विजयकुमार राऊत
जैन धर्मातील "संथरा' पद्धतीने जीवनाचा त्याग करण्यावर सुप्रिम कोर्टाने नुकतीच बंदी आणली आहे. अन्नाचा त्याग करून जीवन संपविणे हे आत्महत्तेच्या कक्षेत येते, असा न्यायालयाचा निर्वाळा आहे. "संथरा' म्हणजे जैन धर्मातील अनेक महत्वाच्या विधींपैकी एक. अशारितीने जीवन संपविण्याचा अधिकार कुणालाच नसून पद्धत कुठलीही असो ही आत्महत्याच ठरते, असे कायदा सांगतो. त्यामुळे जैन धर्मातील साधूसंतांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. दरवर्षी देशात या विधीतून मरण पत्करणा-यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे सरकारने आमच्या धर्मात हे थेट हस्तक्षेप करण्यासारखे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. अन्नत्याग करून जीवन संपविणे म्हणजे आत्महत्या ठरत असेल तर जगात केवळ एकच जैन धर्म अशा त-हेने आत्महत्तेचे समर्थन करतो. हाच मुद्दा आपण हिंदू धर्माच्या चालीरितींना लावल्यास याही धर्मातही अशी प्रथा आहे. वारकरी पंथाचे संस्थापक संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या 21 व्या वर्षी संजिवन समाधी घेतली होती. अलिकडे आचार्य विनोबा भावे यांनीही अन्नत्याग करून देह त्यागल्याचे उदाहरण ताजे आहे. ज्या ज्या संतांनी अशाप्रकारे मरण स्वीकारले ते ते आजच्या कायदयाच्या भाषेत आत्महत्तेच्या गुन्हयास कारणीभूत ठरतात. परंतु कायदयाने दंडूका आणण्याची त्यावेळी पद्धत नसल्यामुळे ज्यांनी ज्यांनी या मार्गाचा अवलंब केला असेल त्यांना त्यांना त्यावेळी दोषी ठरविता आले नाही. हिंदू धर्मातही तशी जीवन संपविण्याची रित होती. आता कायदयाने तशी बंदी घातल्यामुळे सहसा तसे करणारे फारच थोडे आहेत. अशा पद्धतीची आत्महत्या करणे हे पाप नाही का? स्वतःच स्वतःचा अमानुष खून करणे योग्य आहे का? आणि माणूस आत्महत्या का करतो? याचा शोध घेणे मला महत्वाचे वाटते. चित्रपट दिग्दर्शक स्व.गुरूदत्त यांनी आत्महत्तेसारख्या क्लेषदायक मार्गाने जीवन संपविले. मुलांच्या गोष्टी सांगणारे संवेदनशील मनाचे साने गुरूजी यांनीही हाच मार्ग अवलंबिला आहे. अनेक चित्रपट अभिनेते किंवा विद्यार्थी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतात. तर त्यामागे अशीच काही धार्मिकतेतील महान तत्वं आहेत का? मुळीच नाही. चित्रपट तारका व विद्यार्थी यांच्यात एक समानता आहे ती म्हणजे आपल्याला नको झालेले जीवन संपवून टाकणे. चित्रपट तारकांना मिळणारे "ग्लॅमर' पुढच्या काळात मिळत नसल्यामुळे त्या यशापशयाच्या दृष्टीकोनातून स्वतःचे जीवन संपवून टाकतात. यशानंतर एकटेपणातून आलेले नैराश्य त्यांना आत्महत्तेस प्रवृत्त करीत असते. विद्यार्थी मात्र आपण अपयशी झाल्याच्या भावनेतून आत्महत्तेचा मार्ग स्वीकारतात. ते पालकांच्या इच्छा, आकांक्षा व स्वतःचे स्वप्न पूर्ण करता येत नसल्यामुळे हे जीवन निरर्थक म्हणून ते संपवून टाकतात. शेतकरी नापिकीने आत्महत्या करून संसारातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात. वयात आलेला मुलगा किंवा मुलगी प्रेमात धोका मिळाल्याने किंवा आईवडिलांचा विरोध म्हणून आत्महत्या करतात. कुणी अपमान झाल्याने तर कुणी जीवनाचे ध्येय गाठू न शकल्याने या निर्णयाप्रत जातात. परंतु जैन साधु संन्याशांनी अंगीकारलेले "संथारा' व्रत त्या दर्जाचे मुळीच नसते. कायदा मात्र त्यांना गुन्हेगार ठरविण्याची भाषा करतो. कारण कायदयाला दुसरी भाषाच अवगत नसते. प्रभू रामचंद्रांनी जिवित कार्य संपल्यानंतर शरयु नदीत जाउन स्वतःला जलसमाधी घेउन या इहलोकातील यात्रा संपविली होती. तर भगवान श्रीकृष्णाने आयुष्याच्या उत्तरकाळात राज्यात निर्माण झालेली यादवी पाहून अत्यंत व्यथीत अंतःकरणाने जंगलात जाउन स्वतःला पारध्याच्या बाणातून इच्छा मरण स्वीकारले. कारण त्यांच्याजवळ आता काहीही करण्यासारखे राहिलेले नव्हते. ज्या कार्यासाठी आपण पृथ्वीतलावर किंवा जन्मास आलो ते पूर्ण झाल्यामुळे मला आता येथे राहण्याचा काळीमात्रही अधिकार नाही, ही त्यामागची भावना असते. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांसारखे महापुरूष ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहून झाल्यानंतर संस्कृतातील ज्ञानाची सर्व कोठारे बहुजनांसाठी उघडी करून स्वतः संजिवन समाधीत विसावतात. गुरूदत्त सारखा चित्रपट अभिनेता यश व अपयश दोन्ही बाजू उपभोगून झाल्यानंतर आता कुठलेच काही मिळवायचे बाकी राहिले नसल्यामुळे आता जगण्याचे प्रयोजन काय, असा विचार करतो आणि स्वतःला संपवून घेतो. अतिउच्च पातळीवरील तत्वज्ञानातून स्वतःला संपवून घेण्याचा हा मार्ग आहे. संजिवन समाधी घेण्याची संतांची भावना आणि एखादया तरूणाने किंवा शेतक-याने केलेली आत्महत्या, एकाच दर्जाच्या कशा असू शकतात? एक नैराश्येतून तर दुसरी स्वच्छेने एका उदात्त जाणिवेतून स्वीकारलेली गोष्ट आहे. आपण कोण आहोत, कशासाठी जन्माला आलो व आता तेही करून झाले मग एक दिवसही जगण्याचा अधिकार आपल्याला राहात नाही, ही संतांची भूमीका असते. तर मनासारखे झाले नाही या गटात सर्वसामान्य माणसे येत असल्यामुळे सगळयांची आत्महत्तेमागील भूमीका आपण समजू शकतो. जीवन मिळाल्यानंतर विशेषतः त्याची जाणिव झाल्यामुळे जगण्याची सुप्त इच्छा निर्माण होणे, ही नैसर्गीक बाब आहे. प्रत्येक जण जीवनावर मनापासून प्रेम करतो. जीवना मनासारखे होत नाही म्हणून तो आत्महत्याही करतो. इच्छा मरणही त्यातलेच. अलीकडे इच्छा मरणाला स्वीकृती मिळावी यासाठी प्रयत्न होत आहेत. जीवनाचे होत असलेले हाल कुणाला पाहावत नाहीत. म्हणून तो जीवनाला धिक्कारतो. जीवनाची वाट फुलांसोबतच काटयांनीही सजलेली असते, याचा तो विचार करीत नाही. माझे जीवन मला वाटते तसेच असावे, हा हट्ट करून जीवनाचे मोल ठरविले जाते. परंतु हेच जीवन म्हणून त्यातील प्रत्येक सुखदुखाचा बाउ न करता जगत जाणे कधीही उत्तम. यालाच जीवन जगण्याची कला म्हणतात आणि ती जीवनाकडूनच आत्मसात करायची असते. जाणिवेच्या उच्च पातळीवरील समाधी किंवा संथारा या पद्धती धर्माने स्वीकारलेल्या आहेत. प्रपंचातून सगळे आश्रम, सगळया भूमीका पार केल्यानंतर आता जगून काय उपयोग? सगळे या पृथ्वीतलावर भाडेकरू आहेत. एखादया जन्माला येणा-या नवीन जिवासाठी जागा सोडणेच केवळ हातात आहे. दुस-यासाठी संधी निर्माण करण्याची जागा रिकामी करणे ही संथारा या विधीमागची भूमीका असते. परंतु लोकशाहीतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या काळात कायदे सगळयांसाठीच सारखे असल्यामुळे ते विशेष व सर्वसामान्य असा भेद करीत नाही. त्यामुळेच इच्छा मरण, संथरा, संजिवन समाधीला कायदयाचा विरोध आहे. परंतु धार्मिक, सामाजिक, कायदेविषयक बाबी या माणसांच्या समस्येची उकल करण्यासाठी एकमेकांची निर्मीती झाली आहे. धर्म हा कायदा म्हणून कोणे एके काळी अस्तित्वात होता. आता त्याची जागा कायदयांनी घेतल्यामुळे लोकशाहीत कायदयांनाच प्राधान्य देणार हे ठरलेलेच आहे. त्यावेळी धर्म हा सामाजिक पातळीवर सर्वमान्य नसल्यामुळे कायदाव्यवस्थेची गरज पडली, हे ओघाने आलेच. म्हणून कायदा हा सर्वसामान्य माणसाच्या हिताकरीता बनलेला आहे. त्याच्यासाठी चांगले ते योग्य आणि त्याच्यासाठी जे अपायकारक ते अयोग्य. शेवटी कायदा दुहेरी भूमीकेत कधीच राहू शकत नाही. म्हणून धार्मिक क्षेत्रात जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा धर्म आणि कायदा एकमेकांच्या विरोधात संघर्षाच्या पवित्रयात तयार असतात. विजयकुमार राऊत | |||