Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 9 फ़रवरी 2017

अक्‍कल नाय? डोन्ट वरी.....


                                                                                                                 *विजयकुमार राउत
अक्‍कल नावाची काही गोष्ट आहे का तुझयाकडे? थोडी अक्‍कल तर वापरत जा ! परमेश्‍वराने अक्‍कल वाटली तेव्हा कोठे होतास रे?अशी वाक्‍ये नेहमीच्याच परिचयातली. अक्‍कल म्हणजेच सर्वस्व. थोडी चूक झाली की अक्‍कलेत कच्चे असलेल्यांना अक्‍कलवानांकडून टोमणे खाणे ठरलेलेच. बरं जो अकलेवरून इतरांना कमी लेखतो त्याने किती अकलेचे दिवे पाजळले याचा हिशेब मागायचा कोणी? काही जण दिवसरात्र "अकलेचेच तारे' तोडत बसतात. मित्रहो, सचिन तेंदुलकरने कुठली डिग्री घेतली? टाटा, धीरूभाई अंबानीनी कुठल्या "एमबीए'त गोल्ड मेडल मिळविले ? लता मंगेशकर यांनी गायनात कुठल्या विद्यापीठातून "पीएचडी' केले. देशविदेशात प्रत्येक मैफलीत "वाह उस्ताद' ही दाद घेण्यापूर्वी उस्ताद जाकीर हुसेन यांनी कुठल्या कॉलेजमधून "मेरीट' घेतले नाही. अशी अनेक उदाहरणे मिळतील. मग आपल्याजवळ "ती' नसली तर काय बिघडतं? असं कदाचित अक्‍कलशून्य माणसाला एखादवेळेस वाटू शकेल. परंतु अकलेच्या महाभागांना मात्र दुस-याजवळ नसलेल्या कुठल्यातरी नेमक्‍या अकलेबद्‌दल मरदुमकी वाटत असते आणि मग त्याच्या बुद्‌धीमत्तेवर अगदीच तोंडसुख घेणे म्हणजे शहानपणा समजतात. अक्‍कल नसली तर समाजात जगणंच अशक्‍य. बरं अक्‍कल आहे किंवा नाही हे कोणी ठरवावं?
बरं आज बुद्‌धीचे मापन करणा-या "आयक्‍यू'सारख्या "टेस्ट' खूप मागे पडल्याचे दिसून येते. एखाद्या क्षेत्रातील जेमतेम ज्ञान असणे आता "आउटडेट' होत आहे. आता नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. ज्ञानविज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक विस्तारीत होत आहेत. शैक्षकि मानसशास्त्रात आणखी नउ बुद्‌धीमत्ता जोडण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस नवनविन संशोधनातून पुढे येणा-या बाबीनुसार आता बुद्‌धीच असून चालत नाही. केवळ बुद्‌धी आणि बुद्‌धीच्या भरवशावर जगणारे पदोपदी मागे पडताना दिसतात. जुन्या संकल्पना नव्याने तपासून बघीतल्या जात आहेत. जुन्याला नवीन संकल्पनांची जोड देण्यात येत आहे. या संकल्पना नविन चष्म्यातून पाहण्यात येत आहेत. एवढच काय ते नाविण्य ! एरवी भारतासारख्या देशात या संकल्पना खूप खूप वर्षापूर्वीही होत्याच, हे आपण जाणतोच. या देशात तथागतांच्या बाबतीत "महाकारूनिक' आणि भगवान शंकराच्या बाबतीत "करूणावतारम' म्हटल्या जातं. "थर्ड आय' आणि "सम्यक ज्ञान' या अगदी समान संकल्पना. समाजातील असामान्य माणसं केवळ बुद्‌धीच्या भरोशावरच पुढे गेलीत का, याचा कित्येक दिवसापासून आढावा घेतला. असं लक्षात आलं की ज्या निसर्गानं आपल्याला मेंदू , ह्रदय यासारखी इंद्रीये दिली, त्याचा वापर कशासाठी करायचा? प्रत्येकाचं एक मर्यादित क्षेत्र आहे. प्रत्येकाचं कामही वेगवेगळं आहे. " IMGINATION IS GRATER THAN KWOLADGE* असं म्हणणारा असामान्य बुद्‌धीमत्तेचा धनी असलेला अर्ल्बटही आईनस्टाईनही काहीसं हेच सांगतो.
काल परवापर्यंत शाळेत पहिल्या बाकावर बसणारा मुलगाच "स्मार्ट' समजल्या जायचा. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमधील निसर्गरम्य ठिकाणी मातीत खेळणारे विद्यार्थी असोत नाही तर अमिर खानच्या "तारे जमिनपर' चित्रपटातील मंदबुद्‌धी समजला जाणारा विद्यार्थी. मंदबुद्‌धी म्हणून शाळेतून काढून टाकलेल्या "न्यूटन'चेच उदाहरण घ्या. या देशात महान प्रतिभेचा शोध घ्यायचा असेल तर शेवटच्या बाकावरून घ्यावा लागेल, असे वक्‍तव्य डॉ.अब्दुल कलाम करतात,
"आयक्‍यू' सोबत आता तुमच्यात "ईक्‍यू' भावनिक बुद्‌धीमत्ता त्याचबरोबर "एसक्‍यू' आध्यात्मिक बुद्‌धीमत्ता नसेल तर बौद्‌धीक बुद्‌धीमत्ता कामाचीच नसल्याचे सिद्‌ध होत आहे. व्यक्तीच्या विकासात तार्किक बुद्धीइतकंच भावनेचंही महत्वव पुढं लक्षात येऊ लागलं आणि त्यातून भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमन यांची संकल्पना पुढं आली. "इ' म्हणजे एनर्जी आणि मोशन म्हणजे गती यातून "इमोशन'शब्द आला. व्यक्‍तीच्या अवचेतन मनातील विचारांना सकारात्मक भावनांची जोड दिली तर स्वप्नांनासुद्‌धा पाहिजे तो आकार देता येतो, हे आजवरच्या महान प्रतिभावंताच्या कृतीतून दिसून येते. परंतु एवढयावरच संपले नाही तर आणखी एका बुद्‌धीमत्तेची गरज निर्माण झाली. त्याच्यापाठोपाठ गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर बहुविध बुद्धिमत्ता ही हॉवर्ड गार्डनर यांची संकल्पना शैक्षणिक मानसशास्त्रात प्रचारात आली. या सगळ्या घडामोडींनंतर बुद्धिमत्तेच्या नऊ वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार सुरू झाला. त्याचबरोबर "एसक्‍यू'ही नव्याने आलेली संकल्पना सदया अख्ख्या जगात रूळली आहे. डॅना झोहर, सिंडी विगल्सवर्थ यासारख्या अभ्यासकांनी आध्यात्मिकता हा विषय केवळ धार्मिक अथवा तात्विक स्वरूपाचा नसून, मानसशास्त्रीय असल्याचं सांगून त्याला प्रायोगिक मानसशास्त्राचा आधार दिला. त्यासंबंधीच्या मेंदूविषयक संशोधनाची जोड दिली आणि त्यातून माणसाच्या आध्यात्मिक वृत्तीचा शास्त्रशुद्ध वेध घेतला.
लता मंगेशकर, पं.जसराज, झाकीर हुसेन, सत्यजित राय, एम एफ हुसेन आदी कलाकारांच्या बुद्धिमत्तेची जातकुळी वेगळी असते. मॅराडोना, सचिन तेंडूलकर, सायना, आनंद इत्यादी क्रीडापटूंची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता या प्रकारात मोडते. काहींना नाते-संबंध, मैत्री जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची कला अवगत असते. इतर काही आपल्या संभाषण चातुर्यातून वा प्रसन्न व्यक्तिमत्वातून कुणालाही आत्मसात करू शकतात व आपला कार्यभाग उरकून घेतात. काही जण व्यवहारकुशल असतात. अशा प्रकारे बुद्धिमत्ता या शब्दात समस्यांचे विश्‍लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य, संगीत इत्यादी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य व क्रीडाक्षेत्रात नाम कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल. भावनिक बुद्‌धीमत्ता वाढविण्यासाठी उत्तमोत्तम साहित्य वाचणे, संगीत ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे यासारखे छंद जोपासता योत. प्रत्येक माणूसच संवेदनशिल असतो. परंतु त्याला आपल्या भावनांना निकोप बनविणे सहसा जमत नाही. भावनेच्या आहारी जाउन तो स्वतः कमकुवत करीत असतो. चित्रपट, नाटकातून अभिनय करणारा कलावंत काय करतो? भूमीकेत शिरून आपली भावनिक बुद्‌धीमत्ता पणाला लावूनच तो यशस्वी होत असतो. कला क्षेत्र भावनिक भूक भागविण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यानंतर अध्यात्मिक बुद्‌धीमत्ता कुठल्या धर्माशी जोडत नाही, तर आपले आपल्याशीच, आपल्या अस्तित्वाशी जोडत असल्यामुळे व्यवहारासोबतच जीवनातील प्रत्येक प्रसंगात यशस्वी होण्याचा मंत्र देते. प्रत्येक व्यक्‍ती काही ना काही वैशिष्टये असतात. ती शोधली तर आपल्याच "विक प्वाईंट'वर स्वार होउन यशाच्या दिशेने पुढचा प्रवास करता येतो. म्हणून आपल्याकडे काहीच नाही...म्हणून कुढत बसण्यापेक्षा तुमच्यातील उत्तम, सर्वोत्तम शोधले तर तुम्हीही जगात अप्रतिम होउ शकता. हे केवळ मी सांगत नाही, तर अलीकडचे संशोधन सांगते.
gazalesathi.blogspot.com
 
Blogger Templates