Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

रविवार, 28 जून 2015

माणूस नावाच्या गाढवाची गोष्ट




गाढव हा प्राणी अगदी प्रामाणिक असतो, यात मला तिळमात्र शंका नाही. बिचारा मालकाने सांगीतलेली सगळी कामे तो बिनबोभाटपणे पार पाडित असतो. मालक जे देईल, जेवढे आणि जेव्हा देईल तेवढयावरच तो समाधानी होउन उपजिवीका चालवित असतो. त्यामुळे मला पूर्वीपासून तो खूप आवडतो. "ठेविले अनंते तैसेची रहावे...चित्ती असु द्यावे समाधान' या तुकारामाच्या अभंगाप्रमाणे तो कसलीच चिंता बाळगत नाही. याविषयी कुणाकडे साधी तो तक्रारही करत नाही. कुणाविषयी काय तक्रार करावी आणि कशासाठी, म्हणून तो प्राक्‍तनावर रडत न बसता मुकाटपणे रवंथ करीत बसतो. मानवजात मात्र फार हुशार. एखादयाला शिव्या देताना "तू गाढव आहेस' असं म्हणून तो गाढवाचाच उपमर्द करीत असतो. माणसाने मात्र इतर प्राण्यांपेक्षा शहाणा म्हणवून घेण्याचा ठेका घेतला आहे की काय? गाढवाने गाढव जरूर असावे. पण मुर्ख असू नये, असा माणसाच्या बोलण्याचा मतितार्थ असावा कदाचित. सर्वांशी प्रामाणिक राहणे, कृतज्ञ राहणे किंवा एखादयाने कितीही शोषण केले तरी त्याने त्याविरोधात "ब्र'ही काढू नये, याला गाढव नाही तर काय म्हणावे? असे आपल्याला कधीतरी वाटतं.
संसाराचे रहाटगाडगे सांभाळताना आपण गाढवासारखं रात्रंदिवस धाव धावत सुटतो. माझं घर, पत्नी, मुलं, माझे ऑफिस, माझे बॉस आणि माझया नात्यातली माणसं असं एकंदर परिघातच गाढवं धावत राहतात. तर एकंदरीत आपणही गाढवच असतो म्हणाना. नाईलाजास्तव अगतिकपणे कर्म करीत असताना अवतीभवतीची माणसं हेच माझे सिमीत विश्‍व होउन बसते. त्यांची स्वप्ने, आशा आकांक्षा पूर्ण करणे, हेच माझं जीवन असतं. अगदी उर फुटेस्तोवर मी धापा टाकीत धावत असतो. रिटायर्ड झाल्यानंतरही माणसाला कुठलातरी उद्योग हवा असतो. कारण खाली डोकं त्याच्यासाठी "सैतान का घरच' असते. पण गाढव जातीला कोण सांगणार की सैतानाचं घर कधीकाळी स्वतःपर्यंत पोहचण्याचा मार्ग असतो. भगवत्‌गीतेत सांगीतल्याप्रमाणे माणसापेक्षा गाढवंच जास्त कर्मयोग पार पाडीत असतात. कारण त्याला आपण केलेल्या कर्माची खंत किंवा अभिमान मुळीच नसतो. मग त्याला गाढव का बरं म्हणावं? हेच कळत नाही. माझ्याशी दुस-याने प्रामाणिक राहावे; पण मी मात्र प्रामाणिक असू नये, हेच तत्वज्ञान माणसाने स्वीकारले आहे.
मित्रांनो, गाढव कधीच विद्रोह किंवा बंड करून उठल्याचे माझ्या ऐकीवात नाही. कुठल्याच गाढवाने आतापर्यंत क्रांती केल्याचं मी पाहिलं नाही. आपण भलं आणि आपलं काम बरं, या विचारातच गाढव जगत असतात. कुठल्याच गोष्टीत न पडता नाकासमोर चालणे हेच त्याला माहित असतं. म्हणून तो कसलाही उपद्‌व्याप न करता आयुष्य कंठत असतो बरं का ! एक गाढव म्हातारा झाला की तो आपल्या मुलालाही गाढवांची संस्कृती, परंपरा शिकवून जातो. आपल्या बिरादरीत वागण्याचे नियम शिकवतो. समाजाचे नितीनियम तोडून स्वतंत्र प्रतिभाशाली होउन जगणे त्याच्या शब्दकोषात नसतंच.
आपल्या कोषातून जरा बाहेर पडलो की समाजात वावरणा-या सामाजिक गाढवांची स्थितीही अगदी तशीच. सदयाच्या काळात ही गाढवं समाजात जिकडे तिकडे पहायला मिळतात. यांची संख्या खूप मोठी असते. हे गाढवं संख्येने "बहुजन' असल्यामुळे त्यांचे कळप तयार होतात. या कळपातून तो राजकारण, समाजकारण, धर्मकारण खेळण्याचा छंद पूर्ण करतो. गाढव स्वतः राजकारण खेळत नसले तरी राजकारणातील प्यादे म्हणून राबणे त्यांना जास्तच प्रिय असतं. म्हणून त्यांचा कुणीतरी धुर्त कोल्हा हा "गॉडफादर' असतो. त्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून अनुकरण करण्यातच गाढव धन्यता मानित असतो. "अच्छे दिन है आनेवाले ' अशी बतावणी केली की गाढवं "गाढवराज्य' येणार असल्याच्या अविर्भावात नाचायला लागतात. गाढवांचं समाजकारण फार मजेदार असतं. गाढवांचा गॉडफादर गाढवा गाढवात वाटणी करून देतो. त्याप्रमाणे तो मग आपापल्या जातीची संस्था अस्तित्वात आणतो. गाढवं "समाजभूषण' होतात. गाढवांना "हिप्नोटाईझ' करणं खूप सोप्पं काम आहे. त्याला "च्युत्या' बनविण्यापेक्षा तोच च्युत्या बनून जात असतो, हा त्याचा नैसर्गिक गुणधर्मच म्हणाना! तो पळून दुसरीकडे जाउ नये म्हणून त्याचा मालक त्याच्या गळयाभोवती पास बांधल्याचा नुसताच भास निर्माण करतो. गाढवंही अगदी तेच खरं मानून बांधल्या ठिकाणीच गपचिप पडून राहतं. समाजाच्या हितासाठी लढण्याचं नाटक करून लबाड कोल्हा मात्र गाढवाचा सम्राट होउन मलिंदा खात असतो. त्यांचं समाजकारण आणि समाज म्हणजे प्रत्येक गटात विभागली गेलेली त्याची जात. गाढवांना त्यांच्या स्वतःच्या धर्माचा फार अभिमान वाटत असतो. "गर्व से कहो' चा नारा देत आपल्या घोग-या कर्णकर्कश स्वरकंठातून तो धार्मिक "जिहाद' पुकारतो. धर्मसंकटात आला म्हणून तो इतर गाढवांना जागे करण्याचा प्रयत्न करीत असतो. गाढवासारखा धार्मिक या पृथ्वीतलावर दुसरा कुणी सापडणार नाही. त्याचा धर्मही सामूहिक असतो. कारण त्याला जगण्यासाठी कुठला तरी आधार हवा असतो. धर्माप्रमाणे वागलंच पाहिजे नाहीतर गाढवांचा धर्म संकटात सापडतो, असा त्याचा दृढ समज असतो. मग गाढवांची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी गाढवंच गाढवांशी लढत असतात. गाढवंच गाढवांसाठी धर्माच्या नावावर एकमेकांचं रक्‍त सांडतात. गाढवांचे सरकार गाढवांच्या हितासाठी जाहिरनामा तयार करून आम्ही तुमचे तारणहार आहोत, असं भासवून "सुखेनैव संसार' करीत असतात. म्हणून या गाढवांच्या दुनियेत कुण्याही मुर्खाने शहाणा होण्याचा प्रयत्न करू नये ! इति गाढवपुराण !!
                                                                               विजयकुमार राऊत

बुधवार, 17 जून 2015

शास्त्र काटयाची कसोैटी !


                                                        विजयकुमार राऊत
भाषेला असंख्य पैलू असतात. एका शब्दाचे अनेक अर्थ निघतात. अर्थ काढणारा आपल्या सोयीने किंवा त्याच्या मनःस्थितीप्रमाणे समजून बोलून जातो. भाषेचा किंवा शब्दांचा वापर करताना बोलणारा नुसताच शब्द उच्चारित नसतो. तर तो त्यात आपल्या भावना ओतत असतो. भावना किंवा संवेदनाच त्याला बोलतं करीत असतात. पण बोलणारा भावना व्यक्‍त करीत असताना त्याच्या बोलण्याशी ऐकणारा सहमत होईलच असं नाही. कारण नुसतं शब्दांपुरतं बोलायचं झालं तर ते कुठल्या मनःस्थितीतून आले किंवा ऐकणा-याची भावस्थिती काय आहे,यावर सगळं समजणं न समजनं अवलंबून असतं.
म्हणूनच कवी मर्ढेकर म्हणतात की
भावनेला येउ देगा
शास्त्र काटयाची कसोटी !
भाषेचा जन्मच आपले विचार किंवा भावना पोहचविण्यासाठी झालेला असला तरी तिचा हेतू मात्र बव्हंशी साध्य होतोच, असं नाही. कारण आज समाजात व्यक्‍तीपरत्वे वाद निर्माण होण्याचं दुसरं तिसरं कारण कुठलं नसून ही मुळात भाषाच प्रामुख्याने वाद विवादाची जननी आहे, हे अनेक घटनांवरून सिद्‌ध होतं. ज्या भाषेनं सुसंवाद व्हायला हवा त्याच भाषेमुळे विसंवाद निर्माण होत आहेत. आज शब्द नर्मदेतील गोटयांप्रमाणे गुळगुळीत झाले आहेत. त्याचा व्यवहारात सर्रास वापर करीत असताना त्याचे कांगोरे नष्ट होत आहेत. म्हणून जो भाव बोलणा-याच्या शब्दांत येत असतो, तोच भाव ऐकणा-यांपर्यंत तसाच्या तसा जाईल याची शाश्‍वती नसते. शब्दांत सत्य सापडतच नाही. संधी साधू लोक समाजात भाषेचा जेव्हा स्वार्थ आणि हित साधण्यासाठी वापर करतात तेव्हा भाषाच सर्वाधिक भ्रष्ट होते. मग समाजातील नव्याने उदयास येणा-या पिढीस जुनी भाषा गुळगुळीत वाटायला लागते. नवीन पिढी भाषेपासून दूर जायला लागते. असं का व्हावं, याचं चिंतन आपल्याकडे फारसं होत नाही. ज्या भाषेच्या बळावर गेल्या अनेक पिढया पोसल्या गेल्यात, ज्या भाषेचं दूध पिउन त्या पिढयांचं संवर्धन झालं, तिच भाषा नवीन पिढीला सशक्‍त का वाटंत नाही? यासारखे प्रश्‍न भाषेच्या अभ्यासकांना पडत असतात. थोडा गंभीर विचार करून या प्रश्‍नाच्या मुळाशी गेलो तर याचं उत्तर कदाचित सापडू शकेल.
कधी कधी मौनाचा उपयोग केला तर जे बोलायचं आहे जे सांगायचं आहे त्याची उत्तरं मिळतात. परंतु ही झाली माणसाच्या अत्युच्च अध्यात्मिक पायरीवरील बाब. मौनाचा उपयोग व्यवहारी माणसाने केला तर हेच मौन त्याच्यासाठी योग्य ठरणार नाही.

                                                   विजयकुमार राऊत

गुरुवार, 11 जून 2015

निळं क्षितिज धुंडाळणाऱ्या "उद्‌ध्वस्त माणसाच्या कविता'

  


                                                         विजयकुमार राउत
या विश्‍वाच्या कानाकोपऱ्यात आंबेडकरी चळवळ आता विविध अंगाने बहरली आहे. तिचे बहरणे किंवा फुलणे केवळ "मोसमी' नव्हे तर मानवतेसाठी आवश्‍यक असलेल्या वैचारिक सिंचनातून मोठ्या हिमतीने विरोधाचे टोकदार हल्ले पचवित येणाऱ्या यातनांमधून झाले आहे. अक्षर साहित्याच्या पातळीवर तिने मोठ्या कुवतीने अढळस्थान प्राप्त केले आहे. त्याच चळवळीतील नव्याने लिहू पाहणारी, भावना व्यक्‍त करण्यासाठी धडपडणारी पिढी मोठ्या दिमाखात उदयास आलेली आहे. काळाच्या छाताडावर लाथ मारून त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. त्यापैकीच महेंद्रकुमार मेश्राम हे तरुण आंबेडकरी कवी स्वतःच्या अनुभवातून निळं क्षितिज निर्माण करायला निघाले आहेत.
अगदी लहानपणापासून झालेल्या संस्कारावर त्यांचा पिंड पोसलेला आहे. परिस्थितीशी दोन हात करताना आजूबाजूच्या विदारक स्थितीतून त्यांनी काव्यलेखनाला सुरुवात केली आहे. म्हणून त्यांच्याशी भवतालची थेट परिस्थितीच संवाद साधत असल्याचे त्यांच्या पहिल्यावहिल्या "उद्‌ध्वस्त माणसाच्या कविता' संग्रहातून पानोपानी दिसून येते. त्यांच्या कवितेचे विषयही अवतीभवतीचे आहेत. मात्र, त्यांना अस्वस्थ करू पाहणाऱ्या संदर्भाशी भिडण्याचे ते जाहीरपणे आव्हान करताना दिसतात.
आंबेडकरी विचारधारेच्या कवितेत जो अंतर्बाह्य प्रामाणिकपणा, लढाऊबाणा आणि अन्याय सहन न करण्याची विद्रोही वृत्ती या सगळ्या बाबी महेंद्रकुमार मेश्राम यांच्या कवितेत आल्या आहेत. रंध्रारंध्रात अंगार चेतवणारी ही कविता आहे. "ओठात एक आणि पोटात एक' असं न ठेवणारी त्यांची कविता म्हणूनच हृदयाला नुसती भिडत नसून क्रांतीचा सुरूंग लावून उठते. "बा स्वातंत्र्या मला माफ कर !' यांसारख्या कवितेतून विरोधाभासी दिसणाऱ्या परिस्थितीशी लढताना त्यांचा ताबा सुटला नाही तरच नवल! "बाबासाहेबांचा जयजयकार' या कवितेत त्यांनी आज अवतीभवती घडणाऱ्या एकेक घटनांमधून अन्याय व अत्याचाराचा हिशेब संस्कृतीच्या रक्षकांकडून मागितला आहे. विदारक सामाजिक स्थितीचे अवलोकन करताना त्यांनी अवैधपणे होणाऱ्या वृत्तीवर प्रखरपणे हल्ला चढविला आहे.
ताटाखालची मांजरं
तुमची जमीन बंजर
सुपीक करता करता
आम्ही झालो अस्थिपंज

कवी महेंद्रकुमार मेश्राम यांना पडणारे प्रश्‍न साधेच आहेत. त्याची उत्तरेही साधीच आहेत. परंतु, आढेवेढे घेणाऱ्या सांस्कृतिक चक्रव्यूहात ते बसत नसल्यामुळे उत्तरंही कुलूपबंद ठेवण्याचा डाव विचार करायला लावणारा आहे. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते चळवळीचा निळा झेंडा स्वतःच्या खांद्यावर पेलून पुढे नेण्याचा संकल्प करताना "देतो तुला वचन हे' या कवितेतून आश्‍वस्त करतात. म्हणूनच त्यांची कविता उज्ज्वल भविष्याचे योजनाबद्ध संयोजन करताना दिसते.
"उद्‌ध्वस्त माणसाच्या कविता' या काव्यसंग्रहाला सुप्रसिद्ध आंबेडकरी कवी यशवंत मनोहर यांची प्रस्तावना लाभली आहे. विख्यात साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांचे आशीर्वादपर, मनाला उभारी देणारे दोन शब्द लाभलेले आहेत. सुदर्शन बारापात्रे यांचं सुंदर, रेखीव मुखपृष्ठ आहे.
* विजयकुमार राऊत
vraut697@gmail.com









उत्क्रांती


मी जिवंत आहे अजुनही, कोणास सुगावा आहे?
मी कोठे मेलो आहे? हा उगाच दावा आहे !

कृष्णाच्या काळी होतो, बुद्‌धाच्या वेळी होतो
हा माझ्या उत्क्रांतीचा , मी एक पुरावा आहे !! 
                      
                                             * विजयकुमार राऊत
 

शनिवार, 6 जून 2015

राजे


शेवटी माझे म्हणावे लागले
सेवकां राजे म्हणावे लागले !

हात हे घाणीत गेले शेवटी
कमळ हे ताजे म्हणावे लागले !!

ही महागाई अशी छळते मला !
जीवना ओझे म्हणावे लागले

वेश हा माझा गबाळयासारखा
वागतो साधे म्हणावे लागले !

का असा आरोप हा मजवरी?
बोलले ते, जे म्हणावे लागले !!

जेवला का? ते विचारू लागले-
"चल रहे रोजे' म्हणावे लागले !!



                                                  *विजयकुमार राऊत

बुधवार, 3 जून 2015

मान्सुन

मान्सुन


जगणे माझे कठीण आहे, तुझियावाचुन म्हणतो !
तू येते, हुलकावून जाते, तुलाच मान्सुन म्हणतो !! 



रंग, रूप अन्‌ शब्दांच्याही, पलीकडे तू आहे.... !
तुला कुणी साकार म्हणू दे, मी तर निगुर्ण म्हणतो !!

आयुष्याच्या वळणावरती,ऋतूसारखे रंग बदलती
म्हणून तुला मी श्रावण म्हणतो, तुलाच फाल्गुन म्हणतो !!

तुला प्राशन्यासाठी
मी तर चातक पक्षी होतो-
तेव्हा कळते मलाच माझे, कशास मे-जुन म्हणतो!!

जरी आज ओसाड असू दे, काळिज या धरणीचे
दगडांनाही फुटेल पाझर, तुझेच
ऐकुन म्हणतो !!

 

नक्षत्रांचा तुझा सोहळा पाहून हरखुन जातो
दर्शन, सत्संग फजुल सारे, तुलाच दर्शुन म्हणतो !!


                                                           
                                          *विजयकुमार राऊत
 
Blogger Templates