तथागत भगवान गौतम बुद्ध देव, पुर्नजन्म किंवा आत्मा या गोष्टीचं खंडण करतात. ज्या
गावात किंवा नगरात त्यांचे प्रवचन असे तिथे आदल्या दिवसीच दवंडी देउन या तिन्ही
गोष्टींबद्दल कुणी काही विचारू नये, असे जाहिर करण्यात येत असे. अगदी तपश्येच्या
काळात मानवी जीवनातील सुखदुःखाच्या मुळाशी जाउन माणसाला दुःखमुक्त कसं करता येईल,
यावर त्यांनी तत्कालीन गुरूंनी सांगीतलेले शास्त्रातील सगळेच मार्ग अवलंबिले होते.
परंतु सगळं निरर्थक झालं. शेवटी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि त्यांनी सगळे
बनेबनाव नाकारले.त्यात "देव'ही संकल्पनाही आहे. देव म्हणताना प्रत्येकाचा "देव' हा
वेगळा असतो. तो परंपरेने जसा असतो, तशीच कल्पना करून देवाचे रूप ठरविल्या जाते.
माणसाला शेवटी प्रत्येक गोष्टीत समाधान हवे असते. नैसर्गिक नियमाप्रमाणे
त्याचे मन उत्तरासाठी कासाविस झालेले असते. बुद्धांनी तर थेट देवलाच नाकारले.
त्यामुळे व्यावहारीक जगातील सगळी गृहितकेच ढसाढसा कोसळली. बुद्धांनी तथाकथित देव
संकल्पना नाकारण्यामागचे रहस्य काय? त्या खोलात जाण्यापूर्वी जगातले सगळे शास्त्र
तपासून बघीतले की एक सुत्र हाती लागतं. परमेश्वराचा शोध घ्यायला बाहेर पडलेला
माणूस शेवटी स्वतःपर्यंतच येउन पोहचतो, हे अध्यात्म सांगते. बुद्ध महत्वाचं
काहीतरी शोधायला गेले आणि स्वतःपर्यंत येउन नाही का येउन पोहचले? शेवटी हिंदू
धर्मातच नव्हे तर इतरही धर्मातील "देव' ही संकल्पना काही धर्मांध लोकांनी स्वतःच्या
फायदयासाठी कशी राबविली, हे लक्षात येईल. संत ज्ञानेश्वरांना जो बोध होतो, त्यालाच
आत्मबोध म्हणतात. तथागत त्याला "स्वयंदीप' होणे म्हणतात. तर हिंदू धर्मात त्याला
ब्रम्हज्ञान म्हणतात. आज या लेखात देव, आत्मबोध, स्वयंदीप होणं किंवा ब्रम्हज्ञान
म्हणून ज्या गोंष्टींबद्दल आपल्याला कुतूहल असते त्याबद्दल थोडं समजून घेण्याचा
प्रयत्न करूया. परमेश्वराच्या शोधाची सुरवात कुठूनही करा, तरी एक अवकाश मात्र
शिल्लक राहतं. नदी जशी कुठूनही उगम पावते आणि सर्वात शेवटी सागरालाच जाउन मिळते.
अगदी त्याप्रमाणे सगळे शास्त्रच अध्यात्मशास्त्राला जाउन मिळतात. नास्तिक असो वा
आस्तिक सगळयांचा प्रवास शेवटी त्या अनंताच्या दिशेनेच होतो. आता
मानसशास्त्रातील संकल्पना थोडी समजून घेउया. माणसाला जागृत आणि अजागृत अशी दोन मने
असतात, हे सिग्मंड फ्राईडनंच मानसशास्त्रातील संशोधनातून स्पष्ट केलं. आपल्याकडे
मनाचं विज्ञान फार प्राचीन आहे. जागृत मन हे फक्त वीस टक्के आणि 80 टक्के
अर्धजागृत मनाचा व्याप असतो. या वीस टक्के मेंदूपैकी आतापर्यंत सगळयात जास्त मेंदू
महानशास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईननेच वापरला म्हणतात. "परमेश्वर' संकल्पनेच्या
निर्मीतीसाठी हा मेंदूच काय तो कारणीभूत आहे. मेंदूच परमेश्वराचं उगमस्थान आहे,
असं म्हणतात ते अगदी शंभर टक्के खरं आहे. या अर्धजागृत मनात जी अमर्याद शक्ती
आहे, तिला जागृत करण्यासाठी आपल्याला पुन्हा अध्यात्मशास्त्राचा आधार घ्यावा लागतो.
कारण ती जागृत करणे म्हणजे फार परिश्रमाचे आणि अशक्य कोटीतील आहे. इथं झुठ किंवा
नकारात्मक विचारांना तिलांजली द्यावी लागते. खरं तर हा एक "देव' होण्यापेक्षा
"माणूस' होण्याचाच प्रयत्न असतो. आपण सकारात्मक असलो म्हणजे कल्पनेशी सहचर्य करून
थोडीफार त्या ज्ञानाची अनुभूती व्हायला लागते. कल्पना केल्यानंतर ती प्रत्यक्षात
उतरविण्याची उर्वरित कामगिरी मेंदूच पार पाडतो. मेंदूला जागृत करण्यासाठी कसे आचरण
असावे हे सांगते अध्यात्मशास्त्र ! आता पुन्हा आपण विज्ञानाकडे वळलो तर असं दिसून
येईल की अगोदर विज्ञानही अशा अलौकिेक शक्तीचं अस्तित्व मान्य करायला तयार नव्हतं.
कारण विज्ञानाचा सगळा खेळ चालतो भौतिक जगात माणसाला आलेल्या अनुभवांवर. परंतु
अध्यात्मात सांगीतलेले बरेचसे प्रयोग काही काळानंतर विज्ञानालाही सिद्ध झालेले
आहेत. अणूरेणू किंवा सुक्ष्म लहरीपर्यंत (फ्रिक्वेन्सी ) विश्वाचे रहस्य मंद
गतीने का होईना विज्ञानाच्या हाती आले आहे. शास्त्रज्ञांकडून त्या मागचं रहस्य
समजून घेण्याचा प्रयत्न हा नेहमी होतच असतो आणि भविष्यातही होत राहिल. विज्ञानाने
डावा मेंदू आणि उजवा मेंदू अशी विभागणी केली आहे. डावा मेंदू हा व्यवहारी असतो. तर
उजवा मेंदू हा एकंदर भोळा असतो. आपण नाही का शंकराला भोळा म्हणून संबोधतो. हा भोळा
शंकर रावणाच्या भक्तीलाही पावतो. तो चक्क रावणालाही वरदान देउन टाकतो. नंतर या
रावणाच्या उपद्व्यापाचा प्रभू रामचंद्रानाही भयंकर त्रास होतोच ना. या अवचनेत
मनाची शक्ती मात्र अफाट आहे. डावा मेंदू संशय किंवा तार्किकतेचा आधार घेउन व्यवहार
करतो. व्यवहारात जे काही शिकतो ते डाव्या मेंदूचं कार्य आहे. उजवा मेंदू मात्र
आतल्या स्फुर्तींवर चालणारा, म्हणून तो तार्किकतेच्या पलिकडे असतो. "अल्लादुनीचा
चिराग' असतो ना तसं उजव्या मेंदूचं कार्य आहे. त्याला पाहिजे ते मनात टाका ,
त्याप्रमाणेच तो कार्य करण्यास सिद्ध होतो. म्हणजे हा मेंदू "ब्रेन प्रोग्रॅमिंग'
करतो. संगणकाच्या भाषेत तो "साप्टवेअर' आहे. आजपर्यंत महान व्यक्तींचा इतिहास
बघीतला तर एडीसन किंवा मादाम क्यूरी यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या
संशोधन कार्यात याच मेंदूने महत्वाचे योगदान दिल्याचं वाचनात आले. उजवा मेंदू हा
भोळा भाबडा असला तरी त्याच्याजवळ अमर्याद शक्तीचं भांडार आहे. तो सुप्त असला तरी
त्याला जागृत करण्यासाठी आजच्या युगात अनेक मार्ग अवलंबिण्यात येतात.
अध्यात्मशास्त्र म्हणून प्राणायाम किंवा कुंडलिनी जागृतीचा मार्ग सांगते.
मानसशास्त्र चेतन, अवचेतन मनाच्या भाषेत मेंदूचं विभागणी करतं. अवचेतन मनाची
शक्ती ही 80 टक्के असल्याचं मानते. तर मेंदू विज्ञान डाव्या आणि उजव्या भागात
विभागणी करून उजव्या मेंदूत खूप मोठी शक्ती कार्यरत असल्याचं सांगते. त्या
दृष्टीने माणसात पाहिजे तसे परिवर्तन घडविता येत असल्याचं आधुनिक विज्ञान सांगते.
अध्यात्मशास्त्र मात्र कुंडलिनीच्या रूपात सगळी शक्ती सुप्तावस्थेत मुळाधार चक्रात
सापासारखी तीन वेटोळे घालून बसल्याचं हजारो युगांपासून सांगते आहे. ही शक्ती
जागविल्यास अत्त्युच्य उच्च संवेदना जाणवायला लागतात. माणसाचा प्रवास एका अद्भूत
जगात व्हायला लागतो. * विजयकुमार राऊत |
|
|
|