गुरू गोविंद दोउ खडे, काके लागू पाय बलिहारी गुरू
आपनी, जिन्ह गोविंद दिया बताय ! गुरू आणि गोविंद एकाच वेळी माझ्यायासमोर उभे
राहिले तर मी कोणाचे पाय पकडावे, असा प्रश्न कबिरांना पडताच ते म्हणतात, हे
बलिहारी मी तर गुरूंचेच पाय अगोदर पकडणार . कारण गुरूंमुळेच ईश्वरा मला खरे तर
तुला भेटता आले. हा भाव गुरूची कृतज्ञता व्यक्त करण्यास पुरेसा आहे. गुरूची
परंपरा संपूर्ण विश्वात प्रचलित आहे. "गुरू बिन ज्ञान नही' म्हणतात. गुरूविषयीची
मतभिन्नता असली तरी गुरूशिवाय मार्ग नाही हेच खरे. कोणी गुरूला निसर्गात पाहतो. तर
कोणी विशिष्ट व्यक्तीत गुरूची स्थापना करतो. कोणी अनुभवांना गुरू मानतो. गुरू हे
निसर्गातील एक तत्व आहे. भारतीय परंपरेने तर गुरूला परमेश्वरापेक्षाही मोठा दर्जा
बहाल केलेला आहे. जीवनात पदोपदी मिळणारे अनुभवही कधी कधी गुरू होउन मार्गदर्शन
करतात. तेव्हा जीवनाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो. त्यासाठी दृष्टी प्राप्त होणे
आवश्यक असते आणि ती दृष्टी देण्याचं काम गुरू करतो. अज्ञानाकडून ख-या ज्ञानाकडे
नेणारा हा फक्त गुरूच असतो. भारतासारखीच प्राचीन संस्कृती असलेल्या चिनमध्येही
गुरूंची परंपरा आहे. ताओ धर्माचे लाओत्से, कन्फूसिअस, जापानमध्ये झेन, ग्रीसमध्येही
सॉक्रेटीसचा शिष्य प्लेटो त्याचा शिष्य ऑरिस्टाटल आदींची दैदीप्यमान परंपरा लाभली
आहे. जगात गुरूला "मास्टर' असे संबोधिले जाते. भारतातही रूषींमुनींपासून संतापर्यंत
गुरूंचा वारसा अलिकडच्या काळापर्यंत मोठया विनम्रतेने जोपासला जात आहे. नाथ
संप्रदायात मच्छींद्रनाथांपासून सुरू झालेली गुरूपरंपरा निवृत्तीनाथ यांच्यापर्यंत
येउन पोहचलेली दिसते. वारकरी संप्रदाय, बौद्ध, जैनांनीही गुरूंविषयीचे गुणगाण केले
आहे. संगीत क्षेत्रात "उस्ताद' शिवाय उत्कर्ष नाही, असं मानल्या जातं. तशीच उर्दू
साहित्यातही शागिर्द गुरूचा शोध घेत असल्याचे दिसून येते. "ज्ञानियांचा राजा गुरू
महाराव' असे संत ज्ञानदेवांनी म्हटले आहे. ज्ञान देतात ते गुरू. शिळेपासून शिल्प
तयार होउ शकते, पण त्यासाठी शिल्पकार लागतो. विद्यार्थीरूपी शिल्प घडविण्याचे काम
गुरू मोठया लिलयेने करतो. योगी रामकृष्ण परमहसं तर आपल्या लाडक्या शिष्यासाठी
वर्षोगणती प्रतीक्षा करीत बसले होते. स्वप्नात भेट देणारा अतिशय परम शिष्य नरेंद्र
याला साक्षात समोर पाहून त्यांनी भावविभोर वृत्तीने मारलेली मिठी गुरूची
शिष्याविषयी ओढ दर्शविते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही भगवान बुद्ध,
महात्मा ज्योतीबा फुले आणि संत कबिर यांना गुरूस्थानी मानले होते. देवापेक्षाही
अधिक गुरूचा महिमा मानण्यात येतो. अंधकारातून प्रकाशाकडे घेउन जाणारा तो गुरू, अशी
गुरूची व्याख्या करण्यात येते. वेद, उपनिषद, पुराण, गीता आदींमधून गुरूंची महती
गायीलेली आहे. वयाने अतिशय लहान असलेल्या अष्टावक्राच्या आत्मज्ञानाची चुणूक पाहून
जनक राजाने त्याला गुरू मानले होते. शिख धर्मात तर गुरूपरंपरेविषयीचं खूप मोठं
तत्वज्ञान पाहायला मिळतं. परंपरेने चालत आलेली "गुरू' ही संज्ञा किती मोठी आहे,
तिचं महत्व या धर्मात सांगीतलं आहे. गुरूंच्या पेक्षा शिष्य मोठा आहे. कारण
शिष्याला ज्ञानाची तहान लागलीच नाही तर तो गुरूपर्यंत येईल तरी कसा? म्हणून या
धर्माचे संस्थापक गुरूनानकजी म्हणतात की गुरू शोधण्याआधी तू शिक ! त्यानंतरच
तुझयाकडे इच्छीत गुरू चालत येईल, असं काहीसं ओशो रजनिस एके ठिकाणी म्हणतात.
शिखांत दहा गुरूंची परंपरा कायम आहे. कारण गुरूला महानता मिळाल्यानंतर गुरू
होण्याचा मोह सर्वांना होतो. जिकडे तिकडे गुरूंचं पिक आलेलं दिसतं. अशा बिकट क्षणी
खरा गुरू मिळणं अतिशय कठीण असतं. परंपरा प्रदुषित झाल्यानंतर ती तोडणे तितकेच
महत्वाचे असते. म्हणून गुरू नानक नुसतं शिष्य म्हणून जगण्याचं तत्वज्ञान सांगतात.
शिख धर्मात शिष्यालाही गुरूऐवढं महत्व प्राप्त करून देण्यात आलेले आहे. "गुरू
ग्रंथसाहिब' हा पवित्र धर्मग्रंथ गुरूच्याच रूपात आजही अनुयांनाना मार्गदर्शक ठरतो.
गुरू तंत्राची प्रशंसा सगळया शास्त्रात करण्यात आलेली आहे. भगवान श्रीकृष्ण
महाभारतात तर विविध रूपांत वावरताना दिसतात. परंतु धर्नूधर अर्जुनाला आपल्या
कर्तव्यावाचा विसर पडताच त्याला रणांगणावर जाणिव करून देण्यासाठी श्रीकृष्णांनी
घेतलेली भूमीका महत्वाची आहे. अर्जुनाला भगवंतांनी गीता सांगीतली. भगवत्गीतेतील
तत्वज्ञान अध्यात्मिक तर आहेच, परंतु माणसाच्या जगण्याला वेगळे परिणाम प्राप्त करून
देणारे आहे. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश सांगणारी भगवत गीता आजही जगण्याचं बळ देतं.
इतिहासात गुरूबरोबर शिष्याचंही मोठेपण दिसून येते. एकलव्य द्रोणाचार्यांचा पुतळा
प्रत्यक्ष समोर ठेवून विद्या अवगत करतो. गुरूंनी अंगठा मागताच क्षणाचाही विलंब न
लावता तो गुरूंच्या चरणावर अर्पण करतो. ही गुरूभक्ती कितीतरी मोठी आहे. विनोबा
भावे महात्मा गांधीना गुरू मानीत. ते एका ठिकाणी म्हणतात की, मी महात्मा गांधींना
गुरूस्थानी जरूर मानतो. पण मी त्यांच्या खांदयावर बसून त्यांच्या पुढचं जग पाहू
शकतो. गुरूचं मार्गदर्शन घेउन शिष्यांनाच आपला मार्ग तयार करायचा असतो. गुरूंचा
संबंध शिष्याच्या आध्यात्मिक उन्नतीशी असतो. गुरूंच्या पावलांवर पाउल टाकून गुरूंनी
स्वीकारलेल्या मार्गाचं अनुकरण करायचं नसतं, असं एकंदर गुरूशिष्य परंपरेतील सार
दिसून येतं. भगवान बुद्धांनी आपल्या शिष्यांची अनेकदा परीक्षा पाहिली. शिष्याला
तावून सलाखून काढल्यानंतर तो ज्ञान मिळविण्या योग्य झाला की नाही, यासाठी ते
त्यांची कठोर परीक्षा घेतात. आज भारताकडे एक महाशक्तीच्या रूपात पाहण्यात
येते. सर्व जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. पुरातन काळापासून मिळालेले वैभव
काळाच्या उदरात गडप झालेले असले तरी कालांतराने पुरातन संस्कृतीचे अवशेष पुन्हा
मोठया प्रमाणात सापडत आहेत. जुन्या ज्ञानाचे भंडार दिवसेंदिवस उलगडत आहे. उद्याच्या
विज्ञानाला जन्म देणारं अध्यात्म हे कधीच संपणार नाही. म्हणून जगाचा महागुरू
होण्याची संधी आयती भारताकडे आलेली आहे. या संदर्भात चिनमधील विचारक लाओत्से
आयुष्याच्या उत्तर काळात एका अदृष्य संकेतामुळे चिन सोडून हिमालयाच्या दिशेने पळत
सुटले होते. त्यांना हिमालयाच्या दिशेने एक तारा चमकताना दिसला होता, म्हणे. आज
सगळा देश भारताकडे एक महागुरू म्हणून मोठया आशेने पाहात आहे. नॉस्ट्राडम याने
केलेल्या शंभर भाकीतांपैकी एक हेही असावे असे वाटते.
|
|
|
|
* विजयकुमार राऊत
|