गाढव हा प्राणी अगदी प्रामाणिक असतो, यात मला तिळमात्र शंका नाही. बिचारा मालकाने सांगीतलेली सगळी कामे तो बिनबोभाटपणे पार पाडित असतो. मालक जे देईल, जेवढे आणि जेव्हा देईल तेवढयावरच तो समाधानी होउन उपजिवीका चालवित असतो. त्यामुळे मला पूर्वीपासून तो खूप आवडतो. "ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असु द्यावे समाधान' या तुकारामाच्या अभंगाप्रमाणे तो कसलीच चिंता बाळगत नाही. याविषयी कुणाकडे साधी तो तक्रारही करत नाही. कुणाविषयी काय तक्रार करावी आणि कशासाठी, म्हणून तो प्राक्तनावर रडत न बसता मुकाटपणे रवंथ करीत बसतो. मानवजात मात्र फार हुशार. एखादयाला शिव्या देताना "तू गाढव आहेस' असं म्हणून तो गाढवाचाच उपमर्द करीत असतो. माणसाने मात्र इतर प्राण्यांपेक्षा शहाणा म्हणवून घेण्याचा ठेका घेतला आहे की काय? गाढवाने गाढव जरूर असावे. पण मुर्ख असू नये, असा माणसाच्या बोलण्याचा मतितार्थ असावा कदाचित. सर्वांशी प्रामाणिक राहणे, कृतज्ञ राहणे किंवा एखादयाने कितीही शोषण केले तरी त्याने त्याविरोधात "ब्र'ही काढू नये, याला गाढव नाही तर काय म्हणावे? असे आपल्याला कधीतरी वाटतं.
संसाराचे रहाटगाडगे सांभाळताना आपण गाढवासारखं रात्रंदिवस धाव धावत सुटतो. माझं घर, पत्नी, मुलं, माझे ऑफिस, माझे बॉस आणि माझया नात्यातली माणसं असं एकंदर परिघातच गाढवं धावत राहतात. तर एकंदरीत आपणही गाढवच असतो म्हणाना. नाईलाजास्तव अगतिकपणे कर्म करीत असताना अवतीभवतीची माणसं हेच माझे सिमीत विश्व होउन बसते. त्यांची स्वप्ने, आशा आकांक्षा पूर्ण करणे, हेच माझं जीवन असतं. अगदी उर फुटेस्तोवर मी धापा टाकीत धावत असतो. रिटायर्ड झाल्यानंतरही माणसाला कुठलातरी उद्योग हवा असतो. कारण खाली डोकं त्याच्यासाठी "सैतान का घरच' असते. पण गाढव जातीला कोण सांगणार की सैतानाचं घर कधीकाळी स्वतःपर्यंत पोहचण्याचा मार्ग असतो. भगवत्गीतेत सांगीतल्याप्रमाणे माणसापेक्षा गाढवंच जास्त कर्मयोग पार पाडीत असतात. कारण त्याला आपण केलेल्या कर्माची खंत किंवा अभिमान मुळीच नसतो. मग त्याला गाढव का बरं म्हणावं? हेच कळत नाही. माझ्याशी दुस-याने प्रामाणिक राहावे; पण मी मात्र प्रामाणिक असू नये, हेच तत्वज्ञान माणसाने स्वीकारले आहे.
मित्रांनो, गाढव कधीच विद्रोह किंवा बंड करून उठल्याचे माझ्या ऐकीवात नाही. कुठल्याच गाढवाने आतापर्यंत क्रांती केल्याचं मी पाहिलं नाही. आपण भलं आणि आपलं काम बरं, या विचारातच गाढव जगत असतात. कुठल्याच गोष्टीत न पडता नाकासमोर चालणे हेच त्याला माहित असतं. म्हणून तो कसलाही उपद्व्याप न करता आयुष्य कंठत असतो बरं का ! एक गाढव म्हातारा झाला की तो आपल्या मुलालाही गाढवांची संस्कृती, परंपरा शिकवून जातो. आपल्या बिरादरीत वागण्याचे नियम शिकवतो. समाजाचे नितीनियम तोडून स्वतंत्र प्रतिभाशाली होउन जगणे त्याच्या शब्दकोषात नसतंच. आपल्या कोषातून जरा बाहेर पडलो की समाजात वावरणा-या सामाजिक गाढवांची स्थितीही अगदी तशीच. सदयाच्या काळात ही गाढवं समाजात जिकडे तिकडे पहायला मिळतात. यांची संख्या खूप मोठी असते. हे गाढवं संख्येने "बहुजन' असल्यामुळे त्यांचे कळप तयार होतात. या कळपातून तो राजकारण, समाजकारण, धर्मकारण खेळण्याचा छंद पूर्ण करतो. गाढव स्वतः राजकारण खेळत नसले तरी राजकारणातील प्यादे म्हणून राबणे त्यांना जास्तच प्रिय असतं. म्हणून त्यांचा कुणीतरी धुर्त कोल्हा हा "गॉडफादर' असतो. त्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून अनुकरण करण्यातच गाढव धन्यता मानित असतो. "अच्छे दिन है आनेवाले ' अशी बतावणी केली की गाढवं "गाढवराज्य' येणार असल्याच्या अविर्भावात नाचायला लागतात. गाढवांचं समाजकारण फार मजेदार असतं. गाढवांचा गॉडफादर गाढवा गाढवात वाटणी करून देतो. त्याप्रमाणे तो मग आपापल्या जातीची संस्था अस्तित्वात आणतो. गाढवं "समाजभूषण' होतात. गाढवांना "हिप्नोटाईझ' करणं खूप सोप्पं काम आहे. त्याला "च्युत्या' बनविण्यापेक्षा तोच च्युत्या बनून जात असतो, हा त्याचा नैसर्गिक गुणधर्मच म्हणाना! तो पळून दुसरीकडे जाउ नये म्हणून त्याचा मालक त्याच्या गळयाभोवती पास बांधल्याचा नुसताच भास निर्माण करतो. गाढवंही अगदी तेच खरं मानून बांधल्या ठिकाणीच गपचिप पडून राहतं. समाजाच्या हितासाठी लढण्याचं नाटक करून लबाड कोल्हा मात्र गाढवाचा सम्राट होउन मलिंदा खात असतो. त्यांचं समाजकारण आणि समाज म्हणजे प्रत्येक गटात विभागली गेलेली त्याची जात. गाढवांना त्यांच्या स्वतःच्या धर्माचा फार अभिमान वाटत असतो. "गर्व से कहो' चा नारा देत आपल्या घोग-या कर्णकर्कश स्वरकंठातून तो धार्मिक "जिहाद' पुकारतो. धर्मसंकटात आला म्हणून तो इतर गाढवांना जागे करण्याचा प्रयत्न करीत असतो. गाढवासारखा धार्मिक या पृथ्वीतलावर दुसरा कुणी सापडणार नाही. त्याचा धर्मही सामूहिक असतो. कारण त्याला जगण्यासाठी कुठला तरी आधार हवा असतो. धर्माप्रमाणे वागलंच पाहिजे नाहीतर गाढवांचा धर्म संकटात सापडतो, असा त्याचा दृढ समज असतो. मग गाढवांची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी गाढवंच गाढवांशी लढत असतात. गाढवंच गाढवांसाठी धर्माच्या नावावर एकमेकांचं रक्त सांडतात. गाढवांचे सरकार गाढवांच्या हितासाठी जाहिरनामा तयार करून आम्ही तुमचे तारणहार आहोत, असं भासवून "सुखेनैव संसार' करीत असतात. म्हणून या गाढवांच्या दुनियेत कुण्याही मुर्खाने शहाणा होण्याचा प्रयत्न करू नये ! इति गाढवपुराण !!
विजयकुमार राऊत