Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 18 अगस्त 2015

सारे जहा से अच्छा....


विविधतेने नटलेल्या भारतभूतील प्रत्येक राज्याने हातातील बोटांप्रमाणे आपापले वैशिष्टय जपले आहे. बाराव्या शतकातील जगन्नाथपुरी मंदिरातून निघणारी भगवान जगन्नाथ अर्थात श्रीकृष्णाची रथयात्रा संपूर्ण भारतभर प्रसिद्‌ध आहे. जगन्नाथपूरी जिल्हयातील राजधुवा येथे राहणारे जम्बवेश्‍वर रावतराव यांचे कुटूंब हिंगणा एमआयडिसी परिसरात गेल्या तीस वर्षांपासून वास्तव्य करीत आहे. इथल्या रितीरिवाज आणि परंपरेत ते इतके समरस झाले की त्यांना आता महाराष्ट्रच आपली कर्मभूमी वाटायला लागले आहे. इथल्या सण उत्सवाच्या वेळी त्यांना आपले गाव आणि एकंदर राज्यच दिसते. परक्‍या राज्यात कसे काय रमलो, यांचे त्यांना मुळीच आश्‍चर्य वाटत नाही. कारण तीस वर्षापूर्वी येथे आल्यानंतर त्यांना महाराष्ट्राने कधी परके मानले नसल्याची साक्ष ते देतात.

उमेदीच्या काळात कलकत्ता येथे एका कारखान्यात नोकरी केल्यानंतर चांगल्या नोकरीच्या शोधात ते श्रीधर श्रीचंदन या मित्रासोबत नागपूरला आले. हिंगणा एमआयडिसीतील "निको अलायकास्टींग' या कारखान्यात त्यांना कॉंन्ट्रॅक्‍टरचे काम मिळाले. काही दिवस येथे काम केल्यानंतर ते मित्रासोबत मुंबईला गेले. तिथे त्यांचे मन रमेना. पोटापाण्याचा प्रश्‍न सोडविण्याकरीता तिथल्या परिस्थितीशी सामना करीत त्यांनी दीड वर्ष "टाईमपास' केला. नागपूरच्या निको कंपनीने त्यांना परत बोलावून घेतले. तेव्हापासून ते एमआयडिसी परिसरात स्थायीक झाले.
सदयस्थितीत एमआयडिसी परिसरात ओडिसा राज्यातील किमान दहा हजार नागरिकांसोबत "लिटील ओडीसा'च येथे वसले आहे. हिंगणा मार्गावरील राजगृहनगरातील घरापासून शिवमंदिर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. तिथे जगन्नाथ सेवा समितीची स्थापना करून धार्मिक कार्यक्रमातून त्यांना एकत्र आणण्याचे काम ते करीत असतात. जगन्नाथाच्या भव्य यात्रेतून ते दरवर्षी इतर नागरिकांच्या सहकार्याने ओडिसा संस्कृतीचे दर्शन घडवितात. "हरे राम हरे क्रिष्ण' या अखंड संकीर्तनातून ते धार्मिकतेचा ओलावा जपण्याचं काम करतात. नागपूर शहरात "उत्कल असोशिएशन' नावाने ओडिसा बांधवांचे मोठे संघटन आहे. या संघटनातून त्यांना विविध प्रश्‍न सोडवून घेता येतात. मासे ,भात त्यांचे मुख्य अन्न. इथे मात्र ते कुटूंबासह महाराष्ट्रीय जेवणच पसंत करतात. जेवनात कांदा, लसून ते वर्ज्य मानतात. जगन्नाथांच्या यात्रेच्या वेळी घेतलेल्या कार्यक्रमात संपूर्ण जिल्हयातून ओडिसी बांधव एकत्र येतात. सुमारे 30 ते 40 हजार नागरिक महाप्रसादाचा आस्वाद घेतात. अमरावतीमध्ये त्यांच्या सांस्कृतिक संवर्धनाचे केंद्र आहे. त्या केंद्राच्या माध्यमातून कला, सांस्कृतिक, परंपरांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या राज्यात आता जातीप्रथा मोडीत निघाल्याचे ते खंबीरपणे सांगतात. ओडिसात महान क्रांतीकारक सुभाषच्रंद्र बोस यांचे पालणपोषण आणि शिक्षण झाल्याचे सांगताना त्यांची छाती इंचभर फुगली नाही तरच नवल.
राज्याचे वैशिष्टय विचारले की ते म्हणतात की ओडिसा राज्यात गावा गावात युवकांसाठी क्‍लब असून त्यातून युवकांना राज्याच्या विकासात कसा हातभार लावता येईल, याचे प्रबोधन केले जाते. कोरापूर, रायगडा, सुंदरगड, मेहरगंज आदी जिल्हे बंजर आहेत. येथे नक्षलावादाची मुख्य समस्या असल्याचे सांगताना त्यांच्या चेह-यावर चिंतेची लकेर उमटते. ओडिसा राज्यातून येणारे बहुतांश लोक एमआयडिसीतील कारखान्यात काम करतात. कुणी प्लंबरचे काम तर कोणी बॅंकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. रावतराय यांना तीन मुले आहेत. ज्योतीवल्लभ हा मुंबईत विमा कंपनीत तर दुसरा जगत हा सदया कॉलेजमध्ये शिकतो आहे. गीता ही मुलगी लंडनला दिली. जावई संदीप सिंग सॉप्टवेअर कंपनीत काम करीत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून आज मनासारख्या क्षेत्रात यशस्वी झाल्याचे समाधान श्री.रावतराय यांच्या चेह-यावर स्पष्ट दिसते. बादलकुमर संपतराय, धीरज रावत, रमेश महंतो आदी सहका-यांसमवेत जगन्नाथ सेवा समितीच्या माध्यमातून ते धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यही करीत असतात. महाराष्ट्राने आपल्यात सामावून घेतल्याबद्‌दल ते राज्याचे आभार मानतात.
वृक्षारोपन हा त्यांचा आवडता छंद आहे. वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा ते सल्ला देतात. त्यांच्या परसबागेत विविध वृक्षांची लागवड केल्याचे दिसते. "मोरो देशप्रती मोरा बहुत प्रेम है' त्यांच्या एका वाक्‍यातून त्यांचे देशाविषयीचे विचार कळतात.

                                                 विजयकुमार राऊत


 
Blogger Templates