Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

मंगलवार, 19 मई 2015

सिर्फ अहसास है ये... !



                                                                                  * विजयकुमार राउत
सुप्रसिद्‌ध विचारवंत अनिल अवचट यांनी एकदा नागपूरमध्ये केलेले विधान मला फार आवडले. ते म्हणाले, की मला कुठला "वादी' किंवा "कट्‌टर' होणे कधीच पसंत पडणार नाही. त्यांच्या विधानाचा आधार घेउन मला असं म्हणायचं आहे की पुरोगामित्व म्हणजे सर्वज्ञानी असणे, असे नव्हे. पुरोगामी म्हणजे कुठल्यातरी चौकटीत अंतिम सत्य बसवून आपलंच म्हणनं खरं करून भ्रमात जगणारा एक हट्‌टी प्राणी आहे. काही सम्माननिय अपवाद वगळता पुरोगामित्वालाही बदनाम करण्याचं काम सतत काही नकली पुरोगाम्यांकडून होत असते. पुरोगामी म्हणवून घेण्याची गेल्या काही दशकांपासून फॅशनच झाली आहे. "वादी' किंवा "कट्‌टर' होणं हे दुस-याच्या चष्यातून जग पाहण्यासारखंच असतं.
विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन करणा-यां संशोधक, वैज्ञानिकांजवळ सकारात्मकता अधिक असते. प्रत्येक नवा शोध लागल्यानंतर ध्येयाकडे केवळ चालत जाण्याची केवळ 000.09टक्‍केच वाटचाल झाली असल्याची कबुली संशोधक देत असल्यामुळे विज्ञान कधीच अंतिम सत्याचा दावा करीत नाही. शेवटी हा प्रवास असतो. येथे अंतिम असं काहीच नसतं. निसर्ग हा प्रत्येक वेळेस बदलत असतो. या परिवर्तनातच सृष्टीला खरी मौज आहे. म्हणून प्रत्येक पिढीत बदल पहायला मिळतात. उलट सृष्टीच्या नियमानुसार जो बदलत नाही तो संपतोच. डार्विनने हे अभ्यासाअंती त्याच्या सखोल संशोधनातून जगासमोर मांडलं. बदलास प्रतिसाद न देणा-या अनेक प्रजाती आतापर्यंत आपलं अस्तित्व गमावून बसल्याचे दिसून येते.
ख-या अर्थानं खूप शिकलेला माणूस सुशिक्षित होण्यापेक्षा अतिशहाणा होत जातो. त्याच्या अंगात पदव्यां व शिक्षणाविषयी अहंभावच अधिक असतो. सिद्‌धांतवादी किंवा कट्‌टर होणं, हेही अज्ञानाचंच लक्षण असतं. "देव , धर्म सब झुठ आहे...' वगैरे वगैरे म्हणत तो स्वतःला पुरोगामी किंवा नास्तिक म्हणविण्यात धन्यता मानतो. जे डोळयाने दिसते किंवा जे सिद्‌ध करू शकतो, त्यालाच तो मानतो. काही गोष्टी डोळयानें दिसत नाहीत. मग त्या मानायला नकोत का? सुक्ष्मदर्शक यंत्रानंही ज्या "बॅक्‍टेरियां'चं अस्तित्व सिद्‌ध होणे कठीण असते. अशा अनेक गोष्टीचं अस्तित्व सिद्‌ध करताच येत नाही.
शिक्षण घेतल्यानंतर सर्वच प्रश्‍नांची उत्तरे मिळावीत, अशी प्रत्येकाची महत्वाकांक्षा असते. परंतु मित्रहो, शिक्षण मिळाले म्हणजे तुम्हाला देवाकडे पाहण्याची दृष्टीही प्राप्त झाली, असा त्याचा अर्थ होत नाही. देव आहे किंवा नाही, हा प्रश्‍न म्हणजे आपल्या खिशात कवडीही नसताना आपण विमान विकत घेण्यास चाललो, अशा प्रकारचा हा शिक्षित मंडळीचा स्वभाव असतो. इथे "देव' हा शब्द वापरणे हा एक नाईलाज आहे. महात्मा फुलेंना हा शब्द मंजूर नसल्यामुळे त्यांनी एक सुंदर शब्द मराठीला दिला तो म्हणजे "निर्मीक'. हा निर्मीक कोण आहे.. कसा आहे. हे प्रश्‍न फजूल आहेत. भगवान ओशो यांनी "रसो वैसः' म्हणून संबोधलं आहे. तो निगुर्ण, निराकार आहे, हे जगातील प्रत्येक धर्माने सांगीतले आहे. आपल्याला देव किंवा निर्मीक समजून घ्यायचा असेल तर थोडे वेगळे भांडवल कमाविण्याची गरज आहे. जसं काव्य समजून घ्यायचं असेल तर संवेदनशिलता हा गुण महत्वाचा आहे. त्याचा रसास्वाद बुद्‌धीच्या बळावर घेता येत नाही.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उगाच का म्हणून जातात ? "देव बाजारचा भाजीपाला नाही रे.. देव अशानं भेटायचा नाही रे..!' उठसुठ देव कोठे आहे ? देव दाखवा नाही तर श्राद्‌ध करा...तुम्ही देवभोळे, अशी धमकी देत जिंकल्याच्या अविर्भावात स्वतःलाच नास्तिकतेचं प्रमाणपत्र देणा-यांना ते या भजनातून समर्पक उत्तर देतात. ही सगळी उठाठेव कशासाठी? हेच कळत नाही. देवाचे स्वरूप समजून सांगण्यासाठी मला शब्दांचा आधार घ्यावा लागतो. हा माझा नाईलाज आहे. तो निर्गुण आहे...निर्वीकार आहे, हे कुठल्या शब्दात बरे सांगता येईल? कारण मानवी बुद्‌धीला त्याही पलिकडे जाताच येत नाही. म्हणूनच तर सगुण साकाराची पुजा अस्तित्वात आली.
ंथिय साहित्यात "त्या 'निर्गुण- निराकार परमेश्‍वराच्या अस्तित्वाविषयी चार आंधळयांचा एक दृष्टांत आला आहे. त्या आंधळयांना हत्ती कसा असतो, हे विचारले असता एकमेकांना जसा जाणवला तसा ते सांगतात. कोणी म्हणतात हत्ती खराटयासारखा.. तर दुसरा आंधळा म्हणतो हत्ती सुपासारखा. तिसरा म्हणतो हत्ती घराच्या खांबासारखा.. प्रत्येक जण आपल्या मगदूराप्रमाणे उत्तर देतो. या लौकिक जगात वावरत असताना प्रत्येकाला "तो' ईश्‍वर कसा दिसतो, हे या दृष्टांतातून स्पष्ट केले आहे. शेवटी त्याच रस्त्याने जाणारा एक डोळस पुरूष त्या सर्व आंधळयांचा भ्रम तोंडतो व हत्तीचे संपूर्ण अवयव म्हणजे हत्ती, असं सांगतो. तसंच परमेश्‍वराचं आहे. ज्या ज्या गोष्टी दिसतात , त्या त्या गोष्टीत परमेश्‍वरच सामावलेला आहे. आपल्यापैकी अनेक जण त्यालाच ईश्‍वर समजून बसतात. प्रत्येक वेळी आपण सर्वसामान्य त्या आंधळयांच्याच भूमीकेत असतो.
"जे पिंडी ते ब्रम्हांडी' तसंच त्याचं अस्तित्व अणूरेणूत सामावलेलं आहे. शेवटी हा प्रवास आपल्यापासून सुरू होतो आणि आपल्यावरच संपतो. कारण मीदेखिल या सृष्टीचा एक अणूच आहे. जे या सृष्टीत आहे, ते ते माझयात आहे. म्हणून परमेश्‍वराचा एक परिपूर्ण अंश माझयातही आहे. म्हणून मी अगदी रेणूपेक्षाही छोटा आणि आकाशापेक्षाही अतिविशाल आहे. प्रत्येक गोष्टीत पुरावा हवा कशाला? आणि पुरावा देण्याइतके आपण परिपूर्ण आहोत का? निसर्ग तर प्रत्येक वेळी आपल्यावर प्रयोग करतो. सृष्टीची उत्क्रांती करीत असताना प्रत्येक पिढीत तो बदल घडवून आणतोच. डोक्‍यातली विचारांची चिवचिव थांबवा आणि थोडे संवेदनशिल होउन त्याच्या अस्तिवाचा सूक्ष्म आवाज ऐका !
म्हणून गुलजारच्या शब्दात थोडासा फेरफार करून म्हणता येईल....
सिर्फ अहसास है ये, रूहसे महसूस करो.
प्यार को प्यारही रहने दोन कोई नाम ना दो'.
.
आता फक्‍त गुलजारच्या ओळीतून "प्यार' हा शब्द बाजूला करा आणि तेथे जो कोणी सृष्टीचं संचालन करणारा आहे, त्याला त्याठिकाणी बसवा. म्हणजे तुम्हाला जीवनाच्या सकारात्मकतेचा आनंद घेता येईल. कुठल्याही गोष्टीला आपण शब्दात पकडण्याचं धाडस करतो आणि अर्थाच्या सागरात गटांगळया खातो. अनेकदा प्रश्‍न बालिश स्वरूपाचे असतात. या जगात ईश्‍वराचा शोध घेण्यास गेलेले सर्वच शेवटी स्वतःपर्यंत पोहचल्यावर त्यांना या मागचं सुत्र समजलं. म्हणून देव बाहेर शोधायचा नसतो तर प्रत्येकाने स्वतःच्या अंतःकरणात खोदायचा असतो.
आपल्याला जे इंद्रिये निसर्गाकडून मिळालेले आहेत, त्यांची काही क्षमता आहे. त्यापलीकडे जाण्याची क्षमता आपल्यात निसर्गानं निर्माण केलेली आहे. प्रयत्नांती ते साधता येतं. तेथे शब्दांची भाषा काम देत नाही. शब्दांच्या पलिकडे जावे लागते. एखाद्या मुंगीला आपण विचारले की बाई, हे विश्‍व केवढे आहे? तर तिच्या अवाक्‍यात जे आहे तेच तिचे विश्‍व आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या इंद्रियाचे असेच असते. त्याचा जितका अवाका आहे तेच त्याचं विश्‍व असतं.
परमेश्‍वर कसा आणि कुठे असतो, हे समजण्यासाठी अनेक विद्यांमध्ये पारंगत असलेला एक जण एका विख्यात महर्षींकडे जातो. महर्षींना विनंती करतो, की गुरूजी, आपली सगळीकडे ख्याती आहे. आपलं नाव चारी दिशांत पसरलेले आहे. इतक्‍या विद्यांमध्ये मी पारंगत असताना मला देव कुठेच मिळाला नाही. मी देव शोधण्याच्या इच्छेने आपणाकडे आलो. खूप विनवणी केल्यानंतर त्याला महर्षी एका तळयाशेजारी नेतात. पाण्यात उतरण्यास सांगतात. महर्षी त्याला खोल पाण्यात नेउन त्याचे डोके धरून पूर्ण ताकदीनिशी पाण्यात बुचकाळतात. तो शिष्य पाण्याच्या बाहेर निघण्यासाठी खूप धडपडतो. त्याला श्‍वास घेणंही कठीण होउन जातं. ते बलदांड महर्षी आणखी जोरात त्याला पाण्यात बुचकाळतात. तो युवक जगण्याच्या शेवटच्या उर्मीने उफाळून वर येतो. महर्षींना अद्‌वातद्‌वा बोलायला लागतो. "हे गुरूजी, आपल्याकडे मी देव कुठे आहे हे, विचारायला आलो होतो. तेव्हा तुम्ही माझा जिव घेत होता की काय?' युवक अर्धमेला झालेला असतो. महर्षी शांतपणे उत्तर देतात, "हे युवका, तुला देव दाखविण्याच्या तुझया इच्छेखातर तुला मी इथे आणले. तुला "तो' दिसला की नाही कोण जाणे ! तुला खरं तर देवाला बघण्याची तळमळच नव्हती. म्हणून तुझा जिव जाईस्तोवर मी तुला पाण्यात बुचकाळले. तहान लागल्याशिवाय तुला देवत्व कळणार नाही.' युवकाने योग्य तो धडा घेतला आणि रस्त्याने परत निघाला.
भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपलं रूप दाखविताना त्यालाही दिव्य दृष्टी बहाल केली. कारण सर्वसामान्य दृष्टीतून तो भगवंताचं रूप पाहूच शकत नव्हता. सगळी गीता शब्दात सांगून झाल्यानंतरही अजुर्न भगवंताला प्रश्‍न विचरतोच, तेव्हा त्यांना प्रत्यक्ष रूप दाखविण्याशिवाय गत्यंतर नसतं. थोडं व्यापक विचार केला तर भगवंतांनी संपूर्ण जिवसृष्टीचे विज्ञानच येथे सांगीतलेले आहे.
कोणी म्हणतात की देव कुठे आहे? त्याला प्रतिप्रश्‍न असा की, तुझी भक्‍ती कुठे आहे? प्रत्येक गोष्ट बुद्‌धीने समजून घ्यायची नसते. हे म्हणजे अभ्यास न करता मला पहिल्या नंबरने पास करा, म्हणण्यासारखं आहे.
कोण कहता हेै भगवान होते नही
तुने दिलसे कभीभी पुकारा नही !!

भगवान बुद्‌धांकडे एकदा तिन वेगवेगळया स्वभावाच्या व्यक्‍ती आल्या. पहिली व्यक्‍ती सकाळी येउन भगवंतांच्या पाया पडली आणि विनंती केली, हे भगवन, देव असतो की नाही?
तथागत समाधीस्थ होते. त्यांनी मानेने नकार दर्शविला. ती व्यक्‍ती निघून गेली. त्यानंतर दुपारी दुसरी व्यक्‍ती दुपारी येते. बुद्‌धांना नमस्कार करून तिनेही हाच प्रश्‍न विचारला. भगवन, देव आहे की नाही? तेव्हाही भगवंतांनी समाधीस्थ अवस्थेत मानेने होकार दर्शविला. त्यानंतर सायंकाळी एक शेतकरी आला. त्याने ध्यानस्थ बसलेल्या भगवान बुद्‌धांकडे पाहून नमस्कार केला आणि शांत चित्ताने तो एका कोप-यात जाउन बसला. त्याच्या मनाचा तळ अविचल होता. तिथे कुठलेच प्रश्‍न नव्हते. कुठलीच अशांतता नव्हती. भगवान बुद्‌धांनी अर्धोंमिलीत नजरेने तिच्याकडे पाहून थोडे मंद स्मित केलं. तो शेतकरी मनाने अधिक प्रसन्न झाला आणि निघून गेला.
रात्री तथागतांचा अत्यंत निकटवर्तिय, प्रिय भिक्षूक आनंद बुद्‌धांना प्रश्‍न विचारतो की "भगवान, माझया मनात आज एक शंका आहे. आजवर मी तुमच्यावर प्रेम केलं. तुमच्यासोबत राहिलो. तुम्ही आयुष्यात खोटं कधी बोलले नाहीत. परंतु आज मी जे बघितलं ते तुमच्याबद्‌दल भ्रम निर्माण करणारे आहे. आज तुमच्याकडे तिन व्यक्‍ती येउन गेल्या आणि तिघांच्याही एकाच प्रश्‍नाला तुम्ही तीन प्रकारची उत्तरं दिलीत. भगवान, कृपा करून मला हे सांगा. मला स्वस्थ बसवणार नाही.' भगवान पुन्हा स्मित करून त्याला शांत राहण्यास सांगतात. परंतु आनंदाच्या मनाची चलबिचल काही केल्या शांत होत नाही. शेवटी त्याच्या अस्वस्थतेपुढे भगवान आपले मोैन तोडतात. "प्रिय आनंद.. पहिली व्यक्‍ती मला भेटून गेली ती आस्तिक होती. म्हणून मी त्याला मानेनेच नकार दर्शवून त्याचा भ्रम तोडला. दुसरी व्यक्‍ती ही नास्तिक होती. त्यालाही मी होकार दर्शवून त्याचाही गैरसमज दूर केला आणि सायंकाळी आलेल्या तिस-या व्यक्‍तीला या प्रश्‍नांशी काहीही देणेघेणे नव्हते, म्हणून तिनं मला कुठलाच प्रश्‍न केला नाही. तो शेतकरी समाधानी होउन परत गेला. आनंदा, आस्तिक असो नाहीतर नास्तिक. माझे प्रशस्तीपत्र घ्यायला आलेले ते दोघेही अहंकारी पुरूष होते. मी जर त्यांचा अहंकार अधिक फुलावा या दृष्टीने उत्तर दिलं असतं तर त्यांनी समाजात जाउन सर्वसामान्यांची दिशाभूल केली असती. मीच सांगतो म्हणून जनमाणसाला दाखले दिले असते. केवळ माझया चुकीच्या प्रशस्तीपत्राने त्यांनी खोटयाचा प्रचार केला असता. परंतु तिसरा जो माणूस सायंकाळी आला, कुठल्याच प्रश्‍नाशी त्याचं काही देणंघेणं नव्हतं. तो अहंकारी नव्हता. तो सामान्य शेतकरी असल्यामुळे केवळ श्रमावर त्याचा विश्‍वास होता.'
परमेश्‍वराचं अस्तित्व समजून घेण्यासाठी कलावंताचं काळीज आणि बालकासारखं निष्पाप असावं लागतं, शेवटी हेच खरं !
                                     * विजयकुमार राउत

                                            

 
Blogger Templates