जागतिक किर्तीचे भाषा अभ्यासक व संशोधक डॉ.गणेश देवी यांनी घुमान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जगातील दोन हजार वर्षांनंतर शब्दभाषा लोप पावतील व शब्दांची जागा चिन्हे व प्रतीके घेतील, अशी भीती व्यक्त केली आहे. त्यांचे बोलीभाषा व भारतीय भाषा यावर मोठे योगदान आहे. त्याबद्दल त्यांना पद्मश्री पदवीने सम्मानितही करण्यात आले आहे. भारतात 1961 साली1652मातृभाषांपैकी 108 मातृभाषांची आज नोंद आहे. याचा अर्थ चार दशकात 1500भाषा मरणपंथाला गेल्या आहेत. जगात आज सहा हजार भाषा आहेत. असाच धोका कायम राहिला तर चार हजार भाषा मरतील, असे संशोधकांना वाटते. वसाहतवाद, जागतिकीकरणाचा रेटा, व्यापारीकरण हे भाषा मरण्यामागचे कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. जसजसा उत्क्रांत होत गेला तसे तसे त्याने अनेक शोध लावून स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा कसे सरस आहोत, हे सिद्ध केले. व्यक्त होण्यासाठी त्याने सर्वप्रथम भाषेचा शोध लावला. शब्दांच्या नाद व लयीतून तो एकमेकांना समजून घ्यायला लागला. निर्सगातील प्रत्येक अनुभवाला शब्दात पकडण्यासाठी धडपडू लागला. शब्दांची योजना करू लागला. एकमेकांशी संवाद साधण्याचं तंत्र त्याला अवगत झालं. भाषेच्या उत्कर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला खूप समाधान वाटू लागलं. निसर्गातील प्रत्येक गोष्टीला शब्दात पकडल्यानंतर त्याला स्वर्ग अगदी दोन बोटांवरच उरला. त्याच्या मनाची कवाडे त्याने भाव भावना व्यक्त करण्यासाठी सताड उघडी केली. त्यानं शब्दांची पुजा बांधली. नादब्रम्ह, शब्दब्रम्हाचं रूप त्याला बहाल केलं. परंतु पुढे मात्र तो जस जसा उन्नत होत गेला तसतसे अनुभव व्यक्त करण्यासाठी त्याला शब्द कमी पडू लागले. शब्दांच्या कमतरतेमुळे किंवा अतिरेकामुळे विसंवाद वाढू लागला. जे माध्यम सुसंवाद घडवून येण्यासाठी निर्माण झालं तेच साधन विसंवादाचं कारण ठरलं. भाव भावना जशाच्या तशा दुस-यांपर्यंत पोहचविणे कठीण झाले. कित्येक वर्षे शब्द आणि भाषेच्या आश्रयाने चालणा-या माणसाची नंतर मोठी पंचाइत व्हायला लागली असावी. आजपासून हजारो वर्षापूर्वी त्यानं निर्माण केलेल्या भाषेचं सामर्थ्य अपुरं सिद्ध व्हायला लागलं. तेव्हा त्यानं मौनाची भाषा स्वीकारली, परंतु तरीही व्यक्त होण्यासाठी त्याची तळमळ शांत झाली नाही. वेद , उपनिषदांचा काळ भाषेचा उत्कर्षाचा काळ होता. अनेक मंत्रोच्चारांचा जन्मही या काळात झाला. शब्द हे परमेश्वरापर्यंत नेण्यास सहायक आहेत, असं त्याला वाटू लागलं. म्हणून माणसानं शब्दांची पुजा बांधणे सुरू केले. ज्ञानाची आराधना सुरू केली. परंतु वेद, उपनिषदांतील रूषींना जे अनुभवास आलं आणि सर्वसामान्य माणसाचा समजून घेण्याचा अवाका यात दरी निर्माण होत गेली. म्हणून उपनिषदात "नेती नेती' म्हणून सत्य कथन करण्यास रूषी नकार देताना दिसतो. लाओत्सेंनीही असंच काहीसं म्हटलं आहे. "नेती नेती'चा अर्थ असा होतो की हेही खरे नाही अन् तेही खरे नाही. सत्य तिसरे काहीतरी वेगळेच आहे. त्यानंतर झालेल्या शांडिल्य रूषींनी तर "येती येती' म्हणून थोडी सकारात्मकता दाखविली. "येती येती' म्हणजे हेही खरं आहे नि तेही खरं आहे. जे आहे ते सगळं खरंच आहे. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास रात्रही खरी आहे आणि दिवसही आहे. काळाही खरा आहे आणि पांढराही खरा आहे. कुठलीतरी एक बाजू पकडून त्यावर कायम राहण्यासाठी तो सत्य काय आणि ते कसे व्यक्त करायचे, ही अडचण निर्माण झाली. कारण शब्दांच्या दोन्ही बाजूचे समर्थन करताना त्याचा गोंधळ उडणारच. भाषेच्या अस्थैर्यामुळे अनेक गोष्टीत तात्विक पातळीवर गैरव्यवहार आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अडिच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मात्र सर्वसामान्य माणसाची ही अडचण दूर केली. बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारल्यामुळे हा गोंधळ निकालात निघाला. त्याने "नेती नेती' आणि "येती येती' या दोहींना खोडून काढले आणि "सम्यक' निती लोकव्यवहारात उतरविली. माणसाला भाषेतून स्थैर्य मिळाल्यामुळे आता कुठे त्याची धडपड थांबली होती. बुद्धांच्या "सम्यक 'नितीतून त्याला विज्ञानाचा मार्ग सापडला. कारण बुद्धांनी सर्व बाबी बुद्धीच्या कसोटीवर घासून जे योग्य उरते तेच स्वीकारण्याचा सल्ला दिला. प्रत्येक गोष्टीला "सम्यक' शब्द जोडून बुद्धांनी "बॅलेंस' साधला. बुद्धाच्या काळानंतर अडिच हजार वर्षांनी मात्र माहिती आणि ज्ञानात दरी पडू लागली. जागतिकीकरण, नवनवीन शोध,आर्थिक व्यवहाराला आलेलं महत्व आणि अनेक घटनेतील अनुभवाचा पसारा व्यक्त करण्यासाठी माणसाला भाषा अपुरी वाटू लागली. तो बुद्धीवादी असल्यामुळे त्यानं परिश्रमानं ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या. पण आजच्या काळात मात्र मनुष्य भाषा आणि शब्दांपासून दूर होत चालला आहे. शब्द गुळगुळीत होत आहेत. हवा असलेला आशय हरपत आहे. बदलत्या काळानुरूप अनुभव आणि शब्दांची गर्दी वाढलीय. भावना व्यक्त करायला नेमके शब्द सापडत नाहीत. माध्यमांच्या भाउगर्दीत शब्दांचं महत्व कमी होत चाललं. माध्यमांद्वारे माहितीचा मारा माणसाच्या डोक्यावर सतत चोविस तास सुरू असतो. युवकांची मोबाईलवरची सांकेतिक भाषा वेगळी होत चालली आहे. "जनरेशन गॅप' म्हणून आपण युवकांच्या या प्रश्नाकडे पाहात असतो. म्हणूनच कविवर्य सुरेश भट भाषेच्या बाबतीतील खंत व्यक्त करताना एका गझलेच्या या शेरातून म्हणतात कशी या वर्तमानाला कळेना आमची भाषा विजा घेउनी येणा-या पिढयांची बोलतो आम्ही !! सर्व महान संत कवि आणि विचारकांनी जे सांगायचं होतं त्याचा खजानाच काव्यात्मक रूपाने आपल्यापुढे ठेवला. परंतु काव्याची भाषा व्यक्तीपरत्वे पाहिजे तशी वाकविता येत असल्यामुळे गोंधळ झाला. आपल्या मगदूराप्रमाणे व्यक्तीपरत्वे अर्थ निघत गेला आणि अनाचार माजला. आजचे भौतिकशास्त्र किंवा विज्ञानशास्त्रे काटेकोरपणा आणण्यासाठी शब्द आणि भाषेचा वापर टाळून प्रतिके आणि सुत्रांपर्यंत येउन पोहचलेली आहेत. पुढच्या काळात तर भौतिकशास्त्रे आणि एकंदर सगळी विज्ञानशास्त्रे केवळ सुत्र आणि प्रतिकांच्या माध्यमातून हव्या त्या बाबी सांगतील, अशी परिस्थिती आहे. शास्त्रज्ञांनी पुढील काळातील हा धोका वर्तविला असल्याचं डॉ.देवी यांनी सांगीतलं आहे. उत्क्रांतीत मानवाच्या मेंदूत बदल घडत असून मेंदूच्या डाव्या भागाचा केंद्रबिंदू भाषा नव्हे तर प्रतिकांकडे सरकत चालला आहे. त्यामुळे भाषा मृतवत होउन रूपक आणि प्रतिकांची आभाषी भाषा विकसीत होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ******* | |||
-