ज्याचा त्याचा एक धर्म असतो. त्या धर्माप्रमाणे तो आचरण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा धर्माचे आडंबर माजवून एक प्रकारचं धार्मिकतेचे सोंग आणण्याचा प्रयत्न करून समाजात हाच खरा धर्म, असे पसरविले जाते. शेवटी सर्वसामान्य माणूस कर्मकांडाच्या कचाटयात सापडतो. संत तुकारामापासून कबिरापर्यंत सगळयांनीच बाहय कर्मकांडाला फार पोटतिकडीने विरोध केला. तरी समाजात दिखावूपणाच अधिक दिमाखदार पद्धतीने समाजात वावरत आहे. एकमेकांना एकमेकांपासून तोडणारा कुठलाच धर्म हा पृथ्वीच्या पाठीवर नाही. अब्राहम लिंकनचे एक वचन आठवते. ते म्हणतात की "I DO GOOD, I fill good-i do bad i fill bad' पाण्याचा धर्म तहान भागविणे. वृक्षाचा धर्म सावली देणे, हाच असतो. दुसरा कुठलाच धर्म असू शकत नाही. सगळयांच्या जगण्याचे सार कशात आहे. सगळे जगतात फक्त निरामय आनंदासाठी. आणि तो आहे फक्त आपल्यातच. आपण आयुष्यभर आपला धर्म किंवा परमेश्वर केवळ बाहेरच शोधत असतो. आनंदी राहायचं असेल तर दुस-याचा आनंद हिरावून न घेता एक आनंदमय जिवन जगलं पाहिजे. मग संत ज्ञानेश्वरांना झाला तसा आनंद आपल्यालाही प्राप्त होतो. "आनंदाचे डोही आनंद तरंग' याचा प्रत्यय क्षणोक्षणी यायला लागतो.या देशात धर्मासाठी काय काय झालं नाही? सगळे लढे धर्म आणि सत्ता संघर्षासाठी निर्माण झालेले आहेत. फाळणीचं दुःख झेललेले कविवर्य गुलजार तर या भयानक दुःखाचे नुसते साक्षीदार नव्हे तर भागीदारसुद्धा आहेत. ही जखमी कशी चिघळत जाते याचा कटू अनुभव त्यांनी घेतला. मार्कस म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे, ती माणसाला सतत गुंगीत ठेवते. ही गुंगी कायम राहावी याचे भान राजकारणी ठेवत असतात. देशात सदया धर्मांतराचे वारे जोरात वाहायला लागलेले आहेत. धर्म हा "एक्सपायर' झाला, असं कुणी म्हणलं तर मोठे वादळ उठते. त्यामागील अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत कुणीच पडत नाही. तथाकथीत धर्म ज्या कार्यासाठी निर्माण झालेला आहे, त्यामुळे कोणताही हेतू साध्य होत नसल्यामुळे तो आता "एक्सपायर' असे मानण्यातच शहाणपण आहे. जर्मन विचारवंत नित्से जेव्हा "देव' या संकल्पनेवर आघात करताना म्हणतो की देवांना आता देव्हा-यातून हद्पार केले तर बरं होईल. डॉ.श्रीराम लागू म्हणतात की देवाला आता "रिटायर्ड'च केले पाहिजे. यामागे एकच अर्थ आहे, जी प्रतिकं, ज्या संकल्पना आता कालबाहय झाल्या आहेत, त्यांना विशाल अंतःकरणाने मुठमाती दिली तरच मानवाचा भविष्यकाल उजळू शकतो. कारण परिवर्तन हाच शाश्वत नियम आहे. धर्माचे मढे किंवा देवाचे भूत किती दिवस पाठीवर बाळगणार आहोत.? हिंदू असो वा मुस्लीम, कट्टरताही धर्माला पोषक असूच शकत नाही. कट्टरता ही फक्त कोत्या मनाचे निदर्शक होउ शकते. वाद विवादाने कुठलेच प्रश्न संपत नाहीत. खरं म्हणजे महापुरूषांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरच त्यांच्याविषयी कुठलाही वाद सुरू करण्यात अनुयायीच पटाईत असतात. हिंदू धर्मातील कट्रपंथियांनी "घर वापसी अभियान' फार जोरकसपणे राबविणे सुरू केले. आपली विचारसरणी जनमानसात दृढ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या हाती सत्तेची सुत्र असावी लागतात. एकदा हाती सत्ता आली की आपले जाहिरनामे राबविण्यात पुढाकार घेतला जातो. तिचा पाहिजे तसा वापर करता येतो. प्रतिके, श्रद्धा जाग्या होतात. जुना इतिहास आपल्या सोयीनुसार बदलविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होतो. एकप्रकारे जुन्या कर्मकांडाच्या जागी नवीन कर्मकांडे उपस्थित केली जातात. "गर्व से कहो हम..'च्या गर्जना घुमायला लागतात. किंवा एखादया अधार्मिक विचाराबद्दल " जिहाद ' पुकारला जातो. अभिव्यक्ती स्वातंत्रयावर वारंवार हल्ले होतात. चित्रपटांची पोष्टर फाडून सिनेमा बंद पाडल्या जातो. नत्थूरामाचे दैवतीकरण केल्या जाते. त्याच्या नावातही राम दिसायला लागतो. मग त्याची मंदिरे उभी करण्याचा विचार व्यक्त केला जातो. "मंदिर वही बनायेंगे' निर्धार केला जातो. संपूर्ण विश्व भगवे करण्याचा संकल्प सोडला जातो. परदेशाचे दौरे आयोजित करून भगवतगीता भेट देण्याचे प्रयोग होतात. जापानमधील तथागत बुदंच्या मूर्तीऐवजी कमळ पुष्पाचे गुणगाण मुक्कंठाने केले जाते. कारण ते त्यांच्या पक्षाचं चिन्हं असतं. राष्ट्राचा ग्रंथ म्हणून भगवत्गीतेला स्थान देण्याचा विचार सोडल्या जातो. "हमको वोट देनेवाले देशभक्त, और जिन्होने को वोट नही दिया वो देशद्रोही' असे संबोधण्यात येते. त्यापेक्षा थोडे पुढे जाउन देशात "रामजादयांना'च राहण्याचा अधिकार आहे हरामजादयांना नाही, असे ठणकावून सांगीतले जाते. गंगा ही तर हिंदूची पवित्र नदी.. माताच ती ! म्हणून निवडणुक झाल्यानंतर तिची महाआरती करण्याच्या अनुपम सोहळयाचे टिव्हीच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. यात मात्र ख-या धर्माची कुठे हत्या केली जाते, हे या देशातील सर्वसामान्य माणसाला कळतही नाही. "ओ माय गॉड' किंवा "पिके' यासारख्या चित्रपटांतून तथाकथित धार्मिकतेवर प्रहार केले जातात, तेव्हा त्यांवर टिकेची झोड उठविली जाते. या धर्ममांतर्डांच्या विरोधात कुणी तोंड उघडले तर त्याचे मुस्काट फुटणे आलेच. जर त्याने प्रबोधनाचे कार्य सोडले नाही तर त्याला "वैकुंठा'ला पोचविण्यासाठी त्यांचे खास पुष्पकविमान तयारच असतेच. अंधश्रद्धेच्या विरोधात आवाज उचलणा-यांचा शेवटी दाभोळकरच होतो, हे सांगणे न लगे ! विजयकुमार राऊत | |||
-