Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 30 अप्रैल 2015

हे दुःखी लोकांच्या देशा !


                                     * विजयकुमार राउत
हे माझया परमप्रिय देशा... तुझी ही दशा पाहताना मला खरंच फार वाईट वाटतं. अगदी कालपरवाच तुझया तब्येतीचा हाल हवाल जाणून घेताना काळीज अगदी सुन्न झाले. कुठल्यातरी "वर्ल्ड हॅपीनेस रिसर्च सेंटर'च्या अहवालानुसार तू अतिशय दुःखी लोकांचा देश असल्याचे शिक्‍कामोर्तब झाल्यापासून तुला फार वाईट वाटलं असावं. तुझा सख्खा शेजारी, जिवश्‍च शत्रू पाकीस्थान मात्र चक्‍क 51 व्या क्रमांकावर आणि तू 117 व्या क्रमांकावर ! म्हणजे तुझयापेक्षा तो दुपटीने पटीने सुखी. हे म्हणजे जखमेवर मिठ चोळल्यासारखं झालं. तुझयाविषयीचा कळवळा दाटून आल्याने माझयाजवळही तुझे सांत्वन करायलाही आता शब्द नाहीत रे ! कुणी "अच्छे दिन आनेवाले' म्हणत मनाची भलावण करीत सत्तेवर आल्यानंतर त्यानं धत्तू-या दाखवावं, असं झालं. हे प्राणप्रिय देशा... "अच्छे दिन' आनेवाले म्हणून कुणीही तुला "च्युत्या' बनवून जात असेल तर तुझी हालत चांगली कशी असू शकेल, राजा? आजपर्यंत या देशाच्या राजकीय इतिहासात तुला सगळे फक्‍त उल्लू बनवून आपापल्या बिळात सुखरूप झोपा घेत गेलेत. ते जाउ दे...आता हेच बघना. समर्थ रामदास म्हणायचे "जगी सर्व सुखी असा कोण आहे?' तर जगी सर्व सुखी स्वितझरलॅंड आहे, वर्ल्ड हॅपीनेस रिसर्च सेंटरने दिलेले उत्तर तर नसावे? मुळात सुख म्हणजे काय ?तर सुख ही एक मानसिक अवस्था आहे, हे त्या संशोधन करणा-यांना कुणी सांगावं? आम्ही तर कशातही सुखच मानतो. देश स्वातंत्र झाला त्याच्याअगोदरपासून आम्ही किती संयमी आणि समाधानी आहोत, हे सांगायला दुसरा कोणी नको. आज ना उदया "अच्छे दिन' येतील म्हणून किती सबुरी आणि शांत असतो आम्ही? ही प्रतिक्षा करता करता आम्ही पुनर्जन्मावरसुद्‌धा विश्‍वास ठेवून मनाची समजूत घालतोचच की नाही? "कधी गरीबी हटाओ'चा नारा देत तर कधी "फिलगुड' म्हणत खुर्चीवर बसणारे मात्र बदलतात. परंतु जनता आहे तशीच राहते. महागाई, भ्रष्टाचार वाढला तरी कुठलाही राग व्यक्‍त न करता आम्ही समाधानीच असतो. " ठेवीले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान ! हे आमचे ब्रिदवाक्‍य. म्हणून आम्ही असे आनंदी आणि सुखी असताना आम्हाला नालायक ठरविण्याचा अधिकार कुणाला आहे?
"सुख जवापडे.. दुःख पर्वताएवढे' असं तुकाराम महाराज उगाच नाही म्हणत. सुख कशानं मिळतं आणि ते कुठं असतं? याचं उत्तर आपल्या सगळया महापुरूषांनी सांगून ठेवलं आहे बरं का ! तरीही आपलं आपण ते नेहमी बाहेरच शोधत बसतो.
भगवान गौतम बुद्‌ध तर मानवाच्या जीवनाला भंडावून सोडणा-या दुःखावर उपाय शोधण्यासाठीच घरदार सोडून जंगलात भटकत राहिले ना! शेवटी सगळे उपाय संपल्यानंतर त्यांना त्यातील सत्य कळले आणि त्यांनी दुःखावरील जालिम उपाय शोधून काढला. अष्टांग मार्ग त्याचे नाव. सगळया दुःखाचं मुळ त्यांना वासनेत सापडलं. ही वासना जोपर्यंत शमविता येत नाही, तो पर्यंत दुःखाचे निवारण होउन सुखाची निर्मीती होत नाही. दुःख आहे तर त्याचे कारणही असेलच. कारण सापडले तर ते दूर करण्यासाठी आपणच प्रयत्न करू शकतो, हे ही त्यांनीच सांगीतलं. संत तुकाराम "आनंदाचे डोही आंनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे!' असे म्हणत जीवन आनंदात कसं घालविता येईल, याचा पाठ देताना दिसतात. सुख काय अन्‌ दुःख काय, दोन्ही मानसिक क्रियाच आहेत. आपल्या देशाच्या संस्कृतीला अध्यात्माचे मोठे अधिष्ठाण लाभले आहे. प्रत्येक संताने जीवन जगण्याची कला शिकविली आहे. हे माझया प्रिय देशा, कधीकाळी तू सुखी संपन्न असल्याचे पुरावे इतिहासाच्या पानापानावर मिळतात. ते वाचता वाचता आम्ही ताडासारखे वाढत गेलो. पण शिकलं की शहाणपणा येतो, असं कोण म्हणतं? फक्‍त पदव्या घेउन आम्ही मोठे झालो की आम्हाला परदेशाचे डोहाळे लागतात. म्हणजे बाहेर सुख शोधण्याचा पहिला धडा येथूनच सुरू होतो ना ! वारंवार होणा-या परकीय आक्रमणाबरोबर अंतर्गत अतिक्रमण हेसुद्‌धा देशाचं दुर्भाग्यच म्हणावं लागेल. अतिक्रमण मग ते कोणतेही असो. सदयाच्या धर्मवादी, भांडवलशाही आणि जागतिकीकरणाच्या अतिक्रमणातून "इंडिया विरूद्‌ध भारत' अशी दरी कधी निर्माण झाली ते कळलंसुद्‌धा नाही. आपल्याकडे सुखी असण्यासाठी पैशाचीच मोजपट्‌टी वापरल्या जाते. दुसरे परिमानच आपल्याजवळ नाही. पैशाशिवाय सुख नाही, असं म्हटल्या जातं. पैशाने सुख खरेदी नाही करता येत.
दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न, आरोग्यमय जीवनमान, सामाजिक साहस्वातंर्त्य, दानशूरता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण हे सुखी असण्याचे हॅपीनेस रिसर्च सेंटरने ठरविलेले निकष. यात आपण मागे असल्याचे सर्वेक्षणातून त्यांना दिसून आले.
आमच्याकडे मोटारसायकल असली आणि शेजा-याने चारचाकी अंगणात उभी केली की आम्ही त्याच्याशी तुलना करून त्याच्यासारखेच वागण्याचा प्रयत्न करतो. एक मात्र आम्ही न शिकविता शिकतो आणि ते म्हणजे आयुष्याला स्पर्धा समजून सुसाट वेगाने धावणे. हे धावणे इतके प्रचंड असते की आयुष्याच्या शेवटीच थांबल्यानंतर वाट चुकल्याचं लक्षात येतं.
हे सकल जणांच्या देशा, महाशक्‍ती होण्याची तुझयात कुवत आहे तर मग तू दुःखी कसा?हा न सुटणारा प्रश्‍न मला वारंवार भेळसावतो. हा देश महासत्ता होण्याच्या दृष्टीने जेव्हा स्पर्धेत उतरला तेव्हापासूनच या देशाची अधोगती व्हायला लागली , असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण स्पर्धेत "जो जिता वो सिकंदर' हेच तत्व लागू पडतं ना. "evry thing is posible in love and war *हाच न्याय लढाई किंवा स्पर्धेला लागू पडतो. मुळात स्पर्धा कशी आणि कुणाशी असावी, याचे काही ताळतंत्र असायला हवे. जपान हा देश अणुबॉम्बचा मारा सहन करूनच दुःखातून सावरत मोठा झाला ना !. त्याने बुद्‌धाची विचारसरणी अलंबिली आणि तो देश आर्थिकदृष्टया संपन्नही झाला. हे भारता ! आपल्याकडे तर अध्यात्मिक शहाणपण धर्मग्रंथांतून ओसंडून वाहते. परंतु तसे वागण्याची मुळात आपली इच्छाच नसते. कारण आम्हाला अमेरिकेशी तुलना करावीसी वाटते. दुस-याशी तुलना करण्यात आपल्याला कोण आंनद मिळतो ! चिनी विचारवंत लाओत्से हिमालयाच्या दिशेने दिसणा-या एका ता-याला पाहून भारताकडे पळत सुटला होता. कारण त्याला भारत महापुरूषांची जननी वाटला असावा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज "कधी येशील मनमोहना, पाहण्या भारत देश हा पुन्हा' असं विचारतात तेव्हा वाटते की देवा, पुन्हा अशा दुःखी भारताला पाहायला तू कधीच न आलेलंच बरं !

रविवार, 26 अप्रैल 2015

एक्‍सपायरी डेट


                                 विजयकुमार राऊत
ज्याचा त्याचा एक धर्म असतो. त्या धर्माप्रमाणे तो आचरण करण्याचा प्रयत्न करतो. पण त्यापेक्षा धर्माचे आडंबर माजवून एक प्रकारचं धार्मिकतेचे सोंग आणण्याचा प्रयत्न करून समाजात हाच खरा धर्म, असे पसरविले जाते. शेवटी सर्वसामान्य माणूस कर्मकांडाच्या कचाटयात सापडतो. संत तुकारामापासून कबिरापर्यंत सगळयांनीच बाहय कर्मकांडाला फार पोटतिकडीने विरोध केला. तरी समाजात दिखावूपणाच अधिक दिमाखदार पद्‌धतीने समाजात वावरत आहे. एकमेकांना एकमेकांपासून तोडणारा कुठलाच धर्म हा पृथ्वीच्या पाठीवर नाही. अब्राहम लिंकनचे एक वचन आठवते. ते म्हणतात की "I DO GOOD, I fill good-i do bad i fill bad' पाण्याचा धर्म तहान भागविणे. वृक्षाचा धर्म सावली देणे, हाच असतो. दुसरा कुठलाच धर्म असू शकत नाही. सगळयांच्या जगण्याचे सार कशात आहे. सगळे जगतात फक्‍त निरामय आनंदासाठी. आणि तो आहे फक्‍त आपल्यातच. आपण आयुष्यभर आपला धर्म किंवा परमेश्‍वर केवळ बाहेरच शोधत असतो. आनंदी राहायचं असेल तर दुस-याचा आनंद हिरावून न घेता एक आनंदमय जिवन जगलं पाहिजे. मग संत ज्ञानेश्‍वरांना झाला तसा आनंद आपल्यालाही प्राप्त होतो. "आनंदाचे डोही आनंद तरंग' याचा प्रत्यय क्षणोक्षणी यायला लागतो.या देशात धर्मासाठी काय काय झालं नाही? सगळे लढे धर्म आणि सत्ता संघर्षासाठी निर्माण झालेले आहेत. फाळणीचं दुःख झेललेले कविवर्य गुलजार तर या भयानक दुःखाचे नुसते साक्षीदार नव्हे तर भागीदारसुद्‌धा आहेत. ही जखमी कशी चिघळत जाते याचा कटू अनुभव त्यांनी घेतला. मार्कस म्हणतो धर्म ही अफूची गोळी आहे, ती माणसाला सतत गुंगीत ठेवते. ही गुंगी कायम राहावी याचे भान राजकारणी ठेवत असतात.
देशात सदया धर्मांतराचे वारे जोरात वाहायला लागलेले आहेत. धर्म हा "एक्‍सपायर' झाला, असं कुणी म्हणलं तर मोठे वादळ उठते. त्यामागील अर्थ समजून घेण्याच्या भानगडीत कुणीच पडत नाही. तथाकथीत धर्म ज्या कार्यासाठी निर्माण झालेला आहे, त्यामुळे कोणताही हेतू साध्य होत नसल्यामुळे तो आता "एक्‍सपायर' असे मानण्यातच शहाणपण आहे. जर्मन विचारवंत नित्से जेव्हा "देव' या संकल्पनेवर आघात करताना म्हणतो की देवांना आता देव्हा-यातून हद्‌पार केले तर बरं होईल. डॉ.श्रीराम लागू म्हणतात की देवाला आता "रिटायर्ड'च केले पाहिजे. यामागे एकच अर्थ आहे, जी प्रतिकं, ज्या संकल्पना आता कालबाहय झाल्या आहेत, त्यांना विशाल अंतःकरणाने मुठमाती दिली तरच मानवाचा भविष्यकाल उजळू शकतो. कारण परिवर्तन हाच शाश्‍वत नियम आहे. धर्माचे मढे किंवा देवाचे भूत किती दिवस पाठीवर बाळगणार आहोत.? हिंदू असो वा मुस्लीम, कट्‌टरताही धर्माला पोषक असूच शकत नाही. कट्‌टरता ही फक्‍त कोत्या मनाचे निदर्शक होउ शकते. वाद विवादाने कुठलेच प्रश्‍न संपत नाहीत. खरं म्हणजे महापुरूषांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरच त्यांच्याविषयी कुठलाही वाद सुरू करण्यात अनुयायीच पटाईत असतात.
हिंदू धर्मातील कट्‍रपंथियांनी "घर वापसी अभियान' फार जोरकसपणे राबविणे सुरू केले. आपली विचारसरणी जनमानसात दृढ करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या हाती सत्तेची सुत्र असावी लागतात. एकदा हाती सत्ता आली की आपले जाहिरनामे राबविण्यात पुढाकार घेतला जातो. तिचा पाहिजे तसा वापर करता येतो. प्रतिके, श्रद्‌धा जाग्या होतात. जुना इतिहास आपल्या सोयीनुसार बदलविण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न होतो. एकप्रकारे जुन्या कर्मकांडाच्या जागी नवीन कर्मकांडे उपस्थित केली जातात. "गर्व से कहो हम..'च्या गर्जना घुमायला लागतात. किंवा एखादया अधार्मिक विचाराबद्‌दल " जिहाद ' पुकारला जातो. अभिव्यक्‍ती स्वातंत्रयावर वारंवार हल्ले होतात. चित्रपटांची पोष्टर फाडून सिनेमा बंद पाडल्या जातो. नत्थूरामाचे दैवतीकरण केल्या जाते. त्याच्या नावातही राम दिसायला लागतो. मग त्याची मंदिरे उभी करण्याचा विचार व्यक्‍त केला जातो. "मंदिर वही बनायेंगे' निर्धार केला जातो. संपूर्ण विश्‍व भगवे करण्याचा संकल्प सोडला जातो. परदेशाचे दौरे आयोजित करून भगवतगीता भेट देण्याचे प्रयोग होतात. जापानमधील तथागत बुदंच्या मूर्तीऐवजी कमळ पुष्पाचे गुणगाण मुक्‍कंठाने केले जाते. कारण ते त्यांच्या पक्षाचं चिन्हं असतं. राष्ट्राचा ग्रंथ म्हणून भगवत्‌गीतेला स्थान देण्याचा विचार सोडल्या जातो. "हमको वोट देनेवाले देशभक्‍त, और जिन्होने को वोट नही दिया वो देशद्रोही' असे संबोधण्यात येते. त्यापेक्षा थोडे पुढे जाउन देशात "रामजादयांना'च राहण्याचा अधिकार आहे हरामजादयांना नाही, असे ठणकावून सांगीतले जाते. गंगा ही तर हिंदूची पवित्र नदी.. माताच ती ! म्हणून निवडणुक झाल्यानंतर तिची महाआरती करण्याच्या अनुपम सोहळयाचे टिव्हीच्या चॅनलवरून थेट प्रक्षेपण केले जाते. यात मात्र ख-या धर्माची कुठे हत्या केली जाते, हे या देशातील सर्वसामान्य माणसाला कळतही नाही. "ओ माय गॉड' किंवा "पिके' यासारख्या चित्रपटांतून तथाकथित धार्मिकतेवर प्रहार केले जातात, तेव्हा त्यांवर टिकेची झोड उठविली जाते. या धर्ममांतर्डांच्या विरोधात कुणी तोंड उघडले तर त्याचे मुस्काट फुटणे आलेच. जर त्याने प्रबोधनाचे कार्य सोडले नाही तर त्याला "वैकुंठा'ला पोचविण्यासाठी त्यांचे खास पुष्पकविमान तयारच असतेच. अंधश्रद्‌धेच्या विरोधात आवाज उचलणा-यांचा शेवटी दाभोळकरच होतो, हे सांगणे न लगे !
                                                                      विजयकुमार राऊत


                                                                                                  

गुरुवार, 16 अप्रैल 2015

जिंदगानी

                                            विजयकुमार राउत
दरिया मे जैसे लहर जिंदगानी
जरा बात करलू ठहर जिंदगानी !

अंदाज तेरा हे सबसे निराला
कभी शाम तू, सहर जिंदगानी !!

मेरा पता ना अब मुझको पुछों
कभी गाव था, अब शहर जिंदगानी !!

हस-हसके मैने जो तुमको जिया है
हमपे न ढा- ओ कहर जिंदगानी !!

हाथो से तुमने कभी मय पिलादी
तेंरे हाथ से दो जहर जिंदगानी !!

पत्थरपे फुलो को है खिलते देखा
पतझड मे भी तू बहर जिंदगानी !!

मेंरी सास मे, है अहसास मे तू
तुझसे जिंने का हुनर जिंदगानी !!


                                                                 विजयकुमार राउत

गुरुवार, 9 अप्रैल 2015

कळेना आमची भाषा !


                                                  विजयकुमार राउत
जागतिक किर्तीचे भाषा अभ्यासक व संशोधक डॉ.गणेश देवी यांनी घुमान साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून जगातील दोन हजार वर्षांनंतर शब्दभाषा लोप पावतील व शब्दांची जागा चिन्हे व प्रतीके घेतील, अशी भीती व्यक्‍त केली आहे. त्यांचे बोलीभाषा व भारतीय भाषा यावर मोठे योगदान आहे. त्याबद्‌दल त्यांना पद्‌मश्री पदवीने सम्मानितही करण्यात आले आहे. भारतात 1961 साली1652मातृभाषांपैकी 108 मातृभाषांची आज नोंद आहे. याचा अर्थ चार दशकात 1500भाषा मरणपंथाला गेल्या आहेत. जगात आज सहा हजार भाषा आहेत. असाच धोका कायम राहिला तर चार हजार भाषा मरतील, असे संशोधकांना वाटते. वसाहतवाद, जागतिकीकरणाचा रेटा, व्यापारीकरण हे भाषा मरण्यामागचे कारण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
जसजसा उत्क्रांत होत गेला तसे तसे त्याने अनेक शोध लावून स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा कसे सरस आहोत, हे सिद्‌ध केले. व्यक्‍त होण्यासाठी त्याने सर्वप्रथम भाषेचा शोध लावला. शब्दांच्या नाद व लयीतून तो एकमेकांना समजून घ्यायला लागला. निर्सगातील प्रत्येक अनुभवाला शब्दात पकडण्यासाठी धडपडू लागला. शब्दांची योजना करू लागला. एकमेकांशी संवाद साधण्याचं तंत्र त्याला अवगत झालं. भाषेच्या उत्कर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला खूप समाधान वाटू लागलं. निसर्गातील प्रत्येक गोष्टीला शब्दात पकडल्यानंतर त्याला स्वर्ग अगदी दोन बोटांवरच उरला. त्याच्या मनाची कवाडे त्याने भाव भावना व्यक्‍त करण्यासाठी सताड उघडी केली. त्यानं शब्दांची पुजा बांधली. नादब्रम्ह, शब्दब्रम्हाचं रूप त्याला बहाल केलं. परंतु पुढे मात्र तो जस जसा उन्नत होत गेला तसतसे अनुभव व्यक्‍त करण्यासाठी त्याला शब्द कमी पडू लागले. शब्दांच्या कमतरतेमुळे किंवा अतिरेकामुळे विसंवाद वाढू लागला. जे माध्यम सुसंवाद घडवून येण्यासाठी निर्माण झालं तेच साधन विसंवादाचं कारण ठरलं. भाव भावना जशाच्या तशा दुस-यांपर्यंत पोहचविणे कठीण झाले. कित्येक वर्षे शब्द आणि भाषेच्या आश्रयाने चालणा-या माणसाची नंतर मोठी पंचाइत व्हायला लागली असावी. आजपासून हजारो वर्षापूर्वी त्यानं निर्माण केलेल्या भाषेचं सामर्थ्य अपुरं सिद्‌ध व्हायला लागलं. तेव्हा त्यानं मौनाची भाषा स्वीकारली, परंतु तरीही व्यक्‍त होण्यासाठी त्याची तळमळ शांत झाली नाही.
वेद , उपनिषदांचा काळ भाषेचा उत्कर्षाचा काळ होता. अनेक मंत्रोच्चारांचा जन्मही या काळात झाला. शब्द हे परमेश्‍वरापर्यंत नेण्यास सहायक आहेत, असं त्याला वाटू लागलं. म्हणून माणसानं शब्दांची पुजा बांधणे सुरू केले. ज्ञानाची आराधना सुरू केली. परंतु वेद, उपनिषदांतील रूषींना जे अनुभवास आलं आणि सर्वसामान्य माणसाचा समजून घेण्याचा अवाका यात दरी निर्माण होत गेली. म्हणून उपनिषदात "नेती नेती' म्हणून सत्य कथन करण्यास रूषी नकार देताना दिसतो. लाओत्सेंनीही असंच काहीसं म्हटलं आहे.
"नेती नेती'चा अर्थ असा होतो की हेही खरे नाही अन्‌ तेही खरे नाही. सत्य तिसरे काहीतरी वेगळेच आहे. त्यानंतर झालेल्या शांडिल्य रूषींनी तर "येती येती' म्हणून थोडी सकारात्मकता दाखविली. "येती येती' म्हणजे हेही खरं आहे नि तेही खरं आहे. जे आहे ते सगळं खरंच आहे. दुस-या शब्दांत सांगायचे झाल्यास रात्रही खरी आहे आणि दिवसही आहे. काळाही खरा आहे आणि पांढराही खरा आहे. कुठलीतरी एक बाजू पकडून त्यावर कायम राहण्यासाठी तो सत्य काय आणि ते कसे व्यक्‍त करायचे, ही अडचण निर्माण झाली. कारण शब्दांच्या दोन्ही बाजूचे समर्थन करताना त्याचा गोंधळ उडणारच. भाषेच्या अस्थैर्यामुळे अनेक गोष्टीत तात्विक पातळीवर गैरव्यवहार आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

अडिच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्‌धांनी मात्र सर्वसामान्य माणसाची ही अडचण दूर केली. बुद्‌धांनी मध्यम मार्ग स्वीकारल्यामुळे हा गोंधळ निकालात निघाला. त्याने "नेती नेती' आणि "येती येती' या दोहींना खोडून काढले आणि "सम्यक' निती लोकव्यवहारात उतरविली. माणसाला भाषेतून स्थैर्य मिळाल्यामुळे आता कुठे त्याची धडपड थांबली होती. बुद्‌धांच्या "सम्यक 'नितीतून त्याला विज्ञानाचा मार्ग सापडला. कारण बुद्‌धांनी सर्व बाबी बुद्‌धीच्या कसोटीवर घासून जे योग्य उरते तेच स्वीकारण्याचा सल्ला दिला. प्रत्येक गोष्टीला "सम्यक' शब्द जोडून बुद्‌धांनी "बॅलेंस' साधला. बुद्‌धाच्या काळानंतर अडिच हजार वर्षांनी मात्र माहिती आणि ज्ञानात दरी पडू लागली. जागतिकीकरण, नवनवीन शोध,आर्थिक व्यवहाराला आलेलं महत्व आणि अनेक घटनेतील अनुभवाचा पसारा व्यक्‍त करण्यासाठी माणसाला भाषा अपुरी वाटू लागली. तो बुद्‌धीवादी असल्यामुळे त्यानं परिश्रमानं ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या. पण आजच्या काळात मात्र मनुष्य भाषा आणि शब्दांपासून दूर होत चालला आहे. शब्द गुळगुळीत होत आहेत. हवा असलेला आशय हरपत आहे. बदलत्या काळानुरूप अनुभव आणि शब्दांची गर्दी वाढलीय. भावना व्यक्‍त करायला नेमके शब्द सापडत नाहीत. माध्यमांच्या भाउगर्दीत शब्दांचं महत्व कमी होत चाललं. माध्यमांद्वारे माहितीचा मारा माणसाच्या डोक्‍यावर सतत चोविस तास सुरू असतो. युवकांची मोबाईलवरची सांकेतिक भाषा वेगळी होत चालली आहे. "जनरेशन गॅप' म्हणून आपण युवकांच्या या प्रश्‍नाकडे पाहात असतो. म्हणूनच कविवर्य सुरेश भट भाषेच्या बाबतीतील खंत व्यक्‍त करताना एका गझलेच्या या शेरातून म्हणतात
कशी या वर्तमानाला कळेना आमची भाषा
विजा घेउनी येणा-या पिढयांची बोलतो आम्ही !!
सर्व महान संत कवि आणि विचारकांनी जे सांगायचं होतं त्याचा खजानाच काव्यात्मक रूपाने आपल्यापुढे ठेवला. परंतु काव्याची भाषा व्यक्‍तीपरत्वे पाहिजे तशी वाकविता येत असल्यामुळे गोंधळ झाला. आपल्या मगदूराप्रमाणे व्यक्‍तीपरत्वे अर्थ निघत गेला आणि अनाचार माजला. आजचे भौतिकशास्त्र किंवा विज्ञानशास्त्रे काटेकोरपणा आणण्यासाठी शब्द आणि भाषेचा वापर टाळून प्रतिके आणि सुत्रांपर्यंत येउन पोहचलेली आहेत. पुढच्या काळात तर भौतिकशास्त्रे आणि एकंदर सगळी विज्ञानशास्त्रे केवळ सुत्र आणि प्रतिकांच्या माध्यमातून हव्या त्या बाबी सांगतील, अशी परिस्थिती आहे.
शास्त्रज्ञांनी पुढील काळातील हा धोका वर्तविला असल्याचं डॉ.देवी यांनी सांगीतलं आहे. उत्क्रांतीत मानवाच्या मेंदूत बदल घडत असून मेंदूच्या डाव्या भागाचा केंद्रबिंदू भाषा नव्हे तर प्रतिकांकडे सरकत चालला आहे. त्यामुळे भाषा मृतवत होउन रूपक आणि प्रतिकांची आभाषी भाषा विकसीत होत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
*******

मंगलवार, 7 अप्रैल 2015

माणूस जगतो कशासाठी?


                                                                          विजयकुमार राउत
मरण येत नाही म्हणून माणूस जगतो का? की जगण्या- मरणापुढे असहाय म्हणून माणूस जगत असतो? की जीवनात आणखी काही महत्वाचे असावे म्हणून माणूस जगत असावा काय?
"to be or not to be' या शेक्‍सपिअरच्या हॅम्लेटसारखाच दोलायमान अवस्थेतील प्रश्‍न आयुष्यात कधी ना कधी सगळयांना पडत असतो. उत्तरही खूप मोठं आणि त्यापेक्षा प्रश्‍नही समजून घेणं जिकरीचं आहे. "माणूस जगतो कशासाठी?' ही ना.सी.फडके यांची लघुकथा कधीकाळी पाठयपुस्तकात वाचली होती. त्यातील मध्यमवर्गिय नायक हा रोजच्या कटाकटीला कंटाळून आत्महत्त्या करण्याचा टोकाचा विचार करतो. रस्ता ओलांडताना एक इवलीसी बेडकी कारपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी टुन्‌कन उडी मारून रस्त्याच्या पलीकडे जाउन स्वतःला वाचवून घेण्यात धन्यता मानते. यासारख्या अगदी छोटया छोटयाशा प्रसंगापासून कथा फुलत जाते. शेवटी या घटनांमधून नायक जगण्याची प्रेरणा घेतो आणि पुनश्‍च जगण्याचा निर्धार करतो. इथं कथा संपते. माणसाच्या हाती जगणे नाही आणि मरणेही नाही, म्हणून तो कसा तरी जगत असतो. जीवनाला ओझं समजून ते ओढत नेताना आपण इतरांवर उपकार करतो, असं त्याला वाटतं.
या विषयावर माझया काही मित्रांनी नुकतेच एका चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रत्येक जण यावर अगदी भरभरून बोलून गेला. काहींनी यथेच्छ बोलण्याचं सुख मानून गंगेत घोडं न्हाउन घेतलं तर काहींनी आपण कसे जगतो आणि त्यापासून इतरांनी काय प्रेरणा घ्यावी, याबद्‌दल चर्वितचर्वण केलं. अशाप्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजनाचा परिसरातील पहिला प्रयत्न होता, म्हणून त्यातील उणिवांचा भाग अलहिदा ! परंतु असे कार्यक्रम घेण्याची सद्‌सद्विवेकबुद्‌धी जागृत होणं, हे अतिशय महत्वाचं आहे. बबनराव पडोळे, जीवन जवंजाळ यासारख्या नवविचारांचे स्वागत करणा-या मित्रांनी हा उपक्रम हाती घेतला हेही बरे झाले. माझयाही मनात ही संकल्पना होती. योगायोगाने पडोळेंच्या मनात हा विचार आला आणि त्यांनी पुढाकार घेतला, ही बाब स्वागर्ताहच म्हणावी लागेल.
यामागे कुठली विचारक्रांती वेैगरे मोठमोठे शब्द लावणे मला पसंत नाही.
माणूस जगतो कशासाठी ? या प्रश्‍नाचं उत्तर वरवरचं असता कामा नये. इतर रोजच्या घरगुती प्रश्‍नासारखं नुसतंच" टाईमपास' उत्तर देताना या महत्वाच्या प्रश्‍नाला बगल देणेही योग्य नव्हे. खरं तर जन्म घेणे आणि मरणे या दोन्ही क्रिया माणसाच्या हातात नसतात. मात्र या दोहींच्या मध्ये असलेलं जीवन, ते मात्र कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात असतं. ते सुंदर करता यावं आणि आपण आपल्या अवतीभवतीचं जगही कसं सुंदर करता येईल, हे आपल्या हातात आहे.
माना के इस जहॉं को गुलजार न कर सके
कुछ खांर तो कम किये निकले जिधर से हम !!
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तो एकटा जगू शकत नाही. तोही समाजाचं एक "बायोप्राडक्‍ट' असतो. म्हणून तो घडत असताना समाजाकडून अनेक गोष्टी शिकत असतो. संस्कार त्यापैकीच एक. परंतु जगताना तो स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगत असतो. स्वतःला म्हणजे "मी'ला तो अधिक विस्तारण्याऐवजी संकुचित करीत जातो. मी आणि माझे यातच तो धन्यता मानतो.
भगवान बुद्‌धांपासून ते अलीकडे गाडगे महाराज , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत माणसाला दिशादिग्दर्शन करणारे महात्मे माणसाला सुधारताना मुळीच हरले नाहीत किंवा थकले नाहीत. या प्रश्‍नाचं नुसतं त्यांनी उत्तरच शोधलं नाही, तर त्यांनी कृतितून प्रत्यक्षात उतरविलं आणि समाजाला दाखवून दिलं. त्यांच्यापासून काही घेण्याचीही आपली ऐपत नाही. म्हणून झोळी खाली राहिली ती आपणासारख्या कपाळकरंटयांचीच ! जगण्यापासून माणूसपण दूर करता कामा नये. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण "माणूस' तरी होण्याचा प्रयत्न करतो का? सुप्रसिद्‌ध साहित्यीक प्र.के.अत्रेंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिताना एका अग्रलेखात एक ग्रीक कथा दिलेली आहे. एकदा एका राणीकडे एक देवता येते. तिच्या बाळाला देव बनविण्यासाठी बाळाचे कपडे काढून त्याला विस्तवावर धरण्यास मागते. हा जिवघेणा उपक्रम कित्येक दिवस सुरू असतो. परंतु एके दिवशी राणीला पहावत नाही. चटकन ती पुढे होउन बाळाला विस्तावावर धरण्यापासून रोखते व देवतेच्या हातातील बाळ हिसकावून घेते. ती राणी म्हणते की, मी ही कृती करून बाळाला "देवता' होण्यापासून रोखलं आणि त्या बाळाचा माणूस होण्याच्या रस्त्यातली अडचण त्या स्त्रीने दूर केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलितांना माणूस होण्यासाठी लढण्याचं बळ दिलं. माणसाचं दैवतीकरण करण्यापेक्षा माणूस होणंच कठीण काम आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनात दुःखाशिवाय काहीच नाही. परंतु हे दुःख पेरणारे दुसरे तिसरे कुणीच नसून आपण स्वतःच तर असतो. म्हणून तथागत भगवान बुद्‌ध एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमीकेतून अखिल मानव जातीला विकृत होण्यापासून रोखतात. माणसानं या जगात नेत्रदीपक प्रगती केली. पण या प्रगतीबरोबर तो सुखी होण्याऐवजी अधिकाधिक दुःखी का होत गेला? एका जमान्यात माणसाला मन असते. यावर विज्ञानाचा विश्‍वासच बसत नव्हता. सिग्मंड फ्रायडने माणसाला "मन' नावाचा अदृश्‍य अवयव असतो, हे अथक प्रयत्नांती सिद्‌ध करून दाखविलं. आता मनाच्या पातळीवर ज्या अतिशय गुंतागुंतीच्या विचाराच्या प्रक्रिया असतात याचा मुळाशी गेलो तर तिथे सर्वसामान्य माणसाला कसलाही ठाव लागत नाही. गोंधळ उडतो. "मन' हे शरिराची "नॅनो' आवृती होय, असं अलीकडे विज्ञानही मानायला लागलं. मनात जे काही विचाराच्या रूपाने निर्माण होउन पाठलाग करते तेच रोगाच्या रूपाने शरिरावर पसरते. म्हणून मी भगवान बुद्‌धांना मानसोपचारतज्ज्ञ म्हणतो. कारण बुद्‌धांनी माणसाच्या या दृश्‍य अदृष्य मनोव्यापाराचा खूप चिकित्सक अभ्यास केला होता. आजचं विज्ञानही तेच म्हणते. मग मला सांगा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजही विपरित परिस्थितीत विचाराच्या बाबतीत स्वतःला कसे
"पाजेटीव्ह' ठेवतात... "बरे झाले देवा निघाले दिवाळे...बरी या दुष्काळे पीडा गेली...अनुतापे तुझे राहिले चिंतन ! जाला हा वंमर संवसार !!' किवा "निंदकाचे घर असावे शेजारी' असे अभंगातून सांगून ते मोकळे होतात. आपल्या अवतीभवती सुखाच्या अमर्याद खाणी आहेत. आनंद देणारे ठिकठिकाणी असंख्य इवले इवले झरे आहेत. या निसर्गाने अनंत हाताने तुमच्यावर सुखाची उधळण केलेली आहे. ते सोडून आपण देवदर्शनासाठी सगळीकडे नुसते भटकत असतो. काही जण हा गुरू सोड तो धर असा उपद्‌व्याप करीत असतात. "जगण्याचा मार्ग' शोधत असतात. मंत्र तंत्राच्या आहारी जातो. म्हणून तुकाराम म्हणतात की "तुझे आहे तुजपाशी परि तू भूललासी वरलिया रंगाशी' तुकाराम असो, बुद्‌ध असो नाहीतर एखादा महत्वाचा शोध लावणारा संशोधक असो. हे सगळे जीवन सुंदर करणारे वेलीवरची सुगंधित फुलेच आहेत. सजिव सृष्टीही एक शाळा आहे. सर्वात आधी माणूस म्हणून घेण्याच्या योग्यतेचे होणे आवश्‍यक आहे. तुकडोजी महाराज उगाच नाही "माणूस द्या, मज माणूस द्या' म्हणत माणसाच्या शोधत फिरतात. त्यांना माणूस मिळाला असावा का?
                                                                                               विजयकुमार राउत

 
Blogger Templates