Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 22 जनवरी 2015

कुणाचा ना वाद कुणाशीही...


खरं तर माझे आणि तुकारामाचे कधी कुठल्याच प्रकारचे भांडण नव्हतेच, ना आहे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी भागवत धर्माचा पाया रचिला आणि "तुका झालासे कळस' इथपर्यंत माझं काहीही म्हणणं नाही. "निंदकाचे घर असावे शेजारी' असं तुकोबा रायाच एका ठिकाणी म्हणतात. म्हणून मीही त्यांचीच निंदा करतो असे समजू नये. परंतु सगळं गोड गोड वाटावं असंही मला बोलायचं नाही. खरं तर मला माझं म्हणणं मांडण्याचाही अधिकार थोडाफार तरी तुमच्या अभंगाचा अभ्यासक या नात्याने किंवा तुमच्याबद्‌दल आपुलकी वाटत असल्याने आहे. संत तुकाराम महाराज हे साधेसुधे संत नव्हते. म्हणूनच तर तुकोबांचे अभंग विरोधकांनी इंद्रायणीत बुडवूनसुद्‌धा काळाच्या कसोटीवर उतरलेच ना ! वारकरी संप्रदायापासून तर अवघ्या मराठी सारस्वतांत तुकारामांच्या अभंगाचे दाखले दिल्याशिवाय पुढे जाताच येत नाहीत.
आपलाची वाद आपणासी !
माणूस नावाचा प्राणी अजब रसायण आहे बुवा. आयुष्यभर तो कुणा ना कुणाशी भांडत असतोच. हे त्याचं भांडण कुण्या एकटयाशी नसतंच. अहो, स्पर्धेशिवाय काय शिकविल्या जाते या जगात? आता तर ही स्पर्धा अधिकच वाढत चालली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नुसतं घोडा होउन सैरभैर धावत सुटायचं. अशा वेळी दुस-याचं सुख पाहून आपणही मनात दुस-याशी स्पर्धा करायला लागतो. त्यामुळे कळत नकळत आपण दुस-यांच्या सुखावर अंतर्बाहय जळून उठतो. त्याही पुढे जाण्याचा भाव मनात ठेवून आयुष्यभर आपणच लावलेल्या आगीत जळत जातो. इतरांशी भांडण योग्य नव्हे, असं संतसुद्‌धा सांगतात, म्हणून आपण आपल्याशीच भांडण उकरत बसायचं? बरं तर आपलाच स्पर्धक आपण राहून पहिल्यासारखीच परिस्थिती ओढवून घेतो. कारण पहिल्या प्रकारात आपल्या भांडणाचं कारण "दुसरा' कोणी होता. आता मात्र "आपण'च आपले वैरी होउन बसतो. बाहेरचा वैरी एकदा परवडला. आतमध्ये तर असे शेकडो वैरी तुमच्याशी विणाकारण भांडायला तयार असतात. त्यात ज्या व्याध्या लागायच्या आपल्यालाच लागतात. परंतु तुम्हीच सांगा हो, तुकोबा... खरंच भांडून कुणाचं काही भलं झालंय का? हे तुम्हालाही चांगलंच माहित होतं. म्हणूनच तर तुम्ही म्हणता की "आपलाची वाद आपणाशी'.... आता मला सांगा तुकोबा... माणसाला परमेश्‍वराची साधना करीत असताना त्याचं मन कसं पाण्यासारखं नितळ असावं लागतं. ईश्‍वर किंवा आनंदप्राप्तीच्या दिशेने निघालेला माणूस शेवटी कसा असावा, हे गीतेत सांगीतले आहेच. तेव्हा तुमचे "आपलाच वाद आपणाशी' हे काही पटत नाही बुवा!
अहो, चैतन्याच्या दिशेने एकेक पायरी वर चढत असताना माणसाचं स्वतःशीही भांडण योग्य नसतं. कारण बाहेरच्या जगाशी असलेलं भांडण संपलं तरी माणूस पर्याय शोधत असतो. बाहेर हिंसा सोडली आणि आत मनाने मी हिंसाच करत गेलो, तर चालणार आहे का? म्हणून मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "आपुलाची वाद'म्हटले म्हणजे पुन्हा वाद निर्माण झाला की ! "आपलाच वाद आपल्याशी' घालून पुन्हा सर्वसामान्यांसारखे द्वैत निर्माण करणे हे पटण्यासारखे नाहीच. या सृष्टीत दिसणारे द्वैत हे परस्पर विरोधी नाहीच. शेवटी अद्वैत विचार ठेवूनच एकंदर सृष्टीला समजून घ्यावे लागते. दिसणा-या दोन गोष्टी विरोधाभासी असल्यातरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हे माझयासारख्यांने सांगणे म्हणजे सुर्याला आरसा दाखविण्यासारखे आहे. तुकोबा, तुम्ही तर शब्दांचे श्रीमंत. तुमचे अभंग वाचताना एक अनामिक उर्जा संचारते आमच्या अंगात. पंढरीच्या सावळया विठ्‌ठलावरील भक्‍तीने मनाची चंद्रभागा दुथडी भरून वाहायला लागते.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने'
पण खरं सांगू का तुकोबा? शब्द हे दुनियेला आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी वापरलेले एक व्यवहाराचे साधन आहे. साधनाला साध्य समजू नये, याचं भान तुमच्याकडून सुटलं असेल, असं अजिबात म्हणता येणार नाही. तुकोबा शेवटी तुम्ही आम्हा कविंसारखे शब्दांचे पुजारी थोडीच होते?
कविवर्य मर्ढेकर तर "आशयाचा तुच स्वामी... शब्दावाही मी भिकारी' असं निःसंकोच कबुल करून टाकतात. शेवटी शब्दांतून सत्य सांगणे कठीणच, तुकारामा. पकडायला जावं तर हातून पा-यासारखं निसटतं. म्हणून शब्दांपेक्षा मौनच उत्तम म्हणून या विश्‍वातल्या सगळया महात्म्यांनी स्वीकारल्याचं तुम्ही जाणत असालंच. तुकोबा तुमचा पुन्हा "मना'वरचा तो अभंग आम्हाला पुन्हा आशयाच्या चक्रव्यूहात सोडून जातो.
"मन करारे प्रसन्न, सर्व सिद्‌धीचे कारण'
बहिणाबाई बरोबर मनाला उभ्या पिकातलं ढोर म्हणून हिणवितात. ईश्‍वरापर्यंत जाण्यासाठी शेवटी मनालाही सोडून द्यावं लागतं, तुकोबा ! माझयासारख्या पामरानं तुम्हाला हे सांगणं म्हणजे फारच झालं..बुवा !

                              विजयकुमार राउत

शुक्रवार, 9 जनवरी 2015

पाखरांचे थवे




घाव झाले जुने, वार ताजे हवे
वेदनेला फुटावे घुमारे नवे

हाक मारून माघार घेतील का?
दूर गेलेत जे पाखरांचे थवे

काल जे तू दिले तेच सांभाळतो
आज डोळयांत माझया तुझी आसवे

फौज घेउन सारे निघाले कसे
सूर्य झाकायला जसे काजवे!

काय लाचार ही जाहली जिंदगी
काय आयुष्य हे फाटके नागवे!!

आठवांना जरी टाळले मी तरी
तेच तेच सारखे पुन्हा आठवे!

सुखाची कशाला करू याचना?
दुःख गाते सदा गीत माझयासवे
                                                   विजयकुमार राउत
                                                    vraut90@yahoo.com

दावणीला बांधलेले....


कैकदा आले रूतू पण वांझ गेले
दुःख हे माझे बिचारे गांजलेले

कत्तली करतील ते सोयीप्रमाणे-
शब्द त्यांच्या दावणीला बांधलेले

मोकळे आकाश तू जेव्हा दिले
मुक्‍त झाले श्‍वास माझे कोंडलेले

वादळाने कालच्या उद्‌ध्वस्त केले-
खेळ अपुले वाळवंटी मांडलेले

पेरले होते जिथे मी स्वप्न माझे
ऐनवेळी शेत सारे बांड गेले

इतिहासही "त्यांचेच' गातो गोडवे
व्यर्थ गेले रक्‍त माझे सांडलेले

येथे जरी मी दूर तुजपासूनी-
"त्या' तिथे काळीज माझे टांगलेले

                                                                   विजयकुमार राउत
                                                                     vraut90@yahoo.com

लोकशाही


ओठात एक भाषा, पोटात और काही
अशा जगाशी, जमले कधीच नाही

जेथे कुणीच नसतो, माणूस माणसांचा
एैशा युगास आता, म्हणतात लोकशाही

ज्यांनी कधीच त्यांचे, विकले इमान आहे
हल्ली इथे तयांची, होते बरी कमाई

हेतू मला तयांचा, दिसतो जरा निराळा
ते चाहतात मित्रा, सारीकडे तबाही

डोळयात श्‍वापदांच्या, भरला विखार आहे
तू वाग मोकळे पण, थोडे जपून बाई!

या मैफलीत होती, शांती सभोवताली
तू वाद घातला अन्‌, झाली सुरू लढाई

बाहेरच्या जगाशी, ना हारलो कधीही
माझ्यातल्याच  "मी' शी जिंकू कसा लढाई?


                                                              विजयकुमार राउत
                                                              vraut90@yahoo.com

असेहि नाही


मनासारखे घडेल सारे, असेहि नाही
नशिबाचे चमकतील तारे, असेहि नाही

तुफानास तू देशिल टक्‍कर जेव्हा जेव्हा
तुला साथ देतील किनारे, असेहि नाही

भरुन येईल आभाळाचे काळीज जेव्हा
मयुराचे फुलतील पिसारे, असेहि नाही


जीवन म्हणजे, सागर नाही, स्वर्ग सुखाचा
दुःखचे नुसतेच पहारे, असेहि नाही

जरी नसेना ही सजलेली वाट फुलांनी
पायतळी असतील निखारे, असेहि नाही

विजयाचा आनंद कुणाला व्यक्‍त कराया
हवेत केवळ ढोल, नगारे असेहि नाही

                                                         विजयकुमार राउत
                                                        vraut90@yahoo.com

अशी जन्मते कविता ..


"a person can not be a poet or ever appriciate poetry without somekind of unsaundness of mind*
                                                                                                                         lord mechale

लार्ड मॅकेलेचे हे वचन सर्वश्रृत आहे. "अनसाउंडनेस माईंड' असल्याखेरिज कुणीही कविता लिहू शकत नाही. कविता म्हणजे काय? कविता कशी निर्माण होते? कवितेच्या निर्मीतीच्यावेळी नेमकी कोणती परिस्थिती कविला अस्वस्थ करीत असते? कवितेने कुणाचे भले होते काय? कविता लोकांना खरोखरच आवडतात का? हे सर्व प्रश्‍न व्यवहारी जगात वावरताना सगळयांना कमी अधिक प्रमाणात पडत असतात. त्या प्रश्‍नांची उत्तरे जो तो आपापल्यापरिने शोधण्याचा प्रयत्नही करतो. त्याला त्याच्या पद्‌धतीने ती मिळतही असतील. एक रसिक म्हणून कविता जन्माच्या मागची पार्श्‍वभूमी समजून घेणे मोठे रंजक ठरेल.
कविता म्हणजे सभोवतालच्या विश्‍वाला दिलेला मानवी अस्स्तित्वाचा हुंकार. काव्य म्हणजे निसर्गाच्या वेलीवर आलेले भावनांचे सुंदर गुलाबपुष्प. कविता लिहीताना कविची नेमकी भावनिक स्थिती जाणून घेण्याकरीता आपल्याला त्याच्या एकंदर अवतीभवतीच्या परिस्थिती आणि भाववृत्तीचा विचार करावा लागेल.
प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ताल, लय आणि नाद ही मुळ तत्वे जन्मतःच असतात. फक्‍त जसेजसे आपण मोठे होत जातो. तसतसी या तत्वावर धुळ बसत जाते. दिव्यावर काजळी बसावी तशी ! ती जाणण्याची क्षमता धुसर होत जाते. माणूस व्यवहारात इतका व्यस्त झालेला असतो की त्याला या मूळ तत्वांचीच विस्मृती होते. परिणामतः निसर्गात घडणा-या घडामोंडींकडे दुर्लक्ष होते किंवा त्याला प्रतिसाद देण्याची त्याची एकंदर चित्तवृत्ती खंडित झालेली असते. त्यामुळे तो अधिकाधिक व्यवहारात अडकल्यानंतरही त्याच्या ठिकाणी त्या कधी कधी जागृत होत असल्याची झलक एखादवेळी पहावयास मिळते. त्यामुळेच कुठलाही मनुष्य घटका दोन घटका तरी कलेच्या अगदी समीप जाण्याचा कधीतरी प्रयत्न करीत असतो. निसर्गातील नाद, लय, ताल ही मूळ तत्वे माणसाला अधिक संवेदनशिल बनवित असतात. माणूस संवेदनशिल किंवा अस्वस्थ झाल्याशिवाय कुठलीच कलाकृती त्याच्या हातून घडू शकत नाही. कबिर नाही का म्हणत?
सुखिया सब संसार !खावत और सोवेै
दुखिया दास कबिर! जागत और रौवे


एका अनामकि क्षणी होत असलेले अतिंद्रिय अनुभवच त्याला कलेकडे नेण्यास बाध्य करीत असतात. ताल, रंग, नाद याच्यातील अतिऐंद्रीय अनुभव त्याच्यातील संवेदनशिलतेला टिपत असते. निसर्गात घडणा-या गोष्टींचे निरीक्षण सगळेच करीत असतात. परंतु कलावंत मात्र या अतिऐंद्रीयाच्या माध्यमातून त्याला झालेली अनुभूती व्यक्‍त करीत असतो. कुणी लियानार्डो द विंचीसारखा जगप्रसिद्‌ध कलावंत रंग आणि रेशांच्या माध्यमातून मोनालीसाचे न उलगडणारे, गूढ हास्य चित्रातून टिपतो. प्रेयसीला ह्रदयातील संदेश पाठविण्याकरीता आकाशात आलेल्या काळयाकुट्‌ट मेघमालेला दूत बनवून तिच्याकडे पाठविणारा कालिदास "मेघदुत' महाकाव्य केव्हा लिहीतो ते त्याचे त्यालाच आश्‍चर्य वाटते. क्रोंच पक्ष्याच्या जोडप्यातील नराला बाण लागतातच विलाप करणारी मादी पाहून वाल्मीकीसारखा कवि भावविव्हळ अंतःकरणाने महाकाव्य लिहून जातो. जगातील अवतीभवतीचे वास्तव्य कविला अस्वस्थ करीत असते.


हर जगह, हर तरफ बेशुमार आदमी
फिरभी तन्हाईओंका शिकार आदमी !!
सुबह शाम तक बोझ ढोता हुवा !
अपनीही लाश का खुद मजार आदमी !!


अपने खेतो से बिछडने की सजा पाता हूं
अब मै राशन की कतारों मे नजर आता हू!!


मर्ढेकर जगरहाटी व अविरत सुरू असलेली तिची धडपड पाहून मानवाच्या जीवनाची तुलना "मुंगी'शी करून जातात.
"अनसाउंडनेस'मधून किंवा अस्वस्थेतेतूनच काव्य जन्माला येतं.

सारा अंधारच प्यावा एैसी लागली तहान...
एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण !


कोण म्हणतो की उद्याचा सुर्य माझया हातातच येणार नाही म्हणून.
...

किंवा
सुरेश भट अवतीभवतीची एकंदर व्यवस्था पाहून एके ठिकाणी म्हणतात...


सूर्य अंधारला यार हो
नवा सूर्य आणू चला यार हो !!


किंवा भूख गझल अन्‌ प्यास गझल...
तैसी चौविस तास गझल !!


ही तहान लागणे म्हणजेच आपल्या अस्तित्वाला दिलेला अर्थ होय. ही तहान सा-या अस्तित्वाचीच असते. ती व्यक्‍त झालीच पाहिजे. त्यातूनच कविता आकारास येते. पण ही प्रक्रिया मात्र सर्वसामान्य वाचकांसाठी कुतूहलाचा विषय ठरते. रसिकांनाही ही अनुभूती व्हायला लागते. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज म्हणूनच श्रोत्यांना एका पातळीवर येण्यासाठी ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायातून "कवित्वे बरवू रसिकत्वे' असे आवाहन करीत असतात. कारण दोघेही एका विशिष्ट अनुभूतीतून गेले तरच त्याने निर्माण केलेली कलाकृती "ये ह्रदयेची ते ह्रदये' पोहचेल. सुप्रसिद्‌ध साहित्यीक राम शेवाळकर म्हणतात की कवि हे बोलके रसिक असतात तर रसिक हे मुके कवी असतात.

इथे कविवर्य नीलकांत ढोले यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात .....
अमर्याद आयाम हे विश्‍वव्यापी
कुठे मी क्षणांचा असा हा प्रवासी
परि भेदण्याला तुझे व्यूव्ह सारे
सुखे घाल रे तू मला गर्भवासी
..


आईच्या गर्भात विसावण्याचा आनंद हवाहवासा वाटतो. पुन्हा पुन्हा जन्म घेउन त्या त्या क्षणांची अनुभूती घेण्याची इच्छा मनात होणे स्वाभाविक आहे. हा अनुभव कष्टप्रद असला तरी तो पुन्हा पुन्हा व्हावा असे कविला वाटते. सृजनशिलताच या जगात नसेल तर किती मोठा अनर्थ होउ शकतो. वेगवेगळया रूतूंमध्ये विविध रंगात बहरणे, फुलणे, सजने हा सृजनशिलतेचा आनंदोत्सव सृष्टी अविरतपणे साजरा करीत असते. लाजाळूच्या झाडाला स्पर्श करताच तेही स्वतःला आकुंचून घेते. छोटीशी वाटणारी गोगलगाय तिला हात लावताच संपूर्ण अंग आपल्या आत ओढून घेते ... ही संवेदशिलताच असते. प्रसुतीच्यावेळी होणारी मातेला होणारी वेदना कविच्याही अनुभवाला येते.
कवी लोकनाथ यशवंत यांनी सांगीतलेला स्वतःचा अनुभव खरोखरच चिंतन करण्यास भाग पाडतो. एकदा ते म्हणाले की मी कविता कधीच लिहायला बसत नाही. कविता लिहिण्याची उर्मी आली तर मी सर्वसामान्य माणसाला भेटत सुटतो.... त्याच्या बोलण्यातून एखादं वाक्‍य मला मिळतं. तेच पुढे कविता होतं. त्याच्या जीवनातील तो अस्सल अनुभवच मला लिहीते करतो.

युवक मित्रहो, एकदा पत्रकारांनी जगप्रसिद्‌ध शिल्पकार मायमल एंजिलो याला त्याच्या सुंदर शिल्पाविषयी विचारले की तू इतकी सुंदर कलाकृती दगडातून कसा काय शोधून काढतो? त्यावर त्याने दिलेले उत्तर महत्वाचे आहे. तो म्हणतो की मी काहीच करीत नाही. मी हातात छिन्नी घेउन हातोडयाने दगडावर एकामागून एक वार करीत जातो. ही कृती मी सातत्याने करीत असतो. काही क्षणानंतर दगडाचा अनावश्‍यक भाग बाजूला पडत जातो आणि हळूहळू एक सुंदर कलाकृती निर्माण होउ लागते. तसंच कविवर्य सुरेश भट कवितेच्या निर्मीतीबाबत विधान करून जातात. ते म्हणतात की कविता ही आसमंतात अगोदरच लिहून असते. फक्‍त मी तेवढे अनावश्‍यक शब्द बाजूला सारतो आणि कविता आपोआप जन्माला येते. ज्ञानाचेही तसेच असते. ओशो ज्ञानाच्या बाबतीत असंच काहीसं बोलून जातात. आपल्यातील अज्ञान दूर झाले की लगेच ज्ञान प्राप्त होते. या तिघांच्याही बोलण्याचा सारांश एकच आहे.
पाश्‍च्यात कवी इर्मसन म्हणतो की कवितेचा आस्वाद जरी घ्यायचा असेल तेव्हा ह्रदय जागृत ठेवावे लागते. कविता ही डोक्‍याची कृती नव्हे. तर ती भावनेची अभिव्यक्‍ती आहे. ज्याचा त्याचा प्रांत ठरलेला असतो.

शब्दांचे अवतरती मेळे
अन्‌ यमकांना होते घाई
त्या समयाला
सांगायचे नसते काही !!

या असहाय स्थितीतून अनेकांना जावे लागल्याचा अनुभव आहे. आजूबाजूला शब्द पिंगा घालतात. वातावरण भारावलेले असते. अनेकदा कविता लिहिण्याची घाई होते. पण नेमक्‍या वेळी कविताच कागदावर उतरत नाही.. आणि कधी नको त्या ठिकाणी , नको त्यावेळी, अचानक कविता सुचून जाते. याबाबतीत सुरेश भटांचं एक उदाहरण आहे. एकदा सुरेश भटांना एका चित्रपटासाठी गीत लेखन करण्याचं आमंत्रण आलं. त्यासाठी भट मुंबईला गेले. त्यांना एका सर्व सुखसोईंनी युक्‍त असलेल्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं. सगळी बडदास्त होती. दिग्दर्शक रोज येउन त्यांना गीत लेखन झालं का, काही सुचलं का, म्हणून त्यांच्या खोलीत धडकू लागले. भटांकडून "नाही' उत्तर ऐकून दिग्दर्शक आल्या पावली हिरमुसले होउन परत जायचे. असे चार पाच दिवस चालले.खरं तर भटांनाही या गोष्टीची जाणीव होती.पण काय करणार? मनासारखं कागदावर उतरत नव्हतं. सहाव्या दिवशी मात्र दिग्दर्शक वैतागले आणि भटांना विनंती केली" क्षमा करा आणि आता तुम्ही लिहिलं नाही तरी चालेल. तुम्ही जाउ शकता. कारण मी जो चित्रपट काढण्याचं धाडस करीत आहेत तो "स्मॉल' बजेटचा आहे. एवढा अवाढव्य खर्च मला परवडण्यासारखा नाही. म्हणून भट परत नागपूरला आले. नागपूरात पाय ठेवताच त्यांना काही ओळी सुचल्या आणि भट खुश झाले. त्या खुशीच्या भरात त्यांनी दिग्दर्शकांना फोन लावून सुचलेले गीत ऐकवले. ते ऐकून दिग्दर्शकांनी स्वतःच्याच कपाळावर मारून घेतले.
ती सुचलेली कविता अशी-
सुन्या सुन्या मैफलित माझया, तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे !!

दुसरा किस्सा असा आहे. सुरेश भट चौदा वर्षांपासून एका गझलेच्या शेवटचा शेराची पूर्ण होण्याची वाट पाहात होते. ओळ सुचतच नव्हती. एक दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तो शेर सुचला आणि मित्र ज्येष्ठ पत्रकार कमलाकर धारपांना कविता वाचून दाखविण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांच्या दारासमोर उभं राहून ते मोठयाने ओरडत मला गझलेचा शेवटचा शेर सुचला म्हणून सांगू लागले. तेव्हा सगळयांना आश्‍चर्य वाटले...
त्या सुचलेल्या ओळी अशा होत्या...

सुचल्या मला ना तेव्हा माझयाच गीतपंक्‍ती
ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली.!!



कवितेच्या वाटेला जाणा-यांनी शब्दप्रभू जरूर असावे. उत्तम शब्दसंग्रह त्यांच्याजवळ राहिला तर चांगलेच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे
आम्ही घरी धन ! शब्दांचीच रत्ने
असे म्हणतात तर कवी बा.सी.मर्ढेकर म्हणतात ...

आशयाचा तुच स्वामी , शब्दवाही मी भिखारी !
कविवर्य बा.सी. मर्ढेकर स्वतःला शब्दवाही भिकारी समजून घेतात किंवा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शब्दांच्या सामर्थ्यांवर स्वतःला श्रीमंत समजून घेतात. दोघांच्याही बोलण्याचा मथितार्थ एकच आहे.

कुठलीही कलाकृती आपला एक विशेष रचनाबंध "फार्म ' घेउनच जन्माला येत असतो. कधी कवितेत न सापडणारा आशय कादंबरी वा नाटक किंवा कथा होउन जन्म घेतो. मित्रांनो, सगळं काही मिळवलं. शब्द कमाविले, तंत्राचे ज्ञानही आत्मसात केले. परंतु कवितेची परिणामकता? साधता आली नसेल तर..
गझल मे बंदिशे अल्फाजही नही काफी
जिगर का खून भी चाहिऐ असर के लिये !!

असं उर्दू शायर लिहून जातो.
कविता असो वा गझल ती असरदार होण्यासाठी भावनांची उत्कट उत्कटता असावी लागते.
नवोदीत कवी आनंदीरमन यांनी केसवसुतांना एक पत्र लिहून काव्य लिखाणा मागची प्रक्रिया विचारली असता त्यांनी या नवोदित कविला मार्गदर्शन करताना सांगीतलं की कविता ही आकाशातली विज आहे. ती धरू पाहणारे शेकडा नव्वद टक्‍के लोक स्वतःला होरपळून घेतात. कवितेचा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. "करिअर' साठी कवितालेखाणाकडे वळू इच्छीणा-यांना एकच सांगतो की कविता ही "करिअर' निर्मीतीचं साधन नाही. या विचाराने या प्रांतात येण्याचं धाडस करू नका. कविता एक आनंदाचा सोहळा आहे. सृजनशिल उपक्रम आहे. तो जाणून घेतला तरच परमानंदी टाळी वाजल्याशिवाय राहणार नाही.
गालिब यांच्याकडे एकदा दिल्लीचे शेवटचे बादशहा बाहदुरशहॉं जफर हे त्यांना गुरू करायला आले. गालिबची मनोमन मस्ती जिरवून देण्याचा हेतू होता. येता येता त्यांना गालीबला विचारलं. "जनाब आप एक दिनमे कितने गझल लिखते है?'
यावर गालिब मंद हसले आणि म्हणाले की "भला येभी कोई पुंछने की बात है. ... सुझती है तो लिख लेता हू..वर्णा कभी कभी बरसो गुजर जाते है इंतजार मे... सालो तक कोई भी गझल नही सुझती...'
त्यावर उपहासाने बाहादूरशहा जफर म्हणतो...
"क्‍या बात करते जनाब? हमतो एैसी गझले पैखाने जाकर एक दिनमे बिस पच्चास लिख डालते है!'
त्यावर गालीब मिस्कीलपणे हसून म्हणाले, "इसीलिये आपकी गझलोंसे एैसे बदबु आती है'
तर मित्रहो असा हा कवितेचा मनोरंजक प्रवास आहे. तो जाणून घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला....कविता ही अतिशय नाजूक , तरल आणि संवेदनक्षम असते. तिला तिच्या वेळेस व्यक्‍त होण्यास वाव द्यावा लागतो. संवेदनशिलता हाच कवितेचा "ऑक्‍सीजन' आहे. तो मिळवित असताना सभोवतालचं वातावरण प्रदुषणविरहित करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मग चंद्र असो वा मंगळ ..आपल्या पराक्रमाची पताका आकाशात फडकवित असताना विज्ञानासोबत हातात हात घालून सजिवसृष्टीचा अंश पर्यायाने आपलाच अंश शोधून काढण्यास आपण समर्थ होउ.

                                                                                                * विजयकुमार राउत

शुक्रवार, 2 जनवरी 2015

गझलेसाठी !! : "एक्‍सपायरी डेट'

गझलेसाठी !! : "एक्‍सपायरी डेट':                                                                                                      -विजयकुमार राउत ज्याचा त्याचा एक ...
 
Blogger Templates