Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 6 अक्टूबर 2015

हातचा एक


               
                                                                   
                                                                                       विजयकुमार राऊत 
प्रत्येकाला जगताना "हातचा एक' घेउनच जगावे लागते. हा हातचा एकच जगण्याला सुसहय करतो. जर तो नसता तर जीवनाचे गणितच विस्कटले असते. म्हणून गणित सोडविताना हा "हातचा एक' घेण्याची प्रथा कशी पडली, कधी आणि का पडली, हे त्या "हातच्या एकाला'च माहित. गणितात तर चक्‍क त्याला हाताशी घेतल्याशिवाय मोठी आकडेमोड करणेच शक्‍य नसते. हा "हातचा एक' येतो कुठून आणि तो आपण का घ्यावा, याची उत्तरे अजूनपर्यंत तरी माझयासारख्याच्या अल्पबुद्‌धीच्या माणसाला सापडलेली नाहीत. कधी कधी प्रश्‍न पडतो की हा हातचा एक न घेता जगणारी माणसं जगतात तरी कशी ? परंतु खूप विचार केल्यानंतर त्यामागचं रहस्य उलगडायला मदत होते. कुणी डोळयामागचं अस्तित्व जरी नाकारत असले तरी डोळयांनी दिसणारं स्वतःचं अस्तित्व मात्र मान्य करतातच. "हातचा एक' ते स्वतःलाच घेउन जगत असतात. म्हणून तेही स्वतःचे अस्तित्व सिद्‌ध करण्यासाठी ठासून विरोध करतात.पाठपुरावे सादर करतात. परंतु या ठिकाणी फक्‍त "ऑबजेक्‍ट' बदलतो., "सबजेक्‍ट' मात्र उरतोच. ही एवढी तगमग कशासाठी आणि कुणासाठी ? हा नुसता विरोधाला विरोध नसतो. त्यातही बरेच काही आहेच. हातचा एक न घेणा-यांची मग बेरजेची, वजाबाकीची पद्‌धत जरी आगळीवेगळी असली तरी मात्र जे उत्तर किंवा जे समाधान लाभतं त्याची जातकुळीही पहिल्या गटासारखीच "बहुजन सुखायच'च्या मार्गातून "स्वांत-सुखाय'कडे जाणारी असते. कुणी त्यांना नास्तिक म्हटलं तरी ते स्वतःलाच पदोपदी सिद्‌ध करीत असतात. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक तुम्हाला "हातचा एक' गवसलेला असतो. वास्तविक पाहता नास्तिकवादी "हातचा एक' घेणे पसंत करणार नाहीत. परंतु स्व प्रतिमेतच तेही कुठल्या ना कुठल्या प्रकारे "हातचा एक' स्वीकारतात. तेच त्यांचे आधार होतात. या एकाशिवाय ओसाड आयुष्य कुणी जगू शकतच नाही. ज्यांना हातचा किंवा दुसरा जोडता येत नाही, ते नैराश्‍याच्या अवस्थेत एक तर स्वतःला संपवून घेतात किंवा आत्मघातकी मार्ग तरी निवडतात . शेवटी काय तर जगण्याला कसाचाही का असेना आधार हवा असतो. जीवनाला कुठली तरी हिरवळ हवी असते.
आज "स्पेशलाईजेशन'चा जमाना आहे. प्रत्येक अवयवाचा डॉक्‍टर वेगळा असतो. प्रत्येक विषयाचा तज्ज्ञ वेगळा. परंतु कितीही "स्पेशलायजेशन' आले तरी विविधता हा निसर्गाचा स्वभाव आहे. या विश्‍वात सगळं एकमेकांशी जुळलेलं आहे. प्रत्येक वस्तूत कार्य-कारणभाव आहे. म्हणून "स्पेशयलायजेशन' व त्यातून मिळणारं उत्तरही पुन्हा अपूर्णच. एका शाखेतून दुसरी शाखा जन्माला यावी तसं. एका विषयात कुणी तज्ज्ञ झालं की दुसरा विषय किंवा दुसरं काहीतरी त्याच्या हातून सुटतंच. मग त्याची गती डबक्‍याला समुद्र समजण्यासारखी होते. अष्टदिशांतून सळसळ करीत वाहणा-या नदया शेवटी त्या अथांग समुद्रालाच जाउन मिळतात. दिशाहिन झालेली सगळी वादळं अवकाशात जाउनच विसावतात. विविध ठिकाणावरून निघालेले मार्ग एकाच ठिकाणी जाउन लुप्त होतात. जगातील सगळया पॅथ्या, पोथ्या, विचारप्रवाह एका अनामिक शुन्यात जाउन गडप होतात.
नावाचा प्राणीच अजब आहे. भिन्न व्यक्‍ती, भिन्न विचारधारा, भिन्न स्वभाव. कुणी ईश्‍वर मानतात, तर कुणी नाकारतात. कुणी आस्तिक आहेत तर कुणी नास्तिक. कुणी आशावादी तर कुणी अस्तित्ववादी. कुणी कुठल्या पंथाचा तर कुणी कुठल्या धर्माचा. प्रत्येकाचा देव वेगळा. धर्म वेगळा. आधुनिक विज्ञानापुढे अनेक आव्हाने निर्माण करणारा माणूसच. या माणसाच्या भवतीच सगळी शास्त्रे घुटमळतात. सगळी महाकाव्ये त्याच्यासाठीच जन्माला आलेली असतात. भौतिक जगातील सगळे शोध त्याच्याचसाठी लागलेले असतात. एवढं सगळं असूनही, लक्षावधी वर्षे उलटूनही माणूस कुणाच्याच हातात कसा लागला नाही?हेच कोडं आहे. भगवान श्रीकृष्णही कुणालाच कळू शकत नाहीत.
साधं गणित करीत असताना मेंदूला बराच ताण दयावा लागतो. खूप डोकं खाजविल्यानंतर शेवटी उत्तरं मिळतं, तेव्हा आपल्याला कोण आनंद होतो! म्हणून हा माणूस आहे तरी कसा, याचा अभ्यास करणारी, उत्तरं शोधण्यासाठीच नवनवीन शास्त्रे या पृथ्वीतलावर निर्माण होत आहेत. तुमच,ं आमचं, या विश्‍वाचं, या विश्‍वातील जिव जंतूचं अस्तित्व शोधणारीं विज्ञानशास्त्रे तरी काय करीत असतात? सगळीं बुद्‌धीमत्ता कमावूनही विवेकबुद्‌दी नसेल तर या जगाचं काही खरं नाही. हिंदू धर्मशास्त्रांत भगवान शिवाच्या तिस-या डोळयाची कल्पना सांगीतली आहे. भगवान बुद्‌धांची संपूर्ण विचारसरणी "सम्यक' शब्दाला महत्व देणारी आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की "मी निर्गुण निराकार आहे' तेव्हा त्यातील गर्भीत इशारा समजण्यासारखा असतो.
कुठलीच एक बाजू संपूर्ण सत्य नसते, त्यासाठी शंकराचा तिसरा डोळा किंवा बुद्‌धांचा सम्यक विचार जाणल्यावरच सत्य कळू लागतं. ही भाषा सर्वसामान्य मेंदूला कळण्यासारखी नसते , म्हणूनच सगळे मी म्हणतो तेच खरे भासविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी माणूस अंतर्मुख झाला तर त्याच्या आतील प्रत्येक पेशी त्याच्याशी बोलू लागतील. नेमकं हेच अध्यात्मशास्त्रात सांगीतल्या जाते. अध्यात्म म्हणजे काही कुठल्या धर्माचं शास्त्र नव्हे. बुद्‌ध वाचणे म्हणजे बुद्‌धाचा इतिहास वाचणे नव्हे तर स्वतःला समजून घेणे होय. इतिहासातील मुडदे उखरून हाती काय येणार? शिवाजींचा इतिहास वाचताना भूतकाळ खोदून भविष्यकाळात जयजयकार करणे म्हणजे शिवरायांना समजून घेणे नव्हे. परंतु राजकीय पक्ष आपल्याला पुन्हा भूतकाळात नेउन थडग्याला कवटाळणेच शिकवित असतात.
अध्यात्मशास्त्र तरी काय असतं? अध्यात्म म्हणजे अस्तित्वाशी एकरूप होंणं. इतिहास म्हणजे भूतकाळाचे उत्खनन करून अस्तित्वाशी जोडण्याचा प्रयत्न. विज्ञान म्हणजे अस्तित्वाला भविष्याशी जोडून ठेवण्यासाठी चाललेली धडपड. भूगोल म्हणजे अस्तित्वाचा या ब्रम्हांडात वेध घेण्याचा अखड प्रयत्न, गणित म्हणजे अस्तित्वाचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करून बाकी अस्तित्व किती उरते ते जाणून घेणे, भूमीती म्हणजे अस्तित्वाचे क्षेत्रफळ व त्रिज्या काढणे, अस्तित्वाच्या विचारांचा केंद्रबिंदू शोधणे म्हणजे मानसशास्त्र, असा विविध शास्त्रांचा हेतू तपासला की अस्तित्वाच्या दिशेनेच सगळे जात असल्याचे लक्षात येईल
.

                                                               विजयकुमार राऊत

 
Blogger Templates