Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

शुक्रवार, 25 दिसंबर 2015

परमात्मा गृहउद्योग प्रा.लिमीटेड

विजयकुमार राउत

एका मित्राच्या घरी लग्नसमारंभानिमित्त जाण्याचा प्रसंग आला. मित्र आणि त्याच्या कुटूंबातील सगळे प्रागतिक विचाराचे पुरस्कर्ते होते. त्यांनी लग्नसमारंभात परंपरेला फाटा देउन कार्यक्रमांची आखणी केली. प्रथापरंपरांना छेद देउन सामाजपयोगी कार्य करण्यासाठी कार्यक्रम आखला. अनाथ, अपंग मुलांना काही साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे नाव होते "आज देवाला सुटी आहे'. कार्यक्रमामागचा हेतू जरी चांगला असला तरी त्यावर बरीच टिका झाली. समाजात देवाला शिव्या देणारे किंवा देवाच्या नावाने दुकानदारी चालविणारे नेहमीच "देव' या शब्दांवरून द्वंद माजवितात. कुणी देव मानतात तर कुणी मानत नाहीत. दोघेही भांडणासाठी देव या शब्दाचा उपयोग करतात. आमच्या एका मित्राने कार्यक्रमाच्या शीर्षकावरून "देव काय चपराशी आहे, सुटी द्यायला, अशी उपरोधीक टिका केली. "देव' ही संकल्पनाच मुळात भांडणाचं कारण ठरत असेल तर अशा संकल्पना आपण वापरतोच कशाला? लग्न सोहळा हा त्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न. तसेच देव मानने किंवा न मानले हा ज्याचा त्याचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. देवला मानले काय किंवा न मानले काय देवाला काहीच फरक पडत नाही. उलट मानला आणि नाही मानला तरी आपल्यावरच त्याचे परिणाम जाणवायला लागतात. भगवतगीता काय म्हणते किंवा ज्ञानेश्‍वर माउली काय सांगते, याविषयी समाजात चर्चा कधीच होत नाही. तर कार्यक्रमाच्या नावावरूनच टिकाटिपण्णी करून भांडण उकरून काढणार दोन्ही पक्ष समाजात दुही निर्माण करण्याचं काम करीत असतात. समाजात अस्वस्थता निर्माण करून सतत समाजाला वेठीस धरण्याचे काम करतात. ही भांडणं केवळ आजची नव्हे तर युगायुंगांची आहेत.
देवाचा मृत्यू झाला या नित्शेच्या वाक्‍यापासून श्रीराम लांगूंच्या "देवाला आता देवघरातून बाहेर काढले पाहिजे, या विधानापर्यंतचा वाद अजूनही समाजात अस्तित्वात आहेच. गीतेतला परमेश्‍वर , परमात्मा कुठे आहे. भगवान श्रीकृष्ण सांगतात तसा परमेश्‍वर किंवा कर्म, ज्ञानाच्या ठिकाणी स्थिारावलेला भक्‍त आपण समाजात पाहतो का? याचा कधी शोध घेतो का? ते सोडून प्रत्येकाने आपला स्वतःचा वेगळा "देव' निर्माण केला आहे. हिंदु, मुस्लीम,शिख, ईसाई यांच्या नंतरही अनेक पंथ वा धर्म जन्माला आले आहेत. त्यातूनही उपपंथ निर्माण झाले आहेत. एक लक्षात ठेवा हे धर्म, पंथ वा उपपंथ त्या त्या धर्मसंस्थापकांचे निर्वाण झाल्यावरच जन्माला आले आहेत. इतकेच नव्हे तर आजच्या काळात तर जितक्‍या व्यक्‍ती तितकेच त्याचे धर्म निर्माण झाल्याचे दिसून येतात. परमेश्‍वर किंवा धर्माच्या नावावर वाद होतात. कत्तली होतात. परमेश्‍वर हा शब्दच आता संकुचित आणि कलंकित झाला आहे. देवाचं नाव काढलं की काढलं तर त्याच्यावर हल्ला करणारे संधीच्या शोधातच असतात की काय? काळकर्त शिवराम परांजपेंनी "जसे लोक तसे त्यांचे देव' असे म्हटले होते. आता जितक्‍या व्यक्‍ती तितके देव अशी संकल्पना रूढ होउ पाहातेय. म्हणून आता "देव' ही संकल्पनाच गृहउद्योग प्रा.लिमीटेड कंपनीसारखी झाली आहे. देव, धर्म या संकल्पना स्वार्थी लोकांची दुकानदारी झाली आहे. धर्मगुरू एक ब्रांड घेउन समुहाला गोळा करून सर्वसामान्य जनतेला बनविण्याचे काम करीत आहेत. एक उपासना पद्‌धती हद्‌दपार केली तर दुसरी सुरू करून तिला मानणारे लोक गोळा केले जातात. त्यातून मनामनात द-या निर्माण करणे एवढीच काय ते या धर्मांनी दिलेली भेट होय.. समाजही फुशारकीने आपल्या छातीवर धर्माचा बिल्ला मिरवित असतो. त्याचे परिणामच केवळ आपल्याला भोगावे लागतात. धर्माचा योग्य अर्थ समजून घेणारे फारच थोडे या पृथ्वीतलावर झालेले आहेत. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, कबिर आणि असे कितीतरी संत धर्माला विशाल आकाश मिळवून देण्यासाठी जन्माला आले आहेत. त्यामुळे इतिहास गौरवांकित झाला आहे. इतरांनी मात्र इतिहासाचे मढे उकरूनसमाजात दुर्गंधीच पसरविण्याचा धंदा केला आहे.
 
Blogger Templates