* विजयकुमार राऊत
भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सभोवताली
या ह्रदयाची त्या ह्रदयाला "रेंज' मिळेना !!
युवा गझलकार प्रसेनजित गायकवाड यांच्या या कधीकाळी ऐकलेल्या ओळी मनात घर करून गेल्या. एकविसाव्या शतकात हे असे एककल्ली आयुष्य आपल्या सर्वांच्या वाटयाला येईल, असं कदाचित कुणाला वाटलं नसेल. परंतु ही मानवी जीवनातील अपरिहार्यताच असते. आपण भौतिक वस्तूमध्ये सुख शोधण्याच्या आधीन होत गेलो की त्याचे दुष्परिणामही थोडेफार भोगावे लागतात. सर्वप्रथम मानवी उत्क्रांतीच्या प्राथमिक काळात भावना व्यक्त करण्यासाठी अगोदर शब्द जन्माला आला. त्यानंतर भाषा, संभाषण, संवाद आणि सुसंवाद आदी कौशल्ये टप्प्या टप्प्याने विकसीत होत गेली. लगेच उपयुक्ततेची मर्यादा ओलांडल्यानंतर त्याचे विपर्यासात रूपांतर व्हायला वेळ लागत नसतो. आजच्या घडीला वर्तमान काळाचे अवलोकन केल्यास अगदी तिच स्थिती आपल्यापुढे निर्माण झाली, असे म्हणणे गैर होणार नाही.
कोणे एके काळी संवाद कौशल्य आत्मसात केल्यानंतर त्याला दूरच्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधायला साधने उपलब्ध नसल्यामुळे मानवासमोर अनेक प्रश्न उभे राहिले. त्याने भौतिक साधनांची निर्मीती करण्यासाठी शोधाशोध सुरू केली. महाकवी कालिदासाने "मेघदुत' सारख्या काव्यातून प्रेयसीापर्यंत संदेश पोहचवायला आकाशातील काळयाकुट्ट मेघांना आवाहन केले. ही कविकल्पना जरी असली तरी त्यामागे प्रेयसीपर्यंत ह्रदयातील संवाद तातडीने पोहचावा ही तगमग होती. कुठलीही कल्पना ही सुरवातीच्या काळात कल्पना असते आणि पुढे तिच मुर्त रूप धारण करते. पुढच्या काळात भावनेतून संवाद साधण्याची निकड भासू लागली.
पंख होती तो उड आती रे रसिया ओ बालमा
तुझे दिल का दाग दिखलाती रे...!!
या गीतातील नायीका प्रियकराशी संवाद साधण्यासाठी किती अस्वस्थ आहे, हे कळायला त्या प्रेयसीशीच तादात्म पावावं लागेल. दूरदेशी असलेल्या आपल्या काळजाच्या तुकडयाला मनातील व्यथा कळायला त्या आईच्या भावनांशीच एकरूप व्हावं लागेल. कुठलीही भावनीक अस्वस्थता माणसाला एका वेगळया पातळीवर नेउन ठेवते. ती व्यक्ती कवी असेल तर ती शब्दातून भावनेचा फुलोरा फुलविते आणि जर संशोधक वृत्ती असेल तर एखाद्या कल्पनेला मूर्त रूप मिळते. गरजेतून निर्माण झालेल्या मानसिक अस्वस्थेच्या काळात संदेश पोहचविण्यासाठी कुठल्यातरी माध्यमाशी जवळीक साधण्याची अस्वस्थता निर्माण झाली. इतिहासात डोकावलं तर राजा- महाराजांच्या काळात कबुतराच्या माध्यमातून संदेश पोहचविण्याचे तंत्र त्याकाळीही मानवानेच शोधून काढले. पुढे त्याचा वापर एका राज्यातून दुस-या राज्यात महत्वाचा संदेश पोहचविण्यासाठी होउ लागला. दूतांकरवी परस्परांना निरोप पाठविणे हेही ओघाने आलेच. त्याहीपूर्वीच्या काळी काही साधू, सन्याशी, योगाचार्य समाधी अवस्थेत दूरवरच्या व्यक्तीशी संवाद साधत असल्याची उदाहरणे मिळतात. अर्थात हा उपाय सर्वसाधारण माणसाच्या अवाक्यातला नसल्यामुळे आणि तेवढे योगसामर्थ्य अंगी नसल्यामुळे सर्वसामान्यांची मात्र गोची झाली असावी. सर्वसामान्यांनी प्रिय व्यक्तीला संदेश देण्यासाठी आपापल्या त-हेने उपाय शोधून काढण्याची कामगिरी पार पाडली.
आजच्या माहिती -तंत्रज्ञानाच्या युगात अनेक साधनांचा वापर संवादासाठी केला जातो. मोबाईल फोनचा जन्मही त्यातला महत्वपूर्ण टप्पाच म्हणावा लागेल. आज त्यानं आपलं अख्खं आयुष्यच व्यापून टाकलं आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात टेलिफोन अस्तित्वात आला. त्या टेलिफोनचे सर्वांना काय अपृफ !
मेरे पिया गये रंगून, वहासे किया है टेलिफून
तुम्हारी याद सताती है.. जिया मे आग लगाती है! असे नटून थटून भावविभोर स्थितीत गात असलेल्या नायीकेला दूरदेशी गेलेल्या आणि तेथून फोनवर बोलणा-या नायकाचा किती अभिमान ! 1940 च्या दशकात वाहनातील फोनची सुविधा उपलब्ध झाली. पुढील तीन दशके यावर सखोल संशोधन झालं. ग्राफिक्स इन 3, एप्रिल 1973 ला ग्राफिक आउटला पहिला मोबाईल कॉल आला. मोटोरोला कंपनीचे इंजिनिअर मार्टीन कुपर यांनी हा कॉल केला होता. तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता. या घटनेला बरोबर चाळीस वर्ष झाले. केवळ संवादासाठी वापरला जाणारा मोबाईल आता स्मार्ट फोन झाला.
एकवीसाव्या शतकात स्टीव्ह जॉब्ज या युवा संशोधकाने आय फोनचा शोध लावला आणि तो तरूणांच्या गळयातील ताईत झाला. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील हा एक महत्वपूर्ण टप्पा आहे. आतातर संवाद साधण्यासाठी शेकडो पर्याय उपलब्ध आहेत. मित्रहो नव्वदच्या दशकात घरोघरी "ब्लॅक अँड व्हाईट' टिव्ही उपलब्ध होता. त्यावेळी केवळ दूरदर्शनखेरिज कुठलेच चॅनल आपल्याकडे उपलब्ध नव्हते. टिव्हीवरचे कुठलेही रटाळ कार्यक्रम पाहणे सर्वांना ठाउक होते. नंतर रंगीत टिव्हीच्या जमान्यात शेकडो चॅनल येताच ती झटपट बदलण्यासाठी रिमोटच हाती आला. त्यामुळे "क्षणात बदलती झटपट चॅनल...क्षणात फिरूंनी उणिव दिसे' अशी स्थिती झाली. आता तर खाता पिता बायकोशी बोलण्याला "व्हॅट्स अप'चा वापर होउ लागला. प्रिय व्यक्तीच्या मृत्यूची बातमी तेरवीच्या दिवशी मिळण्यात डाकसेवेला लागणारा कालावधी आणि त्यातील गमती जमती आता संपुष्टात आल्यात. इंटरव्हयू झाल्यानंतर हमखास मिळणारा नोकरीचा कॉल हा आयुष्याची घडी विस्कटण्यात महत्वाची भूमीका बजावित असल्यामुळे आता तसे काही उरले नाही. आजच्या काळात क्षणात मिळणारा संदेश जीवनात एक नवीन बदल घडविणारा आहे. उपयोगीतेच्या दृष्टीतून त्याचे महत्व अबाधित असले तरी मनात उभी दरी निर्माण करण्यातही संदेशाच्या माध्यमाचा महत्वाचा वाटा आहे, हेही आता लक्षात घ्यावं लागेल. मुलगा, बाप, भाउ, बहिण, प्रेयसी आणि मित्र यांच्यात परस्परात वाढलेला दुरावा आज विकोपाला पोहचल्याचे चित्र समाजात उभे राहिले आहे. त्यातून नवीन प्रश्न आपणच जन्माला घातले आहेत. आठवून बघा याअगोदरचे आयुष्य. त्याकाळात एकमेकांशी संवाद साधण्यात अडचणी जरी असल्या तरी त्यात आरोपाची जागा नव्हती. होता फक्त लडीवाळपणा. लटकी तक्रार आणि लटका राग. त्यातही परस्परांना वाटणारी मौज. नात्यांत निर्माण झालेला गोडवा. आज एड्सपेक्षा भयंकर विसंवादाच्या नव्या आजाराने शल्यही मनात निर्माण केले. दोन पिढया, दोन मनं, दोन मित्र , प्रेमीयुगल आणि नातलग यांच्यात सुवांदाऐवजी विसंवाद कानी पडतात. यातून नात्यांचा विस्फोट होत असेल तर त्यांना जोडणारे एखादे भावनांचे "सॉप्टवेअर' शोधून काढता येईल का? आईवडिल आणि मुलातील दुराव्याला "जनरेशन गॅप'चे नाव तरी देता येईल. परंतु पती-पत्नी , प्रेमीयुगूल, मित्र आणि आप्तस्वकीयांतील दुराव्याला खतपाणी देण्याचं काम या गॅझेट्समुळे होत असेल तर त्याला काय म्हणावे? माणूस एकलकोंडा होणे हे उत्तम आरोग्याचे प्रतिक नसून मानसिक आजाराचे लक्षणच होत आहे. अतिरेक हा कधीही घातकच. शायर जोश मलीहाबादी यांच्या शब्दात सांगायचे झाले तर...
जो दिल की है, वो बात नहीं होती !
जो दिन न हो, वो रात नहीं होती !!
मिलते तो है अक्सर, जमाने से जोश !
पर अपने आप से मुलाकात नहीं होती !!
नवनवीन संशोधनांनी मानवी जीवनात विकासाची पहाट तर उगवली, पण तिला पुन्हा काळोखाची किनार लाभू नये, किमान एवढी अपेक्षा करायला काय हरकत आहे?
विजयकुमार राऊत