विजयकुमार राउत अवघ्या 18 वर्षात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा संत ज्ञानेश्वर 700 वर्षापूर्वी होउन गेला, यावर कुणाचा विश्वास बसत नसेल. इवलंस रोप आणि त्याच्या प्रतिभेचा वेलू केवढा? तर गगनाला भिडणारा...सगळया ज्ञात अज्ञात जगताचं कोडं त्यानं आपल्या प्रतिभेच्या उत्तुंगतेतून उघडं केलं, हा वागविलासाचा केवढा मोठा प्रताप ! "मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा' अशी ज्ञानेशाची हळूवार समजूत काढताना लहानगी बहिण मुक्ताई आईची ममता अंगी शिरवून दुनियेची रितभात सांगते. तेव्हा ज्ञानेश्वरासारख्या प्रतिभावंतालाही आपल्या कर्तृत्वाची जाण यायला वेळ लागत नाही. मित्रहो असे "ज्ञानेश्वर' जेव्हा जेव्हा जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या वाटयाला सा-या जगाचा उपहासच येत असतो. हा निसर्गनियमातील विरोधाभास, आणि तो निसर्गमान्य आहे, हेच खरे. उजेडाला व्यक्त व्हायला शेवटी काळोख हवा असतो ! ैहम घरमे जब दीप जलाने लगते है ! घरके अंधेरे शोर मचाने लगते है!! कधी कधी चिंतातूर जंतूचं मात्र हसू येतं. त्यांची शंका अशी की सोळा वर्षाचा कोवळा मुलगा अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी काय लिहितो.....21 व्या वर्षी समाधी काय घेतो.. इत्यादी..इत्यादी..(आमचा घोडया दहावीची परीक्षाही निट पास होत नाही. नापास झाल्यानंतर राजकारण किंवा क्रिकेटशिवाय त्याला काही येतही नाही...म्हणून)कविवर्य गोविंदाग्रजांची शपथ घेउन त्यांची माफी मागतो. असा विरोध करणे हेच चिंतातूर जंतूंचं एकमेव आणि पोष्टीक खाद्य असावं, अशी मलाही नाईलाजाने शंका यायला लागली! कदाचित निव्वळ विरोधावरच या जंतूचं पोषण उत्तमरित्या होत असावं, त्यामुळे त्यांना अनेक युगाचं आयुष्य आहे. जिते रहो...!! सदया असे शंकासुर आणि चिंतातूर जंतूच समाजात युगेयुगे इतिहासाचं उत्खनन स्वतःच्या फायदयासाठी करताना दिसतात. आपल्या आपल्या कुवतीनुसार जातीपातीत संत, महापुरूषांची विभागणी करून त्यांना जातीच्या कोंदनात बसवून पुजा बांधली जाते. मित्रहो, हा देश युवकांचा देश म्हणून सा-या जगात गणल्या जातो. परंतु येथील युवकाचे जगणे खरेच युवकासारखे आहे का? त्यांचे मानसिक वय किती वर्षाचे? असे प्रश्न निर्माण होतात. जी विद्याशाखा पुढे येते, युवक करिअरसाठी मोठया संख्येने त्या शाखेत प्रवेश घेतात, ती विद्याशाखा कालांतराने बेरोजगार करण्याइतकी पांगळी कशी काय होते, हेच कळत नाही. कुठलीही विद्याशाखा विस्ताराने खुप मोठी असते. तिथपर्यंत िंकंवा तिच्या आसपासही आपण पोहचू शकत नाही. आपण आपल्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर त्या शाखेला अधिकाधिक समृद्ध करू शकतो, हे आमच्या गावीही नसते. म्हणून नवनविन संशोधनावर काय फक्त पाश्चात देशाचीच मक्तेदारी असावी? ज्या समाजात प्रतिभावंत शास्त्रज्ञ , विचारवंत, कवी, कलावंत, खेळाडू जन्माला यायला हवेत, त्या समाजात जास्तीत जास्त संख्येने आता केवळ आणि केवळ "एकसारखे'च जन्माला येताहेत. जागोजागी मेंढराचे कळप तयार होताहेत. म्हणून आजचे "ज्ञानेश्वर' बेरोजगार होउन गल्लोगल्ली भटकताना दिसतात. त्यांच्या हाताला काम नाही. पुस्तकांच्या ठिकाणी मोबाईल आला आणि आमचे "ज्ञानेश्वर' आज फेसबुक, व्हॉटस् ऍपवरून आपल्या कर्माच्या सुसाट ओव्या लिहित सुटले आहेत. या नवीन ऍप्सवरून नवीन नवीन अफवांचे पिक घेण्याचा मौसम अनुकूल होत आहे. नवनवीन शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या फायदयासाठी एखादया विषयावर "जावई शोध' लावून एखादयाच्या चारित्रयावर शिंतोडे उडविण्यातच सगळी उर्जा वाया घालविली जात आहे. कट्टयावर बसून फालतू चर्चांत वेळ दवडू लागले आहेत. संशोधनाची अनेक क्षेत्र पादाक्रांत करण्याऐवजी "कॉपी पेस्ट' करून त्यात "मास्टरकी' मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात पुस्तकांची आवड कमी झाल्यामुळे मोबाईलवर "गेम' खेळून आपल्याच जीवनाचा"गेम' करण्याकडे आपला "इस्ट्रेस्ट' वाढत आहे. पुस्तकाला "गुगल' हा पर्याय असूच शकत नाही, असे शहाणीसुरती माणसं म्हणतात. आपली विज्ञानाविषयीची समजूतही फारच बाळबोध. शाळेत शिकत असताना जेवढे विज्ञान आपण आत्मसात केले त्यापुढे काकणभरही न सरकण्याची शपथ आपण शिक्षण पूर्ण होताच घेउन टाकतो. सदयाच्या काळात विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. त्यापैकी आपल्याला काय माहिती आहे. नवनवीन संशोधनांची शिखरे क्षणोक्षणी पादाक्रांत केल्या जाताहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादालाही "क्वॉंटम थेरी'तून चॅलेंज मिळत आहे. अख्खे जीवनाचे संदर्भ बदलून टाकणारा अतिवेगवान क्वॉंटम कॉम्प्यूटर जन्मास येत आहे. भविष्यकाळात भौतीक शास्त्रातील अनेक सिद्धांत "ब्लॅक होल' किंवा कृष्ण विवरांमुळे मोडीस निघतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. तरीही आपण मात्र वैज्ञानिक अहंकार जोपासतो आहोत. विज्ञानाचा अहंकार सांगून आपले "पुरोगामित्व' पुढे करण्याचा नवीन अंधविश्वास तयार होत आहे. मुळात बदलण्यापेक्षा अहंकार जोपसणे आपल्याला महत्वाचे वाटते. परंतु शास्त्रज्ञ मात्र आम्ही शून्य पॉईंट शून्यावर आहोत, अजून काही ठामपणे सांगू शकत नाही, असे प्रामाणिक कबुल करतात. थोर शास्त्रज्ञ न्युटनला एकदा त्याच्या मित्राने विचारले की, तू हे सर्व शोध कसे काय लावतोस ? त्यावर न्युटन उत्तरला की मी महासागरातील अथांग पाण्यातील एक थेंब आहे. मी माझ्या मोकळ्या वेळात येशु ख्रिस्ताचे चिंतन करीत बसतो. आम्ही शास्त्रज्ञ शोध कसे लावले सांगू शकत नाही. आम्ही केमीकलमध्ये केमिकल मिसळतो. वायरला वायर जोडतो व त्या निष्काम प्रयत्नातून अचानक आमच्या डोक्यातून वीज चमकल्यासारखा लख्खकन प्रकाश पडतो व नकळत आमच्या हातून शोध लागून जातो. पण या क्रियेच्या पाठीशी एकमेव ईश्वर असतो, असे न्युटन म्हणतो तेव्हा आमच्या बुद्धीची किव करावीसी वाटते. अलीकडे शे-दिडशे वर्षापूर्वी जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्याचे मुळ ज्ञानेश्वारीत सापडते, म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. सुर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सुर्याभोवती फिरते. हा शोध कोपर्निकसने दिडशे वर्षापुर्वी लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोध असल्यामुळे धर्ममार्तंडांनी त्याचा छळही केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सुर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीत सातशे वर्षापुर्वीचे पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. आणि उदो अस्तुतेनि प्रमाणे। जैसे न चालता सुर्याचे चालणे। तेसे नैष्कर्मत्व जाणे। उदय आणि अस्त होत असल्यामुळे सुर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सुर्याचे न चालता भ्रम निर्माण होणे हा ज्ञानेश्वरांचा क्रांतीकारक शोध नाही का? असे ज्ञानेश्वर पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत. तेव्हाच आम्ही "आता विश्वात्मके देवे, येणे वागज्ञे तोषावे' अशा पसायदानातून सा-या जगात विश्वाचा महागुरू होण्याचे स्वप्न उराशी बाळगू शकतो. म्हणून ज्ञानेश्वरांवर टिका करणा-यांनी ते आपल्या गोड भाषेत काय सांगतात, याकडे लक्ष द्यावे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आईवडिल कसे असावेत, हे माझया हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो. मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दुःख करीत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे, त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल ती संधी मी गमाविता कामा नये. विजयकुमार राउत 8888876462 |
-