Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

रविवार, 30 नवंबर 2014

दावणीला बांधलेले....


कैकदा आले रूतू पण वांझ गेले
दुःख हे माझे बिचारे गांजलेले

कत्तली करतील ते सोयीप्रमाणे-
शब्द त्यांच्या दावणीला बांधलेले

मोकळे आकाश तू जेव्हा दिले
मुक्‍त झाले श्‍वास माझे कोंडलेले

वादळाने कालच्या उद्‌ध्वस्त केले-
खेळ अपुले वाळवंटी मांडलेले

पेरले होते जिथे मी स्वप्न माझे
ऐनवेळी शेत सारे बांड गेले

इतिहासही "त्यांचेच' गातो गोडवे
व्यर्थ गेले रक्‍त माझे सांडलेले

येथे जरी मी दूर तुजपासूनी-
"त्या' तिथे काळीज माझे टांगलेले

                                                              विजयकुमार राउत

...............................

पाउसपाण्यासारखा !



रोजचा होतो दगा पाउसपाण्यासारखा !
कोरडया मातीत आहे मी बियाण्यासारखा!!

काल माझ्या कापसाला भाव होता चांगला
आज व्यवहारात आहे,चार आण्यासारखा !!

ही पहा गेली सुगी नी ती उडाली पाखरे
संपलो केव्हा कळेना बारदाण्यासारखा !!

या शिवाराला न आली कीव माझ्यावर कधी
मी असा खपलो जसा की सांगकाम्यासारखा !!

मोसमांना येत नाही का बकुळीची फुले ?
राहिला नाही जमाना त्या जमान्यासारखा !!

तू अशी आकाशवेडी, टाळते मजला जरी
प्राशितो अपमान मी का विष घेण्यासारखा !!

                                                         विजयकुमार राउत

..................................

गुरुवार, 27 नवंबर 2014

गुमनामसा कोई शायर...




गुुमनामसा कोई शायर था, जो शहर मे अक्‍सर दिखता था !
शेरो को कहता महफिलमे, वो गझले-वझले लिखता था !!

उसको पता था के शायद, बदलेंगे हालात ना अब
फिरभी अपने गुलशनमे, वह फुल के जैसा खिलता था!!

यहा कौन समझनेवाला था, जिने का है अंदाजे बयॉं
कागज के कोरे पन्नेपे, वह कलमको क्‍यूकर घिसता था!

बातो मे उसके दर्दे जहॉं, आँखो मे उसके ख्याब जवॉं
वो मजबूरीके चक्‍कीमे, दिनरात हमेशा पिसता था !!

तनहाई मे तनहॉं था कब? वो भिडका हिस्सा बन न सका
खुब चॉंदसे उसकी जमती थी, खुद तारोंसेंभी मिलता था!!

अब एक हवा का झोंका जो, महसूस किया मैने उसको
वो जानसे होके निकलता है, जो की सासोंमे पलता था!
                                                                       

                                                                    * विजयकुमार राउत

इनायत बहुत...

इनायत बहुत...



है मुझपे खुदा की इनायत बहुत !
जेबें हेै खाली और कागद बहुत !!

नही बाज आती है मजबुरीया
टपकती है हरसाल ये छत बहुत !!

कभी वो न आया मेरे रूबरू
लिखे है उसने मुझे खत बहुत

है कॉंच का वो टुटेगा जरूर
पैमाना दिल का उछल मत बहुत !!

नही हाथ आयेगा ये चॉंद अब
करते है बच्चे ये जिद बहुत !!

साबित हुवा मै बेकत्ल लेकिन
वकीलोने की है हिमाकत बहुत !!

तेरा हटके चलना,वो हसना,बहकना
तेरी रास आती है नजाकत बहुत !!

यहा हर निगाहो से बचके रहो
की तुम हो यहा, खुबसुरत बहुत !!

जिंदा रहा, जहर पिने के बावजुद
यहा हर चिजो मे है मिलावट बहुत

बेकारही मै इन झंझटो मे पडा
दिलसे मुझको शिकायत बहुत

विजयकुमार राउत

अफवाहों की बस्ती में....



अफवांहों की बस्ती मे, जाहिर तू जजबात न कर !!
मै हू समुंदर मुझसे तू, एैसी वैसी बात न कर !!

तुझसे मिलनेवालो की अब, नियत उतनी साफ नही
उनसे हाथ मिलाने को तू, इतने लंबे हाथ न कर !!

बेखौप है दिन का उजियाला,उतनाही गर्द अंधेरा है
लौटके जा तू घर अपने, और जियादा रात न कर !!

ैतो अकेलाही अक्‍सर, खुश हूं अपनी दुनिया मे..
मुझको चुरानेको, देकर धोका मात न कर !!

वह एक जमाना गुजरा है, कोई हारा था, कोई जिता गया !
ये खेल कभीका खत्म हुवा, फिरसे तू शुरूवात न कर !!
* विजयकुमार राउत

रूखी सुखीसी

गझल


रूखी सुखीसी दान मिली है, जैसे गरीबी थप्पड मे
जिनाभी दुश्‍वार हुवा है, महंगाई के चक्‍कर मे!!

कश्‍ती अपनी, दर्या उनका, कैसा यह बवंडर है ?
हाय! कमाई गोते खाये, आटा, दाल और शक्‍कर मे!!

मेरे घर मे क्‍या क्‍या होता, रहता है पैसो के लिये
मै उलझॉंसा रहता हूं, दिन रात हमेशा दप्तर मे!!

भुलूभी तो कैसे भुलू की कौन हू मै, और तू है क्‍या?
अपने आपही सामने आती, अपनी हकीकत अक्‍सर मे!!

दुनियादारीसे थककर मै, लोटता हू जब हारासा
खाकर खाना सो जाता हू, घर मे आकर बिस्तर मे !!

किसके पाव मे कॉटे है, किसके कदमो मे बिखरे फुल
औकात हमारी दिख जाती, है फटीपुरानी चप्पल मे

ठिक किया है मैने तुझसे, जब टाल दिया पंगा लेना
टिक न पाता मै बेचारा हाय ! तुम्हारी टक्‍कर मे !!

                                * विजयकुमार राउत

आशयाचा तुच स्वामी !

क्षरांशी ओळख झाल्यापासून शब्दांची प्रत्येक छटा अनोखी आणि चमत्कारीक वाटत आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, त्याप्रमाणे आम्हा कफ्‌ल्लकाजवळ शब्द आणि अक्षरांच्या धनाशिवाय दुसरे असते तरी काय? आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दच तर आपल्याला जागोजागी रूप पालटून वारंवार भेटत असतात. पण ते बहुरूपी नसतात बरे. अशा प्रामाणिक शब्दांतून विश्‍वास, प्रेम, ममता, मैत्री, आपुलकी व सांत्वना मिळत असते. बोबडया बोलांचे कौतुक वाटण्याइतके पालकत्व अंगी असावे लागते. शब्दच अंधारलेल्या रात्री आपल्याला साथ देत मदतीला धावून येतात. मग आपल्या मनातील भावनांना शब्दांचे अंकूर फुटून त्यांचे "कॅथार्सिस' होत असते. ही क्रिया घडली नाही तर सगळया सृष्टीलाच वेड लागेल. शब्दच नसतील तेव्हा सारे जग मुके होउन जाईल. ही स्मशानशांतता मनाला अस्वस्थेच्या खाईत लोटण्याइतकी भयंकर असेल. भावनांना वाट मिळाली नाही तर त्यांचे "बॉंब' होउन निष्पाप वस्तीवर कोसळतील व सगळे विश्‍व बेचिराख करून टाकतील. म्हणून शब्द हे आयुध असले तरी ते जपून वापरायचे असतात, याची जाण असणे आवश्‍यक असते. मौनात शब्दांना पुरून उरणारी ताकत असली तरी तीही एका मर्यादेपर्यंतच. हे निःशब्द मौन जर गैरसमजाचे वादळ निर्माण करीत असेल तर सगळा अनर्थच होउन जाईल. तसा शब्दांचाही गोंधळ झाला की त्याचे दूरगामी परिणाम होतच असतात. माणसाला गरजेच्यावेळी शब्दांची गरज पडणारच. मनातील भावनांचे विरेचन करायला शब्दांशिवाय दुसरे उत्तम साधन नाहीच. तसेंही आपण विश्‍वातल्या कुठल्याही गोष्टीला शब्दांच्या चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करीत असतो आणि तसे झाले तर समाधानही मानत असतो. परंतु सत्य हे पा-यासारखे हातून निसटूनच जाते, हे मात्र खरे. सत्याची एक तृतियांश बाजूच कधी कधी आपल्या हाती लागत असते. आपण तेव्हा सत्य गवसल्याचा विजयोत्सव साजरा करीत असतो.
शब्द जेव्हा चौखूर उधळायला लागतात तेव्हा सगळे विश्‍व कमी पडते. शब्द अर्थांची पर्वा न करता आपल्या धुंदीत जगत असतात. अशा शब्दांना कुणाच्या शिफारसींची गरज नसते. त्या शब्दांचे मग आपल्याला कोण अप्रुप वाटायला लागते. त्यांच्या ठिकाणी असलेले सामर्थ्य आपल्या अंगी यावे, म्हणून मग सुरू होतो शब्दांचा शोध. या जगात शब्दांची पुजा करणारे सच्चे शब्दयोगीही कधी कधी पुस्तकांतून भेटत असतात. ज्ञानेश्‍वरांच्या प्रतिभेचा मोगरा तेव्हा हळूवार बहरून येतो. ज्ञानेश्‍वरीतील नाजूक भाव, तुकारामांचा विद्रोह, कबिरांची सत्यवाणी, नामदेवांची भक्‍ती रूपी श्रद्‌धा यात ईश्‍वर दिसायला लागतो. मनाचा मोर शब्दांभोवती धुंद होउन पिंगा घालायला लागतो. जीवनातील अर्थ शोधण्यांचा प्रवास सुरू असतानाच माणूस होण्याची प्रक्रियाही निरंतर सुरू असते. शब्दांवरची धुळ बाजूला सारली की आतील नितळ, पारदर्शी अर्थाचा तळ हाती लागतो आणि मग स्वर्ग दोन बोटांवरच उरतो.
तसे पाहिले तर या प्रवासात अनेक धोके जाणवतात. अस्सल शब्दांचे मुखवटे धारण करून नकली शब्दांचे फवारे उडविणा-यांचेही मग दुनियेत पिक यायला लागते. "क्रियेविण वाचाळता, व्यर्थ' याप्रमाणे स्वतःचा उदोउदो करून घेणारे पायलीचे पन्नास भेटतात. स्वतःला शब्दांचा मसिहा समजणारे मग अर्थांचा अनर्थ करून शब्दांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असतात. असे शब्द मोठे घातक असतात. आम्हीच सृष्टीचे संचालक म्हणून आभास निर्माण करण्याचे षडयंत्र रचणारे असतात. काही शब्द आश्‍वासक होण्याचे नाटक करीत असतात. ते तर दर पाच वर्षांनी हमखास आपल्याला भेटून आश्‍वासनांची खैरात वाटत दारोदार फिरतात. असे शब्द बनावट असतात, नकली नोटांसारखे. म्हणून तितकेच ते कावेबाजही असतात. अशांपासून जपूण राहणेच उत्तम. शब्दांच्या कोरडया पावसावर तहानलेल्या कंठाची तृष्णा नसते शांत होत. नाहीतर आपण निरर्थक शब्दांच्या भूलथांपाना बळी पडून जागोजागी लुबाडले जाण्याचीच शक्‍यता अधिक. शब्दांशी लबाडी केली की ते जीवावरही उठतात. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी मग असंख्य शब्दांच्या कत्तली पाडल्या जातात. अशावेळी छिन्न विछिन्न झालेल्या मनाला प्रत्येक शब्दच खोटा वाटत असतो.
शब्द फार नटखट असतात. कधी कधी ते हातातून ऐनवेळी पा-यासारखे निसटूनही जातात. मग त्यांच्या मागे आपण पाठशिवनीचा खेळ खेळत त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करीत असतो. नेमक्‍या वेळी शब्द दगा देतात. आपणच आपल्यावर चिडतो. त्रागा करीत आगपाखड करतो. अशावेळी कोण्या एका जुनाट, पडक्‍या वाडयाखाली ग्रेसची भग्नता मनाच्या खोल गाभा-यात हमसून हमसून रडते आणि आपणही आतल्या आत धुमसत जातो निखा-यासारखे.
आपल्याला नाहीच होता आले कुणाच्या दुःखाचे वाटेकरी, तरी शब्दांनी कुणाच्या जखमेवर फुंकर घातली तर जन्म सार्थकी झाल्याचे समाधान असावे. शब्द मनाला उर्जा देणारे असावे किंवा अन्यायाविरूद्‌ध आग ओकणारेही. परंतु कधी कुसमाग्रजांच्या कवितेतील नायकाच्या "पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा' अशी स्फूर्ती देणारे शब्द केव्हाही आदरनीय. असे शब्दच माणसाला माणूसपण प्राप्त करून देणारे असतात. म्हणून ते प्रिय व पुजनीय असतात. कधीतरी एखादा शब्द भेटतो आणि आयुष्यच बदलून जाते. आयुष्याला अर्थ लाभतो. वरून नारळासारखे टणक वाटणारे शब्द आत मात्र खूप मउशार असतात. केवळ "ट'ला "ट' जोडून होत नसते शब्दांची इमारत उभी. आणि झालीच तर ती केव्हा कोसळून पडेल, याचाही नेम नसतो. तिथे लागते शब्दांची सच्चाई. हे खरेपण, ही प्रामाणिकता टाकीचे घाव सोसल्याशिवाय कशी बरी येईल?
पैसा कमविण्यासारखे शब्दही कमवावे लागतात. कारण तिच खरी कमाई असते. प्रत्येकाला होता येत नसते शेक्‍सपिअर, मदर टेरेसा किंवा महात्मा. म्हणून काय कुणी काही करूच नये? स्वतःला या शब्दांच्या परिघाबाहेरचा अर्थ मिळवून देण्याचा प्रयत्न करणे कधीही उत्तम. "ध' चा "मा' करून शब्दांना बदनाम करणा-यांचे मनसुबे उधळण्यातच माणूसकी दडलेली आहे. त्यासाठी जीवनाच्या झोतभट्‌टीत शब्दांना तावून सलाखून दोस्ती करण्याची खबरदारी घेणे केव्हाही चांगले. शब्दांचा पारिजात अंगणात फुलण्यासाठी त्याची जपणूक माळी होउनच करावी लागते. शब्दांची निःसंशय मनाने पुजा बांधली तर मग आपोआपच सुरू होतात त्यांच्याशी इमान राखण्याचे चिरंतन सोहळे. "आशयाचा तुच स्वामी, शब्दांवाही मी भिकारी' मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे, शब्दांचा आशय, जे परतत्व तुझ्यात दडलेले आहे, ते कळण्याइतकी बुद्‌धी आम्हाला लाभल्यास शब्दांना कल्हई देण्याची दुर्बुद्‌धी सुचणार नाही.

विजयकुमार राउत
साईनगर, हिंगणा मार्ग
8888403264

मंगलवार, 25 नवंबर 2014

अवतारवादातील मानवी उत्क्रांती

विजयकुमार राउत 


धर्म ही जीवन जगण्याची एक पद्‌धती किंवा आचारसंहिताच असते. जेव्हा पोलिस यंत्रणा, कायदेव्यवस्था नव्हती. तेव्हा माणसाला जगण्यासाठी कुठल्यातरी नितीनियमांची आवश्‍यकता होती. अन्यथा माणसाला नितीमान जीवन जगताच आले नसते. उलट नीतीशून्य जीवन कुणाच्याच हिताचे ठरले नसते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास प्रत्येक माणूस गुन्हेगारीकडे वळून त्याने कायदा व सुव्यवस्था धोक्‍यात आली असती. "जगा आणि जगू दया' हे सर्वमान्य तत्व या धारणेतूनच आपण स्वीकारलं. आज ज्याला आपण "माणुसकी' म्हणतो ती टिकून राहिलीच नसती. माणूस माणसाला कापत सुटला असता. मानवाला कालांतराने कुठल्यातरी संरक्षक व्यवस्थेची गरज भासू लागली. त्यालाच धर्माचे नाव देण्यात आले. माणसाची वर्तणूक कशी असावी याचं उत्तर धर्माच्या संकल्पनेत खोलवर रूजलेले दिसून येईल. आपण जगताना इतरांनाही जगू देण्याचं समान तत्व सगळयाच धर्मांनी सांगीतलं आणि पाळलं. धर्म अगोदर की माणूस, याचं उत्तर माणूसच आहे. धर्म माणसाला कसं जगावं, हे शिकवितो. माणसाला जगताना जे जे आवश्‍यक आणि आश्‍वासक आहे, त्या त्या गोष्टी शिकविण्याचं काम धर्मच करतो. धर्म हा लिखित- अलिखित असा कायदाच असतो. माणूस या भूतलावर एक जीव म्हणून आला आणि हळूहळू उत्क्रांत होत गेला. प्रारंभिक अवस्थेत त्याचे काही कायदेकानून नसतील. तो कधीकाळी आदिमानवाच्याच रूपात होता. त्याच्या जगण्यावर नियंत्रण असणारी कुठली यंत्रणाही त्यावेळी उपलब्ध नसावी. कालांतराने त्याला जगण्याचा मार्ग सापडत गेला. अनुभवातून अर्जित कलेलं ज्ञान आपल्या दुस-या पिढीकडे सोपविताना माणसानं अनेक शतकांपर्यंत मौखिकपद्‌धतीचा वापर केला असावा. हे काम त्या कळपातील बुर्जूगांनी केलं. जगण्याचा सुलभ मार्ग एका प्रदीर्घ प्रवासानंतर विस्तारीत गेला. भौगोलिक परिस्थितीनुसार मग एकेक धर्म स्थापन झाले. कितीही म्हटलं तरी सगळे धर्म समान तत्वांचीच शिकवण देतात. त्यांच्यातील सुत्र समान आहे हे सांगायला आज कोण्या धर्मपंडिताची गरज नाही. माणूस हाच धर्माच्या केंद्रस्थानी होता आणि भविष्यातही राहणार. त्यातील सकारात्मक भाग लक्षात घेतला तर परंपरेने मौखिक ज्ञानातील गैरसमजही थोडेफार कारणीभूत असतील. पूर्वीच्या काळी ज्ञान मौखिक पद्‌धतीेने प्रक्षेपित होत असल्यामुळे त्यात अडचणी आणि प्रदुषित विचार घुसडणे स्वाभाविक होते. त्यामुळेच नवनवीन धर्मांची गरज मानवाला वाटू लागली. मूळ तत्वांची गफलत होत गेल्यामुळे नवनवीन पंथ जन्माला येत गेले..
आजची स्थिती मात्र वेगळी आहे. वेगवेगळे धर्म एका राजकीय पक्षातून दुसरा पक्ष निर्माण व्हावा, तसे तयार होत असल्यामुळे आजच्या काळात एकमेकांविषयी बंधूभाव, सलोखा निर्माण होण्याऐवजी माणसामाणसात दरी निर्माण करण्याचे काम धर्म आणि पंथ करीत असतात. मानवासाठी धर्म की धर्मासाठी मनूष्य? इथपर्यंत हा वाद विकोपाला गेला आहे. जगात धार्मिक उन्मादाने सर्वात जास्त बळी घेतले आहेत. धर्मांनी जितके संरक्षणाचे काम केले, त्याहीपेक्षा अधिक संहारक शस्त्राप्रमाणे विध्वंसाचे कामही केले, हे स्पष्ट आहे. मुळात माणसाने धर्म आणि त्याचे स्वरूपच समजून घेतले नाही, असा त्याचा अर्थ होतो.
धर्माकडून जे आपण निमूटपणे स्वीकारतो तीच नंतर प्रथा, रिवाज होउन मानगुटीवर कायम बसलेली दिसते. अवतारवाद ही संकल्पनाही आपण तशीच एका पिढीकडून दुस-या पिढीकडे अनेक पदरच्या बाबी घालून हस्तांरीत केली असावी. त्यामुळे धर्माचा मुळ प्रवाह इतका प्रदुषित झाला की गंगेला अनेक गटारे मिळून तिचं पावित्र संपुष्टात यावं, तसं प्रत्येक चांगल्या गोष्टीचं झालं. कोणीतरी येउन आपली या दुःखमय जीवनातून सुटका करेल, असा भोळा आशावाद आपण स्वीकारल्यानंतर निमूटपणे वाट पाहात बसणेच आपल्या हाती उरते. अवतारवादाच्या खोल मुळाशी गेल्यास असं दिसून येईल की अवतारवाद म्हणजे एखादया परमेश्‍वरी आत्म्याचे पूननिर्माण. एका जन्मीचे कार्य आटोपल्यानंतर एखादा महान आत्मा दुस-या रूपात पुन्हा मानव जातीच्या उत्थानाकरीता अवतार घेत असतो, असे आपण मानतो. अवतारवाद आपण जशाच्या तसा स्वीकारला तर प्रत्येक मनूष्य हा आपपल्या परिने अवतार असू शकतो. पण अवतार सर्वसामान्य माणसाचा मानल्या जात नाही. अवतारवादाच्या तळाशी भावना असते पूनर्जन्माची. प्रत्येक पार्थिव शरिराला मृत्यू अटळ आहे, हे सत्य आहे. परंतु आत्म्याला कुठलीच वस्तू मारू शकत नाही. कुठलीच गोष्ट स्पर्शू शकत नाही, असं जर आपण मानलं तर प्रत्येक माणसाचा पूनर्जन्म होतो, असं धर्मच म्हणतो. परंतु पूनर्जन्म मानण्याच्या प्रत्येक धर्मात वेगवेगळया पद्‌धती आहेत. चौ-यांशी लक्ष योनी भोगल्यानंतर मनूष्य जन्म मिळतो, या विधानाचा अर्थ असा की मनूष्य जन्म दुर्लभ असा आहे. पुन्हा हा जन्म मिळणार नाही, तेव्हा नितीमान जीवन जगा, तेव्हाच तुम्हाला मानवाचा पूनर्जन्म मिळेल, असे आश्‍वासन धर्म देतो. त्यासाठी एका अदृश्‍य शक्‍तीचा धाकही दाखवितो.
नितीची तत्वे स्वीकारल्यानंतर मानवाच्या अगदी आरंभीच्या काळात त्याला जगता जगता हळूहळू जगा आणि जगू दया यामागचं मर्म कळत गेलं आणि एकेका नवीन तत्वाचा जन्म होत गेला . तेच त्याच्या जगण्याचे कायदे होत गेले. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असताना त्याला एका वेगळया शक्‍तीची गरज भासू लागली. त्याला निसर्गातील प्रत्येक गोष्टीत देव दिसू लागला.
आजही आपण गंभीरपणे विचार केला तर असे दिसून येते की अवतारवाद हा खरोखर असतो का? त्याचा हेतू काय असावा? या प्रश्‍नांचे उत्तर, माणूस म्हणून जगण्यासाठी केलेली तडजोड असा तर नव्हे? मला कोणीतरी या खाईतून काढून नेईल आणि अखिल मानवजातीचा उद्‌धार करणारा कोणीतरी नक्‍कीच येणार, अशी समजूत जीवनाच्या खोल तळाशी घट्‌ट बिलगून असते.
डार्विनचा मानवाचा उत्क्रांतीवाद आपण स्वीकारला तर माकडापासूनच मानवाची निर्मीती झाली, असे डार्वीन मानतो.. परंतु हे माकड या पृथ्वीतलावर शेवटी आले कुठून, हा प्रश्‍न अनुत्तरीतच राहतो. डार्विनचा सिद्‌धांत एका ठळक अशा टप्प्यापासून सुरू होतो. परंतु अधिक खोलात गेल्यास पृथ्वीवर जीव कसा निर्माण झाला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न धर्माने अर्थात विज्ञानाने अगोदरच केलेला आहे. विज्ञानाची या गोष्टीला जोड दिल्यास त्यातील तथ्य समजण्यास थोडीफार मदत होईल. तसा दावा मात्र करता येणार नाही. या लेखाचा उद्‌देशही तसा नाही.

हिंदू धर्मातील अवतारवादालाही गहन असा अर्थ आहे. या धर्माने सर्वात प्रथम अवतार मत्स्य याला मानले. आता विज्ञानातून ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या विश्‍वात कुठला जीव जन्माला येण्यापूर्वी पृथ्वीवर चूहूबाजूने केवळ पाणी आणि पाणीच होते. मनूष्य नावाचा प्राणी मग आला कोठून? जीवाची पृथ्वीवरील निर्मीती ही अमिबा नावाच्या एकपेशीय प्राण्यापासून झाली, असं विज्ञान म्हणतं. परंतु धर्म म्हणतो की पमेश्‍वराचा पहिला अवतार हा मत्स्य आहे. ढोबळमानाने या अवतारवादाच्या मागचं रहस्य समजून घेतल्यास विज्ञान व धर्मातील अवतारवाद याच्यातील संबंध समजणे सोपे होईल. अमिबा हा एकपेशीय प्राणी असून तो पाण्यात राहतो. मासा हासुद्‌धा पाण्यातच राहतो. म्हणजे जीवाची निर्मीती पाण्यातूनच झाली असावी, असा त्याचा अर्थ निघतो. त्यानंतर दुसरा अवतार कच्छ. या अवतारात जीव हा थोडा जमिीवर राहण्याइतपत उत्क्रांत होउन पाण्याबाहेर यायला लागला. वेळेप्रसंगी तो पाणी आणि जमिन यावर राहून आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानंतरचा वराह हा उत्क्रांतीवादातील तिसरा टप्पा आहे, असे समजण्यास मदत होईल. वराह हा निव्वळ जमिनीवरील अवतार आहे. यामागच्या भाकडकथा थोडया बाजूला ठेवून विचार करायला पाहिजे. भाकडकथा एकतर बोधप्रद असतात किंवा त्या जाणिवपूवर्क घुसडलेल्या असतात. मुद्‌दा स्पष्ट होण्यासाठी क्षणभर विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार करू या. तसा विचार केला तर उत्क्रांतीवादातील एकेक टप्पे उलगडत जातील.
यापुढचा अवतार नृसिंहाचा. नर अधिक हिंस्त्र श्‍वापद. म्हणजे मानव म्हणण्याइतका माणूस उत्क्रांत झाला नव्हता, हे यातून स्पष्ट होतें. मानवाच्या उत्क्रांतीचा प्रवास हा दीर्घकालीन आहे. मात्र त्यानंतर झालेला पशूराम हा आदिमानाच्या ब-याच पुढचा टप्पा असावा. तिथपर्यंत विविध शस्त्रांचा माणसाने शोध लावला होता. चित्रात परशूराम खांदयावर परस म्हणजे कु-हाड घेउन दाखविलेला आहे. म्हणजे त्याकाळात शस्त्राचा वापर होत असावा. शस्त्रांच्या माध्यमातून त्यानं शिकार आणि शत्रूवर विजय मिळविण्यास प्रारंभ केला असावा, असं समजायला काहीही हरकत नाही. त्यानंतर कित्येक युगे लोटलीत. माणसाचा शारिरीक, बौद्‌धीक उत्क्रांतीचा प्रवास असाच अविरत सुरू होता.
तसं पाहिलं तर माणूस सुरवातीपासूनच समाजप्रिय प्राणी आहे. त्याच्या गरजेसाठी त्याने समाजाची निर्मीती केली. पूर्वी आदिमानवाच्या टोळया असल्याचे दाखले इतिहासाच्या पानोपानी सापडतात. त्या टोळयांचे रूपांतर समाज किंवा राज्यात होत गेले. वामन आणि बळीराजाच्या कथेतून शेतीचे प्रतिबिंब अधोरेखित होते. या अवतारात मानवानं शेती करून अन्न मिळविण्याची कला अवगत केली होती. कृषी संस्कृती भरभराटीला आली असावी, असाही एक तर्क निघू शकतो.
भगवान प्रभूरामचंद्रापर्यंतचा प्रवास एका सर्वगुणसंपन्न मानवापर्यंतचा महत्वाचा टप्पा आहे, असंही मानता येईल. एक पत्नी, एकवचनी अशी बिरूदावली आपण प्रभूरामचंद्राच्या नावामागे लावतो. परंतु प्रभू रामचंद्रापर्यंत दिलेला शब्द पाळणे, एकच पत्नीला स्वामीनी मानने आणि मर्यादांचे पालन करणे या बाबी रामायणकाळापूर्वी झालेल्या नसाव्यात किेंवा किंचित अशा अस्पष्ट स्वरूपात असाव्यात. मानवाचा प्रवास तेव्हा कुठे एका सुसंस्कृत समाजापर्यंत येउन ठेपला होता. परंतु जाणिवा अनेक अंगानं प्रगल्भ व्हायला अजूनतरी थोडा वेळ होता. युद्‌धाला त्यानं नितीची जोड दिलेली नसावी. अवतारवादात त्या त्या काळचं प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. त्या काळची संस्कृती, रितीरिवाज, समाज या गोष्टी अवतारवादात दिसून येतात. स्त्री ही पुरूषाची एक सावली आहे, दासी आहे, असेच त्यावेळच्या स्त्रीचे रूप असावे. अनेक अंगांनी ते तपासताही येईल. परंतु त्यानंतरचा भगवान श्रीकृष्णाचा अवतार मात्र हा मात्र अनेक अंगांनी सर्वांना प्रेरणादायी ठरला हेच त्यामांगचं कारण असावं. श्रीकृष्णावतार हा प्रगल्भ जाणिवेचा उत्कट अविष्कारच मानावा लागेल. कारण श्रीकृष्णावतारात सगळं काही सांगीतलं आहे. म्हणून श्रीकृष्ण अवतार परिपूर्ण आहे, असं मानल्या जातं. श्रीकृष्णानं राजनिती, युद्‌धनिती, व्यवहारनिती, अर्थशास्त्र, नितीशास्त्र ही सगळी शास्त्रे सांगीतली. रामायणापेक्षा श्रीकृष्णाचा अवतार हा प्रत्येक बाबतीत सरस आणि उजवा ठरतो, तो यामुळेच.
भगवान बुद्‌धांनी मात्र त्याहीपलिकडे जाउन मानवातील ईश्‍वराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. बुद्‌ध विज्ञानयुगाचा प्रतिनिधी म्हणून श्रेष्ठ वाटतो. बुद्‌धाने मात्र स्वःला परमेश्‍वर न मानता त्याने अखिल मानवजातीला "अत्‌ भव दिप' असा संदेश देत स्वतःच स्वतःचा मुक्‍तीदाता होण्याचा मार्ग सांगीतला. म्हणून बुद्‌धाची विचारसरणी अख्ख्या जगात मानली जाते. आजचं युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. म्हणजे बुद्‌ध आजच्या युगाचा प्रतिनिधी असणे हे स्वाभाविक आहे..
अवतारवादा मागचं गुपित समजून घेण्याचा हा ओझरता प्रयत्न जरी असला तरी त्यात थोडातरी तथ्यांश असावा. मराठी काव्यविश्‍वाबद्‌दल बोलताना आपण पहिले केशवसुत, दुसरे केशवसुत मर्ढेकर आणि तिसरे केशवसुत नारायण सुर्वे यांना मानतो. त्यातून आपण काव्याच्या कालखंडाची विभागणी करतो. केशवसुतांनी तिनदा अवतार घेतला असे म्हणणे हास्यास्पद होईल. त्यामागची कवितेच्या एका वेगवेगळया युगांची संकल्पना स्पष्ट होते. त्याचप्रमाणे अवतारवादाचे आहे. एका विशिष्ट वेळी कोणीतरी अखिल मानवजातीच्या उत्थानाकरीता उभं राहण्याचं बळ निर्माण करतो आणि एकंदर परिस्थिती बदलून टाकतो. वैचारिक ,सामाजिक अथवा सांस्कृतिकदृष्टया ती उत्क्रांतीच ठरत असते. असामान्य अशा पुरूषांनाच अवतार मानल्या जातं. मानव आता शरिरीक पातळीवर अधिक उत्क्रांत होणे कदाचित शक्‍य नाही. परंतु विचाराच्या किंवा आदर्शाच्या बाबतीत घडवून आणलेली उत्क्रांती ही नवीन अवतारास जन्मास घालते, हेही तितकंच खरं.


विजयकुमार राउत 
साई नगर, ट्रॅक्‍टरकंपनी चौक 
हिंगणा रोड नागपूर.16

आई

कांदा भाकर, तेल-मीठ अन्‌, अंबाडीची, भाजी आई
खस्ता खाउन, संसारातील, दुःख झेलते, माझी आई!!

कधी शौर्यांची, कथा सांगते, प्रेमाचेही, धडे शिकविते
संस्कारातून, मला घडविण्या, होते ही शिवबाची आई!!

मायेच्या ममतेला आणिक, हवा कशाला, अता पुरावा?
प्राण द्यावया, तयार होते, हसीखुशीने राजी आई!!

जीवनास या, सुंदर केले, पंढरपूर मग, हवे कशाला?
विठ्‌ठल रखुमाईची जोडी, घरात शोभे, दाजी-आई!!

तिला न ठाउक, नटणे, थटणे, पदरालाही हजार गाठी
पिलांस आम्हा, सुखी पाहुनी, ढेकर देते, साधी आई!!

अशी नात्यांची, गुंफण आई, जशी वेलीवरती, हिरवाई
कधी कुणाची, सासू आई, कधी कुणाची, आजी आई!!

दरवर्षीचा, प्रकोप सारा, झडून जातो, बहर पिकाचा
संकटातही, ताठ रहाते, जशी पऱ्हाटी, ताजी आई!!

टाटा बिर्ला, असो कुणी ना, तिच्यावाचुनी, असे भिकारी
म्हणून असते, पुजनीय ती, देवांच्याही आधी आई!!


* विजयकुमार राऊत 
साईनगर हिंगणा रोड नागपूर440016 

तुकोबा!

मंबाजींचा मठोमठी, उद्‌धार, तुकोबा!
असा कसा हा भक्‍तीचा, व्यापार, तुकोबा!

फाटकाच तू, तुला न कोठे, बंगला-गाडी
प्रत्येकाचा दर्जा "फाईव्ह-स्टार' तुकोबा !

कासेची लंगोट सोडूनी नग्न जाहले-
त्यांच्या पृष्ठावर तू सोटा मार, तुकोबा !

साधू कोठे? ते तर संधीसाधू मोठे-
सभोवताली महिलांचा दरबार, तुकोबा!

"त्या' कुणब्याने अखेरचा गळफास लावला
या चोरांच्या गळा, हिऱ्यांचा हार, तुकोबा!

बरेच झाले असते, जर तू धंदा केला
व्यर्थचि लिहिले अभंग, तूही फार, तुकोबा!

असा कसा रे तुझा विठू भोळाच राहिला
बडव्यांनी मांडला इथे, बाजार, तुकोबा!


* विजयकुमार राऊत 
साईनगर, हिंगणा रोड नागपूर 
888876462 

मच्छरायण

मच्छर बहूत झाले, थोडे जपून झोपा
रक्‍तास चाखण्याचा, द्या की खुशाल मोका !!

गातात ते गझलही, कानी सुरेल ऐसी
शेरांस दाद द्याया, टाळया जरूर ठोका !!

गल्ली असो कि दिल्ली, त्यांची मिरासदारी
देतात ते प्रसंगी, जनतेस मात्र धोका !!

कार्यालयात तेची, मद्यालयात तेची...
ते शोषणास रस्ता, धुंडाळतात सोपा !!

डेंग्यू, मलेरियाचा, हैदोस फार झाला
"फॉगिंग' मारण्याचा, द्या रे कुणास ठेका !!

बहुसंख्य मच्छरांनी, ऐसी कमाल केली
त्यांच्याच विद्यमाने, या मैफिलीत शोभा !!

मस्त यौवनाच्या, कायेस डंख मारा
बदमाश मच्छरांनो, हड्‌डीस मस्त चोखा !!

भक्‍तीमधून पाजू गा, मोक्ष मद्यरात्री..
सत्संग मच्छरांचा, फळण्यास नित्य भोगा !!

स्वादिष्ट रक्‍त चाखा, तुम्हास मेजवानी
खादाड शिष्य त्यांचे, करतात पहा योगा !!

सरकार मच्छरांचे, सरदार मच्छरांचे...
अवतार मच्छरांचे, रोखा जरूर रोखा !! 
                                                  विजयकुमार राउत 
......................................... 

किती दाखले

किती पुरावे, किती दाखले !
ज्याचे त्याचे, हात माखले!

कधी वर्षतील मेघ नभाचे
दुःखाने काळीज व्यापले

भिस्त उदयाची ज्या फांदयांवर
कसे अवेळी झाड छाटले!!

दुष्काळातील महिने तेरा.
नियतीने पदरात टाकले

पोशिंदा उघडाच राहिला
अंग तयाचे कुणी झाकले!

वसुलीसाठी लिलाव झाला!
अबृला मग कुठे राखले?

ओंजळ माझी रिक्‍त राहिली
ज्याने त्याने श्रेय लाटले

अवमानाचे जहर प्राशिता
कुणी म्हणे, मदिरेस चाखले

कुणास मागावे हक्‍काचे?
कुणीच नाही जिथे आपले
 

विजयकुमार राऊत 
साईनगर, हिंगणा रोड 
नागपूर16 
............................................................... 

आप' की अदालत


स्थळ : "आम‘चे..."आप‘ले कामचलावू न्यायालय.

प्रसंग : आणीबाणीचा आणि राष्ट्रपती शासनाच्या पूर्वीचा... निर्णायक घडीचा... बहुमतासाठी जनतेच्या दरबारात जाण्याचा.

काळ : विरोधी पक्षाकडून कोंडीत पकडून तमाशा पाहत बसण्याचा.


न्यायाधीश : ऑर्डर... ऑर्डर...

वकील : मी लॉर्ड, मैं आपके सामने उस शक्‍स को पेश करना चाहूंगा, जिसने दिल्ली में सबकी निंद उडाके रख दी हैं. मी अरविंद के.जरीवाल यांना बोलावतो...



बेलीफ : अरविंद के.जरीवाल हाजिर हो...

अरविंद : (कठड्यात येऊन उभे राहतात. हृदयावर हात ठेवत) मैं अपने "आप‘के दिल पर हाथ रखके कहता हूं की मैं जो कुछ कहूंगा... सच कहूंगा.. सच के शिवा कुछ ना कहूंगा.


न्यायाधीश : "आप‘पे यह इल्जाम हैं की..."आप‘ण जनतेची मते घेऊन निवडणूक जिंकलात... आणि आता मात्र "आप‘ली मनमानी करून परत एकदा जनतेच्या न्यायालयात येण्यासाठी "एसएमएस‘चा फंडा काढताहात? ये अच्छा हैं क्‍या? ये "रिऍलिटी शो‘ हैं क्‍या?


अरविंद ः मी लॉर्ड, मी जनतेचा खऱ्या अर्थाने सेवक आहे. राजकारण्यांनी मला "डेंग्यूचा डास‘ म्हटलं तरी चालेल. दिल्लीतील कचरा साफ करण्यासाठी हातात झाडू घेतला खरा... लेकिन पुरा "बहु‘मत न मिलने से मेराच पका हुआ "आम‘ हो गया. मी लॉर्ड, जनता ने हमे बडे धर्मसंकट में डाल दिया... ना खुदा भी मिला, ना विसाले सनम... ना इधर के रहे, ना उधर के रहे...

वकील ः मी लॉर्ड, अब इनकी नियत मे खोंट आ गई हैं...

न्यायाधीश ः वो कैसे?


वकील ः इनकी जीत क्‍या हुई, यह अपने "आप‘को दिल्ली के आखरी बादशहा समझने लगे हैं... कहते हैं की मैं ही "शीला‘जित हूं.

न्यायाधीश ः (मिश्‍कीलपणे हसत) डाबर का या बैद्यनाथ का?

(सगळे हसतात. न्यायाधीश टेबलवर हातोडी ठोकतात.)

न्यायाधीश ः ऑर्डर... ऑर्डर...

वकील ः मी लॉर्ड, इनके दलिले झुठ साबित हो सकती हैं. मै उस गवाह को अदालत के सामने पेश करना चाहता ह्‌ूं... जो कभी उनके गॉडफादर थे. उनके इनसे मतभेद हुए तबसे इन्होने मुंह मोड लिया. एक जमाने में इनके इशारे परही वे चला करते थे...

न्यायाधीश ः अण्णा नगारे को पेश किया जाए...

चपराशी ः अण्णा नगारे हाजीर हो ।।

अण्णा ः मय लोकपाल की शपथ लेता हूं... यादवबाबा की भी लेता हूं.. वंदे मातरम्‌... मय जो कुछ कहूंगा... सच ही कहूंगा.. सच के शिवा कुछ भी नही कहूंगा....और मय सचके लिये राळेगणसिद्धी तो क्‍या, जंतरमंतर के सामने भी आमरण उपोषण पे भी बैठने की लिए तयार हूं... अब बुढापे में करू भी तो क्‍या? मेरा कोई घर, ना दार... उतनाच मेरा टाइमपास...

न्यायाधीश ः आता काहीही गरज नाही आंदोलनाची वगैरे... लोकपाल मंजूर झालेय... आपके आंदोलन की ही फलश्रुती हैं यह... अरविंद के बारे में क्‍या खयाल है "आप‘के?

अण्णा ः ये अरविंद हैं ना, एक दिन मुख्यमंत्री बनेगा...

वकील ः (आश्‍चर्याने) एक दिन का मुख्यमंत्री?

अण्णा ः उनका रस्ता वेगळा हैं और मेरा अल्लग हैं... त्या दिवशी त्याचा सहकारी गोपाल माझ्या उपोषण मंडपात आला आणि तावातावात बोलून गेला... मी राजकीय व्यक्‍तीला व्यासपीठावर येऊ देण्यास मनाई केली होती. तर त्या "सिंगजी‘वरच बरसला. यांना काय सगळ्यांना शिंगावरच घ्यावंसं वाटतं का? हाकलून लावलं त्याला गावातून...

कपिल ः (प्रेक्षकांतून) यह तो "मूंह में राम बगल मे आसाराम‘ एैसी कहावत हो गयी भैया...

न्यायाधीश ः ऑर्डर ... ऑर्डर...


वकील ः अण्णाजी, तुम्ही राजकीय पक्ष काढून निवडणूक लढविण्याच्या विरोधात आहात... अरविंद राजकीय पक्ष काढून घाण साफ करू इच्छितो. मग कोण योग्य आणि कोण अयोग्य?

अण्णा ः ये चुनके आनेवाले जनता के विश्‍वास के पात्र नही हैं... इनकी जगह तो जेल में ही होनी चाहिए... और लोकपाल आने के बाद सब के सब जेल में दिखाई देंगे...

लालू ः (जनतेतून उभे होत.) हम भी तो यही कहते न्यायाधीश साहब... की सबने अपने जीवन में एक दिन जेल में जाना बहुत जरुरी हैं... जेल गये बगैर किसी की तरक्‍की नही होती. भगवान कृष्ण की जन्मभूमी हैं जेल... जय बोलो भगवान कृष्ण की....

(सगळे "जय‘ म्हणतात.)

न्यायाधीश ः (लाकडी हातोडीने टेबल ठोकत) खाली बसा... खाली बसा... तुमची वेळ यायची आहे अजून... तुम्हाला नंतर बघतो...

अण्णा ः "यादवबाबा‘ माझे दैवत आहे... त्यांच्याच आशीर्वादाने "लोकपाल‘ बिल मंजूर झालं. जय यादवबाबा की...

अरविंद ः लोकपाल के नाम से पूरा का पूरा "जोक‘पाल हो गया हैं यह...

कपिल ः (गर्दीतून) हे म्हणजे आसाराम यांनी ब्रह्मचर्यावर प्रवचन देण्यासारखंच आहे भैया...

न्यायाधीश ः यहा कोई प्रवचन न दे... यह अदालत हैं...

वकील ः तो अदालत से मैं दरख्वास्त करूंगा की फैसला सुना दे... मी लॉर्ड... इनका क्‍या किया जाय?

न्यायाधीश ः तमाम गवाहो और दलिलो के मुताबिक यह अदालत इस नतिजे पर पहुंची है की, इनको ताजे रात दंड दफा 420 के मुताबिक एक दुसरे पर खुल्लम खुल्ला आरोप करने के लिये छोड दिया जाता हैं...

तुम्हीच आहात तुमचे ईश्‍वर !

विजयकुमार राउत 

देव कोणीच पाहिला नाही. तरीही तो आहे किंवा नाही, या वादात आपण अशी कितीतरी वर्षे खर्ची घातलेली आहेत. आणि अगदी जगाच्या अंतापर्यंत तरी हा प्रश्‍न सुटेल, अशी सुतराम शक्‍यता नाही. उलट शिक्षणाचा प्रचार, प्रसार वाढला आणि माणसे सुशिक्षित किंवा उच्च विद्याविभूषित म्हणून मिरवायला लागलीत, तरी देवाचा वाद संपला नाही आणि नादही संपला नाही. पुरोगमी विचारसरणीचे सुप्रसिद्‌ध चरित्र अभिनेते श्रीराम लागू हे जर्मन तत्वज्ञ फेड्रीक नित्शेचेच वाक्‍य घेउन "देवाला आता देवघरातून रिटायर्डच केले पाहिजे', असे बिनधास्त म्हणतात. अनेक वर्षे आपल्या देवघरात असलेल्या परमेश्‍वराने आपले कुठलेच भले केले नाही. तरीही तो गेल्या अठ्‌ठाविस युगांपासून जागा अडवून बसला आहे. समाजात अनेक स्थित्यंतरे आलीत ..सुधारणांचे वारे वाहू लागलेत. माणूस विचार करू लागला. प्रत्येक गोष्टीमागचे कार्य-कारण भाव शोधून काढणे त्याच्या मेंदूला शक्‍य झाले आहे. माणसांनी नवीन विचार जन्माला घातले आहेत. अनेक नवीन शोध लावून सुखसमृद्‌धीचे जग निर्माण केले. तरीही माणूस हा "देव' या संकल्पनेला "फेविकॉल'च्या मजबूत जोडासारखा चिकटून बसला आहे. दिवसेंदिवस देवा धर्माचा वाद मारूतीच्या शेपटाप्रमाणे वाढतच आहे. जगात देव धर्माच्या नावावर मोठया प्रमाणात कत्तली, दंगली होत आहेत आणि होत राहतील. वर्ण व जातीय वादातून पाच हजार वर्षात तीन हजार युद्‌धे लढल्या गेलीत, असा जागतिक इतिहास सांगतो. परंतु शांतीचा मार्ग अंगीकरणेच कुणाला जमले नाही. आतापर्यंत कुठल्याच धर्माने दुस-या धर्मातील माणसाशी वैर धरावे, असे कुठेच सांगीतले नाही.
देवधर्माच्या नावाने निर्माण होणारी भांडणे कधीच शब्दांच्या बुडबुडयांतून बाहेर पडणार नाहीत का? "मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना' असे म्हणून आपण एकमेकांशी नाते जोडणार आहोत की नाही ? एकमेकांच्या मनातील दरी अधिकाधिक विस्तारीत असताना रूंदी कमी करण्याचे काम करणार आहोत की नाही ? या ग्लोबलायझेशनच्या काळात किती काळ आपण कुपमंडूक वृत्तीने जगून स्वतःची भलावण करणार आहोत? धर्माचं मूळ स्वरूप स्वच्छ आहे. नितळ, स्वच्छ पाण्यासारखं आहे. जीवनाला पुरक आहे. ते समजून घेण्याचा कधीतरी प्रयत्न होईल का? आहे ते इतके सोपे आणि सुलभ आहे. त्यात कुणाच्याही मध्यस्थीची मुळीच गरजही नाही. त्यामागची भावना समजून घेणे मुळीच कठीण काम नाही. आतापर्यंत अनेक महापुरूष आणि विचारवंतांनी या भूतलावर जन्म घेतला. त्यांनी दिलेले विचारधन आपल्याजवळ आहे. देवाचे, परमपित्याचे स्वरून समजून, जाणून घेण्याकरीता त्यांनी सोप्यात सोपे मार्ग सांगीतले आहेत. पण कोणीच समजून घेण्याच्या भानगडीत पडत नाही, हेच खरे आश्‍चर्य आहे. ग्रंथांच्या पानावर चढलेली काळाची धुळ बाजूला सारल्यास त्या खाली असलेले नितळ सत्य समजने सोपे होईल.
सर्वप्रथम "देव' ही संकल्पना कशी निर्माण झाली, ते पाहणे रंजक ठरेल. समाजशास्त्रीयदृष्टया देवाचा जन्म हा मानवाच्या आदिम काळात भितीच्या वा उपयोगीतेच्या पोटी झाला. आदिम काळातील मानव हा जंगलात निराधार, निराश्रीतच होता. दैनंदिन जीवन जगत असताना त्याच्या अवतीभवती घडणा-या भयंकर आणि अनियंत्रीत घटनांतून त्याला आपल्यापेक्षा प्रचंड मोठी शक्‍ती आकाशात कुठेतरी अस्तित्वात आहे, याचे भान झाले. उदाहरणार्थ पाउस, वादळवारा, साप किंवा हिंस्त्र प्राण्यांची भिती त्याला वाटू लागली. दिवसरात्र कोसळणारा पाउस, अचानक येणारी वादळे, अंगावर हल्ला करणारे हिंस्त्र प्राणी यातून त्याच्या मनात एक भिती तयार झाली. जी शक्‍ती आपल्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे, अवाढव्य आहे, तिच आपला बचावही करू शकते. अशा शक्‍तीसमोर नतमस्तक होणे, हे मानवी स्वभावाप्रमाणे आलेच.
हिंदू धर्मातील वेद, उपनिषदात "देवा'चा उल्लेख अशा उपयोगीतेतूनच करण्यात आला आहे. कार्यकारण- भाव समजला नाही की मनुष्यप्राणी देव किंवा चमत्कार मानून मोकळा होतो. वेद व उपनिषदातील अर्थ समजून घेण्याचा ठेका दुस-या कुणाकडे असल्यामुळे तो इतरांनी समजून घेउ नये, यासाठी समाजात काही प्रस्थापित वर्गाने व्यवस्था निर्माण केली. त्या व्यवस्थेच्या नितीनियमांमुळे त्याला कधीही न संपणारी गुलामी बहाल झाली. दररोज उगवणारा सूर्य , त्याची उपयोगीता , चंद्र-सूर्याला लागलेले ग्रहण, ग्रहता-यांची स्थिती यातून मनुष्यासमोर आपली मर्यादी अधोरिेखत झाली.
आजच्या काळातही आपण बैलाला देव माणून पोळा सण साजरा करतोच की ! अगदी अलीकडच्या काळातील संगणकाचीही पूजा करण्यात आपल्याला कुठलीच कमीपणा वाटत नाही. मनुष्य समाजशिल प्राणी म्हणून अस्तित्वात आल्यानंतर सण, उत्सव निर्माण झाले, आपण निसर्गातील पशू, पदार्थ याच्यापासून उपयोगीता शिकलो. जे जे उपयोगी येत असेल , ते ते देव असा समज निर्माण झाला. अशाप्रकारे मनुष्य "देव' मानण्याला नकळत तयार झाला. यासाठी त्याला फारसे कष्ट घेण्याची गरज पडली नाही. भिती आणि त्यातून सुटका करण्यासाठी धडपडणे हा माणसाचा स्वभावच आहे. सर्वत्र देवाला शोधताना माणसाची पूरती दमछाम झाली. तेहतीस कोटी देवांची पूजा करून पुन्हा त्यांची अपत्ते नव्याने तयार करण्यात आम्ही धन्यता मानली आहे. शिवाय मंदिेरे, जंगल द-यात शोधता शोधता त्याने आकाशातही देवाचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला. तिच त्याची तिर्थस्थळे झालीत. या सर्व परिस्थितीत माणूस मात्र स्वतःपासून दूर दूरच होत गेला. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचे झाले तर तो पुरता "बाहेरख्याली' झाला. आणि तो युगायुगांपासून नुसता बाहेर भटकतच राहिला.
या संदर्भात एक सुंदर उर्दू शब्द आठवतो. ज्याने कोणी "खुद' हा शब्द निर्माण केला, त्याच्या कल्पनाशक्‍तीला दाद द्यावी तेवढी कमीच वाटते. खुद म्हणजे मी.. स्वतः .... आणि खुदा म्हणजे देव,, परमेश्‍वर. परमात्मा जे काही म्हणत असाल ते. 'खुद' पासून "खुदा' शब्द आला असावा. खुद आणि खुदात फरक तो काय ! खुदापर्यंत पोहचायचे असेल तर खुदलाच म्हणजे स्वतःला समजून घ्यावे लागेल. फरक एवढाच आहे की "खुदा' या शब्दात फक्‍त एकच मात्रा लागते. हा प्रवास करायचा झाल्यास आयुष्यात फक्‍त एक दांडीच तेवढी कमवावी लागते. डोळयावरचा एक चष्माच केवळ बदलावा लागतो. मग उरलेला प्रवास तुम्ही "खुदा' होण्याचा असतो. परंतु तेच जमत नाही. कारण आम्ही स्वतःला ओळखलेच नसते. आत्मा प्रत्येकाजवळ आहे. परंतु परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. माझया ठिकाणी जसा आत्मा आहे, तसाच दुस-याच्या ठिकाणीही आहे. मला दुःख झालं तसंच इतरांना होउ शकते, इतरांनाही भाव भावना आहेत. ही जाणिव निर्माण झाली की परमात्म्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, असे समजावे. तुमच्यातच तुमचा परमात्मा किंवा देव लपलेला आहे. तुकोबाराया म्हणतात "तुझे आहे तुजपाशी.. परि तू भूलला वरिलीया रंगाशी'! हरीण आणि त्याच्या बेंबीत असणारी कस्तुरी ही त्याला माहित नसल्यामुळे तो बेभान होउन सुगंधाच्या दिशेने धावत सुटतो .. वेडा होतो..अगदी उर फुटेस्तोवर धावत जातो. तसेच आहे जीवनाचेही.
तथागत भगवान बुद्‌ध, महर्षी अष्टावक्र, भगवान श्रीकृष्ण, जर्मनीचे तत्वज्ञ नित्शे किंवा अलीकडचे भगवान ओशो आदींनी मांडलेले विचार समजून घेतल्यास आपल्याला "देव' कोणाला म्हणावे ...देव नावाची शक्‍ती कुठे वास करते, याचा प्रत्यय आल्यावाचून राहणार नाही.
भगवान श्रीकृष्णाची गीता खरोखरच अप्रतिम आहे. त्यातील तत्वज्ञान अद्वितीय आहे. बुद्‌धीला पटेल असे आहे. खुद्‌द भगवान श्रीकृष्ण म्हणतात की "माझा कधी जन्म झाला नाही, मृत्यूही झालेला नाही. मला कुठलेच गुण व निर्गुण लागू होत नाही. मी अजन्मा आहे.' याचा अर्थ विज्ञानाच्या कसोटीवर जर आजच्या काळात घासून बघितले तर एकच सिद्‌ध होते. आपला जीवनप्रवास पृथ्वी निर्माण झाल्यापासून म्हणजे पाच अब्ज वर्षांपासून सुरू झालेला आहे. मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यात माणूस उत्क्रांत होत होत आजच्या टप्प्यापर्यंत येउन पोहचला आहे. अनंत पिढयांचे "डीएनए' आपल्यात आहेत. आणि असंख्य जन्म अशीची साखळी सुरू राहणार ... एका कॉम्यूटरमध्ये जी छोटीसी "चिप' असते तिच्यात सर्व "प्रोगॅमिंग' साठवलेले असते, तसेच माझया पूर्वजांचे गुणदोष मलाही लागू पडतात. गुणदोषांचे हस्तांतरण केवळ या पिढीतून पुढच्या पिढीत होत असते. जे गीतेत सांगीतले आहे नेमके तेच विज्ञानही सांगते. तुमच्यात तुमच्या पूर्वजांचे "डीएनए' अधिक मात्रेत तर आईवडिलांचे केवळ वीस टक्‍केच डीएनए आपल्यात दिसतात. आणि वीस टक्‍के निसर्गातील नवीन गुणसुत्र घेउन आपण जन्माला येत असतो.
मी कालही कुठल्या ना कुठल्या रूपात होतो आणि उद्याही कुठल्या ना कुठल्या रूपात राहिलच. हेच सुत्र समजून घेतल्यास गीतेतील विज्ञान स्पष्ट दिसेल. अध्यात्म हे विज्ञानाच्या कसोटीतून समजून घेण्यास उलट मदतच होईल. मी आहे म्हणजे अनंत जन्मांपूर्वीही मी होतोच. आणि अनंत जन्मापर्यंतही मीच राहिल. आजचे माझया पूर्वजाचे डीएनए घेउन पुढील पिढी निर्माण होईल, यात तिळमात्र शंका नाही..
तथागत गौतम बुद्‌धही हेच म्हणतात. "अत्त दीप भव' तू स्वयं दीप हो. ..ते मनुष्यमात्राला प्रकाशमान करणारा दीपक व्हायला सांगतात. भगवान बुद्‌धांच्या तत्वज्ञात "देव' वगैरे संकल्पना अजिबात बसत नाही. म्हणून ते माणसाला देव वगैरे म्हणण्याच्या भानगडीत मुळीच पडत नाहीत. ते म्हणतात की "तूच तुझा दीपक होउन चल.. म्हणजे तुला कुणाचीच गरज भासणार नाही...तुला देवाची किंवा अलौकिक शक्‍तीची मुळीच आवश्‍यकता नाही.' बुद्‌धांनी मनुष्याला स्वयंदीप बनण्याचा सांगीतलेला मार्ग "अष्टांग मार्ग' होय.
दुसरा महान विचार महर्षी अष्टावक्रांनी मांडला. अष्टावक्र महागीतेत म्हणतात, हे मानवा ! तू तर अप्रतिम आहेस. तुझया ठिकाणी चैतन्य आहे .परंतु ते सदया काजळलेले आहे. त्यावर फुंकर मारली की त्यावर चढलेली काजळी दूर होउन तुझे मूळ चैतन्यमय रूप दिसेल. फ्रेड्रींक नित्शे तर म्हणतो , की मी असताना दुसरा कुठलाच परमात्मा राहूच शकत नाही. दुसरा परमात्मा संभवच नाही. कारण मीच मोठा परमात्मा आहे. दुसरा कोणी परमात्मा असेल तर मी स्वतःला गोळया घालून ठार करेन. वेद , उपनिषदे म्हणतात "अहं ब्रम्हास्मी' आणि सुफी संत मंसूर यांनी " अनलहक' ची दिलेली साद दुसरे तिसरे काहीच नसून हेच सार आहे. म्हणून स्वतःला उन्नत करावे जेणेकरून खुद पासून "खुदा' पर्यंतचा प्रवास करणे अधिक चैतन्यदायी व आनंददायी होईल. शेवटी एक शेर आठवतो-
ये सच है की आदम खुदा नही
लेकिन खुदाके नूरसे आदम जुदा नही !
परमेश्‍वर होण्याची पात्रता फक्‍त माणसातच आहे. कारण खुदाचा "नूर' माणसात आहे. स्वतःला ओळखले की अनंत जन्माचा प्रवास इथूनच सुरू होतो.

ऑल इज वेल..!

विजयकुमार राउत 

"जागते रहो'... गुरखा असा मोठ्याने आरोळी देत रात्रभर जागा राहून गावभर फिरत असतो. आपण त्याच्या आरोळीवर भरोसा ठेवून बिनधास्त झोपी जातो. तो आपल्या विश्‍वासातील किंवा आपल्या नात्यातील नसतोच कधी. तरीही आपण त्याच्या भरवशावर निद्रेच्या स्वाधीन होऊन जातो. त्याच्या मागचं कारण हेच की कुणीतरी आपल्यासाठी जागतो, ही भावना अंतर्मनात ठाम असते. कुणीतरी आपलं रक्षण करण्यासाठी "जागते रहो' अशी आरोळी ठोकत आपल्याला संरक्षण देत आहे, याचा मनाला विश्‍वास असतो; पण समजा एखाद्यावेळेस गुरख्याला खरोखरच चोर दिसले आणि त्याला चोरांनी साधा चाकू जरी दाखविला तरी तो दुसऱ्याचे काय, स्वतःचे रक्षणदेखील करू शकणार नाही. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो पळून जाण्याचा हमखास प्रयत्न करणारच; पण तरीही आपण त्याच्यावर अंधविश्‍वास करून झोपी जातोच. तसंच असतं जीवनाचंही... आपलं कुटुंब गाढ झोपेत असते तेव्हा कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात खोलवर हीच भावना असते. कारण घरातील कर्ता पुरुष सर्वांसाठी झटत असतो. देशाच्या सीमेवर हाती बंदूक घेऊन रात्रंदिवस पहारा देत सैनिक देशाचे रक्षण करतात, ही भावनाच मनाला सतत बळकटी देत असते. देवाचं नावंही तसंच. "देव' हा साधा शब्द जरी उच्चारला तरी केवढा मोठा दिलासा येतो माणसाला ! म्हणून कित्येक युगांपासून माणूस पुरता देवाश्रित झालेला आहे. प्रत्येक अडचणीच्या वेळी संकटापासून रक्षण करण्यास देवच धावून येईल, याची आपल्याला शंभर टक्‍के शाश्‍वती असते. संकटातून सुटका झाली तरी देव बरा, नाही झाली तरीही देवच बरा, अशी आपली भूमिका असते... काही "प्रॉब्लेम' असला तर तो फक्‍त आपल्यातच असतो. माझी प्रार्थना त्याने ऐकली नाही किंवा माझ्याच प्रार्थनेत काही उणीव असावी. आपले नशीबच खराब आहे.. देवाजीचा आपल्यावर कोप झाला असावा. मागणे कबूल झाले नाही तर सगळा पापाचा भार सहन करण्यासाठी मी तयार असतो आणि मीच जबाबदारही असतो.
"थ्री इडियट्‌स' या चित्रपटात आमिर खान असेच काही सांगून जातो. "दिल पर हाथ रखके बोलो.. ऑल इज वेल.' देवाचंच नाव कशाला? हृदयावर हात जरी ठेवला तरी आपण बिनधास्त होतोच की! मुळात मनुष्यप्राणी इतर प्राण्यासारखा पदोपदी प्रत्येक गोष्टीला घाबरत असतो. डोळसपणे पाहिल्यास भयाचे काळेकुट्‌ट ढग त्याच्या संपूर्ण जीवनाला व्यापून उरलेले असतात. प्रत्येक जण कुणाला ना कुणाला, कशाला ना कशाला घाबरण्यासाठी किंवा घाबरविण्यासाठी तयार असतो. माणसाचे सगळे व्यवहारच "भय' या भावनेभोवती सुरू असतात. व्यवहाराच्या दुनियेत पोलिस त्याला दंडुकेशाहीच्या भरोशावर घाबरवितो. वकील त्याला कायद्याच्या कचाट्यात पकडून "सळो की पळो' करून सोडतो. पत्रकार त्याच्या चारित्र्याविषयी भीती दाखवून त्याची "पळता भुई थोडी' करून टाकतो. तर डॉक्‍टर त्याला आजारापेक्षा परिणामांनीच अर्धमेलं करून सोडतो. या व्यवहाराच्या मुळाशी भीतीसोबत स्वार्थ दडलेला दिसून येतो. मंदिरात जाणारा माणूस देवदर्शनासाठी जातो. तेव्हा नुसताच देवदर्शन करीत नाही. त्याला दुःखातून मुक्‍ती हवी असते. तो दुःखाने पुरता त्रस्त झालेला असतो. त्यापासून त्याची सुटका व्हावी, हा हेतू असतो. मग त्याच्या असहायतेचा फायदा कुणीतरी पुजारी किंवा ढोंगीबाबा घेत असतो. त्याची लुबाडणूक होत असताना आपण देवाचे कार्य करीत असल्याची माणसाला खात्री असते. म्हणून तो कुणावर शंका घेत नसतो. तो फसविला जात आहे, याचे त्याला भानही नसते. असे एकंदर व्यवहाराचे गणित मोठे गुंतागुंतीचे आणि फसवाफसवीचे असते. याच्या मुळाशी भीती आणि त्यापासून सुटका हेच असते. भावनिकदृष्ट्या त्याला त्यातून सुटण्याची कुणाकडून तरी हमी हवी असते.
ही भीतीच सोडून जगता आले तर? देवाचीही गरज पडणार नाही आणि जागोजागी फसवणूकही होणार नाही.
खरे तर आपणही देवाला फसविण्याचा जागोजागी मार्ग शोधून काढत असतो. एकापेक्षा एक नामी क्‍लृप्त्या शोधून काढतो. देवाला लाच देऊन त्याला आपल्या बाजूने वळवून घेण्यात तर आपला हातखंडाच असतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सोन्याचांदीच्या, माती व दगडधोंड्याच्या देवाच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह उभे केलेले आहे. या फाजील भीतीतून कर्मकांडाचा जन्म झालेला आहे. पाऊस आला नाही तर वरुणराजाच्या कृपेसाठी वेगवेगळी आमिषे दाखविणारेही आपणच असतो. "ये रे ये रे पावसा .. तुला देतो पैसा.. पैसा झाला खोटा ...पाऊस आला मोठा', असे बडबडगीत गाऊन पावसाला आपण पडण्यास भाग पाडताना त्यालाही पैशाची लाच देतो. फसवे बडबडगीत गाऊन आपण चक्‍क त्याला फसवतो. या बडबडगीतातला "पैसा'ही खोटा आणि त्या खोट्या पैशावर लुब्ध होणारा पाऊस मात्र मोठा! मुलगा पास झाला तर देवाला पेढेही कबूल करणारे आपणच असतो. समाजात कुठल्याही मागणीसाठी लाच देण्याचा हा सोपा मार्ग आपणच शोधून काढलेला असतो. खोट्या-खोट्या समजुती... अंधश्रद्धा, खोटे खोटे व्यवहार, आपले सगळेच वरवरचे आणि खोटे खोटे असते. पावसासाठी आर्जवे करणारा इंग्रजी शाळेत शिकणारा छोटा मुलगा ठरळप ीरळप-- से रुरू ---लोशी रसरळप रपीेंहशी वरू--श्रळीींश्रश क्षेपू ुरपीीं ीें श्रिरू " हे बालगीत गाताना कुठेच लाचलुचपत करीत नाही. कारण हे गीत आहे "साहेबां'च्या देशातले. त्यांच्या संस्कृतीत लाच घेणे म्हणजे मोठा गुन्हाच. आपली संस्कृती मात्र सर्वसमावेशक आहे. सगळं सामावून घेणारी.
ही संस्कृती खोट्या-नाट्या भ्रामक कल्पनांवर आधारित असल्यामुळे आपल्याभोवती खोट्यांचे जाळे विणत जाते. तरीही माझी संस्कृती, माझी परंपरा मोठीच असते. (मेरा भारत महान हैं !) देवाच्या नावाखाली आपण काय काय करीत नाही?
एक शुद्ध फसवी कथा पाठ्यपुस्तकात लहानपणी वाचली होती. एक गरीब शेतकरी असतो. पाऊस येत नसल्यामुळे तो देवाला विनवणी करतो. "देवा यंदा चांगला पाऊस येऊ दे.. पाऊस चांगला आला आणि शेतात पेरलेले पीक चांगले आले तर यंदा वरचे सगळे पीक तुला अर्पण करेन.' देव माणसाच्या भूलथापांना बळी पडतो. देवाला यावर्षी अर्पण करायला भुईमुगाची वरवरची टरफलं घेऊन जातो. कारण त्यावर्षी त्याने शेतात भुईमूग पेरलेला असतो. जमिनीतील शेंगा तो स्वतःसाठी ठेवून घेतो. देवाला शेतकऱ्याची चतुराई कळते. पण तो काय बोलणार? दुसऱ्या वर्षी पुन्हा दुष्काळ पडतो. शेतकरी डोळ्यात प्राण आणून देवाला विनवणी करतो. "देवा यंदा चूक झाली. यावर्षी तुला मी नक्‍कीच पिकाचा खालचा पूर्ण भाग देणार. शेतकरी पीक आल्यानंतर पिकाच्या खालचा सगळा भाग देऊन टाकतो. देव विचारात पडतो. परंतु देवापेक्षा माणूसच जास्त व्यवहारी असतो. तो त्याला व्यवहाराची भाषा बोलून प्रसन्न करतो. शेत पिकाने बहरून येते. पिकाची कापणी केल्यानंतर देवाला दिलेले वचन पाळण्यासाठी पिकाच्या खालचा भाग तो देवाकडे घेऊन जातो. देवाला आश्‍चर्य वाटते. पोत्यात भरलेले कडबाकुटार देवाला अर्पण करतो. देव हे पाहून स्वतःचा हात स्वतःच्या कपाळावर मारून घेतो. कारण शेतकऱ्याने या वर्षी ज्वारीचे पीक पेरलेले असते. मोत्यासारख्या ज्वारीची भरदार कणसं स्वतःसाठी तर कडबा कुटार देवाला देतो. देवाला पश्‍चात्ताप होतो.. परत तिसऱ्या वर्षी पावसासाठी काकुळतीला येऊन देवाला तो पुन्हा प्रार्थना करतो. देव ऐकायला तयार होत नाही; परंतु देवाला पटविण्यात माणूस मागे कसा राहील? येनकेन प्रकारेण तो देवाला खूश करतोच.
"देवा यंदा पाऊस आला आणि चांगले पीक आले, तर तुला पिकाचा खालचा आणि वरचा दोन्ही भाग देऊन टाकतो. देवा, आम्ही मानवजात तुझी शपथ घेऊन सांगतो की तुझ्याशी कधीही दगा करणार नाही.' देव खूश होतो. पुन्हा पाऊस पडतो. पीक शेतात बहरते. पिकाची कापणी करून तो देवाकडे घेऊन जातो. देव यावर्षी तरी शेतकरी आपला शब्द पाळेल म्हणून आनंदित असतो; परंतु शेतकरी बैलगाडीतून मक्‍याचा कडबा बाहेर काढतो आणि देवापुढे रिचवतो. देव विचारतो, "हे काय आहे?'
"मी दिलेला शब्द पाळला देवा, तुला जे कबूल केलं होतं ते तुला भक्‍तिभावाने अर्पण करीत आहे. यंदा मी मक्‍याचे पीक शेतात पेरले होते. तुला कबूल केल्याप्रमाणे यंदा खालचा व वरचा दोन्ही भाग तुला देत आहे. मी दिलेल्या वचनाप्रमाणे मधला भाग मी माझ्यासाठी ठेवून घेतला. आता खालच्या आणि वरच्या भागावर हक्‍क तो तुझाच आहे देवा!' असं म्हटल्यानंतर देव स्वतःची फसगत झाली म्हणून काळाठिक्‍कर पडलेला चेहरा कमरेवरचे हात सोडून झाकून घेतो! तर अशा प्रकारे चक्‍क देवाची फसवणूक करणारे महाभाग जागोजागी आहेत. जो परमेश्‍वर सगळ्या विश्‍वाचं संचालन करीत असतो, तो देवच इतका मूर्ख असेल तर त्याला देव तरी कसे म्हणावे? असा साधा प्रश्‍न उभा राहतो.
याच शेतकऱ्याचा नातू-पणतू पुढे राजकारणात गेल्यामुळे देवाला निवडणुकीत विजयी होण्यासाठी नवस बोलतो की हे देवा, मला यंदाच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येऊ दे. मग तुला मी सोन्याची टोपीच चढवितो. असे आश्‍वासन देऊन देवाला कामी लावतो. देव नेहमीप्रमाणे खुश होऊन माणसाला निवडणुकीत यश देतो. निवडणूक जिंकल्यानंतर माणूस मंदिरात जातो. इंच दोन इंच छाती फुगवून ताठ मानेने देवापुढे उभा राहतो. "देवा यापूर्वीची मानवजात तुझी लुबाडणूक करणारी असेल पण या युगातील माणूस मात्र दिलेल्या शब्दाला जागणारा आहे. मी तुला दिलेले वचन कुठल्याही स्थितीत पाळणार आहे. तुला निवडणुकीत जिंकल्यानंतर सोन्याची टोपी घालण्याचा मी नवस केला होता. आहे ना लक्षात का विसरलास? देव मुकाट्याने मान हलवितो. देव मनोमन खूशही होतो. मागच्या पिढीतला शेतकरी लबाड निघाला होता; पण या युगातील माणूस प्रचंड इमानदार आणि हुशार आहे. उगीचच नाही तो चंद्रावर पोहोचला! मंगळावर यान पाठवून जीवसृष्टीचा रात्रंदिवस वेध घेत आहे. सगळे शोध लावले आहेत. मी तर या सृष्टीची निर्मिती केली. परंतु मानव जातीने माझ्या बनविलेल्या सृष्टीसारखीच हुबेहूब दुसरी सुंदर प्रतिसृष्टीच निर्माण करून या दुनियेला "चार चॉंद' लावले आहेत. त्याचा यशाचे पवाडे उगाच त्रिभुवनात दुमदुमत नाहीत!' देवाने माणसाकडे कौतुकाने पाहिले. त्याला आपल्या छातीशी लावून त्याच्या पाठीवर प्रेमाने थोपटले.
प्रसन्न वदनाने भक्‍ताला विचारले,
"सांग सांग मानवा, कुठाय तू कबूल केलेली सोन्याची टोपी? प्रश्‍न सोन्याच्या टोपीचा नाही रे. तू दिलेल्या शब्दाला जागतोस की नाही याचा आहे. मला फार अभिमान आहे. तो दुष्ट शेतकरी आता या जमान्यात दिसता कामा नये. पण तू खरोखरच दिलेल्या शब्दाला पाळणारा आहेस. शाब्बास पठ्‌ठे. जिओ हजारो साल...'
"देवा, थांबा थांबा असे उतावीळ होऊ नका.' आणि तो माणूस गालातल्या गालात हसत जोरात कुणालातरी हाक मारतो.
"सोन्याऽ सोन्याऽऽ'.... त्याच्या हाकेसरशी डोक्‍यात टोपी घातलेला लहानगा "सोन्या' लगेच धावत धावत येतो. माणूस देवाशी त्याचा परिचय करून देतो. लहानग्या बालकाच्या डोक्‍यातून टोपी काढतो. तिला व्यवस्थित केल्यानंतर विटेवर अठ्‌ठावीस युगांपासून उभा असलेल्या विठ्‌ठलाच्या डोक्‍यात टोपी घालून देतो. विठ्‌ठल गोंधळतो. "काय आहे?' हे विचारतो. माणूस गालातल्या गालात पुन्हा हसतो. "अरे, विठ्‌ठला हीच ती सोन्याची टोपी.' देवाला कुणीतरी टोपी घातल्याचं दुःख होतं आणि माणूस आपल्या चातुर्यावर मोठमोठ्याने हसतो.
अठ्‌ठावीस युगांपासून निमूटपणे उभा असलेला विठ्‌ठल गप्पकन डोळे मिटून घेतो! तर मित्रांनो, अशी लांबलचक आहे माणसाच्या फसवेगिरीची कहाणी. एक नव्हे तर अशा माणसाच्या वर्तनाच्या कथांनी अख्खे ग्रंथच्या ग्रंथ आणि पोथ्याच्या पोथ्या भरलेल्या आहेत. देवापुढे नारळ फोडताना आतलं खोबरं माणूस चवीने खातो. बाहेरची टरफलं देवाच्या चरणी वाहतो. माणसाने स्वतःच्या स्वार्थाभोवतीच सगळ्या चातुर्याच्या कथा निर्माण केलेल्या आहेत. तो देव असला तर अतिशय भोळा असावा. क्षमाशील असावा, अशी कल्पना करूनच माणूस "देव' या संकल्पनेशी खेळत असतो. आपण कसेही असू "तो 'मात्र प्रामाणिकच राहिला पाहिजे. तो दयावानच राहिला पाहिजे. "भगवान देता हैं तो छप्पर फाडके देता हैं' " मांगे मिले ना भिख , बिन मांगे मिले मोती', "आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन', भगवान के घर देर है, अंधेर नहीं' अशा आशादायक आणि फसव्या म्हणी तयार करून त्याचा स्वतःला धीर देण्याचा प्रयत्न सुरू असतो. कोणाचा देव मांसाहारी, कुणाच्या देवाला दारूचा नैवेद्य, कुणी रक्‍त पिणारा तर कुणाचा देव नुसताच भाव खाणारा...! अशा विविध रूपांत आपणासारखं देवावरही आरोपन करीत जातो. एकंदरीत, माणूस देवाला आपल्या प्रवृत्तीनुसार उभा करतो. व्यक्‍ती तितक्‍या प्रवृत्ती त्यानुसार व्यक्‍ती तितके देव.. आपण उभी केलेली "देव' ही संकल्पना इतकी बावळट किंवा आपल्यातील माणसासारखीच भूलथापांना बळी पडणारी, असे मानण्यापेक्षा स्वतःच्या हृदयावर हात ठेवून "ऑल इज वेल' म्हटले तरी नाही का चालणार?

 
**************************

रविवार, 23 नवंबर 2014

कामगार

हे कसे आयुष्य आहे, कारखान्यासारखे
कामगारांनी जगावे, यंत्र-घाण्यासारखे!!

संसार माझा, नेटका व्यवहारही
सोबतीला दुःख हे, पेंचीस पान्यासारखे!!

भावना,संवेदना ,घरच्या घरी मी ठेवल्या
वागणे येते मला, येथे जमान्यासारखे!!

रोजचे दारात येती, मागण्या देणेकरी
का जगावे रोज येथे, हाय खाण्यासारखे!!

भोवती माझ्या श्रमाचे, विश्‍व मी साकारले
वाजती भोंगे खुशीचे, गीत गाण्यासारखे!!

उपाशी अर्धपोटी, ते तुपाशी, का असे?
गाळतो मी घाम, त्याला दाम पाण्यासारखे!!

संप अन्‌ आंदोलनाने प्रश्‍न नाही संपले
हे कराराचे जिणे, कोऱ्या रकाण्यासारखे!!

स्वामी, या युगाचा, भाग्यदाताही असे
का रहावे मी इथे मग, दीनवाण्यासारखे!!

                                      विजयकुमार राऊत 

हातचा एक



मित्र शत्रूपरी भेटला
हातचा एक मी घेतला !!

या गणितात आहे मजा-
रीत समजून घेउ चला !

या उधारीत बर्बाद मी
हाच व्यवहार का येथला ?

लोकशाही कशी रे तुझी?
देश माझा कसा पेटला

होय, बेसूर, बेताल मी
ताल माझा जरा वेगळा !

गप्प का जाहले ते असे ?
प्रश्‍न साधाच मी रेटला !

शून्य म्हणजेच रे विश्‍व हे !
शून्य म्हणजेच रे भोपळा !!

विजयकुमार राउत



प्रयोगशाळा

----------------
छान परिक्षा घेवून गेला, तुझा उन्हाळा !!
जखमांवर का,मीठ चोळतो,थंड हिवाळा !!

आजार भेटला, जसा तसे मी, निदान केले
आयुष्याला समजत गेलो प्रयोगशाळा !!

कुणी कुणाच्या दुःखाचे का कारण असते?
दोष तरी का,उगाच द्यावा कुणी कुणाला?

कोण पाहुणा, या गावातून निघून गेला?
वेशीवरती दूर दूर का, उठे धुराळा?

कुणीच नाही, कुणासारखा,शंभर टक्‍के
प्रत्येकाचा , रंग निराळा,ढंग निराळा !!

तुझी त्सुनामी , येते आणि , निघून जाते
दुनिया,अशीच जाते,रसातळाला !!

विजयकुमार राउत
............................ 

गं


गत जन्मीचे, नशीब बाई, छळते गं !
कळते मजला, दुःख तुझेही, कळते गं!!

तुझ्या चितेचे, कारण सांगू, किती तरी
रोज अचानक, कशी कशी तू, जळते गं!!

तू आई, तू बहीण आणिक पत्नी तू
तू नसताना, जग सारे, हळहळते गं !

तूच कल्पना,तूच सुनीता, तूच लता
तुला विहरण्या, गगन ठेंगणे, पडते गं!!

तू ओव्यांतून सदाच गाते रडगाणे
परंपरांना जात्यावर का दळते गं

सीतेला वनवास, अहिल्या, शापित का?
पाप कुणाचे, पुण्य होउनी, फळते गं!!

कालचीच ती, जुनी कहाणीा, पात्र नवे!!
तेच तेच ते, पुन्हा पुन्हा का, घडते गं!!

पदर खोचुनी, या दुनियेशी, बोल जरा
युगे युगे का, भ्याडपणे तू, रडते गं!!

विजयकुमार राऊत 

शनिवार, 22 नवंबर 2014

गझलेसाठी !!

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी !!
तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

या जिवनाची, दूर ग्रहावर,वस्ती थाटू
कठीण कुठला, आहे मंगळ, गझलेसाठी !!

पृथ्वीवरच्या, हवेत आता,श्‍वास कोंडतो
प्रदूषणाची, सोसू का झळ? गझलेसाठी!!

युगायुगांचा, इथे कसा,"एल्गार' जाहला
क्षितिजावरती, उठले वादळ, गझलेसाठी !!

कलंदराने, कष्टाने,हे रोप लाविले !!
येइल नक्‍की, वृक्षाला फळ,गझलेसाठी!!

या आधीचे,जगणे कां ते,जगणे होते?
यानंतरचे, जगणे केवळ, गझलेसाठी !!

गझलेच्या, शत्रूंना आता, उत्तर द्याया
आणा तुमच्या, लेखणीत बळ, गझलेसाठी !!

  विजयकुमार राऊत 
 
Blogger Templates