शनिवार, 19 जून 2021
मंगलवार, 1 जून 2021
बुद्धाची करुणा हवी, करोना नको !
करोना या महामारीने संपूर्ण जगाला हादरुन
सोडले आहे. एखाद्या सूक्ष्म, अदृश्य, विध्वंसकारी शक्तीने मानसाला वेठीस धरून
संपूर्ण जगाला नकोसे करुन सोडावे, चंद्र आणि मंगळावर पोहचलेल्या माणसाल हतबल करुन
सोडावे, पाहता पाहता जगण्याचे सर्व संदर्भ बदवून टाकावे इतकेच नव्हे तर उपचाराअभावी
माणसाची केविलवाणी अवस्था करुन टाकावी, अशा विपत्तीच्या वेळी माणसापासून माणूस दूर
व्हावा, माणसाच्या ताटातली त्याच्या श्रमाची भाकर खाण्याचा हक्कही हिरावून घ्यावा,
आपला जिवाभावाचा माणूस आपल्यापासून निदर्यतेने कोणीतरी हिरावून न्यावा, लॉकडाउनच्या
कोंडीत त्याचा श्वास निघेपर्यंत कोंडून घ्यावे, पोटाची भूक अस्वस्थ करेपर्यंत पाय
घासून मरायला भाग पाडावे, कोरोनाचा संसर्ग होताच त्याला जगापासून तोडून जीव
निघेपर्यंत त्याच्या मरणाची प्रतीक्षा केल्यानंतरही मृत्यूच्या क्षणी मात्र
त्याच्या चितेला स्पर्श होण्यापासून त्याच्या प्रिय जणांना रोखण्यात यावे, त्याच्या
कलेवराचे अंतीम दर्शन करु न देण्यापर्यंत सगळे एकापेक्षा एक कटू अनुभव या
मानवजातीने गेल्या वर्षभरात घेतले आहेत. करोनाची पहिली लाट थोडी ओसरल्यानंतर दुसरी
लाट पहिलीपेक्षा भयंकर अनुभवास मिळाली. त्यानंतर तिसरी, चौथी, पाचवी, सहावी आणि अशा
किती लाटा नशीबात पेरून ठेवाव्या, याचे उत्तर आजतरी कोणाचजवळ नाही. त्याच्या
संसर्गावर कोठला उतारा काम करेल, याचे उत्तरही सद्या कोणत्याच विज्ञानाजवळ नाही.
अशा भयंकर महामारीला आळा घालेल, असा कोणताच उपाय नसल्यामुळे मानवाच्या मर्यादाही या
महामारीसमोर स्पष्ट झाल्या आहेत. अशा अंधारलेल्या सद्याच्या जगात शेकडो
वर्षांपासूनची तथागताची ‘करुणा’च सगळ्या विश्वाच्या अस्तित्वाला पुरुन उरली आहे.
गेल्या अडीच हजार वर्षात अशा कितीतरी महामाऱ्या या जगाने अनुभवल्या आहेत. काही
मानवनिर्मित संकटे, काही नैसर्गिक संहार या आणि अशा संकटांनी सत्यावर बेमुर्वतपणे
हल्ला चढविल्याचा इतिहास आहे.
मित्रहो, अडीच हजार वर्षाचा कालावधी काही
थोडाथोडका नव्हे. इतक्या वर्षात अनेक वादळे आलीत आणि गेलीत. परंतु तथागतांची करुणा
मात्र माजही अख्ख्या विश्वावर मायेची पाखर घालते आहे. माणूस कितीही बुद्धीमान झाला
तरीही ही ‘करुणा’च त्याच्या मदतीला धावून आली. ही करुणाच जगण्याचा आधार ठरली. या
करुणेनेच सगळ्या दुनियेला जवळ केले आहे. एवढी मोठी महामारी आल्यानंतरही ही ‘करुणा’च
मदतीचे रुप घेउन मानवाच्या मदतीला आली. एवढी निष्ठूरता असतानाही वाळवंटात पाण्याचा
झरा मिळावा तसे करुणेचे शिलेदार माणसांच्या मदतीला धावून आल्याचे दृश्य अवतीभवती
दिसले. जशी वेळ आली, जशी गरज भासली तसतसी ही
मंडळी कसलीही अपेक्षा न करताना माणूसकी जपायला पुढे आली. कुणी अन्नधान्याच्या किट्स,
कुणी ऑक्सिजन सिलिंडर, कोणी रुग्णवाहिकेतून गंभीर रुग्णाला ने-आण करणे, स्थानिक नेत्यांनी कोविड सेंटरच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे आदी मदतीची कामे जीव धोक्या घालून पार पाडली. यातून करुणेचे दर्शन महामारीच्या काळोखाने झाकोळले गेले असले तरी मानवी मनातील ‘करुणे’ची ताकद मात्र पुन्हा नवे जग, नवीन आशा निर्मितीचे बळ ठरणार आहे. सोशल डिस्टनसिंग, होम क्वॉरंटाइन, आयसोलेशन, ऑक्सिजनची गरज, म्यूटेशन, इम्यूनिटी पॉवर यासारखे अनेक शब्द नव्यानेच कानावर पडले. त्या त्या शब्दांची गरज जाणिव निर्माण करुन गेली. परंतू त्याचबरोबर ‘करोना’ या शब्दसाधर्म्यामुळे ‘करुणा’ या महाशब्दाला कमीपणा आणण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, असा क्षणभर भ्रम निमाण व्हावा, अशी स्थिती आहे. परंतू कितीही झाले तरी शेवटी ‘करुणे’चाच विजय होईल हे नक्की.
यानंतरही असाच संकटांचा सामना आपल्याला करावाच लागणार आहे, ही खुणगाठ मनाशी बांधून आपल्याला आपल्या कुटुंबाला हा प्रवास करावाच लागणार आहे. बुद्धांच्य करुणेला शरण जाऊन मानवामागे लागलेल्या या करोनारुपी राक्षसाला पराभूत करावेच लागेल. त्यासाठी थोडे धैर्य ठेवावे लागेल. संपूर्ण जगाला ‘महाकारुणिक’ तथागतांनाच शेवटी शरण जावे लागणार आहे. नमो बुद्धाय !!