Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 28 अक्टूबर 2015

दूर देशी बाबा गेले

दूर देशी बाबा गेले

                                              विजयकुमार राउत

रं तर आतापर्यंत आईवरच भरभरून लिहिल्या गेलं. अनेक कविंनी आईच्या दूधाचे रूण शब्दांमधून फेडण्याचा प्रयत्न केला. परंतु "बाप' या विषयावर खूप कमी लिहिलं गेलं, याचं थोडं शल्य वाटतं. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व . आईकडे अश्रृंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट. ठेच लागली तर आपण, आई गं! म्हणतो आणि भीती वाटली तर बाप रे! या जगात जिच्यामुळे आलो ती आई, आणि ज्यांच्यामुळे दुनियेत टिकलो तो बाप, हे दोघेही प्रत्येकासाठी महत्वाचे असतात. कारण ही दोन्ही संसाररथाची चाकं असतात. आई ही जन्म देते तर पालणपोषणाची जवाबदारी पार पाडतो तो बाप. आई ही जन्मदात्री असल्यामुळे तिचा अधिकार तेवढाच महत्वाचा आहे. ज्या घरी बाप असतो त्या घराकडे कुणीही वाकडया नजरेनं पाहण्याचं धाडस करत नाही. म्हणून एका हाडामासाच्या तुकडयाची ओळख जगाला करून देणारा बाप असल्यामुळे त्याचाही हक्‍क काही कमी नाही.

"ख-या बापाची औलाद असशील तर.. बाप दाखव नाही तर श्राद्‌ध कर..रिश्‍तो मे हम सबके बाप लगते है' असा वाक्‌प्रचार समाजात रूढ झाला तो याच अर्थानं. हाच बाप दूरदेशी म्हणजे जग सोडून गेला तर त्या आकाशातील बापाकडे जड अंतःकरणाने आपण मन मोकळं करतोच की नाही ! येशू खिस्त नाही का म्हणाले होते, मी आकाशातील बापाचा एकुलता एक पुत्र आहे म्हणून ! "जगाचा बाप' होउन अनाथ मुलांकडे कृपाळू दृष्टीचे मोरपिस फिरविणारा बाप मला खूप मोठा वाटतो. त्यात संत गाडगेबाबा, शंकरबाबा पापडकर यांचा उल्लेख न झाला तर कृतघ्नता ठरेल. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी दुस-याकडून कीर्तनात तल्लीन झालेल्या गाडगेबाबांना कळते. तेव्हा ते सहज म्हणून जातात....
असे मेले कोटी न कोटी !
काय रडू एकटयासाठी?
गोपाला गोपाला...देवकीनंदन गोपाला !!
अमरावती जिल्हयातील वझझर येथील शंकरबाबा पापडकर शेकडो अनाथ मुलींचे बाप म्हणून कन्यादान करण्याचं व्रत अखंडपणे पार पाडतात, तेव्हा या "फादर इंडिया'चा मनोमन अभिमान वाटतो.
बाप मग खरोखरच अनेक मार्गानं विस्तारत जातो. बाप बहुअर्थांनं मोठा होत जातो. बापाकडे गांभीर्यांनं पाहिलं गेलं नसल्यामुळे "बाप' तसा उपेक्षित राहिला. बापाला मात्र ख-या अर्थांनं समजून घेणारी त्याची लेकच असते. लग्न मंडपात हंबरडा फोडणा-या लेकीचा आवाज बापाच्या जिवाची कालवाकालव करतो. बाप मग कोप-यात जाउन कुणालाच कळू नये म्हणून रूमालाने चेहरा झाकून मनसोक्‍त रडून घेतो. बापाच्या जाण्याची वार्ता मोठयाने हंबरडा फोडून सगळया जगाला सांगणारी त्याची मुलगी असते.
आजच्या काळात बापाची जवाबदारी ख-या अर्थांनं वाढली आहे. बाप मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी, उत्तम राहणीमान देण्यासाठी, मुलांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच कुटूंबाचं पालनपोषण करण्यासाठी सतत तनावाखाली वावरताना दिसतो. त्याच्या व्यथा कुणालाच कळत नाही, असं नाही. नवनविन आव्हानं एका नव्या रूपात पुढे वाढलेली आहेत. त्यातून त्याच्या मनाची कुचंबना होत आहे. जगण्यात भौतिकता वाढली आहे. सगळीकडे चैनीच्या वस्तूंची गर्दी झाल्यामुळे चंगळवाद वाढला आहे. आपली मुलं मागे पडू नयेत, म्हणून बाप जिवाचे रान करतोच आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर एक अपयशी बापाचा शिक्‍का त्याच्या कपाळी बसण्याचीच भिती अधिक. कात्रीत सापडलेल्या बापाला मग काही कटू निर्णय घ्यावे लागतात. बाप कुटूंबापासून दूरावत जातो. नव्या पिढीशी संवाद साधण्यात बाप कमी पडतो. स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी पेलत पडत उठत खस्ता खाणारा बाप मुलांपासून दूर होउ लागतो. वेळेचे गणित सोडविणे त्याच्यासाठी अशक्‍यप्राय होते. सगळं काही करून तो कुटूंबाशी स्वतःला जोडण्यात कधीतरी कमी पडतोच पडतो. अशावेळी कुटूंबात "हिटलर' झालेला किंवा कामाला शरण गेलेला माणूस नाईलाजाने पुरता "वर्कोव्होलीक' होउन बसतो. अशावेळी घरातील एक पणती मात्र बापाच्या आठवणींच्या प्रकाशात दूर देशी गेलेल्या आवडत्या बाबांशी मोबाईलवरून संवाद साधत असते. "पापा जल्दी घर आ जाणा' म्हणत स्मृतींचा ठेवा जपत असते, त्या पणतीचेच दुसरे नाव आहे मुलगी !
                                                         विजयकुमार राउत
                                                                8888876462
 
Blogger Templates