Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

बुधवार, 17 जून 2015

शास्त्र काटयाची कसोैटी !


                                                        विजयकुमार राऊत
भाषेला असंख्य पैलू असतात. एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. अर्थ काढणारा आपल्या सोयीने किंवा त्याच्या मनःस्थितीप्रमाणे समजून बोलून जातो. भाषेचा किंवा शब्दांचा वापर करताना बोलणारा नुसताच शब्द उच्चारित नसतो. तर तो त्यात आपल्या भावना ओतत असतो. भावना किंवा संवेदनाच त्याला बोलतं करीत असतात. पण बोलणारा भावना व्यक्‍त करीत असताना त्याच्या बोलण्याशी ऐकणारा सहमत होईलच असं नाही. कारण नुसतं शब्दांपुरतं बोलायचं झालं तर ते कुठल्या मनःस्थितीतून आले किंवा ऐकणा-याची भावस्थिती काय आहे,यावर सगळं समजणं न समजनं अवलंबून असतं.
म्हणूनच कवी मर्ढेकर म्हणतात की
भावनेला येउ देगा
शास्त्र काटयाची कसोटी !
भाषेचा जन्मच आपले विचार किंवा भावना पोहचविण्यासाठी झालेला असला तरी तिचा हेतू मात्र बव्हंशी साध्य होतोच, असं नाही. कारण आज समाजात व्यक्‍तीपरत्वे वाद निर्माण होण्याचं दुसरं तिसरं कारण कुठलं नसून ही मुळात भाषाच प्रामुख्याने वाद विवादाची जननी आहे, हे अनेक घटनांवरून सिद्‌ध होतं. ज्या भाषेनं सुसंवाद व्हायला हवा त्याच भाषेमुळे विसंवाद निर्माण होत आहेत. आज शब्द नर्मदेतील गोटयांप्रमाणे गुळगुळीत झाले आहेत. त्याचा व्यवहारात सर्रास वापर करीत असताना त्याचे कांगोरे नष्ट होत आहेत. म्हणून जो भाव बोलणा-याच्या शब्दांत येत असतो, तोच भाव ऐकणा-यांपर्यंत तसाच्या तसा जाईल याची शाश्‍वती नसते. शब्दांत सत्य सापडतच नाही. संधी साधू लोक समाजात भाषेचा जेव्हा स्वार्थ आणि हित साधण्यासाठी वापर करतात तेव्हा भाषाच सर्वाधिक भ्रष्ट होते. मग समाजातील नव्याने उदयास येणा-या पिढीस जुनी भाषा गुळगुळीत वाटायला लागते. नवीन पिढी भाषेपासून दूर जायला लागते. असं का व्हावं, याचं चिंतन आपल्याकडे फारसं होत नाही. ज्या भाषेच्या बळावर गेल्या अनेक पिढया पोसल्या गेल्यात, ज्या भाषेचं दूध पिउन त्या पिढयांचं संवर्धन झालं, तिच भाषा नवीन पिढीला सशक्‍त का वाटंत नाही? यासारखे प्रश्‍न भाषेच्या अभ्यासकांना पडत असतात. थोडा गंभीर विचार करून या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तर याचं उत्तर कदाचित सापडू शकेल.
कधी कधी मौनाचा उपयोग केला तर जे बोलायचं आहे जे सांगायचं आहे त्याची उत्तरं मिळतात. परंतु ही झाली माणसाच्या अत्युच्च अध्यात्मिक पायरीवरील बाब. मौनाचा उपयोग व्यवहारी माणसाने केला तर हेच मौन त्याच्यासाठी योग्य ठरणार नाही.

                                                   विजयकुमार राऊत

 
Blogger Templates