Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 31 दिसंबर 2014

"एक्‍सपायरी डेट'

                                                                                                    -विजयकुमार राउत

ज्याचा त्याचा एक धर्म असतो. त्या धर्माप्रमाणे तो आचरण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा धर्माचे आडंबर माजवून एक प्रकारचं धार्मिकतेचे सोंग आणण्याचा प्रयत्न करून समाजात हाच खरा धर्म असे पसरविले जाते. सर्वसामान्य माणूस कर्मकांडाच्या कचाटयात सापडतो. संत तुकारामापासून कबिरापर्यंत सगळयांनीच बाहय कर्मकांडाला फार पोटतिकडीने विरोध केला. तरी समाजात दिखावूपणाच अधिक दिमाखदार पद्‌धतीने समाजात वावरत आहे. एकमेकांना एकमेकांपासून तोडणारा कुठलाच धर्म हा पृथ्वीच्या पाठीवर नाही. अब्राहम लिंकनचे एक वचन आठवते.ते म्हणतात की "i do good i fill good - i do bad i fill bad' पाण्याचा धर्म तहान भागविणे, वृक्षाचा धर्म सावली देणे हाच असतो. दुसरा कुठलाच धर्म असू शकत नाही. सगळयांच्या जगण्याचे सार कशात आहे? सगळे जगतात फक्‍त निरामय आनंदासाठी. आणि तो आहे फक्‍त आपल्यातच. आपण आयुष्यभर आपला धर्म किंवा परमेश्‍वर हा केवळ बाहेरच शोधतो. आनंदी राहायचं असेल तर दुस-याचा आनंद हिरावून न घेता एक आनंदमय जिवन जगलं पाहिजे. मग संत ज्ञानेश्‍वरांना आला तसा आनंद आपल्यालाही प्राप्त होतो. "आनंदाचे डोही आनंद तरंग' चा प्रत्यय क्षणोक्षणी यायला लागतो. या देशात धर्मासाठी काय काय झालं नाही? सगळे लढे धर्म आणि सत्ता संघर्षासाठी निर्माण झालेले आहेत. फाळणीचं दुःख झेललेले कविवर्य गुलजार तर या भयानक दुःखाचे नुसते साक्षीदार नव्हे तर भागीदारसुद्‌धा आहे. ही जखमी कशी चिघळत जाते याचा कटू अनुभव त्यांनी घेतला. मार्क्‍स म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे. ती माणसाला सतत गुंगीत ठेवते. ही गुंगी चढविण्याचे काम राजकारणी करीत असतात.
देशात सदया धर्मांतराचे वारे जोरात वाहायला लागलेले आहेत. धर्म हा "एक्‍सपायर' झाला, असं कुणी म्हणलं तर मोठे वादळ उठते. त्यामागील अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे. तथाकथीत धर्म ज्या कार्यासाठी निर्माण झालेला आहे, त्यामुळे कोणताही हेतू साध्य होत नसल्यामुळे तो आता "एक्‍सपायर' झाला, असे मानण्यातच शहाणपण आहे. जर्मन विचारवंत नित्से जेव्हा "देव' या संकल्पनेवर आघात करताना म्हणतो की देवांना आता देव्हा-यातून हद्‌दपार केले तर बरं होईल. डॉ.श्रीराम लागू म्हणतात की देवाला आता "रिटायर्ड'च केले पाहिजे. यामागे एकच अर्थ आहे. जि प्रतिकं , ज्या संकल्पना आता कालबाहय झाल्या आहेत, त्यांना विशाल अंतःकरणाने मुठमाती दिली तरच मानवाचा भविष्यकाल उजळू शकतो. कारण परिवर्तन हाच शाश्‍वत नियम आहे. धर्माचे मढे किंवा देवाचे भूत किती दिवस पाठीवर बाळगणार आहोत? हिंदू असो वा मुस्लीम . कट्‌टरता ही धर्माला पोषक असूच शकत नाही. कट्‌टरता ही फक्‍त कोत्या मनाचे निदर्शक होउ शकते. वाद विवादाने कुठलेच प्रश्‍न संपत नाहीत. आणि खरं म्हणजे महापुरूषांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरच कुठलाही "वाद' सुरू करण्यात अनुयायीच पटाईत असतात.
हिंदू धर्मातील कट्‌टर पंथियांनी "घर वापसी' अभियान फार जोरकसपणे राबविणे सुरू केले. आपली विचारसरणी जनमानसात दृढ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या हाती सत्तेची सुत्र असावी लागतात. एकदा हाती सत्ता आली की आपले जाहिरनामे राबविण्यात पुढाकार घेतला जातो. तिचा पाहिजे तसा वापर करता येतो. प्रतिके श्रद्‌धेची जागा घेतात. जुना इतिहास आपल्या पद्‌धतीने बदलविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होतो. एकप्रकारे जुन्या कर्मकांडाच्या जागी नवीन कर्मकांडे उपस्थित केली जातात. "गर्व से कहो हम..'च्या गर्जना घुमायला लागतात. किंवा एखादया अधार्मिक विचाराबद्‌दल "जिहाद' पुकारला जातो. अभिव्यक्‍ती स्वातंत्रयावर वारंवार हल्ले होतात. चित्रपटांची पोष्टर फाडून सिनेमा बंद पाडल्या जातो. "नत्थूराम'चे दैवतीकरण केल्या जाते. त्याच्या नावातही "राम' दिसायला लागतो. मग त्याची मंदिरे उभी करण्याचा विचार व्यक्‍त केला जातो."मंदिर वही बनायेंगे'चा निर्धार केला जातो. संपूर्ण विश्‍वच भगवे करण्याचा संकल्प केल्या जातो. परदेशाचे दौरे आयोजित करून भगवतगीता भेट देण्याचे प्रयोग होतात. जापानमधील तथागत बुद्‌धांच्या मूर्तीऐवजी कमळ पुष्पाचे गुणगाण मुक्‍त कंठाने केले जाते. कारण ते त्यांच्या पक्षाचं चिन्हं असतं. राष्ट्राचा ग्रंथ म्हणून भगवत गीतेला स्थान देण्याचा विचार सोडल्या जातो. "हमको वोट देनेवाले देशभक्‍त और जिन्होने को वोट नही दिया वो देशद्रोही' संबोधण्यात येतो. त्यापेक्षा थोडे पुढे जाउन " या देशात "राम'जादयांनाच राहण्याचा अधिकार आहे "हराम'जादयांना नाही' असे ठणकावून सांगीतले जाते. गंगा ही तर हिंदूची पवित्र नदी. माताच ती ! म्हणून निवडणुक झाल्यानंतर तिची महाआरती करण्याच्या अनुपम सोहळयाचे टिव्हीच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. यात मात्र ख-या धर्माची कुठे हत्या केली जाते ,हे या देशातील सर्वसामान्य माणसाला कळतही नाही. "ओ माय गॉड' किंवा "पिके' यासारख्या चित्रपटांतून धार्मिकतेवर प्रहार केले जातात तेव्हा त्यांवर टिकेची झोड उठविली जाते. या धर्ममांतर्डांच्या विरोधात कुणी तोंड उघडले तर त्याचे मुस्काट फुटणे आलेच. जर त्याने प्रबोधनाचे कार्य सोडले नाही तर त्यांला "वैकुंठा'ला पोचविण्यासाठी त्यांचे खास "पुष्पक' विमान तयारच असते. अंधश्रद्‌धेच्या विरोधात आवाज उचलणा-यांचा शेवटी दाभोळकरच होतो, हे सांगणे न लगे.
                                                                                                  

                                                                                            -विजयकुमार राउत

गुरुवार, 25 दिसंबर 2014

अनिष्ठ ते इस्ट


                                                                       -विजयकुमार राउत
" हिंदू धर्म मे लाख बुराईया होने के बावजूद भी मै उससे प्रेम करता हू'असे महात्मा गांधी म्हणायचे. कारण हिंदू धर्म हा कितीही पुरातन असला तरी काळाच्या भट्‌टीत तावून सलाखून बाहेर पडला आहे. या धर्मात जशी वेगवेगळया काळांत आलेली स्थिंतंतरे पाहता या धर्मात अनेक रूढींपरंपरांचा शिरकाव झालेला आहे. परंतु या धर्मातील कठोर अशा नियमांमुळे किंवा प्रलोभण व आक्रमणांमुळे प्रत्येक काळात मोठया प्रमाणात धर्मांतर घडूनही आलेले आहे. त्यात जितक्‍या हिंदूनी धर्मांतरण केलं त्याही पेक्षा कमी धर्मांतरण इतर धर्मात झाल्याचं पहायला मिळेल. याचं कारण जाचक रूढी, परंपरा यामागे तर आहेच त्याचबरोबर गरीबीतही आहें. ख्रिश्‍चनांनी पैशाच्या जोरावर तर मुस्लीमांनी तलवारीच्या जोरावर हे धर्मांतरण घडवून आणलेले आहे. यानंतरच्या काळात मात्र अस्पृशांना माणूस म्हणून जगणे नाकारणा-या हिंदू धर्माला एका मोठया वर्गांकडून सोडचिठ्‌ठी देण्याचा लढा पाहायला मिळतो. वैचारिक पातळीवर ,सामाजिक स्तरावरचा हा लढा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या धर्मात सुधारणा घडवून आणण्याची अनेकदा तथाकथित हिंदुत्ववाद्यांना संधी देण्याचं महत्वाचं कार्य केलं. त्यांनी त्यांच्या समाजाला या धर्मात बरोबरीचे स्थान व दर्जा मिळवून देण्यासाठीचं जीवाचे रान केले होते. हिंदू धर्म सोडताना त्यांची काय अवस्था झाली होती, हे त्यांच्या एकंदरीत घालमेलीवरून दिसून येते. बौद्‌ध धर्म स्वीकारण्यापूर्वी त्यांनी इतर धर्माचाही अभ्यस केला. काळाराम मंदिर प्रवेशावरून त्यांनी दिलेला लढा तर सर्वांनाच माहित आहे. परंतु समाजातील काही धुरीनांनी स्वतः या धर्माला संकुचित विचारात गुरफटून टाकण्याचे कार्य न थकता पार पाडले. सुधारणा घडवून आणण्याचं धाडस मात्र कधी कोणी दाखविले नाही. तसे अनेक प्रयत्न पूर्वी झाले आहेत. परंतु या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करून सुचविलेले बदल स्वीकारण्याचं कुणीच मनावर घेंतलं नाही. या धर्माला सर्वात घातक अशी चातवुर्ण्य व्यवस्थाच आहे.
कालबाहय झालेल्या रूढींवर चिंतन करून त्यांना दूर करणे ही आजची गरज आहे. या धर्मात अनेक चालीरिती आहेत. त्यापैकी ब-याच परंपरा या वैज्ञानिक आणि तर्कसंगत वाटत नाहीत. त्या त्या काळातील गरज म्हणून त्या आलेल्या आहेत. परंतु काळाच्या कसोटीवर आता त्यांचं महत्व उरलेलं नाही. ज्या परंपरा संस्कृती म्हणून आपण स्वीकारल्या त्या आता वैज्ञानिक कसोटीवर घासून त्याची उपयुक्‍तता तपासणे गरजेचे आहे. संत वाडःमयात अनेक संतांनी या दुष्ट रूढींवर प्रहार केल्याचे दिसून येते. त्यानंतर समाजसुधारकांनी टीका ओढवून परंपरा किंवा रूढी नाकारण्याचं महत्वाचं कार्य केलेले आहे.
या धर्मातील अनेक रिती किंवा रूढींना विज्ञानाचाही आधार आहे, असं म्हटल्यास थोडं धाडसाचं होईल. या रूढी किंवा परंपरा निर्माण करण्यामागचा हेतू लक्षात घेतला तर तो मनुष्याच्या सर्वांगिण प्रगतीकरीता सकारात्मक आहे. रूढी, परंपरा म्हणजे संस्कृती नव्हे. रूढी, परंपरा या एका वर्गाचे हित जोपासणा-या असतात. संस्कृती मात्र अखिल मानवजातीला उन्नत करणा-या असतात. म्हणून डॉ.आंबेडकरांनी कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता आपल्या सद्‌सदविवेकबुद्‌धीला जागृत ठेवूनच बौद्‌ध धर्म अंगिकारला आले. कारण या मातीतील धम्म, येथील परंपरांशी नाते निर्माण करणारा बौद्‌ध धम्म हाच माणसाला माणुसकीचे क्षितीज दाखविणारा आहे, हे डॉ.आंबेडकरांना चांगल्या माहित होतं. बुद्‌ध धर्माला विज्ञाननिष्ठ धर्म म्हणूण स्वीकारणेच सगळयांच्या हिताचे आहे. यातच बौद्‌ध धर्माचे मोठेपण आहे. बौद्‌ध धम्म कुठलाही लपंडाव करीत नाही, किंवा दुसरे कुठलेच प्रलोभण दाखवित नाही. त्याचबरोबर त्याने माणूस म्हणून विचार करण्याचं स्वातंत्रय कायम राखले आहे. धम्मातील तत्व जीवनात अंगीकारण्यासाठी ते बुद्‌धीमत्तेच्या निकषावर घासून शेवटी योग्य असेल तरच स्वीकारा, असा मोलाचा संदेश भगवान गौतम बुद्‌ध देतात. म्हणून बौद्‌ध धम्म हा विज्ञाननिष्ठ वाटतो. माणसांसाठी धर्म की धर्मासाठी माणूस? हा प्रश्‍न येतोच. हजारो स्त्रीया केशवपन करून पतीच्या चितेत स्वतःला झोकून देत असताना हिंदू धर्मियांना कधीच दया आली नाही. शेवटी राजा राममोहन रॉय यांच्यासारख्या पुढा-यांना सतीप्रथा बंद करण्यासाठी इंग्रजांच्या मदतीने कायदा करावा लागला. अस्पृशांना मानवतेची वागणूक देण्याऐवजी त्यांना पशूपेक्षाही निच वागणूक देत असताना प्राणीमात्रांत सुद्‌धा परमेश्‍वराचं वास्तव्य असतं, हे तत्व सांगणा-या हिंदू धर्मात परस्पर विरोधाभास कसा भरलेला आहे हे जागोजागी दिसून येते.
हिंदू धर्मात विज्ञानाला परंपरेच्या नावाखाली दडपल्या गेलं. तुळसीचं रोपटं अंगणात लावल्याखेरीज घराला घरपण येत नाही. तुळसीचं रोपटं हे वातावरण प्रदुषणमुक्‍त करण्याचं काम करते. म्हणून ते पवित्र आहे. तुळसी चोविस तास प्राणवायू निर्माण करण्याचं काम करते. हिंदू धर्मात त्याचं वैज्ञानिक महत्व न सांगता त्याला केवळ धार्मिक चौकट देउन त्याची स्थापना अंगणातील वृंदावनात करण्यात आली. यामागचं वैज्ञानिक सत्य सांगण्याच्या भानगडीत हा धर्म कधी पडला नाही. या धर्मात शंका किंवा तर्क करण्यास कुठेच वाव देण्यात आला नाही. म्हणून जे वर्षानुवर्षे सुरू आहे , तेच हजारो वर्षांनंतरही अबाधीत राहिलेलं दिसून येते. उपवास हा आरोग्याच्या दृष्टीने फायदेशिर ठरतो. यामागचं कारण असं की पोटाची शुद्‌धी होण्याकरीता आजच्या भाषेत "डायटींग' घेणे आवश्‍यक असल्याची बाब आज आरोग्यशास्त्राने सांगीतली. उपावासाने पचनसंस्था चांगली राहते, याचा शास्त्रीय आधार घेउन बुदधीच्या कसोटीवर घासून न तपासता महिन्यातून कित्येक दिवस उपवास पाळणारी व्यक्‍ती अंधश्रद्‌धेपोटी हा रितीरिवाज परंपरेच्या नावाखाली आंधळे होउन पाळीत आहे. जे अंधपणे आपण स्वीकारतो ती अंधश्रद्‍र्धाच. परंतु उपवास करण्यामागचं विज्ञान या धर्माने कधी समजावून सांगीतलं नाही. याबाबतीत हेमाद्री पंडिताचं उदाहरण पुरेसे ठरेल. राज्यात पुरेशी संपन्नता असतानाही राज्यातील जनता आरोग्याची निट काळजी घेण्यापासून दूर गेल्यामुळे रामदेवराजा चिंतेत पडला. सगळी सुखे असताना राज्यातील जनतेचे आरोग्य का ढासळत आहे , याचा राजाला विचार पडला. त्याने वास्तूशास्त्रात पारंगत असलेल्या हेमाद्री पंडिताला बोलावून त्याने याबाबत त्याच्याशी चर्चा केली. सर्वगुणसंपन्न हेमाद्री पंडितांच्या लक्षात ही बाब राजांनी आणून दिली. आणि त्यावर मार्ग शोधण्याची आज्ञा दिली. पंडितांनी काही दिवस सखोल अभ्यास केल्यानंतर एक मोठा ग्रंथच राजासमोर सादर केला. राजाने त्या ग्रंथाचे अध्ययण केले . तेव्हा राजा अतिशय आनंदीत झाला. हेमाद्री पंडितांनी आरोग्य शास्त्राला धार्मिक बाबींचे अनुष्ठान देउन त्याला आरोग्याशी जोडलं. राजाने तो ग्रंथ देवादीपकांची खोटी भिती दाखवून जनतेकडून त्याची अंमलबजावणी करण्यास भाग पाडले. त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. धार्मिक भितीपोटी जनतेने या ग्रंथात जे काही सांगीतलं ते पाळण्यास सुरवात केली. त्याचा आरोग्यावर पाहिजे तसा परिणाम होण्यास मदत झाली. सगळीकडे सुबत्ता नांदू लागली. राज्यात सुख समाधानाचे कारंजे उडायला लागलेत. भितीचा परिणाम इतका झाला की हेमाद्री पंडिताने सांगीतलेले धार्मिक अनुष्ठाण करणे सगळयांनी मुकाटयाने स्वीकारले. हिंदू धर्मात प्रथा, परंपरांना मोठे स्थान आहे. त्यामागचं विज्ञान समजून घेण्याचं आपणही कधी डोळसपणे धाडस करीत नाही. हिंदूह्रदयसम्राट वि.दा. सावरकर यांनी मात्र धर्मात साचलेली मळगट दूर करण्यासबंधी महत्वाचे विचार प्रकर्षाने मांडले. परंतु हजारो वर्षांपासून पडलेला परंपरांचा पायंडा मोडण्याचं धाडस कोणीच केलं नाही. सावरकरांनी ज्या रूढी इस्ट असतील त्यामागचे शास्त्र समाजावून सांगीतले. अनिष्ठ रूढीं नाकारण्याचे औदार्यंही दाखविले. यात हिंदू धर्माची इतर धर्माशी तुलना करण्याचा प्रश्‍नच येत नाही. त्या अनिष्ठ रूढी दूर करण्याचं पातक कोण आपल्या माथी मारून घेईल म्हणून जे सुरू आहे ते निमूटपणे पार पाडण्याखेरीज गत्यंतर नाही, या भावनेने पालन सुरू आहे. बरे यामागे ईश्‍वरी कोप होईल अशी आपली समजूत असते. अदृश्‍य शक्‍तीची भिती दाखवून त्या चालत राहिल्या तरच धर्म सुरक्षित राहिल असा काहीसा समज पसरविण्यात आला. या परंपरांना कुरवाळत बसण्यापेक्षा त्या अत्यंत पुरातन म्हणून निरूपयोगी आहेत. धर्मामध्ये हजारो वर्षाचा कचरा साचून आता त्याला गटाराचं स्वरूप येत आहे. तसं हजारो वर्षाचं विज्ञानही त्यामागे पाहावयास मिळते. यज्ञ संस्कृती योग्य नसली तरी ती काही अंशी मानवाच्या उत्कर्षासाठी आवश्‍यकही आहे. आज त्यामागचं सत्य बाहेर येत आहे. सावरकरांनी सांगीतल्याप्रमाणं हिंदू व मुस्लीम धर्मात कुठलाच विरोधाभास नाही. कारण या दोन्ही धर्मियांतील प्रत्येक प्रथा एकमेकांच्या हेतूपुरस्सर विरोधी नाहीत. आपली संस्कृती ही सुर्यपुजक असल्यामुळे उगवत्या सुर्याला नमस्कार करण्यासाठी हिंदू धर्मिय पूर्वकडे तोंड करून त्याला नमस्कार करतात. तर मुुस्लीम धर्मिय मक्‍का मदिना हे पवित्र स्थळ पश्‍चिमेस असल्यामुळे त्या दिेशाने तोंड करून नमाज अदा करतात. हिंदूमध्ये मृत्यूनंतर पार्थिवालला अग्नि देण्यात येतो. तर मुस्लीम धर्मात "इंतकाल' झाल्यानंतर त्याचा दफणविधी करण्यात येतो. यामागं कुठला आला विरोधाभास?. मुस्लीम धर्माचं उगमस्थान अरबस्थानात वाळवंटी प्रदेशात असल्यामुळे तिथे जंगलांचा अभाव असणं सहाजिक आहे. म्हणून लाकडांची वाट पाहात बसण्यापेक्षा मृत शरिरास वाळवंटात पुरविणे सोयीस्कर आहे. म्हणून दफन करण्याची प्रथा या धर्मात पडली. हिंदू धर्मीचे उगमस्थान जंगलांनी व्याप्त अशा सिंध प्रांतात असल्यामुळे तेथे लाकडांची मुबलकता असणे हा भौगौलिक फरक दोन्ही धर्मातील परंपरा दर्शविते.
d

बुधवार, 24 दिसंबर 2014

काय पाहिजे?


काय पाहिजे, विचार एकदा
जीवनास घे पुन्हा, उधार एकदा!

विचारले तिला, तू व्यस्त का अशी?
भेटली कधीतरी दुपार एकदा!!

गाढवा, अरे जरी इमानदार तू!
जाणुणि जगास हो हुशार एकदा!!

आपुले म्हणून काय झाकतोस तू?
चुकांस आपुल्या कधी सुधार एकदा !!

हारलो कधीच मी, नि जिंकलीस तू
खेळलो तुझ्यासवे जुगार एकदा!!

तापली उन्हात ही तुझी वसुंधरा
सिंचनास दे नभा तुषार एकदा!!

पूर्ण व्हावयास ही गझल तुझी "विजय'
वापरून बघ जरा "कुमार' एकदा!!

                                * विजयकुमार राउत
                                     साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक,
                                   हिंगणा मार्ग, नागपूर 16



आसवे का येत नाही?



बोचले काटें जरी मज वेदना का होत नाही
हाय! डोळयांतून माझया आसवे का येत नाही

गोड या कंठातील का संपली कोकिळगाणी?
माझियासाठी तसा हा चांगला संकेत नाही

जीवनाचा डाव माझया खेळणारा मीच होतो
दोष माझया हारण्याचा मी कुणाला देत नाही

या उन्हाचा सोयरा मी, यातनांचा मी प्रवासी
सावलीला झाड कोठे, येथल्या वाटेत नाही

ते तुझी गातात सुक्‍ते, भावभोळया रे विठोबा
एकदा त्यांच्या मनाचा ठाव का तू घेत नाही

काल ज्या गावात माझी चौकशी केली न कोणी
आज त्या गावात माझा जावयाचा बेत नाही

संपली जेव्हा तयांच्या जींदगानीची कहाणी
एकही ताजा निखारा राहिला राखेत नाही
                                                                    -विजयकुमार राउत


असेहि नाही


मनासारखे घडेल सारे, असेहि नाही
नशिबाचे चमकतील तारे, असेहि नाही !

तुफानास तू देशिल टक्‍कर जेव्हा जेव्हा-
तुला साथ देतील किनारे, असेहि नाही !

भरुन येईल काळीज जेव्हा आभाळाचे
मयुराचे फुलतील पिसारे, असेहि नाही !

जीवन म्हणजे, सागर नाही, स्वर्ग सुखाचा
दुःखाचे नुसतेच पहारे, असेहि नाही !

जरी नसेना ही सजलेली वाट फुलांनी
पायतळी असतील निखारे, असेहि नाही !

विजयाचा आनंद कुणाला व्यक्‍त कराया
हवेत केवळ ढोल, नगारे असेहि नाही !



                                                 विजयकुमार राउत

                                                            ट्रॅक्‍टर कंपनी चौक
                                                              हिंगणा रोड

सोमवार, 22 दिसंबर 2014

आमदंगल (लघुकथा)


                                                                               * विजयकुमार राउत





कोजागरी पौर्णिमा जवळ आली अन्‌ं दस-याचं सोनं लुटलं की दुसऱ्याच दिवसापासून गावात आमदंगलीची तयारी युद्‌धस्तरावर सुरू व्हायची. याहीवर्षीची कुस्ती पंचक्रोशित गाजली पाहिजे, या विचारानं नवनियुक्‍त सरपंच बारकू पाटलानं कुस्त्यांचं जंगी आयोजन करण्याचं निवडून येताक्षणीच ठरवून टाकलं होतं. वर्चस्व दाखविण्याची दुसरी नामी संधी नव्हती. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांची मिटींग बोलावून त्यात एकमुखानं ठराव पारितही करून घेतला आणि गावात सिरप्याकडून दवंडीही देउन टाकली. यावर्षीच्या कुस्त्या "भूतो न भविष्यतीच ' झाल्या पाहिजेत, म्हणून बारकू पाटलाने ग्रामपंचायतीच्या अर्थसंकल्पात विशेष तरतुद करून घेतली. यामागंच कारणही तसंच होतं. यावर्षी गावात ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुका नुकत्याच आटोपल्या होत्या. नवनियुक्‍त सरपंच आणि त्यांची कार्यकारीणी ही आमदार खुशालराव झापरे यांच्या गटाची होती. बारकू पाटील हा "सिंगल' हड्‌डीचा होता म्हणून तो आमदारसाहेबांचा हाडाचा कार्यकर्ता असल्याची गावात ख्याती होती. तो बहुमतानं निवडून आल्यामुळं आमदारांचा उत्साह अनंतगुणीत झाला होता. आतापर्यंत बारकू पाटील ग्रामपंचायतच्या बऱ्याच निवडणुका लढला होता. तरीही निवडून येण्याचं त्याच्या अनेक पिढयांनाही जमलं नव्हतं. आमदारसाहेबांनीच विशेष "रस' घेउन त्याला निवडून आणण्यासाठी नको ते ते (वाट्‌टेल ते) प्रयत्न केले.

आमदार निधीतील काही निधी दरवर्षीच्या कुस्ती स्पर्धेसाठी देण्याचं वचन आमदार झापरे यांनी यावेळेस मात्र इमानेइतबारे पाळलं होतं. आतापर्यंत दुस-या पार्टींनच कुस्ती मारून नेली होती. आपल्या कार्यकाळात ही कुस्ती आपल्या गटानंच जिंकली पाहिजे अन्‌ं आपलं नाव सा-या मतदारांच्या जिभेवर खेळलं पाहिजे, म्हणून बारकू पाटील हाडांची काळं करीत होता.

गावात कुस्त्यांचेबी दोन आखाडे. कुस्त्यांतबी इतर क्षेत्राप्रमाणं राजकारण शिरलं. प्रत्येक गावात दोन गट असतात तसे कुस्त्यांच्या आखाडयांचे दोन पक्ष परंपरनेनुसार गेल्या काही वर्षांपासून तयार झाले होते. एक गट खशाबा पहेलवानाचा तर दुसरा हशाबा पहेलवानाचा. या दोन्ही पहेलवानांच्या गटांतून विस्तवही जात नव्हता. यावर्षी कुस्ती जिंकायचीच या ईर्शेनं रात्रींचा दिवस आणि दिवसाची रात्र करून खशाबा पहेलवानानं चांगलीच मेहनत घेतली. दिवसभऱ्यात हजार दंड बैठका मारल्याशिवाय कुणाला "बाहेरकडे' जरी लागली तरी त्यानं ती पोटात जिरवून पुन्हा दंडबैठका माराव्यात, कारण त्याशिवाय दुस-याची आपल्याले जिरवताच येत नाही, असा गुरूमंत्र त्याला त्याच्या गुरूनं खाजगीत दिला होता.
दंड पेलणे, मालिश करणे, उठबशा काढणे, प्रतिस्पर्ध्यांला मातीत लोळवणे आदी कसरती नवशिक पहेलवानांकडून करवून घेण्याचा वस्तादांचा एकमेव कार्यक्रम गावात सुरू होता.


जत्रेचा दिवस समोर आला. कमलाबुढ्‌ढीनं मोठया परिश्रमाने जमा केलेल्या शेणाच्या गोवऱ्या नातवाच्या मदतीनं धाब्यावरून काढून घेतल्या आणि एका पोत्यात भरल्या. तेव्हा तिचा अल्लड नातू, परश्‍यानं तिला हटकलं
"आजी कायले गोव-या काढतं वो. माहया मायनं तुहया सरणासाठी ठेवल्या नं थ्या.'
"माहालेका. म्या मेली पाहजेन म्हूण टपून बसला कारे. बांडबोहारीच्या...'. असं म्हणंत बुढीनं त्याला हटकलं.


स्वयंपाकाची भांडीकुंडी दुस-या पोत्यात भरून जत्रेला जाण्याची तयारी म्हातारीनं पूर्ण करून घेतली होती. एक पोतं सुनेच्या आणि दुसरं नातवाच्या डोक्‍यावर देउन त्यांना मायमाजीच्या देवळाकडे रवाना केलं. मागून रिकाम्या हातानं काठी टेकत ती अख्ख्या गावातील बाया बापडयांना मारूतीच्या मंदिराकडे चालण्याचं आवतन देत फिरू लागली.
"आवं पारबते, आवं झालं कावो बाई ? कववरी घरातलंच करत राहयशिन वो..चालनं मायमाजे लवकर.. झालं पडतवरी देवाले परसाद दाखवून घरी आलो पाहजेन न वो माय. काहून तिथीच राहायचं आहे का? तुमाले अक्‍कलगी काई हाये कावो. काय माय बाई...'
सासूरवाशिनी सुनांनी तिच्या तोंडाचा दरारा पाहून मुकाटयानं आटोपतं घेतलं.



ग्रामपंचायतनं आठ दिवसापासून शाळेतल्या पोट्‌टयाहीच्या हातानं ग्रामस्वच्छता मोहिम राबवून गावाची स्वच्छता करून घेतली. गावच्या मुख्य रस्त्यावर सकाळचा कार्यक्रम आटोपण्यास पोटयाबाट्‌टयांसह त्यांच्या मायबापांना मनाई करण्यात आली. निदान आमदंगल होईपर्यंत तरी उघाडयावर बसायचं नाही, असं स्वतः बारकू पाटील आणि चमचे, मतदानासाठी मतदारांना पटवतात तसं पटवू लागले. मायबापही काही दिवसांचीच कटकट म्हणून अनेच्छेने का होईना दूर जाउन "गेम' साधू लागले.

स्वागतासाठी ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर सरपंचाच्या रंगीत फोटोसोबत वरच्या भागास आमदार साहेब उभ्या "पोज'मध्ये आणि उतरत्या क्रमानं पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचे फोटो बॅनर्सवर नाटके पेंटरकडून रंगवून घेण्यात आले.
गावाला त्या दिवशी जत्रेचं स्वरूप आलं होतं. आजूबाजूच्या गावातून कुस्त्या पाहण्यासाठी गावक-यांनी मोठी गर्दी केली होती. नदीच्या पलीकडच्या विस्तीर्ण प्रांगणात एका बाजूला कुस्त्या तर दुस-या बाजूला स्वयंपाकाची जयत तयारी सुरू होती. चिंचेच्या जुन्या झाडाखाली असलेल्या मारूतीच्या मंदिराच्या शेजारी बायांनी आपले स्वयंपाकाचे बिऱ्हाड मांडले होते. बायाबापुडया मंदिराच्या आवारात स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या होत्या
.
"आवं रूखमे. चांगला धुना पेटवजो बाई. जरा जास्तीच्या गोव-या लावजो माय. वल्या गोव-यां बरूबर पेटतच नाही पोरी '

नवीनच लग्न होउन सासरी आलेल्या गावातील सुनांना कमलाबुढ्‌ढी उपदेशाचे डोस पाजत होती. गावच्या म्हाताऱ्या बायांना दुसरे कामधंदे नसल्याने एकमेकींजवळ सुनांचे उखाळे-पाखाळे काढीत सुनांना कामात थोडीफार मदत करीत होत्या. सकाळपासून तोंडात असलेली सुपारी पुन्हा पुन्हा चघळत बसल्या होत्या. इकडं गोवऱ्यांचं भकभक धुर सोडणं हळूहळू सुरू झालं होतं.
आमदार साहेबांना ताबडतोब मुंबईला निघणं आवश्‍यक होतं, म्हणून बारकू पाटलानं आमदारसाहेबांच्या हातानं कुस्तीस्पर्धेचं उद्‌घाटन करून त्यांना कधीचंच मोकळं करून रवानाही केलं होतं.

गावोगावाहून आलेल्या पहेलवानांच्या कुस्त्याची पूर्वतयारी आता अंतिम चरणात पोहोचली होती. कुस्त्यांच्या स्पर्धेत बाजी मारलेल्या पहेलवानांसोबत लंगोटया घालून, अंगास चांगलं सरसूचं तेल चोपडून काही नवीन पहेलवानही आखाडयात उतरले होते. उन्हात त्यांचे काळेकुट्‌ट अंग डोम्या नागासारखे लखलख चकाकत होते.
"स्टॅमिना ' टिकून राहावा म्हणून कोणी दंड बैठका मारीत होतं. मातब्बर पहेलवानांच्या अंगाची चांगली रगडून मालीश करून देण्यासाठी गावातील मालिश "स्पेशालिस्ट' गण्या म्हाली व त्याचे सहकारी अविरत गुंतले होते.
शेजारच्या गावावरून बोलाविण्यात आलेल्या बंडोबा धमाल पार्टीनं कुस्त्या सुरू होण्यापूर्वीच वातावरण निर्मीती व्हावी, म्हणून जोरजोरात "ढम्‌ ढम्‌ 'वाजविणे सुरू केले होते. आमदार साहेबांच्या आदेशावरून पंच म्हणून गावातील "सेवानिवृत्त' पहेलवांनांची नेमणूक करण्यात आली होती.
गावातील छोटी पोरं आईबापांजवळ हट्‌ट करून जत्रेतलं काहीबाही घेउन मागत होती. आणि ते न घेउन दिलं तर "टय्‌ा टय्‌ा.'. करून मोठयानं भोकाड पसरीत होती.

भोंबल्यानं तोंडात सिट्‌टी पकडून ती वाजविण्याची एकदा "प्रॅक्‍टीस' करून पाहिली. नंतर सरपंच बारकू पाटलाच्या आदेशावरून दोन्ही गालांचा चंबू फुगवित त्यानं ती मोंठयाने फुंकलीही. तसं सगळयांचं लक्ष आखाडयाकडं गेलं. आता गर्दी चांगलीच जमली होती. चिंध्या वस्तादनं एका पहेलवानाचा हात पकडून
" बोला... हाय का हया डोम्या पहेलवानाले जोड' असं म्हणतं "चॅलेंज' केलं. गर्दीतील सगळे उत्सुकतेनं पाहात होते. कोण पुढे येणार, याची प्रत्येक जण मनोमन चाचपणी घेत होता. इतक्‍यात मागच्या बाजूनं कोणीतरी अगडबंब पहेलवान गर्दीतून वाट काढीत अगडधुतासारखा पुढं येउन उभा ठाकला.

" मी हाओनं ..कोण लढते माहयासंग.. सांगानं कोणाची देउ जिरवून. चांगला दावतोच त्याले माहया हिसका'
असं म्हणत त्यानं अंगाला आळोखेपिळोखे दिले. दोघांचीही कुस्ती लावून देण्यात आली. दोघांनही जमिनीवरची माती हातात घेताना भूईला नमस्कार केला आणि आपापल्या गुरूंचं नावं घेत कुस्तीचा पवित्रा घेतला. प्रतिस्पर्धी पहेलवानास एकमेकास चित करण्याचा प्रयत्न करू लागले.
पण एकही पहेलवान दुसऱ्या पहेलवानाच्या हातात आपली टांग दयायला तयार नव्हता. त्यापैकी पहिल्या पहेलवानाचे डाव कमी पडल्यामुळं दुसऱ्याच्या हातात नकळत त्याची उजवी टांग आली. दुसऱ्यानं आवडाव पाहून धाडदिशी त्याला कवटयात धरलं आणि पायांची कैची करून छोबीपछाड मारली. पुढचा गडी एका क्षणात जमिनदोस्त झाला.


पुन्हा शिटी वाजली. दुसरा पहेलवान विजयी झाला. बंडोबा धुमाळ पार्टीचा ढोल जोरजोरात वाजू लागला. गर्दीतून विजयी पहेलवानाला उचलण्यासाठी काही जणांनी धाव घेतली. त्याला डोक्‍यावर घेउन ते नाचायला लागले. विजयाच्या उन्मादात गर्दीतून धकलाधकली करीत त्याला बाहेर नेउन त्यांनी विजयाचा जल्लोष केला.
पहिल्या कुस्तीचा जल्लोष झाल्यानंतर दुसरी कुस्ती खेळण्यासाठी हशाबा व खशाबा पहेलवान मैदानात उतरले. पुन्हा तोच प्रकार सुरू झाला. दोघांत चांगली जुंपली. कोण विजयी होंईल याचं गणित लावण्यात सगळें तल्लीन झाले होते. काहींनी दोन्हीकडून पैज लावली होती. कुस्ती बराच वेळ रंगली.

इतक्‍यात कोणीतरी बाई मोठयानं ओरडून उठली.
"आवं माय.... धावारे बाप्पा ...पय गे बाई...' इतरही बाया तिचा सुर आळवित सैरावैरा जिकडं वाट मिळेल तिकडं पळायला लागल्या.
इकडं कुस्तीत सगळा जमाव हरखून गेला होता. बारकू पाटलाच्या कानावर बायांचा कल्लोळ ऐकू आला.

"आबे..पळा रे........ चिचवरच्या आग्या मोहयराच्या माशा होयेनं खवळल्या. भाडीत गेली कुस्ती' असं म्हणून बारकु पाटील धोतर सावरत पळू लागला. खवळलेल्या माशां वादळासारख्या.. "घों... घों.'. करीत कुस्तीच्या आखाडयाकडे वळल्या होत्या. तोपर्यंत अनेकांना माशांनी चावा घेतला होता. थव्या थव्याने त्या कुस्तीच्या फडापर्यंत येउन पोहचल्या होत्या. जो जिकडे वाट मिळंल तिकडं आश्रय शोधत पळत सुटला होता. कोणाचा पाय कोणाच्या धोतराच्या काष्टयावर पडत होता. याचंही कुणाला भान नव्हतं. गडबडीत कुणाची तरी लात पडल्यानं बारकू पाटलाचं धोतर कमरेपासून केव्हाचं वेगळं झालं होतं. तो नुसताच चड्‌डीवर टूनटून उडया मारत पळत होता. चिंचेखालचा धूर नाकातोंडात गेल्यानं मधमाशांनी आता अक्राळविक्राळ रूप धारण केलं होतं. विशेष करून उघडया अंगावर तेल चोपडलेल्या पहेलवानांचा पाठलाग करीत त्यांना जोरात चावा घेणं त्यांनी सुरू केलं.
पळता पळता एक पहेलवान जीवानिशी किंचाळला.

" मेलो रे बाप्पा........'
पळणा-या पहेलवानांच्या मागं बंडोबा धमाल पार्टीचे वाजंत्री ढोल बडवित पळू लागले. मधमाशा पिच्छा सोडतील म्हणून जे हातात असेल ते मोठामोठयाने वाजवित होते. भोंबल्या सिटी फुुंकत सैरावैरा पळत होता. चटणी लावल्यासारखी अंगाची आग पेटल्यामुळं बाजूच्या नदीत उडी घेउन काहीं पहेलवानांनी आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मधमाशांनी कमी वेळात नको त्या ठिकाणी आपला इंगा दाखविला होता

.


आमदार साहेबांच्या गाडीचे "ब्रेक' थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पटांगणातच लागले. त्यांच्या मागं त्यांचा पी.ए लसनापुरे आणि पक्षाचे चार दोन कार्यकर्ते दवाखान्याच्या आत शिरले. मधमाशांनी उघडया अंगावर दंश केल्याने बरेच जण, आहे त्याच्या दिडपट फुगले होते. कोणी कसं तर कुणी भलतंच काही दिसत होतं. कोण कुठे आहे, हे ओळखणं आमदारांना कठीण झांलं होतं..

"माय.. वं...आरे बाप्पा रे ' करीत सगळे विव्हळत होते. जखमींपैकी एक दोघांजवळ जाउन आमदारसाहेबांनी विचारपुस करण्याच्या निमित्तानं बारकू पाटलाला शोधण्याचा प्रयत्न केला.

"बारक्‍या कुठांय रे?' असं म्हणत असताना आमदारसाहेबांचा हात गंगाराम पहेलवानाच्या फुगलेल्या दंडावर पडला. तसा गंगाराम जोरात विव्हळला.
"आरे बाप्पा ... मेलो रे .. ... जी आमदार साहेब..बारक्‍याचं मढं थ्या तिकडं हाये कोंटयात...... मी गंगाराम होवो न बाप्पा ...एवढया लवकर वळखबी इसरले का जी.?'
"आरं च्या बहिन दुसरंच निघालं' म्हणून आमदारसाहेबांनी पुढची वाट धरली.
कोप-यावरच्या पलंगावरून आमदार साहेबांना कोणीतरी विव्हळतंच हाक मारली. तो बरक्‍याच असावा म्हणून आमदार त्याच्याकडे वळले. सिंगल हड्‌डीचा बारकू पाटील डबल रोटीसारखा झाला होता.
"आबे बारक्‍या, तू कायले भाडीले कुस्ती खेळला बे? 'आमदारसाहेबानं चौकशी केली.
"मी कुठं कुस्ती खेळलो जी आमदारसाहेब? थे आग्या मोहोरच कुस्ती खेळलं नं बाप्पा आमच्यासंग. आन्‌ त्यानं माही अशी हालत करून ठेवली जी.'
आग्या मोहोळाच्या हल्ल्यात बारकू पाटील जखमी झाल्याचं आमदार झामरे यांना फार दुःख झालं. त्यांनी भरून आलेला गळा साफ केला अन्‌ पीए लसनापुरे यांना आवेगानं हाक मारली.
" लसनापुरे . आपातकालीन अवस्थेत आग्या मोहळाच्या माशांच्या हल्ल्यात मेंदाळ गावचे गावकरी जखमी झाल्याबद्‌दल या सगळयांना दहा दहा हजाराची मदत देउन टाका'
टिव्हीवर प्रतिक्रिया दिल्यासारखे आमदार तावातावात पत्रकारांसमोर बोलून गेले.
अतिव दुःखानं विव्हळत पडलेला गंगाराम आमदार साहेबांच्या घोषणेनं आनंदाच्या भरात नाचायलाच उठला. पण अंगाची इंगळी चावल्यागत आग झाल्यानं पुन्हा तितक्‍याच झपाटयानं "आरे बापारे' म्हणत तो पलंगावर कोसळला.

                                                                                                       *  विजयकुमार राउत


वरात (लघुकथा)



                                                                          * विजयकुमार राउत



छप-याचा गंगाराम लगीन जुळल्यापासून लई म्हणजे लईच खुश होता. त्याला सगळी दुनिया सिनेम्यासारखी वाटाले लागली होती. अगदी तीर मारल्यासारखा तो गावात वावरू लागला. त्याच्या होणा-या बायकोची तुलना तो उठसुठ कोणाही जवळ ऐश्‍वर्या रॉयशीच करत होता. ती ऐश्‍वर्या रॉय होती, म्हणून हयाला आपलं उगीच सलमान असल्यासारखंच वाटायचं. त्याचा एवढयात सिनेमे पाहायचा शौकही मस्त रंगात आला होता. दर दिवसाआड नागपूरात जाउन तो ब्लॅक तिकिट घेउन एैश्‍वर्या नाही तर सलमान खानचा सिनेमा हमखास पाहूनच घरी यायचा. कुठल्या कामात त्याचं लक्ष लागताना दिसत नव्हतं. त्याच्यात झालेला बदल पाहून सगळे दोस्तही त्याची मजा घेण्यासाठी त्याला "छप-याचा सल्लू' म्हणून हाक मारत होतें. कोणी जवान पोरगी रस्त्यात दिसली तर तिला पाहून मुद्‌दामहून "शिला शिला की जवानी' नाही तर "मुन्नी बदनाम हो गयी' असं मोठया आवाजात गुणगुणायचा. उत्तरा दाखल पोरीकंडून त्याला चांगल्या शिव्यांचीं लाखोली वाहीली जायची. पण गंग्याला काही फरक पडत नव्हता. त्याचं असं वागणं सगळयांना त्रासदायक ठरू लागलं होतं. शेतीकडे गंग्याचं दुर्लक्ष होउ लागलं. त्याचा बाप लक्ष्मण बुढ्‌ढाही गंग्याच्या या हरकतीने कमालीचा वैतागला होता. कारण शेतातील संगळी कामं आता त्यालाच करावी लागत होती. त्याचं लग्नं जुळल्यामुळं लक्ष्मण बुढा अधिकच चिंतेत पडला होता. "कराले गेलं काय आन्‌ उल्टे झाले पाय' अशी स्थिती म्हाता-या बापाची झाली होती. एक दिवस मात्र शेतातून कामावरून आल्या आल्या बापाने सखू बुढ्‌ढीजवळ गोष्ट काढलीच.
" कोठं गेलं वो थे पोट्‌टं?'
"काजीन का बाप्पा. एवढयात तं घाडंच रंग करून राहयलं..'
"तूनंच चढवून ठेवलं त्याले'
"आतं वं माय. माहयचं नाव घेते हया बुढ्‌ढा. मीनं कायले चढवलं वं त्याले? बरूबरच्या पोराहीचे लग्न होउन त्याईले लेकरंही झाले आन्‌ हेच राहयलं होतं लग्नाचं. गावात लंगलंग हिंडते आणं कलागती आणून पाडते. म्हणून म्या म्हणलं का त्याचं लगीन करून दया म्हणून.'
"आवं तं लगीन झाल्यावर सुधरते का बिघडते मायमाजे? हे पोट्‌टं तं लईच नखरे करून राहयलं. बहिन माय, लगीन जोडलं तईच मले वाटलं होतं.. हे असंच करंण म्हणून. चांगलं कामागीवर लक्ष लागनं म्हणलं लेकाचं. बापाचं वझं हलकं होईन म्हणलं. त्याचं तं भल्लंतच सुरू राहयते. वावराकडं लक्ष दयाचं काही सुचतच नाही त्याले. इची बहिण आताच तं आपल्याले गिनत नाही. लगीन झाल्यावर का झाट गिनते?'
बाप असाच काही बुढ्‌ढीले बोलून गंग्यावरचा राग "वडयाचं तेल वांग्यावर काढावं' तसा बुढीवर काढत राहायचा. गंग्या मात्र सलमान खानसारखी दंड दाखविणरी बनियान, तंग जिन्स पॅंट, डोळयावर काळा गॉगल्स घालून गावात फिरत होता.. एवढं कमी झालं म्हणून तो नागपूरला गेला तेव्हा हजामतीच्या "स्टॅंडर्ड' दुकानात गेला. कटींग दाढी केली. आरश्‍यात चेंहरा आडवातिरपा करत त्याच्या बापाच्या वयातल्या सलूनवाल्याला म्हणाला..
"काकाजी. कटींगतं करू देल्ली माही. दाढीबी भादरून देल्ली. आता मिशीबी काढून ठेवली जी? कसा दिसतो थेच पाहाचं हाये मले.'
न्हाव्याने मागे पुढे न पाहता त्याच्या बोलण्याबरोबर मिशीवरून सपक्‌न वस्त-याचा हात घुमवला.
त्याला बिनामिशीचा पाहून बुढ्‌ढयाची विंचू चावल्यागत आग झाली.
तो घरी येताच बुढ्‌ढा जोरात त्याच्यावर खेकसला.
"आता लग्नाच्या आंधी माही तेरवीबी करून टाकशिन तं बरं होईन. च्या मायले कोणत्या नाच्याले जलम देल्ला मीनं तं'
"काउन म्या का केलं? मिशी काहाडली तं कोणतं बिघडलं. हिरोलोक नाही काहाडत का? मोठमोठें लोक काहाडतेत. तुमच्या जवानीत नाही केल्ते का तुमी नखरे?. मीनं तं मिशीच काहाडली. तुमी तं तमाशात बी नाचले होतें म्हणतेत...बायल्यासारखे...तुमच्यापरीस मी बरा हाओ.' गंग्यानं बुढ्‌ढयाले चांगलीच सुनावून दिली..
चिरंजिवांच्या तोंडातून पडलेली ही मुक्‍ताफळे ऐकताच बुढ्‌ढयानं कपाळावर हातच मारून घेतले आनं कायले अशा चित्तर पोट्‌टयाले जन्म देल्लां म्हणून सखू बुढीवरच ताव खाउ लागला.
*******

लग्नाची तारीख आता जवळ आली होती. गंग्या आपली केव्हीबी उतरून ठेवन म्हणून लक्ष्मण बुढ्‌ढयानं गंग्याशी बोलनंच बंद केलं. घरातील संगळे कामं बुढ्‌ढी गंग्या नाहीतर नोकरचाकरांकडून पूर्ण करून घेउ लागली. पत्रिका वाटण्याचे काम तेवढं गंग्यानं हाती घेतलं होतं. दिवसभर मस्त घुमायचं अन्‌ सिनेमा पाहयचा. बस एवढंच काम.


गंग्याच्या लग्नाचा दिवस एकदाचा कसाबसा उगवला. सगळी तयारी झाली होती. बॅंडपासून वरात नेण्यासाठी लागणारे मेटॉडोअर दारात येउन कधीपासून उभे होते. बॅंडवाले खूप वेळेपासून कंटाळा आल्यासारखे वाजवत होते. गंग्या नवरदेव झाल्यामुळे फारच एैटीत वागत होता. बॅंडवाल्यांचे जुने गाणे ऐकून गंग्या सणकला.
"काउन तुमाले नवीन गाणे वाजवता येत नाही का गा? तवांचं पाहूनच राहयलो. मयतीसारखे वाजवून राहयले. काउन तुमचा बाप मेला कारे? चांगले "ढिंग चिका ढिंग चिका' गाण लावानं.' गंग्याच्या रागावल्याने बॅंडवाले जाग्यावर आले. त्यांनी आता येत नसलेले गाणेही कसेबसे गाल फुगवून फुगवून वाजवणें सुरू केले. लक्ष्मण बुढा पाहुण्यांसोबत बोलत बाजूला उभा राहून काहीतरी सांगत होता. सगळे सोपस्कर पार पडल्यावर गंग्यानं नवरदेवाच्या गाडीच्या समोर नारळ फोडला. नारळाचा डोल टण्‌कन उडून लक्ष्मण बुढ्‌ढयाच्या
टकू-यात जाउन बसला. तसा लक्ष्मण बुढा बोंबलून उठला.
"आरे बापा मेलो रे .... हया पोट्‌टयानं घेतला रे माहया जीव....'
नात्यातल्या लोकानीं धावपळ करून लक्ष्मण बुढ्‌ढयाला धरून सावलीत नेलं.
" बरं झालं नारेळच नाही सुटलं हातातून. नाही तं डोक्‍सच गेलं होतं कामातून. खूप लागलं काजी?' जो तो चौकशी करू लागला.
लक्ष्मण बुढ्‌ढया त्यांच्यावरच खेकसला
" आरे त्याले काही सांगानं. मलेच इचारून राहयले तं. आता हेच राहयलं होतं माहया नशिबात. कोणत्या नक्‍तीरात जलमलं तं माहित नाही हे पोट्‌टं'
"जाउ दया बावाजी. व्हाचं नव्हतं होउन गेलं. लगीनगी झालं म्हणजे सुधरंण. ' लक्ष्मण बुढ्‌ढयाच्या जवळच्या नात्यातंल्या एकानं लक्ष्मण बुढयाची समजूत काढली.
" आता नशिबाचे भोगच तसे असतीन तं कोणाले सांगाव च्या बहिण?'
******
सगळं व-हाड मेटॉडोअर कोंबून एकदाचं नवरीच्या गावाकडे रवाना झालं.
गावात पोहचताच गाडी बसस्टॅंडवर थांबली. व-हाडी खाली उतरले. मारोतीच्या देवळासमोरच्या पटांगणात वधुपक्षाचे लोक घयायला येतील म्हणून व-हाडी वाट पाहात बसले होते. व-हाडी मंडळापैकी काही हौसी वराडी शिण घालविण्यासाठी दारूच्या दुकानाचा शोध घेत गावात फिरू लागले. वराकडील मंडळीला सोबत नेण्यासाठी दहा पंधरा जणांसोबत काही महिला हातात पुजेचं सामान घेउन वाजतगाजत येत होत्या. तशी गंग्याची कॉलर आणखी टाईट व्हायला लागली. रितीरिवाजाप्रमाणे सगळं आटोपल्यानंतर मंडपात जाण्याअगोदरच गंग्याच्या मनात भलतंच भूत शिरलं. गंग्या गाल फुगवून कोप-यात जाउन बसला. कोणाला काही कळेचना. वरातीतील काहीं शाण्यासुरत्यांनी त्याला विचारलं.
"गंग्या का झालं गा? पोटगी काही दुखत तं नाही? लेका, सकाळी तुन शेवया खाल्यानं त्या खुपत असंण...नाही तं संडासले नसंन गेला घाईघाईत'
"संडासचा काही इंतजाम करू का?' त्याच्या मित्रानं त्याला विचारलं..
गंग्या कोणाशी बोलायला तयारच नव्हता. काय झालं...म्हणून सगळे चौकशी करून गेले. पण काहीही उपयोग झाला नाही.
"गंग्याले फटफटी पाहयजेन असंण. नाही गा?' एकानं शंका उपस्थित केली.
"नाही नाही चांगली हिरो होंडा गाडी हाये नं त्याच्याजवळ.' दुसरा बोलला.
"मंग फिरीज पाहयजेन असंण..' तिस-यानं पुन्हा शंका घेतली.
"बाप चांगला दो जोडयाचा कास्तकार हाये नं गा. त्याले कायची कमी हाये'
सगळयांनी तर्कवितर्क लावले. पण कोणालाच गंग्याच्या मनाचा थांग लागेना. सासरा नामदेव म्हैसमारे आता अधिकच घाईकुतीला आला होता.
"जवाईबापू, का झालं जी? कसं वाटते? काही तब्येत बरूबर नाही का? डॉक्‍टरले बलवू का?का झाडफुक करणा-याले बलवू?' पोरीच्या बापानं चिंता व्यक्‍त केली.
गंग्या अजूनही गुपचूप बसून होता.
"जावईबापू, काही चुकलं असंण तं हात जोडतो बावा. पण असं करू नोकाजी. का काही कमी राहयलं तं सांगा. आत्तं पूरं करतो'
तरीबी गंग्या तोंड उघडायला तयार नव्हता. वरपक्षाकडील मंडळीलाही आश्‍चर्य वाटलं. एवढा मस्ती करणारा गंग्या चूप कसा? सगळया वरातीत सुकसुक सुरू झाली. गंग्याला काय झालं असावं, त्याचा आपापल्यापरिनं अर्थ लावणं सुरू झालं. कुणी म्हणे का बुढयाचं आणि गंग्याचं निघतेवेळी भांडण झालं. त्याचा गंग्याले राग आला असंण . कोणी म्हणे का देवळाच्या आवारातच त्याची दातखळी बसली. तेव्हा ही जागाच खराब असंण. तं कोणी म्हणे नवरदेवाला कोणी झपाटलं तं नसंन.... बरीच वेळ निघून गेली. तसा वरातील एक जण गंग्याच्या कानाला लागला. त्यानं गंग्या खुलून उठला.
"हे पहा मंडळी. मी दोन मिनीटात गंग्याले घेउन येतो. थो कसा बोलत नाही तं पाहयतोच. याची झाडफुक करूनच आणतो.'
सगळयांना पुन्हा आश्‍चार्याचा धक्‍का बसला. गंग्याला घेउन गर्दीतून वाट काढत दोघेही देवळाच्या मागच्या शेताकडे निघाले सगळे व-हाडी त्यांच्याकडे पाहातच राहिले.
काही वेळानंतर गंग्या आणि परश्‍या डोलत डोलत देवळाकडे परत आले. परश्‍या व-हाडी मंडळीसमोर बोलायला लागला.
"हे पाहा रे बावा. आता गंग्या काउन बोलत नोहता थे खुद गंग्याच सांगनं. मीन आपलं काम केंलं. आता त्याचा निकाल पाहा. आपलं कामच तसं हाये.' नामदेवच्या चेह-यावर समाधनाचे भाव उमटले.. लक्ष्मण बुढा तिथून वेडंवाकळं तोंड करीत दूर झाडाच्या सावलीत जाउन खिशातून बंदरी छाप बिडी काढली आणि ती ओढत बसला. तसा गंग्या एका झटक्‍यात बोलायला लागला.
"मी तवांच पाहून राहयलो मलें तं वा-यावरच सोडलं नवरीवाल्याहीनं. माही काही किंमतच नाही का बा?...'
गंग्याचं सगळे जण उत्सुकूतेने ऐकू लागले.
"माहयंवालं पयलं पयलं लगीन आन्‌ माहयासाठी घोडं नाही आणलं.? समजत नाही का कोणाले? मले आताच्या आता मंडपात जायले घोडं पाहिजेन. त्याच्या शिवाय नाही येणार मी'
गंग्याच्या या वाक्‍यानं नामदेव म्हैसमारे चाटच पडला. वधुपक्षाकडे कुजबुज सुरू झाली.
नामदेवचा मोठा जावई पुढं झाला.
"अजी नवरदेव सायेब. मायं आईकता का? या खेडयात कुठचं आलं जी घोडं? तुम्ही अगोदरच सांगून ठेवलं असतं त काही इंतजाम केला असता. आता येथून नागपूरबी लई दूर हाये. तवा झाली चुक माफ करा. पुढच्या खेपीनं तुमाले बग्गीतून फिरवतो. पण आतातं लगीन लावून घ्या' नामदेवचा मोठा जावई बोलला.
गंग्या तरी ऐकायला तयार नव्हता. त्यानं ब-याच वेळपर्यंत एकच रि ओढली होती की घोडं पाहिजे म्हणज ेपाहिजे. लग्नाची वेळ निघून जात होती. गावातली शहाणीसुरती माणसं पुढं झाली. त्यांनीही गंग्याले समजविण्याचा आळीपाळीनं एकेकदा प्रयत्न करून पाहिला. पण सगळं निष्पळ. शेवटी वधुपक्षाकडील काही मंडळी जरा दूर जाउन एकमेकांशी बोलत उभी राहिली.
वधुपक्षाकडील एक जण तावातावात पुढं झाला.
"ठिक हाये जाव्रईबापू. काही येळ थांबा. घोडाच आणतो. तुमची वरात घोडयावरच वाजत गाजत नेतो मंडपात. ' असं म्हणून चारपाच जण कुंभाराच्या घराकडे तरातरा निघाले. गावाच्या बाहेर कुंभाराची वस्ती होती. मंडळी वस्तीत शिरली. गोम्या कुंभाराच्या घराजवळ सगळे उभे राहिले. त्यातील एकानं गोम्या कुंभाराचा पो-या गण्या हयाला जोरात हाक मारली. आवाज ऐकूण एक तरूण पोरगी घराच्या बाहेर डोकावली.
"गण्या हाये कावं पोरी घरी?' एकानं पोरीला विचारलं.
"न्हाई जी?
"कुठं गेला.?'
जंगलात गेले.ढोरं चाराले.'
"हात तिच्या बहिण. ....' दुस-यानं तोंड वेडवाकडं केलं.
"ठिक आहे. चालारे....' त्या मंडळीने तिथून काढता पाय घेतला आणि जंगलाच्या दिशेने तरातरा पायीपायीच निघाले. गावाच्या बाहेर जंगल होतं. घनदाट झाडीतून वाट काढीत मंडळी एका ओढयाजवळ पोहचली. त्यांच्यापैकी कुणालातरी गुरं चारताना गण्या दिसला. मंडळीचा जीव भांडयात पडला..
"राम राम जी जवाईबापू' गण्यानं त्या मंडळीला नमस्कार केला.
"राम राम. गणू भाउ. एक काम होतं तुहयासंग'
"काम आणं माहयासंग? गरीबासंग कोणतं काम हाये जी?' हसत हसत गण्या बोलला.
"काम असं होतं गडया. तुहय खेचर पाहयजे होतं. नवरदेव भाईच रूसला. आता घोडं कुठून आणावं? म्हणून म्हणलं का तुहय खेचरच काम देईन.'दुसरा बोलला.
"का बोलता जी? माहया चंप्याले आदत नाही नं जी लग्नाइची? थे काम देईन का नाही सांगता येत नाही बा' गण्यानं आधीच खुलासा केला.
"काई नाही होतं. तुू फकस्त आमच्या संग खेचराले घेउन चालं. तुले लागनं तेवढे पैसे देतो' मंडळीपैकी एकानं गण्याला विनंती केली. गण्या नाही हो म्हणता तयार झाला.

******
गाव लागताच एक ओढा आडवा लागला. त्यात गण्यानं त्याच्या खेचरला चांगलं घासून घासून धुवून काढलं. गावात आल्यानंतर त्याला चांगलं सजविलं आणि व-हाड थांबलं तिथं मारोतीच्या देवळाकडें घेउन आला. तोपर्यंत सारेच कंटाळून गेले होते. राहून राहून भुकेने तोंड फाडत झाडाच्या आस-याने बसले होते.
"हे घ्या घोडं भाउ. आता बसा चांगले याच्यावर राज्यासारखे' एकानं फर्मान सोडलं.
गंग्या खेचराजवळ आला. त्यानं त्याला खालपासून वरपर्यंत चांगलं न्हयाळलं. काही वेळ मंडळीकडे संशयाने पाहातच राहिला.
"हे होये का घोडं.? मीच राहयलो होतो च्युत्या बनवाचा, नाही ?'
"न्हाई. गधं होये. नाही चुकलो चुकलो. खेचर होये. घोडयाचा लहान भाउ.' चूक सुधारून घेत एक जण बोलला.
"हे गधं आन घोडं यांचं एकत्रीत मिश्रण हाये. पिवर हायब्रीड हाये' एकानं मुद्‌दाम खुलासा केला.
" आता न्हाई म्हणू नका. लईच तरास झाला वराडी मंडळीले . लहान पोराबाराईले भूक लागली असंण. तुमी याच्यावर बसले तं तुमचे लई उपकार होतीनं' मंडळीपैकी एक जण अगदी रडकुंडीला आला होता.
क्षणभर विचार करून गंग्या शेवटी स्वतःला सावरत खेचरवर जाउन बसला. वरपक्ष आणि वधुपक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. आनंदाच्या भरात बॅंड वाजायला लागला. पोरं गाण्याच्या तालावर नाचायला लागली. सगळं व-हाड लग्नमंडपाकडे मार्गस्थ होण्यासाठी सिद्‌ध झालं. वाजतगाजत व-हाड पुढं पुढं सरकू लागलं. गण्याच्या हातात खेचराचे कासरे होते. अधूनमधुन तो त्याला चांगलं चुचकारत चालत होता.
वरातीतील एकाला नाचता नाचता हुकी आली. त्यानं जवळ आणलेली फटाक्‍याची माळ जमिनीवर अंथरली आणि आगपेटीतील काडी बाहेर काढून ती उगाळली. जळलेली ती काडी फटाक्‍याच्या वातीला लावताच फटाके धाडधाड फुटू लागले.
दणाण दाण्‌....दणाणदाण........
एवढा वेळ मुकाटयानं चालत असलेलं खेचर बिथरलं . गण्याने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला. पण तेही कोणाच्या बापाला ऐकायला तयार नव्हतं. फटाके फुटने अजुूनही सुरूच होते. खेचर चांगलंच बिथरलं. गण्या कुंभाराला ते काही केल्या ऐकत नव्हतं. घाबरलेलया खेचारने गण्याच्या हाताला जोरात एक झटका मारून जंगलाच्या दिशेने नवरदेवासहित धुम ठोकली. सगळे ओरडायला लागले. हातात जे सापडेंल ते त्याच्या दिशेने फेकून मारू लागले. परंतु खेचर आणखी जोरात पळू लागलं. खेचर आणि गंग्या दोघेही नजेरआड होईस्तोवर सगळे व-हाडीदम टाकत धावत होतें. खेचर गंग्याचं "हरण' करून जंगलाच्या दिशेने वायुवेगाने पळत होतं.


.*******
वरवधुपक्षाकडील आठ दहा जण जंगलात वेगवेगळया दिशेने गंग्याचा शोध घेत होते. पण गंग्या आणि खेचराचा कुठेच पत्ता लागत नव्हता. शेवटी एका झुडूपात कोणीतरी कन्हतांना दिसलं. जवळ जाताच तो गंग्याच असल्याचीं काही लोकांना खात्री झाली. गंग्याची एका मुक्‍या प्राण्याने चांगलीच जिरवली होती. झुडपात फसलेल्या गंग्याला मोठया हिकमतीनं बाहेर काढण्यात आलं. ओढयात नेउन त्याला आंघोळ घातली. दोघा-तिघांनी हिरोहोंडावर बसवून त्याला गावात आणलं. त्याचा शेकनिवा केला. चांगले कपडे घालून दिले . त्याला धरून एक दोघांनी आधार देत लग्नमंडपात आणलं. दोघांनी दोन हातांनी त्याला अलगद धरले होते. मंगलाकष्टके सुरू झाली, तेव्हा गंग्या वेदनेने विव्हळत होता. मंगलाष्टके आटोपल्यानंतर ब्राम्हणाच्या सांगण्यावरून त्यानं मित्रांच्या हाताच्या सहा-यानं नववधुच्या गळयात माळ घातली. वधुचा हात लाजत लाजत त्याच्या गळयाजवळ गेला. पुष्पमाला टाकताना गर्दीत तिच्या हातांचा धक्‍का गंग्याच्या अंगाला लागला, तसा तो जोरात किंचाळला.
" मेलो रे बाप्पा........'

                                                                               . * विजयकुमार राउत             

                                                                               साईनगर, हिंगणा रोड
                                                                                 नागपूर 16

गुड मार्निंग



                                                                                              * विजयकुमार राउत


आमसभेसाठी गावकरी ग्रामपंचायतच्या आवारात तासभ-यापासून आपसात कुजबुज करीत बसले होते. समोर कार्यकारीणीचे सदस्य आणि ग्रामसेवक पि.के. कदम खुर्च्यांत बसून कुणाची तरी वाट पाहात होते. त्यापैकी सरपंच ढेबरू काळदाते अधूनमधून मनगटाच्या घडयाळात किती वाजले, याचा अंदाज घेत होते, तर त्यांच्या बाजूला बसलेल्या महिला सदस्या केव्हापासून बेचैन झाल्या होत्या. बोलता बोलता नाक मुरडत मारक्‍या म्हशीसारख्या ग्रामसेवक कदम आणि सरपंच ढेबरू काळदाते यांच्याकडे पाहात होत्या. त्यांच्या एकंदर हालचालींना साथ देत ग्रामपंचायत सदस्य सदा पूरे यांना असहय झाल्याने ते उठून उभे झाले. अस्वस्थेतून दोनचारदा उठबशा काढल्या. नंतर राहावलं नाही म्हणून ताडकन त्यांनी फाईलवरच्या कागदावर सरपंचचांच्या सहया घेत असलेल्या वासू चपराशाला हाक मारली.
"वास्या अबे ये वास्या..इकडं ये.'
"आलो. आलो..'वासुदेव हातचे काम सोडून ग्रामपंचायत सदस्याच्या हाकेसरशी धावून आला.
"च्या मायले नेवो तं. तवांच वाटच पाहयून राहयलो बे मी. कवा येतीन रे तुमचे सायेब? '
"आता थोडयाचं वेळात येईन म्हणते नं आमचे साहेब' वासू डावा खांदा खाजवत बोलला.
"थे येतीनं तवा येतीन. त्याहीले कामच कोणतं राहयते. आम्ही त्याहीच्यासाठी रिकामं बसून राहाचं का? मले इनीच्या गावले जाचं होतं. तिनं मले बोलावलं हाये. याच वर्षी पोराचं लगीन झालं न. पहल्यांदाच जात होतं तं थेबी राहयलं.. च्या मायले नेओ तं आम्ही कामधंदे सोडून तवांचं झक मारत बसलो आन्‌ थे तिसमारखानसारखे येउन राहयले.' सदा पूरेंचा पारा जाम भडकला होता.
"हो बाई मला पण बचत गटाच्या मिटींगला पण ज्यायचं होतं. बायका वाट पाहात असतीन.' महिला ग्रा.पं.सदस्या मालतीताई कुरकुरे कुरकुर करीत बोलल्या.
"हाउ ना बाई. कवाभी मिटींगा घेते हे लोक. आता का सांगते तं काजिन का बाप्पा! जसं चालते तसं चालू दयाव. नाही तं काय? मलेबी लेकीच्या बाळंतपणाले मेटाउमरीले जाचं हाये.' इतका वेळ गप्प राहिलेल्या दुस-या सदस्या कमलाबाई डोईफोडे डोक्‍यावर पदर घेत बोलल्या.
"गावाची का आता हागमूत बंद करते का थो सायेब?' सरपंचाच्या बाजूनं बसलेला बाजीराव फोकमारे बोलला.
" त्याहीची हागमूत बंद करता करता सरकारचीच याहीनं बंद करून टाकली. आहो गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी वाट्‌टनं थे तितंबे करून पाहयले. रस्त्यांवर हागणा-यांचे जाहिर सत्कार काय केले. उघडयावर बसणा-यांचा पत्ता सांगणा-यांलें इनाम बी देल्ले .. पण काहीच उपेग झाला नाही. ' ग्रामपंचायत सदस्य वाकडे वाकडयात शिरत बोलले.
तेव्हापासून गुपचूप सहया मारण्यात व्यस्त असलेले सरपंच काळदाते शांतपणे बोलले.
"जाउ दयानं राजेहो . आता कोणी आलंच नाही त. थोडया वेळानं चालू करून टाकू आमसभा. कोरम तं तसाबी पूर्ण झालाच हायेनं. मंग कोणाची वाट पाहयाची? ' सरपंचांनी समजूतदारपणा दाखविला.
"ओ कदम सायेब.सुरू करा तुमची आमसभा. लईच झाली भोपाली. आम्ही कववरी वाट पाहात बसावं. मले बी जायचं हाये बाहेरगावले मयतीले. इथं सरपंचालेच थांब म्हणा..' मध्येच गर्दीतून कोणी उभं होत बोललं.
"स्वारी ...स्वारी शांत बसा. थोडा उशिर झाल्याबद्‌दल माफ करा. बिडीओ साहेब येतच हायेत. मला आताच त्यांचा मोबाईल आला होता' कदम समजूत काढण्याच्या सुरात बोलले.
"एक तासापासून वाट पाहून राहयलो. काही कामधंदे नाही का आमाले?' गर्दीतून श्‍यामराव धुसफुसेंनी प्रश्‍न केला.
ग्रामसेवक कदम आता पुरते रडकुंडीस आले होते. त्यांची बाजू घेत सरपंच काळदाते उभे राहिले.
"हे पाहा माहय आयकुन घ्या. आता थोडयाच वेळात ग्रामसभा चालू होईन. आपलं गाव स्वच्छ सुंदर राहासाठी सरकार किती प्रयत्न करते. लाखो रूपये खर्च करते. पण आपण काही आयकालेच तयार नाही..' सरपंच काळदाते यांनी समजविण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
"ओ सरपंच सायेब. तुम्ही आमाले नाकानं गोष्टी सांगता. मांगच्या वर्षी थ्या जयस्वाल सायेबाले गावात बिअर बार सुरू करण्यासाठी कोणं देल्ली एनओसी? ' गावातील एक सामाजिक कार्यकर्तो तावातावानं बोलून गेला.
"होनं तवा नाही घेतली मिटींग. रजिस्टरवर जागा खाली ठेवून मंजुरीचा ठरावबी करून घेतला याहीच्या माणसानं.' विरोधी पक्षाचा एक कार्यकर्ता तावातावानं बोलला.
" हे बघा ही वेळ भांडण्याची नाही. गावाच्या भल्यासाठी राजकारण विसरून विकासाचं राजकारण केलं तर बरं होईन.' गावक-यांची शेकडो तोंडे आवरणे आता सरपंच काळदाते यांना अशक्‍य झाले होते. ग्रामसेवक कदम तो "माहौल' पाहून उभ्या उभ्याच पायात अळखळू लागले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षातील राजकारणाला आता चांगलेच तोंड फुटत चालले होते.
"हे बघा शांत व्हा....शांत व्हा' ग्रामसेवक कदम सगळयांना शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
इतक्‍यात निळया रंगाची जुनी जिप भकभक करीत पटांगणात येउन उभी राहली. ग्रामसेवक कदम व चपराशी वासू हातात फाईल घेउन धावत पुढे झाले. गाडीतून उतरताच बीडीओ मच्छरमारेंनी गर्दीकडे एक कटाक्ष टाकला. कदम यांनी मच्छरमारे साहेबांच्या दडपणाखाली चेह-यावर जबरदस्तीने प्रसन्नतेचे भाव आणले. बीडीओंच्या मागे पुढे होत ग्रामसेवक यांनी त्यांना सभास्थळी आणले. कार्यकारीणीनेही त्यांचं मोैखिक स्वागत केलं.
ग्रामसेवक कदम यांनी वेळ न घालवता माईक सांभाळला.
"हॅलो.. हॅलो.. माईक टेस्टींग...' एकदोनदा माईकवर हाताने टकटक वाजवले अन्‌ फाईल सांभाळत कदम बोलू लागले.
" नुकतेच बीडीओ साहेब गावात आलेले आहेत. आता डायरेक्‍ट मिटींगलाच सुरवात करू ' कदम बोलले.
पुष्पगुच्छाने स्वागत केल्यानंतर ग्रामसेवकांनी विषयालाच हात घातला.
. "आपलं गाव शंभर टक्‍के हागणदारीमुक्‍त व्हावं यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू हाये. आजची मिटींग आहे निर्मल ग्राम आणि हागणदारीमुक्‍त गाव या शासनाच्या अभियानांची माहिती देण्यासाठी. आपलं गाव निर्मल ग्राम करण्यासाठी काय काय करता येईल, यावर मार्गदर्शन करण्यासाठी बीडीओ साहेब बोलणार आहेत. तेव्हा कुणाला शंका किंवा कुशंका आल्यास त्यांनी संकोच न बाळगता काही विचारावं-.'
इतक्‍यात एक जण गर्दीतून उभा होत बाहेर जायला लागला. तेव्हा ग्रामसेवक कदम यांनी त्यांना हातानेच शांत बसण्याचा इशारा केला.
" मले जोराची लघुशंका आली. हात कायले दाखवून राहयले.' बोट दाखवित तो घाईघाईने बाहेर निघून गेला.
कोणी काहीच विचारावयास तयार नसल्याचं लक्षात येताच बिडीओंनी कुठलीच औपचारिका न पाळता माईक हातात घेतला.
"प्रिय बंधू आणि भगीनींनो. ... 'म्हणत बीडीओ मच्छरमारे यांनी माहिती देण्यास सुरवात केली. निर्मल ग्रामवर बीडीओंनी अभियानांची माहिती दिली. गाव हागणदरीमुक्‍त कसं करता येईल यावर त्यांनी तासभर गावक-यांचे प्रबोधन केलं "शासनाच्या योजना आणि लोकसहभागाची आवश्‍यकता' याविषयावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. परंतु कितीही सांगीतलं तरी गावक-यांनी कुठलंच "टेंशन' डोक्‍यावर घेतलं नाही. वैयक्‍तिक लाभाच्याच योजनांवरच अधिक माहिती जाणून घेतली. कोणत्या योजनांचा स्वतःला लाभ कसा घेता येईल, त्यासाठी कोणते "फंडे' वापरावे लागतील, हे गुपित जाणण्यातच अधिक वेळ गेला. शेवटी बीडिओंनी गाव निर्मल कसा ठेवता येईल, याची शपथही नाईलाजाने सगळया गावक-यांकडून एकमुखाने वदवून घेतली. आदर्श गाव घडवायचंच, असा संकल्प समारोपाला आलेल्या चहाबरोबर गावक-यांनी पिउन सोडला. कोलाहलात सुरू झालेली आमसभा एकदाची शांततेत पार पडली. बीडीओ मच्छरमारे यांनी गावातून काढता पाय घेतला आणि समाधानाने दुस-या गावाकडे निघून गेले.


दोन तीन दिवस जात नाहीत, तोच एके दिवशी भल्या पहाटे खाटेवरून उठलेला श्‍यामराव धोतराच्या पदरानं डोळे चोळीत सांधीत गेला. टमरेलानं रांजणातलं पाणी घेतलं. चेह-यावर चारदोन झपके मारले. उरलेलं पाणी तोंडात भरून "गुळगुळ' असा विचित्र आवाज करीत त्यानं गुळण्या केल्या. हातात टमरेल घेउन तरातरा "बाहेरकडे' जाण्यास निघाला. गावाला ओलांडून झप झप पाय टाकत जात असताना नामदेव चोलपे त्याला आडवा गेला. क्षणभर जागच्या जागी थांबत श्‍यामरावला पाहून बोलला.
"राम राम गा श्‍यामराव भाउ'
"राम राम.' त्याच्याकडे न बघता श्‍यामराव पुढे निघाला.
" बाप्पा, एवढया सकारवकार घाईनं कुठं चालला गा? थ्या दिसी मिटींगमधी तं घरी संडास बांधण्याची शपथबी खाल्ली आन्‌ं आता गावाच्या बाहेर चालला शपथ मोडाले.'
"काउन. तुले कोणतं जड होउन राहयलं? मीनं इचारलं का तुले? तू देशिन का पैसे उधार मले संडास बांधाले?' असं मध्येच हटकल्यामुळे श्‍यामरावला त्याचा जरा रागच आला होता.
"बाप्पा, मी कायले देउन गा? बरं जाउ दे.. हाये का एखांदी बिडी?' नामदेव विणवणी करीत बोलला.
"तुले तं भलत्याच वक्‍ती तलप येते. फुकटाचंच पाहात जा. फुकटचोदू लेकाचा. इकडं मले जोरात लागली आन्‌ तुले मजाक सुचून राहयली. वारेवा..'
सवयीप्रमाणे बिडी पिण्यासाठी इकडं नामदेवचा जीव अगदी कासाविस झाला होता.
"देणं गा.. खूप भाव खातेस बा. सकाळच्या पाहयरी बिडी पेल्याबिगर डोक्‍संच चालत नाही आपलं.'
"मंग ठेवत जानं ... पैशानं इकत घेउन..' श्‍यामरावनं खिशातून बिडी काढून नामदेवच्या हातात दिली. दुसरी बिडी स्वतःच्या तोंडात धरली.
"आता डब्बीभी पाहजेन असंण? 'श्‍यामरावनं खोचकपणे इचारलं.
"नाही, थे हाये नं माहयाच जवळ. नेहमी कोणी नाही कोणी भेटते नं तुहयासारखं. ' नामदेवनं हसत हसत बांडीच्या खिशातून माचिस काढली. तिच्यावर एका बाजूनं काडी फर्रंर करीत घासली. आग चेतवल्यानंतर त्यानं दोन्ही हाताची आडप धरीत बिडी सुलगावली. हातातली काडी खाली फेकण्यापूर्वी श्‍यामरावची बिडीही त्यानं पेटवून दिली. अन्‌ शांत चित्तानं झुरके मारत पुढे जायला निघाला.
"ये ये लवकर जाउन ये. बरोबर पाहयजो...नाहीतं धोतरातच करशिन.' जाता जाता श्‍यामरावला सल्ला दयायला तो विसरला नाही.
श्‍यामराव कासविस झाल्यामुळे लगबग करीत गावाच्या गोदरीजवळ आला. गावाच्या अगदी टोकावर मुख्य महामार्ग होता. सकाळपासूनच त्यावरील वर्दळ सुरू व्हायची. सूर्य निघायच्या अगोदर गावातील काही लोक येथे नित्यनेमाने न चुकता हजेरी लावायचे. पोट खाली केल्याचा आनंद घेत शेजारीच असलेल्या टपरीवर काही जण चहा पित गप्पा मारत बसायचे. आजही सकाळी सकाळी रोडच्या दोन्ही बाजूला अनेक जण खाली टमरेल ठेवून बिनधास्त बसले होते. मोकळया हवेचा मनसोक्‍त आस्वाद घेत निर्विकार चेह-यानं बसून "महत्कार्य' उरकवित होते. चारदोन माणसांपासून दहा विस फुटाच्या अंतरावर जागा थोडी रिकामी होती. श्‍यामरावने एका ठिकाणी "फुलस्टॉप' घेतला. मोकळी जागा निवडली आणि तेथे जाउन बिडीचे झुरके घेत ठमरेल खाली ठेवलं. काष्टयाला हात घातला. धोतरं कमरेभोवती गुंडाळून खाली बसण्यापूर्वीच त्यानं "टरर्‌‌‌ा....टर्रा..' असा उंच पट्‌टीतील सूर आळवला. आपल्याच तंद्रीत शेजारी निवांतपणे बसलेला बाजीराव श्‍यामरावनं काढलेल्या त्या अनोळखी स्वराने दचकला. तसा तो श्‍यामरावकडे पाहात बोलला..
"कोणाचं इंजिन होये रे बावा?'
"काउन. तुले दचकाले का झालं?'
"दचकणार नाही तं का गा? एवढं मोठयानं गाणं म्हणशिन तं कोण नाही दचकणार?'
"तुले मी इंजिन वाटतो का? काउन इतक्‍यातच वळखी इसरला का? ग्रामपंचायतमधी निवडून आला तं लगीत शायणा झाला असंण नाही?'
"निवडून आलो म्हणजे जसा तोपचंद झालो नाही का? गरामपंचायतचा मेंबरच तं केलं. आणं याच्यात का कमाई राहयते ? आपली ठेकेदारी हाये म्हणून बरं हाये. नाहीतं गरामपंचायतीमंधी भेटतेंच का कंद?' बाजीराव नेहमीचे रडगाणे गात होता.
"बाप्पा आमच्यापरिस मानापानानं मोठा हायेस नं तू. चांगल्या दोन दोन मोटारी घरी हाये. मोठां बंगला हाये... संडास हाये अन्‌ तरीबी तू रस्त्यावर येउन बसते. कमाल हाये बावा !.'
" घरी चांगला मारबलचा संडास हाये. पण जे मज्या खुल्या वातावरणात राहयते थे घरच्या संडासात नाही येत नं भाउ. उतरतच नाही उघडयावर बसल्याशिवाय. पोटात गॅस जमा होते. आन्‌ मंग बिमारी होते. तुले तं माहीतच हाये दिवसभर "ढरा ढरा' करत हवा खराब करत इंजिन सुरू राहयते आपलं.' बाजीरावनं आपली बाजू मांडली.
" वारे तुहावालं इंजिन. सरकार म्हणते संडास बांधा, रस्त्यावर बसू नका आन्‌ आपूण बसतो रस्ते पुंजत ' श्‍यामराव बिडीचे झुरके सोडीत निवांतपणे मोकळं झाल्याचा आनंद घेत होता.
गोष्टी सुरू असताना एक मेटॅडोअर बाजीरावच्या अगदी जवळून भुर्र करीत निघून गेला. मेटॅडोअर अंगावर येण्याच्या भितीने बाजीराव जरा मागेच सरकला. तेवढयात हाताच्या धक्‍क्‍यानं त्याच्या समोरच्या टमरेलानं पल्टी खाल्ली.
"हट तिच्या माय बहिण. भोसळीचे आंगावर आणतेत का?' मनातल्या मनात शिवीगाळ करीत बाजीराव स्वतःला सावरत बोलला.
"त्याहीचं का चुकते? सडक हागासाठी थोडीच राहयते.'
" तुहया टमरेलातलं जरासं पाणी देजो बरं. घरी जाउन तुले आणून देतो. नाही तं मले पाहा लागंन एखादा मोठ्‌ठा गोटा'
"हो थे बरं राहयते. गावघुती तरीका. बाहेरदेशात थे कोणता म्हणते तं पेपर वापरतेत नं तसां... आता तू मले पाणी आणून कवा देशिन आणं मी घरी कवा जाईन. त्यापेक्षा दोघंही थोंडं थोडं वापरून उरकून घेउ. शेजारधर्म निभवलाच पाहयजेनं बावा.' श्‍यामरावनं मध्यममार्ग काढला.
इतक्‍यात दोन जिप मोटारी त्यांच्या पुढयात येउन उभ्या राहिल्या. तेव्हा गोदरीत एकाएकी पळापळ सुरू झाली. जो तो ज्या अवस्थेत असेल अगदी त्याच स्थितीत कपडे सांभाळीत शेजारच्या शेताकडे पळायला लागले. गाडयांतून चारपाच पोलिस आणि काही जण ताडताड गाडीच्या खाली उतरले. शेवटचा कार्यक्रम पार पाडत असताना श्‍यामराव अन्‌ं बाजीराव यांनी एकाच वेळी मान वर उचलली.
"गुड मार्निंग...काय, झाली का?' त्या टोळक्‍यातील एकानं भुवयांची हालचाल करीत विचारलं. दोघांनाही काय भानगड हे अद्याप कळलं नव्हतं.
"पाणी सांडलं होतं. दोघंबी एका टमरेलात उरकून घेतो म्हणलं...' काहीच बोध झाला नसल्यामुळे हसत हसत श्‍यामराव आरामात आटपत होता.
" तुमचं आटोपलं असेल तर तुम्हाला घ्यायला आलो होतो. आम्ही "गुड मार्निंग' पथकवाले. ये चल घेरे यांचे चांगले फोटो.. पेपरात छापायचे आहेत.' त्यांच्यासोबत आलेल्या फोटाग्राफरने पुढे होत चटकन कॅमेरा "क्‍लिक' केला व फटाफट दोनचार फोटो घेतले.
" मजाक करता काजी सायेब? उघडयावर बसलो तं बरं वाटून राहयलं लमचं.' श्‍यामरावने धोतर व्यवस्थित करीत शरमेने मान खाली घातली.
"गाव हागणदारीमुक्‍त करण्यासाठी शपथ घेता आणि ती अशारितीने पाळता काय?' त्यांच्यापैकी एक जण बोलला.
"हे घ्या गुलाबाचं फुल. स्वागत आहे तुमचं.' एका साहेबानं जबरदस्तीनं त्यांच्या हातात दोन गुलाबाचे फूलं कोंबले .
"चला रे, घ्या यांना गाडीत..' कडक आवाजात एकानं ऑर्डर देताच चौघे पुढे झाले. "नाही नाही' म्हणताना श्‍यामराव व बाजीरावचा हात गच्च पकडीत त्यांना गाडीत बसविण्यात आलं. प्रकरण आता दोघांनाही चांगलं कळलं होतं. संपूर्ण जिल्हयात हागणदारीमुक्‍त गावासाठी असलेल्या सरकारच्या अभियानाचा हा एक भाग असल्याचं पेपरात दोनचार दिवसांपूर्वीच छापून आलं होतं. अनेक प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर सरकारनं हे कठोर पाउल उचलेलं होतं. पथकातील साहेबांकडे श्‍यामराव व बाजीरावंने बरीच विणवणी केली. पण अधिकारी काही केल्या ऐकायलाच तयार नव्हते.
"माफ कराजी सायेब. आजी माहया घराचं बांधकाम सुरू हाये म्हणून बसलो होतो बाप्पा. अजी मी या गावच्या ग्रामपंचायतचा मेंबर हायोंनं बावा !.. ...'
"मग तर तुम्हाला चांगली कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ' अधिकारी दरडावित बोलला.
"सायेब यंदा घरी संडासच बांधतो. पण एक इनंती करतो अशी बेईज्जत करू नोका साहेब. लागनंतं उदया पासून घरीच करतो सोय.. ' काकुळतीला येत श्‍यामराव बोलला.
"ते सगळं पोलिस स्टेशनला गेल्यानंतर सांगा. चांगले दोन दिवस पोलिस कोठडीची हवा खाउन याल तेव्हाच कळेल तुम्हाला....' असं म्हणत मोठे साहेब गाडीत बसले अन्‌ दार ओढून घेतलं.
"चला रे' असं म्हणताच गाडया सुरू झाल्या अन्‌ तालुक्‍याच्या गावाकडे रवानाही झाल्या. चहाच्या टपरीवर जमा झालेले सगळे मात्र फिदीफिदी हसत होते.

                                                                    * विजयकुमार राउत

                                                             साईनगर, हिंगणा रोड नागपूर -16

******

हातचा एक

           

                   मित्र शत्रूपरी भेटला
                    हातचा एक मी घेतला !!

                                 या गणितात आहे मजा-
                                 रीत समजून घेउ चला !

            या उधारीत बर्बाद मी
            हाच व्यवहार का येथला ?

                              लोकशाही कशी रे तुझी?
                               देश माझा कसा पेटला

                होय, बेसूर, बेताल मी
                 ताल माझा जरा वेगळा !

      गप्प का जाहले ते असे ?
     प्रश्‍न साधाच मी रेटला !

                                 शून्य म्हणजेच रे विश्‍व हे !
                                    शून्य म्हणजेच रे भोपळा !!

                                                                           * विजयकुमार राउत

लंदफंद (लघुकथा)


                                                                      * विजयकुमार राऊत


"बावाजी म्या येतो जी गावाले.....'

सकाळी उठल्यापासून तुकाराम टोंग्याचा नातू उकंडया रडून रडून सारखा जिद्‌दीला पेटला होता. तुकाराम कापसाच्या चुका-याचे पैसे आणण्यासाठी नागपूरला चालला होता. शेतात काम करणा-या बायां, नोकरा-चाकरांबरोबर रब्बी हंगामात बी- बियाणे, खते व पेरणीसाठी पैसे लागतील म्हणून ही तयारी आतापासूनच करणं जरूरीच होतं. तुकारामला गंगाराम नावाचा एक पोरगा होता. गावच्या देवजी बुवाला नवस बोलल्यानंतर गंगारामच्या पोटी गोरं गोमटं उकंडया जन्माला आला. म्हणून तुकाराम बुढयाच्या तो अती लाडाचा होता.
शेती अद्यापही तुकारामाच्याच नावानं असल्यामुळं बुढ्‌ढा पैशाचे सारे व्यवहार स्वतः पाहात होता. जुनेवानीवरून नागपूरचं अंतर तसं पंचेविस-तिस किलोमिटर इतंक होंतं. परंतु दळणवळणाची कुठलीच साधनं उपलब्ध नसल्यामुळे नागपुरला जाणं म्हणजे जिकरीचं काम . त्यासाठी शेतीच्या कामांचं दिवसभराचं नियोजन करून नागपुरला जावं लागत होतं. आजही शेतातील सगळी कामं गंगारामकडं सोपवून बुढ्‌ढयानं नागपुरकडे जायची तयारी आदल्या दिवसी घरात बोलून दाखविली. "पहेलवानाची वाडी' अन्‌ "बेवडयाची डुंगी ' या दोन्ही वावराकडं गंगाराम लक्ष देईल, काय लागलं सवरलं तर पाहिलं, म्हणून महादयाकडं सगळी जवाबदारी गंगारामवर सोपविली होती.
नागपुरला गेल्यानंतर सर्वसामान्य शेतक-याला सरकारी ऑफिसातली कामं करता करता अख्खा दिवस कसा भूर्रकुन उडून जातो, हे कळंतही नव्हतं. नागपुरला जाणं आणं पंढरपूरची पायदळची वारीच दोन्ही सारखंच. पहाटे पाच वाजतापासून सगळया तयारीनिशी शिदोरी घेउन निघालेला माणूस रस्त्यातल्या चोराचिलटाच्या भितीनं रात्रीचा अंधार व्हायच्या आधी घराकडे परतत होता. म्हणून तुकारामनं नातवाला सोबत येण्यास मनाई केली होती. त्याला प्रेमानं "बापू बापू' म्हणून समजावून पाहिलं . तरी ते ऐकतच नव्हतं.

"कायले येतंस बे? तिथं का खाचं हाये का? तवांच बोंबलून राहयलं लेकाचं...'
"नाही.. मी येतो. जी बावाजी... नाही तं.... पाहून घेजा.....ऊ....ऊ.....ऊ'
"आबे तं तुहयासाठी भातकं आणीनं नं . अणखीन का लागतें तं सांग. तोंड कायल फाडतंस लेका '
तुकाराम नातवाची समजूत काढण्याच्या इरादयानं बोलला. पण ते कारटंही काही ऐकायच्या स्थितीत नव्हतं.
"मामाजी येते तं घेऊन जा नं जी संग. हे पोट्‌टं काही केल्या आयकतच नाही'. सुनेनंही न ऐकणा-या मुलाच्या पुढं एकदम हात टेकले.
"हो तू तं भलीच सांगतेस वो. रातगी झाली म्हणजे मी का यालेच सवारत बसीन का? चोर चिलटं राहते नं रस्त्यात'.
'नोको जाऊ रे पोट्‌टया ' सुनेनं पोराला लटक्‍यानं आपल्याजवळ ओढून घेतलं.
उकंडया आणखी भोकाड पसरायला लागला.
"चाल इच्या बहिन माय. हे पोट्‌टं काही आयकतच नाही' तुकारामनंबी नातवासमोर हार पत्करली..
"इमले, जा वो बाई करून दे याची तयारी' तुकारामनं शेवटी हतबल होउन नातवाला सोबत घ्यायला तयार झाला. खुशीच्या भरात रडण्याचं थांबवत टूनकन उडी मारून लेकरू मायजवळं पळालं. तिनं दिवाळीला आणलेले नवीन मनिला, चोलना घालून दिला. विस्कटलेले केस तेलपाणी लावून व्यवस्थित विचंरून दिले. पेल्यातून थंड पाणी पाजलं.

"बरोबर जाजो रे बापू. काही घेऊन मांगासाठी जिद्‌ नोको करजो.' अशा सूचना देत मायनं पोराला सास-याच्या हवाली केलं. नातू खेळभांडे प्लॅस्टीकच्या पिशवीत भरायला लागला.
"कायले भाडीले घेतं बे थे. चाल लेका तुले दाखवतोच आता लंदफंद.'
तुकारामनं नातवाचा हात ओढला अन्‌ भरभर चालायला लागला.
जुनेवाणी ते हिंगणा हे अंतर पायदळ कापित नातवाला पाठीवर घेऊन तुकाराम हिंगण्याच्या रस्त्याला लागला.

.
नातवाला खांदयावरून खाली उतरवीलं तेव्हा हिंगणा आलं होतं.
एका वडाच्या भल्या मोठया झाडाखाली येताच तुकारामनं सुस्कारा सोडला. डोक्‍याला बांधलेला लाल जरीचा दुपट्‌टा सोडला अन्‌ त्यानं चेह-यावर आलेला पशिना पुसून घेतला. नंतर हळूच नातवाच्या तोंडावरून हात फिरवित बसला. वडाच्या झाडाखाली अनेक लोक गर्दी करून गटागटानं बसले होतें. म्हातारे कोतारे सावलीच्या आश्रयानं गप्पागोष्टी करीत जनावरांप्रमाणं रिकाम्या तोंडानं रवंथ करीत होते. म्हाता-यांच्या बाजूला काही प्रोैढ बाया आपापले टोपले, पोते आदी साहित्य घेउन एकमेकींबद्‌दल बिनधास्त गा-हाणे मांडत होत्या. तुकारामच्या ओळखीचे दोनचार बुढ्‌ढे त्याच्याकडे ओळखीचं पाहून हसले.
"कुठं चालला गा तुकारामा नातवाले घेऊन?तुहया आंगावरचं बरं हाये हे' कोंडबा बुढ्‌ढयानं चौकशी केली.
"नाप्पूरले चाल्लोना कापसाचा चुकारा आणाले. काहून गव्हू नाही का पेराचे ?.पैसे पाहयजे नं. बाप्पा.. हे पोट्‌टंबी इच्या बहिन दात होठ खाऊन मांग लांगलं लेकाचं. म्हणलं चालते तं चाल. तुले दाखवतोच आता लंदफंद.'
"लंदफंद याले दाखवून दे चांगली' ह-या गमतीने बोलला.

"आपल्या वक्‍ती नोहती गा हे लंदफंद'
कोंडबा बुढ्‌ढयानं बांडीत हात टाकून मोठी चंची काढली.
"होनं.. घोट चांगला जम्मून तंबाखु. लई तलफ आली बावा तवांनची' ह-या बुढ्‌ढयाला मोठी जांभई आली.
कोंडबा बुढ्‌ढयानं चांगली चिलीम तंबाखानं भरून घेतली. जोरात दम ओढून तिला सिलगावून घेतली . तोंडाची चिलीम काढता काढता त्याला जोराचा ठसका बसला. तसा तो खोखो....करून उठला. बराच वेळ कोंडबा खोकलत राहिला.

"पाहजो गा कोंडू भाऊ. नाहीत सोडशिन लेका दम. एकडावचा. नातवाचं लगन गी पाहून घे .आणं मंग जाजो'
कोंडबानं आपल्या हातातली चिलीम आता ह-याच्या हातात दिली. ह-या आरामात दम मारून धूर सोडू लागला.


उकंडया सावलीच्या सुतानं गाडी गाडी खेळण्यात एकटाच व्यस्त झाला होता. आजूबाजूला बसलेले गावकरी शेती आणि पिकपाण्यांच्या गोष्टी करीत गाडीची प्रतीक्षा करीत होते.
"कोठची तयारी हाये गा तुयी?' तुकारामनं इस्तारी बुढ्‌ढयाजवळ चौकशी केली.
"पोराले एक पोरगी दाखवाले रामटेकले घेऊन चाललो. औंदा लगन कराचं हाये नं. त्याले का बियासाठी ठेवू बाप्पा..? '
"हो तुहयंबी बरोबर हाये म्हणा--'
"पोट्‌टे जवानीत आले म्हणजे त्याईले येसंणच टोचाले पाहयजेन.'
"हो नं.........'
कंटाळा आल्यामुळे झोलबा बुढ्‌ढयानं तोंडाचं रिकामं बोळकं मोठ्‌ठं करीत जोरात जांभई दिली. तास दीड तास झाले तरी गाडीचा पत्ता नव्हता.


अचानक एक तरूण तावातावाने पुढं झाला, त्याच्यासोबत चार पाच गरम रक्‍ताचे युवक कार्यकर्तेही त्याची बाजू घेत कंडक्‍टर हिरामनशी भांडू लागले.
"भाडीत गेली तूही लंदफंद. कवा येईन सांगतरी.'
"येऊन राहयली नं. अर्ध्यांत असंण. इतकं भडकाले का झालं गा.'
"भडकन नाही तं का गा? खोपडंच आऊट झालं. दोन घंटयापासून तुहया लंदफंदची वाट पाहून राहयलो. तिचा तं काही पत्ताच नाही. आतापर्यंत बहिन नागपूरात पयदल गेलो असतो आन्‌ं सिलीमाबी पाहून आले असतो. गेला का नाही बाराचा शो.'
"मंग मले काय म्हणते. गाडी होये नं. काही बंडी थोडंच होये'. हिरामनही त्याच तावानं उत्तर देउ लागला होता.
"इच्या बहिन रेंगी परवडली, पण थे गाडी का फाडी नाई परवडली. लक्ष्मीनारायण सेठले सांग का एसटीचा धंदा सोडून दोनचार रेंग्याच ठेवून घे म्हणून'
टोळक्‍यातील एकानं हिरामनची मजा घेतली. बाकीचे त्याच्या मागून हसू लागले.

हिरामन आणि त्याचा सोबती मम्मद मियॉं दोघेही खुर्चीवरून उठले . हिरामननं गळयात बांधलेला दुपट्‌टा पाठीमागे फेकला अन्‌ मम्मद मियाला सोबत घेऊन हॉटेलकडे जायला निंघाला. जाता जाता त्यानं बसलेल्या प्रवाशांवर एक कटाक्ष टाकला.
" लवकरच येईन नं आता लंदफंद. आपआपल्या तिकिटा बरोबर ठेवजा म्हणजे झालं. चाल रे मम्मदया. चहा पिऊन येऊ हाटलेतातून .'
हिरामन अन्‌ मम्मद दोघंही गोपालच्या हॉटेलकडे तरातरा निघून गेले.

"बावाजी, पाणी पेतो. तहान लागली.'मध्येच उकंडयानं मागीतलं.
"हट्‌ इच्या बहिन. या पोट्‌टयाले वाडखोंच तहानबी लागली. देरे बावा ह-या याले पाणी'
हरबानं मघाशी उघडलेलं डबकं खोलून झाकणात ग्लासासारखं पाणी ओतलं. लहानगा उकंडया गटागटा पाणी प्याला आणि पुन्हा खेळण्यात हरखून गेला.

हिरामन हॉटेलात जाऊन अर्धाअधिक तास लोटला होता. तरी त्याचा काही पत्ता नव्हता.
"एवढा वेळ लागते का त्याले चाहा ढोसाले' कोंडबा बुढ्‌ढयानं शंका व्यक्‍त केली.
"गेला असंण पांढरं पाणी प्यायले' हरबा बोलला.
"हो त्याचीच तं खेती होये. लक्षुमी त्याच्या हातात हाये आन्‌ं शेठ हाये नाप्पूरले.'
"शेठ चांगला माणूस हाये गा. आपल्या जीवाले तरास झाला नाही पाहयजेन म्हणून त्यानं एसटी काहाडली आपल्यासाठी-'

इतक्‍यात युवकांच्या टोळक्‍यातील एक जण मोठयानं ओरडून उठला.
"आली रे बावा लंदफंद.'.
सगळं जण आपापले सामान आवरू लागले. मघापासून बिनधास्त झोपलेला झोलबा ताडकन उठून बसला. तुकारामनंही उकंडयाला जवळ घेतलं.
मैदानातील बसस्टॉपजवळ गाडी यायला अजून बराच वेळ होता. लंदफंद दुरून मजल दरमजल करीत गोंगलगाईसारखी चालत होती.

झाडाखालच्या प्रवाशांनी आता लवकरच लंदफंद येईल म्हणून सुस्कारा सोडला. निळया रंगाची लंदफंद बाळंतीन बाईसारखी हळूहळू अंतर कापीत जवळ येत होती. एवढं अंतर कापायला किमान अर्धा तास तरी लागेल असं दिसत होतं. लंदफंदचा नखरा म्हणजे नव्या को-या नवरीसारखाच! ओबडधोबड रस्त्यातून चालत चालत ती नाजूकाबाईसारखं अंतर कापीत प्रवाशांची सेवा करीत होती. लक्ष्मी नारायण सेठ म्हणजे मोठी असामी. सगळया जिल्हयात लक्ष्मीनारायण सेठचं नाव शेंबडया पोरांपासून बुढ्‌ढयापर्यंत सा-यांमध्ये "फेमस' होतं. लक्ष्मीनारायण सेठचे अनेक धंदे होते. परंतु "प्रवाशांच्या सेवेसाठी' सुरू केलेला हा नवीन धंदा त्यानं चांगला भावला. त्यानं नुकत्याच चार पाच मिनी बस विकत घेतल्या होत्या. धंदाबी चांगला होईल अन्‌ त्यातून पुण्यही मिळेल, असा त्याचा दुहेरी हिशेब होता.
गावक-यांना मात्र त्या गाडीचं भारी कौतुक. त्याचं नामकरणही त्यानं असं करून टाकलं. तुकाराम नेहमी लंदफंद गाडीचं कौतुक करीत नातवाला लंदफंद मधून गावाला नेण्याचं आश्‍वासन देत झोपवून दयायचा. लंदफंद पाहायच्या इरादयानं शाळेला बुट्‌टी मारून उकंडया म्हणूनच तुकारामच्या मागं लागला होता.

"तुकाराम भाऊ.. पाहयजो गा लंदफंद येईन तं. मुतून घेतो.' कोंडबा बुढ्‌ढा लघवी लागल्यानं कासाविस झाला होता.
"तुलेबी वक्‍तावरच लागली का गा? जा ये लवकर'

लंदफंद येऊन राहिली म्हणून बायका रस्त्याकडं पाहात उभ्या होत्या. त्यांचं लक्ष नाही हे पाहून थोडया अंतरावर सरकून कोंडबा बुढ्‌ढा भडभड्‌ लघवी करू लागला. त्यापैकी एक प्रोैढ बाई कुजबुज करू लागली.
" हया बुढ्‌ढयाची मती गेली असंण का माय? बायका- बियका याले दिसतंच नसंन '
दुसरीनं तिच्या बोलण्यात सुर मिळविला.
"आगे माय.लईच करते हया बुढ्‌ढा. याले का सुनवाहि-या दिसत नाई का बाई?'
"आवं झोपत रातच्याले हाथरूण पांघरून वलं करून ठेवते म्हणते हया खेडमा ,


कोंडबाला काहीच ऐकू न आल्यामुळे तो बिनधास्त आपला "कार्यक्रम' उरकून घेत होता.




इकडे लंदफंद पाहण्यासाठी लहानगा उकंडया क्षणोक्षणी बेचैन होत चालला होता. केव्हा लंदफंद येते ती केव्हा बसतो, असं झालं होतं.
खूप वेळ वाट पाहिल्यानंतर एकदाची लंदफंद पुढयात येऊन ठेपली. तसा प्रवाशांनी आत शिरण्यासाठी एकच गलका केला. तुकारामनं नातवाला डोक्‍यावर घेऊन दोनचार जणाले चांगलं घोळसत एकदाची जागा पकडली.
कोंडबा, ह-या अन्‌ चारपाच बुढ्‌ढे धकाधकीत मागे पडले. म्हणून ते उभेच राहिले. पाच-दहा मिनीटात लंदफंद प्रवाशांनी खच्चाखच्च भरली. मुंगी शिरायला ही जागा नव्हती. मागून प्रवाशांचा एक जोराचा रेला आला तसा कोंडबा त्यावर स्वार होऊन कधी आत गेला हे त्यालांही कळलं नाही. त्याचा पचांग खोचलेला धोतराचा काष्टा सुटून तो आता पुरता लुंगीवर झाला होता. त्याचे दोन्ही हात दंडा पकडण्यात व्यस्त होते. मध्येच एका तरूण पोराचा धक्‍का लागल्यानं मघाची ती प्रौढ बाई ओरडली.
"ए कोणता भाडया होये वो. माय बहिण नाई का त्याले? कोण्या हलकटानं धक्‍का मारला बाई.'
"आवं तं लागला असंण मायमाजे. होतेच हाये एवढया गर्दीत'तुकारामनं समजाविण्याचा प्रयत्न केला.
काही प्रवासी आत, तर काही दारावर लटकलेले, तर काही लंदफंदच्या मागे चांगले गोकरासारखे चिपकले होते.


म्मद मियॉं सारे प्रवासी कोंबून झाल्यानंतर लंदफंद सुरू करण्यासाठी गाडीच्या समोर येऊन उभा राहिला. त्यानं इंजिनजवळचा हॅंडल पकडला आणि ताकत लावून फिरविणं सुरू केलं. बरेच हात मारल्यानंतर एकदाची लंदफंद धूर सोडीत "घ्यांग घ्यांग ' आवाज करीत सुरू झाली.
"चलो सुभानभाय. भर गया डिब्बा ... निकालो तुम्हारी चारसौ ग्यारा'
म्मदनं ड्रायव्हरला हिरवा "सिग्नल' दिला.
"हो गया नं पुरा. देखणा रे बावा. अपणी अपणी जान संभलना ' असं म्हणत ड्रायव्हरने गाडी गेअरमध्ये टाकली. त्याचा एक जोरदार झटका आतल्या सर्व प्रवाशांना बसला. प्रवासी पुन्हा एकमेकांच्या अंगावर जाऊन कोसळले.
"आरे बापरे ' करीत स्वतःला सावरू लागले.

गाडी दारू पिल्यागत झोकांडे खात रस्त्यानं चालू लागली. आता सराव झाल्यामुळं प्रवाशांमध्ये गचके सहन करायची ताकत आली होती. उकंडया मात्र गाडीतून बाहेरचं दृश्‍य पाहण्यात मश्‍गुल झाला होता. आजोबाला सारखं काहीबाही विचारून त्यानं त्रासून सोडलं होतं. प्रवाशीही इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्यात शहराला जवळ करीत होते. तिन-चार किलोमिटर गाडी गेल्यानंतर वानाडोंगरीची टेकडी आली अन्‌ गाडीनं आपले असली रंग दाखवणं सुरू केले. एवढया मोठया गर्दीला ओढताना तिची दशा केविलवाणी झाली होती. अचानक ती बंद पडली.

"काहून रे बावा. का झालं इले' कोणीतरी बोललं.
"मथ्था आ गयानं वानाडोंगरी का? मशिन हैनं भाऊ, कोई आदमी थोडी है? चलो उतरो दोचार जवान पोट्‌टे'
"कायकू धक्‍का मारेंगे? काहून आम्ही पैसे नाही देल्ले का?.'
"पैसे दिये तो क्‍या लंदफंद को इकत लिये क्‍या. धक्‍का मारो. नही तो गाडी जगह से नही हिलेगी'

नाईलाजाने गाडीतून उतरून चार पाच तरूण ताकतीनिशी गाडीला धक्‍का देऊ लागले. गाडी किंचीत पुढे ढकलल्या गेली अन्‌ हटील्यासारखी पुन्हा त्याच जागेवर येऊउन उभी राहयली. पुन्हा त्यांनी देवाचं नाव घेत दम निघेस्तोवर धक्‍का मारला. खूप वेळ भाव खाल्यानंतर लंदफंद परत सुरू झाली. पोरं गाडीमागं धावत होते अन्‌ गाडी पुढं पळत सुटली. वावरभर अंतर धावाधावी सुरू असताना शेवटी ज्याला जसं जमेल तसे गाडीला लटकले.
गाडी शहराच्या रस्त्यानं नव्या दमानं वचके देत चालत होती.

लंदफंद नागपूरच्या हद्‌दीत शिरली तेव्हा दुपारचे तीन वाजले असतील. शहरातलं वातावरण पाहून उकंडयाच्या चेह-यावरचा आनंद ओसंडून वाहात होता. गाडी एकदाची सिताबर्डी परिसरात आली. जिथं लंदफंदसारख्या दोनचार गाडया आणखी स्टॅंडवर लागल्या होत्या. त्या ठिकाणी गाडीनं खेडयातून आणलेला सगळा माल रिचविला. दिवसभर नातवाला सोबत घेऊन तुकाराम बुढ्‌ढयानं शहरातलं काम उरुन घेतलं. त्याला अख्खं नागपूर घुमवलं. हॉटेलात नेऊन तुकारामनं नातवाला मनसोक्‍त आलूबोंडा, जिलेबी खाऊ घातली. एका आण्याचा मस्तपैकी एक रंगीत चष्माही घेऊन दिला. नातवांनं कागदी बिल्ल्यासह तो डोळयाला तसाच लावून घेतला. महाराजबागेंत जाऊन तेथील विविध प्राणी दाखविले.
अन्‌ आजा नातू परतीच्या प्रवासाला निघाले. त्या दिवशी उकंडयाला "साहेब' झाल्यासारखं वाटलं.

सायंकाळी लंदफंदनंच तुकाराम उकंडयाला घेऊन घरी परतला, तेव्हा तो पिकलेल्या आंब्यासारखा झाला होता. दिवसभराच्या धावपळीनं तुकारामचं अंग पार आंबून गेलं होतं. गंगाराम शेतातील कामं आटोपून घराकडे परतला होता. उकंडयानं मायजवळ लंदफंदची सारी हकीकत सांगतली. रात्री छपरीत सगळयांची जेवणं सुरू असताना अचानक उकंडयानं पुन्हा भोकाड पसरणं सुरू केलं.

"कायले बोंबलते बे. मघांशीतं तुले चांगलं नेलं व्हतं नं नाप्पूरले लंदफंदमंधी' तुकाराम वैतागून बोलला.
"हो.--'
"तुले आलबोंडा घेऊन देल्लानं?'
"हो....'
"महाराज बाग पाहयला नं?'
"हो...'
"मंग अणखीन का पाहजेन बे तुले? बोंबलून कायले राहयला तं.....'.

" मले खरीखुरी लदंफंद घेऊन पाहयजेनं.. ऊ.....ऊ....ऊ..'
तुकारामनं नातवाच्या नावानं कपाळावर हात मारून घेतला. तसा त्याला जोराचा ठसका लागला.


                                                                      * विजयकुमार. राऊत
                                                                     साईनगर, हिंगणा रोड,
नागपूर 440016

भरवसा (लघुकथा)



.*विजयकुमार राउत


"शेतक-यांसाठी खुश खबर.... यंदा लाभणार शेतक-यांना निसर्गाची साथ ....मान्सून वेळेवर महाराष्ट्रात दाखल होण्याचे हवामान खात्याचे संकेत..... वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार अंदमान निकोबार बेटात मान्सूनचे वेळेपूर्वीच आगमन झाले असून यंदा सरासरी नव्यानव टक्‍के पाउस पडण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. सदया हिंदी महासागरात मान्सूनच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. पुढील आठवडयात बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होणार व त्यानंतर राज्यात जोरदार पावसाचे आगमन होईल, असे हवामान विभागाच्या प्रवक्‍त्यांकडून जाहिर करण्यात आले आहे. यावर्षी हवामानखात्याच्या अंदाजाप्रमाणें पाउस झाल्यास कृषी क्षेत्रात अन्नधान्याची विपुलता निर्माण होईल, असे मत कृषीमंत्रयांनी या पार्श्‍वभूमीवर व्यक्‍त केलं आहे.......'
विठ्‌ठल काकडेनं जाहिररित्या वाचन केलेला पेपर त्याच्या भोवती बसलेल्या इतर शेतक-यांपुढे सरकावला. उन्हाच्या प्रहरी गप्पांसाठी गावच्या पारावर लिंबाच्या सावलीत बसलेल्या शेतक-यांना पावसाच्या बातमीतून थोडा का होईना दिलासा मिळाला. त्यामुळे सगळयांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आरशासारखे लख्ख उमटले होते.
"औंदा पाणी लवकर येईन म्हणते नाही गा? पिकपाणीबी बरं व्हईन...का गा नारू?'
गुलाब खंतेच्या या वाक्‍यानें ना-या काळे ताडकन स्वप्नातून जागा झाला.
" तं मंग? . ...दरसाली कस्तकारांच्या मागं अवदसा राहयतेच राहयते इची बहिण. कमीत कमी दलिदरी तरी दूर होईल. येरे बावा पाण्या . लवकर ये ' ढेबानंही पेपरची पुंगळी करीत ना-यांच्या रित रि ओढली.
" इठ्‌ठलभाउ... कोणतं खातं म्हणलं गा तुन मंघाशी?' गुलब्याने विठ्‌ठल काकडेला प्रश्‍न केला.
" गुलाबभाउ, हवामान खाते म्हणलं म्या. हवामान विभाग...'
"हो थेच म्हणलं. अडाणी मानसाचं असं राहयते..कोणी शिकला सवरला माणूस बोलला का त्याचंही आयका लागते. म्हून म्हणलं का आजपावेतो सरकारी अधिका-यांचं खातं पाहयलं होतं. पण हे कोणतं खातं होये थे माहया ध्यानात आलं नोहयतं. सरकारी योजनाचा फायदा घ्यासाठी पंचायत समितीत जाआल तं तिथंबी अधिकारी खातेत. पोलिस ठाण्यातबी खातेत. पटवा-याकडं गेलो तं थोबी उभ्यानं खातेच. कुठं खात नाही?.समदीकडे खातेच खाते' गुलब्यानं मनातलं सगळं भडभड बाहेर फेकलं. गुलब्याच्या वाक्‍यानं आजूबाजूचे शेतकरी हसून उठले.
"तसं नही म्हणलं मी गुलाबभाउ. तुले राग आला असंण. येणबी स्वाभाविक आहे म्हणा. कारण शेतक-याले खाणारी यंत्रणा सगळीकडेच बोक्‍यासारखी टपून बसलेली आहेच नं.' विठ्‌ठलच्या बोलण्यानं गुलब्याला जोर आला.
"गोष्ट हवामान खात्याची निंघली होती. म्हून मले एका गोष्टीची आठवण झली. कास्तकाराले समदे खाते हे म्या तुले आंधीच सांगतलं. मले वाटलं का बा हवापाणी खाणाराबी कोणी राहयतेत का ? बरं थे जाउदे. एक सांग इ्‌ठ्‌ठला. थे माहया सास-याच्या गावी भेंडवळले एक जोतिषी हाये. दरवर्षी अखजीले घट मांडला का दुस-याच दिशी थो घट पाहून पावसाचं गणित सांगते. सा-या गावचे लोकं येतेत तेथं जोतिस्य आयकाले. म्याबी एकदोन येरी गेलो होतो.' गुलब्यानं आपल्या मनातील शंकांना वाट मोकळी करून दिली.
"हे पाहय गुलाबभाउ. तुहया सास-याच्या गावी होते त्याले भविष्यवाणी म्हणतेत ..आणि हे शासनाचं हवामान खातं वेगळंच राहयते. तिथं मोठमोठे तज्ज्ञ, शास्त्रज्ञ याहीची नियुक्‍ती करण्यात येते...पाउसपाण्याचा अभ्यास करण्यासाठी? थे रात्रंदिवस संशोधन करीत असतात. त्यांनी काही मॉडेल्स विकसीत केलेले असतात. त्यानुसार हवामान खात्यातील बदलाचा अंदाज घेता येतो. त्यामुळेच आपल्याले पावसाच्या दिवसाचं वेळापत्रक समजते. ' पदवीपर्यंत शिकलेल्या विठ्‌ठलनं गुलाबला समजावणीच्या सुरात सांगीतलं.
"म्हणजे आपून हवा पाहून तिवा मांडतो तस्सं, नाही?' गुलब्याच्या या वाक्‍यावर सगळे मोठयानं हसून उठले.
"बरं गुलब्या अखजीले गेला होता का तू भेंडवळले....सास-याच्या गावी ?' डोमा कावळयानं गुलब्याकडे पाहून प्रश्‍न टाकला.
"नाय बा... मांगल दिसा अखजी झाल्यावर नातवाची भेट घ्याले सासराच आलता माहया घरी.'
"का म्हणे तुहया सासरा ?' डोम्याने उत्सुकतेने विचारलं.
"भेंडवळच्या बाबानंही असंच सांगतलं म्हणे...औंदा पाणी चांगला जम्मून हाये म्हणून' गुलब्यानं खुशीतीच उत्तर दिलं.
"सरकारचं खातंबी पेपरातून थेच सांगतेनं. दोघाहीचं गणित सारखच येउन राहयलं. औंदा चांगली बरसात हाये रे बाप्पा धनाची....मजा हाये यंदा कास्तकाराहीची.... घ्या चांगलीं फसल..उपडा प-हाटी..लागा कामाले..करा पेरणी .....'
कोप-यात बसलेला गण्या वेडयागत हसत बोंबलून उठला.
*******
मागच्या तीनचार वर्षांपासून पावसाचा लपंडाव सुरू होता. म्हणून आता शेतकरी चांगलेच कावून गेले होते. सावकाराचं, बॅंकेचं कर्ज फेडता फेडता सर्वांच्या नाकी नउ आलं होतं. म्हणून यंदातरी झालेल्या नुकसानीची भरपाई होईल म्हणून जमलेल्या कास्तकारांना पावसाच्या बातमीनं जीवात जीव आला होता.
" औंदा पाउस चांगला पडण तं मांगच्या वर्षीच्या कर्जाचं वंझं तर हलकं व्हईन.' डोमा आकाशाकडे पाहात बोलला.
" आपलं बी तसंच हाय बा. फसलं चांगली आली तं मी पोरीचं लग्न उरकवून घेईन म्हणतो. नाहीतं मागच्या वर्षी हुंडयाचे पैसे थोडसे कमी पडले म्हूण नवकरीवालं पोरगं हातचं निघूंन गेलं. पोरगीचं वय जास्त होत चाललं...' किसनानं आपली चिंता मनाशीच बोलून दाखविली.
" अभायातल्या पाण्याचं आणं कास्तकाराच्या नशिबाचं काही खरं राहात नाही बापू.' म्हातारा अजाब डोळयांसमोर हात धरून आकाशाकडे टक लावत बोलला.

*****
ृग नक्षत्रं पंधरा वीस दिवसावर येउन ठेपलं होतं. शेतक-यांची लगबग सुरू झाली. कास्तकारवर्ग मशागतीची कामे पटापट उरकून घेण्यात व्यस्त झाला. मृगाच्या पहिल्या सरी येताच पेरणी करून घ्यायची, या आशेने बबन्यानं दोन वखर लावून शेतीची उन्हाळवाही करून घेतली. किसन्यानं भाडयाचे ट्रॅक्‍टर लावून संपूर्ण शेताची नांगरणी करून शेत पेरणीयोग्य तयार केलं. गावठाणातील उकिरडयावरून बारा महिने जमा केलंलं गुराढोराचं शेणखत बैलगाडयांनी सा-या वावरभर पसरण्यात आलं. रोहिणी नक्षत्रं जेमतेम सुरू झालं. अंगाची लाही करणारं उन्ह वातावरणात पसरलं होतं. मध्येच एक दोन ढग सुर्याला झाकण्याचा निष्फळ प्रयत्न करायचे. पुन्हा काही क्षणात आकाश उघडं पडायचं. रोहिणीच्या हलक्‍या सरींनी वातावरण काही क्षणापुरतं सुसहय केलं. त्यानंतर उन्ह पुन्हा तापू लागलं. कास्तकाराच्या बायका म्हणून लागल्या "किरतका रोहिनी आन्‌ मिरगाच्या बहिणी' . परंतु सुर्य पूर्ववत आकाशात दात ओठ खाउन जिद्‌दीनं तळपू लागल्यामुळे पुन्हा सरी बरसण्याची कुठेच शक्‍यता दिसत नव्हती. कास्तकार शेतात उन्हातान्हात खपत होता. अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. प्रत्येक जण मरेस्तोवर स्वतःला कामात जुंपून घेत होता. मृग नक्षत्र लागताच पाउस येणारच, असा हिशेब करून सगळे जोमानं कामाला लागले होते. किसना मात्र धुळ पेरणी करण्याच्या विचारात होता. त्यासाठी पूर्वी करावी लागणारी उन्हाळवाही आटोपताच त्यानं बेधडक वखरणंही सुरू केलं. काहीबी झालं तरी कोणी आपल्यासमोर प-हाटीची लावणी करू नये, पहिला नंबर आपलाच असावा, या ईर्षेने तो सगळी धावपळ करीत होता. तसा दरवर्षी शेजारच्या पांजरी गावातील बाळा पाटील धुळ पेरणी करून घ्यायचा. तो उन्हाळयातच प-हाटीची लावणी करून सगळयांची मजा घेत इतर शेतक-यांना तो-यात हिणवायचा. पहिला पाउस पडेस्तोवर मोटारपंप सुरू करून प-हाटीला पाणी देत राहायचा. सुरवातीला लोकही त्याला हसायचे. नंतर तो इतर कास्तकारांपेक्षा जास्त पिक कमी वेळेत घेउ लागला, तेव्हा कुठे सगळयांना हेवा सुटला. परंतु औंदा किसनानं बाळा पाटलाला मागे टाकण्याचा निश्‍चयच केला होता. धुळ पेरणी करणे तसे फार "रिस्की' काम. प-हाटीला पाणी दिलं अन्‌ं जोरदार पाउस लागून पडला की हलक्‍या जमिनीत पाणी मुरत नसल्यामुळे प-हाटीची बुडं सडून जायची भिती. असं अनेकदा घडलं होतं. तेवढी हिंमत लावली नाहीतर कास्तकारच कुठला? असा साधा हिशेब शेतकरी करीत होते. त्यामुळे छातीला माती लावून किसनानं एकदाचा हा निर्णय घेउन टाकला. "असंबी मरणंच, आन्‌ं तसंबी मरणंच ...' म्हणून त्यानं हिंमत बांधून एकदाची धुळ पेरणी उरकूुन घेतली.
गावच्या सगळया कास्तकारांनी मृगाच्या तोंडावर सगळी तयार करून घेतली होती. पैपेै जुळवून बियाणे, खते आणि किटकनाशकांची खरेदी सुरू झाली. किसनानं सास-याकडं जाउन त्याच्या मध्यस्थीने सावकाराकडून व्याजाने पैसे आणले. बबन्यानं बायकोचं मंगळसुत्र गहाण ठेवून बियाणे खरेदी केले होते. तर गुलब्यानं होतं नव्हतं सगळं कास्तकारीच्या जुगारात ओतलं होतं. हिंगण्याला जाउन त्यानं बी- बियाणे, खते आणि औषध खरेदी करून बैलबंडीनं घरी आणून घेतलं. किसन्यानं कोरडया शेतात धुळ पेरणी करून घेतली.
ृग नक्षत्रानं म्हशीवर स्वार होउन आगमन केलं. शिवाराच्या पोटात आता बियाणे ओतून कास्तकार निश्‍चिंत झाला होता. सगळे कास्तकार पावसाची वाट पाहात आकाशाकडे डोळे लावून बसले. एक दिवस, दोन दिवस अन्‌ं मृग नक्षत्राचे चांगले आठ-पंधरा दिवस निघून गेले. तरी आकाशाला कुठेच जराही पान्हा फुटला नाही. वांझ असलेल्या म्हशीसारखं मृग नक्षत्र कोरडं गेलं. जसजसे दिवस लोटत होते, तसतसे कास्तकार चिंतेने अस्वस्थ व्हायचे. सायंकाळच्या प्रहरी एकमेकांना कैफियत सांगायला गावच्या पारावर जमायचे. कुठल्यातरी निमित्तानं तासन्‌ तास शेतीवरच बोलत बसायचे. एकमेकांना दुखणी सांगायचे. मन हलकं व्हायचं. हतबल झालेला कास्तकार शेवटी करणार तरी काय?
******

"पाण्यानं तर चांगलाच धोका देल्ला गा' किसन्या असाहयपणे बोलत होता.
"का सांगावं बा. दोन दिसानं मिरूगबी जाईन आन्‌ं अडदडा लागंन. पाण्याचा जराबी पत्ता दिसत नाही. प-हाटीचं बी जिमिनीच्या पोटात जीव नसल्यावाणीच पडलं हाये.' डोमानंही नैराश्‍येत सुर मिसळला.
"तुमचं तं पाणी नाही आला म्हणून बी नाही निंघलं. पण माहया वावरात वलिताच्या जमिनीत पेरूनबी बी नाही उगवलं.... मले तं आता दुकानवाल्यावरच शक येउन राहिला. च्या मायले मले चांगलंच फसवलं गा अग्रवाल शेठनं. नकली बियाणं देल्लं त्यानं मले .. ' किसन्यानं आपलं दुःख तक्रारीच्या सुरात सगळयांपुढे मांडलं.
"हो तुहं खरंच हाये. आमच्या वावरातलं बी तं पाणी आल्यावर निंघाची आसतरी हाये. पण तुहय? तुनं तं चांगली धुळपेरणी केल्ती नं गा. ' बबन्या बोलला.
"थेच तं भोवलं मले. कुठून अक्‍कल सुचली तं माहित नाही. परवा दुकान मालकांकडं गेल्तो तं त्यानंही मले टरकावूनच लावलं. पाणी येतंच नाही तं बियाणं कसं का उगवण म्हणे.' किसनानं आपबिती सांगीतली. त्याचा आवाज केविलवाणा झाला होता.
"आबे तं भाडया म्हणा. म्यातं धुळपेरणी केल्ती म्हणा. आन्‌ माहया वावरात तं मीनं मोटारीचं पाणी वललं म्हणा. शिकवतं का साला आपल्याले?' डोमा रागारागात बोलून गेला.
"परवा तं कंपनीचे काही लोकं वावरात येउन पाहयणी करून गेले. कंपनीचा मोठ्‌ठा साहेब म्हणे का बियाणं नकली हाये, याचा काही पुरवा हाये का तुहयाकडं? म्या म्हणलं साहेब, तुम्हाले तं दिसतेच जी. का माहया वावरात पाणी देउनबी तुमच्या कंपनीचं बी नाही उगवलं थे. त्याले कायले पाहजे सबूत? त्याच्यातला एक जण म्हणला का तुम्हाले काही समजत नाही. तुमी अडाणी हाआत आनं अडाणीच राहान.... वरचा पाणी नसतानी बियाणं उगवलं नाही तं त्याच्यात आमचा काही दोस हाये का?'
"तिच्या मायचा भोसळा म्हणा...साल्याले. कायचा साहेब झाला ? आलू कुठे लागते म्हणून इचारलं त्याले तं थो म्हणणं फांदीले . टमाटर कुठं लागते म्हणून इचारलं तं सांगनं झाडाच्या बुडात. थे आपल्याले अक्‍कल सिकोते भोसळीचे? दोन किताबी नाही वाचल्या तं चाल्ले शहापणा शिकवाले? च्या मायचं थे हवामान खातं का का म्हणते तं... थेबी आमाले च्युत्या बनवाचा कारखाना दिसते. कोणाचा भरोसा करावं गा माणसानं ? सरकारबी आपल्या तोंडाले नुसते पानं पुसत राहयते. चिवते साले कास्तकाराच्या जीवावर उठले ...सराफ लागनं त्याचा. अन्नबी भेटणार नाही खाले... लेकाईले.' बबन्या इंगळी चावून आग झाल्यासारखा चवताळून उठला होता. परिस्थितीचं गा-हाणं एकमेकांसमोर प्रत्येक जण ओकत होता.

नैराश्‍याच्या वातावरणात दूर कुठंतरी "पेरते व्हा...पेरते व्हा ' म्हणत पक्षी झाडांवर बसून साद घालत होता.
**************
"दुबार पेरणीचे संकट..शेतकरी हैराण...जिल्हयात एैंशी टक्‍के पेरण्या उगवल्याच नाहीत. मृगापाठोपाठ आद्रा नक्षत्रही कोरडं गेल्यामुळं शेतक-यांवर दुबार पेरणीची पाळी. शेतकरी आर्थिक संकटात .....मान्सूनने आपली दिशा बदलली. महाराष्ट्राला पावसाचा खो... शेतक-यांनी केली शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी' या आणि अशा आशयाच्या बातम्या पेपरात दररोज झळकू लागल्या. शेतक-यांजवळ दुबार पेरणी करायलाही पैसा उरला नाही. शासन मात्र अजूनही गप्प. शेतक-यांच्या परिस्थितीवर बोलण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत विराजकारण राजकारण खेळणारे राजकीय पक्षही हातात हात गुंडाळून बसलेले. धुर्त नेते जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यात व्यस्त. दुष्काळाचं शेतकरी वगळता कुणालाच काही घेणं देणं नाही....टिव्हीच्या चॅनलवर मनोरंजनाच्या नावाखाली होणारं देहाचं हिडीस प्रदर्शन.... राज्यातील अग्रगण्य म्हणविणारे विचारवंत टिव्हीवरून गंभीर मुद्रेत उगाच आव आणित दुस-याच मुद्‌दयावर चर्चा घालताना.... सगळं सगळं तिरस्कार आणणारं... एकंदरीत बळीराजा पुरता मातीत मिळाला असताना कुणालाच फिकीर नाही, सगळं कसं आलबेल सुरू असल्याचं चित्रं.

एके दिवशी मात्र सगळं गाव गुलब्याच्या घरापुढं जमा झालेलं. सगळयांच्या चेह-यावर चिंता. सगळयांचे चेहरे काळवंडलेले. जों तो एकमेकांना विचारत होता.
""अरेरे . असं काहून केलं गा त्यानं ?'"
"का माहित बा. काल सांजच्या पारी वावरातच गेला होता म्हणते.....लहान लहान तीन पोरं हायेत गा गुलब्याले...त्याचं कसं होईन.....त्याच्या मता-या मायचं कसं होईन? जानजवान बहिण लग्नाची हाये, तिचं लगंन कसं व्हईन... होत्याचं नोहतं झालं गा बिचा-यासंग. पाणी नसतानी पेरणी केली अन्‌ पाणीच आला नाही. पैसा कास्तकारीत पाण्यासारखा वतला. आता का कराचं म्हणून लई दिसापासून इचारात होता. वावरात जाउन लई येळ एकटाच बसून राहायचा. रात्र झाली तं घरीबी न्हाई येत व्हता.' गंभीर वातावरणात अशीच विचारपूस ब-याच वेळपर्यंत सुरू राहिली.

*****

तिस-या दिवशी निळया दिव्यांची रूग्णवाहिका "टयूव टयूव' करीत गुलब्याच्या अंगणात येउन उभी राहिली. तिनचार धडधाकट माणसांनी गुलब्याचा देह गाडीबाहेर उचलून घरात आणला. अन्‌ छपरात अंथरून असलेल्या खाटेवर टाकला. खाटेभोवती गुलब्याची लहान लहान पोरं "बाबा बाबा' करीत बापाजवळ रेंगाळू लागली. हळू हळू सारा गाव त्याच्या घरी जमा झाला. त्याची बायको रखमा हिच्या गळयात हुंदका दाटून आला. तिनं लगेच चेहरा पदराआड झाकून घेतला. मंजूळा बुढ्‌ढी खाटेजवळ येउन गुलब्याच्या चेह-यावरून थरथरता हात फिरवत मोठयानं बोंबलून उठली.
" अरे बापा असं कसं केलं गा तूनं. काउन रे बापू. चांगली जींदगानी सोडून असं करा लागते का माहया लेकरा?बरं झालं बाप्पा तुहयाजोळ कास्तकारी तरी हाये..हिंमत हाये. नाईतं कुठं भिख मांगली असती गा? तू असा हिंमत काउन हारला माहया लेकरा? तूहे सोन्यासारखे लेकरं कुणाकडं पाहिनं गा.? कास्तकाराईची जींदगानी आपली . तुहया बापानं कास्तकारी करता करता लगीत खट्‌टे खाल्ले ..पण त्यानं नाही केलं जन्मात असं. कास्तकारीच्या भरूशावर अमिर नाई झालो बापू आपून. नुसता जुवाच खेळतो हरवर्षी. दोन वक्‍ताचं खारट तिखंट खावाले भेटते, त्याच्यातच सुख मानून घेवू. लेकरा, कसेबी दिसं काढून जिंदगानी ढकलू.. माहयासारख्या मथा-या बाईनं का करावं बाप्पा? थ्या दुस्मानाईले तुहया दुखावर फुटला नसता पाना .. ...' मंजूळी बुढी मात्र ब-याच वेळपर्यंत अंसीच काहीबाही बोलत बोंबलत होती. मघापासून खाटेच्या शेजारी मुकाटयानं उभा असलेला विठ्‌ठल पुढं आला. दोन्ही हातांनी त्यानं मंजुळा बुढ्‌ढीला बाजूला घेतलं.
" झालं गेलं गंगेला मिळालं आजी. नव्या उमेदीनं आता पुन्हा जगा लेकराबाळाहीले घेउन. कास्तकाराचं जगणं हालअपेष्टांशिवाय कसं राहिन लमचे? पोरगं तुले दगा दयायले निंघालं होतं तूहयं. मरणाच्या दाढेंतून सुटून घरी आलं. वावरात प-हाटीवर माराचं औषधही कास्तकाराच्या नशिबासारखं नकली निंघालं. गुलब्याची जीवनाशी असलेली नाळ तुटायची नव्हती म्हणून तुटली नाही.'

विठ्‌ठल मंजूळा बुढ्‌ढीले समजावित होता. अन्‌ गुलब्या हताश मनाने आढयाकडे पाहात होता. कोरडया पावसाळयात मात्र विठ्‌ठलच्या डोळयात ढग दाटून आले होते.

.* विजयकुमार राउत

साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा मार्ग
नागपूर 16

मंगलवार, 2 दिसंबर 2014

धुमकेतू



वर्तमाना सांगना तू, मी कसे वागायचे?
भूतकाळाने भविष्याला कसे भागायचे ?

या भूगोलावर मी उभा, पाहतो सुर्याकडे
रे इतिहासा ! कितीदा, मी तुला वाचायचे ?

"या' धृवावर राहतो मी, "त्या' धृवावर तू तिथे
अंतर प्रकाशाचे किती वर्षांत मी मापायचे ?

मोजूनि सा-या ग्रहांना, माझयापुढे तू ठेवले
तूच त्यांना बोलना कुठल्या दिशेने जायचे?

रात्र अंधारी अशीही, निखळती तारे किती !
फाटले आकाश येथे, मी कसे झाकायचे?

मोकळा तू श्‍वास घे, अन्‌ या फुलांचा वास घे
आयुष्य हे पंचागापरि खुंटीस का लटकायचे?

मी न राहू, मी न केतू, धुमकेतू मी उद्याचा
तू तुझया शहरास आता ,राख जर राखायचे !!

                                                                       विजयकुमार राउत

कुणासारखा?

तू असा तू तसा, तू कुणासारखा?
शेवटी तू निघाला, जनासारखा !

शब्दसुरांत गातो तुझी भैरवी
आज झंकार तू पैजनांसारखा !!

मी मला वाटलो जर नकोसा कधी
टाळतो मी मला दुर्गुणांसारखा !!

तू अकस्मात रस्त्यात येता, गडे !
बघ, कसा वागतो मी सज्जनासारखा !!

जिंदगानी ! मला तुच समजून घे !!
होय, जगतो खरा मी मनासारखा !!

एक नाते असावे जगावेगळे...
गुंतला कसा तू बंधनासारखा !!

व्यर्थ कोणी उगाळू नये कोळसा
देह झिजवा इथे चंदनासारखा !!

प्रिय माझी असू दे फकिरी मला !
मी भला बापडा, निर्धनासारखा !!

सत्य हे जाणिले, एकदा शेवटी...
मीच केवळ धुळीच्या कणासारखा !!

                                                  विजयकुमार राउत

 
Blogger Templates