विजयकुमार राउत
धर्म ही जीवन जगण्याची एक पद्धती किंवा आचारसंहिताच असते. जेव्हा पोलिस यंत्रणा, कायदेव्यवस्था नव्हती. तेव्हा माणसाला जगण्यासाठी कुठल्यातरी नितीनियमांची आवश्यकता होती. अन्यथा माणसाला नितीमान जीवन जगताच आले नसते. उलट नीतीशून्य जीवन कुणाच्याच हिताचे ठरले नसते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रत्येक माणूस गुन्हेगारीकडे वळून त्याने कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असती. "जगा आणि जगू दया' हे सर्वमान्य तत्व या धारणेतूनच आपण स्वीकारलं. आज ज्याला आपण "माणुसकी' म्हणतो ती टिकून राहिलीच नसती. माणूस माणसाला कापत सुटला असता. मानवाला कालांतराने कुठल्यातरी संरक्षक व्यवस्थेची गरज भासू लागली. त्यालाच धर्माचे नाव देण्यात आले. माणसाची वर्तणूक कशी असावी याचं उत्तर धर्माच्या संकल्पनेत खोलवर रूजलेले दिसून येईल. आपण जगताना इतरांनाही जगू देण्याचं समान तत्व सगळयाच धर्मांनी सांगीतलं आणि पाळलं. धर्म अगोदर की माणूस, याचं उत्तर माणूसच आहे. धर्म माणसाला कसं जगावं, हे शिकवितो. माणसाला जगताना जे जे आवश्यक आणि आश्वासक आहे, त्या त्या गोष्टी शिकविण्याचं काम धर्मच करतो. धर्म हा लिखित- अलिखित असा कायदाच असतो. माणूस या भूतलावर एक जीव म्हणून आला आणि हळूहळू उत्क्रांत होत गेला. प्रारंभिक अवस्थेत त्याचे काही कायदेकानून नसतील. तो कधीकाळी आदिमानवाच्याच रूपात होता. त्याच्या जगण्यावर नियंत्रण असणारी कुठली यंत्रणाही त्यावेळी उपलब्ध नसावी. कालांतराने त्याला जगण्याचा मार्ग सापडत गेला. अनुभवातून अर्जित कलेलं ज्ञान आपल्या दुस-या पिढीकडे सोपविताना माणसानं अनेक शतकांपर्यंत मौखिकपद्धतीचा वापर केला असावा. हे काम त्या कळपातील बुर्जूगांनी केलं. जगण्याचा सुलभ मार्ग एका प्रदीर्घ प्रवासानंतर विस्तारीत गेला. भौगोलिक परिस्थितीनुसार मग एकेक धर्म स्थापन झाले. कितीही म्हटलं तरी सगळे धर्म समान तत्वांचीच शिकवण देतात. त्यांच्यातील सुत्र समान आहे हे सांगायला आज कोण्या धर्मपंडिताची गरज नाही. माणूस हाच धर्माच्या केंद्रस्थानी होता आणि भविष्यातही राहणार. त्यातील सकारात्मक भाग लक्षात घेतला तर परंपरेने मौखिक ज्ञानातील गैरसमजही थोडेफार कारणीभूत असतील. पूर्वीच्या काळी ज्ञान मौखिक पद्धतीेने प्रक्षेपित होत असल्यामुळे त्यात अडचणी आणि प्रदुषित विचार घुसडणे स्वाभाविक होते. त्यामुळेच नवनवीन धर्मांची गरज मानवाला वाटू लागली. मूळ तत्वांची गफलत होत गेल्यामुळे नवनवीन पंथ जन्माला येत गेले..
आजची स्थिती मात्र वेगळी आहे. वेगवेगळे धर्म एका राजकीय पक्षातून दुसरा पक्ष निर्माण व्हावा, तसे तयार होत असल्यामुळे आजच्या काळात एकमेकांविषयी बंधूभाव, सलोखा निर्माण होण्याऐवजी माणसामाणसात दरी निर्माण करण्याचे काम धर्म आणि पंथ करीत असतात. मानवासाठी धर्म की धर्मासाठी मनूष्य? इथपर्यंत हा वाद विकोपाला गेला आहे. जगात धार्मिक उन्मादाने सर्वात जास्त बळी घेतले आहेत. धर्मांनी जितके संरक्षणाचे काम केले, त्याहीपेक्षा अधिक संहारक शस्त्राप्रमाणे विध्वंसाचे कामही केले, हे स्पष्ट आहे. मुळात माणसाने धर्म आणि त्याचे स्वरूपच समजून घेतले नाही, असा त्याचा अर्थ होतो.
धर्माकडून जे आपण निमूटपणे स्वीकारतो तीच नंतर प्रथा, रिवाज होउन मानगुटीवर कायम बसलेली दिसते. अवतारवाद ही संकल्पनाही आपण तशीच एका पिढीकडून दुस-या पिढीकडे अनेक पदरच्या बाबी घालून हस्तांरीत केली असावी. त्यामुळे धर्माचा मुळ प्रवाह इतका प्रदुषित झाला की गंगेला अनेक गटारे मिळून तिचं पावित्र संपुष्टात यावं, तसं प्रत्येक चांगल्या गोष्टीचं झालं. कोणीतरी येउन आपली या दुःखमय जीवनातून सुटका करेल, असा भोळा आशावाद आपण स्वीकारल्यानंतर निमूटपणे वाट पाहात बसणेच आपल्या हाती उरते. अवतारवादाच्या खोल मुळाशी गेल्यास असं दिसून येईल की अवतारवाद म्हणजे एखादया परमेश्वरी आत्म्याचे पूननिर्माण. एका जन्मीचे कार्य आटोपल्यानंतर एखादा महान आत्मा दुस-या रूपात पुन्हा मानव जातीच्या उत्थानाकरीता अवतार घेत असतो, असे आपण मानतो. अवतारवाद आपण जशाच्या तसा स्वीकारला तर प्रत्येक मनूष्य हा आपपल्या परिने अवतार असू शकतो. पण अवतार सर्वसामान्य माणसाचा मानल्या जात नाही. अवतारवादाच्या तळाशी भावना असते पूनर्जन्माची. प्रत्येक पार्थिव शरिराला मृत्यू अटळ आहे, हे सत्य आहे. परंतु आत्म्याला कुठलीच वस्तू मारू शकत नाही. कुठलीच गोष्ट स्पर्शू शकत नाही, असं जर आपण मानलं तर प्रत्येक माणसाचा पूनर्जन्म होतो, असं धर्मच म्हणतो. परंतु पूनर्जन्म मानण्याच्या प्रत्येक धर्मात वेगवेगळया पद्धती आहेत. चौ-यांशी लक्ष योनी भोगल्यानंतर मनूष्य जन्म मिळतो, या विधानाचा अर्थ असा की मनूष्य जन्म दुर्लभ असा आहे. पुन्हा हा जन्म मिळणार नाही, तेव्हा नितीमान जीवन जगा, तेव्हाच तुम्हाला मानवाचा पूनर्जन्म मिळेल, असे आश्वासन धर्म देतो. त्यासाठी एका अदृश्य शक्तीचा धाकही दाखवितो.
नितीची तत्वे स्वीकारल्यानंतर मानवाच्या अगदी आरंभीच्या काळात त्याला जगता जगता हळूहळू जगा आणि जगू दया यामागचं मर्म कळत गेलं आणि एकेका नवीन तत्वाचा जन्म होत गेला . तेच त्याच्या जगण्याचे कायदे होत गेले. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असताना त्याला एका वेगळया शक्तीची गरज भासू लागली. त्याला निसर्गातील प्रत्येक गोष्टीत देव दिसू लागला.
आजही आपण गंभीरपणे विचार केला तर असे दिसून येते की अवतारवाद हा खरोखर असतो का? त्याचा हेतू काय असावा? या प्रश्नांचे उत्तर, माणूस म्हणून जगण्यासाठी केलेली तडजोड असा तर नव्हे? मला कोणीतरी या खाईतून काढून नेईल आणि अखिल मानवजातीचा उद्धार करणारा कोणीतरी नक्कीच येणार, अशी समजूत जीवनाच्या खोल तळाशी घट्ट बिलगून असते.
डार्विनचा मानवाचा उत्क्रांतीवाद आपण स्वीकारला तर माकडापासूनच मानवाची निर्मीती झाली, असे डार्वीन मानतो.. परंतु हे माकड या पृथ्वीतलावर शेवटी आले कुठून, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. डार्विनचा सिद्धांत एका ठळक अशा टप्प्यापासून सुरू होतो. परंतु अधिक खोलात गेल्यास पृथ्वीवर जीव कसा निर्माण झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न धर्माने अर्थात विज्ञानाने अगोदरच केलेला आहे. विज्ञानाची या गोष्टीला जोड दिल्यास त्यातील तथ्य समजण्यास थोडीफार मदत होईल. तसा दावा मात्र करता येणार नाही. या लेखाचा उद्देशही तसा नाही.
हिंदू धर्मातील अवतारवादालाही गहन असा अर्थ आहे. या धर्माने सर्वात प्रथम अवतार मत्स्य याला मानले. आता विज्ञानातून ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या विश्वात कुठला जीव जन्माला येण्यापूर्वी पृथ्वीवर चूहूबाजूने केवळ पाणी आणि पाणीच होते. मनूष्य नावाचा प्राणी मग आला कोठून? जीवाची पृथ्वीवरील निर्मीती ही अमिबा नावाच्या एकपेशीय प्राण्यापासून झाली, असं विज्ञान म्हणतं. परंतु धर्म म्हणतो की पमेश्वराचा पहिला अवतार हा मत्स्य आहे. ढोबळमानाने या अवतारवादाच्या मागचं रहस्य समजून घेतल्यास विज्ञान व धर्मातील अवतारवाद याच्यातील संबंध समजणे सोपे होईल. अमिबा हा एकपेशीय प्राणी असून तो पाण्यात राहतो. मासा हासुद्धा पाण्यातच राहतो. म्हणजे जीवाची निर्मीती पाण्यातूनच झाली असावी, असा त्याचा अर्थ निघतो. त्यानंतर दुसरा अवतार कच्छ. या अवतारात जीव हा थोडा जमिीवर राहण्याइतपत उत्क्रांत होउन पाण्याबाहेर यायला लागला. वेळेप्रसंगी तो पाणी आणि जमिन यावर राहून आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतरचा वराह हा उत्क्रांतीवादातील तिसरा टप्पा आहे, असे समजण्यास मदत होईल. वराह हा निव्वळ जमिनीवरील अवतार आहे. यामागच्या भाकडकथा थोडया बाजूला ठेवून विचार करायला पाहिजे. भाकडकथा एकतर बोधप्रद असतात किंवा त्या जाणिवपूवर्क घुसडलेल्या असतात. मुद्दा स्पष्ट होण्यासाठी क्षणभर विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार करू या. तसा विचार केला तर उत्क्रांतीवादातील एकेक टप्पे उलगडत जातील.
यापुढचा अवतार नृसिंहाचा. नर अधिक हिंस्त्र श्वापद. म्हणजे मानव म्हणण्याइतका माणूस उत्क्रांत झाला नव्हता, हे यातून स्पष्ट होतें. मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास हा दीर्घकालीन आहे. मात्र त्यानंतर झालेला पशूराम हा आदिमानाच्या ब-याच पुढचा टप्पा असावा. तिथपर्यंत विविध शस्त्रांचा माणसाने शोध लावला होता. चित्रात परशूराम खांदयावर परस म्हणजे कु-हाड घेउन दाखविलेला आहे. म्हणजे त्याकाळात शस्त्राचा वापर होत असावा. शस्त्रांच्या माध्यमातून त्यानं शिकार आणि शत्रूवर विजय मिळविण्यास प्रारंभ केला असावा, असं समजायला काहीही हरकत नाही. त्यानंतर कित्येक युगे लोटलीत. माणसाचा शारिरीक, बौद्धीक उत्क्रांतीचा प्रवास असाच अविरत सुरू होता.
तसं पाहिलं तर माणूस सुरवातीपासूनच समाजप्रिय प्राणी आहे. त्याच्या गरजेसाठी त्याने समाजाची निर्मीती केली. पूर्वी आदिमानवाच्या टोळया असल्याचे दाखले इतिहासाच्या पानोपानी सापडतात. त्या टोळयांचे रूपांतर समाज किंवा राज्यात होत गेले. वामन आणि बळीराजाच्या कथेतून शेतीचे प्रतिबिंब अधोरेखित होते. या अवतारात मानवानं शेती करून अन्न मिळविण्याची कला अवगत केली होती. कृषी संस्कृती भरभराटीला आली असावी, असाही एक तर्क निघू शकतो.
भगवान प्रभूरामचंद्रापर्यंतचा प्रवास एका सर्वगुणसंपन्न मानवापर्यंतचा महत्वाचा टप्पा आहे, असंही मानता येईल. एक पत्नी, एकवचनी अशी बिरूदावली आपण प्रभूरामचंद्राच्या नावामागे लावतो. परंतु प्रभू रामचंद्रापर्यंत दिलेला शब्द पाळणे, एकच पत्नीला स्वामीनी मानने आणि मर्यादांचे पालन करणे या बाबी रामायणकाळापूर्वी झालेल्या नसाव्यात किेंवा किंचित अशा अस्पष्ट स्वरूपात असाव्यात. मानवाचा प्रवास तेव्हा कुठे एका सुसंस्कृत समाजापर्यंत येउन ठेपला होता. परंतु जाणिवा अनेक अंगानं प्रगल्भ व्हायला अजूनतरी थोडा वेळ होता. युद्धाला त्यानं नितीची जोड दिलेली नसावी. अवतारवादात त्या त्या काळचं प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. त्या काळची संस्कृती, रितीरिवाज, समाज या गोष्टी अवतारवादात दिसून येतात. स्त्री ही पुरूषाची एक सावली आहे, दासी आहे, असेच त्यावेळच्या स्त्रीचे रूप असावे. अनेक अंगांनी ते तपासताही येईल. परंतु त्यानंतरचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मात्र हा मात्र अनेक अंगांनी सर्वांना प्रेरणादायी ठरला हेच त्यामांगचं कारण असावं. श्रीकृष्णावतार हा प्रगल्भ जाणिवेचा उत्कट अविष्कारच मानावा लागेल. कारण श्रीकृष्णावतारात सगळं काही सांगीतलं आहे. म्हणून श्रीकृष्ण अवतार परिपूर्ण आहे, असं मानल्या जातं. श्रीकृष्णानं राजनिती, युद्धनिती, व्यवहारनिती, अर्थशास्त्र, नितीशास्त्र ही सगळी शास्त्रे सांगीतली. रामायणापेक्षा श्रीकृष्णाचा अवतार हा प्रत्येक बाबतीत सरस आणि उजवा ठरतो, तो यामुळेच.
भगवान बुद्धांनी मात्र त्याहीपलिकडे जाउन मानवातील ईश्वराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बुद्ध विज्ञानयुगाचा प्रतिनिधी म्हणून श्रेष्ठ वाटतो. बुद्धाने मात्र स्वःला परमेश्वर न मानता त्याने अखिल मानवजातीला "अत् भव दिप' असा संदेश देत स्वतःच स्वतःचा मुक्तीदाता होण्याचा मार्ग सांगीतला. म्हणून बुद्धाची विचारसरणी अख्ख्या जगात मानली जाते. आजचं युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. म्हणजे बुद्ध आजच्या युगाचा प्रतिनिधी असणे हे स्वाभाविक आहे..
अवतारवादा मागचं गुपित समजून घेण्याचा हा ओझरता प्रयत्न जरी असला तरी त्यात थोडातरी तथ्यांश असावा. मराठी काव्यविश्वाबद्दल बोलताना आपण पहिले केशवसुत, दुसरे केशवसुत मर्ढेकर आणि तिसरे केशवसुत नारायण सुर्वे यांना मानतो. त्यातून आपण काव्याच्या कालखंडाची विभागणी करतो. केशवसुतांनी तिनदा अवतार घेतला असे म्हणणे हास्यास्पद होईल. त्यामागची कवितेच्या एका वेगवेगळया युगांची संकल्पना स्पष्ट होते. त्याचप्रमाणे अवतारवादाचे आहे. एका विशिष्ट वेळी कोणीतरी अखिल मानवजातीच्या उत्थानाकरीता उभं राहण्याचं बळ निर्माण करतो आणि एकंदर परिस्थिती बदलून टाकतो. वैचारिक ,सामाजिक अथवा सांस्कृतिकदृष्टया ती उत्क्रांतीच ठरत असते. असामान्य अशा पुरूषांनाच अवतार मानल्या जातं. मानव आता शरिरीक पातळीवर अधिक उत्क्रांत होणे कदाचित शक्य नाही. परंतु विचाराच्या किंवा आदर्शाच्या बाबतीत घडवून आणलेली उत्क्रांती ही नवीन अवतारास जन्मास घालते, हेही तितकंच खरं.
विजयकुमार राउत
साई नगर, ट्रॅक्टरकंपनी चौक
हिंगणा रोड नागपूर.16