* विजयकुमार राउत
आमसभेसाठी गावकरी ग्रामपंचायतच्या आवारात तासभ-यापासून आपसात कुजबुज करीत बसले होते. समोर कार्यकारीणीचे सदस्य आणि ग्रामसेवक पि.के. कदम खुर्च्यांत बसून कुणाची तरी वाट पाहात होते. त्यापैकी सरपंच ढेबरू काळदाते अधूनमधून मनगटाच्या घडयाळात किती वाजले, याचा अंदाज घेत होते, तर त्यांच्या बाजूला बसलेल्या महिला सदस्या केव्हापासून बेचैन झाल्या होत्या. बोलता बोलता नाक मुरडत मारक्या म्हशीसारख्या ग्रामसेवक कदम आणि सरपंच ढेबरू काळदाते यांच्याकडे पाहात होत्या. त्यांच्या एकंदर हालचालींना साथ देत ग्रामपंचायत सदस्य सदा पूरे यांना असहय झाल्याने ते उठून उभे झाले. अस्वस्थेतून दोनचारदा उठबशा काढल्या. नंतर राहावलं नाही म्हणून ताडकन त्यांनी फाईलवरच्या कागदावर सरपंचचांच्या सहया घेत असलेल्या वासू चपराशाला हाक मारली.
"वास्या अबे ये वास्या..इकडं ये.'
"आलो. आलो..'वासुदेव हातचे काम सोडून ग्रामपंचायत सदस्याच्या हाकेसरशी धावून आला.
"च्या मायले नेवो तं. तवांच वाटच पाहयून राहयलो बे मी. कवा येतीन रे तुमचे सायेब? '
"आता थोडयाचं वेळात येईन म्हणते नं आमचे साहेब' वासू डावा खांदा खाजवत बोलला.
"थे येतीनं तवा येतीन. त्याहीले कामच कोणतं राहयते. आम्ही त्याहीच्यासाठी रिकामं बसून राहाचं का? मले इनीच्या गावले जाचं होतं. तिनं मले बोलावलं हाये. याच वर्षी पोराचं लगीन झालं न. पहल्यांदाच जात होतं तं थेबी राहयलं.. च्या मायले नेओ तं आम्ही कामधंदे सोडून तवांचं झक मारत बसलो आन् थे तिसमारखानसारखे येउन राहयले.' सदा पूरेंचा पारा जाम भडकला होता.
"हो बाई मला पण बचत गटाच्या मिटींगला पण ज्यायचं होतं. बायका वाट पाहात असतीन.' महिला ग्रा.पं.सदस्या मालतीताई कुरकुरे कुरकुर करीत बोलल्या.
"हाउ ना बाई. कवाभी मिटींगा घेते हे लोक. आता का सांगते तं काजिन का बाप्पा! जसं चालते तसं चालू दयाव. नाही तं काय? मलेबी लेकीच्या बाळंतपणाले मेटाउमरीले जाचं हाये.' इतका वेळ गप्प राहिलेल्या दुस-या सदस्या कमलाबाई डोईफोडे डोक्यावर पदर घेत बोलल्या.
"गावाची का आता हागमूत बंद करते का थो सायेब?' सरपंचाच्या बाजूनं बसलेला बाजीराव फोकमारे बोलला.
" त्याहीची हागमूत बंद करता करता सरकारचीच याहीनं बंद करून टाकली. आहो गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी वाट्टनं थे तितंबे करून पाहयले. रस्त्यांवर हागणा-यांचे जाहिर सत्कार काय केले. उघडयावर बसणा-यांचा पत्ता सांगणा-यांलें इनाम बी देल्ले .. पण काहीच उपेग झाला नाही. ' ग्रामपंचायत सदस्य वाकडे वाकडयात शिरत बोलले.
तेव्हापासून गुपचूप सहया मारण्यात व्यस्त असलेले सरपंच काळदाते शांतपणे बोलले.
"जाउ दयानं राजेहो . आता कोणी आलंच नाही त. थोडया वेळानं चालू करून टाकू आमसभा. कोरम तं तसाबी पूर्ण झालाच हायेनं. मंग कोणाची वाट पाहयाची? ' सरपंचांनी समजूतदारपणा दाखविला.
"ओ कदम सायेब.सुरू करा तुमची आमसभा. लईच झाली भोपाली. आम्ही कववरी वाट पाहात बसावं. मले बी जायचं हाये बाहेरगावले मयतीले. इथं सरपंचालेच थांब म्हणा..' मध्येच गर्दीतून कोणी उभं होत बोललं.
"स्वारी ...स्वारी शांत बसा. थोडा उशिर झाल्याबद्दल माफ करा. बिडीओ साहेब येतच हायेत. मला आताच त्यांचा मोबाईल आला होता' कदम समजूत काढण्याच्या सुरात बोलले.
"एक तासापासून वाट पाहून राहयलो. काही कामधंदे नाही का आमाले?' गर्दीतून श्यामराव धुसफुसेंनी प्रश्न केला.
ग्रामसेवक कदम आता पुरते रडकुंडीस आले होते. त्यांची बाजू घेत सरपंच काळदाते उभे राहिले.
"हे पाहा माहय आयकुन घ्या. आता थोडयाच वेळात ग्रामसभा चालू होईन. आपलं गाव स्वच्छ सुंदर राहासाठी सरकार किती प्रयत्न करते. लाखो रूपये खर्च करते. पण आपण काही आयकालेच तयार नाही..' सरपंच काळदाते यांनी समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
"ओ सरपंच सायेब. तुम्ही आमाले नाकानं गोष्टी सांगता. मांगच्या वर्षी थ्या जयस्वाल सायेबाले गावात बिअर बार सुरू करण्यासाठी कोणं देल्ली एनओसी? ' गावातील एक सामाजिक कार्यकर्तो तावातावानं बोलून गेला.
"होनं तवा नाही घेतली मिटींग. रजिस्टरवर जागा खाली ठेवून मंजुरीचा ठरावबी करून घेतला याहीच्या माणसानं.' विरोधी पक्षाचा एक कार्यकर्ता तावातावानं बोलला.
" हे बघा ही वेळ भांडण्याची नाही. गावाच्या भल्यासाठी राजकारण विसरून विकासाचं राजकारण केलं तर बरं होईन.' गावक-यांची शेकडो तोंडे आवरणे आता सरपंच काळदाते यांना अशक्य झाले होते. ग्रामसेवक कदम तो "माहौल' पाहून उभ्या उभ्याच पायात अळखळू लागले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील राजकारणाला आता चांगलेच तोंड फुटत चालले होते.
"हे बघा शांत व्हा....शांत व्हा' ग्रामसेवक कदम सगळयांना शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
इतक्यात निळया रंगाची जुनी जिप भकभक करीत पटांगणात येउन उभी राहली. ग्रामसेवक कदम व चपराशी वासू हातात फाईल घेउन धावत पुढे झाले. गाडीतून उतरताच बीडीओ मच्छरमारेंनी गर्दीकडे एक कटाक्ष टाकला. कदम यांनी मच्छरमारे साहेबांच्या दडपणाखाली चेह-यावर जबरदस्तीने प्रसन्नतेचे भाव आणले. बीडीओंच्या मागे पुढे होत ग्रामसेवक यांनी त्यांना सभास्थळी आणले. कार्यकारीणीनेही त्यांचं मोैखिक स्वागत केलं.
ग्रामसेवक कदम यांनी वेळ न घालवता माईक सांभाळला.
"हॅलो.. हॅलो.. माईक टेस्टींग...' एकदोनदा माईकवर हाताने टकटक वाजवले अन् फाईल सांभाळत कदम बोलू लागले.
" नुकतेच बीडीओ साहेब गावात आलेले आहेत. आता डायरेक्ट मिटींगलाच सुरवात करू ' कदम बोलले.
पुष्पगुच्छाने स्वागत केल्यानंतर ग्रामसेवकांनी विषयालाच हात घातला.
. "आपलं गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त व्हावं यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू हाये. आजची मिटींग आहे निर्मल ग्राम आणि हागणदारीमुक्त गाव या शासनाच्या अभियानांची माहिती देण्यासाठी. आपलं गाव निर्मल ग्राम करण्यासाठी काय काय करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यासाठी बीडीओ साहेब बोलणार आहेत. तेव्हा कुणाला शंका किंवा कुशंका आल्यास त्यांनी संकोच न बाळगता काही विचारावं-.'
इतक्यात एक जण गर्दीतून उभा होत बाहेर जायला लागला. तेव्हा ग्रामसेवक कदम यांनी त्यांना हातानेच शांत बसण्याचा इशारा केला.
" मले जोराची लघुशंका आली. हात कायले दाखवून राहयले.' बोट दाखवित तो घाईघाईने बाहेर निघून गेला.
कोणी काहीच विचारावयास तयार नसल्याचं लक्षात येताच बिडीओंनी कुठलीच औपचारिका न पाळता माईक हातात घेतला.
"प्रिय बंधू आणि भगीनींनो. ... 'म्हणत बीडीओ मच्छरमारे यांनी माहिती देण्यास सुरवात केली. निर्मल ग्रामवर बीडीओंनी अभियानांची माहिती दिली. गाव हागणदरीमुक्त कसं करता येईल यावर त्यांनी तासभर गावक-यांचे प्रबोधन केलं "शासनाच्या योजना आणि लोकसहभागाची आवश्यकता' याविषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. परंतु कितीही सांगीतलं तरी गावक-यांनी कुठलंच "टेंशन' डोक्यावर घेतलं नाही. वैयक्तिक लाभाच्याच योजनांवरच अधिक माहिती जाणून घेतली. कोणत्या योजनांचा स्वतःला लाभ कसा घेता येईल, त्यासाठी कोणते "फंडे' वापरावे लागतील, हे गुपित जाणण्यातच अधिक वेळ गेला. शेवटी बीडिओंनी गाव निर्मल कसा ठेवता येईल, याची शपथही नाईलाजाने सगळया गावक-यांकडून एकमुखाने वदवून घेतली. आदर्श गाव घडवायचंच, असा संकल्प समारोपाला आलेल्या चहाबरोबर गावक-यांनी पिउन सोडला. कोलाहलात सुरू झालेली आमसभा एकदाची शांततेत पार पडली. बीडीओ मच्छरमारे यांनी गावातून काढता पाय घेतला आणि समाधानाने दुस-या गावाकडे निघून गेले.
दोन तीन दिवस जात नाहीत, तोच एके दिवशी भल्या पहाटे खाटेवरून उठलेला श्यामराव धोतराच्या पदरानं डोळे चोळीत सांधीत गेला. टमरेलानं रांजणातलं पाणी घेतलं. चेह-यावर चारदोन झपके मारले. उरलेलं पाणी तोंडात भरून "गुळगुळ' असा विचित्र आवाज करीत त्यानं गुळण्या केल्या. हातात टमरेल घेउन तरातरा "बाहेरकडे' जाण्यास निघाला. गावाला ओलांडून झप झप पाय टाकत जात असताना नामदेव चोलपे त्याला आडवा गेला. क्षणभर जागच्या जागी थांबत श्यामरावला पाहून बोलला.
"राम राम गा श्यामराव भाउ'
"राम राम.' त्याच्याकडे न बघता श्यामराव पुढे निघाला.
" बाप्पा, एवढया सकारवकार घाईनं कुठं चालला गा? थ्या दिसी मिटींगमधी तं घरी संडास बांधण्याची शपथबी खाल्ली आन्ं आता गावाच्या बाहेर चालला शपथ मोडाले.'
"काउन. तुले कोणतं जड होउन राहयलं? मीनं इचारलं का तुले? तू देशिन का पैसे उधार मले संडास बांधाले?' असं मध्येच हटकल्यामुळे श्यामरावला त्याचा जरा रागच आला होता.
"बाप्पा, मी कायले देउन गा? बरं जाउ दे.. हाये का एखांदी बिडी?' नामदेव विणवणी करीत बोलला.
"तुले तं भलत्याच वक्ती तलप येते. फुकटाचंच पाहात जा. फुकटचोदू लेकाचा. इकडं मले जोरात लागली आन् तुले मजाक सुचून राहयली. वारेवा..'
सवयीप्रमाणे बिडी पिण्यासाठी इकडं नामदेवचा जीव अगदी कासाविस झाला होता.
"देणं गा.. खूप भाव खातेस बा. सकाळच्या पाहयरी बिडी पेल्याबिगर डोक्संच चालत नाही आपलं.'
"मंग ठेवत जानं ... पैशानं इकत घेउन..' श्यामरावनं खिशातून बिडी काढून नामदेवच्या हातात दिली. दुसरी बिडी स्वतःच्या तोंडात धरली.
"आता डब्बीभी पाहजेन असंण? 'श्यामरावनं खोचकपणे इचारलं.
"नाही, थे हाये नं माहयाच जवळ. नेहमी कोणी नाही कोणी भेटते नं तुहयासारखं. ' नामदेवनं हसत हसत बांडीच्या खिशातून माचिस काढली. तिच्यावर एका बाजूनं काडी फर्रंर करीत घासली. आग चेतवल्यानंतर त्यानं दोन्ही हाताची आडप धरीत बिडी सुलगावली. हातातली काडी खाली फेकण्यापूर्वी श्यामरावची बिडीही त्यानं पेटवून दिली. अन् शांत चित्तानं झुरके मारत पुढे जायला निघाला.
"ये ये लवकर जाउन ये. बरोबर पाहयजो...नाहीतं धोतरातच करशिन.' जाता जाता श्यामरावला सल्ला दयायला तो विसरला नाही.
श्यामराव कासविस झाल्यामुळे लगबग करीत गावाच्या गोदरीजवळ आला. गावाच्या अगदी टोकावर मुख्य महामार्ग होता. सकाळपासूनच त्यावरील वर्दळ सुरू व्हायची. सूर्य निघायच्या अगोदर गावातील काही लोक येथे नित्यनेमाने न चुकता हजेरी लावायचे. पोट खाली केल्याचा आनंद घेत शेजारीच असलेल्या टपरीवर काही जण चहा पित गप्पा मारत बसायचे. आजही सकाळी सकाळी रोडच्या दोन्ही बाजूला अनेक जण खाली टमरेल ठेवून बिनधास्त बसले होते. मोकळया हवेचा मनसोक्त आस्वाद घेत निर्विकार चेह-यानं बसून "महत्कार्य' उरकवित होते. चारदोन माणसांपासून दहा विस फुटाच्या अंतरावर जागा थोडी रिकामी होती. श्यामरावने एका ठिकाणी "फुलस्टॉप' घेतला. मोकळी जागा निवडली आणि तेथे जाउन बिडीचे झुरके घेत ठमरेल खाली ठेवलं. काष्टयाला हात घातला. धोतरं कमरेभोवती गुंडाळून खाली बसण्यापूर्वीच त्यानं "टरर्ा....टर्रा..' असा उंच पट्टीतील सूर आळवला. आपल्याच तंद्रीत शेजारी निवांतपणे बसलेला बाजीराव श्यामरावनं काढलेल्या त्या अनोळखी स्वराने दचकला. तसा तो श्यामरावकडे पाहात बोलला..
"कोणाचं इंजिन होये रे बावा?'
"काउन. तुले दचकाले का झालं?'
"दचकणार नाही तं का गा? एवढं मोठयानं गाणं म्हणशिन तं कोण नाही दचकणार?'
"तुले मी इंजिन वाटतो का? काउन इतक्यातच वळखी इसरला का? ग्रामपंचायतमधी निवडून आला तं लगीत शायणा झाला असंण नाही?'
"निवडून आलो म्हणजे जसा तोपचंद झालो नाही का? गरामपंचायतचा मेंबरच तं केलं. आणं याच्यात का कमाई राहयते ? आपली ठेकेदारी हाये म्हणून बरं हाये. नाहीतं गरामपंचायतीमंधी भेटतेंच का कंद?' बाजीराव नेहमीचे रडगाणे गात होता.
"बाप्पा आमच्यापरिस मानापानानं मोठा हायेस नं तू. चांगल्या दोन दोन मोटारी घरी हाये. मोठां बंगला हाये... संडास हाये अन् तरीबी तू रस्त्यावर येउन बसते. कमाल हाये बावा !.'
" घरी चांगला मारबलचा संडास हाये. पण जे मज्या खुल्या वातावरणात राहयते थे घरच्या संडासात नाही येत नं भाउ. उतरतच नाही उघडयावर बसल्याशिवाय. पोटात गॅस जमा होते. आन् मंग बिमारी होते. तुले तं माहीतच हाये दिवसभर "ढरा ढरा' करत हवा खराब करत इंजिन सुरू राहयते आपलं.' बाजीरावनं आपली बाजू मांडली.
" वारे तुहावालं इंजिन. सरकार म्हणते संडास बांधा, रस्त्यावर बसू नका आन् आपूण बसतो रस्ते पुंजत ' श्यामराव बिडीचे झुरके सोडीत निवांतपणे मोकळं झाल्याचा आनंद घेत होता.
गोष्टी सुरू असताना एक मेटॅडोअर बाजीरावच्या अगदी जवळून भुर्र करीत निघून गेला. मेटॅडोअर अंगावर येण्याच्या भितीने बाजीराव जरा मागेच सरकला. तेवढयात हाताच्या धक्क्यानं त्याच्या समोरच्या टमरेलानं पल्टी खाल्ली.
"हट तिच्या माय बहिण. भोसळीचे आंगावर आणतेत का?' मनातल्या मनात शिवीगाळ करीत बाजीराव स्वतःला सावरत बोलला.
"त्याहीचं का चुकते? सडक हागासाठी थोडीच राहयते.'
" तुहया टमरेलातलं जरासं पाणी देजो बरं. घरी जाउन तुले आणून देतो. नाही तं मले पाहा लागंन एखादा मोठ्ठा गोटा'
"हो थे बरं राहयते. गावघुती तरीका. बाहेरदेशात थे कोणता म्हणते तं पेपर वापरतेत नं तसां... आता तू मले पाणी आणून कवा देशिन आणं मी घरी कवा जाईन. त्यापेक्षा दोघंही थोंडं थोडं वापरून उरकून घेउ. शेजारधर्म निभवलाच पाहयजेनं बावा.' श्यामरावनं मध्यममार्ग काढला.
इतक्यात दोन जिप मोटारी त्यांच्या पुढयात येउन उभ्या राहिल्या. तेव्हा गोदरीत एकाएकी पळापळ सुरू झाली. जो तो ज्या अवस्थेत असेल अगदी त्याच स्थितीत कपडे सांभाळीत शेजारच्या शेताकडे पळायला लागले. गाडयांतून चारपाच पोलिस आणि काही जण ताडताड गाडीच्या खाली उतरले. शेवटचा कार्यक्रम पार पाडत असताना श्यामराव अन्ं बाजीराव यांनी एकाच वेळी मान वर उचलली.
"गुड मार्निंग...काय, झाली का?' त्या टोळक्यातील एकानं भुवयांची हालचाल करीत विचारलं. दोघांनाही काय भानगड हे अद्याप कळलं नव्हतं.
"पाणी सांडलं होतं. दोघंबी एका टमरेलात उरकून घेतो म्हणलं...' काहीच बोध झाला नसल्यामुळे हसत हसत श्यामराव आरामात आटपत होता.
" तुमचं आटोपलं असेल तर तुम्हाला घ्यायला आलो होतो. आम्ही "गुड मार्निंग' पथकवाले. ये चल घेरे यांचे चांगले फोटो.. पेपरात छापायचे आहेत.' त्यांच्यासोबत आलेल्या फोटाग्राफरने पुढे होत चटकन कॅमेरा "क्लिक' केला व फटाफट दोनचार फोटो घेतले.
" मजाक करता काजी सायेब? उघडयावर बसलो तं बरं वाटून राहयलं लमचं.' श्यामरावने धोतर व्यवस्थित करीत शरमेने मान खाली घातली.
"गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी शपथ घेता आणि ती अशारितीने पाळता काय?' त्यांच्यापैकी एक जण बोलला.
"हे घ्या गुलाबाचं फुल. स्वागत आहे तुमचं.' एका साहेबानं जबरदस्तीनं त्यांच्या हातात दोन गुलाबाचे फूलं कोंबले .
"चला रे, घ्या यांना गाडीत..' कडक आवाजात एकानं ऑर्डर देताच चौघे पुढे झाले. "नाही नाही' म्हणताना श्यामराव व बाजीरावचा हात गच्च पकडीत त्यांना गाडीत बसविण्यात आलं. प्रकरण आता दोघांनाही चांगलं कळलं होतं. संपूर्ण जिल्हयात हागणदारीमुक्त गावासाठी असलेल्या सरकारच्या अभियानाचा हा एक भाग असल्याचं पेपरात दोनचार दिवसांपूर्वीच छापून आलं होतं. अनेक प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर सरकारनं हे कठोर पाउल उचलेलं होतं. पथकातील साहेबांकडे श्यामराव व बाजीरावंने बरीच विणवणी केली. पण अधिकारी काही केल्या ऐकायलाच तयार नव्हते.
"माफ कराजी सायेब. आजी माहया घराचं बांधकाम सुरू हाये म्हणून बसलो होतो बाप्पा. अजी मी या गावच्या ग्रामपंचायतचा मेंबर हायोंनं बावा !.. ...'
"मग तर तुम्हाला चांगली कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ' अधिकारी दरडावित बोलला.
"सायेब यंदा घरी संडासच बांधतो. पण एक इनंती करतो अशी बेईज्जत करू नोका साहेब. लागनंतं उदया पासून घरीच करतो सोय.. ' काकुळतीला येत श्यामराव बोलला.
"ते सगळं पोलिस स्टेशनला गेल्यानंतर सांगा. चांगले दोन दिवस पोलिस कोठडीची हवा खाउन याल तेव्हाच कळेल तुम्हाला....' असं म्हणत मोठे साहेब गाडीत बसले अन् दार ओढून घेतलं.
"चला रे' असं म्हणताच गाडया सुरू झाल्या अन् तालुक्याच्या गावाकडे रवानाही झाल्या. चहाच्या टपरीवर जमा झालेले सगळे मात्र फिदीफिदी हसत होते.
* विजयकुमार राउत
साईनगर, हिंगणा रोड नागपूर -16
******
******