* विजयकुमार राऊतजगात ज्या गोष्टी दिसतात, त्या एक दिवस संपणारच असतात. कारण त्या कालौघात नष्ट होण्यासाठीच जन्माला आलेल्या असतात. कुठलीही गोष्ट नित्य नसतेच. जगातील सगळया गोष्टी अनित्य असल्याचे भगवान बुद्धांनीही म्हटले होते. भौतिक यशाचेही तसेच असते. आपल्या यशाचे गणितच मोठे विचित्र असते. आपण मिळविलेले यश चुकीच्या समजूतींवर आधारित असल्यामुळे अपयशानंतर यश, पुन्हा यशानंतर अपयश अशा वर्तुळात आपल्या जीवनाचे मार्गक्रमण होत असते. स्पर्धेतून आलेले यशच प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. कारण ते मोठया कष्टानं मिळालेले असते. ते मिळविण्यासाठी आपल्या अस्तित्वाचा कस पणाला लावलेला असतो. इतरांशी संघर्ष करीत आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहचलेले असतो. साम, दाम, दंड, भेद या नितीचा वापर करून विजयश्री आपल्या पायाशी लोळण घालत असते. आज तर स्पर्धा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मित्रांनो, दुस-याच्या पराभवाच्या इमारतीवर जर तुमचं यश उभं राहात असेल तर असं यश तुम्हाला आवडेल का? अनेकांच्या शारिरीक, मानसिक, भावनीक कत्तली करून मिळालेले यश मला आनंद देत असेल तर त्या यशाला काय म्हणावं? हे क्षणिक समाधान मला कायम पुरणार आहे का?जगाच्या व्यवहारात आपण केलेली स्पर्धा स्वतःशी निकोप नसते. आपण कळत न कळत दुस-याशीच स्पर्धा करीत असतो. परंतु मित्रांनो, दुस-याशी तुलना करून स्वतःला कमी अधिक जोखू नये. ख-या अर्थानं त्याचा काहीच उपयोग होत नाही. जसं मी माझया दुःखास कारणीभूत आहे, तसाच माझया अपयशास दुसरा कोणी जवाबदार राहू शकतो का? परंतु आपणं सगळंच अगदी विरूद्ध दिशेने जगत असतो. आपलं यश हे दुस-याचा पराभव करण्यावर अवलंबून असतं. म्हणून ते टिकाउ नसतं. पूर्ण काळ सुख देणारं नसतं. दुस-याला कुठल्याही स्थितीत पराभूत करून स्वतःच्या विजयाचा झेंडा मिरविणे यालाच आपण यश म्हणतो. हे यश दिखावू असतं. इतरांनी माझं वर्चस्व कबुल करावं यासाठी या यशाचा उपयोग करता येतो. या विजयाला मिरविण्यासाठी आपल्याला इतरांचं प्रमाणपत्र लागतं. दुस-याचा पराभव करणे म्हणजे एक प्रकारची मानसिक हिंसाच असते, हे सांगतं ते अध्यात्म. जगज्जेता सिकंदर, हिटलर किंवा सम्राट अशोकाचे काय झाले? यांनी तर अमाप यश संपादीत केले होतं ना ! परंतु शेवटच्या क्षणी अख्खं विश्व जिंकूनही ते पराभूत का झाले? कारण त्यांच्या यशापयशाच्या संकल्पनाच मुळात नैसगिक नव्हत्या. त्या एकंदर मानवतेच्या विरोधात होत्या.चिनी तत्वज्ञ लाओत्सेला कुणीतरी विचारलं की, आपण नेहमीच म्हणता की कोणीच मला हरवू शकत नाही. ते कसं काय? यावर लाओत्सने उत्तर दिलं की मला कुणीच शेवटपर्यंत हरवूच शकत नाही. कारण मी कुणाशीच स्पर्धा करत नाही. मी अशा ठिकणी बसतो की जेथून मला कोणी उठ म्हणत नाही. त्यामुळे कुणालाच अडचण होत नाही आणि मी माझया जागेवर कायम असतो.आपण अध्यात्माला धार्मिकतेच्या जोखडात बंद केलं असल्यामुळे चुकीच्या संकल्पना तयार होत गेल्या. या जगात अध्यात्म हे माझयासाठी नाहीच, असं ठाम मत बनतं. भगव्तगीता, महाभारत किंवा ज्ञानेश्वरी, वेद-उपनिषद आदी ग्रंथ हे केवळ पुजेसाठी नसतात. त्या ग्रंथातून जगण्यातील सर्व तत्वज्ञान मांडलेलं असतं. मानवतेचं दिशादिग्दर्शन त्यात मिळतं. परंतु आपण प्रतिकांत अडखळतो. म्हणून तर आपण सत्यापर्यंत पोहचू शकत नाही. "आय विल चेंज, डे बाय डे' असं म्हणत कालच्यापेक्षा आज मी किती उत्तम झालो, हे सांगायला दुस-याची गरज नसते. तिथे आपणच न्यायालय असतो आणि आपणच आरोपी. आज मिळालेल्या भौतिक यशाच्या मिरवणूकीचा बाज जर लोकांच्या नजरेत भरणारा असला तरी हा बाज आपला माज उतरवून केव्हा बर्बाद करेल हे सांगता येत नाही. कारण सृष्टीचा नियमच परिवर्तनाचा असतो. आज आहे ते उद्या नाही. जीवन एका वर्तुळाकार गतीने चालत असते. कधी पाण्यावर नाव तर कधी नावेत पाणी, असं वर्तुळ नको असेल तर स्पर्धेची दिशा बदलायला हवी. स्पर्धा बहिर्गम असली तर ती एक दिवस अपयशात परिवर्तीत होणारच. इतरांच्या नजरेत भरणारं यश हे एक दिवस संपणारच.. मग सदासर्वकाळ तुम्हाला यश हवं असेल तर अंतर्मुख होउन स्वतःशी स्पर्धा करायला शिकलं पाहिजे. मग मनावर विजय मिळविणा-या यशस्वी माणसाचे यश कधी कुणाला दिसणारं नसतं. कारण ते पाहण्याइतकी सर्वांची दृष्टी परिपक्व झालेली नसते...त्या यशाला कधीच मरणही येत नाही.* विजयकुमार राऊत | |||
-