Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 30 अप्रैल 2015

हे दुःखी लोकांच्या देशा !


                                     * विजयकुमार राउत
हे माझया परमप्रिय देशा... तुझी ही दशा पाहताना मला खरंच फार वाईट वाटतं. अगदी कालपरवाच तुझया तब्येतीचा हाल हवाल जाणून घेताना काळीज अगदी सुन्न झाले. कुठल्यातरी "वर्ल्ड हॅपीनेस रिसर्च सेंटर'च्या अहवालानुसार तू अतिशय दुःखी लोकांचा देश असल्याचे शिक्‍कामोर्तब झाल्यापासून तुला फार वाईट वाटलं असावं. तुझा सख्खा शेजारी, जिवश्‍च शत्रू पाकीस्थान मात्र चक्‍क 51 व्या क्रमांकावर आणि तू 117 व्या क्रमांकावर ! म्हणजे तुझयापेक्षा तो दुपटीने पटीने सुखी. हे म्हणजे जखमेवर मिठ चोळल्यासारखं झालं. तुझयाविषयीचा कळवळा दाटून आल्याने माझयाजवळही तुझे सांत्वन करायलाही आता शब्द नाहीत रे ! कुणी "अच्छे दिन आनेवाले' म्हणत मनाची भलावण करीत सत्तेवर आल्यानंतर त्यानं धत्तू-या दाखवावं, असं झालं. हे प्राणप्रिय देशा... "अच्छे दिन' आनेवाले म्हणून कुणीही तुला "च्युत्या' बनवून जात असेल तर तुझी हालत चांगली कशी असू शकेल, राजा? आजपर्यंत या देशाच्या राजकीय इतिहासात तुला सगळे फक्‍त उल्लू बनवून आपापल्या बिळात सुखरूप झोपा घेत गेलेत. ते जाउ दे...आता हेच बघना. समर्थ रामदास म्हणायचे "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर जगी सर्व सुखी स्वितझरलॅंड आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिसर्च सेंटरने दिलेले उत्तर तर नसावे? मुळात सुख म्हणजे काय ?तर सुख ही एक मानसिक अवस्था आहे, हे त्या संशोधन करणा-यांना कुणी सांगावं? आम्ही तर कशातही सुखच मानतो. देश स्वातंत्र झाला त्याच्याअगोदरपासून आम्ही किती संयमी आणि समाधानी आहोत, हे सांगायला दुसरा कोणी नको. आज ना उदया "अच्छे दिन' येतील म्हणून किती सबुरी आणि शांत असतो आम्ही? ही प्रतिक्षा करता करता आम्ही पुनर्जन्मावरसुद्‌धा विश्‍वास ठेवून मनाची समजूत घालतोचच की नाही? "कधी गरीबी हटाओ'चा नारा देत तर कधी "फिलगुड' म्हणत खुर्चीवर बसणारे मात्र बदलतात. परंतु जनता आहे तशीच राहते. महागाई, भ्रष्टाचार वाढला तरी कुठलाही राग व्यक्‍त न करता आम्ही समाधानीच असतो. " ठेवीले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान ! हे आमचे ब्रिदवाक्‍य. म्हणून आम्ही असे आनंदी आणि सुखी असताना आम्हाला नालायक ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे?
"सुख जवापडे.. दुःख पर्वताएवढे' असं तुकाराम महाराज उगाच नाही म्हणत. सुख कशानं मिळतं आणि ते कुठं असतं? याचं उत्तर आपल्या सगळया महापुरूषांनी सांगून ठेवलं आहे बरं का ! तरीही आपलं आपण ते नेहमी बाहेरच शोधत बसतो.
भगवान गौतम बुद्‌ध तर मानवाच्या जीवनाला भंडावून सोडणा-या दुःखावर उपाय शोधण्यासाठीच घरदार सोडून जंगलात भटकत राहिले ना! शेवटी सगळे उपाय संपल्यानंतर त्यांना त्यातील सत्य कळले आणि त्यांनी दुःखावरील जालिम उपाय शोधून काढला. अष्टांग मार्ग त्याचे नाव. सगळया दुःखाचं मुळ त्यांना वासनेत सापडलं. ही वासना जोपर्यंत शमविता येत नाही, तो पर्यंत दुःखाचे निवारण होउन सुखाची निर्मीती होत नाही. दुःख आहे तर त्याचे कारणही असेलच. कारण सापडले तर ते दूर करण्यासाठी आपणच प्रयत्न करू शकतो, हे ही त्यांनीच सांगीतलं. संत तुकाराम "आनंदाचे डोही आंनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे!' असे म्हणत जीवन आनंदात कसं घालविता येईल, याचा पाठ देताना दिसतात. सुख काय अन्‌ दुःख काय, दोन्ही मानसिक क्रियाच आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीला अध्यात्माचे मोठे अधिष्ठाण लाभले आहे. प्रत्येक संताने जीवन जगण्याची कला शिकविली आहे. हे माझया प्रिय देशा, कधीकाळी तू सुखी संपन्न असल्याचे पुरावे इतिहासाच्या पानापानावर मिळतात. ते वाचता वाचता आम्ही ताडासारखे वाढत गेलो. पण शिकलं की शहाणपणा येतो, असं कोण म्हणतं? फक्‍त पदव्या घेउन आम्ही मोठे झालो की आम्हाला परदेशाचे डोहाळे लागतात. म्हणजे बाहेर सुख शोधण्याचा पहिला धडा येथूनच सुरू होतो ना ! वारंवार होणा-या परकीय आक्रमणाबरोबर अंतर्गत अतिक्रमण हेसुद्‌धा देशाचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल. अतिक्रमण मग ते कोणतेही असो. सदयाच्या धर्मवादी, भांडवलशाही आणि जागतिकीकरणाच्या अतिक्रमणातून "इंडिया विरूद्‌ध भारत' अशी दरी कधी निर्माण झाली ते कळलंसुद्‌धा नाही. आपल्याकडे सुखी असण्यासाठी पैशाचीच मोजपट्‌टी वापरल्या जाते. दुसरे परिमानच आपल्याजवळ नाही. पैशाशिवाय सुख नाही, असं म्हटल्या जातं. पैशाने सुख खरेदी नाही करता येत.
दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, आरोग्यमय जीवनमान, सामाजिक साहस्वातंर्त्य, दानशूरता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण हे सुखी असण्याचे हॅपीनेस रिसर्च सेंटरने ठरविलेले निकष. यात आपण मागे असल्याचे सर्वेक्षणातून त्यांना दिसून आले.
आमच्याकडे मोटारसायकल असली आणि शेजा-याने चारचाकी अंगणात उभी केली की आम्ही त्याच्याशी तुलना करून त्याच्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतो. एक मात्र आम्ही न शिकविता शिकतो आणि ते म्हणजे आयुष्याला स्पर्धा समजून सुसाट वेगाने धावणे. हे धावणे इतके प्रचंड असते की आयुष्याच्या शेवटीच थांबल्यानंतर वाट चुकल्याचं लक्षात येतं.
हे सकल जणांच्या देशा, महाशक्‍ती होण्याची तुझयात कुवत आहे तर मग तू दुःखी कसा?हा न सुटणारा प्रश्‍न मला वारंवार भेळसावतो. हा देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने जेव्हा स्पर्धेत उतरला तेव्हापासूनच या देशाची अधोगती व्हायला लागली , असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण स्पर्धेत "जो जिता वो सिकंदर' हेच तत्व लागू पडतं ना. "evry thing is posible in love and war *हाच न्याय लढाई किंवा स्पर्धेला लागू पडतो. मुळात स्पर्धा कशी आणि कुणाशी असावी, याचे काही ताळतंत्र असायला हवे. जपान हा देश अणुबॉम्बचा मारा सहन करूनच दुःखातून सावरत मोठा झाला ना !. त्याने बुद्‌धाची विचारसरणी अलंबिली आणि तो देश आर्थिकदृष्टया संपन्नही झाला. हे भारता ! आपल्याकडे तर अध्यात्मिक शहाणपण धर्मग्रंथांतून ओसंडून वाहते. परंतु तसे वागण्याची मुळात आपली इच्छाच नसते. कारण आम्हाला अमेरिकेशी तुलना करावीसी वाटते. दुस-याशी तुलना करण्यात आपल्याला कोण आंनद मिळतो ! चिनी विचारवंत लाओत्से हिमालयाच्या दिशेने दिसणा-या एका ता-याला पाहून भारताकडे पळत सुटला होता. कारण त्याला भारत महापुरूषांची जननी वाटला असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज "कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत देश हा पुन्हा' असं विचारतात तेव्हा वाटते की देवा, पुन्हा अशा दुःखी भारताला पाहायला तू कधीच न आलेलंच बरं !

 
Blogger Templates