Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 7 अप्रैल 2015

माणूस जगतो कशासाठी?


                                                                          विजयकुमार राउत
मरण येत नाही म्हणून माणूस जगतो का? की जगण्या- मरणापुढे असहाय म्हणून माणूस जगत असतो? की जीवनात आणखी काही महत्वाचे असावे म्हणून माणूस जगत असावा काय?
"to be or not to be' या शेक्‍सपिअरच्या हॅम्लेटसारखाच दोलायमान अवस्थेतील प्रश्‍न आयुष्यात कधी ना कधी सगळयांना पडत असतो. उत्तरही खूप मोठं आणि त्यापेक्षा प्रश्‍नही समजून घेणं जिकरीचं आहे. "माणूस जगतो कशासाठी?' ही ना.सी.फडके यांची लघुकथा कधीकाळी पाठयपुस्तकात वाचली होती. त्यातील मध्यमवर्गिय नायक हा रोजच्या कटाकटीला कंटाळून आत्महत्त्या करण्याचा टोकाचा विचार करतो. रस्ता ओलांडताना एक इवलीसी बेडकी कारपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टुन्‌कन उडी मारून रस्त्याच्या पलीकडे जाउन स्वतःला वाचवून घेण्यात धन्यता मानते. यासारख्या अगदी छोटया छोटयाशा प्रसंगापासून कथा फुलत जाते. शेवटी या घटनांमधून नायक जगण्याची प्रेरणा घेतो आणि पुनश्‍च जगण्याचा निर्धार करतो. इथं कथा संपते. माणसाच्या हाती जगणे नाही आणि मरणेही नाही, म्हणून तो कसा तरी जगत असतो. जीवनाला ओझं समजून ते ओढत नेताना आपण इतरांवर उपकार करतो, असं त्याला वाटतं.
या विषयावर माझया काही मित्रांनी नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रत्येक जण यावर अगदी भरभरून बोलून गेला. काहींनी यथेच्छ बोलण्याचं सुख मानून गंगेत घोडं न्हाउन घेतलं तर काहींनी आपण कसे जगतो आणि त्यापासून इतरांनी काय प्रेरणा घ्यावी, याबद्‌दल चर्वितचर्वण केलं. अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा परिसरातील पहिला प्रयत्न होता, म्हणून त्यातील उणिवांचा भाग अलहिदा ! परंतु असे कार्यक्रम घेण्याची सद्‌सद्विवेकबुद्‌धी जागृत होणं, हे अतिशय महत्वाचं आहे. बबनराव पडोळे, जीवन जवंजाळ यासारख्या नवविचारांचे स्वागत करणा-या मित्रांनी हा उपक्रम हाती घेतला हेही बरे झाले. माझयाही मनात ही संकल्पना होती. योगायोगाने पडोळेंच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी पुढाकार घेतला, ही बाब स्वागर्ताहच म्हणावी लागेल.
यामागे कुठली विचारक्रांती वेैगरे मोठमोठे शब्द लावणे मला पसंत नाही.
माणूस जगतो कशासाठी ? या प्रश्‍नाचं उत्तर वरवरचं असता कामा नये. इतर रोजच्या घरगुती प्रश्‍नासारखं नुसतंच" टाईमपास' उत्तर देताना या महत्वाच्या प्रश्‍नाला बगल देणेही योग्य नव्हे. खरं तर जन्म घेणे आणि मरणे या दोन्ही क्रिया माणसाच्या हातात नसतात. मात्र या दोहींच्या मध्ये असलेलं जीवन, ते मात्र कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. ते सुंदर करता यावं आणि आपण आपल्या अवतीभवतीचं जगही कसं सुंदर करता येईल, हे आपल्या हातात आहे.
माना के इस जहॉं को गुलजार न कर सके
कुछ खांर तो कम किये निकले जिधर से हम !!
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जगू शकत नाही. तोही समाजाचं एक "बायोप्राडक्‍ट' असतो. म्हणून तो घडत असताना समाजाकडून अनेक गोष्टी शिकत असतो. संस्कार त्यापैकीच एक. परंतु जगताना तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगत असतो. स्वतःला म्हणजे "मी'ला तो अधिक विस्तारण्याऐवजी संकुचित करीत जातो. मी आणि माझे यातच तो धन्यता मानतो.
भगवान बुद्‌धांपासून ते अलीकडे गाडगे महाराज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत माणसाला दिशादिग्दर्शन करणारे महात्मे माणसाला सुधारताना मुळीच हरले नाहीत किंवा थकले नाहीत. या प्रश्‍नाचं नुसतं त्यांनी उत्तरच शोधलं नाही, तर त्यांनी कृतितून प्रत्यक्षात उतरविलं आणि समाजाला दाखवून दिलं. त्यांच्यापासून काही घेण्याचीही आपली ऐपत नाही. म्हणून झोळी खाली राहिली ती आपणासारख्या कपाळकरंटयांचीच ! जगण्यापासून माणूसपण दूर करता कामा नये. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण "माणूस' तरी होण्याचा प्रयत्न करतो का? सुप्रसिद्‌ध साहित्यीक प्र.के.अत्रेंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिताना एका अग्रलेखात एक ग्रीक कथा दिलेली आहे. एकदा एका राणीकडे एक देवता येते. तिच्या बाळाला देव बनविण्यासाठी बाळाचे कपडे काढून त्याला विस्तवावर धरण्यास मागते. हा जिवघेणा उपक्रम कित्येक दिवस सुरू असतो. परंतु एके दिवशी राणीला पहावत नाही. चटकन ती पुढे होउन बाळाला विस्तावावर धरण्यापासून रोखते व देवतेच्या हातातील बाळ हिसकावून घेते. ती राणी म्हणते की, मी ही कृती करून बाळाला "देवता' होण्यापासून रोखलं आणि त्या बाळाचा माणूस होण्याच्या रस्त्यातली अडचण त्या स्त्रीने दूर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलितांना माणूस होण्यासाठी लढण्याचं बळ दिलं. माणसाचं दैवतीकरण करण्यापेक्षा माणूस होणंच कठीण काम आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नाही. परंतु हे दुःख पेरणारे दुसरे तिसरे कुणीच नसून आपण स्वतःच तर असतो. म्हणून तथागत भगवान बुद्‌ध एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमीकेतून अखिल मानव जातीला विकृत होण्यापासून रोखतात. माणसानं या जगात नेत्रदीपक प्रगती केली. पण या प्रगतीबरोबर तो सुखी होण्याऐवजी अधिकाधिक दुःखी का होत गेला? एका जमान्यात माणसाला मन असते. यावर विज्ञानाचा विश्‍वासच बसत नव्हता. सिग्मंड फ्रायडने माणसाला "मन' नावाचा अदृश्‍य अवयव असतो, हे अथक प्रयत्नांती सिद्‌ध करून दाखविलं. आता मनाच्या पातळीवर ज्या अतिशय गुंतागुंतीच्या विचाराच्या प्रक्रिया असतात याचा मुळाशी गेलो तर तिथे सर्वसामान्य माणसाला कसलाही ठाव लागत नाही. गोंधळ उडतो. "मन' हे शरिराची "नॅनो' आवृती होय, असं अलीकडे विज्ञानही मानायला लागलं. मनात जे काही विचाराच्या रूपाने निर्माण होउन पाठलाग करते तेच रोगाच्या रूपाने शरिरावर पसरते. म्हणून मी भगवान बुद्‌धांना मानसोपचारतज्ज्ञ म्हणतो. कारण बुद्‌धांनी माणसाच्या या दृश्‍य अदृष्य मनोव्यापाराचा खूप चिकित्सक अभ्यास केला होता. आजचं विज्ञानही तेच म्हणते. मग मला सांगा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही विपरित परिस्थितीत विचाराच्या बाबतीत स्वतःला कसे
"पाजेटीव्ह' ठेवतात... "बरे झाले देवा निघाले दिवाळे...बरी या दुष्काळे पीडा गेली...अनुतापे तुझे राहिले चिंतन ! जाला हा वंमर संवसार !!' किवा "निंदकाचे घर असावे शेजारी' असे अभंगातून सांगून ते मोकळे होतात. आपल्या अवतीभवती सुखाच्या अमर्याद खाणी आहेत. आनंद देणारे ठिकठिकाणी असंख्य इवले इवले झरे आहेत. या निसर्गाने अनंत हाताने तुमच्यावर सुखाची उधळण केलेली आहे. ते सोडून आपण देवदर्शनासाठी सगळीकडे नुसते भटकत असतो. काही जण हा गुरू सोड तो धर असा उपद्‌व्याप करीत असतात. "जगण्याचा मार्ग' शोधत असतात. मंत्र तंत्राच्या आहारी जातो. म्हणून तुकाराम म्हणतात की "तुझे आहे तुजपाशी परि तू भूललासी वरलिया रंगाशी' तुकाराम असो, बुद्‌ध असो नाहीतर एखादा महत्वाचा शोध लावणारा संशोधक असो. हे सगळे जीवन सुंदर करणारे वेलीवरची सुगंधित फुलेच आहेत. सजिव सृष्टीही एक शाळा आहे. सर्वात आधी माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे होणे आवश्‍यक आहे. तुकडोजी महाराज उगाच नाही "माणूस द्या, मज माणूस द्या' म्हणत माणसाच्या शोधत फिरतात. त्यांना माणूस मिळाला असावा का?
                                                                                               विजयकुमार राउत

 
Blogger Templates