Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 11 जून 2015

निळं क्षितिज धुंडाळणाऱ्या "उद्‌ध्वस्त माणसाच्या कविता'

  


                                                         विजयकुमार राउत
या विश्‍वाच्या कानाकोपऱ्यात आंबेडकरी चळवळ आता विविध अंगाने बहरली आहे. तिचे बहरणे किंवा फुलणे केवळ "मोसमी' नव्हे तर मानवतेसाठी आवश्‍यक असलेल्या वैचारिक सिंचनातून मोठ्या हिमतीने विरोधाचे टोकदार हल्ले पचवित येणाऱ्या यातनांमधून झाले आहे. अक्षर साहित्याच्या पातळीवर तिने मोठ्या कुवतीने अढळस्थान प्राप्त केले आहे. त्याच चळवळीतील नव्याने लिहू पाहणारी, भावना व्यक्‍त करण्यासाठी धडपडणारी पिढी मोठ्या दिमाखात उदयास आलेली आहे. काळाच्या छाताडावर लाथ मारून त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. त्यापैकीच महेंद्रकुमार मेश्राम हे तरुण आंबेडकरी कवी स्वतःच्या अनुभवातून निळं क्षितिज निर्माण करायला निघाले आहेत.
अगदी लहानपणापासून झालेल्या संस्कारावर त्यांचा पिंड पोसलेला आहे. परिस्थितीशी दोन हात करताना आजूबाजूच्या विदारक स्थितीतून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आहे. म्हणून त्यांच्याशी भवतालची थेट परिस्थितीच संवाद साधत असल्याचे त्यांच्या पहिल्यावहिल्या "उद्‌ध्वस्त माणसाच्या कविता' संग्रहातून पानोपानी दिसून येते. त्यांच्या कवितेचे विषयही अवतीभवतीचे आहेत. मात्र, त्यांना अस्वस्थ करू पाहणाऱ्या संदर्भाशी भिडण्याचे ते जाहीरपणे आव्हान करताना दिसतात.
आंबेडकरी विचारधारेच्या कवितेत जो अंतर्बाह्य प्रामाणिकपणा, लढाऊबाणा आणि अन्याय सहन न करण्याची विद्रोही वृत्ती या सगळ्या बाबी महेंद्रकुमार मेश्राम यांच्या कवितेत आल्या आहेत. रंध्रारंध्रात अंगार चेतवणारी ही कविता आहे. "ओठात एक आणि पोटात एक' असं न ठेवणारी त्यांची कविता म्हणूनच हृदयाला नुसती भिडत नसून क्रांतीचा सुरूंग लावून उठते. "बा स्वातंत्र्या मला माफ कर !' यांसारख्या कवितेतून विरोधाभासी दिसणाऱ्या परिस्थितीशी लढताना त्यांचा ताबा सुटला नाही तरच नवल! "बाबासाहेबांचा जयजयकार' या कवितेत त्यांनी आज अवतीभवती घडणाऱ्या एकेक घटनांमधून अन्याय व अत्याचाराचा हिशेब संस्कृतीच्या रक्षकांकडून मागितला आहे. विदारक सामाजिक स्थितीचे अवलोकन करताना त्यांनी अवैधपणे होणाऱ्या वृत्तीवर प्रखरपणे हल्ला चढविला आहे.
ताटाखालची मांजरं
तुमची जमीन बंजर
सुपीक करता करता
आम्ही झालो अस्थिपंज

कवी महेंद्रकुमार मेश्राम यांना पडणारे प्रश्‍न साधेच आहेत. त्याची उत्तरेही साधीच आहेत. परंतु, आढेवेढे घेणाऱ्या सांस्कृतिक चक्रव्यूहात ते बसत नसल्यामुळे उत्तरंही कुलूपबंद ठेवण्याचा डाव विचार करायला लावणारा आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते चळवळीचा निळा झेंडा स्वतःच्या खांद्यावर पेलून पुढे नेण्याचा संकल्प करताना "देतो तुला वचन हे' या कवितेतून आश्‍वस्त करतात. म्हणूनच त्यांची कविता उज्ज्वल भविष्याचे योजनाबद्ध संयोजन करताना दिसते.
"उद्‌ध्वस्त माणसाच्या कविता' या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध आंबेडकरी कवी यशवंत मनोहर यांची प्रस्तावना लाभली आहे. विख्यात साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे आशीर्वादपर, मनाला उभारी देणारे दोन शब्द लाभलेले आहेत. सुदर्शन बारापात्रे यांचं सुंदर, रेखीव मुखपृष्ठ आहे.
* विजयकुमार राऊत
vraut697@gmail.com









 
Blogger Templates