* विजयकुमार राऊतकवितेतील लय गमाविणे म्हणजे आपल्या शुद्ध मनाचे तंत्र बिघडून बसणे. आपण जन्मतो तेव्हा हे तंत्र घेउनच जन्माला येतो. परंतु जसजसं आपण मोठे होत जातो.. तसे तसे मनाने खोटेही होत जातो आणि छोटेही. हळूहळू बाहेरचा गोंगाट कानात वाढत जातो. आपण आपली लयबद्धता हरवून बसतो. एक वेळ अशी येते की आपण स्वतःला निसर्गाच्या एकंदर व्यवहारापासून खुप दूर नेउन ठेवतो. मग कालांतराने पुन्हा सर्वसामान्य माणूस शेवटी हतबल झाल्यावर हरविलेल्याचा शोध घेण्याच्या फंदात पडून "हे' ना "ते' बरे म्हणत निसर्गाचा शोध घेण्यासाठी सहलीला जातो, देव दर्शनासाठी शेकडो किलोमिटरची यात्रा करीत तिर्थस्थळांना भेटी देतो. हे सगळे उपद्व्याप केले तरी त्याच्या मनाला शांती मिळत नाही. हो, फक्त तो इतरांना दाखविण्यासाठी शांत असल्याचं पदोपदी नाटक करीत असतो. जीवन जगण्यात व्यस्त असताना तेव्हा खूप खूप भानगडी करीत असतो. त्याला तेव्हा जीवनातील काव्याचा शोध घेण्याचं अजिबात भान नसतं. कविता म्हणजे फालतू उद्योग म्हणून तो हेटाळणी करतो. मग जीवनाच्या शक्तीहिन टप्प्यावर त्याला "कविते'चा किंवा अन्य कलांचा शोध लागतो. कुणी सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्य कसं जाईल, याचा विचार करीत या धंदयाला जवळ करतात. त्यातील अनेक जण "रसिक' होण्याच्याच खर्चिक भानगडीत पडत नाही. कारण ते फार परिश्रमाचे असते. काही चांगल्या कविता, चांगले कवी न वाचता.. "डायरेक्ट' कवी होण्याची सोय असल्यामुळे कविंचं अमाप पिक समाजात वाढीला लागले आहे. मग त्यांना शब्दांची हगवण लागण्याचाच धोका अधिक असतो. या देशात एक चांगलं आहे की कवडीचं वाचन, मनन न करताही विद्वान होता येतं. कवितेची घसरण करण्यात त्यांचाच मोठा वाटा असल्यामुळे वर्तमानपत्रातूनही कविता आता आपली जागा गमावून बसली आहे.कविवर्य सुरेश भटांना "मेंदीच्या पानावर'....सारख्या अनेक कविता पूर्ण करण्यासाठी खूप वर्षे वाट पहावी लागली, हे सत्य आहे. "उचलला पेन की लावला कागदाला..' आणि मग तेच रसिक या तथाकथित कविंना "सुंदर, अप्रतिम' म्हणत त्याला बिघडविण्याचा जिवघेणा खेळ खेळतात. दोघेही एकमेकांशी ठोकून देण्याचा धंदा करतात. ते कवी महाशयांच्या लक्षात येत नाही. कविता वर्तमानपत्रात छापून येण्याची लायकी नसलेलेही मग गल्लीतले एका रात्रीतून महाकवि होतात. त्यासाठी धन्यवाद "फेसबुक' आणि त्याच्या सोशल भावंडांचा. कविता ही साधना आहे. ती तपश्चःर्या आहे. ती फुलत, बहरत जाण्याची अखंड प्रक्रिया आहे. तिला खूप वेळ द्यावा लागतो. त्यात संयम, समतोल, जगण्यावरचा विश्वास आणि सगळयात महत्वाचं की आतली लय ऐकण्याची सवय महत्वाची आहे. एक उर्दू कवि म्हणतो की.... गझल मे बंदीशे, अल्फाजही नही काफी जिगर का खूनभी चाहिऐ असर के लिये !! तंत्र गवसले की आपण नैसर्गिक लयीशी एकरूप होतो...निसर्गाला बनवेगीरी चालत नाही. म्हणून केशवसुत कवितेला आकाशातील विजेची उपमा देतात. लय सापडणे म्हणजे आपण आपल्याला गवसणे... बाकी कितीही लिहिले तरी त्यात काव्य नसून ती कवितेची केवळ टरफले असतात. ते असतात फक्त "ट' ला "ट' जोडण्याचे फालतू उद्योग ! "टाईमपास' म्हणून उचललेली लेखणी अखेर जीवनाला अर्थहिन बनविते. एकंदर आपल्या अस्तित्वाची तहान लागणे आणि त्याचा सतत ध्यास घेणे म्हणजे जीवनातील कविता शोधणे होय.......!! * विजयकुमार राऊत | |||
-