विजयकुमार राउत
आताशा "डुप्लीकेट' चेह-यांची
अवतीभवती खूप गर्दी होत आहे. कुठलाच चेहरा खरा वाटत नाही. ख-या चेह-यांची सद्दीच
समाजातून संपली झाली की काय? जो भेटतो तो मुखवटाच घेउन भेटतो. कारण आता म्हणे
बाजारात या पॉलीश केलेल्या चेह-यांची भलतीच मागणी आली आहे. एक दोन नव्हे तर असंख्य
मुखवटे घेउन ही माणसे अवतीभवती वावरतात. पाहिजे तेव्हा, पाहिजे तो चेहरा घेउन ही
माणसं निःसंकोच प्रगट होतात. जब जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग एक
चेहरपे कई चेहरे सजा लेते है लोग ! प्रत्येक चेह-याची भूमीका वेगळी. प्रत्येक
चेह-याची दुनिया वेगळी..व्यासपीठावर हे चेहरे दिमाखात आपली भूमीका पार पाडीत असतात.
खचितच आपल्या हेतूमध्ये यशस्वीही होतात. यशस्वी होण्याचा आनंदोत्सव साजरा होतो.
पाटर्या झडतात. एकमेकांना भरपूर शुभेच्छाही देउन एकमेकांकडून पाठही थोपटून घेतली
जाते. घरून बाहेर पडताना एक मुखवटा, समाजात गेल्यावर दुसरा चेहरा, मित्रांत तिसरा
मुखवटा तर फायदयाच्या वेळी पॉलिश केलेला चिकनाचोपडा चेहरा. असे मुखवटयांचे जागोजागी
प्रदर्शन होत असते. प्रत्येक व्यासपीठावर हे मुखवटे अग्रेसर असतात. या मुखवटा
बदलण्याच्या शेवटी एक मनोरंजक प्रकार घडतो. या चेह-यांना स्वतःचा एकही चेहरा राहात
नाही, हीच त्याची "ट्रॅजिडी' ठरते. कारण ही चेहरा गमावून बसलेली माणसं शेवटी आपला
अस्सल चेहराच विसरून गेलेली असतात. म्हणून मृत्यूसमयी मात्र ते स्वतःचा चेहरा
गमविण्याच्या शल्याने आयुष्याला कोसत बसतात. म्हणूनच संत परंपरेत आत्मरूपाशी
जुळण्याचा मंत्र दिला आहे. संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम वारंवार
आत्मस्वरूपाविषयी का सांगत असतात? कारण ते आत्मरूपाशी एकरूप झाले होते. त्यांना या
अस्तित्वाचा अर्थबोध झाला होता. आत्मस्वरूप आनंदमय आणि पारदर्शी असतं. ते
पाण्यासारखं नितळ आहे. ते जपणं यातच खरा पुरूषार्थ आहे. चेह-यावर दुसरा मुखवटा बसू
न देणं मोठं जिकरीचं आहे. समाजात वावरताना नकळत आपण समाजाकडूनच एक चेहरा स्वतःच्या
चेह-यावर चिटकून घेत असतो. समाजाच्या चेह-यालाच स्वतःचा चेहरा मानू लागतो. हळूहळू
तो स्वरूपापासून खूप दूर जायला लागतो. बरे हा चेहरा खूप टिकाउ नसतोच. वयाबरोबर हा
चेहरा कधी गळून पडतो, हे त्याचे त्यालाही कळत नाही. एक गोष्ट आठवते. या
पृथ्वीवर माणूस जन्माला आला तेव्हा आरशांचा शोध नव्हता लागला. त्यामुळे चेहरा कसा
असतो याची त्याला कल्पनाही नसावी. एके दिवशी मात्र साचलेल्या डबक्यातील पाण्याला
ओलांडून जात असताना माणसाने डबक्यात चेहरा पाहिला आणि तो त्या चेह-याच्या प्रेमात
पडला. त्याला कोणीतरी सुंदर माणूस या पृथ्वीतलावर असल्याचा भास झाला. त्याला
शोधण्यासाठी त्याने आयुष्यभर जिवाचे रान केले. परंतु पुन्हा त्याला तो चेहरा कधी
गवसला नाही. त्याला खुप दुःख झाले. तो मनाने दिवसेंदिवस खचत गेला आणि झुरून झुरून
एकदाचा त्याचा मृत्यू झाला. ही कथा ऐकल्यानंतर काय बोध होतो? आदिमानवापासून सुरू
असलेला हा चेह-याचा शोध महामानव होईस्तोवर संपलाच नाही. आपण सारे अजूनही
बुद्धूच... एकमेकांचा चेहरा घेउन फिरत आहोत. बुद्धाच्या "अत्तदीप' प्रेरणेने जागे
होउन स्वतःचा चेहरा शोधण्याचा आपण कधीच प्रयत्न करीत नाही. ज्ञानेश्वरांच्या
साधनेतून आत्मस्वरूप शोधण्याचा मार्ग खरे तर खूप सोपा आहे. परंतु सत्य कधीच
अनुभवाला आलं नसल्यामुळे खोटयांलाच खरं मानण्याची खोड आपल्या डोक्यातून युगानुयुगे
जात नाही.
विजयकुमार राउत
|