Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 28 अक्टूबर 2015

दूर देशी बाबा गेले

दूर देशी बाबा गेले

                                              विजयकुमार राउत

रं तर आतापर्यंत आईवरच भरभरून लिहिल्या गेलं. अनेक कविंनी आईच्या दूधाचे रूण शब्दांमधून फेडण्याचा प्रयत्न केला. परंतु "बाप' या विषयावर खूप कमी लिहिलं गेलं, याचं थोडं शल्य वाटतं. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व . आईकडे अश्रृंचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट. ठेच लागली तर आपण, आई गं! म्हणतो आणि भीती वाटली तर बाप रे! या जगात जिच्यामुळे आलो ती आई, आणि ज्यांच्यामुळे दुनियेत टिकलो तो बाप, हे दोघेही प्रत्येकासाठी महत्वाचे असतात. कारण ही दोन्ही संसाररथाची चाकं असतात. आई ही जन्म देते तर पालणपोषणाची जवाबदारी पार पाडतो तो बाप. आई ही जन्मदात्री असल्यामुळे तिचा अधिकार तेवढाच महत्वाचा आहे. ज्या घरी बाप असतो त्या घराकडे कुणीही वाकडया नजरेनं पाहण्याचं धाडस करत नाही. म्हणून एका हाडामासाच्या तुकडयाची ओळख जगाला करून देणारा बाप असल्यामुळे त्याचाही हक्‍क काही कमी नाही.

"ख-या बापाची औलाद असशील तर.. बाप दाखव नाही तर श्राद्‌ध कर..रिश्‍तो मे हम सबके बाप लगते है' असा वाक्‌प्रचार समाजात रूढ झाला तो याच अर्थानं. हाच बाप दूरदेशी म्हणजे जग सोडून गेला तर त्या आकाशातील बापाकडे जड अंतःकरणाने आपण मन मोकळं करतोच की नाही ! येशू खिस्त नाही का म्हणाले होते, मी आकाशातील बापाचा एकुलता एक पुत्र आहे म्हणून ! "जगाचा बाप' होउन अनाथ मुलांकडे कृपाळू दृष्टीचे मोरपिस फिरविणारा बाप मला खूप मोठा वाटतो. त्यात संत गाडगेबाबा, शंकरबाबा पापडकर यांचा उल्लेख न झाला तर कृतघ्नता ठरेल. स्वतःच्या मुलाच्या मृत्यूची बातमी दुस-याकडून कीर्तनात तल्लीन झालेल्या गाडगेबाबांना कळते. तेव्हा ते सहज म्हणून जातात....
असे मेले कोटी न कोटी !
काय रडू एकटयासाठी?
गोपाला गोपाला...देवकीनंदन गोपाला !!
अमरावती जिल्हयातील वझझर येथील शंकरबाबा पापडकर शेकडो अनाथ मुलींचे बाप म्हणून कन्यादान करण्याचं व्रत अखंडपणे पार पाडतात, तेव्हा या "फादर इंडिया'चा मनोमन अभिमान वाटतो.
बाप मग खरोखरच अनेक मार्गानं विस्तारत जातो. बाप बहुअर्थांनं मोठा होत जातो. बापाकडे गांभीर्यांनं पाहिलं गेलं नसल्यामुळे "बाप' तसा उपेक्षित राहिला. बापाला मात्र ख-या अर्थांनं समजून घेणारी त्याची लेकच असते. लग्न मंडपात हंबरडा फोडणा-या लेकीचा आवाज बापाच्या जिवाची कालवाकालव करतो. बाप मग कोप-यात जाउन कुणालाच कळू नये म्हणून रूमालाने चेहरा झाकून मनसोक्‍त रडून घेतो. बापाच्या जाण्याची वार्ता मोठयाने हंबरडा फोडून सगळया जगाला सांगणारी त्याची मुलगी असते.
आजच्या काळात बापाची जवाबदारी ख-या अर्थांनं वाढली आहे. बाप मुलाला उत्तम शिक्षण देण्यासाठी, उत्तम राहणीमान देण्यासाठी, मुलांच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच कुटूंबाचं पालनपोषण करण्यासाठी सतत तनावाखाली वावरताना दिसतो. त्याच्या व्यथा कुणालाच कळत नाही, असं नाही. नवनविन आव्हानं एका नव्या रूपात पुढे वाढलेली आहेत. त्यातून त्याच्या मनाची कुचंबना होत आहे. जगण्यात भौतिकता वाढली आहे. सगळीकडे चैनीच्या वस्तूंची गर्दी झाल्यामुळे चंगळवाद वाढला आहे. आपली मुलं मागे पडू नयेत, म्हणून बाप जिवाचे रान करतोच आहे. अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर एक अपयशी बापाचा शिक्‍का त्याच्या कपाळी बसण्याचीच भिती अधिक. कात्रीत सापडलेल्या बापाला मग काही कटू निर्णय घ्यावे लागतात. बाप कुटूंबापासून दूरावत जातो. नव्या पिढीशी संवाद साधण्यात बाप कमी पडतो. स्वप्न पूर्ण करण्याची जवाबदारी पेलत पडत उठत खस्ता खाणारा बाप मुलांपासून दूर होउ लागतो. वेळेचे गणित सोडविणे त्याच्यासाठी अशक्‍यप्राय होते. सगळं काही करून तो कुटूंबाशी स्वतःला जोडण्यात कधीतरी कमी पडतोच पडतो. अशावेळी कुटूंबात "हिटलर' झालेला किंवा कामाला शरण गेलेला माणूस नाईलाजाने पुरता "वर्कोव्होलीक' होउन बसतो. अशावेळी घरातील एक पणती मात्र बापाच्या आठवणींच्या प्रकाशात दूर देशी गेलेल्या आवडत्या बाबांशी मोबाईलवरून संवाद साधत असते. "पापा जल्दी घर आ जाणा' म्हणत स्मृतींचा ठेवा जपत असते, त्या पणतीचेच दुसरे नाव आहे मुलगी !
                                                         विजयकुमार राउत
                                                                8888876462

सोमवार, 26 अक्टूबर 2015

एक चेहरेपे कई चेहरे.....


विजयकुमार राउत

आताशा "डुप्लीकेट' चेह-यांची अवतीभवती खूप गर्दी होत आहे. कुठलाच चेहरा खरा वाटत नाही. ख-या चेह-यांची सद्‌दीच समाजातून संपली झाली की काय? जो भेटतो तो मुखवटाच घेउन भेटतो. कारण आता म्हणे बाजारात या पॉलीश केलेल्या चेह-यांची भलतीच मागणी आली आहे. एक दोन नव्हे तर असंख्य मुखवटे घेउन ही माणसे अवतीभवती वावरतात. पाहिजे तेव्हा, पाहिजे तो चेहरा घेउन ही माणसं निःसंकोच प्रगट होतात.
जब जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग
एक चेहरपे कई चेहरे सजा लेते है लोग !
प्रत्येक चेह-याची भूमीका वेगळी. प्रत्येक चेह-याची दुनिया वेगळी..व्यासपीठावर हे चेहरे दिमाखात आपली भूमीका पार पाडीत असतात. खचितच आपल्या हेतूमध्ये यशस्वीही होतात. यशस्वी होण्याचा आनंदोत्सव साजरा होतो. पाटर्या झडतात. एकमेकांना भरपूर शुभेच्छाही देउन एकमेकांकडून पाठही थोपटून घेतली जाते. घरून बाहेर पडताना एक मुखवटा, समाजात गेल्यावर दुसरा चेहरा, मित्रांत तिसरा मुखवटा तर फायदयाच्या वेळी पॉलिश केलेला चिकनाचोपडा चेहरा. असे मुखवटयांचे जागोजागी प्रदर्शन होत असते. प्रत्येक व्यासपीठावर हे मुखवटे अग्रेसर असतात. या मुखवटा बदलण्याच्या शेवटी एक मनोरंजक प्रकार घडतो. या चेह-यांना स्वतःचा एकही चेहरा राहात नाही, हीच त्याची "ट्रॅजिडी' ठरते. कारण ही चेहरा गमावून बसलेली माणसं शेवटी आपला अस्सल चेहराच विसरून गेलेली असतात. म्हणून मृत्यूसमयी मात्र ते स्वतःचा चेहरा गमविण्याच्या शल्याने आयुष्याला कोसत बसतात. म्हणूनच संत परंपरेत आत्मरूपाशी जुळण्याचा मंत्र दिला आहे. संत ज्ञानेश्‍वर किंवा संत तुकाराम वारंवार आत्मस्वरूपाविषयी का सांगत असतात? कारण ते आत्मरूपाशी एकरूप झाले होते. त्यांना या अस्तित्वाचा अर्थबोध झाला होता.
आत्मस्वरूप आनंदमय आणि पारदर्शी असतं. ते पाण्यासारखं नितळ आहे. ते जपणं यातच खरा पुरूषार्थ आहे. चेह-यावर दुसरा मुखवटा बसू न देणं मोठं जिकरीचं आहे. समाजात वावरताना नकळत आपण समाजाकडूनच एक चेहरा स्वतःच्या चेह-यावर चिटकून घेत असतो. समाजाच्या चेह-यालाच स्वतःचा चेहरा मानू लागतो. हळूहळू तो स्वरूपापासून खूप दूर जायला लागतो. बरे हा चेहरा खूप टिकाउ नसतोच. वयाबरोबर हा चेहरा कधी गळून पडतो, हे त्याचे त्यालाही कळत नाही.
एक गोष्ट आठवते. या पृथ्वीवर माणूस जन्माला आला तेव्हा आरशांचा शोध नव्हता लागला. त्यामुळे चेहरा कसा असतो याची त्याला कल्पनाही नसावी. एके दिवशी मात्र साचलेल्या डबक्‍यातील पाण्याला ओलांडून जात असताना माणसाने डबक्‍यात चेहरा पाहिला आणि तो त्या चेह-याच्या प्रेमात पडला. त्याला कोणीतरी सुंदर माणूस या पृथ्वीतलावर असल्याचा भास झाला. त्याला शोधण्यासाठी त्याने आयुष्यभर जिवाचे रान केले. परंतु पुन्हा त्याला तो चेहरा कधी गवसला नाही. त्याला खुप दुःख झाले. तो मनाने दिवसेंदिवस खचत गेला आणि झुरून झुरून एकदाचा त्याचा मृत्यू झाला. ही कथा ऐकल्यानंतर काय बोध होतो? आदिमानवापासून सुरू असलेला हा चेह-याचा शोध महामानव होईस्तोवर संपलाच नाही. आपण सारे अजूनही बुद्‌धूच... एकमेकांचा चेहरा घेउन फिरत आहोत. बुद्‌धाच्या "अत्तदीप' प्रेरणेने जागे होउन स्वतःचा चेहरा शोधण्याचा आपण कधीच प्रयत्न करीत नाही. ज्ञानेश्‍वरांच्या साधनेतून आत्मस्वरूप शोधण्याचा मार्ग खरे तर खूप सोपा आहे. परंतु सत्य कधीच अनुभवाला आलं नसल्यामुळे खोटयांलाच खरं मानण्याची खोड आपल्या डोक्‍यातून युगानुयुगे जात नाही.

                                                                        विजयकुमार राउत


गुरुवार, 8 अक्टूबर 2015

अस्तित्वाला स्वयंदीप करणे म्हणजेच बुद्‌धत्व

                                                                             विजयकुमार राउत

कृर काळोखाला चंद्राच्या शितल प्रकाशाने टोकदारपणे चिरत जावं, तसं एक प्रखर अस्तित्व वैशाख महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री आकाशातील निरव शांततेत स्वयंपूर्ण तेज घेउन उजाडलं, तेव्हा दाही दिशा प्रकाशमान झाल्या. आकाशानेही एक अर्थपूर्ण मौन धारण केलं. करूणा, शांती आणि अहिंसेचं परिपूर्ण ज्ञान घेउन ते अस्तित्व अवकाशाला व्यापून उरलं होतं. युगायुगांपासून उद्‌दामपणे नाचणारा काळोख केवळ शुद्‌ध प्रकाशाच्या भयाने पुन्हा शून्यात गडप झाला. तथागतांचा उदय हजारो युगांसाठी प्रेरणादायी ठरला. म्हणून तथागत जन्माने बुद्‌ध होउन कधीच अवतरित झालेले नसतात. तर माणसांतील संपूर्ण संभावनांचं पूर्ण रूपांतरण अखिल मानवजातीपुढे मूळ स्वरूपात प्रगट झालेलं असतं. बुद्‌धांचा जन्म, त्यांना ज्ञान प्राप्त होणं आणि महापरिनिर्वाण या तिन्ही घटनांकडे बारकाईनं बघीतलं तर बुद्‌ध एका प्रकाशयुगाचा प्रतिनिधी ठरतो.
सुमारे अडिच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्‌ध या मातीत जन्माला आले. त्यानंतर कितीतरी वर्षे अखंड भारतवर्षाचे क्षितीज त्यांच्या धम्मकायेने उजळून निघालेले असतानाचा काळ हा इतिहासातील सर्वात महत्वूपर्ण ठरतो. या काळात मानवातील अतिउच्च जाणिवा नेणिवेच्या दिशेने प्रसरण पावत असल्याचे दृष्य या जगात इतिहासाला पहिल्यांदाच पहावयास मिळालं. मधल्या काळात अडिच हजार वर्षांपर्यंत बुद्‌ध मात्र या मातीतून अचानक गडप झाल्याचा इतिहासही या मातीने वाचला आहे.
14 ऑक्‍टोबर 1956 या वर्षापर्यंत मानवतेला उत्थानाकडे नेणारा बौद्‌ध धम्म येथून कसा काय हद्‌दपार झाला, याचं उत्तरही इतिहासात सापडेल. परंतु इतिहास जाणने म्हणजे केवळ भूतकाळातील मृत अवशेषाचे उत्खनन करून त्यांची पूजा बांधणे नव्हे, तसं त्याचं स्वरूपही नसावं. इतिहास हा संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वाला जोडून त्याच्याशी नाते अबाधित करण्याचा संशोधनात्मकरित्या केलेला एक सुयोग्य प्रयत्न असावा. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो शोषित, पिडीत बांधवांना बौद्‌ध धम्माची दीक्षा देउन त्यांचे जीवन नुसतेच सुकर केले नाही तर ते स्वयंप्रकाशित केले. कारण केवळ बुद्‌धाचा एकमेव धम्मच माणसाला त्याची खरी ओळख देउ शकतो, या विचारातून दीक्षेच्या रूपाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बोधीसत्वाचे बिज या भूमीवर रूजविले. आज बोधीवृक्षाचा खूप मोठया प्रमाणात विस्तार झाला आहे. या विश्‍वातील प्रामुख्याने सुमारे दहा-पंधरा देशांत अनेक शाखांच्या रूपाने बौद्‌ध धम्म विकास पावला आहे. धम्म हा त्यांच्या जगण्याचा एक भाग झाला आहे.
आयफोनचा शोध लागण्यापूर्वी स्टीफन जॉब्ज हा संशोधनात अनेकदा असफल झाला असताना त्याला कुणीतरी भारतात जाउन बौद्‌ध धम्माबद्‌दल जाणून घेण्याचा सल्ला दिला. नैराश्‍येच्या स्थितीत स्टीफन भारतात आला. बौद्‌ध धम्माच्या तत्वज्ञानाने त्याच्यावर गारूड घातले. तो येथून परत गेला, तेव्हा त्याला त्याच्या संशोधनातील त्रुटया लक्षात आल्या आणि तो संशोधनात एकाग्र झाल्यानंतर यशस्वी झाला. त्याच्या मागचे कारण शोधले तर बौद्‌ध धम्म हा "स्वयंदीप' होण्याचा जो मंत्र देतो,या सुत्रातच दडलेले आहे. स्टीफनला आलेला हा अनुभव केवळ जादू किंवा हिप्नोटीझमच्या स्वरूपाचा नव्हता. "स्वयंदीप' या शब्दातच यशाची बिजे रूजलेली असल्याचे स्टीफनला जाणवले आणि आयफोनचा शोध लावण्यात तो यशस्वी ठरला. त्याचप्रमाणे महान संशोधक आईनस्टाईन हा सुद्‌धा संशोधन करताना बुद्‌ध विचारांनी प्रभावित झालेला होता. संशोधक, साहित्यीक व जगातील महान विचारवंतांना आज बुद्‌ध न संपणारं पर्व वाटतं. चिनमध्ये ताओ, जापानमध्ये झेन किंवा शिंतो, थायलॅंड, मॅनमार, मलेशिया, श्रीलंका, कम्बोडिया, तायवान आदी देशात विविध स्वरूपाचा बौद्‌ध धम्म अस्तित्वात आला आहे. बुद्‌ध होण्याचं बिज प्रत्येकात सुप्तावस्थेत असतं, हा संदेश बुद्‌ध विचारधारेतून मिळतो.
आज आधुनिक शिक्षण पद्‌धतीच्या नावाने सगळीकडे ओरड आहे. आजच्या शिक्षण व्यवस्थेला इंग्रजांच्या कुटनितीची किनार असल्यामुळे तिनं निर्माण केलेला समाज हा सुजान झालेला नसून विकृत होत आहे. आधुनिकतून भौतिक विकास तर साधल्या गेला. परंतु श्रीमंत, गरीब, जाती-धर्माची दरी मात्र खूप वाढत गेली. दोन्ही वर्ग एकमेकांबद्‌दल वाटणा-या भावनेतून अस्वस्थ आहेत. इंडिया विरूद्‌ध भारत, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. प्रतिशोधाचं रसायण मेंदूत तयार झालं आणि ते आता दिवसेंदिवस रक्‍तातून सळसळत आहे. हिंसा, बलात्कार, भ्रष्टाचार, एकमेकांबद्‌दची असुया यासारख्या विकारांनी माणुसकीला पुरतं गिळंकृत केलं आहे. समाज हा प्रतिशोधाच्या आगीत रात्रंदिवस जळत आहे. हे सर्व होत असताना या समस्यांचं मूळ मेकॉलेच्या शिक्षणपद्‌धतीत आहे. भांडवलदारीच्या युगात माणूस एक "प्रॉडक्‍ट' झाला आहे. "युज अँड थ्रो' या भूमीकेतून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. माणूस बनविणारी शिक्षणव्यवस्थाच कोलमडून पडली आहे. त्यामुळे राष्ट्राचा मुख्य पाया असलेला माणूसच राजकारणातून उपद्‌व्याप निर्माण करीत आहे. एक उद्योगपती "हम फौलाद नही, इनसान बनाते है' असं म्हणतो, तेव्हा तो त्या कारखान्याच्या मालाच्या गुणवत्तेचच कौतुक अधिक करीत असतो. माणूस बनविणारी शिक्षणपद्‌धतीच अस्तित्वात नसल्यामुळे येथे सगळे प्रश्‍न "जैसे थेच' आहेत.
बुद्‌ध प्रज्ञा,शिल आणि करूणा ही माणसाची त्रिसुत्री असल्याचं सांगतात तेव्हा त्यात जगातील प्रत्येक माणसाच्या उदयाची शाश्‍वती आहे. भगवान बुद्‌धांचा धम्म हा खरा विज्ञानवादी आहे. प्रतित्युतसमुद्‌पादसारख्या सिद्‌धांतातून त्यांनी त्रिकालाबाधीत विज्ञान सांगीतलं आहे. नुसत्या स्त्री -पुरुषाच्या मिलनाने शरीर निर्माण होत नाही, तर त्याबरोबर तिसरी घटना घडते, त्याला च्युतिचित्त (deceased conciousness)असे म्हटले जाते. भगवान बुद्धाने जो कर्म सिद्धांत सांगितला आहे, त्यात "कराल तसे भराल' असे म्हटले आहे. असे सांगणारा बुद्ध हा पहिला महापुरुष ठरतो. भगवान बुद्ध म्हणतात की शीलाच्या आणि शुद्ध आचरणाच्या मार्गाने मनुष्य आपल्या भविष्याचा निर्माता होउ शकतो किंवा अशुद्ध आचरणाने मनुष्य आपल्याकरीता नरक म्हणजे दुःखमय जग निर्माण करू शकतो . जेव्हा आपले चित्त, वाणी, शारीरिक क्रिया संतुलित असतात तेव्हा विचारही संतुलीतच असतात. भगवान बुद्धांनी म्हटले आहे की पापकर्म आपणच करतो आणि माणूस अशुद्ध होतो. म्हणून तो स्वतःला पापकर्म करण्यापासून दूर ठेवू शकतो आपणही आपली शुद्धी करू शकतो. पाप किंवा पुण्य या दोन्ही गोष्टी स्वतःवरच अवलंबून आहेत. सम्यक संकल्प, सम्यक आजिवीका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हीच निर्वाण प्राप्त करण्याची साधनं असल्याचे बुद्‌ध सांगतो.
शरीराची रचना पुष्कळशा धातूपासून बनली असून त्यांनी शरीराच्या स्वभावावर धातूंचा प्रभाव असल्याचे बुद्‌ध म्हणता. त्यावेळचे तथागातांचे धातूविषयक असणारे त्यांचे विचार हे आजचे विज्ञानही मान्य करीत आहे. वैज्ञानिक प्रयोगाने सिद्ध झाले आहे की शरीर निरनिराळ्या तत्वांचे बनलेले आहे. यात कार्बन, हायड्रोजन, ऑक्‍सिजन, नाइट्रोजन, लोह, कॅल्शियम, फॉस्फोरस हे मुख्य आहेत. वरील तत्व आवश्‍यक मात्रेत शरीरात पोहचले पाहिजे, या तत्वांची कमी किंवा अधिकता निश्‍चितपणे शरीराला प्रभावित करते. विज्ञानाची ही मान्यता बुद्धाने मध्यम मार्गातून सांगितली आहे. संपूर्ण बुद्‌ध वाचल्यानंतर त्याच्या दिशेने चालने म्हणजे स्वतःच स्वतःला जाणून घेणे किंवा स्वयंदीप करणे होय.

                                       विजयकुमार राउत
                                      vraut90@yahoo.com

                                                                   

मंगलवार, 6 अक्टूबर 2015

हातचा एक


               
                                                                   
                                                                                       विजयकुमार राऊत 
प्रत्येकाला जगताना "हातचा एक' घेउनच जगावे लागते. हा हातचा एकच जगण्याला सुसहय करतो. जर तो नसता तर जीवनाचे गणितच विस्कटले असते. म्हणून गणित सोडविताना हा "हातचा एक' घेण्याची प्रथा कशी पडली, कधी आणि का पडली, हे त्या "हातच्या एकाला'च माहित. गणितात तर चक्‍क त्याला हाताशी घेतल्याशिवाय मोठी आकडेमोड करणेच शक्‍य नसते. हा "हातचा एक' येतो कुठून आणि तो आपण का घ्यावा, याची उत्तरे अजूनपर्यंत तरी माझयासारख्याच्या अल्पबुद्‌धीच्या माणसाला सापडलेली नाहीत. कधी कधी प्रश्‍न पडतो की हा हातचा एक न घेता जगणारी माणसं जगतात तरी कशी ? परंतु खूप विचार केल्यानंतर त्यामागचं रहस्य उलगडायला मदत होते. कुणी डोळयामागचं अस्तित्व जरी नाकारत असले तरी डोळयांनी दिसणारं स्वतःचं अस्तित्व मात्र मान्य करतातच. "हातचा एक' ते स्वतःलाच घेउन जगत असतात. म्हणून तेही स्वतःचे अस्तित्व सिद्‌ध करण्यासाठी ठासून विरोध करतात.पाठपुरावे सादर करतात. परंतु या ठिकाणी फक्‍त "ऑबजेक्‍ट' बदलतो., "सबजेक्‍ट' मात्र उरतोच. ही एवढी तगमग कशासाठी आणि कुणासाठी ? हा नुसता विरोधाला विरोध नसतो. त्यातही बरेच काही आहेच. हातचा एक न घेणा-यांची मग बेरजेची, वजाबाकीची पद्‌धत जरी आगळीवेगळी असली तरी मात्र जे उत्तर किंवा जे समाधान लाभतं त्याची जातकुळीही पहिल्या गटासारखीच "बहुजन सुखायच'च्या मार्गातून "स्वांत-सुखाय'कडे जाणारी असते. कुणी त्यांना नास्तिक म्हटलं तरी ते स्वतःलाच पदोपदी सिद्‌ध करीत असतात. तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक तुम्हाला "हातचा एक' गवसलेला असतो. वास्तविक पाहता नास्तिकवादी "हातचा एक' घेणे पसंत करणार नाहीत. परंतु स्व प्रतिमेतच तेही कुठल्या ना कुठल्या प्रकारे "हातचा एक' स्वीकारतात. तेच त्यांचे आधार होतात. या एकाशिवाय ओसाड आयुष्य कुणी जगू शकतच नाही. ज्यांना हातचा किंवा दुसरा जोडता येत नाही, ते नैराश्‍याच्या अवस्थेत एक तर स्वतःला संपवून घेतात किंवा आत्मघातकी मार्ग तरी निवडतात . शेवटी काय तर जगण्याला कसाचाही का असेना आधार हवा असतो. जीवनाला कुठली तरी हिरवळ हवी असते.
आज "स्पेशलाईजेशन'चा जमाना आहे. प्रत्येक अवयवाचा डॉक्‍टर वेगळा असतो. प्रत्येक विषयाचा तज्ज्ञ वेगळा. परंतु कितीही "स्पेशलायजेशन' आले तरी विविधता हा निसर्गाचा स्वभाव आहे. या विश्‍वात सगळं एकमेकांशी जुळलेलं आहे. प्रत्येक वस्तूत कार्य-कारणभाव आहे. म्हणून "स्पेशयलायजेशन' व त्यातून मिळणारं उत्तरही पुन्हा अपूर्णच. एका शाखेतून दुसरी शाखा जन्माला यावी तसं. एका विषयात कुणी तज्ज्ञ झालं की दुसरा विषय किंवा दुसरं काहीतरी त्याच्या हातून सुटतंच. मग त्याची गती डबक्‍याला समुद्र समजण्यासारखी होते. अष्टदिशांतून सळसळ करीत वाहणा-या नदया शेवटी त्या अथांग समुद्रालाच जाउन मिळतात. दिशाहिन झालेली सगळी वादळं अवकाशात जाउनच विसावतात. विविध ठिकाणावरून निघालेले मार्ग एकाच ठिकाणी जाउन लुप्त होतात. जगातील सगळया पॅथ्या, पोथ्या, विचारप्रवाह एका अनामिक शुन्यात जाउन गडप होतात.
नावाचा प्राणीच अजब आहे. भिन्न व्यक्‍ती, भिन्न विचारधारा, भिन्न स्वभाव. कुणी ईश्‍वर मानतात, तर कुणी नाकारतात. कुणी आस्तिक आहेत तर कुणी नास्तिक. कुणी आशावादी तर कुणी अस्तित्ववादी. कुणी कुठल्या पंथाचा तर कुणी कुठल्या धर्माचा. प्रत्येकाचा देव वेगळा. धर्म वेगळा. आधुनिक विज्ञानापुढे अनेक आव्हाने निर्माण करणारा माणूसच. या माणसाच्या भवतीच सगळी शास्त्रे घुटमळतात. सगळी महाकाव्ये त्याच्यासाठीच जन्माला आलेली असतात. भौतिक जगातील सगळे शोध त्याच्याचसाठी लागलेले असतात. एवढं सगळं असूनही, लक्षावधी वर्षे उलटूनही माणूस कुणाच्याच हातात कसा लागला नाही?हेच कोडं आहे. भगवान श्रीकृष्णही कुणालाच कळू शकत नाहीत.
साधं गणित करीत असताना मेंदूला बराच ताण दयावा लागतो. खूप डोकं खाजविल्यानंतर शेवटी उत्तरं मिळतं, तेव्हा आपल्याला कोण आनंद होतो! म्हणून हा माणूस आहे तरी कसा, याचा अभ्यास करणारी, उत्तरं शोधण्यासाठीच नवनवीन शास्त्रे या पृथ्वीतलावर निर्माण होत आहेत. तुमच,ं आमचं, या विश्‍वाचं, या विश्‍वातील जिव जंतूचं अस्तित्व शोधणारीं विज्ञानशास्त्रे तरी काय करीत असतात? सगळीं बुद्‌धीमत्ता कमावूनही विवेकबुद्‌दी नसेल तर या जगाचं काही खरं नाही. हिंदू धर्मशास्त्रांत भगवान शिवाच्या तिस-या डोळयाची कल्पना सांगीतली आहे. भगवान बुद्‌धांची संपूर्ण विचारसरणी "सम्यक' शब्दाला महत्व देणारी आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा म्हणतात की "मी निर्गुण निराकार आहे' तेव्हा त्यातील गर्भीत इशारा समजण्यासारखा असतो.
कुठलीच एक बाजू संपूर्ण सत्य नसते, त्यासाठी शंकराचा तिसरा डोळा किंवा बुद्‌धांचा सम्यक विचार जाणल्यावरच सत्य कळू लागतं. ही भाषा सर्वसामान्य मेंदूला कळण्यासारखी नसते , म्हणूनच सगळे मी म्हणतो तेच खरे भासविण्याचा प्रयत्न करीत असतात. अशावेळी माणूस अंतर्मुख झाला तर त्याच्या आतील प्रत्येक पेशी त्याच्याशी बोलू लागतील. नेमकं हेच अध्यात्मशास्त्रात सांगीतल्या जाते. अध्यात्म म्हणजे काही कुठल्या धर्माचं शास्त्र नव्हे. बुद्‌ध वाचणे म्हणजे बुद्‌धाचा इतिहास वाचणे नव्हे तर स्वतःला समजून घेणे होय. इतिहासातील मुडदे उखरून हाती काय येणार? शिवाजींचा इतिहास वाचताना भूतकाळ खोदून भविष्यकाळात जयजयकार करणे म्हणजे शिवरायांना समजून घेणे नव्हे. परंतु राजकीय पक्ष आपल्याला पुन्हा भूतकाळात नेउन थडग्याला कवटाळणेच शिकवित असतात.
अध्यात्मशास्त्र तरी काय असतं? अध्यात्म म्हणजे अस्तित्वाशी एकरूप होंणं. इतिहास म्हणजे भूतकाळाचे उत्खनन करून अस्तित्वाशी जोडण्याचा प्रयत्न. विज्ञान म्हणजे अस्तित्वाला भविष्याशी जोडून ठेवण्यासाठी चाललेली धडपड. भूगोल म्हणजे अस्तित्वाचा या ब्रम्हांडात वेध घेण्याचा अखड प्रयत्न, गणित म्हणजे अस्तित्वाचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करून बाकी अस्तित्व किती उरते ते जाणून घेणे, भूमीती म्हणजे अस्तित्वाचे क्षेत्रफळ व त्रिज्या काढणे, अस्तित्वाच्या विचारांचा केंद्रबिंदू शोधणे म्हणजे मानसशास्त्र, असा विविध शास्त्रांचा हेतू तपासला की अस्तित्वाच्या दिशेनेच सगळे जात असल्याचे लक्षात येईल
.

                                                               विजयकुमार राऊत

 
Blogger Templates