Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

सोमवार, 22 दिसंबर 2014

भरवसा (लघुकथा)



.*विजयकुमार राउत


"शेतक-यांसाठी खुश खबर.... यंदा लाभणार शेतक-यांना निसर्गाची साथ ....मान्सून वेळेवर महाराष्ट्रात दाखल होण्याचे हवामान खात्याचे संकेत..... वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंदमान निकोबार बेटात मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन झाले असून यंदा सरासरी नव्यानव टक्‍के पाउस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सदया हिंदी महासागरात मान्सूनच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुढील आठवडयात बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होणार व त्यानंतर राज्यात जोरदार पावसाचे आगमन होईल, असे हवामान विभागाच्या प्रवक्‍त्यांकडून जाहिर करण्यात आले आहे. यावर्षी हवामानखात्याच्या अंदाजाप्रमाणें पाउस झाल्यास कृषी क्षेत्रात अन्नधान्याची विपुलता निर्माण होईल, असे मत कृषीमंत्रयांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केलं आहे.......'
विठ्‌ठल काकडेनं जाहिररित्या वाचन केलेला पेपर त्याच्या भोवती बसलेल्या इतर शेतक-यांपुढे सरकावला. उन्हाच्या प्रहरी गप्पांसाठी गावच्या पारावर लिंबाच्या सावलीत बसलेल्या शेतक-यांना पावसाच्या बातमीतून थोडा का होईना दिलासा मिळाला. त्यामुळे सगळयांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आरशासारखे लख्ख उमटले होते.
"औंदा पाणी लवकर येईन म्हणते नाही गा? पिकपाणीबी बरं व्हईन...का गा नारू?'
गुलाब खंतेच्या या वाक्‍यानें ना-या काळे ताडकन स्वप्नातून जागा झाला.
" तं मंग? . ...दरसाली कस्तकारांच्या मागं अवदसा राहयतेच राहयते इची बहिण. कमीत कमी दलिदरी तरी दूर होईल. येरे बावा पाण्या . लवकर ये ' ढेबानंही पेपरची पुंगळी करीत ना-यांच्या रित रि ओढली.
" इठ्‌ठलभाउ... कोणतं खातं म्हणलं गा तुन मंघाशी?' गुलब्याने विठ्‌ठल काकडेला प्रश्‍न केला.
" गुलाबभाउ, हवामान खाते म्हणलं म्या. हवामान विभाग...'
"हो थेच म्हणलं. अडाणी मानसाचं असं राहयते..कोणी शिकला सवरला माणूस बोलला का त्याचंही आयका लागते. म्हून म्हणलं का आजपावेतो सरकारी अधिका-यांचं खातं पाहयलं होतं. पण हे कोणतं खातं होये थे माहया ध्यानात आलं नोहयतं. सरकारी योजनाचा फायदा घ्यासाठी पंचायत समितीत जाआल तं तिथंबी अधिकारी खातेत. पोलिस ठाण्यातबी खातेत. पटवा-याकडं गेलो तं थोबी उभ्यानं खातेच. कुठं खात नाही?.समदीकडे खातेच खाते' गुलब्यानं मनातलं सगळं भडभड बाहेर फेकलं. गुलब्याच्या वाक्‍यानं आजूबाजूचे शेतकरी हसून उठले.
"तसं नही म्हणलं मी गुलाबभाउ. तुले राग आला असंण. येणबी स्वाभाविक आहे म्हणा. कारण शेतक-याले खाणारी यंत्रणा सगळीकडेच बोक्‍यासारखी टपून बसलेली आहेच नं.' विठ्‌ठलच्या बोलण्यानं गुलब्याला जोर आला.
"गोष्ट हवामान खात्याची निंघली होती. म्हून मले एका गोष्टीची आठवण झली. कास्तकाराले समदे खाते हे म्या तुले आंधीच सांगतलं. मले वाटलं का बा हवापाणी खाणाराबी कोणी राहयतेत का ? बरं थे जाउदे. एक सांग इ्‌ठ्‌ठला. थे माहया सास-याच्या गावी भेंडवळले एक जोतिषी हाये. दरवर्षी अखजीले घट मांडला का दुस-याच दिशी थो घट पाहून पावसाचं गणित सांगते. सा-या गावचे लोकं येतेत तेथं जोतिस्य आयकाले. म्याबी एकदोन येरी गेलो होतो.' गुलब्यानं आपल्या मनातील शंकांना वाट मोकळी करून दिली.
"हे पाहय गुलाबभाउ. तुहया सास-याच्या गावी होते त्याले भविष्यवाणी म्हणतेत ..आणि हे शासनाचं हवामान खातं वेगळंच राहयते. तिथं मोठमोठे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ याहीची नियुक्‍ती करण्यात येते...पाउसपाण्याचा अभ्यास करण्यासाठी? थे रात्रंदिवस संशोधन करीत असतात. त्यांनी काही मॉडेल्स विकसीत केलेले असतात. त्यानुसार हवामान खात्यातील बदलाचा अंदाज घेता येतो. त्यामुळेच आपल्याले पावसाच्या दिवसाचं वेळापत्रक समजते. ' पदवीपर्यंत शिकलेल्या विठ्‌ठलनं गुलाबला समजावणीच्या सुरात सांगीतलं.
"म्हणजे आपून हवा पाहून तिवा मांडतो तस्सं, नाही?' गुलब्याच्या या वाक्‍यावर सगळे मोठयानं हसून उठले.
"बरं गुलब्या अखजीले गेला होता का तू भेंडवळले....सास-याच्या गावी ?' डोमा कावळयानं गुलब्याकडे पाहून प्रश्‍न टाकला.
"नाय बा... मांगल दिसा अखजी झाल्यावर नातवाची भेट घ्याले सासराच आलता माहया घरी.'
"का म्हणे तुहया सासरा ?' डोम्याने उत्सुकतेने विचारलं.
"भेंडवळच्या बाबानंही असंच सांगतलं म्हणे...औंदा पाणी चांगला जम्मून हाये म्हणून' गुलब्यानं खुशीतीच उत्तर दिलं.
"सरकारचं खातंबी पेपरातून थेच सांगतेनं. दोघाहीचं गणित सारखच येउन राहयलं. औंदा चांगली बरसात हाये रे बाप्पा धनाची....मजा हाये यंदा कास्तकाराहीची.... घ्या चांगलीं फसल..उपडा प-हाटी..लागा कामाले..करा पेरणी .....'
कोप-यात बसलेला गण्या वेडयागत हसत बोंबलून उठला.
*******
मागच्या तीनचार वर्षांपासून पावसाचा लपंडाव सुरू होता. म्हणून आता शेतकरी चांगलेच कावून गेले होते. सावकाराचं, बॅंकेचं कर्ज फेडता फेडता सर्वांच्या नाकी नउ आलं होतं. म्हणून यंदातरी झालेल्या नुकसानीची भरपाई होईल म्हणून जमलेल्या कास्तकारांना पावसाच्या बातमीनं जीवात जीव आला होता.
" औंदा पाउस चांगला पडण तं मांगच्या वर्षीच्या कर्जाचं वंझं तर हलकं व्हईन.' डोमा आकाशाकडे पाहात बोलला.
" आपलं बी तसंच हाय बा. फसलं चांगली आली तं मी पोरीचं लग्न उरकवून घेईन म्हणतो. नाहीतं मागच्या वर्षी हुंडयाचे पैसे थोडसे कमी पडले म्हूण नवकरीवालं पोरगं हातचं निघूंन गेलं. पोरगीचं वय जास्त होत चाललं...' किसनानं आपली चिंता मनाशीच बोलून दाखविली.
" अभायातल्या पाण्याचं आणं कास्तकाराच्या नशिबाचं काही खरं राहात नाही बापू.' म्हातारा अजाब डोळयांसमोर हात धरून आकाशाकडे टक लावत बोलला.

*****
ृग नक्षत्रं पंधरा वीस दिवसावर येउन ठेपलं होतं. शेतक-यांची लगबग सुरू झाली. कास्तकारवर्ग मशागतीची कामे पटापट उरकून घेण्यात व्यस्त झाला. मृगाच्या पहिल्या सरी येताच पेरणी करून घ्यायची, या आशेने बबन्यानं दोन वखर लावून शेतीची उन्हाळवाही करून घेतली. किसन्यानं भाडयाचे ट्रॅक्‍टर लावून संपूर्ण शेताची नांगरणी करून शेत पेरणीयोग्य तयार केलं. गावठाणातील उकिरडयावरून बारा महिने जमा केलंलं गुराढोराचं शेणखत बैलगाडयांनी सा-या वावरभर पसरण्यात आलं. रोहिणी नक्षत्रं जेमतेम सुरू झालं. अंगाची लाही करणारं उन्ह वातावरणात पसरलं होतं. मध्येच एक दोन ढग सुर्याला झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करायचे. पुन्हा काही क्षणात आकाश उघडं पडायचं. रोहिणीच्या हलक्‍या सरींनी वातावरण काही क्षणापुरतं सुसहय केलं. त्यानंतर उन्ह पुन्हा तापू लागलं. कास्तकाराच्या बायका म्हणून लागल्या "किरतका रोहिनी आन्‌ मिरगाच्या बहिणी' . परंतु सुर्य पूर्ववत आकाशात दात ओठ खाउन जिद्‌दीनं तळपू लागल्यामुळे पुन्हा सरी बरसण्याची कुठेच शक्‍यता दिसत नव्हती. कास्तकार शेतात उन्हातान्हात खपत होता. अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. प्रत्येक जण मरेस्तोवर स्वतःला कामात जुंपून घेत होता. मृग नक्षत्र लागताच पाउस येणारच, असा हिशेब करून सगळे जोमानं कामाला लागले होते. किसना मात्र धुळ पेरणी करण्याच्या विचारात होता. त्यासाठी पूर्वी करावी लागणारी उन्हाळवाही आटोपताच त्यानं बेधडक वखरणंही सुरू केलं. काहीबी झालं तरी कोणी आपल्यासमोर प-हाटीची लावणी करू नये, पहिला नंबर आपलाच असावा, या ईर्षेने तो सगळी धावपळ करीत होता. तसा दरवर्षी शेजारच्या पांजरी गावातील बाळा पाटील धुळ पेरणी करून घ्यायचा. तो उन्हाळयातच प-हाटीची लावणी करून सगळयांची मजा घेत इतर शेतक-यांना तो-यात हिणवायचा. पहिला पाउस पडेस्तोवर मोटारपंप सुरू करून प-हाटीला पाणी देत राहायचा. सुरवातीला लोकही त्याला हसायचे. नंतर तो इतर कास्तकारांपेक्षा जास्त पिक कमी वेळेत घेउ लागला, तेव्हा कुठे सगळयांना हेवा सुटला. परंतु औंदा किसनानं बाळा पाटलाला मागे टाकण्याचा निश्‍चयच केला होता. धुळ पेरणी करणे तसे फार "रिस्की' काम. प-हाटीला पाणी दिलं अन्‌ं जोरदार पाउस लागून पडला की हलक्‍या जमिनीत पाणी मुरत नसल्यामुळे प-हाटीची बुडं सडून जायची भिती. असं अनेकदा घडलं होतं. तेवढी हिंमत लावली नाहीतर कास्तकारच कुठला? असा साधा हिशेब शेतकरी करीत होते. त्यामुळे छातीला माती लावून किसनानं एकदाचा हा निर्णय घेउन टाकला. "असंबी मरणंच, आन्‌ं तसंबी मरणंच ...' म्हणून त्यानं हिंमत बांधून एकदाची धुळ पेरणी उरकूुन घेतली.
गावच्या सगळया कास्तकारांनी मृगाच्या तोंडावर सगळी तयार करून घेतली होती. पैपेै जुळवून बियाणे, खते आणि किटकनाशकांची खरेदी सुरू झाली. किसनानं सास-याकडं जाउन त्याच्या मध्यस्थीने सावकाराकडून व्याजाने पैसे आणले. बबन्यानं बायकोचं मंगळसुत्र गहाण ठेवून बियाणे खरेदी केले होते. तर गुलब्यानं होतं नव्हतं सगळं कास्तकारीच्या जुगारात ओतलं होतं. हिंगण्याला जाउन त्यानं बी- बियाणे, खते आणि औषध खरेदी करून बैलबंडीनं घरी आणून घेतलं. किसन्यानं कोरडया शेतात धुळ पेरणी करून घेतली.
ृग नक्षत्रानं म्हशीवर स्वार होउन आगमन केलं. शिवाराच्या पोटात आता बियाणे ओतून कास्तकार निश्‍चिंत झाला होता. सगळे कास्तकार पावसाची वाट पाहात आकाशाकडे डोळे लावून बसले. एक दिवस, दोन दिवस अन्‌ं मृग नक्षत्राचे चांगले आठ-पंधरा दिवस निघून गेले. तरी आकाशाला कुठेच जराही पान्हा फुटला नाही. वांझ असलेल्या म्हशीसारखं मृग नक्षत्र कोरडं गेलं. जसजसे दिवस लोटत होते, तसतसे कास्तकार चिंतेने अस्वस्थ व्हायचे. सायंकाळच्या प्रहरी एकमेकांना कैफियत सांगायला गावच्या पारावर जमायचे. कुठल्यातरी निमित्तानं तासन्‌ तास शेतीवरच बोलत बसायचे. एकमेकांना दुखणी सांगायचे. मन हलकं व्हायचं. हतबल झालेला कास्तकार शेवटी करणार तरी काय?
******

"पाण्यानं तर चांगलाच धोका देल्ला गा' किसन्या असाहयपणे बोलत होता.
"का सांगावं बा. दोन दिसानं मिरूगबी जाईन आन्‌ं अडदडा लागंन. पाण्याचा जराबी पत्ता दिसत नाही. प-हाटीचं बी जिमिनीच्या पोटात जीव नसल्यावाणीच पडलं हाये.' डोमानंही नैराश्‍येत सुर मिसळला.
"तुमचं तं पाणी नाही आला म्हणून बी नाही निंघलं. पण माहया वावरात वलिताच्या जमिनीत पेरूनबी बी नाही उगवलं.... मले तं आता दुकानवाल्यावरच शक येउन राहिला. च्या मायले मले चांगलंच फसवलं गा अग्रवाल शेठनं. नकली बियाणं देल्लं त्यानं मले .. ' किसन्यानं आपलं दुःख तक्रारीच्या सुरात सगळयांपुढे मांडलं.
"हो तुहं खरंच हाये. आमच्या वावरातलं बी तं पाणी आल्यावर निंघाची आसतरी हाये. पण तुहय? तुनं तं चांगली धुळपेरणी केल्ती नं गा. ' बबन्या बोलला.
"थेच तं भोवलं मले. कुठून अक्‍कल सुचली तं माहित नाही. परवा दुकान मालकांकडं गेल्तो तं त्यानंही मले टरकावूनच लावलं. पाणी येतंच नाही तं बियाणं कसं का उगवण म्हणे.' किसनानं आपबिती सांगीतली. त्याचा आवाज केविलवाणा झाला होता.
"आबे तं भाडया म्हणा. म्यातं धुळपेरणी केल्ती म्हणा. आन्‌ माहया वावरात तं मीनं मोटारीचं पाणी वललं म्हणा. शिकवतं का साला आपल्याले?' डोमा रागारागात बोलून गेला.
"परवा तं कंपनीचे काही लोकं वावरात येउन पाहयणी करून गेले. कंपनीचा मोठ्‌ठा साहेब म्हणे का बियाणं नकली हाये, याचा काही पुरवा हाये का तुहयाकडं? म्या म्हणलं साहेब, तुम्हाले तं दिसतेच जी. का माहया वावरात पाणी देउनबी तुमच्या कंपनीचं बी नाही उगवलं थे. त्याले कायले पाहजे सबूत? त्याच्यातला एक जण म्हणला का तुम्हाले काही समजत नाही. तुमी अडाणी हाआत आनं अडाणीच राहान.... वरचा पाणी नसतानी बियाणं उगवलं नाही तं त्याच्यात आमचा काही दोस हाये का?'
"तिच्या मायचा भोसळा म्हणा...साल्याले. कायचा साहेब झाला ? आलू कुठे लागते म्हणून इचारलं त्याले तं थो म्हणणं फांदीले . टमाटर कुठं लागते म्हणून इचारलं तं सांगनं झाडाच्या बुडात. थे आपल्याले अक्‍कल सिकोते भोसळीचे? दोन किताबी नाही वाचल्या तं चाल्ले शहापणा शिकवाले? च्या मायचं थे हवामान खातं का का म्हणते तं... थेबी आमाले च्युत्या बनवाचा कारखाना दिसते. कोणाचा भरोसा करावं गा माणसानं ? सरकारबी आपल्या तोंडाले नुसते पानं पुसत राहयते. चिवते साले कास्तकाराच्या जीवावर उठले ...सराफ लागनं त्याचा. अन्नबी भेटणार नाही खाले... लेकाईले.' बबन्या इंगळी चावून आग झाल्यासारखा चवताळून उठला होता. परिस्थितीचं गा-हाणं एकमेकांसमोर प्रत्येक जण ओकत होता.

नैराश्‍याच्या वातावरणात दूर कुठंतरी "पेरते व्हा...पेरते व्हा ' म्हणत पक्षी झाडांवर बसून साद घालत होता.
**************
"दुबार पेरणीचे संकट..शेतकरी हैराण...जिल्हयात एैंशी टक्‍के पेरण्या उगवल्याच नाहीत. मृगापाठोपाठ आद्रा नक्षत्रही कोरडं गेल्यामुळं शेतक-यांवर दुबार पेरणीची पाळी. शेतकरी आर्थिक संकटात .....मान्सूनने आपली दिशा बदलली. महाराष्ट्राला पावसाचा खो... शेतक-यांनी केली शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी' या आणि अशा आशयाच्या बातम्या पेपरात दररोज झळकू लागल्या. शेतक-यांजवळ दुबार पेरणी करायलाही पैसा उरला नाही. शासन मात्र अजूनही गप्प. शेतक-यांच्या परिस्थितीवर बोलण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत विराजकारण राजकारण खेळणारे राजकीय पक्षही हातात हात गुंडाळून बसलेले. धुर्त नेते जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यात व्यस्त. दुष्काळाचं शेतकरी वगळता कुणालाच काही घेणं देणं नाही....टिव्हीच्या चॅनलवर मनोरंजनाच्या नावाखाली होणारं देहाचं हिडीस प्रदर्शन.... राज्यातील अग्रगण्य म्हणविणारे विचारवंत टिव्हीवरून गंभीर मुद्रेत उगाच आव आणित दुस-याच मुद्‌दयावर चर्चा घालताना.... सगळं सगळं तिरस्कार आणणारं... एकंदरीत बळीराजा पुरता मातीत मिळाला असताना कुणालाच फिकीर नाही, सगळं कसं आलबेल सुरू असल्याचं चित्रं.

एके दिवशी मात्र सगळं गाव गुलब्याच्या घरापुढं जमा झालेलं. सगळयांच्या चेह-यावर चिंता. सगळयांचे चेहरे काळवंडलेले. जों तो एकमेकांना विचारत होता.
""अरेरे . असं काहून केलं गा त्यानं ?'"
"का माहित बा. काल सांजच्या पारी वावरातच गेला होता म्हणते.....लहान लहान तीन पोरं हायेत गा गुलब्याले...त्याचं कसं होईन.....त्याच्या मता-या मायचं कसं होईन? जानजवान बहिण लग्नाची हाये, तिचं लगंन कसं व्हईन... होत्याचं नोहतं झालं गा बिचा-यासंग. पाणी नसतानी पेरणी केली अन्‌ पाणीच आला नाही. पैसा कास्तकारीत पाण्यासारखा वतला. आता का कराचं म्हणून लई दिसापासून इचारात होता. वावरात जाउन लई येळ एकटाच बसून राहायचा. रात्र झाली तं घरीबी न्हाई येत व्हता.' गंभीर वातावरणात अशीच विचारपूस ब-याच वेळपर्यंत सुरू राहिली.

*****

तिस-या दिवशी निळया दिव्यांची रूग्णवाहिका "टयूव टयूव' करीत गुलब्याच्या अंगणात येउन उभी राहिली. तिनचार धडधाकट माणसांनी गुलब्याचा देह गाडीबाहेर उचलून घरात आणला. अन्‌ छपरात अंथरून असलेल्या खाटेवर टाकला. खाटेभोवती गुलब्याची लहान लहान पोरं "बाबा बाबा' करीत बापाजवळ रेंगाळू लागली. हळू हळू सारा गाव त्याच्या घरी जमा झाला. त्याची बायको रखमा हिच्या गळयात हुंदका दाटून आला. तिनं लगेच चेहरा पदराआड झाकून घेतला. मंजूळा बुढ्‌ढी खाटेजवळ येउन गुलब्याच्या चेह-यावरून थरथरता हात फिरवत मोठयानं बोंबलून उठली.
" अरे बापा असं कसं केलं गा तूनं. काउन रे बापू. चांगली जींदगानी सोडून असं करा लागते का माहया लेकरा?बरं झालं बाप्पा तुहयाजोळ कास्तकारी तरी हाये..हिंमत हाये. नाईतं कुठं भिख मांगली असती गा? तू असा हिंमत काउन हारला माहया लेकरा? तूहे सोन्यासारखे लेकरं कुणाकडं पाहिनं गा.? कास्तकाराईची जींदगानी आपली . तुहया बापानं कास्तकारी करता करता लगीत खट्‌टे खाल्ले ..पण त्यानं नाही केलं जन्मात असं. कास्तकारीच्या भरूशावर अमिर नाई झालो बापू आपून. नुसता जुवाच खेळतो हरवर्षी. दोन वक्‍ताचं खारट तिखंट खावाले भेटते, त्याच्यातच सुख मानून घेवू. लेकरा, कसेबी दिसं काढून जिंदगानी ढकलू.. माहयासारख्या मथा-या बाईनं का करावं बाप्पा? थ्या दुस्मानाईले तुहया दुखावर फुटला नसता पाना .. ...' मंजूळी बुढी मात्र ब-याच वेळपर्यंत अंसीच काहीबाही बोलत बोंबलत होती. मघापासून खाटेच्या शेजारी मुकाटयानं उभा असलेला विठ्‌ठल पुढं आला. दोन्ही हातांनी त्यानं मंजुळा बुढ्‌ढीला बाजूला घेतलं.
" झालं गेलं गंगेला मिळालं आजी. नव्या उमेदीनं आता पुन्हा जगा लेकराबाळाहीले घेउन. कास्तकाराचं जगणं हालअपेष्टांशिवाय कसं राहिन लमचे? पोरगं तुले दगा दयायले निंघालं होतं तूहयं. मरणाच्या दाढेंतून सुटून घरी आलं. वावरात प-हाटीवर माराचं औषधही कास्तकाराच्या नशिबासारखं नकली निंघालं. गुलब्याची जीवनाशी असलेली नाळ तुटायची नव्हती म्हणून तुटली नाही.'

विठ्‌ठल मंजूळा बुढ्‌ढीले समजावित होता. अन्‌ गुलब्या हताश मनाने आढयाकडे पाहात होता. कोरडया पावसाळयात मात्र विठ्‌ठलच्या डोळयात ढग दाटून आले होते.

.* विजयकुमार राउत

साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा मार्ग
नागपूर 16
 
Blogger Templates