प्रत्येक धर्माचं सारही हेच आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. मग ही जीवन जगण्याची काही सूत्रे प्रत्येक धर्माने सांगितलेली आहेत. त्यापैकीच "आनंद' हेच समान सूत्र जगाच्या पाठीवर सगळीकडेच पाहायला मिळते. कुठल्याही धर्माचं अध्यात्म हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्म्यापर्यंत पोहचविणारा प्रवास असतो. त्यासाठी मानवनिर्मित अंधश्रद्धेत शिरण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. स्वतः निरोगी राहून "जगा आणि जगू द्या' या ध्येयापर्यत नेतो तो धर्म. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येक घरातील माणसामाणसांपर्यंत भक्तीचा वारसा पोहचला. "आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर असोत वा कुठलाही सुफी संप्रदाय केवळ आनंद आणि परोपकाराचे तत्वज्ञान सांगतो. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे. आंतरिक भावनेला महत्व देणारा हा संप्रदाय असल्यामुळे तो संवेदना जपताना दिसतो. म्हणून "आनंद' ही संवेदना संप्रदायात खोलवर रूजलेली दिसते. हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकीच एक स्वच्छंदी संप्रदाय म्हणजे सुफी. निर्गुण, निराकाराची भक्ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते. वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकाराशी नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्वर एकच आहे, अशी शिकवण दिली. हे करीत असताना मनाची निरामय अवस्था आणि आनंद हेच जीवनात हातात हात घालून प्रवास करीत असल्याचे दिसते. हा प्रवासच उच्चतम अवस्थेपर्यंत नेणारा आहे. अभिजात सूफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र' अशी केली आहे. विख्यात भारतीय गूढवादी ओशो रजनिस यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला "मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सूफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित महम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे. सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळें फकिरी वृत्तीनें राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ;ऑर्थोडॉक्स होता. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथीं इसमांच्या विचारांना व मतांनां इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनीं हाच सर्वेश्वरवाद ;पॅनथीइझम प्रस्थापित केला. हे सर्वेश्वरी मत सुफीपंथी गूढवादी विद्वानांनीं स्वयंप्रेरणेनें व कुराणाच्या आधारानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली असणे शक्य आहे. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे. सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे असे म्हणता येत नाहीं. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो असे सुफी लोक मानतात. तदनुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात. पुढे गूढार्थपर कविताही पुष्कळ होउन फारशी वाङ्मयांत अबू सय्यद, फरीदुद्दीन अत्तार ; जलाल अल दीन रूमी ; जामीए महमूद शबिस्तरी, इब्न अल् फरिद, इब्न अल् अरबी, नेमिसी वगैरे कवी ललामभूत आहेत. सुफी संप्रदायाने समाजाच्या निकोप वाढीसाठी आपल्याला संगीत, काव्याची भेट दिली यावरून मानवी जीवनाच्या उत्थानाबरोबर एकंदर मानवी मनही घडविण्याचे काम सुफींनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ध्यान ही "स्वबोधा' ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी प्रत्येक साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे. सुफींनी ध्यानाची त-हा मात्र स्वछंदी, मस्त धुंद स्थितीत परमेश्वराच्या भक्तीकडे जाण्याची निवडली. शिवाजी गोर्ले यांच्या शब्दांत, आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. सुख - दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो. आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. आनंद हीच यशाची पहिली पायरी असते. आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते. "इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल'. म्हणून आनंदाची सुत्रे सांगणारा सुफी असो वा अन्य कोणताही संप्रदाय ख-या अर्थांने आनंदापर्यंत पोहविणारेच शास्त्र आहे. विजयकुमार राउत साईनगर, ट्रॅक्टर कंपनी चौक हिंगणा रोड , नागपूर 8888876462 | |||
-