Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 13 अक्टूबर 2016

सुफींचा सर्वेश्‍वरवाद


                                                                                           विजयकुमार राउत

परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे " पिंडी ते ब्रम्हांडी' असा तो मामला आहे. एक मात्र खरे या निसर्गापासून आपण जसजसे दूर होउ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न मग ते मानसिक असो वा शारिरीक पातळीवर निर्माण होत जातात. पुढच्या काळात समाजात अधिकाधिक मानसिक समस्याच उद्‌भवणार, असे एकंदर संशोधन सांगते. या सर्व समस्यांवर आध्यात्मिक जिवन जगणे हेच अचुक उत्तर असू शकते, हे एकंदर महात्म्यांच्या जीवन जगण्याच्या पद्‌धतीवरून लक्षात येईल. वेद उपनिषादतील "अहं ब्रम्हास्मी' असो किंवा सुफी संत मंसूर यांनी ईश्‍वर भक्‍तीत बेधुंद होउन दिलेली "अन हलक' ही हाक किंवा बुद्‌धांचे "अत्त दीप भव' तिन्हीचा अर्थ एकच. फक्‍त शब्दांचा काय तो फरक !
अध्यात्म हे शरिर आणि मनाच्या पलिकडे जाउन थेट शुद्‌ध आत्म्यापर्यंत घेउन जाणारे एकमेव शास्त्र आहे. त्यासाठी मानवनिर्मीात देवाची पुजा किंवा अंधश्रद्‌धेत गुरफटण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. कुठलाही धर्म असो वा संप्रदाय हेच तत्व नेहमी सांगतो आहे. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. म्हणून अनेक संकटातून ताठ उभा राहणारा समाजपुरूष निर्माण करण्यात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा आहे. थोडक्‍यात काय तर विज्ञान म्हणजे नास्तीकांचं अध्यात्म आणि आस्तिकांचं विज्ञान म्हणजे अध्यात्म, अशी सुटसुटीत व्याख्या आहे.
भक्‍तीचे विविध प्रकार प्रत्येक पंथात व धर्मात पहायला मिळतात. हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप पाडली. अशा संप्रदायांपैकी एक म्हणजे सुफी. निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते.
वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकारापर्यंची नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळे फकिरी वृत्तीने राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ; ऑर्थोडॉक्‍स होता, असे म्हटल्या जाते. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथी इसमांच्या विचारांना व मतांना इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनी हाच सर्वेश्वरवाद ; पॅनथीइझम प्रस्थापित केला. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे, असं संशोधकांचं मत आहे. सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे, असे म्हणता येत नाही. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो, असे सुफी लोक मानतात व तद्‌नुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात.
सुफी मत किंवा तसव्वुफ याची व्याख्या त्याच्या स्वीकारकर्त्यांकडून इस्लामची आंतरिक, गूढवादी मिती अशी केली आहे. हे मत मान्य असणा-यांनाही "सुफी' म्हणतात आणि ते मुस्लिमांपुरतेच मर्यादित नाहीत. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित मुहम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे. अभिजात सुफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र" अशी केली आहे. अहमद इब्न अबिजा या सुफी गुरुच्या म्हणण्यानुसार सुफी मत म्हणजे दिव्यत्वाकडे प्रवास कसा करावा, आपले अंतरंग वाईट गोष्टी सोडून शुद्ध कसे करावे आणि प्रशंसनीय गुणांनी त्याला कसे सजवावे, हे सांगणारे शास्त्र होय. विख्यात भारतीय गूढवादी ओशो यांच्या म्हणण्यानुसार सुफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सुफी त्याला "मत' समजत नाही. परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सुफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. कुठलाही संप्रदाय किंवा धर्म हा अंधश्रद्‌धेपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. परंतु समाज नेहमी चमत्कारांपुढे नतमस्तक होत असल्यामुळे मुळे प्रवाह गढुळ होउन जातो. तेव्हा ख-या अर्थाने धर्म मरतो आणि मग उरते फक्‍त धर्माचे निष्प्राण कलेवर.
विजयकुमार राउत

8888876462
 
Blogger Templates