Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शुक्रवार, 25 दिसंबर 2015

माणसाचा शोध


                                                                          विजयकुमार राउत
"माणूस द्या मज माणूस द्या'! हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ब्रिद... ग्रीसमधील डायग्नोसिस हा मोठा तत्ववेत्ता. अंगावर एक कापडही न घालता चोविस तास डोक्‍याजवळ कंदील घेउन झोपत असे. दिवसा त्याच्याजवळ कंदील पेटलेला पाहून अनेकांनी त्याला वेडयात काढलं होतं. कुणी विचारल तर तो सांगायचा की कधीपासून मी माणसाचा शोधच घेत आहे. परंतु मला अद्याप माणूसच मिळाला नाही. माणसाला शोधण्यास दिवसाचा उजेड कमी पडू नये म्हणून तो कदाचित कंदील बाळगत असावा.
झांजस हा इसापचा मालक. गुलामांच्या बाजारातून त्याने इसापला खरेदी केलं होतं. अतिशय कृशाग्र बुद्‌धीच्या इसापच्या प्रतिभेची झलक अनेक कथांमधून दिसून येते. एकदा झांजसला विहिरीवर उघडयावर स्नान करण्याची हुबक येते. त्यांने इसापला विहिरीवर माणसे किती आहे हे, पाहून यायला सांगीतलं. इसाप जेव्हा विहिरीवर गेला तेव्हा त्याला विहीरीवर अंघोळ करणा-यांची खूप गर्दी दिसली. तो दूर जाउन एके ठिकाणी उभा राहिला. अंघोळीला येत असलेला प्रत्येक जण रस्त्यात असलेल्या दगडाला ठेच लागून जात होता. विहिरीवर झालेली गर्दी पाहून तहानेने व्याकुळ झालेला एक भिकारी कितीतरी क्षणांपासून उभा होता. इतक्‍यात एक व्यक्‍ती घाईघाईने विहिरीवर अंघोळ करायला आली. त्याला दगडाची ठेच लागताच त्याने मार्गातील दगड हाताने उपटून दुरवर फेकून दिला. मग त्या भिका-याकडे वळला. बादलीने विहिरीतील पाणी काढून त्याने तहानलेल्या भिका-याला पाजले. इसाप घरी गेला. विहिरीवर गर्दी आहे का? किती माणसं आहेत? झांजसचा प्रश्‍न. लगेच इसापने उत्तर दिले की विहिरीवर केवळ एकच माणूस आहे. झांजस खूश झाला. अंघोळ करायला अडचणी नाह म्हणून तो लगबगीने विहिरीकडे निघाला. पाहातो तो काय विहिरीवर गर्दीच गर्दी होती. इसाप खोटा बोलला असं समजून झांजस फार चिडला. इसापला त्याने बेदम झोडून काढले. मारणे झाल्यावर त्याने इसापला विचारले. तू खोटं का बोललास? इसाप म्हणाला आपण मला किती माणसं आहेत, हे पाहून यायला सांगीतलं होतं. परंतु मला त्या गर्दीत केवळ एकच माणूस दिसला. त्याने त्याच्याठिकाणी माणूसकी होती म्हणून मार्गातला दगड उपटून फेकला. इतर सारे स्नान करण्यात मग्न होते. त्यांना तहानेने व्याकुळ झालेला भिकारी दिसला नाही की रस्त्यातला दगड दिसला नाही. परंतु या माणसाने त्या भिका-याला विहिरीचे यथेच्छ पाणी पाजले. त्याची तहान भागविली. असं म्हणतातच झांजसला खूप दुःख झाले. माणूस म्हणून जन्माला आलो तरी माणूस म्हणून जगणेच बहुतेकांना जमत नाही. या छोटया छोटया कहाण्यांतून माणसाचा शोध सर्वत्र सुरू असल्याचे दिसून येते.


परमात्मा गृहउद्योग प्रा.लिमीटेड

विजयकुमार राउत

एका मित्राच्या घरी लग्नसमारंभानिमित्त जाण्याचा प्रसंग आला. मित्र आणि त्याच्या कुटूंबातील सगळे प्रागतिक विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांनी लग्नसमारंभात परंपरेला फाटा देउन कार्यक्रमांची आखणी केली. प्रथापरंपरांना छेद देउन सामाजपयोगी कार्य करण्यासाठी कार्यक्रम आखला. अनाथ, अपंग मुलांना काही साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे नाव होते "आज देवाला सुटी आहे'. कार्यक्रमामागचा हेतू जरी चांगला असला तरी त्यावर बरीच टिका झाली. समाजात देवाला शिव्या देणारे किंवा देवाच्या नावाने दुकानदारी चालविणारे नेहमीच "देव' या शब्दांवरून द्वंद माजवितात. कुणी देव मानतात तर कुणी मानत नाहीत. दोघेही भांडणासाठी देव या शब्दाचा उपयोग करतात. आमच्या एका मित्राने कार्यक्रमाच्या शीर्षकावरून "देव काय चपराशी आहे, सुटी द्यायला, अशी उपरोधीक टिका केली. "देव' ही संकल्पनाच मुळात भांडणाचं कारण ठरत असेल तर अशा संकल्पना आपण वापरतोच कशाला? लग्न सोहळा हा त्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न. तसेच देव मानने किंवा न मानले हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. देवला मानले काय किंवा न मानले काय देवाला काहीच फरक पडत नाही. उलट मानला आणि नाही मानला तरी आपल्यावरच त्याचे परिणाम जाणवायला लागतात. भगवतगीता काय म्हणते किंवा ज्ञानेश्‍वर माउली काय सांगते, याविषयी समाजात चर्चा कधीच होत नाही. तर कार्यक्रमाच्या नावावरूनच टिकाटिपण्णी करून भांडण उकरून काढणार दोन्ही पक्ष समाजात दुही निर्माण करण्याचं काम करीत असतात. समाजात अस्वस्थता निर्माण करून सतत समाजाला वेठीस धरण्याचे काम करतात. ही भांडणं केवळ आजची नव्हे तर युगायुंगांची आहेत.
देवाचा मृत्यू झाला या नित्शेच्या वाक्‍यापासून श्रीराम लांगूंच्या "देवाला आता देवघरातून बाहेर काढले पाहिजे, या विधानापर्यंतचा वाद अजूनही समाजात अस्तित्वात आहेच. गीतेतला परमेश्‍वर , परमात्मा कुठे आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात तसा परमेश्‍वर किंवा कर्म, ज्ञानाच्या ठिकाणी स्थिारावलेला भक्‍त आपण समाजात पाहतो का? याचा कधी शोध घेतो का? ते सोडून प्रत्येकाने आपला स्वतःचा वेगळा "देव' निर्माण केला आहे. हिंदु, मुस्लीम,शिख, ईसाई यांच्या नंतरही अनेक पंथ वा धर्म जन्माला आले आहेत. त्यातूनही उपपंथ निर्माण झाले आहेत. एक लक्षात ठेवा हे धर्म, पंथ वा उपपंथ त्या त्या धर्मसंस्थापकांचे निर्वाण झाल्यावरच जन्माला आले आहेत. इतकेच नव्हे तर आजच्या काळात तर जितक्‍या व्यक्‍ती तितकेच त्याचे धर्म निर्माण झाल्याचे दिसून येतात. परमेश्‍वर किंवा धर्माच्या नावावर वाद होतात. कत्तली होतात. परमेश्‍वर हा शब्दच आता संकुचित आणि कलंकित झाला आहे. देवाचं नाव काढलं की काढलं तर त्याच्यावर हल्ला करणारे संधीच्या शोधातच असतात की काय? काळकर्त शिवराम परांजपेंनी "जसे लोक तसे त्यांचे देव' असे म्हटले होते. आता जितक्‍या व्यक्‍ती तितके देव अशी संकल्पना रूढ होउ पाहातेय. म्हणून आता "देव' ही संकल्पनाच गृहउद्योग प्रा.लिमीटेड कंपनीसारखी झाली आहे. देव, धर्म या संकल्पना स्वार्थी लोकांची दुकानदारी झाली आहे. धर्मगुरू एक ब्रांड घेउन समुहाला गोळा करून सर्वसामान्य जनतेला बनविण्याचे काम करीत आहेत. एक उपासना पद्‌धती हद्‌दपार केली तर दुसरी सुरू करून तिला मानणारे लोक गोळा केले जातात. त्यातून मनामनात द-या निर्माण करणे एवढीच काय ते या धर्मांनी दिलेली भेट होय.. समाजही फुशारकीने आपल्या छातीवर धर्माचा बिल्ला मिरवित असतो. त्याचे परिणामच केवळ आपल्याला भोगावे लागतात. धर्माचा योग्य अर्थ समजून घेणारे फारच थोडे या पृथ्वीतलावर झालेले आहेत. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, कबिर आणि असे कितीतरी संत धर्माला विशाल आकाश मिळवून देण्यासाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे इतिहास गौरवांकित झाला आहे. इतरांनी मात्र इतिहासाचे मढे उकरूनसमाजात दुर्गंधीच पसरविण्याचा धंदा केला आहे.

बुधवार, 16 दिसंबर 2015

कृष्णविवर


* विजयकुमार राऊत

आपलं व्यक्‍तीमत्व म्हणजे केवळ एक हिमनगाचा तुकडा. आयुष्यभर अव्यक्‍त राहिलेला भाग कितीतरी पटीने अधिक. आपणच आपल्यापासून दूर.. अंधाराखाली म्हणा नाहीतर अव्यक्‍त म्हणा. या अव्यक्‍त जाणिवेला आपला कधीही स्पर्श झालेला नसतो. या सृष्टीचे गणित म्हणजे जे दिसते त्यापेक्षा अदृष्य पातळीवर घडणारे असंख्य परिणाम आपल्यासाठी अपरिचित. हें जग भ्रम आहे ..कल्पना आहे.. असे भारतीय तत्वज्ञानात सांगीतलेले आहे.

आपले दोन डोळे या जगाचा वेध घेण्यासाठी मात्र नेहमी प्रयत्न करतात. पण अदृष्य जग हाती यायला मोठे परिश्रम पडतात हेच खरे. आता या प्रकाशाचेच उदाहरण घ्याना. प्रकाश तरी आपल्या दृष्टीत किती असतो बरं?. आपली गरज चिमूटभर प्रकाशाची असते. तो प्रकाश डोळयांच्या सिमा ओलांडून कधीच परावर्तीत होउन परत आलेला नसतो. मग आपण जे डोळयांनी पाहिलं आहे त्याचेच दावेप्रतिदावे करीत बसतो. वाद विवाद होतात. भांडणं होतात. मलाच सत्य गवसलं असा अट्‌टाहास होतो. या जगात बुद्‌द आले , येशू आले, भगवान श्रीकृष्ण .. सगळे सगळे महापुरूष आले .. पण त्यांनी या जगातलं अज्ञान दूर करण्याचा आपापल्या परिने प्रयत्न केला. परंतु कुठे झाला समाज विवेकी? कुठे गवसल्या प्रकाशाच्या वाटा? ज्ञान मिळाल्याचा पुरस्कार करताना एकमेकांच्या खोटयाला खरे माणनारे येथे एकमेकांना दाद देताना सत्याचा अपमान करीत असल्याचं कसं ध्यानात येत नाही, माणसाच्या.? बुद्‌धांनी सम्यक ज्ञान आणलं. मनुष्यजातीनं जिवनात अजिबात उतरविलं नाही.
ओन्ली दू थिंग इज इन्फीनाईट. फस्ट्र युनीवर्स अँड सेकंड हयुमॅन स्टुपीडीटी' असं आईनस्टाईन म्हणाला होता.बरोबर आहे ते. कारण अर्जुनाचा युद्‌धभूमीवर थरकाप उडाला असताना भगवान श्रीकृष्णांनी त्याचा धर्म सांगण्यासाठी आपलं साक्षात रूप दाखविलं. तेव्हा भगवंताच्या आकर्षक रूपानं अर्जुनाचे मन प्रसन्न झाले. ते रूप वारंवार पाहण्याचा तो अट्‌टाहास करू लागला. परंतु भगवंतांनी त्याला भानावर आणलं. "जे तुला आवडलं केवळ ते रूप माझं खरं रूप नव्हे, असे म्हणून भगवंतांनी आपलं विदारक रूप त्याच्यापुढे आणंलं तेव्हा तो मुच्छीत होउन पडला.
भगवान श्रीकृष्ण आधीच पूर्ण अवतार.साक्षात पुर्णत्व. यानिमित्ताने भगवंतांनी दिलेले ज्ञान समजून घेतलं तर आपल्याला जे आवडते आपण त्यालाच धरून ठेवण्याचा प्रयत्न करतो हे आपल्या लक्षात येते. परंतु ज्या गोष्टी अप्रिय आहेत, त्या गोष्टींशीही जमवून घेणं यालाच भगवंत पूर्ण सत्य म्हणतात. महान वैज्ञानिक आईनस्टाईन म्हणतो ते सत्य आहे. कारण आपण प्रकाशालाच परमेश्‍वराचं रूपं मानून त्याची पुजा करण्याची आपली परंपरा आहे. संपूर्ण जगाला जीवन देणा-या सुर्याच्या मागचे जग जेव्हा नेहमी अंधारात राहते. त्याच्या प्रकाशात न येणारे कितीतरी विश्‍व त्याच्या प्रकाशावाचून अनंत वर्षे टिकून आहेच ना? ते जग एकाच वेळी पूर्ण झाकण्याचं सामर्थ्यही त्या सूर्यात नसते. या ब्रम्हांडात अनंत कोटी सूर्य आहेत. तरीही विश्‍वातले "कृष्णविवर' त्यापेक्षा अनंत पटीनं मोठे आहे. भौतिकशास्त्रातील कुठलेच नियम तेथे लागू पडत नाही. विज्ञानात प्रचलित झालेल्या सगळया व्याख्या, गणिते... सगळे सगळे फेल ठरतात. आपल्या अवचेतन मनाच्या शक्‍तीचेही तसेच आहे. ज्या मनाची या लौकिक जगात सदानकदा सोबत असते ते चेतन मन. केवळ 20 टक्‍के एवढंच. उर्वरित 80 टक्‍के शक्‍तीचं भांडार मात्र अवचेतन मनात साठलेलं असतें. या अवचेतन मनाच्या शक्‍तीचा अनुभव घेतल्याशिवाय जगातील बहुसंख्य जिव जगाचा निरोप घेतात. विज्ञानाच्या भाषेतही हेच लागू पडतं. डावा मेंदू क्रियाशिल असल्यामुळे उजव्या मेंदूकडे दुर्लक्ष करून त्याच्या अगणित सामर्थ्याचा अनुभव घेण्याइतके आपण प्रगल्भ नसतो.
                                                                * विजयकुमार राऊत


गुरुवार, 3 दिसंबर 2015

देव देवळात नाही तर माणसाच्या अवचेतन मनात !


                                                                                     * विजयकुमार राऊत

तथागत भगवान गौतम बुद्‌ध देव, पुर्नजन्म किंवा आत्मा या गोष्टीचं खंडण करतात. ज्या गावात किंवा नगरात त्यांचे प्रवचन असे तिथे आदल्या दिवसीच दवंडी देउन या तिन्ही गोष्टींबद्‌दल कुणी काही विचारू नये, असे जाहिर करण्यात येत असे. अगदी तपश्‍येच्या काळात मानवी जीवनातील सुखदुःखाच्या मुळाशी जाउन माणसाला दुःखमुक्‍त कसं करता येईल, यावर त्यांनी तत्कालीन गुरूंनी सांगीतलेले शास्त्रातील सगळेच मार्ग अवलंबिले होते. परंतु सगळं निरर्थक झालं. शेवटी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी सगळे बनेबनाव नाकारले.त्यात "देव'ही संकल्पनाही आहे. देव म्हणताना प्रत्येकाचा "देव' हा वेगळा असतो. तो परंपरेने जसा असतो, तशीच कल्पना करून देवाचे रूप ठरविल्या जाते.

माणसाला शेवटी प्रत्येक गोष्टीत समाधान हवे असते. नैसर्गिक नियमाप्रमाणे त्याचे मन उत्तरासाठी कासाविस झालेले असते. बुद्‌धांनी तर थेट देवलाच नाकारले. त्यामुळे व्यावहारीक जगातील सगळी गृहितकेच ढसाढसा कोसळली. बुद्‌धांनी तथाकथित देव संकल्पना नाकारण्यामागचे रहस्य काय? त्या खोलात जाण्यापूर्वी जगातले सगळे शास्त्र तपासून बघीतले की एक सुत्र हाती लागतं. परमेश्‍वराचा शोध घ्यायला बाहेर पडलेला माणूस शेवटी स्वतःपर्यंतच येउन पोहचतो, हे अध्यात्म सांगते. बुद्‌ध महत्वाचं काहीतरी शोधायला गेले आणि स्वतःपर्यंत येउन नाही का येउन पोहचले? शेवटी हिंदू धर्मातच नव्हे तर इतरही धर्मातील "देव' ही संकल्पना काही धर्मांध लोकांनी स्वतःच्या फायदयासाठी कशी राबविली, हे लक्षात येईल. संत ज्ञानेश्‍वरांना जो बोध होतो, त्यालाच आत्मबोध म्हणतात. तथागत त्याला "स्वयंदीप' होणे म्हणतात. तर हिंदू धर्मात त्याला ब्रम्हज्ञान म्हणतात. आज या लेखात देव, आत्मबोध, स्वयंदीप होणं किंवा ब्रम्हज्ञान म्हणून ज्या गोंष्टींबद्‌दल आपल्याला कुतूहल असते त्याबद्‌दल थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. परमेश्‍वराच्या शोधाची सुरवात कुठूनही करा, तरी एक अवकाश मात्र शिल्लक राहतं. नदी जशी कुठूनही उगम पावते आणि सर्वात शेवटी सागरालाच जाउन मिळते. अगदी त्याप्रमाणे सगळे शास्त्रच अध्यात्मशास्त्राला जाउन मिळतात. नास्तिक असो वा आस्तिक सगळयांचा प्रवास शेवटी त्या अनंताच्या दिशेनेच होतो.
आता मानसशास्त्रातील संकल्पना थोडी समजून घेउया. माणसाला जागृत आणि अजागृत अशी दोन मने असतात, हे सिग्मंड फ्राईडनंच मानसशास्त्रातील संशोधनातून स्पष्ट केलं. आपल्याकडे मनाचं विज्ञान फार प्राचीन आहे. जागृत मन हे फक्‍त वीस टक्‍के आणि 80 टक्‍के अर्धजागृत मनाचा व्याप असतो. या वीस टक्‍के मेंदूपैकी आतापर्यंत सगळयात जास्त मेंदू महानशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईननेच वापरला म्हणतात. "परमेश्‍वर' संकल्पनेच्या निर्मीतीसाठी हा मेंदूच काय तो कारणीभूत आहे. मेंदूच परमेश्‍वराचं उगमस्थान आहे, असं म्हणतात ते अगदी शंभर टक्‍के खरं आहे. या अर्धजागृत मनात जी अमर्याद शक्‍ती आहे, तिला जागृत करण्यासाठी आपल्याला पुन्हा अध्यात्मशास्त्राचा आधार घ्यावा लागतो. कारण ती जागृत करणे म्हणजे फार परिश्रमाचे आणि अशक्‍य कोटीतील आहे. इथं झुठ किंवा नकारात्मक विचारांना तिलांजली द्यावी लागते. खरं तर हा एक "देव' होण्यापेक्षा "माणूस' होण्याचाच प्रयत्न असतो. आपण सकारात्मक असलो म्हणजे कल्पनेशी सहचर्य करून थोडीफार त्या ज्ञानाची अनुभूती व्हायला लागते. कल्पना केल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरविण्याची उर्वरित कामगिरी मेंदूच पार पाडतो. मेंदूला जागृत करण्यासाठी कसे आचरण असावे हे सांगते अध्यात्मशास्त्र ! आता पुन्हा आपण विज्ञानाकडे वळलो तर असं दिसून येईल की अगोदर विज्ञानही अशा अलौकिेक शक्‍तीचं अस्तित्व मान्य करायला तयार नव्हतं. कारण विज्ञानाचा सगळा खेळ चालतो भौतिक जगात माणसाला आलेल्या अनुभवांवर. परंतु अध्यात्मात सांगीतलेले बरेचसे प्रयोग काही काळानंतर विज्ञानालाही सिद्‌ध झालेले आहेत. अणूरेणू किंवा सुक्ष्म लहरीपर्यंत (फ्रिक्‍वेन्सी ) विश्‍वाचे रहस्य मंद गतीने का होईना विज्ञानाच्या हाती आले आहे. शास्त्रज्ञांकडून त्या मागचं रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न हा नेहमी होतच असतो आणि भविष्यातही होत राहिल. विज्ञानाने डावा मेंदू आणि उजवा मेंदू अशी विभागणी केली आहे. डावा मेंदू हा व्यवहारी असतो. तर उजवा मेंदू हा एकंदर भोळा असतो. आपण नाही का शंकराला भोळा म्हणून संबोधतो. हा भोळा शंकर रावणाच्या भक्‍तीलाही पावतो. तो चक्‍क रावणालाही वरदान देउन टाकतो. नंतर या रावणाच्या उपद्‌व्यापाचा प्रभू रामचंद्रानाही भयंकर त्रास होतोच ना. या अवचनेत मनाची शक्‍ती मात्र अफाट आहे. डावा मेंदू संशय किंवा तार्किकतेचा आधार घेउन व्यवहार करतो. व्यवहारात जे काही शिकतो ते डाव्या मेंदूचं कार्य आहे. उजवा मेंदू मात्र आतल्या स्फुर्तींवर चालणारा, म्हणून तो तार्किकतेच्या पलिकडे असतो. "अल्लादुनीचा चिराग' असतो ना तसं उजव्या मेंदूचं कार्य आहे. त्याला पाहिजे ते मनात टाका , त्याप्रमाणेच तो कार्य करण्यास सिद्‌ध होतो. म्हणजे हा मेंदू "ब्रेन प्रोग्रॅमिंग' करतो. संगणकाच्या भाषेत तो "साप्टवेअर' आहे.
आजपर्यंत महान व्यक्‍तींचा इतिहास बघीतला तर एडीसन किंवा मादाम क्‍यूरी यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधन कार्यात याच मेंदूने महत्वाचे योगदान दिल्याचं वाचनात आले. उजवा मेंदू हा भोळा भाबडा असला तरी त्याच्याजवळ अमर्याद शक्‍तीचं भांडार आहे. तो सुप्त असला तरी त्याला जागृत करण्यासाठी आजच्या युगात अनेक मार्ग अवलंबिण्यात येतात. अध्यात्मशास्त्र म्हणून प्राणायाम किंवा कुंडलिनी जागृतीचा मार्ग सांगते.
मानसशास्त्र चेतन, अवचेतन मनाच्या भाषेत मेंदूचं विभागणी करतं. अवचेतन मनाची शक्‍ती ही 80 टक्‍के असल्याचं मानते. तर मेंदू विज्ञान डाव्या आणि उजव्या भागात विभागणी करून उजव्या मेंदूत खूप मोठी शक्‍ती कार्यरत असल्याचं सांगते. त्या दृष्टीने माणसात पाहिजे तसे परिवर्तन घडविता येत असल्याचं आधुनिक विज्ञान सांगते. अध्यात्मशास्त्र मात्र कुंडलिनीच्या रूपात सगळी शक्‍ती सुप्तावस्थेत मुळाधार चक्रात सापासारखी तीन वेटोळे घालून बसल्याचं हजारो युगांपासून सांगते आहे. ही शक्‍ती जागविल्यास अत्त्युच्य उच्च संवेदना जाणवायला लागतात. माणसाचा प्रवास एका अद्‌भूत जगात व्हायला लागतो.
                                                                              * विजयकुमार राऊत



बुधवार, 28 अक्टूबर 2015

दूर देशी बाबा गेले

दूर देशी बाबा गेले

                                              विजयकुमार राउत

रं तर आतापर्यंत आईवरच भरभरून लिहिल्या गेलं. अनेक कविंनी आईच्या दूधाचे रूण शब्दांमधून फेडण्याचा प्रयत्न केला. परंतु "बाप' या विषयावर खूप कमी लिहिलं गेलं, याचं थोडं शल्य वाटतं. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व . आईकडे अश्रृंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट. ठेच लागली तर आपण, आई गं! म्हणतो आणि भीती वाटली तर बाप रे! या जगात जिच्यामुळे आलो ती आई, आणि ज्यांच्यामुळे दुनियेत टिकलो तो बाप, हे दोघेही प्रत्येकासाठी महत्वाचे असतात. कारण ही दोन्ही संसाररथाची चाकं असतात. आई ही जन्म देते तर पालणपोषणाची जवाबदारी पार पाडतो तो बाप. आई ही जन्मदात्री असल्यामुळे तिचा अधिकार तेवढाच महत्वाचा आहे. ज्या घरी बाप असतो त्या घराकडे कुणीही वाकडया नजरेनं पाहण्याचं धाडस करत नाही. म्हणून एका हाडामासाच्या तुकडयाची ओळख जगाला करून देणारा बाप असल्यामुळे त्याचाही हक्‍क काही कमी नाही.

"ख-या बापाची औलाद असशील तर.. बाप दाखव नाही तर श्राद्‌ध कर..रिश्‍तो मे हम सबके बाप लगते है' असा वाक्‌प्रचार समाजात रूढ झाला तो याच अर्थानं. हाच बाप दूरदेशी म्हणजे जग सोडून गेला तर त्या आकाशातील बापाकडे जड अंतःकरणाने आपण मन मोकळं करतोच की नाही ! येशू खिस्त नाही का म्हणाले होते, मी आकाशातील बापाचा एकुलता एक पुत्र आहे म्हणून ! "जगाचा बाप' होउन अनाथ मुलांकडे कृपाळू दृष्टीचे मोरपिस फिरविणारा बाप मला खूप मोठा वाटतो. त्यात संत गाडगेबाबा, शंकरबाबा पापडकर यांचा उल्लेख न झाला तर कृतघ्नता ठरेल. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी दुस-याकडून कीर्तनात तल्लीन झालेल्या गाडगेबाबांना कळते. तेव्हा ते सहज म्हणून जातात....
असे मेले कोटी न कोटी !
काय रडू एकटयासाठी?
गोपाला गोपाला...देवकीनंदन गोपाला !!
अमरावती जिल्हयातील वझझर येथील शंकरबाबा पापडकर शेकडो अनाथ मुलींचे बाप म्हणून कन्यादान करण्याचं व्रत अखंडपणे पार पाडतात, तेव्हा या "फादर इंडिया'चा मनोमन अभिमान वाटतो.
बाप मग खरोखरच अनेक मार्गानं विस्तारत जातो. बाप बहुअर्थांनं मोठा होत जातो. बापाकडे गांभीर्यांनं पाहिलं गेलं नसल्यामुळे "बाप' तसा उपेक्षित राहिला. बापाला मात्र ख-या अर्थांनं समजून घेणारी त्याची लेकच असते. लग्न मंडपात हंबरडा फोडणा-या लेकीचा आवाज बापाच्या जिवाची कालवाकालव करतो. बाप मग कोप-यात जाउन कुणालाच कळू नये म्हणून रूमालाने चेहरा झाकून मनसोक्‍त रडून घेतो. बापाच्या जाण्याची वार्ता मोठयाने हंबरडा फोडून सगळया जगाला सांगणारी त्याची मुलगी असते.
आजच्या काळात बापाची जवाबदारी ख-या अर्थांनं वाढली आहे. बाप मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी, उत्तम राहणीमान देण्यासाठी, मुलांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच कुटूंबाचं पालनपोषण करण्यासाठी सतत तनावाखाली वावरताना दिसतो. त्याच्या व्यथा कुणालाच कळत नाही, असं नाही. नवनविन आव्हानं एका नव्या रूपात पुढे वाढलेली आहेत. त्यातून त्याच्या मनाची कुचंबना होत आहे. जगण्यात भौतिकता वाढली आहे. सगळीकडे चैनीच्या वस्तूंची गर्दी झाल्यामुळे चंगळवाद वाढला आहे. आपली मुलं मागे पडू नयेत, म्हणून बाप जिवाचे रान करतोच आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर एक अपयशी बापाचा शिक्‍का त्याच्या कपाळी बसण्याचीच भिती अधिक. कात्रीत सापडलेल्या बापाला मग काही कटू निर्णय घ्यावे लागतात. बाप कुटूंबापासून दूरावत जातो. नव्या पिढीशी संवाद साधण्यात बाप कमी पडतो. स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी पेलत पडत उठत खस्ता खाणारा बाप मुलांपासून दूर होउ लागतो. वेळेचे गणित सोडविणे त्याच्यासाठी अशक्‍यप्राय होते. सगळं काही करून तो कुटूंबाशी स्वतःला जोडण्यात कधीतरी कमी पडतोच पडतो. अशावेळी कुटूंबात "हिटलर' झालेला किंवा कामाला शरण गेलेला माणूस नाईलाजाने पुरता "वर्कोव्होलीक' होउन बसतो. अशावेळी घरातील एक पणती मात्र बापाच्या आठवणींच्या प्रकाशात दूर देशी गेलेल्या आवडत्या बाबांशी मोबाईलवरून संवाद साधत असते. "पापा जल्दी घर आ जाणा' म्हणत स्मृतींचा ठेवा जपत असते, त्या पणतीचेच दुसरे नाव आहे मुलगी !
                                                         विजयकुमार राउत
                                                                8888876462

सोमवार, 26 अक्टूबर 2015

एक चेहरेपे कई चेहरे.....


विजयकुमार राउत

आताशा "डुप्लीकेट' चेह-यांची अवतीभवती खूप गर्दी होत आहे. कुठलाच चेहरा खरा वाटत नाही. ख-या चेह-यांची सद्‌दीच समाजातून संपली झाली की काय? जो भेटतो तो मुखवटाच घेउन भेटतो. कारण आता म्हणे बाजारात या पॉलीश केलेल्या चेह-यांची भलतीच मागणी आली आहे. एक दोन नव्हे तर असंख्य मुखवटे घेउन ही माणसे अवतीभवती वावरतात. पाहिजे तेव्हा, पाहिजे तो चेहरा घेउन ही माणसं निःसंकोच प्रगट होतात.
जब जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग
एक चेहरपे कई चेहरे सजा लेते है लोग !
प्रत्येक चेह-याची भूमीका वेगळी. प्रत्येक चेह-याची दुनिया वेगळी..व्यासपीठावर हे चेहरे दिमाखात आपली भूमीका पार पाडीत असतात. खचितच आपल्या हेतूमध्ये यशस्वीही होतात. यशस्वी होण्याचा आनंदोत्सव साजरा होतो. पाटर्या झडतात. एकमेकांना भरपूर शुभेच्छाही देउन एकमेकांकडून पाठही थोपटून घेतली जाते. घरून बाहेर पडताना एक मुखवटा, समाजात गेल्यावर दुसरा चेहरा, मित्रांत तिसरा मुखवटा तर फायदयाच्या वेळी पॉलिश केलेला चिकनाचोपडा चेहरा. असे मुखवटयांचे जागोजागी प्रदर्शन होत असते. प्रत्येक व्यासपीठावर हे मुखवटे अग्रेसर असतात. या मुखवटा बदलण्याच्या शेवटी एक मनोरंजक प्रकार घडतो. या चेह-यांना स्वतःचा एकही चेहरा राहात नाही, हीच त्याची "ट्रॅजिडी' ठरते. कारण ही चेहरा गमावून बसलेली माणसं शेवटी आपला अस्सल चेहराच विसरून गेलेली असतात. म्हणून मृत्यूसमयी मात्र ते स्वतःचा चेहरा गमविण्याच्या शल्याने आयुष्याला कोसत बसतात. म्हणूनच संत परंपरेत आत्मरूपाशी जुळण्याचा मंत्र दिला आहे. संत ज्ञानेश्‍वर किंवा संत तुकाराम वारंवार आत्मस्वरूपाविषयी का सांगत असतात? कारण ते आत्मरूपाशी एकरूप झाले होते. त्यांना या अस्तित्वाचा अर्थबोध झाला होता.
आत्मस्वरूप आनंदमय आणि पारदर्शी असतं. ते पाण्यासारखं नितळ आहे. ते जपणं यातच खरा पुरूषार्थ आहे. चेह-यावर दुसरा मुखवटा बसू न देणं मोठं जिकरीचं आहे. समाजात वावरताना नकळत आपण समाजाकडूनच एक चेहरा स्वतःच्या चेह-यावर चिटकून घेत असतो. समाजाच्या चेह-यालाच स्वतःचा चेहरा मानू लागतो. हळूहळू तो स्वरूपापासून खूप दूर जायला लागतो. बरे हा चेहरा खूप टिकाउ नसतोच. वयाबरोबर हा चेहरा कधी गळून पडतो, हे त्याचे त्यालाही कळत नाही.
एक गोष्ट आठवते. या पृथ्वीवर माणूस जन्माला आला तेव्हा आरशांचा शोध नव्हता लागला. त्यामुळे चेहरा कसा असतो याची त्याला कल्पनाही नसावी. एके दिवशी मात्र साचलेल्या डबक्‍यातील पाण्याला ओलांडून जात असताना माणसाने डबक्‍यात चेहरा पाहिला आणि तो त्या चेह-याच्या प्रेमात पडला. त्याला कोणीतरी सुंदर माणूस या पृथ्वीतलावर असल्याचा भास झाला. त्याला शोधण्यासाठी त्याने आयुष्यभर जिवाचे रान केले. परंतु पुन्हा त्याला तो चेहरा कधी गवसला नाही. त्याला खुप दुःख झाले. तो मनाने दिवसेंदिवस खचत गेला आणि झुरून झुरून एकदाचा त्याचा मृत्यू झाला. ही कथा ऐकल्यानंतर काय बोध होतो? आदिमानवापासून सुरू असलेला हा चेह-याचा शोध महामानव होईस्तोवर संपलाच नाही. आपण सारे अजूनही बुद्‌धूच... एकमेकांचा चेहरा घेउन फिरत आहोत. बुद्‌धाच्या "अत्तदीप' प्रेरणेने जागे होउन स्वतःचा चेहरा शोधण्याचा आपण कधीच प्रयत्न करीत नाही. ज्ञानेश्‍वरांच्या साधनेतून आत्मस्वरूप शोधण्याचा मार्ग खरे तर खूप सोपा आहे. परंतु सत्य कधीच अनुभवाला आलं नसल्यामुळे खोटयांलाच खरं मानण्याची खोड आपल्या डोक्‍यातून युगानुयुगे जात नाही.

                                                                        विजयकुमार राउत


गुरुवार, 8 अक्टूबर 2015

अस्तित्वाला स्वयंदीप करणे म्हणजेच बुद्‌धत्व

                                                                             विजयकुमार राउत

कृर काळोखाला चंद्राच्या शितल प्रकाशाने टोकदारपणे चिरत जावं, तसं एक प्रखर अस्तित्व वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री आकाशातील निरव शांततेत स्वयंपूर्ण तेज घेउन उजाडलं, तेव्हा दाही दिशा प्रकाशमान झाल्या. आकाशानेही एक अर्थपूर्ण मौन धारण केलं. करूणा, शांती आणि अहिंसेचं परिपूर्ण ज्ञान घेउन ते अस्तित्व अवकाशाला व्यापून उरलं होतं. युगायुगांपासून उद्‌दामपणे नाचणारा काळोख केवळ शुद्‌ध प्रकाशाच्या भयाने पुन्हा शून्यात गडप झाला. तथागतांचा उदय हजारो युगांसाठी प्रेरणादायी ठरला. म्हणून तथागत जन्माने बुद्‌ध होउन कधीच अवतरित झालेले नसतात. तर माणसांतील संपूर्ण संभावनांचं पूर्ण रूपांतरण अखिल मानवजातीपुढे मूळ स्वरूपात प्रगट झालेलं असतं. बुद्‌धांचा जन्म, त्यांना ज्ञान प्राप्त होणं आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटनांकडे बारकाईनं बघीतलं तर बुद्‌ध एका प्रकाशयुगाचा प्रतिनिधी ठरतो.
सुमारे अडिच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्‌ध या मातीत जन्माला आले. त्यानंतर कितीतरी वर्षे अखंड भारतवर्षाचे क्षितीज त्यांच्या धम्मकायेने उजळून निघालेले असतानाचा काळ हा इतिहासातील सर्वात महत्वूपर्ण ठरतो. या काळात मानवातील अतिउच्च जाणिवा नेणिवेच्या दिशेने प्रसरण पावत असल्याचे दृष्य या जगात इतिहासाला पहिल्यांदाच पहावयास मिळालं. मधल्या काळात अडिच हजार वर्षांपर्यंत बुद्‌ध मात्र या मातीतून अचानक गडप झाल्याचा इतिहासही या मातीने वाचला आहे.
14 ऑक्‍टोबर 1956 या वर्षापर्यंत मानवतेला उत्थानाकडे नेणारा बौद्‌ध धम्म येथून कसा काय हद्‌दपार झाला, याचं उत्तरही इतिहासात सापडेल. परंतु इतिहास जाणने म्हणजे केवळ भूतकाळातील मृत अवशेषाचे उत्खनन करून त्यांची पूजा बांधणे नव्हे, तसं त्याचं स्वरूपही नसावं. इतिहास हा संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला जोडून त्याच्याशी नाते अबाधित करण्याचा संशोधनात्मकरित्या केलेला एक सुयोग्य प्रयत्न असावा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो शोषित, पिडीत बांधवांना बौद्‌ध धम्माची दीक्षा देउन त्यांचे जीवन नुसतेच सुकर केले नाही तर ते स्वयंप्रकाशित केले. कारण केवळ बुद्‌धाचा एकमेव धम्मच माणसाला त्याची खरी ओळख देउ शकतो, या विचारातून दीक्षेच्या रूपाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बोधीसत्वाचे बिज या भूमीवर रूजविले. आज बोधीवृक्षाचा खूप मोठया प्रमाणात विस्तार झाला आहे. या विश्‍वातील प्रामुख्याने सुमारे दहा-पंधरा देशांत अनेक शाखांच्या रूपाने बौद्‌ध धम्म विकास पावला आहे. धम्म हा त्यांच्या जगण्याचा एक भाग झाला आहे.
आयफोनचा शोध लागण्यापूर्वी स्टीफन जॉब्ज हा संशोधनात अनेकदा असफल झाला असताना त्याला कुणीतरी भारतात जाउन बौद्‌ध धम्माबद्‌दल जाणून घेण्याचा सल्ला दिला. नैराश्‍येच्या स्थितीत स्टीफन भारतात आला. बौद्‌ध धम्माच्या तत्वज्ञानाने त्याच्यावर गारूड घातले. तो येथून परत गेला, तेव्हा त्याला त्याच्या संशोधनातील त्रुटया लक्षात आल्या आणि तो संशोधनात एकाग्र झाल्यानंतर यशस्वी झाला. त्याच्या मागचे कारण शोधले तर बौद्‌ध धम्म हा "स्वयंदीप' होण्याचा जो मंत्र देतो,या सुत्रातच दडलेले आहे. स्टीफनला आलेला हा अनुभव केवळ जादू किंवा हिप्नोटीझमच्या स्वरूपाचा नव्हता. "स्वयंदीप' या शब्दातच यशाची बिजे रूजलेली असल्याचे स्टीफनला जाणवले आणि आयफोनचा शोध लावण्यात तो यशस्वी ठरला. त्याचप्रमाणे महान संशोधक आईनस्टाईन हा सुद्‌धा संशोधन करताना बुद्‌ध विचारांनी प्रभावित झालेला होता. संशोधक, साहित्यीक व जगातील महान विचारवंतांना आज बुद्‌ध न संपणारं पर्व वाटतं. चिनमध्ये ताओ, जापानमध्ये झेन किंवा शिंतो, थायलॅंड, मॅनमार, मलेशिया, श्रीलंका, कम्बोडिया, तायवान आदी देशात विविध स्वरूपाचा बौद्‌ध धम्म अस्तित्वात आला आहे. बुद्‌ध होण्याचं बिज प्रत्येकात सुप्तावस्थेत असतं, हा संदेश बुद्‌ध विचारधारेतून मिळतो.
आज आधुनिक शिक्षण पद्‌धतीच्या नावाने सगळीकडे ओरड आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेला इंग्रजांच्या कुटनितीची किनार असल्यामुळे तिनं निर्माण केलेला समाज हा सुजान झालेला नसून विकृत होत आहे. आधुनिकतून भौतिक विकास तर साधल्या गेला. परंतु श्रीमंत, गरीब, जाती-धर्माची दरी मात्र खूप वाढत गेली. दोन्ही वर्ग एकमेकांबद्‌दल वाटणा-या भावनेतून अस्वस्थ आहेत. इंडिया विरूद्‌ध भारत, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. प्रतिशोधाचं रसायण मेंदूत तयार झालं आणि ते आता दिवसेंदिवस रक्‍तातून सळसळत आहे. हिंसा, बलात्कार, भ्रष्टाचार, एकमेकांबद्‌दची असुया यासारख्या विकारांनी माणुसकीला पुरतं गिळंकृत केलं आहे. समाज हा प्रतिशोधाच्या आगीत रात्रंदिवस जळत आहे. हे सर्व होत असताना या समस्यांचं मूळ मेकॉलेच्या शिक्षणपद्‌धतीत आहे. भांडवलदारीच्या युगात माणूस एक "प्रॉडक्‍ट' झाला आहे. "युज अँड थ्रो' या भूमीकेतून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. माणूस बनविणारी शिक्षणव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. त्यामुळे राष्ट्राचा मुख्य पाया असलेला माणूसच राजकारणातून उपद्‌व्याप निर्माण करीत आहे. एक उद्योगपती "हम फौलाद नही, इनसान बनाते है' असं म्हणतो, तेव्हा तो त्या कारखान्याच्या मालाच्या गुणवत्तेचच कौतुक अधिक करीत असतो. माणूस बनविणारी शिक्षणपद्‌धतीच अस्तित्वात नसल्यामुळे येथे सगळे प्रश्‍न "जैसे थेच' आहेत.
बुद्‌ध प्रज्ञा,शिल आणि करूणा ही माणसाची त्रिसुत्री असल्याचं सांगतात तेव्हा त्यात जगातील प्रत्येक माणसाच्या उदयाची शाश्‍वती आहे. भगवान बुद्‌धांचा धम्म हा खरा विज्ञानवादी आहे. प्रतित्युतसमुद्‌पादसारख्या सिद्‌धांतातून त्यांनी त्रिकालाबाधीत विज्ञान सांगीतलं आहे. नुसत्या स्त्री -पुरुषाच्या मिलनाने शरीर निर्माण होत नाही, तर त्याबरोबर तिसरी घटना घडते, त्याला च्युतिचित्त (deceased conciousness)असे म्हटले जाते. भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे, त्यात "कराल तसे भराल' असे म्हटले आहे. असे सांगणारा बुद्ध हा पहिला महापुरुष ठरतो. भगवान बुद्ध म्हणतात की शीलाच्या आणि शुद्ध आचरणाच्या मार्गाने मनुष्य आपल्या भविष्याचा निर्माता होउ शकतो किंवा अशुद्ध आचरणाने मनुष्य आपल्याकरीता नरक म्हणजे दुःखमय जग निर्माण करू शकतो . जेव्हा आपले चित्त, वाणी, शारीरिक क्रिया संतुलित असतात तेव्हा विचारही संतुलीतच असतात. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की पापकर्म आपणच करतो आणि माणूस अशुद्ध होतो. म्हणून तो स्वतःला पापकर्म करण्यापासून दूर ठेवू शकतो आपणही आपली शुद्धी करू शकतो. पाप किंवा पुण्य या दोन्ही गोष्टी स्वतःवरच अवलंबून आहेत. सम्यक संकल्प, सम्यक आजिवीका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हीच निर्वाण प्राप्त करण्याची साधनं असल्याचे बुद्‌ध सांगतो.
शरीराची रचना पुष्कळशा धातूपासून बनली असून त्यांनी शरीराच्या स्वभावावर धातूंचा प्रभाव असल्याचे बुद्‌ध म्हणता. त्यावेळचे तथागातांचे धातूविषयक असणारे त्यांचे विचार हे आजचे विज्ञानही मान्य करीत आहे. वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले आहे की शरीर निरनिराळ्या तत्वांचे बनलेले आहे. यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्‍सिजन, नाइट्रोजन, लोह, कॅल्शियम, फॉस्फोरस हे मुख्य आहेत. वरील तत्व आवश्‍यक मात्रेत शरीरात पोहचले पाहिजे, या तत्वांची कमी किंवा अधिकता निश्‍चितपणे शरीराला प्रभावित करते. विज्ञानाची ही मान्यता बुद्धाने मध्यम मार्गातून सांगितली आहे. संपूर्ण बुद्‌ध वाचल्यानंतर त्याच्या दिशेने चालने म्हणजे स्वतःच स्वतःला जाणून घेणे किंवा स्वयंदीप करणे होय.

                                       विजयकुमार राउत
                                      vraut90@yahoo.com

                                                                   

मंगलवार, 6 अक्टूबर 2015

हातचा एक


               
                                                                   
                                                                                       विजयकुमार राऊत 
प्रत्येकाला जगताना "हातचा एक' घेउनच जगावे लागते. हा हातचा एकच जगण्याला सुसहय करतो. जर तो नसता तर जीवनाचे गणितच विस्कटले असते. म्हणून गणित सोडविताना हा "हातचा एक' घेण्याची प्रथा कशी पडली, कधी आणि का पडली, हे त्या "हातच्या एकाला'च माहित. गणितात तर चक्‍क त्याला हाताशी घेतल्याशिवाय मोठी आकडेमोड करणेच शक्‍य नसते. हा "हातचा एक' येतो कुठून आणि तो आपण का घ्यावा, याची उत्तरे अजूनपर्यंत तरी माझयासारख्याच्या अल्पबुद्‌धीच्या माणसाला सापडलेली नाहीत. कधी कधी प्रश्‍न पडतो की हा हातचा एक न घेता जगणारी माणसं जगतात तरी कशी ? परंतु खूप विचार केल्यानंतर त्यामागचं रहस्य उलगडायला मदत होते. कुणी डोळयामागचं अस्तित्व जरी नाकारत असले तरी डोळयांनी दिसणारं स्वतःचं अस्तित्व मात्र मान्य करतातच. "हातचा एक' ते स्वतःलाच घेउन जगत असतात. म्हणून तेही स्वतःचे अस्तित्व सिद्‌ध करण्यासाठी ठासून विरोध करतात.पाठपुरावे सादर करतात. परंतु या ठिकाणी फक्‍त "ऑबजेक्‍ट' बदलतो., "सबजेक्‍ट' मात्र उरतोच. ही एवढी तगमग कशासाठी आणि कुणासाठी ? हा नुसता विरोधाला विरोध नसतो. त्यातही बरेच काही आहेच. हातचा एक न घेणा-यांची मग बेरजेची, वजाबाकीची पद्‌धत जरी आगळीवेगळी असली तरी मात्र जे उत्तर किंवा जे समाधान लाभतं त्याची जातकुळीही पहिल्या गटासारखीच "बहुजन सुखायच'च्या मार्गातून "स्वांत-सुखाय'कडे जाणारी असते. कुणी त्यांना नास्तिक म्हटलं तरी ते स्वतःलाच पदोपदी सिद्‌ध करीत असतात. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक तुम्हाला "हातचा एक' गवसलेला असतो. वास्तविक पाहता नास्तिकवादी "हातचा एक' घेणे पसंत करणार नाहीत. परंतु स्व प्रतिमेतच तेही कुठल्या ना कुठल्या प्रकारे "हातचा एक' स्वीकारतात. तेच त्यांचे आधार होतात. या एकाशिवाय ओसाड आयुष्य कुणी जगू शकतच नाही. ज्यांना हातचा किंवा दुसरा जोडता येत नाही, ते नैराश्‍याच्या अवस्थेत एक तर स्वतःला संपवून घेतात किंवा आत्मघातकी मार्ग तरी निवडतात . शेवटी काय तर जगण्याला कसाचाही का असेना आधार हवा असतो. जीवनाला कुठली तरी हिरवळ हवी असते.
आज "स्पेशलाईजेशन'चा जमाना आहे. प्रत्येक अवयवाचा डॉक्‍टर वेगळा असतो. प्रत्येक विषयाचा तज्ज्ञ वेगळा. परंतु कितीही "स्पेशलायजेशन' आले तरी विविधता हा निसर्गाचा स्वभाव आहे. या विश्‍वात सगळं एकमेकांशी जुळलेलं आहे. प्रत्येक वस्तूत कार्य-कारणभाव आहे. म्हणून "स्पेशयलायजेशन' व त्यातून मिळणारं उत्तरही पुन्हा अपूर्णच. एका शाखेतून दुसरी शाखा जन्माला यावी तसं. एका विषयात कुणी तज्ज्ञ झालं की दुसरा विषय किंवा दुसरं काहीतरी त्याच्या हातून सुटतंच. मग त्याची गती डबक्‍याला समुद्र समजण्यासारखी होते. अष्टदिशांतून सळसळ करीत वाहणा-या नदया शेवटी त्या अथांग समुद्रालाच जाउन मिळतात. दिशाहिन झालेली सगळी वादळं अवकाशात जाउनच विसावतात. विविध ठिकाणावरून निघालेले मार्ग एकाच ठिकाणी जाउन लुप्त होतात. जगातील सगळया पॅथ्या, पोथ्या, विचारप्रवाह एका अनामिक शुन्यात जाउन गडप होतात.
नावाचा प्राणीच अजब आहे. भिन्न व्यक्‍ती, भिन्न विचारधारा, भिन्न स्वभाव. कुणी ईश्‍वर मानतात, तर कुणी नाकारतात. कुणी आस्तिक आहेत तर कुणी नास्तिक. कुणी आशावादी तर कुणी अस्तित्ववादी. कुणी कुठल्या पंथाचा तर कुणी कुठल्या धर्माचा. प्रत्येकाचा देव वेगळा. धर्म वेगळा. आधुनिक विज्ञानापुढे अनेक आव्हाने निर्माण करणारा माणूसच. या माणसाच्या भवतीच सगळी शास्त्रे घुटमळतात. सगळी महाकाव्ये त्याच्यासाठीच जन्माला आलेली असतात. भौतिक जगातील सगळे शोध त्याच्याचसाठी लागलेले असतात. एवढं सगळं असूनही, लक्षावधी वर्षे उलटूनही माणूस कुणाच्याच हातात कसा लागला नाही?हेच कोडं आहे. भगवान श्रीकृष्णही कुणालाच कळू शकत नाहीत.
साधं गणित करीत असताना मेंदूला बराच ताण दयावा लागतो. खूप डोकं खाजविल्यानंतर शेवटी उत्तरं मिळतं, तेव्हा आपल्याला कोण आनंद होतो! म्हणून हा माणूस आहे तरी कसा, याचा अभ्यास करणारी, उत्तरं शोधण्यासाठीच नवनवीन शास्त्रे या पृथ्वीतलावर निर्माण होत आहेत. तुमच,ं आमचं, या विश्‍वाचं, या विश्‍वातील जिव जंतूचं अस्तित्व शोधणारीं विज्ञानशास्त्रे तरी काय करीत असतात? सगळीं बुद्‌धीमत्ता कमावूनही विवेकबुद्‌दी नसेल तर या जगाचं काही खरं नाही. हिंदू धर्मशास्त्रांत भगवान शिवाच्या तिस-या डोळयाची कल्पना सांगीतली आहे. भगवान बुद्‌धांची संपूर्ण विचारसरणी "सम्यक' शब्दाला महत्व देणारी आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की "मी निर्गुण निराकार आहे' तेव्हा त्यातील गर्भीत इशारा समजण्यासारखा असतो.
कुठलीच एक बाजू संपूर्ण सत्य नसते, त्यासाठी शंकराचा तिसरा डोळा किंवा बुद्‌धांचा सम्यक विचार जाणल्यावरच सत्य कळू लागतं. ही भाषा सर्वसामान्य मेंदूला कळण्यासारखी नसते , म्हणूनच सगळे मी म्हणतो तेच खरे भासविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी माणूस अंतर्मुख झाला तर त्याच्या आतील प्रत्येक पेशी त्याच्याशी बोलू लागतील. नेमकं हेच अध्यात्मशास्त्रात सांगीतल्या जाते. अध्यात्म म्हणजे काही कुठल्या धर्माचं शास्त्र नव्हे. बुद्‌ध वाचणे म्हणजे बुद्‌धाचा इतिहास वाचणे नव्हे तर स्वतःला समजून घेणे होय. इतिहासातील मुडदे उखरून हाती काय येणार? शिवाजींचा इतिहास वाचताना भूतकाळ खोदून भविष्यकाळात जयजयकार करणे म्हणजे शिवरायांना समजून घेणे नव्हे. परंतु राजकीय पक्ष आपल्याला पुन्हा भूतकाळात नेउन थडग्याला कवटाळणेच शिकवित असतात.
अध्यात्मशास्त्र तरी काय असतं? अध्यात्म म्हणजे अस्तित्वाशी एकरूप होंणं. इतिहास म्हणजे भूतकाळाचे उत्खनन करून अस्तित्वाशी जोडण्याचा प्रयत्न. विज्ञान म्हणजे अस्तित्वाला भविष्याशी जोडून ठेवण्यासाठी चाललेली धडपड. भूगोल म्हणजे अस्तित्वाचा या ब्रम्हांडात वेध घेण्याचा अखड प्रयत्न, गणित म्हणजे अस्तित्वाचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करून बाकी अस्तित्व किती उरते ते जाणून घेणे, भूमीती म्हणजे अस्तित्वाचे क्षेत्रफळ व त्रिज्या काढणे, अस्तित्वाच्या विचारांचा केंद्रबिंदू शोधणे म्हणजे मानसशास्त्र, असा विविध शास्त्रांचा हेतू तपासला की अस्तित्वाच्या दिशेनेच सगळे जात असल्याचे लक्षात येईल
.

                                                               विजयकुमार राऊत

शनिवार, 22 अगस्त 2015

का रे हा दुरावा ?


                                                   * विजयकुमार राऊत


भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सभोवताली
या ह्रदयाची त्या ह्रदयाला "रेंज' मिळेना !!


युवा गझलकार प्रसेनजित गायकवाड यांच्या या कधीकाळी ऐकलेल्या ओळी मनात घर करून गेल्या. एकविसाव्या शतकात हे असे एककल्ली आयुष्य आपल्या सर्वांच्या वाटयाला येईल, असं कदाचित कुणाला वाटलं नसेल. परंतु ही मानवी जीवनातील अपरिहार्यताच असते. आपण भौतिक वस्तूमध्ये सुख शोधण्याच्या आधीन होत गेलो की त्याचे दुष्परिणामही थोडेफार भोगावे लागतात. सर्वप्रथम मानवी उत्क्रांतीच्या प्राथमिक काळात भावना व्यक्‍त करण्यासाठी अगोदर शब्द जन्माला आला. त्यानंतर भाषा, संभाषण, संवाद आणि सुसंवाद आदी कौशल्ये टप्प्या टप्प्याने विकसीत होत गेली. लगेच उपयुक्‍ततेची मर्यादा ओलांडल्यानंतर त्याचे विपर्यासात रूपांतर व्हायला वेळ लागत नसतो. आजच्या घडीला वर्तमान काळाचे अवलोकन केल्यास अगदी तिच स्थिती आपल्यापुढे निर्माण झाली, असे म्हणणे गैर होणार नाही.
कोणे एके काळी संवाद कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याला दूरच्या प्रिय व्यक्‍तीशी संवाद साधायला साधने उपलब्ध नसल्यामुळे मानवासमोर अनेक प्रश्‍न उभे राहिले. त्याने भौतिक साधनांची निर्मीती करण्यासाठी शोधाशोध सुरू केली. महाकवी कालिदासाने "मेघदुत' सारख्या काव्यातून प्रेयसीापर्यंत संदेश पोहचवायला आकाशातील काळयाकुट्‌ट मेघांना आवाहन केले. ही कविकल्पना जरी असली तरी त्यामागे प्रेयसीपर्यंत ह्रदयातील संवाद तातडीने पोहचावा ही तगमग होती. कुठलीही कल्पना ही सुरवातीच्या काळात कल्पना असते आणि पुढे तिच मुर्त रूप धारण करते. पुढच्या काळात भावनेतून संवाद साधण्याची निकड भासू लागली.
पंख होती तो उड आती रे रसिया ओ बालमा
तुझे दिल का दाग दिखलाती रे...!!

या गीतातील नायीका प्रियकराशी संवाद साधण्यासाठी किती अस्वस्थ आहे, हे कळायला त्या प्रेयसीशीच तादात्म पावावं लागेल. दूरदेशी असलेल्या आपल्या काळजाच्या तुकडयाला मनातील व्यथा कळायला त्या आईच्या भावनांशीच एकरूप व्हावं लागेल. कुठलीही भावनीक अस्वस्थता माणसाला एका वेगळया पातळीवर नेउन ठेवते. ती व्यक्‍ती कवी असेल तर ती शब्दातून भावनेचा फुलोरा फुलविते आणि जर संशोधक वृत्ती असेल तर एखाद्या कल्पनेला मूर्त रूप मिळते. गरजेतून निर्माण झालेल्या मानसिक अस्वस्थेच्या काळात संदेश पोहचविण्यासाठी कुठल्यातरी माध्यमाशी जवळीक साधण्याची अस्वस्थता निर्माण झाली. इतिहासात डोकावलं तर राजा- महाराजांच्या काळात कबुतराच्या माध्यमातून संदेश पोहचविण्याचे तंत्र त्याकाळीही मानवानेच शोधून काढले. पुढे त्याचा वापर एका राज्यातून दुस-या राज्यात महत्वाचा संदेश पोहचविण्यासाठी होउ लागला. दूतांकरवी परस्परांना निरोप पाठविणे हेही ओघाने आलेच. त्याहीपूर्वीच्या काळी काही साधू, सन्याशी, योगाचार्य समाधी अवस्थेत दूरवरच्या व्यक्‍तीशी संवाद साधत असल्याची उदाहरणे मिळतात. अर्थात हा उपाय सर्वसाधारण माणसाच्या अवाक्‍यातला नसल्यामुळे आणि तेवढे योगसामर्थ्य अंगी नसल्यामुळे सर्वसामान्यांची मात्र गोची झाली असावी. सर्वसामान्यांनी प्रिय व्यक्‍तीला संदेश देण्यासाठी आपापल्या त-हेने उपाय शोधून काढण्याची कामगिरी पार पाडली.
आजच्या माहिती -तंत्रज्ञानाच्या युगात अनेक साधनांचा वापर संवादासाठी केला जातो. मोबाईल फोनचा जन्मही त्यातला महत्वपूर्ण टप्पाच म्हणावा लागेल. आज त्यानं आपलं अख्खं आयुष्यच व्यापून टाकलं आहे. दुस-या महायुद्‌धाच्या काळात टेलिफोन अस्तित्वात आला. त्या टेलिफोनचे सर्वांना काय अपृफ !
मेरे पिया गये रंगून, वहासे किया है टेलिफून
तुम्हारी याद सताती है.. जिया मे आग लगाती है!
असे नटून थटून भावविभोर स्थितीत गात असलेल्या नायीकेला दूरदेशी गेलेल्या आणि तेथून फोनवर बोलणा-या नायकाचा किती अभिमान ! 1940 च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली. पुढील तीन दशके यावर सखोल संशोधन झालं. ग्राफिक्‍स इन 3, एप्रिल 1973 ला ग्राफिक आउटला पहिला मोबाईल कॉल आला. मोटोरोला कंपनीचे इंजिनिअर मार्टीन कुपर यांनी हा कॉल केला होता. तो प्रोटोटाईप पद्‌धतीचा मोबाईल फोन होता. या घटनेला बरोबर चाळीस वर्ष झाले. केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल आता स्मार्ट फोन झाला.
एकवीसाव्या शतकात स्टीव्ह जॉब्ज या युवा संशोधकाने आय फोनचा शोध लावला आणि तो तरूणांच्या गळयातील ताईत झाला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आतातर संवाद साधण्यासाठी शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. मित्रहो नव्वदच्या दशकात घरोघरी "ब्लॅक अँड व्हाईट' टिव्ही उपलब्ध होता. त्यावेळी केवळ दूरदर्शनखेरिज कुठलेच चॅनल आपल्याकडे उपलब्ध नव्हते. टिव्हीवरचे कुठलेही रटाळ कार्यक्रम पाहणे सर्वांना ठाउक होते. नंतर रंगीत टिव्हीच्या जमान्यात शेकडो चॅनल येताच ती झटपट बदलण्यासाठी रिमोटच हाती आला. त्यामुळे "क्षणात बदलती झटपट चॅनल...क्षणात फिरूंनी उणिव दिसे' अशी स्थिती झाली. आता तर खाता पिता बायकोशी बोलण्याला "व्हॅट्‌स अप'चा वापर होउ लागला. प्रिय व्यक्‍तीच्या मृत्यूची बातमी तेरवीच्या दिवशी मिळण्यात डाकसेवेला लागणारा कालावधी आणि त्यातील गमती जमती आता संपुष्टात आल्यात. इंटरव्हयू झाल्यानंतर हमखास मिळणारा नोकरीचा कॉल हा आयुष्याची घडी विस्कटण्यात महत्वाची भूमीका बजावित असल्यामुळे आता तसे काही उरले नाही. आजच्या काळात क्षणात मिळणारा संदेश जीवनात एक नवीन बदल घडविणारा आहे. उपयोगीतेच्या दृष्टीतून त्याचे महत्व अबाधित असले तरी मनात उभी दरी निर्माण करण्यातही संदेशाच्या माध्यमाचा महत्वाचा वाटा आहे, हेही आता लक्षात घ्यावं लागेल. मुलगा, बाप, भाउ, बहिण, प्रेयसी आणि मित्र यांच्यात परस्परात वाढलेला दुरावा आज विकोपाला पोहचल्याचे चित्र समाजात उभे राहिले आहे. त्यातून नवीन प्रश्‍न आपणच जन्माला घातले आहेत. आठवून बघा याअगोदरचे आयुष्य. त्याकाळात एकमेकांशी संवाद साधण्यात अडचणी जरी असल्या तरी त्यात आरोपाची जागा नव्हती. होता फक्‍त लडीवाळपणा. लटकी तक्रार आणि लटका राग. त्यातही परस्परांना वाटणारी मौज. नात्यांत निर्माण झालेला गोडवा. आज एड्‌सपेक्षा भयंकर विसंवादाच्या नव्या आजाराने शल्यही मनात निर्माण केले. दोन पिढया, दोन मनं, दोन मित्र , प्रेमीयुगल आणि नातलग यांच्यात सुवांदाऐवजी विसंवाद कानी पडतात. यातून नात्यांचा विस्फोट होत असेल तर त्यांना जोडणारे एखादे भावनांचे "सॉप्टवेअर' शोधून काढता येईल का? आईवडिल आणि मुलातील दुराव्याला "जनरेशन गॅप'चे नाव तरी देता येईल. परंतु पती-पत्नी , प्रेमीयुगूल, मित्र आणि आप्तस्वकीयांतील दुराव्याला खतपाणी देण्याचं काम या गॅझेट्‌समुळे होत असेल तर त्याला काय म्हणावे? माणूस एकलकोंडा होणे हे उत्तम आरोग्याचे प्रतिक नसून मानसिक आजाराचे लक्षणच होत आहे. अतिरेक हा कधीही घातकच. शायर जोश मलीहाबादी यांच्या शब्दात सांगायचे झाले तर...
जो दिल की है, वो बात नहीं होती !
जो दिन न हो, वो रात नहीं होती !!
मिलते तो है अक्‍सर, जमाने से जोश !
पर अपने आप से मुलाकात नहीं होती !!

नवनवीन संशोधनांनी मानवी जीवनात विकासाची पहाट तर उगवली, पण तिला पुन्हा काळोखाची किनार लाभू नये, किमान एवढी अपेक्षा करायला काय हरकत आहे?

                                             विजयकुमार राऊत

मंगलवार, 18 अगस्त 2015

सारे जहा से अच्छा....


विविधतेने नटलेल्या भारतभूतील प्रत्येक राज्याने हातातील बोटांप्रमाणे आपापले वैशिष्टय जपले आहे. बाराव्या शतकातील जगन्नाथपुरी मंदिरातून निघणारी भगवान जगन्नाथ अर्थात श्रीकृष्णाची रथयात्रा संपूर्ण भारतभर प्रसिद्‌ध आहे. जगन्नाथपूरी जिल्हयातील राजधुवा येथे राहणारे जम्बवेश्‍वर रावतराव यांचे कुटूंब हिंगणा एमआयडिसी परिसरात गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. इथल्या रितीरिवाज आणि परंपरेत ते इतके समरस झाले की त्यांना आता महाराष्ट्रच आपली कर्मभूमी वाटायला लागले आहे. इथल्या सण उत्सवाच्या वेळी त्यांना आपले गाव आणि एकंदर राज्यच दिसते. परक्‍या राज्यात कसे काय रमलो, यांचे त्यांना मुळीच आश्‍चर्य वाटत नाही. कारण तीस वर्षापूर्वी येथे आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राने कधी परके मानले नसल्याची साक्ष ते देतात.

उमेदीच्या काळात कलकत्ता येथे एका कारखान्यात नोकरी केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात ते श्रीधर श्रीचंदन या मित्रासोबत नागपूरला आले. हिंगणा एमआयडिसीतील "निको अलायकास्टींग' या कारखान्यात त्यांना कॉंन्ट्रॅक्‍टरचे काम मिळाले. काही दिवस येथे काम केल्यानंतर ते मित्रासोबत मुंबईला गेले. तिथे त्यांचे मन रमेना. पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्याकरीता तिथल्या परिस्थितीशी सामना करीत त्यांनी दीड वर्ष "टाईमपास' केला. नागपूरच्या निको कंपनीने त्यांना परत बोलावून घेतले. तेव्हापासून ते एमआयडिसी परिसरात स्थायीक झाले.
सदयस्थितीत एमआयडिसी परिसरात ओडिसा राज्यातील किमान दहा हजार नागरिकांसोबत "लिटील ओडीसा'च येथे वसले आहे. हिंगणा मार्गावरील राजगृहनगरातील घरापासून शिवमंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथे जगन्नाथ सेवा समितीची स्थापना करून धार्मिक कार्यक्रमातून त्यांना एकत्र आणण्याचे काम ते करीत असतात. जगन्नाथाच्या भव्य यात्रेतून ते दरवर्षी इतर नागरिकांच्या सहकार्याने ओडिसा संस्कृतीचे दर्शन घडवितात. "हरे राम हरे क्रिष्ण' या अखंड संकीर्तनातून ते धार्मिकतेचा ओलावा जपण्याचं काम करतात. नागपूर शहरात "उत्कल असोशिएशन' नावाने ओडिसा बांधवांचे मोठे संघटन आहे. या संघटनातून त्यांना विविध प्रश्‍न सोडवून घेता येतात. मासे ,भात त्यांचे मुख्य अन्न. इथे मात्र ते कुटूंबासह महाराष्ट्रीय जेवणच पसंत करतात. जेवनात कांदा, लसून ते वर्ज्य मानतात. जगन्नाथांच्या यात्रेच्या वेळी घेतलेल्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्हयातून ओडिसी बांधव एकत्र येतात. सुमारे 30 ते 40 हजार नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. अमरावतीमध्ये त्यांच्या सांस्कृतिक संवर्धनाचे केंद्र आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून कला, सांस्कृतिक, परंपरांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या राज्यात आता जातीप्रथा मोडीत निघाल्याचे ते खंबीरपणे सांगतात. ओडिसात महान क्रांतीकारक सुभाषच्रंद्र बोस यांचे पालणपोषण आणि शिक्षण झाल्याचे सांगताना त्यांची छाती इंचभर फुगली नाही तरच नवल.
राज्याचे वैशिष्टय विचारले की ते म्हणतात की ओडिसा राज्यात गावा गावात युवकांसाठी क्‍लब असून त्यातून युवकांना राज्याच्या विकासात कसा हातभार लावता येईल, याचे प्रबोधन केले जाते. कोरापूर, रायगडा, सुंदरगड, मेहरगंज आदी जिल्हे बंजर आहेत. येथे नक्षलावादाची मुख्य समस्या असल्याचे सांगताना त्यांच्या चेह-यावर चिंतेची लकेर उमटते. ओडिसा राज्यातून येणारे बहुतांश लोक एमआयडिसीतील कारखान्यात काम करतात. कुणी प्लंबरचे काम तर कोणी बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. रावतराय यांना तीन मुले आहेत. ज्योतीवल्लभ हा मुंबईत विमा कंपनीत तर दुसरा जगत हा सदया कॉलेजमध्ये शिकतो आहे. गीता ही मुलगी लंडनला दिली. जावई संदीप सिंग सॉप्टवेअर कंपनीत काम करीत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून आज मनासारख्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे समाधान श्री.रावतराय यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसते. बादलकुमर संपतराय, धीरज रावत, रमेश महंतो आदी सहका-यांसमवेत जगन्नाथ सेवा समितीच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यही करीत असतात. महाराष्ट्राने आपल्यात सामावून घेतल्याबद्‌दल ते राज्याचे आभार मानतात.
वृक्षारोपन हा त्यांचा आवडता छंद आहे. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा ते सल्ला देतात. त्यांच्या परसबागेत विविध वृक्षांची लागवड केल्याचे दिसते. "मोरो देशप्रती मोरा बहुत प्रेम है' त्यांच्या एका वाक्‍यातून त्यांचे देशाविषयीचे विचार कळतात.

                                                 विजयकुमार राऊत


रविवार, 16 अगस्त 2015

रोबोट (लघुकथा)


                                           * विजयकुमार राउत

देर रात ऑफिससे थका हारा लौटने के बाद दीक्षांत बिस्तरपर लेट गया. जल्दही वह गहरी निंदमे खो गया. आधी रातके के बाद उसने एक अजिबोगरीब सपना देखा. सपने मे पती-पत्नी एक दुसरे के साथ जोर जोरसे लढ रहे थे. महिलाने गुस्से मे खुद के हाथोंसे बदनपर मिट्‌टी का तेल डाल ले दिया और माचिस की तिल्लीसे आग लगा दी. आग कि लपेटे उठ रही थी. और वह जोर जोरसे चिल्ला रही थी. देखते ही देखते वह जलकर कोयला हो गयी. कुछ पल सन्नाटा. लेकीन ताज्जुब की बात ! वह महिला कोयले की ढेरसे फिरसे उठकर खडी हुवी. परिजनो के साथ हसती मुस्कुराती बाते करने लगी. आग मे स्नान करने के बाद वह खुद को बडी फ्रेश और आरामदेह महसूस कर रही थी. दुसरे दृष्य मे एक मोटारसायकील की ट्रकके साथ जबरदस्त भीडत हो गयी. मोटारसायकीलस्वार का शरिर छिन्न विच्छीन्न हो गया . कुछ पल बाद कार्टुन फिल्म के किसी पात्र की तरह उसने अपने आप को इकठ्‌ठा कर लिया. गाडी को किक मारी और वह निकल पडा. जैसे कुछ हुवाही न हो. परिक्षा मे फेल होने के कारण एक छात्रने जहर पी लिया. कुछही पलमे वह खुद को बडा फुर्तीला और हलका महसूस कर रहा था ! दरवाजे पर बेल बजने के बाद दीक्षांत का सपना टूट गया. बिस्तरसे उठकर उसने दरवाजा खोला. जमिन पर पडे अखबार को उठाया और पढने लगा ! खबर थी.."गुडगाव के किसी कारखाने मे तकनिकी गलती के कारण एक रोबोटने किसी मजदूर को उठाकर भट्‌टी मे डाल दिया...
                                                                                   विजयकुमार राऊत

..

बुधवार, 12 अगस्त 2015

संथारा की आत्महत्या?


विजयकुमार राऊत


जैन धर्मातील "संथरा' पद्‌धतीने जीवनाचा त्याग करण्यावर सुप्रिम कोर्टाने नुकतीच बंदी आणली आहे. अन्नाचा त्याग करून जीवन संपविणे हे आत्महत्तेच्या कक्षेत येते, असा न्यायालयाचा निर्वाळा आहे. "संथरा' म्हणजे जैन धर्मातील अनेक महत्वाच्या विधींपैकी एक. अशारितीने जीवन संपविण्याचा अधिकार कुणालाच नसून पद्‌धत कुठलीही असो ही आत्महत्याच ठरते, असे कायदा सांगतो. त्यामुळे जैन धर्मातील साधूसंतांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे.
दरवर्षी देशात या विधीतून मरण पत्करणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारने आमच्या धर्मात हे थेट हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अन्नत्याग करून जीवन संपविणे म्हणजे आत्महत्या ठरत असेल तर जगात केवळ एकच जैन धर्म अशा त-हेने आत्महत्तेचे समर्थन करतो. हाच मुद्‌दा आपण हिंदू धर्माच्या चालीरितींना लावल्यास याही धर्मातही अशी प्रथा आहे. वारकरी पंथाचे संस्थापक संत ज्ञानेश्‍वर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी संजिवन समाधी घेतली होती. अलिकडे आचार्य विनोबा भावे यांनीही अन्नत्याग करून देह त्यागल्याचे उदाहरण ताजे आहे. ज्या ज्या संतांनी अशाप्रकारे मरण स्वीकारले ते ते आजच्या कायदयाच्या भाषेत आत्महत्तेच्या गुन्हयास कारणीभूत ठरतात. परंतु कायदयाने दंडूका आणण्याची त्यावेळी पद्‌धत नसल्यामुळे ज्यांनी ज्यांनी या मार्गाचा अवलंब केला असेल त्यांना त्यांना त्यावेळी दोषी ठरविता आले नाही. हिंदू धर्मातही तशी जीवन संपविण्याची रित होती. आता कायदयाने तशी बंदी घातल्यामुळे सहसा तसे करणारे फारच थोडे आहेत.
अशा पद्‌धतीची आत्महत्या करणे हे पाप नाही का? स्वतःच स्वतःचा अमानुष खून करणे योग्य आहे का? आणि माणूस आत्महत्या का करतो? याचा शोध घेणे मला महत्वाचे वाटते. चित्रपट दिग्दर्शक स्व.गुरूदत्त यांनी आत्महत्तेसारख्या क्‍लेषदायक मार्गाने जीवन संपविले. मुलांच्या गोष्टी सांगणारे संवेदनशील मनाचे साने गुरूजी यांनीही हाच मार्ग अवलंबिला आहे. अनेक चित्रपट अभिनेते किंवा विद्यार्थी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तर त्यामागे अशीच काही धार्मिकतेतील महान तत्वं आहेत का? मुळीच नाही.
चित्रपट तारका व विद्यार्थी यांच्यात एक समानता आहे ती म्हणजे आपल्याला नको झालेले जीवन संपवून टाकणे. चित्रपट तारकांना मिळणारे "ग्लॅमर' पुढच्या काळात मिळत नसल्यामुळे त्या यशापशयाच्या दृष्टीकोनातून स्वतःचे जीवन संपवून टाकतात. यशानंतर एकटेपणातून आलेले नैराश्‍य त्यांना आत्महत्तेस प्रवृत्त करीत असते.
विद्यार्थी मात्र आपण अपयशी झाल्याच्या भावनेतून आत्महत्तेचा मार्ग स्वीकारतात. ते पालकांच्या इच्छा, आकांक्षा व स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येत नसल्यामुळे हे जीवन निरर्थक म्हणून ते संपवून टाकतात. शेतकरी नापिकीने आत्महत्या करून संसारातील प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करतात. वयात आलेला मुलगा किंवा मुलगी प्रेमात धोका मिळाल्याने किंवा आईवडिलांचा विरोध म्हणून आत्महत्या करतात. कुणी अपमान झाल्याने तर कुणी जीवनाचे ध्येय गाठू न शकल्याने या निर्णयाप्रत जातात. परंतु जैन साधु संन्याशांनी अंगीकारलेले "संथारा' व्रत त्या दर्जाचे मुळीच नसते. कायदा मात्र त्यांना गुन्हेगार ठरविण्याची भाषा करतो. कारण कायदयाला दुसरी भाषाच अवगत नसते.
प्रभू रामचंद्रांनी जिवित कार्य संपल्यानंतर शरयु नदीत जाउन स्वतःला जलसमाधी घेउन या इहलोकातील यात्रा संपविली होती. तर भगवान श्रीकृष्णाने आयुष्याच्या उत्तरकाळात राज्यात निर्माण झालेली यादवी पाहून अत्यंत व्यथीत अंतःकरणाने जंगलात जाउन स्वतःला पारध्याच्या बाणातून इच्छा मरण स्वीकारले. कारण त्यांच्याजवळ आता काहीही करण्यासारखे राहिलेले नव्हते. ज्या कार्यासाठी आपण पृथ्वीतलावर किंवा जन्मास आलो ते पूर्ण झाल्यामुळे मला आता येथे राहण्याचा काळीमात्रही अधिकार नाही, ही त्यामागची भावना असते. म्हणूनच संत ज्ञानेश्‍वरांसारखे महापुरूष ज्ञानेश्‍वरीसारखा महान ग्रंथ लिहून झाल्यानंतर संस्कृतातील ज्ञानाची सर्व कोठारे बहुजनांसाठी उघडी करून स्वतः संजिवन समाधीत विसावतात. गुरूदत्त सारखा चित्रपट अभिनेता यश व अपयश दोन्ही बाजू उपभोगून झाल्यानंतर आता कुठलेच काही मिळवायचे बाकी राहिले नसल्यामुळे आता जगण्याचे प्रयोजन काय, असा विचार करतो आणि स्वतःला संपवून घेतो. अतिउच्च पातळीवरील तत्वज्ञानातून स्वतःला संपवून घेण्याचा हा मार्ग आहे. संजिवन समाधी घेण्याची संतांची भावना आणि एखादया तरूणाने किंवा शेतक-याने केलेली आत्महत्या, एकाच दर्जाच्या कशा असू शकतात? एक नैराश्‍येतून तर दुसरी स्वच्छेने एका उदात्त जाणिवेतून स्वीकारलेली गोष्ट आहे.
आपण कोण आहोत, कशासाठी जन्माला आलो व आता तेही करून झाले मग एक दिवसही जगण्याचा अधिकार आपल्याला राहात नाही, ही संतांची भूमीका असते. तर मनासारखे झाले नाही या गटात सर्वसामान्य माणसे येत असल्यामुळे सगळयांची आत्महत्तेमागील भूमीका आपण समजू शकतो.
जीवन मिळाल्यानंतर विशेषतः त्याची जाणिव झाल्यामुळे जगण्याची सुप्त इच्छा निर्माण होणे, ही नैसर्गीक बाब आहे. प्रत्येक जण जीवनावर मनापासून प्रेम करतो. जीवना मनासारखे होत नाही म्हणून तो आत्महत्याही करतो. इच्छा मरणही त्यातलेच. अलीकडे इच्छा मरणाला स्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. जीवनाचे होत असलेले हाल कुणाला पाहावत नाहीत. म्हणून तो जीवनाला धिक्‍कारतो. जीवनाची वाट फुलांसोबतच काटयांनीही सजलेली असते, याचा तो विचार करीत नाही. माझे जीवन मला वाटते तसेच असावे, हा हट्‌ट करून जीवनाचे मोल ठरविले जाते. परंतु हेच जीवन म्हणून त्यातील प्रत्येक सुखदुखाचा बाउ न करता जगत जाणे कधीही उत्तम. यालाच जीवन जगण्याची कला म्हणतात आणि ती जीवनाकडूनच आत्मसात करायची असते. जाणिवेच्या उच्च पातळीवरील समाधी किंवा संथारा या पद्‌धती धर्माने स्वीकारलेल्या आहेत. प्रपंचातून सगळे आश्रम, सगळया भूमीका पार केल्यानंतर आता जगून काय उपयोग? सगळे या पृथ्वीतलावर भाडेकरू आहेत. एखादया जन्माला येणा-या नवीन जिवासाठी जागा सोडणेच केवळ हातात आहे. दुस-यासाठी संधी निर्माण करण्याची जागा रिकामी करणे ही संथारा या विधीमागची भूमीका असते. परंतु लोकशाहीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या काळात कायदे सगळयांसाठीच सारखे असल्यामुळे ते विशेष व सर्वसामान्य असा भेद करीत नाही. त्यामुळेच इच्छा मरण, संथरा, संजिवन समाधीला कायदयाचा विरोध आहे. परंतु धार्मिक, सामाजिक, कायदेविषयक बाबी या माणसांच्या समस्येची उकल करण्यासाठी एकमेकांची निर्मीती झाली आहे. धर्म हा कायदा म्हणून कोणे एके काळी अस्तित्वात होता. आता त्याची जागा कायदयांनी घेतल्यामुळे लोकशाहीत कायदयांनाच प्राधान्य देणार हे ठरलेलेच आहे. त्यावेळी धर्म हा सामाजिक पातळीवर सर्वमान्य नसल्यामुळे कायदाव्यवस्थेची गरज पडली, हे ओघाने आलेच. म्हणून कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या हिताकरीता बनलेला आहे. त्याच्यासाठी चांगले ते योग्य आणि त्याच्यासाठी जे अपायकारक ते अयोग्य. शेवटी कायदा दुहेरी भूमीकेत कधीच राहू शकत नाही. म्हणून धार्मिक क्षेत्रात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा धर्म आणि कायदा एकमेकांच्या विरोधात संघर्षाच्या पवित्रयात तयार असतात.

विजयकुमार राऊत


बुधवार, 5 अगस्त 2015

ही भाषा प्रतिकांची !

    


* विजयकुमार राऊत

या भूतलावर मानव प्राणी जन्माला आला आणि त्याने त्याच्या अस्तित्वाचा अमिट ठसा काळाच्या छाताडावर उमटविला. इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याची प्रगती आणि भरभराट फार अल्पावधीतील आहे. त्याच्या कल्पनाशक्‍तीच्या बळावर अख्या ब्रम्हांडाला गवसणी घालण्याचा प्रयत्न त्याने केला. खरंच अप्रतिम आहे, त्याची बुद्‌धीमत्ता. म्हणूनच अतिशय प्राचीन काव्य असलेल्या वेदोपनिषेदांनीही त्याला सलाम केला. नदी-नाले, झरे, इंद्रधनुष्य , आकाश, मेघ, फुलपाखरे पाहून तो अतिशय आनंदीत झाला तर विजांचा गडगडाट, सोसाटयाचा वारा, जोराचा पाउस पाहून तो घाबरलाही. सृजनाचा सोहळा उघडया डोळयांनी पाहात असताना तो सृष्टीच्या विविध रूपात अगदी हरखून गेला आणि मृत्यूचे तांडव अनुभवताना अतिशय दुःखीही झाला. तरीही यातून स्वतःच्या बुद्‌धी आणि गुणवत्तेच्या जोरावर त्याने नेत्रदीपक यश मिळविले, याचे आश्‍चर्य वाटायला नको. निसर्गतः अनुभव आणि स्मृतींचा साठा त्याच्याकडे उपलब्ध असल्यामुळे त्याला हे सगळं शक्‍य झालं. त्याने एवढी प्रचंड झेप घेतली ती स्वकर्तृत्वाच्या बळावर.
स्मृतितून ज्ञान जपून ठेवणे आणि आलेल्या प्रसंगातून कसे सावधपणे जीवन जगायचे, याचा धडा घेणे, ही ज्ञान मिळविण्याची त्याची अगदी साधी, सोपी पद्‌धत. जीवन जगत असताना तो सर्वात अगोदर निसर्गातील निरीक्षणे डोळयांनी नोंदवित गेला. पुढे अनुमानातून त्याची वारंवार पडताळणी करीत गेला. त्यातून मिळालेले ज्ञान जवळच्या लोकांना देत गेला. ज्ञानाची आदानप्रदान करताना त्याने निवडलेली भाषा ही शिल्प, चित्र, नृत्य, काव्याची होती. हजारो वर्षे गेल्यानंतर वेदोपनिषदांतून त्याने काव्यात्मक शब्दां
त विज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला. या जगात अनुभवसंपन्न होण्यासाठी त्याच्या कित्येक पिढया अशा खर्ची गेल्या असाव्यात. अर्थात त्यासाठी शेकडो वर्षाच्या कालावधीत त्याला बरेच चटके सोसावे लागले. मागच्या माहितीत सुधारणा करून त्याला अद्यावत करण्याचे काम त्याच्या पुढच्या पिढीेने केले. हे करीत असताना त्याचा सहोदर असलेल्या निसर्गातील सुत्रे त्याने शब्दांत मांडताना त्याच्या माहितीचा साठा शिल्लक राहावा म्हणूनी कधी शिल्पकला, हस्तकला, काव्य, प्रतिके यांचा आधार घेउन पुढच्या पिढीसाठी ज्ञान राखून ठेवले. त्यापैकी काव्य आणि परंपरेने चालत आलेली प्रतिके यांचे उदाहरण घेता येईल.
आता शिवलिंगाची पुजा करताना कुठलाही भाविक त्यामागचे विज्ञान समजून घ्यायलाच तयार नसतो. शिवलिंग हे सृष्टीतील एक सृजनाचे प्रतिक असल्याचे त्याला सांगीतले तर तो काहीसा नाक मुरडतो. लिंग आणि योनीच्या माध्यमातून या सृष्टीतील सृजनाची पुजा करण्याचा आमच्या पूर्वजांचा किती मोठा भाव होता. त्याबद्‌दल त्याने अतिशय आदरभाव बाळगला होता. त्याने दहीदूधाने त्याचा अभिषेक केला होता. त्यासाठी दहीदुध वापरणे हेही प्रतिकात्मक होते. संभोग हे सृजनशिलतेतील महत्वाचा टप्पा आहे, हे यातून सुचित करण्याचा प्रयत्न आमच्या पूर्वजांनी केला. सगळी सृष्टीच त्याभोवती फिरत आहे. सगळे सामाजिक, अध्यात्मिक, भौतिक व्यवहार, हे संभोगाच्या अवतीभवती सुरू आहेत. निसर्गानं केलेली ही योजना आमच्या पूर्वजांना कळली होती , तर असो.
दुसरे प्रतिक आहे लक्ष्मी आणि सरस्वतीचे. या नावाच्या देवता कधीही जन्माला आलेल्या नाहीत, हे समजून घेणे आवश्‍यक आहे. प्रतिभेचा स्पर्श झालेला माणूस हा नेहमी साध्या वेशात राहातो. त्याला चमकदारपणा किंवा दिखाउपणा मुळीच पसंत नसतो. उलट श्रीमंत व्यक्‍तीला आकर्षक वस्त्रे परिधान करून राहणे आवडत असते. किंबहुना आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा उपद्‌व्याप तो करीत असतो. म्हणून त्याच्याकडे
सगळे आकर्षित होतात. हा गुण प्रत्येक युगात , प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळतो. लक्ष्मी , सरस्वती ही निव्वळ प्रतिके आहेत. अगदी ताजे उदाहरणच द्यायचे झाले तर भारतमातेचे देउ शकतो. भारतमाता नावाची देवी सिंहावर आरूढ होउन हातात झेंडा किंवा कमरेला तलवार लटकवून असल्यामुळे ती देवी कधीतरी जन्माला आली असल्याचा भाव अडाणी माणसांबरोबर शहाण्या लोकांच्याही मनात उत्पन्न होउ शकतो. मित्रहो, जगाच्या पाठीवर असा प्रकार कुठेही बघायला मिळत नाही. अमेरिका, इंग्लंड, युरोप किंवा चिन, जापानने असले काहीही केले नाही. आपण मात्र मनात देशभक्‍ती कायम राहावी, म्हणून पुन्हा 36 कोटी देवांदिकांमध्ये पुन्हा भर घालून एकेका देवतेची निर्मीती करीत राहतो. देवा-धर्माशिवाय आपल्याला चांगली भावना जोपासताच येत नाही, हेही तितकेच खरे. देव निर्माण केल्यामुळे आपण किती देवभोळे आहोत, याचा प्रत्यय जगाला पदोपदी आणून देतो.
अर्धनारीनटेश्‍वराची मूर्ती बघीतली तर आपले अध्यात्म हे दुसरे तिसरे काही नसून विज्ञानच असल्याचे प्रत्यंतर येते. "एक्‍स ..एक्‍स' हे गुणसुत्र केवळ महिलांत असते. एक्‍स वाय गुणसुत्रांची जोडी ही पुरूषात असते, हे आपल्याला शाळेत शिकविले जाते. हे ज्ञान सुरक्षित ठेवण्यासाठी प्राचीन माणसाजवळ
कुठलेच साधन नव्हते. अर्धनारीनटेश्‍वराच्या प्रतिकांतून त्याने विज्ञानच सांगीतले आहे.
भाषेचा उत्कर्ष झाल्यानंतर गेल्या दहा वीस हजार वर्षात तो काव्य करायला शिकला. ज्ञान स्मृतीत राहावे म्हणून त्याने काव्याचा आधार घेतला. श्‍लोकाच्या माध्यमातून काव्याच्या रूपात मंत्र, सुत्रे, गुढ ज्ञान मांडण्याचा प्रयोग त्याने सुरू केला .. तो आजतागायत सुरू आहे. म्हणून ज्ञानेश्‍वरांनी भिंत चालवली किंवा ज्ञानदेवाने रेडयाच्या तोंडून वेद वदवून घेतले, असे आपण म्हणतो, तेव्हा त्यातील काव्य किंवा अर्थ समजून न घेता त्यांच्या केवळ शब्दार्थावर जाउन संत ज्ञानेश्‍वरासारख्या प्रतिभासंपन्न महाकविंवर चमत्कारी असल्याचा आरोप करतो. तसेच अगदी अलीकडच्या काळातही आपण संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराजांजबद्‌दल अफवा उठवून त्यांचे दैविकरण करणे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लढाईत जिंकण्यासाठी आई भवानीनेच तलवार दिली, तिचेच नाव भवानी तलवार असे साळसुदपणे सांगतो किंवा ऐकतो.

तुळसीचं रोपटं आपण दारात लावतो, ते कशासाठी तर त्यामागे ते प्राणवायुचा पुरवठा सतत चोविस तास करीत असते, हे त्यामागचं विज्ञान आहे म्हणूनच ना !
ही प्रतिके हजारो वर्ष चालत आल्यानंतर त्यामागचा विचार पुसला गेला. विज्ञान हरपलं. प्रतिकांची भाषा विसरून आपण एक अंधश्रद्‌धा म्हणून तिचा स्वीकार केला. आताही प्रतिकांची पुजा करताना त्याचा विचार होताना दिसत नाही. प्रतिकांमधील विज्ञान आणि मोठा ज्ञानाचा साठा कालांतराने मृतप्राय झाल्याचं जुन्या प्रतिकांमधून दिसतं.
अलीकडच्या काळात माणसांपेक्षा प्रतिकेच मोठी झालेली आहेत. आधुनिक विज्ञानाने हा धोका ओळखून सुत्रांची भाषा अवगत केली. "एचटुओ' हे सुत्र मांडले की त्यात स्पष्टीकरण देण्याची गरज उरत नाही. "एचटू ओ' म्हटले की पाणीच. त्याखेरिज दुसरा अर्थ काढताच येणार नाही. महान रूषीमुंनींनी काव्यात मांडलेलं ज्ञान सर्वसामान्य माणसाच्या डोक्‍यावर अंधश्रद्‌धा म्हणून नाचू लागताच विज्ञानानं स्वीकारलेली पद्‌धत माणसाला डोळस करणारी आहे. त्यामुळे भविष्यात भौतिकशास्त्रासारखी विज्ञानशास्त्रे सुत्रांच्या भाषेत ज्ञान मांडण्यास प्राधान्य देतील, हे निर्विवाद सत्य आहे.

                                                              * विजयकुमार राऊत


सोमवार, 3 अगस्त 2015

जगणे सुंदर व्हावे म्हणून !

                                     


                                                           विजयकुमार राऊत

नकारात्मकता एक गंभीर आजार आहे...आणि त्यापासून आपण शेकडो मैल दूर राहिलेलचं बरं...जे सिद्‌ध करायचे आहे, ते या सृष्टीच्या बाहेरचे नसल्यामुळे आपण कधीही, केव्हाही आणिा काहीही सिद्‌ध करू शकतो. अगदी पुराव्यांचा आधारावर गुन्हा नसतानाही फासावर लटकविण्याचीही सोय करता येते. त्यासाठी रिसर्च सेंटरच्या किंवा "नासा'च्या दाखल्यांची मुळीच गरज नसते. आपण सकारात्मक राहिलो तर आपल्यालाच त्याचा फायदा नक्‍की होईल आणि दुस-यांनासुद्‌धा सुखी करण्याचं सामर्थ्य आपल्यात येईल. त्यासाठी मनाची उत्तम तयारी मात्र करणे आवश्‍यक असते... आणि तेच कठीण आहे. एखादा आळसी विद्यार्थी अभ्यास न करता नापास होण्यासाठी कठीण आलेला पेपरच कारणीभूत होता, असं म्हणत जवाबदारी झटकण्यातच धन्यता मानतो.
अध्यात्म खोटं वगैरे सांगून मनातील नकारात्मक विचाराकडे होत असलेली वाटचाल वेळीच आपण आपल्या ध्यानात घेतलेली बरी. कारण कुठलेच शास्त्र खोटे नसते. पोटार्थी लोक त्याचा बाजार करून त्याला बदनाम करतात. माझे जगणे मला सुंदर करायचे आहे, म्हणजे मला माझ्‌यावरच लाख लाख उपकार करायचे आहेत, असे समजल्यास काय हरकत आहे? माझया ठिकाणी इतरांसारखा क्रोध हा विकार असेल, निंदा करण्यात मला आनंद वाटत असेल किंवा दुस-याला दुःख देण्यात जर मला असुरी समाधान मिळत असेल तर.. क्षुद्र विचार केल्यानंतर माझया वागणुकीतून दुनियेचा रोष पत्करणार असेल आणि माझे या रस्त्याने चालल्यास नुकसानच अधिक आहे. असे केल्याने माझे आरोग्य संपुष्टात येत असेल तर उत्तम विचारणे ठेवणे हा गुन्हा नाही. "मेडिटेशन' करणे हे दुबळया मनाचे लक्षण नव्हे तर एका स्वस्थ आणि निरोगी मनाचे सामर्थ्य होय.
चला मान्य आहे. तुमच्या दृष्टीकोनातून एक बाजू आजारी आणि लंगडी आहे; तर दुसरीही मानसिक आजाराचे लक्षण आहेच की नाही? एक वाट मानसिक विकासाकडे आणि दुसरी मानसिक अधःपतनाकडे जाते, हेही जेवढे लवकर लक्षात घेतले तर उर्वरित आयुष्यात आपोआपच बदल होतो. मित्रा, सकारात्मकता घेउन जगलो तर नुकसान काय आहे? उलट फायदाच आहे. प्रश्‍न देव मानण्याचा किंवा न मानण्याचा नाही. कारण देव मानणारेच बहुतांश अतिरेकी असतात, हे मला मान्य आहे. माणूस हा आस्तिकही असत नाही आणि नास्तीकही नसतो. फक्‍त तो वास्तविक असतो, म्हणून त्याच्या जगण्याकडे वास्तविक दृष्टीने पाहणेच योग्य आहे. आपण स्वतःत सुधार घडवून आणण्याच्या दिशेने टाकलेले पाउल कधीच वाईट नसते. परमेश्‍वर भक्‍ती वगैरे वगैरे तर निव्वळ औपचारिकता आहे आणि तशी एका अर्थाने विशिष्ट पातळीपर्यंत तिची गरज आहे. पुढच्या प्रवासात त्याची काही गरजही उरत नाही.

"आता विश्‍वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे ' म्हणत "जो जे वांछिल ते तो लाहो' अशी प्रार्थना करीत सर्व मांगल्याचा विचार करणे म्हणजे कोणत्या देवाला मानणे होय? देव मानल्यास किंवा न मानल्यास देवाचे किंवा कुणाचे फार काही नुकसान होत नाही. खरा "परमेश्‍वर', "गॉड, "अल्लाह' जो असतो त्याला नाव देता येणार नाही, तो आहे फक्‍त आनंदस्वरूप. व्यवहारात निखळ आनंदाऐवजी हिशेबच लावणारे जास्त भेटतात. कुठलीही गोष्ट चुकीच्या मापात मोजने आणि तिची तुलना करून तिचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व ठरविणे म्हणजे स्वतःलाच मर्यादा घालण्यासारखे आहे. माझ्या स्थितीला नशिब किंवा दुसरा कोणी जवाबदार आहे, असे म्हणत कुढत जगणारे जगात कमी नाहीतच. स्वतः स्वतःशी प्रामाणिक राहून जगण्याचा प्रयत्न करणे, हेच ख-या अध्यात्माचे सार्थक आहे. जगभरातील कुठल्याही धर्माचा अभ्यास केला तर हेच सांगीतलेलं आहे. थोडे डोळे उघडे ठेवून बघावे लागेल एवढेच!

मनाचा रस्त्याला भलतीकडे जाण्यापासून रोकले तर जीवन नव्याने कळायला लागेल. विरोधाभास जगात नाहीच, दिसतो तो फक्‍त चांगला, वाईट भास. माझ्याविरोधात बोलणारे किंवा वागणारे माझे हितचिंतक आहेत, हे ही तितकेच खरे आहे, हेही स्वीकारले तर कुणाशीच शत्रुत्व उरत नाही. माझे शत्रू नकळत माझ्या विकासाला हातभारच लावित आहे. थोडा मनाने बदल स्वीकारला तर? द्वंद निर्माण करून वाद घालणे माणसाचा स्वभाव आहे. वाद-विवाद ओढून घेण्यासाठी काही बोलणे गरजेचे नाही. मी चकार शब्द न बोलताही वाद घालण्यासाठी कोणीही माझ्यावर टिका करू शकतो. कारण त्याचं मन त्याच्याशी द्वंद करीत असतं. त्याला तसे स्वातंत्रय आहे. प्रश्‍न माझा नाही तो त्याचा स्वतःचा आहे. वाद घालण्याचा विचार त्याचा स्वतःचा असल्यामुळे त्याला मी काय करणार? अशावेळी शब्दाने शब्द वाढविण्यापेक्षा मौन राहूनच स्थितीचे निरपेक्ष भावाने चिंतन केले तर आपणच आपल्याला ख-या अर्थाने दिसायला लागतो.. नव्या अर्थाने कळायला लागतो. तेव्हाच जीवन अधिकाधिक सुंदर होत जाते !

                                                            विजयकुमार राऊत


                                                            विजयकुमार राउत

शनिवार, 1 अगस्त 2015

सत्यम शिवम सुंदरम


                                                                                       विजयकुमार राउत

हमारे बुर्जूग कहा करते थे "सत्यम शिवम सुंदरम' जानेमाने फिल्म निर्देशक कपूर की इसी नाम की फिल्मभी आयी थी. उसमे एक गीतभी था. "सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है..' सत्य बहोत ही सुंदर और पवित्र होता है...सत्य बहोतही सरल और साधा होता है. इसलीये तो उसे शिव यानी परमात्मा कहा जाता है. लेकिन हमको व्यावहारीक जीवन मे असत्य स्वीकारना बडाही सरल लगता है. क्‍योकी हमारे सामने जो चिज चमचमाती है , उसीकी ओर हमारे कदम बढने लगते है . असत्य तो हमे बडा प्रभावित करता है. हमारा उसी के प्रति आकर्षण हो जाता है. जो हमारे फायदे का होता है उसेही हम सत्य कहते हेै. जो नुकसानदायक होता है वो हमारे लिये असत्य हो जाता है. सत्यपर सिर्फ हमारीही मालकी होती है ऐसा हम समजते है.धीरे धीरे जिंदगी मे एैसीही हमारी सोच बन जाती है.लेकीन वास्तविकता जाने तो सत्य फायदा और नुकसान के पार होता है. सत्य किसकी पैरवी नही करता बल्की सत्य सत्य होता है. यह तथ्य जिस दिन हम अपना लेते है तब हमारे जिवन मे परिवर्तन शुरू होना शुरू हो जाता है.

खलील जिब्रान की एक कहाणी है. एक बार सत्य और असत्य की दो देविया स्वर्गसे उतरकर जमींपर आ गई. स्वर्ग से लेकर पृथ्वी तक का उनका सफर था. उनके कपडे बहोतही मैले हो चुके थे. धुल चढ गई थी कपडो पर . तो उन्होने एक नदी मे जाकर स्नान करने की इच्छा जतायी . औरे वे दोनो नदी के पास गई. दोनोने अपने बदन से कपडे उतारे, किनारे पर रखे और नदी मे कुंद पडी. तैरते तैरते सत्य की देवी बडी दूर तक चली गई थी. और असत्य की देवी बहुत पिछे रह गई. उस समय असत्य की देवीके मन मे विचार आया. वापस पलटकर सत्य के देवी के कपडे उसने पहन लिये और भाग गयी. सत्य की देवी स्नान करने के बाद किनारे पर आई . उसके कपडे किनारे से गायब हो चुके थे. सुबह हो चुकी थी. नदी किनारे लोगोकी चहल पहल अब बढनेवाली थी. उसने तुरंत असत्य के देवी के कपडे पहनकर अपनी लज्जा ढांकणे की कोशिश की और वहा से भाग गयी. तबसे लेंकर अभी तक हालत वैसेही कायम है. सत्य अपने वही फटे पुराने कपडे पहने है. और असत्य की देवी आकर्षक खुबसुरत लिबास मे दुनियामे इतराते हुवे घुम रही है. जिब्रान की यह कहानी काफी मशहूर है. जिब्रानने हकीकत बयाण की है इस कहानीमे. सत्य बहोत साधे लिबास मे घुम रहा है. हमारी संस्कृतीमे अक्‍सर ऐसा हमको देखने को मिलता है. धन की देवी लक्ष्मी और विद्या की देवी सरस्वती. चित्र मे दोनो एक साथ होती है. सरस्वती जो की कला व विद्या की देवता है. वे साधे, सफेद कपडे पहनकर हाथो मे विणा लेकर प्रसन्न भाव दर्शाते हुवे बैठी है. और धन की देवी आभुषणोसे मढी हुवी आशीर्वाद देने के लिये हाथो से सोने-चांदीकी बरसात करते दिखाई देती है. हमारे समाज की निव को हम देखते है तो साफ जाहिर होता की किसी गुणवान व्यक्‍ती को पैसो के अभाव के कारण पिछे रह जाता है. हालाकी गुणवान और चारित्रयवान व्यक्‍ती हमेशा अपने कर्म को साधना और तपस्या समझकर जिता है. वो लोगो के नजर मे बिचारा गरीब कहलाता है. हालाकी वह दिलसे बहुत अमीर होता है. उसे पैसो के सामने अपमानीत होना पडता है. दुनिया चमकनेवाले जुगनू को बहुतही पसंद करती है. लेकीन वे जानते नही की चमकनेवाला जुगनू ज्यादा देर तक चमककर रोशनी नही दे पाता है.

वैसे देखा जाये तो असत्य पहचानने मे और सत्य की परख करने मे हमारी आँखे हमेशा धोखा खा लेती है. जो हमारा ध्यान अपनी ओर आकर्षित कर लेता है वो कभीभी सत्य नही हो सकता. थोडा गौरसे देखेंगे तो असली बात समझ मे आ जाती है. चिनमे एक रूषी थे. उनकी सत्यके बारे मे बहुतही ख्याती थी. वो सत्य के सामने कभीभी समझोता नही करते थे. राणीने कई बार उसकी परीक्षा लेने के लिये उसे महल आने की खबर भेजी. लेकीन उस तपस्वीने राणी की आज्ञा को ठुकरा दिया. क्‍योकी कोई सत्य के शिवाय किसी और की सत्ता वे मानते नही थे. इसलिये वे राणीसे मिलने के लिये उत्सुक नही थे. राणी को गुस्सा आ जाता है. और वो उनकी परीक्षा लेने उनके आश्रम मे चली जाती है. तपस्वी से कहती है के तुम अगर सच्चे तपस्वी हो तो मेरे हाथ मे दो फुल है. उनमेसे असली कौनसा है और नकली कौनसा उसे पहचानो. तपस्वी समाधी मे लिन थे. आश्रम के दरवाजे बंद थे. उन्होने आँखे खोलते हुवै क्षणभर उस राणी को देखा और कहा, तुम्हारे दाये हाथ मे जो फुल है वो असली है और बाये हाथ का फुल नकली है. राणी अचंभित रह गयी. क्‍योकी साधू महाशय ने आँसे बंद करके यह निर्णय लिया था. राणी प्रभावित होकर साधू के चरणो मे गिर पडी. और उसने तपस्वी को पुँछा...हे तपस्वी आपके जवाबसे मै अचंभित रह गई. आँखे बंद होने के बादभी आपने यह अनुमान कैसे लगाया की मेरे दाये हाथ का फुल असली और बाये हाथ का फुल नकली है?साधू महाशय मंद मंद मुस्काये और उन्होने कहा , हे राणी आपने आश्रम मे जैसेही प्रवेश किया और असली फुल की महक मेरे नाक तक आ गई. फिर मैने आँखे बंद करने के पहले देखा की मख्खी आपके दाये हाथ मे जो फुल था उसपर बैठी है .. और मेै उस फुल की असलीयत पहचान गया. तुम्हारे दुसरे हाथ मे जो फुल था वह केवल कागज का फुल था, नकली था, यह बात मै जान गया. असली फुल नकली फुलसे जादा आकर्षक था. लेकीन उसपर कोई मख्खी बैठे भी कैसे?

जो लोग सत्य की झलक पा लेते है.. उनकी जिंदगी कुछ और हो जाती है..सुकरात जिसने सत्य की खोज की. सत्य पाने के लिये उसने जहरतक पि लिया. क्‍योकी वह जानता था की सत्य के सामने अपनी जान गई तो उसमे क्‍या बडा हुवा? गॅलीलिओ को भी सत्य का ज्ञान हुवा था. इसलीये उसने कैद पसंद की... और मर गया.

सत्य की यात्रा बडी लंबी और आनंददायी होती है. क्षणैक सुख के लिये हम झुठ का सहारा लेते है. ऐसा जरूरी नही की सत्य हमेशा हारही खा लेता है. लेकीन सत्य को निहारणे मे थोडा समय जादा लगता है. क्‍योकी उसकी यात्रा का कही हिसाब नही. असत्य की उम्र बडी छोटी होती है.

                                                                     विजयकुमार राउत

शनिवार, 25 जुलाई 2015

शिक्षणाच्या नानाची टांग


                                   विजयकुमार राऊत

"पढोगे लिखोगे तो बनोगे नवाब, जो खेलोगे कुदोगे तो होंगे खराब' हे गाण लहानपणी रेडीओवर नेहमी ऐकायला मिळायचं. काळ बदलला. चित्र बदललं. आता "शिक्षणाच्या आवशीचा घो' अशा शिव्या हासडण्यापर्यंत नव्या पिढीची मजल गेली. आवडत्या खेळात रमून सचिन तेंदूलकरसारखा क्रिेकेटपटू तयार झाला. औपचारिक शिक्षण घेउन चिरंजिवांनी काय दिवे लावलेत, असा प्रश्‍न पालक करू लागले. किंवा उच्च शिक्षण घेतले नाही म्हणून सचिन तेंदूलकरचं काय बिघडलं? असंही म्हणणारे भेटतील. मुळात शिक्षण घेणे आणि नोकरी मिळविणे हे समीकरणच झालं. शहाणा, सुसंस्कृत होण्याचा शिक्षणाचा संबंधच कुठे उरला? शिक्षण हे नोकरी मिळवून एैशोआरामात जीवन जगण्यासाठीच असतं, असे म्हटले तर काय चुकलं?
आज सगळीकडे कॉन्व्हेंट संस्कृती झपाटयाने खेडयापाडयापर्यंत पोहचली. जि.प.शाळा "झोलबा पाटलाचा वाडा' वाटण्याइतपत आपली पत गमावून बसल्या. प्रत्येक आईवडिलांना आपला मुलगा ताडताड इंग्रजी बोलावा असं वाटू लागलं. त्याला चांगल्या कॉन्व्हेंमध्ये शिकविण्यासाठी तो मागेल ती रक्‍कम मोजू लागला. जमाण्याच्या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर स्पर्धा आवश्‍यक, हे सुत्र प्रत्येकाच्या अंगात चांगलं भिनलं आहे. आपल्या मुलानं शिक्षण फक्‍त नोकरीसाठी घ्यावं, अशी मानसिकता तयार झाली. शासनही शिक्षणाचा खेळखंडोबा करण्यातच धन्यता मानू लागलं. "आरटीई' अंतर्गत मुलाला प्रवेश मिळावा म्हणून वडिल मोठया शाळेचे स्वप्न पाहू लागले. शेवटी पाहिजे त्या शाळेत प्रवेश मिळाला की पूर्वजांचे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद पालकांना वाटायला लागला. आम्ही इतर शाळांच्या तुलनेत कसे उत्तम शिक्षण देतो, याबद्‌दलची बढाई मारण्यात शाळेच्या संचालकांपासून मुख्याध्यापकांपर्यंत कुठेच कमतरता बाळगली जात नाही. आता शिक्षणाच्या नावाने इतका सुकाळ असताना, माशी कुठे शिंकते कोण जाणे? समजा एखादया नामांकित शाळेत मुलाला प्रवेश मिळाला तर समाजातील गरीब पालक आधीच या शाळेत असलेल्या धनाठय पालकांच्या मुलांशी कुठल्याबाबतीत स्पर्धा करणार आहेत का? शिक्षणाची की आर्थिक संपन्नतेची? मुलांच्या निष्पाप मनावर कुठेल संस्कार घडवतो. विद्यार्थ्यांना "मठ्‌ठ' निर्बुद्‌ध म्हणून शिवी देणे कायदयाने गुन्हा ठरविले जाते. मग अशा वातावरणात आपण श्रीमंत मुलांच्या तुलनेत गरीब आहोत, हेच संस्कार त्यांच्या मनावर बिेंबविणार आहोत का?
त्याच्या मानसिक जडघडणीच्या काळात त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण करण्याचे काम कोण करतंय?अशा एक ना अनेक प्रसंग बालमनावर आघात करून जातात. जसे आम्ही तशीच आमची शिक्षणपद्‌धती आहे. तिच्यात तसुभरही कमी नाही. हुशार मुलांना पहिल्या बाकावर आणि आकलनात मागे पडलेल्या विद्यार्थ्याला मागच्या बाकावरील स्थान देण्यात येंतं. अमीर खान यांचा "तारे जमिनपर' या विषयावर नेमका प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांतील वेगळी वैशिष्टये ओळखून त्याच्या उपचार करणे हे शिक्षकाचे काम आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या व्यक्‍तीमत्वाला पैलू पाडण्याचे काम करतो. परंतु शिक्षकही आपले काम सोपें कसे होईल,या विचारात परंपरेने चालत आलेल्या आयुधांचा वापर करून हुशार विद्यार्थ्यांनाच पॉलीश करण्याचं काम करतात तेव्हा एकंदर शिक्षण पद्‌धतीची कीव करावीसी वाटते. पुस्तकातील किडे होउन जगण्यापेक्षा निसर्गातील ज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेतलेलया अनुभवांना पुस्तकाची जोड दिली तर विद्यार्थीही आपलं जिवन घडवितील. रविंद्रनाथ टागोरांसारखं प्रयोगशिल होउन "शांतीनिकेतन' घडविण्याचं सामर्थ निर्माण करता येईल.

गुरुवार, 16 जुलाई 2015

जिन्ह गोविंद दिया बताय


गुरू गोविंद दोउ खडे, काके लागू पाय
बलिहारी गुरू आपनी, जिन्ह गोविंद दिया बताय !

गुरू आणि गोविंद एकाच वेळी माझ्यायासमोर उभे राहिले तर मी कोणाचे पाय पकडावे, असा प्रश्‍न कबिरांना पडताच ते म्हणतात, हे बलिहारी मी तर गुरूंचेच पाय अगोदर पकडणार . कारण गुरूंमुळेच ईश्‍वरा मला खरे तर तुला भेटता आले. हा भाव गुरूची कृतज्ञता व्यक्‍त करण्यास पुरेसा आहे.
गुरूची परंपरा संपूर्ण विश्‍वात प्रचलित आहे. "गुरू बिन ज्ञान नही' म्हणतात. गुरूविषयीची मतभिन्नता असली तरी गुरूशिवाय मार्ग नाही हेच खरे. कोणी गुरूला निसर्गात पाहतो. तर कोणी विशिष्ट व्यक्‍तीत गुरूची स्थापना करतो. कोणी अनुभवांना गुरू मानतो. गुरू हे निसर्गातील एक तत्व आहे. भारतीय परंपरेने तर गुरूला परमेश्‍वरापेक्षाही मोठा दर्जा बहाल केलेला आहे. जीवनात पदोपदी मिळणारे अनुभवही कधी कधी गुरू होउन मार्गदर्शन करतात. तेव्हा जीवनाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. त्यासाठी दृष्टी प्राप्त होणे आवश्‍यक असते आणि ती दृष्टी देण्याचं काम गुरू करतो. अज्ञानाकडून ख-या ज्ञानाकडे नेणारा हा फक्‍त गुरूच असतो. भारतासारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या चिनमध्येही गुरूंची परंपरा आहे. ताओ धर्माचे लाओत्से, कन्फूसिअस, जापानमध्ये झेन, ग्रीसमध्येही सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो त्याचा शिष्य ऑरिस्टाटल आदींची दैदीप्यमान परंपरा लाभली आहे. जगात गुरूला "मास्टर' असे संबोधिले जाते. भारतातही रूषींमुनींपासून संतापर्यंत गुरूंचा वारसा अलिकडच्या काळापर्यंत मोठया विनम्रतेने जोपासला जात आहे. नाथ संप्रदायात मच्छींद्रनाथांपासून सुरू झालेली गुरूपरंपरा निवृत्तीनाथ यांच्यापर्यंत येउन पोहचलेली दिसते. वारकरी संप्रदाय, बौद्‌ध, जैनांनीही गुरूंविषयीचे गुणगाण केले आहे. संगीत क्षेत्रात "उस्ताद' शिवाय उत्कर्ष नाही, असं मानल्या जातं. तशीच उर्दू साहित्यातही शागिर्द गुरूचा शोध घेत असल्याचे दिसून येते. "ज्ञानियांचा राजा गुरू महाराव' असे संत ज्ञानदेवांनी म्हटले आहे. ज्ञान देतात ते गुरू. शिळेपासून शिल्प तयार होउ शकते, पण त्यासाठी शिल्पकार लागतो. विद्यार्थीरूपी शिल्प घडविण्याचे काम गुरू मोठया लिलयेने करतो. योगी रामकृष्ण परमहसं तर आपल्या लाडक्‍या शिष्यासाठी वर्षोगणती प्रतीक्षा करीत बसले होते. स्वप्नात भेट देणारा अतिशय परम शिष्य नरेंद्र याला साक्षात समोर पाहून त्यांनी भावविभोर वृत्तीने मारलेली मिठी गुरूची शिष्याविषयी ओढ दर्शविते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही भगवान बुद्‌ध, महात्मा ज्योतीबा फुले आणि संत कबिर यांना गुरूस्थानी मानले होते.
देवापेक्षाही अधिक गुरूचा महिमा मानण्यात येतो. अंधकारातून प्रकाशाकडे घेउन जाणारा तो गुरू, अशी गुरूची व्याख्या करण्यात येते. वेद, उपनिषद, पुराण, गीता आदींमधून गुरूंची महती गायीलेली आहे. वयाने अतिशय लहान असलेल्या अष्टावक्राच्या आत्मज्ञानाची चुणूक पाहून जनक राजाने त्याला गुरू मानले होते. शिख धर्मात तर गुरूपरंपरेविषयीचं खूप मोठं तत्वज्ञान पाहायला मिळतं. परंपरेने चालत आलेली "गुरू' ही संज्ञा किती मोठी आहे, तिचं महत्व या धर्मात सांगीतलं आहे. गुरूंच्या पेक्षा शिष्य मोठा आहे. कारण शिष्याला ज्ञानाची तहान लागलीच नाही तर तो गुरूपर्यंत येईल तरी कसा? म्हणून या धर्माचे संस्थापक गुरूनानकजी म्हणतात की गुरू शोधण्याआधी तू शिक ! त्यानंतरच तुझयाकडे इच्छीत गुरू चालत येईल, असं काहीसं ओशो रजनिस एके ठिकाणी म्हणतात.
शिखांत दहा गुरूंची परंपरा कायम आहे. कारण गुरूला महानता मिळाल्यानंतर गुरू होण्याचा मोह सर्वांना होतो. जिकडे तिकडे गुरूंचं पिक आलेलं दिसतं. अशा बिकट क्षणी खरा गुरू मिळणं अतिशय कठीण असतं. परंपरा प्रदुषित झाल्यानंतर ती तोडणे तितकेच महत्वाचे असते. म्हणून गुरू नानक नुसतं शिष्य म्हणून जगण्याचं तत्वज्ञान सांगतात. शिख धर्मात शिष्यालाही गुरूऐवढं महत्व प्राप्त करून देण्यात आलेले आहे. "गुरू ग्रंथसाहिब' हा पवित्र धर्मग्रंथ गुरूच्याच रूपात आजही अनुयांनाना मार्गदर्शक ठरतो. गुरू तंत्राची प्रशंसा सगळया शास्त्रात करण्यात आलेली आहे.
भगवान श्रीकृष्ण महाभारतात तर विविध रूपांत वावरताना दिसतात. परंतु धर्नूधर अर्जुनाला आपल्या कर्तव्यावाचा विसर पडताच त्याला रणांगणावर जाणिव करून देण्यासाठी श्रीकृष्णांनी घेतलेली भूमीका महत्वाची आहे. अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगीतली. भगवत्‌गीतेतील तत्वज्ञान अध्यात्मिक तर आहेच, परंतु माणसाच्या जगण्याला वेगळे परिणाम प्राप्त करून देणारे आहे. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश सांगणारी भगवत गीता आजही जगण्याचं बळ देतं. इतिहासात गुरूबरोबर शिष्याचंही मोठेपण दिसून येते. एकलव्य द्रोणाचार्यांचा पुतळा प्रत्यक्ष समोर ठेवून विद्या अवगत करतो. गुरूंनी अंगठा मागताच क्षणाचाही विलंब न लावता तो गुरूंच्या चरणावर अर्पण करतो. ही गुरूभक्‍ती कितीतरी मोठी आहे. विनोबा भावे महात्मा गांधीना गुरू मानीत. ते एका ठिकाणी म्हणतात की, मी महात्मा गांधींना गुरूस्थानी जरूर मानतो. पण मी त्यांच्या खांदयावर बसून त्यांच्या पुढचं जग पाहू शकतो. गुरूचं मार्गदर्शन घेउन शिष्यांनाच आपला मार्ग तयार करायचा असतो. गुरूंचा संबंध शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीशी असतो. गुरूंच्या पावलांवर पाउल टाकून गुरूंनी स्वीकारलेल्या मार्गाचं अनुकरण करायचं नसतं, असं एकंदर गुरूशिष्य परंपरेतील सार दिसून येतं. भगवान बुद्‌धांनी आपल्या शिष्यांची अनेकदा परीक्षा पाहिली. शिष्याला तावून सलाखून काढल्यानंतर तो ज्ञान मिळविण्या योग्य झाला की नाही, यासाठी ते त्यांची कठोर परीक्षा घेतात.
आज भारताकडे एक महाशक्‍तीच्या रूपात पाहण्यात येते. सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पुरातन काळापासून मिळालेले वैभव काळाच्या उदरात गडप झालेले असले तरी कालांतराने पुरातन संस्कृतीचे अवशेष पुन्हा मोठया प्रमाणात सापडत आहेत. जुन्या ज्ञानाचे भंडार दिवसेंदिवस उलगडत आहे. उद्याच्या विज्ञानाला जन्म देणारं अध्यात्म हे कधीच संपणार नाही. म्हणून जगाचा महागुरू होण्याची संधी आयती भारताकडे आलेली आहे. या संदर्भात चिनमधील विचारक लाओत्से आयुष्याच्या उत्तर काळात एका अदृष्य संकेतामुळे चिन सोडून हिमालयाच्या दिशेने पळत सुटले होते. त्यांना हिमालयाच्या दिशेने एक तारा चमकताना दिसला होता, म्हणे. आज सगळा देश भारताकडे एक महागुरू म्हणून मोठया आशेने पाहात आहे. नॉस्ट्राडम याने केलेल्या शंभर भाकीतांपैकी एक हेही असावे असे वाटते.




                                                                                                 * विजयकुमार राऊत


सोमवार, 6 जुलाई 2015

आदमी अच्छा होगा !

                 


                                                                               * विजयकुमार राऊत
व्यक्‍तींच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्याची आताशा सवयच झाली. प्रत्येक व्यक्‍ती माझयासाठी एक खुली किताब आहे. तोच माझी कविता आहे, तोच माझी गझल आहे..कुराण अन्‌ गीता ग्रंथही तोच आहे...तोच माझं एकंदरीत भावविश्‍व आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना या ना त्या स्वरूपात माणूसच सर्वप्रथम भेटतो. या जगतात नाईलाजाने का होईना सर्वप्रथम माणसांशीच नाते जोडावे लागते. तुमच्या अवतीभवतीचं जग माणसांनीच तर भरलेलं आहे. या माणसांच्या जगात वावरताना तुम्हालाही सर्वसामान्य माणूसच व्हावं लागतं. हे सर्व करीत असताना आपल्याला भेटलेल्या माणसाशी आपण वागलो तशी मिळालेल्या अनुभवातून त्याची प्रतवारी ठरवितो. त्याला व्यवहाराच्या कोंदणात बसवतो. काही काही माणसं समाजाला न परवडणारी असतात. तर काही आपल्या विचारांनी समाजात बंड घडवून आणणरी असतात. आपल्या विचारांशी सहमत होणारा माणूस केव्हा आपला होउन जातो कळतंच नाही. इतरांना मात्र आपण आपल्या दारातून बेदरकारपणे हुसकावून लावतो. आपल्या विचाराला छेद देणारा माणूस नक्‍कीच आपला शत्रू होउन बसतो. सामाजिक नितीनियमांच्या विरोधात वागणारा माणूस तर अख्ख्या समाजाचा शत्रू होतो. माणसाच्या हिताच्या गोष्टी करणारा माणूस, सत्य सांगून त्याला योग्य मार्ग दाखविणारा माणूस हा रिकामटेकडा ठरविल्या जातो. कोण केव्हा परका वाटेल हे सांगता येत नाही.
समाजातून बहिष्कृत केलेली माणसं नेहमीच उपेक्षेचा विषय असतात. त्याला दुषणं देण्यात येतात. परंतु माणूस वाईट झाला म्हणून त्याला दूर लोटणे कुठल्या शास्त्रात बसते. अशा व्यक्‍तीचे पैलू शोधून काढणे कोण्या येरागबाळयाचे काम नव्हे. विल्सन चर्चिल म्हणतो की तुमचे कुणी शत्रू आहेत? फार चांगली गोष्ट आहे. याचाच अर्थ असा की तुम्ही कधीतरी मुल्यांच्या बाजूने उभे राहिला होता. प्रत्येक माणूस एक शास्त्र सांगत असतो. त्याच्या व्यक्‍तीमत्वातून असंख्य हिरे, माणके शोधून काढता येतील कदाचित. साहित्यातील अशा कितीतरी व्यक्‍तीरेखा अफलातून माणसाच्या व्यक्‍तीमत्वातूनच अजरामर झालेल्या आहेत. प्रत्येक शास्त्र माणसासाठीच जन्माला आलेलं आहे. सगळी शास्त्रेच माणसाच्या भोवती घुटमळतात. जागोजागी बदलत जाणारी सामान्य माणसंही काहीतरी नकळतपणे शिकवून जातात.
माणसाला फक्‍त उणिव असते प्रेमाची. प्रेमातून माणसं उलगडत जातात...कळत जातात. निदा फाजली नावाचा शायर म्हणूनच म्हणतो.
उसके दुश्‍मन है बहोत, आदमी अच्छा होगा
तरह वोभी शहर मे तन्हा होगा !
अशी हद्‌दपार झालेली, बेताल जगणारी माणसंच ख-या अर्थांनं मस्तीत जगत असतात. म्हणूनच माणूस हा न उलगडणारं एक कोडं होउन बसतो. त्याला आपल्या व्यवहाराच्या गणितात कितीही पडताळलं तरी तो कळंतच नाही. त्याच्या मनाचा व एकंदर स्वभावाचा कितीही अभ्यास केला तरी तो पूर्णतः तसा अपरिचितच असतो. म्हणूनच सुप्रसिद्‌ध नाटककार विजय तेंदूलकर त्याला "माणूस नावाचं बेट' असं संबोधतात. एक अपरिचित बेटच तर असतो माणूस. कुठलाही दुराग्रह न बाळगता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या व्यक्‍तीमत्वाची अनेक दालनं उघडू शकतील कदाचित. कधी न कळणारी बेताल वागणारी माणसंच आयुष्याला आणि विचारांना वेगळी कलाटणी देउन जातात. मानशास्त्रीय दृष्टीकोनातून विविध प्रवृत्तीची माणसं समाजात मानसोपचार तज्ज्ञांनाही कळायला "चॅलेंज' करतात. त्यापेैकी अनिर्बंध, बेताल जगणारी माणसं, आपल्याच विश्‍वात रमणारी माणसं, दुःखातही सुखाचा मुखवटा घेउन जगणारी माणसं, दुस-यांसाठी धडपडणारी माणसं, कुढत कुढत जगणारी माणसं,प्रेमासाठी व्याकुळे झालेली माणसं, एकलकोंडी माणसं, माणूसवेडी माणसं, सुख मिळताच धबधब्यासारखी कोसळणारी माणसं, दुःखातून वेडी झालेली माणसं, माणूस जातीचा तिरस्कार करणारी माणसं , एखाद्याच्या अनुपस्थितीत उणीधुनी काढणारी माणसं, सदा न कदा जिवनाची क्षुल्लक कारणांवरून तक्रार करणारी माणसं, दुस-यानं त्याचं ऐकावं म्हणून सतत काही ना काही करून लक्ष वेधणारी माणसं, सतत प्रसिद्‌धीच्या झोतात राहून स्वतःला चर्चेत ठेवणारी, एखादया विचारावर ठाम असणारी माणसं, काही जगावेगळी माणसं अशी असंख्य माणसं या समाजात सर्वत्र विविध रंगात भेटत असतात. माणसाचं वैविध्यच दुनियेला विविध रंगी करून जातं. वाल्याचा वाल्मीक होतो, अंगुलीमालसारखा भगवान बुद्‌धांना शरण येउन योग्य मार्गाला लागतो. मग रस्ता सोडून चालणारी माणसं रस्त्यावर परत येउ शकत नाही का?

विजयकुमार राऊत
नागपूर, राज्य महाराष्ट्र (भारत)
मोबाई क्रमांक ः 8888876462



शुक्रवार, 3 जुलाई 2015

शार्टकट

                                                                             
                                                                                * विजयकुमार राऊत

आजचा जमाना "फास्ट फुड'चा आहे. पिज्झा, बर्गर खाणे मुलांना खूप आवडायला लागले आहे. लोकांना आता क्षणभर थांबण्याची मुळीच उसंत नाही. कुठलीही गोष्ट त्वरीत व्हायला पाहिजे. धावपळ, जिवघेणी स्पर्धा दिवसेंदिवस वाढत आहे. उर फाटेस्तोवर धावणे हेच आजच्या यशस्वी होण्यामागचं सुत्रं ठरत आहे. ही एवढी दौड कुठून आली? ही अघोरी स्पर्धा कशाची? ती कशी निर्माण झाली? सामाजिक बदलातून, मनाच्या अधीरतेतून झालेले हे परिवर्तन आहे की झटपट यशस्वी होण्यासाठी "शार्टकर्ट' शोधण्यातला हा पुरूषार्थ आहे? आजूबाजूची परिस्थिती बदलली की समाजात, वातावरणात किंवा अवतीभवतीच्या एकंदर जीवनमानात त्याचे बदल हळूहळू जाणवायला लागतात. आज सगळयाच क्षेत्रात एकंदर हीच स्थिती आहे. मनाची अधिरता वाढली की एखादी वस्तू मिळविण्यासाठी उताविळपणा निर्माण होतो. "तू मेरी नही तो, औरो की भी नही हो सकती' हा डॉयलॉग फक्‍त चित्रपटातूनच ऐकायला मिळत नाही. त्याचा शिरकाव आता समाजातही झाला असल्याचं वेगवेगळया घटनांमधून वाचायला मिळते. मला मिळाले नाही तरी चालेल, परंतु ते त्यालाही मिळता कामा नये, ही क्षुद्र भावना वाढीस लागली. क्रिकेट शौकीन पूर्वी कसोटी मॅच पाहाण्यात चार पाच दिवस टिव्हीसमोर घालवित होते. आता हीच मॅच वनडे वरून ेट्‌व्नटी ेट्‌व्नटीवर आली आहे. तीन...साडे तीन तासांचा चित्रपट आता दीड दोन तासांवरूनही "शार्ट' होत चालला आहे. जे सांगायचं ते थोडक्‍यात सांगा... फापट पसारा नकोच. कुणाला वेळच नाही. वृत्तपत्रांचे वाचन करण्याची वेळ कमी होत चाललेली आहे. ही वृत्ती कशाचे द्योतक आहे? आजच्या स्पर्धेच्या मागेही हीच मानसिकता पहायला मिळते. या धावपळीच्या युगातील ही अपरिहार्यता आहे?

गेल्या वर्ष दोन वर्षातील ठळक राजकीय घडामोडी लक्षात घेतल्या तर यावरून समाजातील एकंदरीत दिशा स्पष्ट होते. आपला देश हा अवतारांचा देश आहे. अवतारात एक तारणहार शोधण्याची हजारो वर्षांची सवय आपल्या जिन्समध्ये सामावलेली आहे. राजकीय क्षेत्रात अशा काही हालचाली झाल्यानंतर थोडफार सत्य गवसतं. कुणीतरी अवतार या पृथ्वीतलावर येईल आणि आमचं कल्याण करेल, केवळ याच कल्पनेत सगळे रंगून गेलेले दिसतात. अगदी ठळकच सांगायचे झाले तर दोन वर्षापूर्वी दिल्लीत रंगलेला अण्णा हजारे नामक तमाशा थेट चॅनलमार्फत घराघरात पोहचला. तेव्हा पुन्हा एकदा चार पाच दिवस चालणा-या कसोटी क्रिकेट मॅचची आठवण झाली. अण्णांच्या लाईव्ह इव्हेंटमध्ये सगळयांना कोण उत्सुकता होती ! दिवसभर टिव्हीसमोर बसून आबालवृद्‌धांची उत्कंठा शिगेला गेल्याचे दृष्य पाहून अण्णा आता या देशाचे तारणहार होणार की काय, अशी शंका अनेकांच्या डोक्‍यात यायला लागली. त्यानंतर अण्णांना दुसरे गांधी असा शिक्‍का मारून त्यांना गांधीजींचाही एक नवा अवतार बहाल केला. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनाची घडी विस्कटली आणि केजरीवाल नावाचे तुणतुणे वाजायला लागले. केजरीवाल यांनाही लोकांनी डोक्‍यावर घेतले आणि अनिल कपूर यांनी भूमीका केलेल्या एका चित्रपटातील एक दिवसाचा मुख्यमंत्री जिवंत झाल्याचा भास जनतेला होउ लागला. "सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही , मेरी कोशिश है की यह हालात बदलने चाहिए' हा दुष्यंतकुमारांचा शेर त्यांनी केजरीवाल यांना पाहूनच लिहिला की काय, असे जनतेला वाटू लागले.
कविता आणि राजकाराणातलं फारसं काही कळत नसलेल्यांनाही केजरीवालांच्या भाषणावरून ते युगप्रवर्तक असल्याचे चित्र तयार झाले. तोपर्यंत दुसरा हिरो राजकीय पडद्यामागे एंट्रीची भक्‍कम रिव्हर्सल करीत होता. तो चेहरा होता मोदींचा. केजरीवालांची जादू "सरपे चढके' बोलत होती. मोदी फक्‍त केजरीवाल नावाच्या वादळाला शांत होण्याची वाट पाहात होते. देशभरात लगेच लोकसभा निवडणुका लागल्या. केजरीवाल यांनी लोकसभेच्या तोंडावर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मोदी घराघरात पोहचल्याने आणि केजरीवालचे जादू संपत आल्याची चाहूल लागताच मतदारांनी केजरीवाल यांची साथ सोडली व मोदी यांनी रंगमंचावर "एंट्री' केली. मोदी बहुमताने विजयी झाले. निवडून देणारेच आता मोदींविरूद्‌ध आरोळी ठोकायला लागल्याचे पुसट चित्र दिसू लागले आहे. जनतेचा यात दोष म्हणता येणार नाही. मोदींनी स्वतःची जी प्रतिमा निर्माण केली, ती निभावताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे दिसत आहे.
एकंदर या देशाला चटकन जादूची कांडी फिरविणारा कुणीतरी जादूगर हवा आहे की काय, अशी शंका निर्माण होते. अलीकडे चमकणा-या हिरोंचा कार्यकाळ केवळ क्षणभंगूर ठरला आहे. यावरून जनतेच्या मनावर आता दीर्घकाळ अधिराज्य गाजविणारा नेता निर्माण करण्याची वेळ निघून गेली की काय, अशी शंका निर्माण झाली.

                                                            * विजयकुमार राऊत 

                                                             mob-8888876462
 
Blogger Templates