माणूस होण्याच्या मार्गातील "उत्कलनबिंदू' तथागत
विजयकुमार राउत
बुद्ध म्हणजे गर्भअंधारयुगात भारतवर्षाला पडलेले एक तेजोमय, स्वयंपूर्ण, सर्वांगसुंदर असे स्वप्न. तथागत म्हणजे संधीकाळात गवसलेले शांती, करूणेचे स्वच्छ, कोरे क्षितीज. तथागत म्हणजे शंभर टक्के अस्सल माणूस होण्याची शाश्वती आणि उपलब्ध असलेली संधी. भारताच्या पदरात असंख्य युगानंतर पडलेला "डायमंड' म्हणजे तथागत. माणसाच्या जगण्याचे एका सुंदर फुलात रूपांतरण घडवून आणणारे एक चमत्कारीक रसायण म्हणजे तथागत. माणूसपण गोठलेल्या मातीत माणूस होण्याची शक्यता होउन सर्वदूर प्रसरण पावणारा सर्वोच्च असा "उत्कलनबिंदू' तथागत भगवान बुद्ध.
खुद्दनिकायाच्या इतिवुत्तकपाळीमध्ये स्वतः तथागतांनी "तथागत' या शब्दाचे स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, हे भिख्खूंनो, तथागत जसे बोलतो, तसे करतो, आणि जसे करतो तसे बोलतो. तो यथावादी तथाकारी, यथाकारी तथावादी म्हणून "तथागत' म्हटल्या जातो. "तथागत' हे बिरूद स्वीकारण्याचा बुद्धांचा जो विचार आहे, तो स्वयंपूर्ण आहे. या शब्दाचा अर्थ समजावून घेताना अधिकाधिक सकारात्मकतेने थोडेसे संतुलीत होउन सैल व स्वैर फुलपाखरासारखे स्वच्छंद व्हावे लागते. परंपराचे अवजड ओझे झिडकारून द्यावे लागते. तेथे आपला "स्व' म्हणजे निरर्थक "इगो'चा तनाव विसर्जित करावा लागतो. मनाचा गोंधळ आणि बडबड शांत करावी लागते. "तथागता'चा अर्थ आहे, जसे आहे तसे पाहणारा, जसे आहे तसे स्वीकारणारा, जसे आहे तसे सांगणारा, आणि जसे आहे तसे वागणारा ! आता हे "जसे' आहे "तसे' म्हणजे याचा नेमका अर्थ तरी काय? ते आपल्या विचार-अविचारंच्या तथाकथीत ज्ञानाच्या कक्षेत बसते काय? "तथागत' या अर्थाने गौतम बुद्ध "मल्टीडायमेंशनल' आहेत, यात वादच नाही. सर्वांत अगोदर आपल्याला आपली दृष्टी, बुद्धी व त्यानंतर इंद्रीयोगोचर जे कमीअधिक अनुभव वाटयाला येतात, त्याकडे निरपेक्ष बुद्धीने बघावे लागेल. त्याचे निर्दोषत्व तपासावे लागेल. आपल्या धारणा ज्या गोष्टींवर अवलंबून असतात, त्याची क्षमता बुद्धत्वाच्या सम्यक ज्ञानावर घासावी लागेल. सर्वप्रथम आपल्याला हे विचारात घ्यावे लागते की आपल्याला दिसते ते सत्य की तथागतांनी म्हटलेले सत्य? तथागत हा शब्दच "डायमेंशनल' आहे. ऑरिस्टाटल, प्लेटो किंवा साक्रेटीसपूर्वी सत्य बुद्धाने शोधले होते.
निसर्गातील वस्तूंबद्दल विश्लेषण करण्याची परिपूर्णता सम्यक ज्ञानातून उपलब्ध होते आणि ती प्राप्तच करावी लागते. येथे ख-या अर्थाने प्रयत्नवादी व्हावे लागते. म्हणून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म विचारवंताच्या दृष्टीने शुद्ध विज्ञानवादी ठरतो.
"सम्यक' म्हणजे balance हा शब्द देणारा बुद्ध हा पृथ्वीतलावरील पहिला आणि शेवटचा ज्ञाता होय. आजच्या काळात balance या शब्दाचे किती महत्व आहे, हे आपल्या जीवनात पदोपदी ध्यानात येते. कट्टर धार्मिकतेच्या काळात एक सम्यक व संतुलित भाषा देणारे बुद्ध म्हणून कोणलाही सहज भावतात. सुख आणि दुःख या केवळ मानसिक अवस्था होत, हे सांगणारा पहिला मानसशास्त्रज्ञ बुद्धच आहे. धर्माचा गवगवा करणा-यांना तो सांगतो की धम्म हे केवळ आपल्या उद्दीष्टपूर्तीचे साधन होय, असे सांगणारा पहिला तत्वज्ञानी बुद्धच ठरतो. विश्व नित्य प्रसरण पावते, हे सांगणारा पहिला वैज्ञानिक बुद्धच ठरतो. आईनस्टाईन आणि "ऍपल'चा निर्माता स्टीव्ह जॉब्जही हे मानतो. बुद्धत्वाला सत्याच्या मार्गात अंतिम आणि अढळ असे स्थान आहे. म्हणून देश, काल आणि परिस्थितीच्याही सिमा ओलांडून दीर्घ काळ बौद्ध धम्म टिकून राहतो. बुद्ध जगात सत्य, अहिंसा व करूणेच्या बळावर स्थायीत्व मिळवितो. बुद्धाच्या जागरूक मार्गाने "निब्बान' अवस्थेपर्यंत पोहचल्यानंतर जीवनाची फलश्रृती होते. बुद्धाला वैशाख शुद्ध पौर्णिमेला ज्ञान प्राप्त होते, यात निसर्गाची भूमीका फार मोलाची ठरते. याचा प्रत्यय आपल्याला एखादा चित्रपट पाहताना येतो. चित्रपटाचा दिग्दर्शक ज्याप्रमाणे कथेला साजेसी पार्श्वभूमी निर्माण करून ते अधिक प्रभावकारी होण्याच्या दृष्टीने वातावरणाचा backgraoundच्या सहायाने दृश्याची उभारणी करतो, तशीच बुद्धाच्या जन्माच्या वेळी निसर्गाने केलेली पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राची योजना सुचक आणि दिशादर्शकच नव्हे तर "क्वॉंटम' दुनियेत खरी ठरते. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर बुद्ध जेव्हा आपल्या पाच सहका-यांना उपदेश करायला वाराणसीकडे निघाले, तेव्हा उरवेला आणि गया या प्रांतामध्ये उपक अनिषक बुद्धाला आश्चर्याने म्हणतो,
तुझी इंद्रीये विशेष प्रसन्न आहेत, तुझी कांती परिशुद्ध आणि उजळ आहे. ज्ञानातून येणारी एक विशेष चकाकी बुद्धांच्या कांतीला तेजस्वीता प्रदान करीत होती. दैनंदिन जीवनात एखादया वेळी काही सुचले की तर आपल्याला कोण आनंद होतो. आपल्या चर्येवर ज्ञानाची कवडसे पसरतात. तसेच बुद्धाचेही झाले. बुद्धाला तर सर्वज्ञान प्राप्त झाले होते. त्यांची अवस्था कशी असेल ! असे म्हटल्या जाते की ते ज्या मार्गाने चालत जायचे, तेथे अवकाळीच "कमळे' फुलायची.
एक साधे सत्य कळायचे असेल तर अख्खे आयुष्य उधळून लावायची तयारी असायला हवी, अशी शिकवण बुद्धांच्या जीवनातून मिळते. सत्य हे "मल्टीडायमेंशनल' असते. त्याला एक नव्हे तर असंख्य बाजू असतात, असे आजचे विज्ञान सांगते. म्हणून बुद्धाला पूर्णपणे समजणे हे कोणालाच जमत नाही. अलीकडे "क्वॉंटम थेअरी' मुळे सगळया विचारधारा भराभर ढासळायला लागल्या. आधुनिक विज्ञान आतापर्यंत केवळ दहा "डायमेंशन'वर पोहचले. इतर देशातील तज्ज्ञ हे समजत आहेत. अडिच हजार वर्षांपासून बुद्धाच्या तत्वज्ञानात कुठेच कमतरता येत नाही. बुद्धांच्या समकालीन असलेले वर्धमान महावीरही मात्र पंचेविस "डायमेंशन' जाणत होते. म्हणून आपण म्हणतो ते सत्य आणि बुद्ध ज्या परिपूर्ण दृष्टीतून मांडतात "ते सत्य' यात जमिन आसमानचा फरक आहे. आपण जे काही बोलत जातो ते अर्धसत्यच ठरतं. व्यक्ती जितकी मोठी, तितकी सर्वसामान्य जनतेची समजण्याची पात्रता कमी, तितके त्यांचे पंथ, उपपंथ अधिक. मतामतांचा गलबला फार. बुद्धांना अडिच हजार वर्षांनंतर कितीही जाणले तरी ते अपूर्णतेकडेच घेउन जाणारे ठरते. बुद्धाच्या मार्गाने प्रत्यक्ष चालण्याचा अनुभव घेतल्याशिवाय आपल्या जीवनाला परिपूर्णता लाभत नाही.
विजयकुमार राउत
8888876462