* विजयकुमार राऊत दैनंदिन जीवनात पावलोपावली निखळ आनंदापासून आपणा स्वतःला कोसो दूर ठेवित असतो. केवळ आपण आपल्या दृष्टीची व्यापकता जर रूंद केली नाही तर त्या वस्तूपासून मिळणा-या आनंदालाही आपण खरे तर पारखे होउन बसतो. वस्तू निसर्गतः जशी आहे तसे पाहणे म्हणजे त्याला दृष्टी प्राप्त करणे म्हणता येईल. उर्दू साहित्यात याला "नजर पैदा' करणे असे म्हणतात. जगभरातील महापुरूषांनी ही नजर मिळविण्यासाठी आपल्याला अनेकदा सचेत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिल्यांदा विशाल समुद्र पाहिला तेव्हाची अनुभूती पुन्हा दुस-यांदा येईलच असे नाही. इंद्रिये यांत्रिक होत गेलीत की आपली नजरही संवेदनशिलता गमावून बसते. जे आहे अगदी तशीच अनुभूती घेता आली तर त्या वस्तुतील आनंद अवर्णणीय असतो. आपली दृष्टी किंवा दृष्टीकोन हा अवतीभवतीच्या पूर्व संस्कारातून तयार झालेला असतो. आपण दैनंदिन जीवनात कुठलेही काम करीत असताना जो यांत्रिकपणा येतो, त्यामुळेच मनुष्य दुःखाला जवळ करून सर्वस्व गमावून बसतो. आपल्याला कुठल्याही वस्तूवर आपल्या मतेमतांराचे खोटे शिक्के मारण्याची सवय झालेली असते. हे शिक्के त्या व्यक्तीबद्दलच्या असणा-या स्मृतितून निर्माण झालेले असतात. ही बाब समजून घेण्याकरीता एका साध्या गोष्टीचे उदाहरण देतो. केदारनाथला आलेला प्रलय. ही घटना साधी नैसर्गिक आहे. ती जशी आहे तसे तिच्याकडे पाहणे म्हणजे सत्याचे ज्ञान करून घेणे होय. परंतु आपल्यावर संस्काराने दिलेल्या चष्म्यातून आपण त्या घटनेकडे पाहिले तर आपण सत्यापासून दूर जात असल्याचे कळते. बद्रीनाथ-केदारनाथच्या दुर्घटनेत हजारो नागरिक वाहून गेले. फार मोठया प्रमाणात नुकसान झाले. परंतु या घटनेकडे पाहणारे मात्र आपले वेगवेगळे दृष्टीकोन व्यक्त करताना दिसतात. कोणी म्हणतात केदारनाथसारख्या तिर्थस्थळी भाविकांना आलेले मरण ही देवाची मर्जी असल्यामुळे त्यांचे जीवन कृत्य झाले. दुसरा एखादा म्हणतो, दुनियेत पाप फार वाढलं होतं ते साफ झालं. तिसरा या दुर्घटनेतून सुखरूप बचावणारा देवाच्या कृपेचे गुणगाण करीत असतो. देवाच्या कृपेने वाचल्याचा आनंद व्यक्त करताना तो पुुन्हा एक अंधश्रद्धा निर्माण करतो. आता सांगा कोण खरा आणि कोण खोटा ? कारण निसर्गनियमानुसार ही घटना ही नैसर्गिक आपत्तीच होती. त्यासाठी बव्हंशी माणूसच जवाबदार आहे. अशा घटना घडणे पृथ्वीतलावर सतत सुरूच असते.अशा घटनेत आपण देवाला मध्ये आणून आपले समाधानच करीत असतो की नाही? मला सुप्रसिद्ध साहित्यीक यशवंत मनोहर यांनी एका ठिकाणी म्हटलेलं एक वाक्य आठवते. निसर्ग हा असाही नसतो किंवा तसाही नसतो. तो केवळ असतो, हेच सत्य आहे. आपण मात्र निसर्गाला दयाळू, कृर असे संबोधून त्याच्यावर उगाच आरोप किंवा त्याचे गुणगाण गात बसतो. आरोप केल्याने त्याचा राग आपण ओढवून घेत नसतो किंवा गुणगाण केल्याने तो आपल्यावर फार प्रसन्न होतो असेही नाही. आपण मात्र माणसाचे गुण निसर्गावर उगीच लादत असतो. कारण सत्य स्वीकारणे आपल्याला झेपत नाही किंवा तशी दृष्टीच आपल्याला अवगत झालेली नसते. जीवन जगत असताना निसर्गाच्या हातात हात घालूनच स्वतःचा सर्वांगिण विकास साधत जगणेच केवळ आपल्या हातात उरते. चीनमधील "ताओ' धर्मही हेच सांगतो. पृथ्वी सुर्याभोवती फिरत असल्याचा कधीकाळी आपल्याला भास व्हायचा. मात्र गॅलिलिओंने फक्त एका तर्काच्या आधारे आपला समज साफ चुकीचा असल्याचे नाही का सिद्ध केले? पृथ्वी सपाट असल्याचे दाखले धर्मग्रंथांच्या पानापानावर दिसतात. पृथ्वी या ग्रहाबद्दल किती किती गैरसमज होते म्हणून सांगावे ! ही पृथ्वी शेषनागाच्या पाठीवर असल्याचे कधीकाळी सांगण्यात यायचे. परंतु आजच्या प्रगत विज्ञानाने हे साफ चुकीचे असल्याचे सिद्ध केले. असे अनेक गैरसमज काळाच्या कसोटीवर फोल सिद्ध झालेले आहेत . समाजात एखादया व्यक्तीच्या बाबतीतही असेच अनुभवायला मिळते. अमुक व्यक्ती धार्मिक अन् तुमक व्यक्ती अधार्मिक अशी धारणा करून आपण त्या व्यक्तीला पूर्णपणे जाणण्यापासून दूर ठेवतो. खरे तर व्यक्ती जशी आहे तसे स्वीकारणे आपल्या व्यवहारात परडण्यासारखे नसतेच.शब्दही मानवाने निर्माण केलेले असता आणि अर्थही. आणि म्हणूनच एका टप्प्यावर आपल्याला जग अर्थहिन वाटायला लागतं. * विजयकुमार राऊत 8888876462 | |||
-