गीत रामायणकार गदिमाच्या गीतांचे स्वर कधीकाळी कानी पडले तर एका वेगळया भावविश्वात अंतर्बाहय रमून जाणेच मी पसंत करतो. काय सुरेख गीत आहे! समाजातील एक जळजळीत वास्तव्य गदीमांनी त्या गीतातून रेखाटलेलं आहे. एका तळयात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक... शेवटच्या कडव्यात मात्र गदींमा त्या पिलाला खोटया भ्रमातून बाहेर काढतात. . एके दिनी परंतू, पिल्लास त्या कळाले भय वेड पार त्याचे, वा-यासवे पळाले पाण्यात पाहताना, चोरुनिया क्षणैक त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक खरंच... समाजात यापेक्षा दुसरं काय होतं? सगळयांना मोजण्याची एक फुटपट्टी तयार केली या समाजाने. सर्वांना एकाच मापात मोजले जाते. त्याने किमान समाजाने ठरविलेल्या निकषातच जगावे, हीच समाजाची धारणा असते. एक स्वतंत्र व्यक्ती या समाजात स्वतःचे विचार व्यक्त करीत असेल..तर त्याला त्याच्या अभिव्यक्तीपासून रोखण्याचा प्रयत्न समाजातील काही धुरिन पुढे येउन करीत असतात. सर्वप्रथम एक व्यक्ती म्हणून प्रत्येकाचं जन्मतःच वेगळं व्यक्तिमत्व असतं. निसर्गानं त्या व्यक्तीची जन्माला येताच एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणाच्याच हातांचे ठसे कुणाशीच मिळत नाहीत. म्हणून तर आता आधार कार्डवर प्रत्येक व्यक्तींची ओळख हे त्याच्या हाताचे ठसे ठरविण्यात आलेली आहे. परंतु प्रत्यक्ष समाजात स्वतंत्र विचार किंवा ओळख निर्माण होण्याआधीच जमिनीतील कितीतरी अंकुर जमिनीतच दफन केले जातात. स्वतंत्र एका व्यक्तींसाठी समाज नेहमी शत्रूच असतो. कारण त्याचं स्वतंत्र व्यक्तीमत्व समाजासाठी धोकादायक आणि तितकंच आव्हानात्मक असतं. म्हणूनच व्यक्ती या समाजात जन्माला येताच त्याच्यावर संस्कार आणि रूढी , परंपरेचे ज्ञान दिले जाते. त्याला समाजाच्या चौकटीत जगायला शिकविल्या जाते. एखादे बंडखोर मुलं असेल तर त्याच्यावर भिती, धाक दपटशाने अंकुश घालण्यात येतो. समाजात वावरताना समाज काय म्हणेल, या गोष्टीची चिंताच अधिक केल्या जाते. बालपणातच त्याची प्रतिभा समाजास घातक ठरू नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. आजपर्यंत झालेल्या महान व्यक्तींचा समाजाने खूप छळ केला असल्याच्या कथा इतिहासाच्या पानोपानी वाचायला मिळतात. स्वामी विवेकानंद एके ठिकाणी म्हणतात की, मी इतरांपेक्षा वेगळा म्हणून ते मला हसतात. आणि ते सर्व एकसारखे वागतात , म्हणून मी त्यांना हसतो. समाजाला त्याचंच एक प्रॉडक्ट हवं असतं. त्या "प्रॉडक्ट' ची किंमत ठरविण्यासाठी त्याची सामाजिक मूल्ये आवश्यक असतात. समाजाचे व्यवहार मोठे अजब असतात. समाजात राहायचे असेल तर ते पाळण्याची एक अट व नियम समाजाने घालून दिलेले असतात. तिला व्यवस्था म्हणतात. समाजाची स्वतःची एक व्यवस्था असते. अवतीभवती दृष्य अदृष्य स्वरूपात असलेला समाज सर्वप्रथम व्यक्तीची प्रज्ञा गोठविण्यासाठी प्रयत्न करीत असतो. मित्रांनो, समाजाचे आणि व्यक्तीचे विळा भोपळयाचे वैर असते. समाजापेक्षा व्यक्ती मोठा झाला तर त्याचा विरोध होतो. चाकोरीतील सामाजिक रूढी , परंपरा तोडण्याचा एखादयाकडून प्रयत्न झाला तर त्या व्यक्तीला समाजाच्या बाहेर काढून त्याच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अत्याचार केले जातात. गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले यांच्यावरील हल्ले त्यातूनच झालेले आहेत. तर आजचे ख्यातनाम समाजसुधारक नरेंद्र जाधव किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी समाजाला काही वेगळे देण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना गोळया घालण्यात येतात. काय गुन्हा होता त्यांचा? समाजात समाजाच्या भल्यासाठी वेगळे विचार करणे हा गुन्हा होता का? नाही. त्यांचे विचार हे आपल्या दुकानदारी व्यवस्थेला घातक असल्याचे दिसून येतात तेव्हा समाजातील खलनायकांचा आत्मा खवळून उठतो आणि मग ते हा मार्ग अलंबितात. या व्यवस्थेसाठी प्रत्येक स्वतंत्र विचाराची व्यक्ती ही विद्रोही वाटत असते. गॅलीलिओचे काय झाले? सॉक्रेटिसला विषाचा पेला कुणी दिला? महात्मा गांधींना गोळया कुणी घातल्या?येशूला क्रृसावर कुणी चढविले?बुद्धावर कुणी हल्ले केलेत? तुकारामाला कुणी सदेही स्वर्गात पाठविलं? या स्वतंत्र प्रतिभेच्या थोर पुरूषांचे विचार ज्या समाजाला पेलवत नाही. समाजाच्या नितीनियमांनी चालणारा समाज नवीन विचारांना जवळ करतो की काय, अशी भिती वाटत असल्यामुळे समाज अधिक हिंसक होउन विचाराचं उत्तर गोळयांनी देउ पाहतो. जन्म घेतला तेव्हापासून मरेपर्यंत आपण एकंदर समाजाच्या प्रभावाखालीच जगत असतो. म्हणून मग माणूसही समाजाचं एक बायोप्रॉक्ट होत जातो. म्हणूनच ओशो म्हणतात ते शंभर टक्के खरं आहे. comparison is a very foolish attitude because each person is unique and incomparble. one this understanding settels in you jealouse disappears विजयकुमार राउत Vraut697@gmail.com विजयकुमार राउत Vraut697@gmail.com | |||
-