* विजयकुमार राउतछप-याचा गंगाराम लगीन जुळल्यापासून लई म्हणजे लईच खुश होता. त्याला सगळी दुनिया सिनेम्यासारखी वाटाले लागली होती. अगदी तीर मारल्यासारखा तो गावात वावरू लागला. त्याच्या होणा-या बायकोची तुलना तो उठसुठ कोणाही जवळ ऐश्वर्या रॉयशीच करत होता. ती ऐश्वर्या रॉय होती, म्हणून हयाला आपलं उगीच सलमान असल्यासारखंच वाटायचं. त्याचा एवढयात सिनेमे पाहायचा शौकही मस्त रंगात आला होता. दर दिवसाआड नागपूरात जाउन तो ब्लॅक तिकिट घेउन एैश्वर्या नाही तर सलमान खानचा सिनेमा हमखास पाहूनच घरी यायचा. कुठल्या कामात त्याचं लक्ष लागताना दिसत नव्हतं. त्याच्यात झालेला बदल पाहून सगळे दोस्तही त्याची मजा घेण्यासाठी त्याला "छप-याचा सल्लू' म्हणून हाक मारत होतें. कोणी जवान पोरगी रस्त्यात दिसली तर तिला पाहून मुद्दामहून "शिला शिला की जवानी' नाही तर "मुन्नी बदनाम हो गयी' असं मोठया आवाजात गुणगुणायचा. उत्तरा दाखल पोरीकंडून त्याला चांगल्या शिव्यांचीं लाखोली वाहीली जायची. पण गंग्याला काही फरक पडत नव्हता. त्याचं असं वागणं सगळयांना त्रासदायक ठरू लागलं होतं. शेतीकडे गंग्याचं दुर्लक्ष होउ लागलं. त्याचा बाप लक्ष्मण बुढ्ढाही गंग्याच्या या हरकतीने कमालीचा वैतागला होता. कारण शेतातील संगळी कामं आता त्यालाच करावी लागत होती. त्याचं लग्नं जुळल्यामुळं लक्ष्मण बुढा अधिकच चिंतेत पडला होता. "कराले गेलं काय आन् उल्टे झाले पाय' अशी स्थिती म्हाता-या बापाची झाली होती. एक दिवस मात्र शेतातून कामावरून आल्या आल्या बापाने सखू बुढ्ढीजवळ गोष्ट काढलीच. " कोठं गेलं वो थे पोट्टं?' "काजीन का बाप्पा. एवढयात तं घाडंच रंग करून राहयलं..' "तूनंच चढवून ठेवलं त्याले' "आतं वं माय. माहयचं नाव घेते हया बुढ्ढा. मीनं कायले चढवलं वं त्याले? बरूबरच्या पोराहीचे लग्न होउन त्याईले लेकरंही झाले आन् हेच राहयलं होतं लग्नाचं. गावात लंगलंग हिंडते आणं कलागती आणून पाडते. म्हणून म्या म्हणलं का त्याचं लगीन करून दया म्हणून.' "आवं तं लगीन झाल्यावर सुधरते का बिघडते मायमाजे? हे पोट्टं तं लईच नखरे करून राहयलं. बहिन माय, लगीन जोडलं तईच मले वाटलं होतं.. हे असंच करंण म्हणून. चांगलं कामागीवर लक्ष लागनं म्हणलं लेकाचं. बापाचं वझं हलकं होईन म्हणलं. त्याचं तं भल्लंतच सुरू राहयते. वावराकडं लक्ष दयाचं काही सुचतच नाही त्याले. इची बहिण आताच तं आपल्याले गिनत नाही. लगीन झाल्यावर का झाट गिनते?' बाप असाच काही बुढ्ढीले बोलून गंग्यावरचा राग "वडयाचं तेल वांग्यावर काढावं' तसा बुढीवर काढत राहायचा. गंग्या मात्र सलमान खानसारखी दंड दाखविणरी बनियान, तंग जिन्स पॅंट, डोळयावर काळा गॉगल्स घालून गावात फिरत होता.. एवढं कमी झालं म्हणून तो नागपूरला गेला तेव्हा हजामतीच्या "स्टॅंडर्ड' दुकानात गेला. कटींग दाढी केली. आरश्यात चेंहरा आडवातिरपा करत त्याच्या बापाच्या वयातल्या सलूनवाल्याला म्हणाला.. "काकाजी. कटींगतं करू देल्ली माही. दाढीबी भादरून देल्ली. आता मिशीबी काढून ठेवली जी? कसा दिसतो थेच पाहाचं हाये मले.' न्हाव्याने मागे पुढे न पाहता त्याच्या बोलण्याबरोबर मिशीवरून सपक्न वस्त-याचा हात घुमवला. त्याला बिनामिशीचा पाहून बुढ्ढयाची विंचू चावल्यागत आग झाली. तो घरी येताच बुढ्ढा जोरात त्याच्यावर खेकसला. "आता लग्नाच्या आंधी माही तेरवीबी करून टाकशिन तं बरं होईन. च्या मायले कोणत्या नाच्याले जलम देल्ला मीनं तं' "काउन म्या का केलं? मिशी काहाडली तं कोणतं बिघडलं. हिरोलोक नाही काहाडत का? मोठमोठें लोक काहाडतेत. तुमच्या जवानीत नाही केल्ते का तुमी नखरे?. मीनं तं मिशीच काहाडली. तुमी तं तमाशात बी नाचले होतें म्हणतेत...बायल्यासारखे...तुमच्यापरीस मी बरा हाओ.' गंग्यानं बुढ्ढयाले चांगलीच सुनावून दिली.. चिरंजिवांच्या तोंडातून पडलेली ही मुक्ताफळे ऐकताच बुढ्ढयानं कपाळावर हातच मारून घेतले आनं कायले अशा चित्तर पोट्टयाले जन्म देल्लां म्हणून सखू बुढीवरच ताव खाउ लागला. ******* लग्नाची तारीख आता जवळ आली होती. गंग्या आपली केव्हीबी उतरून ठेवन म्हणून लक्ष्मण बुढ्ढयानं गंग्याशी बोलनंच बंद केलं. घरातील संगळे कामं बुढ्ढी गंग्या नाहीतर नोकरचाकरांकडून पूर्ण करून घेउ लागली. पत्रिका वाटण्याचे काम तेवढं गंग्यानं हाती घेतलं होतं. दिवसभर मस्त घुमायचं अन् सिनेमा पाहयचा. बस एवढंच काम. गंग्याच्या लग्नाचा दिवस एकदाचा कसाबसा उगवला. सगळी तयारी झाली होती. बॅंडपासून वरात नेण्यासाठी लागणारे मेटॉडोअर दारात येउन कधीपासून उभे होते. बॅंडवाले खूप वेळेपासून कंटाळा आल्यासारखे वाजवत होते. गंग्या नवरदेव झाल्यामुळे फारच एैटीत वागत होता. बॅंडवाल्यांचे जुने गाणे ऐकून गंग्या सणकला. "काउन तुमाले नवीन गाणे वाजवता येत नाही का गा? तवांचं पाहूनच राहयलो. मयतीसारखे वाजवून राहयले. काउन तुमचा बाप मेला कारे? चांगले "ढिंग चिका ढिंग चिका' गाण लावानं.' गंग्याच्या रागावल्याने बॅंडवाले जाग्यावर आले. त्यांनी आता येत नसलेले गाणेही कसेबसे गाल फुगवून फुगवून वाजवणें सुरू केले. लक्ष्मण बुढा पाहुण्यांसोबत बोलत बाजूला उभा राहून काहीतरी सांगत होता. सगळे सोपस्कर पार पडल्यावर गंग्यानं नवरदेवाच्या गाडीच्या समोर नारळ फोडला. नारळाचा डोल टण्कन उडून लक्ष्मण बुढ्ढयाच्या टकू-यात जाउन बसला. तसा लक्ष्मण बुढा बोंबलून उठला. "आरे बापा मेलो रे .... हया पोट्टयानं घेतला रे माहया जीव....' नात्यातल्या लोकानीं धावपळ करून लक्ष्मण बुढ्ढयाला धरून सावलीत नेलं. " बरं झालं नारेळच नाही सुटलं हातातून. नाही तं डोक्सच गेलं होतं कामातून. खूप लागलं काजी?' जो तो चौकशी करू लागला. लक्ष्मण बुढ्ढया त्यांच्यावरच खेकसला " आरे त्याले काही सांगानं. मलेच इचारून राहयले तं. आता हेच राहयलं होतं माहया नशिबात. कोणत्या नक्तीरात जलमलं तं माहित नाही हे पोट्टं' "जाउ दया बावाजी. व्हाचं नव्हतं होउन गेलं. लगीनगी झालं म्हणजे सुधरंण. ' लक्ष्मण बुढ्ढयाच्या जवळच्या नात्यातंल्या एकानं लक्ष्मण बुढयाची समजूत काढली. " आता नशिबाचे भोगच तसे असतीन तं कोणाले सांगाव च्या बहिण?' ****** सगळं व-हाड मेटॉडोअर कोंबून एकदाचं नवरीच्या गावाकडे रवाना झालं. गावात पोहचताच गाडी बसस्टॅंडवर थांबली. व-हाडी खाली उतरले. मारोतीच्या देवळासमोरच्या पटांगणात वधुपक्षाचे लोक घयायला येतील म्हणून व-हाडी वाट पाहात बसले होते. व-हाडी मंडळापैकी काही हौसी वराडी शिण घालविण्यासाठी दारूच्या दुकानाचा शोध घेत गावात फिरू लागले. वराकडील मंडळीला सोबत नेण्यासाठी दहा पंधरा जणांसोबत काही महिला हातात पुजेचं सामान घेउन वाजतगाजत येत होत्या. तशी गंग्याची कॉलर आणखी टाईट व्हायला लागली. रितीरिवाजाप्रमाणे सगळं आटोपल्यानंतर मंडपात जाण्याअगोदरच गंग्याच्या मनात भलतंच भूत शिरलं. गंग्या गाल फुगवून कोप-यात जाउन बसला. कोणाला काही कळेचना. वरातीतील काहीं शाण्यासुरत्यांनी त्याला विचारलं. "गंग्या का झालं गा? पोटगी काही दुखत तं नाही? लेका, सकाळी तुन शेवया खाल्यानं त्या खुपत असंण...नाही तं संडासले नसंन गेला घाईघाईत' "संडासचा काही इंतजाम करू का?' त्याच्या मित्रानं त्याला विचारलं.. गंग्या कोणाशी बोलायला तयारच नव्हता. काय झालं...म्हणून सगळे चौकशी करून गेले. पण काहीही उपयोग झाला नाही. "गंग्याले फटफटी पाहयजेन असंण. नाही गा?' एकानं शंका उपस्थित केली. "नाही नाही चांगली हिरो होंडा गाडी हाये नं त्याच्याजवळ.' दुसरा बोलला. "मंग फिरीज पाहयजेन असंण..' तिस-यानं पुन्हा शंका घेतली. "बाप चांगला दो जोडयाचा कास्तकार हाये नं गा. त्याले कायची कमी हाये' सगळयांनी तर्कवितर्क लावले. पण कोणालाच गंग्याच्या मनाचा थांग लागेना. सासरा नामदेव म्हैसमारे आता अधिकच घाईकुतीला आला होता. "जवाईबापू, का झालं जी? कसं वाटते? काही तब्येत बरूबर नाही का? डॉक्टरले बलवू का?का झाडफुक करणा-याले बलवू?' पोरीच्या बापानं चिंता व्यक्त केली. गंग्या अजूनही गुपचूप बसून होता. "जावईबापू, काही चुकलं असंण तं हात जोडतो बावा. पण असं करू नोकाजी. का काही कमी राहयलं तं सांगा. आत्तं पूरं करतो' तरीबी गंग्या तोंड उघडायला तयार नव्हता. वरपक्षाकडील मंडळीलाही आश्चर्य वाटलं. एवढा मस्ती करणारा गंग्या चूप कसा? सगळया वरातीत सुकसुक सुरू झाली. गंग्याला काय झालं असावं, त्याचा आपापल्यापरिनं अर्थ लावणं सुरू झालं. कुणी म्हणे का बुढयाचं आणि गंग्याचं निघतेवेळी भांडण झालं. त्याचा गंग्याले राग आला असंण . कोणी म्हणे का देवळाच्या आवारातच त्याची दातखळी बसली. तेव्हा ही जागाच खराब असंण. तं कोणी म्हणे नवरदेवाला कोणी झपाटलं तं नसंन.... बरीच वेळ निघून गेली. तसा वरातील एक जण गंग्याच्या कानाला लागला. त्यानं गंग्या खुलून उठला. "हे पहा मंडळी. मी दोन मिनीटात गंग्याले घेउन येतो. थो कसा बोलत नाही तं पाहयतोच. याची झाडफुक करूनच आणतो.' सगळयांना पुन्हा आश्चार्याचा धक्का बसला. गंग्याला घेउन गर्दीतून वाट काढत दोघेही देवळाच्या मागच्या शेताकडे निघाले सगळे व-हाडी त्यांच्याकडे पाहातच राहिले. काही वेळानंतर गंग्या आणि परश्या डोलत डोलत देवळाकडे परत आले. परश्या व-हाडी मंडळीसमोर बोलायला लागला. "हे पाहा रे बावा. आता गंग्या काउन बोलत नोहता थे खुद गंग्याच सांगनं. मीन आपलं काम केंलं. आता त्याचा निकाल पाहा. आपलं कामच तसं हाये.' नामदेवच्या चेह-यावर समाधनाचे भाव उमटले.. लक्ष्मण बुढा तिथून वेडंवाकळं तोंड करीत दूर झाडाच्या सावलीत जाउन खिशातून बंदरी छाप बिडी काढली आणि ती ओढत बसला. तसा गंग्या एका झटक्यात बोलायला लागला. "मी तवांच पाहून राहयलो मलें तं वा-यावरच सोडलं नवरीवाल्याहीनं. माही काही किंमतच नाही का बा?...' गंग्याचं सगळे जण उत्सुकूतेने ऐकू लागले. "माहयंवालं पयलं पयलं लगीन आन् माहयासाठी घोडं नाही आणलं.? समजत नाही का कोणाले? मले आताच्या आता मंडपात जायले घोडं पाहिजेन. त्याच्या शिवाय नाही येणार मी' गंग्याच्या या वाक्यानं नामदेव म्हैसमारे चाटच पडला. वधुपक्षाकडे कुजबुज सुरू झाली. नामदेवचा मोठा जावई पुढं झाला. "अजी नवरदेव सायेब. मायं आईकता का? या खेडयात कुठचं आलं जी घोडं? तुम्ही अगोदरच सांगून ठेवलं असतं त काही इंतजाम केला असता. आता येथून नागपूरबी लई दूर हाये. तवा झाली चुक माफ करा. पुढच्या खेपीनं तुमाले बग्गीतून फिरवतो. पण आतातं लगीन लावून घ्या' नामदेवचा मोठा जावई बोलला. गंग्या तरी ऐकायला तयार नव्हता. त्यानं ब-याच वेळपर्यंत एकच रि ओढली होती की घोडं पाहिजे म्हणज ेपाहिजे. लग्नाची वेळ निघून जात होती. गावातली शहाणीसुरती माणसं पुढं झाली. त्यांनीही गंग्याले समजविण्याचा आळीपाळीनं एकेकदा प्रयत्न करून पाहिला. पण सगळं निष्पळ. शेवटी वधुपक्षाकडील काही मंडळी जरा दूर जाउन एकमेकांशी बोलत उभी राहिली. वधुपक्षाकडील एक जण तावातावात पुढं झाला. "ठिक हाये जाव्रईबापू. काही येळ थांबा. घोडाच आणतो. तुमची वरात घोडयावरच वाजत गाजत नेतो मंडपात. ' असं म्हणून चारपाच जण कुंभाराच्या घराकडे तरातरा निघाले. गावाच्या बाहेर कुंभाराची वस्ती होती. मंडळी वस्तीत शिरली. गोम्या कुंभाराच्या घराजवळ सगळे उभे राहिले. त्यातील एकानं गोम्या कुंभाराचा पो-या गण्या हयाला जोरात हाक मारली. आवाज ऐकूण एक तरूण पोरगी घराच्या बाहेर डोकावली. "गण्या हाये कावं पोरी घरी?' एकानं पोरीला विचारलं. "न्हाई जी? "कुठं गेला.?' जंगलात गेले.ढोरं चाराले.' "हात तिच्या बहिण. ....' दुस-यानं तोंड वेडवाकडं केलं. "ठिक आहे. चालारे....' त्या मंडळीने तिथून काढता पाय घेतला आणि जंगलाच्या दिशेने तरातरा पायीपायीच निघाले. गावाच्या बाहेर जंगल होतं. घनदाट झाडीतून वाट काढीत मंडळी एका ओढयाजवळ पोहचली. त्यांच्यापैकी कुणालातरी गुरं चारताना गण्या दिसला. मंडळीचा जीव भांडयात पडला.. "राम राम जी जवाईबापू' गण्यानं त्या मंडळीला नमस्कार केला. "राम राम. गणू भाउ. एक काम होतं तुहयासंग' "काम आणं माहयासंग? गरीबासंग कोणतं काम हाये जी?' हसत हसत गण्या बोलला. "काम असं होतं गडया. तुहय खेचर पाहयजे होतं. नवरदेव भाईच रूसला. आता घोडं कुठून आणावं? म्हणून म्हणलं का तुहय खेचरच काम देईन.'दुसरा बोलला. "का बोलता जी? माहया चंप्याले आदत नाही नं जी लग्नाइची? थे काम देईन का नाही सांगता येत नाही बा' गण्यानं आधीच खुलासा केला. "काई नाही होतं. तुू फकस्त आमच्या संग खेचराले घेउन चालं. तुले लागनं तेवढे पैसे देतो' मंडळीपैकी एकानं गण्याला विनंती केली. गण्या नाही हो म्हणता तयार झाला. ****** गाव लागताच एक ओढा आडवा लागला. त्यात गण्यानं त्याच्या खेचरला चांगलं घासून घासून धुवून काढलं. गावात आल्यानंतर त्याला चांगलं सजविलं आणि व-हाड थांबलं तिथं मारोतीच्या देवळाकडें घेउन आला. तोपर्यंत सारेच कंटाळून गेले होते. राहून राहून भुकेने तोंड फाडत झाडाच्या आस-याने बसले होते. "हे घ्या घोडं भाउ. आता बसा चांगले याच्यावर राज्यासारखे' एकानं फर्मान सोडलं. गंग्या खेचराजवळ आला. त्यानं त्याला खालपासून वरपर्यंत चांगलं न्हयाळलं. काही वेळ मंडळीकडे संशयाने पाहातच राहिला. "हे होये का घोडं.? मीच राहयलो होतो च्युत्या बनवाचा, नाही ?' "न्हाई. गधं होये. नाही चुकलो चुकलो. खेचर होये. घोडयाचा लहान भाउ.' चूक सुधारून घेत एक जण बोलला. "हे गधं आन घोडं यांचं एकत्रीत मिश्रण हाये. पिवर हायब्रीड हाये' एकानं मुद्दाम खुलासा केला. " आता न्हाई म्हणू नका. लईच तरास झाला वराडी मंडळीले . लहान पोराबाराईले भूक लागली असंण. तुमी याच्यावर बसले तं तुमचे लई उपकार होतीनं' मंडळीपैकी एक जण अगदी रडकुंडीला आला होता. क्षणभर विचार करून गंग्या शेवटी स्वतःला सावरत खेचरवर जाउन बसला. वरपक्ष आणि वधुपक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आनंदाच्या भरात बॅंड वाजायला लागला. पोरं गाण्याच्या तालावर नाचायला लागली. सगळं व-हाड लग्नमंडपाकडे मार्गस्थ होण्यासाठी सिद्ध झालं. वाजतगाजत व-हाड पुढं पुढं सरकू लागलं. गण्याच्या हातात खेचराचे कासरे होते. अधूनमधुन तो त्याला चांगलं चुचकारत चालत होता. वरातीतील एकाला नाचता नाचता हुकी आली. त्यानं जवळ आणलेली फटाक्याची माळ जमिनीवर अंथरली आणि आगपेटीतील काडी बाहेर काढून ती उगाळली. जळलेली ती काडी फटाक्याच्या वातीला लावताच फटाके धाडधाड फुटू लागले. दणाण दाण्....दणाणदाण........ एवढा वेळ मुकाटयानं चालत असलेलं खेचर बिथरलं . गण्याने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. पण तेही कोणाच्या बापाला ऐकायला तयार नव्हतं. फटाके फुटने अजुूनही सुरूच होते. खेचर चांगलंच बिथरलं. गण्या कुंभाराला ते काही केल्या ऐकत नव्हतं. घाबरलेलया खेचारने गण्याच्या हाताला जोरात एक झटका मारून जंगलाच्या दिशेने नवरदेवासहित धुम ठोकली. सगळे ओरडायला लागले. हातात जे सापडेंल ते त्याच्या दिशेने फेकून मारू लागले. परंतु खेचर आणखी जोरात पळू लागलं. खेचर आणि गंग्या दोघेही नजेरआड होईस्तोवर सगळे व-हाडीदम टाकत धावत होतें. खेचर गंग्याचं "हरण' करून जंगलाच्या दिशेने वायुवेगाने पळत होतं. .******* वरवधुपक्षाकडील आठ दहा जण जंगलात वेगवेगळया दिशेने गंग्याचा शोध घेत होते. पण गंग्या आणि खेचराचा कुठेच पत्ता लागत नव्हता. शेवटी एका झुडूपात कोणीतरी कन्हतांना दिसलं. जवळ जाताच तो गंग्याच असल्याचीं काही लोकांना खात्री झाली. गंग्याची एका मुक्या प्राण्याने चांगलीच जिरवली होती. झुडपात फसलेल्या गंग्याला मोठया हिकमतीनं बाहेर काढण्यात आलं. ओढयात नेउन त्याला आंघोळ घातली. दोघा-तिघांनी हिरोहोंडावर बसवून त्याला गावात आणलं. त्याचा शेकनिवा केला. चांगले कपडे घालून दिले . त्याला धरून एक दोघांनी आधार देत लग्नमंडपात आणलं. दोघांनी दोन हातांनी त्याला अलगद धरले होते. मंगलाकष्टके सुरू झाली, तेव्हा गंग्या वेदनेने विव्हळत होता. मंगलाष्टके आटोपल्यानंतर ब्राम्हणाच्या सांगण्यावरून त्यानं मित्रांच्या हाताच्या सहा-यानं नववधुच्या गळयात माळ घातली. वधुचा हात लाजत लाजत त्याच्या गळयाजवळ गेला. पुष्पमाला टाकताना गर्दीत तिच्या हातांचा धक्का गंग्याच्या अंगाला लागला, तसा तो जोरात किंचाळला. " मेलो रे बाप्पा........' . * विजयकुमार राउतसाईनगर, हिंगणा रोडनागपूर 16 | |||
-