* विजयकुमार राऊत व्यक्तींच्या एकंदर स्थितीचा अभ्यास
करण्याची आताशा सवयच झाली. प्रत्येक व्यक्ती माझयासाठी एक खुली किताब आहे. तोच
माझी कविता आहे, तोच माझी गझल आहे..कुराण अन् गीता ग्रंथही तोच आहे...तोच माझं
एकंदरीत भावविश्व आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करीत असताना या ना त्या स्वरूपात
माणूसच सर्वप्रथम भेटतो. या जगतात नाईलाजाने का होईना सर्वप्रथम माणसांशीच नाते
जोडावे लागते. तुमच्या अवतीभवतीचं जग माणसांनीच तर भरलेलं आहे. या माणसांच्या जगात
वावरताना तुम्हालाही सर्वसामान्य माणूसच व्हावं लागतं. हे सर्व करीत असताना
आपल्याला भेटलेल्या माणसाशी आपण वागलो तशी मिळालेल्या अनुभवातून त्याची प्रतवारी
ठरवितो. त्याला व्यवहाराच्या कोंदणात बसवतो. काही काही माणसं समाजाला न परवडणारी
असतात. तर काही आपल्या विचारांनी समाजात बंड घडवून आणणरी असतात. आपल्या विचारांशी
सहमत होणारा माणूस केव्हा आपला होउन जातो कळतंच नाही. इतरांना मात्र आपण आपल्या
दारातून बेदरकारपणे हुसकावून लावतो. आपल्या विचाराला छेद देणारा माणूस नक्कीच आपला
शत्रू होउन बसतो. सामाजिक नितीनियमांच्या विरोधात वागणारा माणूस तर अख्ख्या समाजाचा
शत्रू होतो. माणसाच्या हिताच्या गोष्टी करणारा माणूस, सत्य सांगून त्याला योग्य
मार्ग दाखविणारा माणूस हा रिकामटेकडा ठरविल्या जातो. कोण केव्हा परका वाटेल हे
सांगता येत नाही. समाजातून बहिष्कृत केलेली माणसं नेहमीच उपेक्षेचा विषय असतात.
त्याला दुषणं देण्यात येतात. परंतु माणूस वाईट झाला म्हणून त्याला दूर लोटणे
कुठल्या शास्त्रात बसते. अशा व्यक्तीचे पैलू शोधून काढणे कोण्या येरागबाळयाचे काम
नव्हे. विल्सन चर्चिल म्हणतो की तुमचे कुणी शत्रू आहेत? फार चांगली गोष्ट आहे.
याचाच अर्थ असा की तुम्ही कधीतरी मुल्यांच्या बाजूने उभे राहिला होता. प्रत्येक
माणूस एक शास्त्र सांगत असतो. त्याच्या व्यक्तीमत्वातून असंख्य हिरे, माणके शोधून
काढता येतील कदाचित. साहित्यातील अशा कितीतरी व्यक्तीरेखा अफलातून माणसाच्या
व्यक्तीमत्वातूनच अजरामर झालेल्या आहेत. प्रत्येक शास्त्र माणसासाठीच जन्माला
आलेलं आहे. सगळी शास्त्रेच माणसाच्या भोवती घुटमळतात. जागोजागी बदलत जाणारी सामान्य
माणसंही काहीतरी नकळतपणे शिकवून जातात. माणसाला फक्त उणिव असते प्रेमाची.
प्रेमातून माणसं उलगडत जातात...कळत जातात. निदा फाजली नावाचा शायर म्हणूनच म्हणतो.
उसके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा तरह वोभी शहर मे तन्हा होगा !
अशी हद्दपार झालेली, बेताल जगणारी माणसंच ख-या अर्थांनं मस्तीत जगत असतात.
म्हणूनच माणूस हा न उलगडणारं एक कोडं होउन बसतो. त्याला आपल्या व्यवहाराच्या गणितात
कितीही पडताळलं तरी तो कळंतच नाही. त्याच्या मनाचा व एकंदर स्वभावाचा कितीही अभ्यास
केला तरी तो पूर्णतः तसा अपरिचितच असतो. म्हणूनच सुप्रसिद्ध नाटककार विजय तेंदूलकर
त्याला "माणूस नावाचं बेट' असं संबोधतात. एक अपरिचित बेटच तर असतो माणूस. कुठलाही
दुराग्रह न बाळगता त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या व्यक्तीमत्वाची
अनेक दालनं उघडू शकतील कदाचित. कधी न कळणारी बेताल वागणारी माणसंच आयुष्याला आणि
विचारांना वेगळी कलाटणी देउन जातात. मानशास्त्रीय दृष्टीकोनातून विविध प्रवृत्तीची
माणसं समाजात मानसोपचार तज्ज्ञांनाही कळायला "चॅलेंज' करतात. त्यापेैकी अनिर्बंध,
बेताल जगणारी माणसं, आपल्याच विश्वात रमणारी माणसं, दुःखातही सुखाचा मुखवटा घेउन
जगणारी माणसं, दुस-यांसाठी धडपडणारी माणसं, कुढत कुढत जगणारी माणसं,प्रेमासाठी
व्याकुळे झालेली माणसं, एकलकोंडी माणसं, माणूसवेडी माणसं, सुख मिळताच धबधब्यासारखी
कोसळणारी माणसं, दुःखातून वेडी झालेली माणसं, माणूस जातीचा तिरस्कार करणारी माणसं ,
एखाद्याच्या अनुपस्थितीत उणीधुनी काढणारी माणसं, सदा न कदा जिवनाची क्षुल्लक
कारणांवरून तक्रार करणारी माणसं, दुस-यानं त्याचं ऐकावं म्हणून सतत काही ना काही
करून लक्ष वेधणारी माणसं, सतत प्रसिद्धीच्या झोतात राहून स्वतःला चर्चेत ठेवणारी,
एखादया विचारावर ठाम असणारी माणसं, काही जगावेगळी माणसं अशी असंख्य माणसं या समाजात
सर्वत्र विविध रंगात भेटत असतात. माणसाचं वैविध्यच दुनियेला विविध रंगी करून जातं.
वाल्याचा वाल्मीक होतो, अंगुलीमालसारखा भगवान बुद्धांना शरण येउन योग्य मार्गाला
लागतो. मग रस्ता सोडून चालणारी माणसं रस्त्यावर परत येउ शकत नाही का? विजयकुमार
राऊत नागपूर, राज्य महाराष्ट्र (भारत) मोबाई क्रमांक ः 8888876462
|
|
|
|
|