Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 20 अक्टूबर 2016

सुफींचा स्वच्छंद


परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. या निसर्गापासून आपण जसजसे दूर होऊ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न निर्माण करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. निखळ हास्य ही मानवाला मिळालेली अप्रतिम अशी देणगी आहे, आणि तोच त्याचा स्वभावही. वेद-उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे अन्नकोष, मनकोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असा तो प्रवास आहे. "अन हल हक'ची साद देत रस्त्याने मस्तीत नाचत सुटलेला सुफी संत मंसूर खऱ्या धर्माचे अंतरंग उलगडतो. सुफी संप्रदायाचे तत्वज्ञान जीवनाच्या लयीशी तादात्म्य साधण्याचा एक छंद आहे, असं म्हटलं तरी चालेल.
प्रत्येक धर्माचं सारही हेच आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. मग ही जीवन जगण्याची काही सूत्रे प्रत्येक धर्माने सांगितलेली आहेत. त्यापैकीच "आनंद' हेच समान सूत्र जगाच्या पाठीवर सगळीकडेच पाहायला मिळते. कुठल्याही धर्माचं अध्यात्म हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्म्यापर्यंत पोहचविणारा प्रवास असतो. त्यासाठी मानवनिर्मित अंधश्रद्धेत शिरण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. स्वतः निरोगी राहून "जगा आणि जगू द्या' या ध्येयापर्यत नेतो तो धर्म.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येक घरातील माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. "आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर असोत वा कुठलाही सुफी संप्रदाय केवळ आनंद आणि परोपकाराचे तत्वज्ञान सांगतो. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे. आंतरिक भावनेला महत्व देणारा हा संप्रदाय असल्यामुळे तो संवेदना जपताना दिसतो. म्हणून "आनंद' ही संवेदना संप्रदायात खोलवर रूजलेली दिसते.
हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकीच एक स्वच्छंदी संप्रदाय म्हणजे सुफी.
निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते. वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकाराशी नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली. हे करीत असताना मनाची निरामय अवस्था आणि आनंद हेच जीवनात हातात हात घालून प्रवास करीत असल्याचे दिसते. हा प्रवासच उच्चतम अवस्थेपर्यंत नेणारा आहे. अभिजात सूफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र' अशी केली आहे. विख्यात भारतीय गूढवादी ओशो रजनिस यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला "मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सूफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित महम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळें फकिरी वृत्तीनें राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ;ऑर्थोडॉक्‍स होता. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथीं इसमांच्या विचारांना व मतांनां इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनीं हाच सर्वेश्वरवाद ;पॅनथीइझम प्रस्थापित केला. हे सर्वेश्वरी मत सुफीपंथी गूढवादी विद्वानांनीं स्वयंप्रेरणेनें व कुराणाच्या आधारानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली असणे शक्‍य आहे. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे.
सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे असे म्हणता येत नाहीं. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो असे सुफी लोक मानतात. तदनुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात. पुढे गूढार्थपर कविताही पुष्कळ होउन फारशी वाङ्मयांत अबू सय्यद, फरीदुद्दीन अत्तार ; जलाल अल दीन रूमी ; जामीए महमूद शबिस्तरी, इब्न अल्‌ फरिद, इब्न अल्‌ अरबी, नेमिसी वगैरे कवी ललामभूत आहेत. सुफी संप्रदायाने समाजाच्या निकोप वाढीसाठी आपल्याला संगीत, काव्याची भेट दिली यावरून मानवी जीवनाच्या उत्थानाबरोबर एकंदर मानवी मनही घडविण्याचे काम सुफींनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ध्यान ही "स्वबोधा' ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी प्रत्येक साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे. सुफींनी ध्यानाची त-हा मात्र स्वछंदी, मस्त धुंद स्थितीत परमेश्‍वराच्या भक्‍तीकडे जाण्याची निवडली.
शिवाजी गोर्ले यांच्या शब्दांत, आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. सुख - दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो. आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्‍चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. आनंद हीच यशाची पहिली पायरी असते. आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते.
"इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल'. म्हणून आनंदाची सुत्रे सांगणारा सुफी असो वा अन्य कोणताही संप्रदाय ख-या अर्थांने आनंदापर्यंत पोहविणारेच शास्त्र आहे.

विजयकुमार राउत
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा रोड , नागपूर
8888876462

गुरुवार, 13 अक्टूबर 2016

सुफींचा सर्वेश्‍वरवाद


                                                                                           विजयकुमार राउत

परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे " पिंडी ते ब्रम्हांडी' असा तो मामला आहे. एक मात्र खरे या निसर्गापासून आपण जसजसे दूर होउ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न मग ते मानसिक असो वा शारिरीक पातळीवर निर्माण होत जातात. पुढच्या काळात समाजात अधिकाधिक मानसिक समस्याच उद्‌भवणार, असे एकंदर संशोधन सांगते. या सर्व समस्यांवर आध्यात्मिक जिवन जगणे हेच अचुक उत्तर असू शकते, हे एकंदर महात्म्यांच्या जीवन जगण्याच्या पद्‌धतीवरून लक्षात येईल. वेद उपनिषादतील "अहं ब्रम्हास्मी' असो किंवा सुफी संत मंसूर यांनी ईश्‍वर भक्‍तीत बेधुंद होउन दिलेली "अन हलक' ही हाक किंवा बुद्‌धांचे "अत्त दीप भव' तिन्हीचा अर्थ एकच. फक्‍त शब्दांचा काय तो फरक !
अध्यात्म हे शरिर आणि मनाच्या पलिकडे जाउन थेट शुद्‌ध आत्म्यापर्यंत घेउन जाणारे एकमेव शास्त्र आहे. त्यासाठी मानवनिर्मीात देवाची पुजा किंवा अंधश्रद्‌धेत गुरफटण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. कुठलाही धर्म असो वा संप्रदाय हेच तत्व नेहमी सांगतो आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. म्हणून अनेक संकटातून ताठ उभा राहणारा समाजपुरूष निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. थोडक्‍यात काय तर विज्ञान म्हणजे नास्तीकांचं अध्यात्म आणि आस्तिकांचं विज्ञान म्हणजे अध्यात्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे.
भक्‍तीचे विविध प्रकार प्रत्येक पंथात व धर्मात पहायला मिळतात. हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप पाडली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी. निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते.
वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकारापर्यंची नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे फकिरी वृत्तीने राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ; ऑर्थोडॉक्‍स होता, असे म्हटल्या जाते. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथी इसमांच्या विचारांना व मतांना इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनी हाच सर्वेश्वरवाद ; पॅनथीइझम प्रस्थापित केला. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे, असं संशोधकांचं मत आहे. सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे, असे म्हणता येत नाही. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो, असे सुफी लोक मानतात व तद्‌नुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात.
सुफी मत किंवा तसव्वुफ याची व्याख्या त्याच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली आहे. हे मत मान्य असणा-यांनाही "सुफी' म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे. अभिजात सुफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सुफी गुरुच्या म्हणण्यानुसार सुफी मत म्हणजे दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे, हे सांगणारे शास्त्र होय. विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सुफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सुफी त्याला "मत' समजत नाही. परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सुफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. कुठलाही संप्रदाय किंवा धर्म हा अंधश्रद्‌धेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाज नेहमी चमत्कारांपुढे नतमस्तक होत असल्यामुळे मुळे प्रवाह गढुळ होउन जातो. तेव्हा ख-या अर्थाने धर्म मरतो आणि मग उरते फक्‍त धर्माचे निष्प्राण कलेवर.
विजयकुमार राउत

8888876462

रविवार, 11 सितंबर 2016

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

.....

                                                                                        *विजयकुमार राउत

"मी निर्गुण, निराकार आहे...मी अनादी अन्‌ मी अनंत आहे..असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण असोत किंवा फळ झाडावरून खालीच का पडते, असं विचारणारा न्युटन असो, जेव्हा तत्कालीन समाजाच्या डोक्‍याचा भूगा पाडून विचारांचा जळजळीत निखारा डोक्‍यात पेरून जातात तेव्हा ती माणसं हमखास विद्रोहीच ठरविली जातात. त्यांचे विचार काही लोकांसाठी उपहासात्मक जरी ठरले तरी त्या विचारांची नाड मात्र या मातीतून कदापी उखळून फेकता येणार नाही, हेच खरे. म्हणून ओशो रजनिशांना बुद्‌धाप्रमाणे जेवढे नाकारले जाते, तेवढेच समाजात स्वीकारलेही जाते, हेही सत्य आहे.
ओशो रजनिश एक विद्रोही व्यक्‍तीमत्व म्हणून 11 डिसेंबर 1931 रोजी जन्माला आले खरे.. परंतु त्यांच्या विचारांच्या शलाका शेकडो वर्षे भविष्यात प्रकाशमान होताना दिसतात. ओशो विश्‍वाच्या क्षितीजावर अलौकिक दिव्यत्वाने तेजाळून उठतात. फक्‍त व्यवहाराच्या चौकटीत फिट बसलेली भाषा समाजाच्या डिएनएत सुप्त वास करीत असते. तेव्हा मात्र अख्या पिढीची बौद्‌धीक आणि एकंदरीत शरिर रचनाच क्‍लिष्ट झालेली असते. यातील विरोधाभास असा की ती सर्वसामान्यांना कळणारी भाषाही कालांतरणाने लोकमान्य झाली तरी त्यातील अर्थ मात्र मेलेलाच असतो. मग आपण निष्प्राण झालेलं कलेवर खांदयावर घेउन वावरत असतो. म्हणून वारंवार बुद्‌ध, कबीर, ज्ञानेश्‍वरासारखे संत येउन माणसाच्या जगण्यातील गर्भितार्थ उलगडून जातात.
ओशोंनी केलेली वक्‍तव्ये मात्र एका नव्या वादास जन्म देणारी ठरली नाही, तरच नवल! "संभोगातून समाधी' असो किंवा त्यांच्या गुढ व्यक्‍तीमत्वाचा एकूण भाग असो. कृष्ण जसा पूर्ण पुरूष असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती लागत नाही तसेच ओशोचं व्यक्‍तीमत्वही पा-यासारखं हातून निसटून जातं. हेच असामान्य माणसाचं जीवन असतं. मग व्यक्‍तीमत्वातली गुढता येते कुठून? याचा विचार केला तर जीवन सरळ असते,..समजणा-याच्या मनातील आणि एकूण त्याच्या जगण्यातला गोंधळच मग व्यक्‍तीमत्वाची गुंतागुंत करून ठेवते. मेंदूतील न्यूरॉन्सच्या निर्मीतीतील प्रक्रियाच क्‍लिष्ट करून ठेवल्यामुळेच आपणंही "मल्टी डायमेंशनल' न होता "मल्टी सायकीक' झालेले असतो. मग अशा वेळी ओशोंसारख्यांच्या वक्‍तव्यात विरोधाभास शोधून त्यांच्यावर टिका होते. म्हणूनच महापुरूषांचे विचार तत्कालीन समाजव्यवस्थेला पचनी पडत नाही. महापुरूषांच्या हयातीत ते रूजताना पाहण्याची संधी त्यांना मिळत नसते. ओशो रजनिशांच्या बाबतीत नेमके तेच झाले.
खरं म्हणजे ओशो रजनिश मनाच्या कुठल्याशा कप्प्यातून मुक्‍त श्‍वासासोबत आपल्या अंतरंगात प्रवेश करतात. हळूच ऑक्‍सीजनसारखे रक्‍तातून मेंदूपर्यंतचा मार्ग शोधत जातात. नसानसात शितलता पेरून गार हवेसारखे संपूर्ण अंतरंगात झिरपणे हा त्यांचा स्वभाव असतो. हळूहळू मग मनाचा प्रदेश काबिज करून डोक्‍यातील मेंदूच्या प्रदेशावरही कब्जा मिळवितात. त्यांच्या बुद्‌धीची तेजस्विता अनेक वाद उकरून मेंदूतील कारस्थान झिडकारून लावते. जुनाट परंपरा नाकारून नवीन सृजनात्मकतेशी धागे जोडून देते. नास्तीक आणि आस्तिकेची मूळं अलगद खोदून काढते. ओशो एकंदर अस्तित्वाशी एकरूप होण्याचं वारंवार निमंत्रण देतात. बुद्‌धाप्रमाणे स्वयंदीप होण्याचा कानमंत्र देउन जातात. त्याबद्‌दल त्यांना जगाचे आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागतात. कुठल्या धर्माचं अनुयायीत्व न स्वीकारता कट्‌टरता सोडून स्वतःचा धर्म जागृत करण्यास सांगतात.
प्रज्ञेचं सळसळतं तेज घेउन ओशो नावाचं रसायन ब्रम्हांडातील अचेतन मनाच्या कृष्णविवरात अनेक दडलेल्या गुपितांचे एकेक पापुद्रे उलगडत जातं. असंख्य युगांपासून अस्तित्वाची ताटातूट झालेल्या अज्ञात विश्‍वाशी मग आपला परिचय व्हायला लागतो. आपल्याशी स्वतःला मिळवून देण्याचे अभिवचन देउन ते स्वतंत्र दृष्टी प्रदान करतात. तेव्हा गुरूजीएफप्रमाणे जीवनाकडे पाहण्याचा आपला अख्खा "गेस्टॉलच चेंज' झालेला असतो. दूर खोलवर पसरणारी मुळं आपल्या अपरिचित व्यत्मित्वातील दिव्यत्व शोधण्याकरीता स्वतःच स्वतःचं खोदकाम करतात. म्हणूनच जगाच्या पाठीवर त्यांना प्रवेश नाकारला जातो. शब्दात कितीही सांगीतले तरी त्याचा परिणाम होणारच नाही, हे जेव्हा कळायला लागते तेव्हा बुद्‌धाप्रमाणे ते सावधगीरी बाळगतात. जगातील महान पुरूषांनी वापरलेली मौनाची ताकद सर्वश्रेष्ठ असल्याचं मान्य करतात. कालांतराने ओशो निःशब्द होउन मौनात शिरतात ते यासाठी. त्यातून समाधीतील शून्यत्वाला अस्तित्वाशी एकरूप, एकसंध करून निराकारापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा करतात. " आय नो .. आय डोन्ट नो' असं म्हणणारा सॉक्रेटीस किंवा "जो जानता है वो बोलता नही.. और जो बोलता है वो जानता नही' हे सत्य सांगणारा चिनचा लोओत्सु ओशोच्या तत्वज्ञानातून थेट मूकसंवाद साधताना दिसतो.
जगाच्या व्यासपिठावर ओशो रजनिश एक अलौंकिक व्यक्‍तीमत्व असल्याचं आपल्याला थोडं उशीराच कळायला लागतं. त्यांच्या गूढवादी व्यक्‍तिमत्त्वाशी परिचय होण्यासाठी आपण त्यांना अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसंतसे ओशो क्षितीाजाच्या पलिकडे घेउन जाण्याचा स्पष्ट इशारा करतात. दृष्य आणि द्रष्टा यांच्याशी असलेलं तादात्म्य संपल्यावर एका अमर्याद अशा निराकाराशी तदृप होण्याच्या आनंदात ते शुन्यत्वाचं दर्शन घडवितात.
शब्दांची साथ सोडून शब्दांच्या पलिकडे पाहण्याचा वारंवार संकेत देतात. तरी हा संकेत कळण्याइतकी माणसं उत्क्रांतीतही एका अर्थानं उत्क्रांत झालेली नसतात. मग जगातल्या एकंदर कलांचा जन्म ज्या तत्वातून झाला त्या तत्वाची जडणघडण समजायला लागते. यासाठी ओशो कविता आणि शायरीचा आधार घेतात.

"संभोग से समाधी तक' या पुस्तकावर होणारे वाद-विवाद, समज गैरसमज किंवा आरोप-प्रत्यारोप हा पारंपरिक बुद्‌धीचे कारस्थानच असल्याचे सिद्‌ध होते. फ्राईड असो वात्सायन.. किंवा मायथॉलॉजीत संभोग हा विषय उपेक्षित म्हणूनच त्याचे विकृतीकरण केले जाते. "संभोगातून समाधी'पर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी पुस्तक न वाचता त्यांना दुषणं देणं अशा मेंदूचं काम असतं. हयात असतानाही आणि नसतानाही ओशो नावाचं गारूड जगातील असंख्य चाहत्यांच्या डोक्‍यातून काही केल्या उतरत नाही. बुद्‌ध, कृष्ण, महाविर, सुफी संत मंसूर , लाओत्से, कबिर ,मीरा, कन्फयूशिएस, गुरूजीएफ, खलील जिब्रान अशी कितीतरी नावं सांगावीत, त्या सर्वांशी रजनिश नाते सांगत जातात. ओशो समजने तर खुप दूरचे पण साधे वाचनेही पचनी पडत नाही. परमात्मा कही खोजने की चिज नही है . परमात्मा तो जानणे की चिज है' असं सांगत असताना आपल्यातील परम्यात्म्याशी जवळीक साधण्याचं बळ देउन जातात. म्हणून त्यांच्या समाधीवरील या ओळी आजही जिवंत वाटतात..
ओशो नेव्हर बॉर्न..नेव्हर डेथ्ड
ओनली व्हीजीटेड ऑन अर्थ प्लॅनेट !!
VRAUT90@YAOO.COM

सोमवार, 29 अगस्त 2016

ससा, कासव पुन्हा नव्याने

विजयकुमार राउत


ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहान असताना कित्येक वेळा ऐकलेली आहे. त्यात नवीन असे काहीच राहिलेंले नाही. अगदी कथेचा चौथा पडेपर्यंत आपण चर्वितचर्वण केलेले आहे. अतिआत्मविश्‍वास बाळगाल तर तुमची सदैव हारच होईल, हा बोध घेण्यापलिकडे आपण त्या कथेच्या वाटेला गेलेलो नसतो. रूपकं आणि प्रतिकं वापरून दिलेला संदेश नेमका आपल्यापर्यंत पोहचावा हा त्या कथेमागचा उद्‌देश असतो. तो किती पोहचतो, हेन बोललेले बरे. परंतु समाजात नेमके तसे होताना दिसत नाही. ससा हा भित्रा आणि वेगाने पळणारा प्राणी आहे, हे आपल्याला माहित आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात ससाच्या चालीने चालणारे आपण अधिक वेगवान कसे होउ याचाच प्रत्यक्ष आपल्याला ध्यास लागलेला असतो. म्हणून आपल्या जगण्यातला वेग दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो. प्रत्येक गोष्टीत घाई करणे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वेगातून शरिराकडे दुर्लक्ष आणि असंख्य ताणतनाव व बेसुमार आजारांना सोबतीला घेउन आपण पुढच्या काळात कुढत कुढत जग असतो. ससा हा वेगवान आयुष्याचे प्रतिक आहे. आजच्या काळात तोही कदाचित मागे पडेल, असे आपले एकंदरीत जीवनमान झाले आहे.
फार वर्षापूर्वी वेगवान सशाची व मंद गतीने चालणा-या कासवाची शर्यत लागते. अन्‌ स्वभावाप्रमाणे ससा हरतो. सशाला वाटते आपण निश्‍तिच जिंकणार अशा भ्रमात तो विसावा घेता आणि कासव त्याच्या पुढे जाउन जिंकतो. परंतु यातील मर्म असे की ससा जसा वेगवान आहे तसेच त्याला आयुष्यही लाभलेले असते. बहुतांश त्याचे वय कासवाच्या तुलनेत खूप खूप कमी. ससा बहुतेक हा सुमारे 15 ते 20 वर्षच या पृथ्वीतलावर जगतो. तर कासवाचे आयुष्य चारपाचशेच्या घरात असते. या चारपाचशे वर्षाच्या काळात त्याच्या जीवनाचे घडयाळही अती मंद असते. कासवासाठी काळ मंद तर सशासाठी तो वेगवान. सशाच्या जीवनाचे घडयाळ अतिशय वेगाने धावणारे असते. त्यावरून ससाच्या ह्रदयाचे ठोके फारच गतीमान तर कासवाच्या ह्रदयाची धकधक फारच मंद. ह्रदयाच्या या गतीबरोबर त्याच्या जीवनाचा सर्व संकल्प, स्वप्न, आशा-आकांक्षांचा कालावधी ठरलेला असतो. या जगात एक दिवस जगणारे जीवही आपल्या संपूर्ण आयुष्याचे वतुर्ळ पूर्ण करूनच जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तरूणपण, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू असे हे वर्तुळ ठरलेले असते. हे वर्तुळ निसर्गाच्या नियमाप्रमाणे फिरत असते. परंतु त्याचा फिरण्याचा काळ आणि वेग मात्र निसर्गाने निश्‍चित केलेला असतो. प्रत्येक जिवाचे घडयाळ वेगवेगळे असते. चिमूरडया मुंग्याही आपले आयुष्य वर्तुळ पूर्ण करून जगत असतात. माणसाला कदाचित सुमारे 80 वर्षाचे आयुष्य वाटयाला येते. यात सर्व टप्पे ओलांडायचे असतात. कासवाला लाभणारे आयुष्य माणसाच्या तुलनेत फार लांब असते. तर सशाचे त्याहूनही अल्प. अल्पशा कालावधीत संपूर्ण आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी त्याच्या शरिराची एकंदर रचनाच निसर्गाने करून ठेवलेली असते. कासवासाठी मात्र आयुष्याचा पल्ला लांब असतो. त्याला ससाच्या तुलनेत फार दीर्घकाळात प्रवास पूर्ण करायचा असतो. या कथेपासून माणसाने खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्या जीवनातील काळही आता वेगवान झाल्याचे दिसून येते. ताळतंत्र सोडून सगळया गोष्टी कमी श्रमात , कमी वेळात मिळविण्याकडे आपला कल असतो. प्रत्येक पिढीत यश हस्तगत करण्याचा वेग वाढला आहे. त्यातून माणसाच्या वाटयाला काय येत आहे? तर भविष्याची चिंता, त्यातून येणारी अस्वस्थता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळत आपल्या हाती येतो शार्टकटचा मार्ग. आपल्या आजूबाजूची गतीमान होत जाणारी धावपळ आणि त्यातून आलेली अस्वस्थता याकडे आपण कधी डोळेभरून पाहतो का?
विजयकुमार राउत

गुरुवार, 31 मार्च 2016

निसर्ग, कविता आणि आपण !!


                                                                              * विजयकुमार राऊत

वितेतील लय गमाविणे म्हणजे आपल्या शुद्‌ध मनाचे तंत्र बिघडून बसणे. आपण जन्मतो तेव्हा हे तंत्र घेउनच जन्माला येतो. परंतु जसजसं आपण मोठे होत जातो.. तसे तसे मनाने खोटेही होत जातो आणि छोटेही. हळूहळू बाहेरचा गोंगाट कानात वाढत जातो. आपण आपली लयबद्‌धता हरवून बसतो. एक वेळ अशी येते की आपण स्वतःला निसर्गाच्या एकंदर व्यवहारापासून खुप दूर नेउन ठेवतो. मग कालांतराने पुन्हा सर्वसामान्य माणूस शेवटी हतबल झाल्यावर हरविलेल्याचा शोध घेण्याच्या फंदात पडून "हे' ना "ते' बरे म्हणत निसर्गाचा शोध घेण्यासाठी सहलीला जातो, देव दर्शनासाठी शेकडो किलोमिटरची यात्रा करीत तिर्थस्थळांना भेटी देतो. हे सगळे उपद्‌व्याप केले तरी त्याच्या मनाला शांती मिळत नाही. हो, फक्‍त तो इतरांना दाखविण्यासाठी शांत असल्याचं पदोपदी नाटक करीत असतो. जीवन जगण्यात व्यस्त असताना तेव्हा खूप खूप भानगडी करीत असतो. त्याला तेव्हा जीवनातील काव्याचा शोध घेण्याचं अजिबात भान नसतं. कविता म्हणजे फालतू उद्योग म्हणून तो हेटाळणी करतो. मग जीवनाच्या शक्‍तीहिन टप्प्यावर त्याला "कविते'चा किंवा अन्य कलांचा शोध लागतो. कुणी सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य कसं जाईल, याचा विचार करीत या धंदयाला जवळ करतात. त्यातील अनेक जण "रसिक' होण्याच्याच खर्चिक भानगडीत पडत नाही. कारण ते फार परिश्रमाचे असते. काही चांगल्या कविता, चांगले कवी न वाचता.. "डायरेक्‍ट' कवी होण्याची सोय असल्यामुळे कविंचं अमाप पिक समाजात वाढीला लागले आहे. मग त्यांना शब्दांची हगवण लागण्याचाच धोका अधिक असतो. या देशात एक चांगलं आहे की कवडीचं वाचन, मनन न करताही विद्‌वान होता येतं. कवितेची घसरण करण्यात त्यांचाच मोठा वाटा असल्यामुळे वर्तमानपत्रातूनही कविता आता आपली जागा गमावून बसली आहे.
कविवर्य सुरेश भटांना "मेंदीच्या पानावर'....सारख्या अनेक कविता पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे वाट पहावी लागली, हे सत्य आहे. "उचलला पेन की लावला कागदाला..' आणि मग तेच रसिक या तथाकथित कविंना "सुंदर, अप्रतिम' म्हणत त्याला बिघडविण्याचा जिवघेणा खेळ खेळतात. दोघेही एकमेकांशी ठोकून देण्याचा धंदा करतात. ते कवी महाशयांच्या लक्षात येत नाही. कविता वर्तमानपत्रात छापून येण्याची लायकी नसलेलेही मग गल्लीतले एका रात्रीतून महाकवि होतात. त्यासाठी धन्यवाद "फेसबुक' आणि त्याच्या सोशल भावंडांचा.
कविता ही साधना आहे. ती तपश्‍चःर्या आहे. ती फुलत, बहरत जाण्याची अखंड प्रक्रिया आहे. तिला खूप वेळ द्यावा लागतो. त्यात संयम, समतोल, जगण्यावरचा विश्‍वास आणि सगळयात महत्वाचं की आतली लय ऐकण्याची सवय महत्वाची आहे. एक उर्दू कवि म्हणतो की....
गझल मे बंदीशे, अल्फाजही नही काफी
जिगर का खूनभी चाहिऐ असर के लिये !!
तंत्र गवसले की आपण नैसर्गिक लयीशी एकरूप होतो...निसर्गाला बनवेगीरी चालत नाही. म्हणून केशवसुत कवितेला आकाशातील विजेची उपमा देतात. लय सापडणे म्हणजे आपण आपल्याला गवसणे... बाकी कितीही लिहिले तरी त्यात काव्य नसून ती कवितेची केवळ टरफले असतात. ते असतात फक्‍त "ट' ला "ट' जोडण्याचे फालतू उद्योग ! "टाईमपास' म्हणून उचललेली लेखणी अखेर जीवनाला अर्थहिन बनविते. एकंदर आपल्या अस्तित्वाची तहान लागणे आणि त्याचा सतत ध्यास घेणे म्हणजे जीवनातील कविता शोधणे होय.......!!

                                                                                             * विजयकुमार राऊत


सोमवार, 1 फ़रवरी 2016

जग जिंकण्याऐवजी स्वतःलाच जिंका !

* विजयकुमार राऊत

जगात ज्या गोष्टी दिसतात, त्या एक दिवस संपणारच असतात. कारण त्या कालौघात नष्ट होण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. कुठलीही गोष्ट नित्य नसतेच. जगातील सगळया गोष्टी अनित्य असल्याचे भगवान बुद्‌धांनीही म्हटले होते. भौतिक यशाचेही तसेच असते. आपल्या यशाचे गणितच मोठे विचित्र असते. आपण मिळविलेले यश चुकीच्या समजूतींवर आधारित असल्यामुळे अपयशानंतर यश, पुन्हा यशानंतर अपयश अशा वर्तुळात आपल्या जीवनाचे मार्गक्रमण होत असते. स्पर्धेतून आलेले यशच प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. कारण ते मोठया कष्टानं मिळालेले असते. ते मिळविण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा कस पणाला लावलेला असतो. इतरांशी संघर्ष करीत आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले असतो. साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून विजयश्री आपल्या पायाशी लोळण घालत असते. आज तर स्पर्धा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मित्रांनो, दुस-याच्या पराभवाच्या इमारतीवर जर तुमचं यश उभं राहात असेल तर असं यश तुम्हाला आवडेल का? अनेकांच्या शारिरीक, मानसिक, भावनीक कत्तली करून मिळालेले यश मला आनंद देत असेल तर त्या यशाला काय म्हणावं? हे क्षणिक समाधान मला कायम पुरणार आहे का?

जगाच्या व्यवहारात आपण केलेली स्पर्धा स्वतःशी निकोप नसते. आपण कळत न कळत दुस-याशीच स्पर्धा करीत असतो. परंतु मित्रांनो, दुस-याशी तुलना करून स्वतःला कमी अधिक जोखू नये. ख-या अर्थानं त्याचा काहीच उपयोग होत नाही. जसं मी माझया दुःखास कारणीभूत आहे, तसाच माझया अपयशास दुसरा कोणी जवाबदार राहू शकतो का? परंतु आपणं सगळंच अगदी विरूद्‌ध दिशेने जगत असतो. आपलं यश हे दुस-याचा पराभव करण्यावर अवलंबून असतं. म्हणून ते टिकाउ नसतं. पूर्ण काळ सुख देणारं नसतं. दुस-याला कुठल्याही स्थितीत पराभूत करून स्वतःच्या विजयाचा झेंडा मिरविणे यालाच आपण यश म्हणतो. हे यश दिखावू असतं. इतरांनी माझं वर्चस्व कबुल करावं यासाठी या यशाचा उपयोग करता येतो. या विजयाला मिरविण्यासाठी आपल्याला इतरांचं प्रमाणपत्र लागतं. दुस-याचा पराभव करणे म्हणजे एक प्रकारची मानसिक हिंसाच असते, हे सांगतं ते अध्यात्म. जगज्जेता सिकंदर, हिटलर किंवा सम्राट अशोकाचे काय झाले? यांनी तर अमाप यश संपादीत केले होतं ना ! परंतु शेवटच्या क्षणी अख्खं विश्‍व जिंकूनही ते पराभूत का झाले? कारण त्यांच्या यशापयशाच्या संकल्पनाच मुळात नैसगिक नव्हत्या. त्या एकंदर मानवतेच्या विरोधात होत्या.

चिनी तत्वज्ञ लाओत्सेला कुणीतरी विचारलं की, आपण नेहमीच म्हणता की कोणीच मला हरवू शकत नाही. ते कसं काय? यावर लाओत्सने उत्तर दिलं की मला कुणीच शेवटपर्यंत हरवूच शकत नाही. कारण मी कुणाशीच स्पर्धा करत नाही. मी अशा ठिकणी बसतो की जेथून मला कोणी उठ म्हणत नाही. त्यामुळे कुणालाच अडचण होत नाही आणि मी माझया जागेवर कायम असतो.

आपण अध्यात्माला धार्मिकतेच्या जोखडात बंद केलं असल्यामुळे चुकीच्या संकल्पना तयार होत गेल्या. या जगात अध्यात्म हे माझयासाठी नाहीच, असं ठाम मत बनतं. भगव्‌तगीता, महाभारत किंवा ज्ञानेश्‍वरी, वेद-उपनिषद आदी ग्रंथ हे केवळ पुजेसाठी नसतात. त्या ग्रंथातून जगण्यातील सर्व तत्वज्ञान मांडलेलं असतं. मानवतेचं दिशादिग्दर्शन त्यात मिळतं. परंतु आपण प्रतिकांत अडखळतो. म्हणून तर आपण सत्यापर्यंत पोहचू शकत नाही. "आय विल चेंज, डे बाय डे' असं म्हणत कालच्यापेक्षा आज मी किती उत्तम झालो, हे सांगायला दुस-याची गरज नसते. तिथे आपणच न्यायालय असतो आणि आपणच आरोपी. आज मिळालेल्या भौतिक यशाच्या मिरवणूकीचा बाज जर लोकांच्या नजरेत भरणारा असला तरी हा बाज आपला माज उतरवून केव्हा बर्बाद करेल हे सांगता येत नाही. कारण सृष्टीचा नियमच परिवर्तनाचा असतो. आज आहे ते उद्या नाही. जीवन एका वर्तुळाकार गतीने चालत असते. कधी पाण्यावर नाव तर कधी नावेत पाणी, असं वर्तुळ नको असेल तर स्पर्धेची दिशा बदलायला हवी. स्पर्धा बहिर्गम असली तर ती एक दिवस अपयशात परिवर्तीत होणारच. इतरांच्या नजरेत भरणारं यश हे एक दिवस संपणारच.. मग सदासर्वकाळ तुम्हाला यश हवं असेल तर अंतर्मुख होउन स्वतःशी स्पर्धा करायला शिकलं पाहिजे. मग मनावर विजय मिळविणा-या यशस्वी माणसाचे यश कधी कुणाला दिसणारं नसतं. कारण ते पाहण्याइतकी सर्वांची दृष्टी परिपक्‍व झालेली नसते...त्या यशाला कधीच मरणही येत नाही.

                                       * विजयकुमार राऊत


शनिवार, 23 जनवरी 2016

भाऊ, अजून कविता सरली नाही....

                                                              * विजयकुमार राउत


सायंकाळी कळले मजला, वहीत पाने उरली नाही
किती जणांनी लिहिली कविता, अजून कविता सरली नाही !!

भाऊंचे जाणे मनातील आसमंतात काळाभोर अंधार पेरून गेले. कोण जाणे ! काही माणसं अशीच असतात आपल्या अवतीभवतीच्या अस्तित्वाला सुन्न करून जाणारी. वातावरणात निःशब्दता पसरून पलिकडच्या प्रवासाला निघणारी. भाऊंचे जाणेही भली मोठी पोकळी निर्माण करून गेले. कवितेतील त्यांची "भाईगिरी' थेट व्यवस्थेलाच हलाल करून जाणारी, तर कवितेतला "भाऊ' मात्र संपर्कातील माणसांना बंधुत्वाचा साक्षात्कार घडविणारा. अबे, नालायक, हरामखोर, मुर्ख आणि अशा कितीतरी शिव्या त्यांच्यावर प्रेम करणा-या माणसांना ऐकणेच भाग पडायचे. नंतर मात्र भाउंच्या वागण्यातून समोरच्या व्यक्‍तींबद्‌दलचा त्यांच्या मनातील प्रेमाचा झरा नुसताच कोसळत राहाण्याचा अनुभव माझयासारख्या नवख्या माणसांना अनेकदा आला. कविवर्य सुरेश भटांशी त्यांची "केमिस्ट्री' तंतोतंत जुळताना मी पाहिली. पृथ्वीवरच्याच अज्ञात बेटासारखी ही माणसं कुणाला कळतच नाहीत. भाउंचे जाणेही असेच न कळणारे....
व्यवस्थेच्या छाताडावर बेधडक चढून क्रांतीचे गीत गाणारा "जिंदादिल' भाउ खरा माणूस, खरा गझलकार आणि खरा मित्र. आंबेडकरी कवितेच्या पानांवर त्याने निळया अक्षरात नेहमीसाठी आपली स्वाक्षरी कोरून ठेवली. सुप्रसिद्‌ध गझलकार नीलकांत ढोले यांच्याकडे आल्यानंतर भाउ सगळयांच्या मनावर बेमोसमी पावसासारखा धो-धो बरसायचे. कुटूंबातील सगळयांवर त्यांचा लडा. थेट स्वयंपाकघरातही त्याच्या पावलांची दणदण ऐकूण कविवर्य ढोलेंचं अख्खं घर गझलमय झालेले मी पाहिलं. जगण्यातील तत्वज्ञान ते बेमुर्वतपणे मांडायचे. भाउंच्या वागण्यांतून बुद्‌धाचे सौंदर्यशास्त्र स्पष्ट झळकायचे, तर बोलण्यातून आंबेडकरी क्रांतीच्या धगधगत्या ज्वाला. कविता आणि जगणं त्याच्यापासून वेगळे नव्हतेच कधी. म्हणून लिखाणातून व्यक्‍त होताना हातचं काही लपविले नाही. कुणाचीही भिडमुर्वत केली नाही. ते लिहिता लिहिता शब्दांत जगत गेले. आंबेडकरी साहित्यात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले असले तरी ते माणसांच्या दुनियेतला "धृवतारा'च होते.
या गावातील बेमानांना, किती उशीरा कळले होते !
आम्ही जळलो तेव्हा कोठे, त्यांचे गाव उजडले होते !

फक्‍कडपणे बोलणा-या भाउंच्या शब्दांत एखाद क्षणी मला "दर्द' दिसायचा. भाउंच्या जगण्यातील बेफिकीर वृत्ती बोलण्यातून झळकायची. स्वभावातील दोन्ही पैलू टोकाचेच...एक प्रेमाचा तर दुसरा ताडामाडासारखा कठोर. "विजू, याले समजाउन सांग ... तुहया पोराचं नाव दिक्षांत कशाला ठेवतोस? दुसरं काही शोध...' असाच काहीसा सल्ला देउन जाणारा...आणि ह्रदयनाथ मंगेशकरांनी "उषःकाल होता होता' भटांच्या या गीताला लावलेली चाल आवडली नसल्याचं मित्रांमध्ये स्पष्ट बोलणारा.. " निलू, आता घरी गेलं पाहिजे यार...' असं म्हणत एखादया नटखट बालकासारखं कविवर्य ढोलेंच्या गालाचे चुंबन घेउन स्कुटरला "किक' मारून निघून जाणारा आमचा लाडका "भाई' आता पुन्हा कधीच दिसणार नाही.

                                                                                               * विजयकुमार राउत

8888876462

बुधवार, 6 जनवरी 2016

काळोखात उजेड पेरणा-यां माणसांची गोष्ट


                                                                                            विजयकुमार राउत

थॉमस अल्वा एडिसन ही असामान्य बुद्‌धीमत्तेची व्यक्‍ती. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावून काळोखात उजेड पेरण्याचे काम केले. एके ठिकाणी त्याच्या बालपणातील एक छोटीसी गोष्ट वाचनात आली. एडीसन लहान असताना त्याला दररोज शाळेत त्याची आई सोडून द्यायची. एके दिवशी एडीसनला शाळेत सोडण्यास ती गेली असता शाळेचे मुख्याध्यापक प्रवेशद्वाराकडे तरातरा चालत आले आणि तिच्या हातात एक चिठ्‌ठी दिली. आईने घरी जाउन ती वाचली आणि ओक्‍साबोक्‍सी रडायला लागली. लहानग्या एडिसनला काय झाले ते कळेना. सगळं काही कळण्याइतकं त्यां वयही नव्हतं. त्याने आईजवळ जाउन चौकशी केली. आईने त्याला जवळ घेउन चिठ्‌ठी वाचायला दिली. चिठ्‌ठीवर लिहिले होते, तुमचा मुलगा असामान्य बुद्‌धीमत्तेचा आहे. त्याला आमची शाळा पाहिजे त्या सोयीसुविधा पुरवू शकत नाही. आमची शाळा त्याच्या योग्यतेची नाही. त्याला दुसरीकडे न्या' एडिसनला मात्र आईच्या रडण्याचा अर्थ कळला नाही. त्याने खोदून खोदून आईला रडण्याचे कारण विचारले. आई म्हणाली, माझा मुलगा असामान्य बुद्‌धीमत्तेचा असल्याचे प्रमाणपत्र खुद्‌द शाळेने दिल्यामुळे माझया डोळयात आनंदाश्रृ आलेत.
काही वर्षानंतर एडीसन खूप मोठा होतो. विजेच्या दिव्याचा शोध लावल्यामुळे त्याचे नाव सगळीकडे झाले होते. मानसम्मान त्याच्या पायाशी लोळण घेतात. आईचे मात्र देहावसान झालेले असते. त्याला घडविणा-या आईची त्याला आज खूप उणिव जाणवू लागते.
एका सायंकाळच्या निवांत क्षणी तो आईचे कपाट उघडून तिच्या एकेक वस्तू न्याहाळतो. आईच्या एकेक स्मृती जागवू लागतो. एका डब्यात त्याला एक चिठ्‌ठी ठेवलेली दिसते. एडिसन कुतूहलाने ती चिठ्‌ठी उघडून वाचू लागतो. त्यात लिहिलेला मजकूर असतो... "तुमचा मुलगा फार मठ्‌ठ आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सरासरीइतकीही त्याची बुद्‌धीमत्ता नाही. त्यामुळे त्याला उद्यापासून या शाळेत पाठवायचं नाही ' एडिसनला त्याच्या बालपणची ती आठवण होते. शाळेतून परत येताना आई हंबरून रडल्याचं आठवतं. त्याला आता हळूहळू सगळं कळायला लागतं. एका सर्वसामान्य बुद्‌धीमत्तेच्या मुलासाठी आयुष्यात खचके खाउन तिने आपल्याला घडविल्याचा आईबद्‌दलचा सार्थ अभिमान जागृत होतो आईने लहानपणी दाखवलेली चिठ्‌ठी खरी नसते हेही त्याला कळते.. आज सापडलेली चिठ्‌ठी मात्र खरी आहे, हे समजल्यानंतर त्याच्या डोळयांतून आईविषयीचे अश्रृं गालावरून ओघळतात.
काळोखात उजेड पेरणा-यांच्या थोर माणसांच्या जीवनातील ही गोष्ट आहे. माणसांचं मुल्यमापन करणारे शेवटी कोण असतात? कधी कधी पारंपरिक मापांत कुठलं व्यक्‍तीमत्व मोजणे शक्‍य आहे का? रविंद्रनाथ टागोरांनी "शांतीनिकेतन' सुरू केलं. तिथे निसर्गाच्या खुल्या शाळेत विद्यार्थी ज्ञानार्जन करायला जात. एकदा शाळेची तपासणी करायला कुणीतरी आले. त्यावेळी वर्गातील सगळी मुले अभ्यास करण्यात मग्न होती. मात्र वर्गापासून काही अंतरावर दोन विद्यार्थी मातीत खेळताना पाहून मान्यवरांनी रविंद्रनाथांना विचारले. सगळी मुलं अभ्यास करत असताना ही मुले खेळतात , त्यांना तुम्ही शिस्तीने अभ्यास करायला का लावत नाही? त्यावर रविंद्रनाथ म्हणाले, खरंतर अभ्यास करणा-या मुलांचीच मला जास्त काळजी वाटते. त्या मातीत खेळणा-या मुलांचा मात्र मला अभिमान वाटतो. कारण ते निसर्गाच्या शाळेत शिकत आहेत. त्यांचं इमान मातीशी असल्यामुळे या मातीतूनच जीवनाचा मार्ग शोधतील. डॉ.अब्दुल कलाम म्हणायचे की या देशात प्रतिभा शोधायची असेल तर शेवटच्या बाकावरून सुरवात करावी लागेल. अमीर खान यांचा "तारे जमीपर' किंवा "थ्री इडिएट्‌स' हे सिनेमे पाहिले तर त्यातही त्याने हेच सुत्र मांडलें आहे. जी माणसं जीवनात खूप मोठी झालेली आपण पाहतो ती जगापेक्षा असामान्य बुद्‌धीमत्तेचीच होती. फक्‍त मोजणा-यांची मापे पारंपरिक होती. ही माणसं आगळयावेगळया उंचीने उठून दिसतात. जीवनात उजेड पेरणा-या माणसांना सलाम...!!
 
Blogger Templates