Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 6 जनवरी 2016

काळोखात उजेड पेरणा-यां माणसांची गोष्ट


                                                                                            विजयकुमार राउत

थॉमस अल्वा एडिसन ही असामान्य बुद्‌धीमत्तेची व्यक्‍ती. त्याने विजेच्या दिव्याचा शोध लावून काळोखात उजेड पेरण्याचे काम केले. एके ठिकाणी त्याच्या बालपणातील एक छोटीसी गोष्ट वाचनात आली. एडीसन लहान असताना त्याला दररोज शाळेत त्याची आई सोडून द्यायची. एके दिवशी एडीसनला शाळेत सोडण्यास ती गेली असता शाळेचे मुख्याध्यापक प्रवेशद्वाराकडे तरातरा चालत आले आणि तिच्या हातात एक चिठ्‌ठी दिली. आईने घरी जाउन ती वाचली आणि ओक्‍साबोक्‍सी रडायला लागली. लहानग्या एडिसनला काय झाले ते कळेना. सगळं काही कळण्याइतकं त्यां वयही नव्हतं. त्याने आईजवळ जाउन चौकशी केली. आईने त्याला जवळ घेउन चिठ्‌ठी वाचायला दिली. चिठ्‌ठीवर लिहिले होते, तुमचा मुलगा असामान्य बुद्‌धीमत्तेचा आहे. त्याला आमची शाळा पाहिजे त्या सोयीसुविधा पुरवू शकत नाही. आमची शाळा त्याच्या योग्यतेची नाही. त्याला दुसरीकडे न्या' एडिसनला मात्र आईच्या रडण्याचा अर्थ कळला नाही. त्याने खोदून खोदून आईला रडण्याचे कारण विचारले. आई म्हणाली, माझा मुलगा असामान्य बुद्‌धीमत्तेचा असल्याचे प्रमाणपत्र खुद्‌द शाळेने दिल्यामुळे माझया डोळयात आनंदाश्रृ आलेत.
काही वर्षानंतर एडीसन खूप मोठा होतो. विजेच्या दिव्याचा शोध लावल्यामुळे त्याचे नाव सगळीकडे झाले होते. मानसम्मान त्याच्या पायाशी लोळण घेतात. आईचे मात्र देहावसान झालेले असते. त्याला घडविणा-या आईची त्याला आज खूप उणिव जाणवू लागते.
एका सायंकाळच्या निवांत क्षणी तो आईचे कपाट उघडून तिच्या एकेक वस्तू न्याहाळतो. आईच्या एकेक स्मृती जागवू लागतो. एका डब्यात त्याला एक चिठ्‌ठी ठेवलेली दिसते. एडिसन कुतूहलाने ती चिठ्‌ठी उघडून वाचू लागतो. त्यात लिहिलेला मजकूर असतो... "तुमचा मुलगा फार मठ्‌ठ आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सरासरीइतकीही त्याची बुद्‌धीमत्ता नाही. त्यामुळे त्याला उद्यापासून या शाळेत पाठवायचं नाही ' एडिसनला त्याच्या बालपणची ती आठवण होते. शाळेतून परत येताना आई हंबरून रडल्याचं आठवतं. त्याला आता हळूहळू सगळं कळायला लागतं. एका सर्वसामान्य बुद्‌धीमत्तेच्या मुलासाठी आयुष्यात खचके खाउन तिने आपल्याला घडविल्याचा आईबद्‌दलचा सार्थ अभिमान जागृत होतो आईने लहानपणी दाखवलेली चिठ्‌ठी खरी नसते हेही त्याला कळते.. आज सापडलेली चिठ्‌ठी मात्र खरी आहे, हे समजल्यानंतर त्याच्या डोळयांतून आईविषयीचे अश्रृं गालावरून ओघळतात.
काळोखात उजेड पेरणा-यांच्या थोर माणसांच्या जीवनातील ही गोष्ट आहे. माणसांचं मुल्यमापन करणारे शेवटी कोण असतात? कधी कधी पारंपरिक मापांत कुठलं व्यक्‍तीमत्व मोजणे शक्‍य आहे का? रविंद्रनाथ टागोरांनी "शांतीनिकेतन' सुरू केलं. तिथे निसर्गाच्या खुल्या शाळेत विद्यार्थी ज्ञानार्जन करायला जात. एकदा शाळेची तपासणी करायला कुणीतरी आले. त्यावेळी वर्गातील सगळी मुले अभ्यास करण्यात मग्न होती. मात्र वर्गापासून काही अंतरावर दोन विद्यार्थी मातीत खेळताना पाहून मान्यवरांनी रविंद्रनाथांना विचारले. सगळी मुलं अभ्यास करत असताना ही मुले खेळतात , त्यांना तुम्ही शिस्तीने अभ्यास करायला का लावत नाही? त्यावर रविंद्रनाथ म्हणाले, खरंतर अभ्यास करणा-या मुलांचीच मला जास्त काळजी वाटते. त्या मातीत खेळणा-या मुलांचा मात्र मला अभिमान वाटतो. कारण ते निसर्गाच्या शाळेत शिकत आहेत. त्यांचं इमान मातीशी असल्यामुळे या मातीतूनच जीवनाचा मार्ग शोधतील. डॉ.अब्दुल कलाम म्हणायचे की या देशात प्रतिभा शोधायची असेल तर शेवटच्या बाकावरून सुरवात करावी लागेल. अमीर खान यांचा "तारे जमीपर' किंवा "थ्री इडिएट्‌स' हे सिनेमे पाहिले तर त्यातही त्याने हेच सुत्र मांडलें आहे. जी माणसं जीवनात खूप मोठी झालेली आपण पाहतो ती जगापेक्षा असामान्य बुद्‌धीमत्तेचीच होती. फक्‍त मोजणा-यांची मापे पारंपरिक होती. ही माणसं आगळयावेगळया उंचीने उठून दिसतात. जीवनात उजेड पेरणा-या माणसांना सलाम...!!
 
Blogger Templates