Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

रविवार, 11 सितंबर 2016

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

ओशो "नेव्हर डाय्‌ड'

.....

                                                                                        *विजयकुमार राउत

"मी निर्गुण, निराकार आहे...मी अनादी अन्‌ मी अनंत आहे..असं सांगणारे भगवान श्रीकृष्ण असोत किंवा फळ झाडावरून खालीच का पडते, असं विचारणारा न्युटन असो, जेव्हा तत्कालीन समाजाच्या डोक्‍याचा भूगा पाडून विचारांचा जळजळीत निखारा डोक्‍यात पेरून जातात तेव्हा ती माणसं हमखास विद्रोहीच ठरविली जातात. त्यांचे विचार काही लोकांसाठी उपहासात्मक जरी ठरले तरी त्या विचारांची नाड मात्र या मातीतून कदापी उखळून फेकता येणार नाही, हेच खरे. म्हणून ओशो रजनिशांना बुद्‌धाप्रमाणे जेवढे नाकारले जाते, तेवढेच समाजात स्वीकारलेही जाते, हेही सत्य आहे.
ओशो रजनिश एक विद्रोही व्यक्‍तीमत्व म्हणून 11 डिसेंबर 1931 रोजी जन्माला आले खरे.. परंतु त्यांच्या विचारांच्या शलाका शेकडो वर्षे भविष्यात प्रकाशमान होताना दिसतात. ओशो विश्‍वाच्या क्षितीजावर अलौकिक दिव्यत्वाने तेजाळून उठतात. फक्‍त व्यवहाराच्या चौकटीत फिट बसलेली भाषा समाजाच्या डिएनएत सुप्त वास करीत असते. तेव्हा मात्र अख्या पिढीची बौद्‌धीक आणि एकंदरीत शरिर रचनाच क्‍लिष्ट झालेली असते. यातील विरोधाभास असा की ती सर्वसामान्यांना कळणारी भाषाही कालांतरणाने लोकमान्य झाली तरी त्यातील अर्थ मात्र मेलेलाच असतो. मग आपण निष्प्राण झालेलं कलेवर खांदयावर घेउन वावरत असतो. म्हणून वारंवार बुद्‌ध, कबीर, ज्ञानेश्‍वरासारखे संत येउन माणसाच्या जगण्यातील गर्भितार्थ उलगडून जातात.
ओशोंनी केलेली वक्‍तव्ये मात्र एका नव्या वादास जन्म देणारी ठरली नाही, तरच नवल! "संभोगातून समाधी' असो किंवा त्यांच्या गुढ व्यक्‍तीमत्वाचा एकूण भाग असो. कृष्ण जसा पूर्ण पुरूष असल्यामुळे सर्वसामान्यांच्या हाती लागत नाही तसेच ओशोचं व्यक्‍तीमत्वही पा-यासारखं हातून निसटून जातं. हेच असामान्य माणसाचं जीवन असतं. मग व्यक्‍तीमत्वातली गुढता येते कुठून? याचा विचार केला तर जीवन सरळ असते,..समजणा-याच्या मनातील आणि एकूण त्याच्या जगण्यातला गोंधळच मग व्यक्‍तीमत्वाची गुंतागुंत करून ठेवते. मेंदूतील न्यूरॉन्सच्या निर्मीतीतील प्रक्रियाच क्‍लिष्ट करून ठेवल्यामुळेच आपणंही "मल्टी डायमेंशनल' न होता "मल्टी सायकीक' झालेले असतो. मग अशा वेळी ओशोंसारख्यांच्या वक्‍तव्यात विरोधाभास शोधून त्यांच्यावर टिका होते. म्हणूनच महापुरूषांचे विचार तत्कालीन समाजव्यवस्थेला पचनी पडत नाही. महापुरूषांच्या हयातीत ते रूजताना पाहण्याची संधी त्यांना मिळत नसते. ओशो रजनिशांच्या बाबतीत नेमके तेच झाले.
खरं म्हणजे ओशो रजनिश मनाच्या कुठल्याशा कप्प्यातून मुक्‍त श्‍वासासोबत आपल्या अंतरंगात प्रवेश करतात. हळूच ऑक्‍सीजनसारखे रक्‍तातून मेंदूपर्यंतचा मार्ग शोधत जातात. नसानसात शितलता पेरून गार हवेसारखे संपूर्ण अंतरंगात झिरपणे हा त्यांचा स्वभाव असतो. हळूहळू मग मनाचा प्रदेश काबिज करून डोक्‍यातील मेंदूच्या प्रदेशावरही कब्जा मिळवितात. त्यांच्या बुद्‌धीची तेजस्विता अनेक वाद उकरून मेंदूतील कारस्थान झिडकारून लावते. जुनाट परंपरा नाकारून नवीन सृजनात्मकतेशी धागे जोडून देते. नास्तीक आणि आस्तिकेची मूळं अलगद खोदून काढते. ओशो एकंदर अस्तित्वाशी एकरूप होण्याचं वारंवार निमंत्रण देतात. बुद्‌धाप्रमाणे स्वयंदीप होण्याचा कानमंत्र देउन जातात. त्याबद्‌दल त्यांना जगाचे आरोप-प्रत्यारोप सहन करावे लागतात. कुठल्या धर्माचं अनुयायीत्व न स्वीकारता कट्‌टरता सोडून स्वतःचा धर्म जागृत करण्यास सांगतात.
प्रज्ञेचं सळसळतं तेज घेउन ओशो नावाचं रसायन ब्रम्हांडातील अचेतन मनाच्या कृष्णविवरात अनेक दडलेल्या गुपितांचे एकेक पापुद्रे उलगडत जातं. असंख्य युगांपासून अस्तित्वाची ताटातूट झालेल्या अज्ञात विश्‍वाशी मग आपला परिचय व्हायला लागतो. आपल्याशी स्वतःला मिळवून देण्याचे अभिवचन देउन ते स्वतंत्र दृष्टी प्रदान करतात. तेव्हा गुरूजीएफप्रमाणे जीवनाकडे पाहण्याचा आपला अख्खा "गेस्टॉलच चेंज' झालेला असतो. दूर खोलवर पसरणारी मुळं आपल्या अपरिचित व्यत्मित्वातील दिव्यत्व शोधण्याकरीता स्वतःच स्वतःचं खोदकाम करतात. म्हणूनच जगाच्या पाठीवर त्यांना प्रवेश नाकारला जातो. शब्दात कितीही सांगीतले तरी त्याचा परिणाम होणारच नाही, हे जेव्हा कळायला लागते तेव्हा बुद्‌धाप्रमाणे ते सावधगीरी बाळगतात. जगातील महान पुरूषांनी वापरलेली मौनाची ताकद सर्वश्रेष्ठ असल्याचं मान्य करतात. कालांतराने ओशो निःशब्द होउन मौनात शिरतात ते यासाठी. त्यातून समाधीतील शून्यत्वाला अस्तित्वाशी एकरूप, एकसंध करून निराकारापर्यंत पोहचण्याचा प्रवास सोपा करतात. " आय नो .. आय डोन्ट नो' असं म्हणणारा सॉक्रेटीस किंवा "जो जानता है वो बोलता नही.. और जो बोलता है वो जानता नही' हे सत्य सांगणारा चिनचा लोओत्सु ओशोच्या तत्वज्ञानातून थेट मूकसंवाद साधताना दिसतो.
जगाच्या व्यासपिठावर ओशो रजनिश एक अलौंकिक व्यक्‍तीमत्व असल्याचं आपल्याला थोडं उशीराच कळायला लागतं. त्यांच्या गूढवादी व्यक्‍तिमत्त्वाशी परिचय होण्यासाठी आपण त्यांना अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतो तसंतसे ओशो क्षितीाजाच्या पलिकडे घेउन जाण्याचा स्पष्ट इशारा करतात. दृष्य आणि द्रष्टा यांच्याशी असलेलं तादात्म्य संपल्यावर एका अमर्याद अशा निराकाराशी तदृप होण्याच्या आनंदात ते शुन्यत्वाचं दर्शन घडवितात.
शब्दांची साथ सोडून शब्दांच्या पलिकडे पाहण्याचा वारंवार संकेत देतात. तरी हा संकेत कळण्याइतकी माणसं उत्क्रांतीतही एका अर्थानं उत्क्रांत झालेली नसतात. मग जगातल्या एकंदर कलांचा जन्म ज्या तत्वातून झाला त्या तत्वाची जडणघडण समजायला लागते. यासाठी ओशो कविता आणि शायरीचा आधार घेतात.

"संभोग से समाधी तक' या पुस्तकावर होणारे वाद-विवाद, समज गैरसमज किंवा आरोप-प्रत्यारोप हा पारंपरिक बुद्‌धीचे कारस्थानच असल्याचे सिद्‌ध होते. फ्राईड असो वात्सायन.. किंवा मायथॉलॉजीत संभोग हा विषय उपेक्षित म्हणूनच त्याचे विकृतीकरण केले जाते. "संभोगातून समाधी'पर्यंतचा प्रवास समजून घेण्यासाठी पुस्तक न वाचता त्यांना दुषणं देणं अशा मेंदूचं काम असतं. हयात असतानाही आणि नसतानाही ओशो नावाचं गारूड जगातील असंख्य चाहत्यांच्या डोक्‍यातून काही केल्या उतरत नाही. बुद्‌ध, कृष्ण, महाविर, सुफी संत मंसूर , लाओत्से, कबिर ,मीरा, कन्फयूशिएस, गुरूजीएफ, खलील जिब्रान अशी कितीतरी नावं सांगावीत, त्या सर्वांशी रजनिश नाते सांगत जातात. ओशो समजने तर खुप दूरचे पण साधे वाचनेही पचनी पडत नाही. परमात्मा कही खोजने की चिज नही है . परमात्मा तो जानणे की चिज है' असं सांगत असताना आपल्यातील परम्यात्म्याशी जवळीक साधण्याचं बळ देउन जातात. म्हणून त्यांच्या समाधीवरील या ओळी आजही जिवंत वाटतात..
ओशो नेव्हर बॉर्न..नेव्हर डेथ्ड
ओनली व्हीजीटेड ऑन अर्थ प्लॅनेट !!
VRAUT90@YAOO.COM
 
Blogger Templates