* विजयकुमार राउत
सायंकाळी कळले मजला, वहीत पाने उरली नाही
किती जणांनी लिहिली कविता, अजून कविता सरली नाही !!
भाऊंचे जाणे मनातील आसमंतात काळाभोर अंधार पेरून गेले. कोण जाणे ! काही माणसं अशीच असतात आपल्या अवतीभवतीच्या अस्तित्वाला सुन्न करून जाणारी. वातावरणात निःशब्दता पसरून पलिकडच्या प्रवासाला निघणारी. भाऊंचे जाणेही भली मोठी पोकळी निर्माण करून गेले. कवितेतील त्यांची "भाईगिरी' थेट व्यवस्थेलाच हलाल करून जाणारी, तर कवितेतला "भाऊ' मात्र संपर्कातील माणसांना बंधुत्वाचा साक्षात्कार घडविणारा. अबे, नालायक, हरामखोर, मुर्ख आणि अशा कितीतरी शिव्या त्यांच्यावर प्रेम करणा-या माणसांना ऐकणेच भाग पडायचे. नंतर मात्र भाउंच्या वागण्यातून समोरच्या व्यक्तींबद्दलचा त्यांच्या मनातील प्रेमाचा झरा नुसताच कोसळत राहाण्याचा अनुभव माझयासारख्या नवख्या माणसांना अनेकदा आला. कविवर्य सुरेश भटांशी त्यांची "केमिस्ट्री' तंतोतंत जुळताना मी पाहिली. पृथ्वीवरच्याच अज्ञात बेटासारखी ही माणसं कुणाला कळतच नाहीत. भाउंचे जाणेही असेच न कळणारे....
व्यवस्थेच्या छाताडावर बेधडक चढून क्रांतीचे गीत गाणारा "जिंदादिल' भाउ खरा माणूस, खरा गझलकार आणि खरा मित्र. आंबेडकरी कवितेच्या पानांवर त्याने निळया अक्षरात नेहमीसाठी आपली स्वाक्षरी कोरून ठेवली. सुप्रसिद्ध गझलकार नीलकांत ढोले यांच्याकडे आल्यानंतर भाउ सगळयांच्या मनावर बेमोसमी पावसासारखा धो-धो बरसायचे. कुटूंबातील सगळयांवर त्यांचा लडा. थेट स्वयंपाकघरातही त्याच्या पावलांची दणदण ऐकूण कविवर्य ढोलेंचं अख्खं घर गझलमय झालेले मी पाहिलं. जगण्यातील तत्वज्ञान ते बेमुर्वतपणे मांडायचे. भाउंच्या वागण्यांतून बुद्धाचे सौंदर्यशास्त्र स्पष्ट झळकायचे, तर बोलण्यातून आंबेडकरी क्रांतीच्या धगधगत्या ज्वाला. कविता आणि जगणं त्याच्यापासून वेगळे नव्हतेच कधी. म्हणून लिखाणातून व्यक्त होताना हातचं काही लपविले नाही. कुणाचीही भिडमुर्वत केली नाही. ते लिहिता लिहिता शब्दांत जगत गेले. आंबेडकरी साहित्यात त्यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले असले तरी ते माणसांच्या दुनियेतला "धृवतारा'च होते.
या गावातील बेमानांना, किती उशीरा कळले होते !
आम्ही जळलो तेव्हा कोठे, त्यांचे गाव उजडले होते !
फक्कडपणे बोलणा-या भाउंच्या शब्दांत एखाद क्षणी मला "दर्द' दिसायचा. भाउंच्या जगण्यातील बेफिकीर वृत्ती बोलण्यातून झळकायची. स्वभावातील दोन्ही पैलू टोकाचेच...एक प्रेमाचा तर दुसरा ताडामाडासारखा कठोर. "विजू, याले समजाउन सांग ... तुहया पोराचं नाव दिक्षांत कशाला ठेवतोस? दुसरं काही शोध...' असाच काहीसा सल्ला देउन जाणारा...आणि ह्रदयनाथ मंगेशकरांनी "उषःकाल होता होता' भटांच्या या गीताला लावलेली चाल आवडली नसल्याचं मित्रांमध्ये स्पष्ट बोलणारा.. " निलू, आता घरी गेलं पाहिजे यार...' असं म्हणत एखादया नटखट बालकासारखं कविवर्य ढोलेंच्या गालाचे चुंबन घेउन स्कुटरला "किक' मारून निघून जाणारा आमचा लाडका "भाई' आता पुन्हा कधीच दिसणार नाही.
* विजयकुमार राउत
8888876462