Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

सोमवार, 29 अगस्त 2016

ससा, कासव पुन्हा नव्याने

विजयकुमार राउत


ससा आणि कासवाची गोष्ट आपण लहान असताना कित्येक वेळा ऐकलेली आहे. त्यात नवीन असे काहीच राहिलेंले नाही. अगदी कथेचा चौथा पडेपर्यंत आपण चर्वितचर्वण केलेले आहे. अतिआत्मविश्‍वास बाळगाल तर तुमची सदैव हारच होईल, हा बोध घेण्यापलिकडे आपण त्या कथेच्या वाटेला गेलेलो नसतो. रूपकं आणि प्रतिकं वापरून दिलेला संदेश नेमका आपल्यापर्यंत पोहचावा हा त्या कथेमागचा उद्‌देश असतो. तो किती पोहचतो, हेन बोललेले बरे. परंतु समाजात नेमके तसे होताना दिसत नाही. ससा हा भित्रा आणि वेगाने पळणारा प्राणी आहे, हे आपल्याला माहित आहे. आजच्या स्पर्धेच्या काळात ससाच्या चालीने चालणारे आपण अधिक वेगवान कसे होउ याचाच प्रत्यक्ष आपल्याला ध्यास लागलेला असतो. म्हणून आपल्या जगण्यातला वेग दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसतो. प्रत्येक गोष्टीत घाई करणे आपल्या अंगवळणी पडलेले असते. या वेगातून शरिराकडे दुर्लक्ष आणि असंख्य ताणतनाव व बेसुमार आजारांना सोबतीला घेउन आपण पुढच्या काळात कुढत कुढत जग असतो. ससा हा वेगवान आयुष्याचे प्रतिक आहे. आजच्या काळात तोही कदाचित मागे पडेल, असे आपले एकंदरीत जीवनमान झाले आहे.
फार वर्षापूर्वी वेगवान सशाची व मंद गतीने चालणा-या कासवाची शर्यत लागते. अन्‌ स्वभावाप्रमाणे ससा हरतो. सशाला वाटते आपण निश्‍तिच जिंकणार अशा भ्रमात तो विसावा घेता आणि कासव त्याच्या पुढे जाउन जिंकतो. परंतु यातील मर्म असे की ससा जसा वेगवान आहे तसेच त्याला आयुष्यही लाभलेले असते. बहुतांश त्याचे वय कासवाच्या तुलनेत खूप खूप कमी. ससा बहुतेक हा सुमारे 15 ते 20 वर्षच या पृथ्वीतलावर जगतो. तर कासवाचे आयुष्य चारपाचशेच्या घरात असते. या चारपाचशे वर्षाच्या काळात त्याच्या जीवनाचे घडयाळही अती मंद असते. कासवासाठी काळ मंद तर सशासाठी तो वेगवान. सशाच्या जीवनाचे घडयाळ अतिशय वेगाने धावणारे असते. त्यावरून ससाच्या ह्रदयाचे ठोके फारच गतीमान तर कासवाच्या ह्रदयाची धकधक फारच मंद. ह्रदयाच्या या गतीबरोबर त्याच्या जीवनाचा सर्व संकल्प, स्वप्न, आशा-आकांक्षांचा कालावधी ठरलेला असतो. या जगात एक दिवस जगणारे जीवही आपल्या संपूर्ण आयुष्याचे वतुर्ळ पूर्ण करूनच जगत असतो. प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तरूणपण, म्हातारपण आणि शेवटी मृत्यू असे हे वर्तुळ ठरलेले असते. हे वर्तुळ निसर्गाच्या नियमाप्रमाणे फिरत असते. परंतु त्याचा फिरण्याचा काळ आणि वेग मात्र निसर्गाने निश्‍चित केलेला असतो. प्रत्येक जिवाचे घडयाळ वेगवेगळे असते. चिमूरडया मुंग्याही आपले आयुष्य वर्तुळ पूर्ण करून जगत असतात. माणसाला कदाचित सुमारे 80 वर्षाचे आयुष्य वाटयाला येते. यात सर्व टप्पे ओलांडायचे असतात. कासवाला लाभणारे आयुष्य माणसाच्या तुलनेत फार लांब असते. तर सशाचे त्याहूनही अल्प. अल्पशा कालावधीत संपूर्ण आयुष्याचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी त्याच्या शरिराची एकंदर रचनाच निसर्गाने करून ठेवलेली असते. कासवासाठी मात्र आयुष्याचा पल्ला लांब असतो. त्याला ससाच्या तुलनेत फार दीर्घकाळात प्रवास पूर्ण करायचा असतो. या कथेपासून माणसाने खूप काही शिकण्यासारखे आहे. आपल्या जीवनातील काळही आता वेगवान झाल्याचे दिसून येते. ताळतंत्र सोडून सगळया गोष्टी कमी श्रमात , कमी वेळात मिळविण्याकडे आपला कल असतो. प्रत्येक पिढीत यश हस्तगत करण्याचा वेग वाढला आहे. त्यातून माणसाच्या वाटयाला काय येत आहे? तर भविष्याची चिंता, त्यातून येणारी अस्वस्थता आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकळत आपल्या हाती येतो शार्टकटचा मार्ग. आपल्या आजूबाजूची गतीमान होत जाणारी धावपळ आणि त्यातून आलेली अस्वस्थता याकडे आपण कधी डोळेभरून पाहतो का?
विजयकुमार राउत
 
Blogger Templates