Social Icons

चल खोदूया, चंद्राचा तळ, गझलेसाठी!! तिथे मिळावे, पाणी निर्मळ, गझलेसाठी!!

गुरुवार, 23 मार्च 2017

डोळे उघडा "वि'ज्ञानेश्‍वरा !


विजयकुमार राउत

अवघ्या 18 वर्षात ज्ञानेश्‍वरी सारखा ग्रंथ लिहून जगण्याचे तत्वज्ञान सांगणारा संत ज्ञानेश्‍वर 700 वर्षापूर्वी होउन गेला, यावर कुणाचा विश्‍वास बसत नसेल. इवलंस रोप आणि त्याच्या प्रतिभेचा वेलू केवढा? तर गगनाला भिडणारा...सगळया ज्ञात अज्ञात जगताचं कोडं त्यानं आपल्या प्रतिभेच्या उत्तुंगतेतून उघडं केलं, हा वागविलासाचा केवढा मोठा प्रताप !
"मजवरी दया करा, ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा' अशी ज्ञानेशाची हळूवार समजूत काढताना लहानगी बहिण मुक्‍ताई आईची ममता अंगी शिरवून दुनियेची रितभात सांगते. तेव्हा ज्ञानेश्‍वरासारख्या प्रतिभावंतालाही आपल्या कर्तृत्वाची जाण यायला वेळ लागत नाही. मित्रहो असे "ज्ञानेश्‍वर' जेव्हा जेव्हा जन्माला येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या वाटयाला सा-या जगाचा उपहासच येत असतो. हा निसर्गनियमातील विरोधाभास, आणि तो निसर्गमान्य आहे, हेच खरे. उजेडाला व्यक्‍त व्हायला शेवटी काळोख हवा असतो !
ैहम घरमे जब दीप जलाने लगते है !
घरके अंधेरे शोर मचाने लगते है!!
कधी कधी चिंतातूर जंतूचं मात्र हसू येतं. त्यांची शंका अशी की सोळा वर्षाचा कोवळा मुलगा अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्‍वरी काय लिहितो.....21 व्या वर्षी समाधी काय घेतो.. इत्यादी..इत्यादी..(आमचा घोडया दहावीची परीक्षाही निट पास होत नाही. नापास झाल्यानंतर राजकारण किंवा क्रिकेटशिवाय त्याला काही येतही नाही...म्हणून)कविवर्य गोविंदाग्रजांची शपथ घेउन त्यांची माफी मागतो. असा विरोध करणे हेच चिंतातूर जंतूंचं एकमेव आणि पोष्टीक खाद्य असावं, अशी मलाही नाईलाजाने शंका यायला लागली! कदाचित निव्वळ विरोधावरच या जंतूचं पोषण उत्तमरित्या होत असावं, त्यामुळे त्यांना अनेक युगाचं आयुष्य आहे. जिते रहो...!!
सदया असे शंकासुर आणि चिंतातूर जंतूच समाजात युगेयुगे इतिहासाचं उत्खनन स्वतःच्या फायदयासाठी करताना दिसतात. आपल्या आपल्या कुवतीनुसार जातीपातीत संत, महापुरूषांची विभागणी करून त्यांना जातीच्या कोंदनात बसवून पुजा बांधली जाते.
मित्रहो, हा देश युवकांचा देश म्हणून सा-या जगात गणल्या जातो. परंतु येथील युवकाचे जगणे खरेच युवकासारखे आहे का? त्यांचे मानसिक वय किती वर्षाचे? असे प्रश्‍न निर्माण होतात. जी विद्याशाखा पुढे येते, युवक करिअरसाठी मोठया संख्येने त्या शाखेत प्रवेश घेतात, ती विद्याशाखा कालांतराने बेरोजगार करण्याइतकी पांगळी कशी काय होते, हेच कळत नाही. कुठलीही विद्याशाखा विस्ताराने खुप मोठी असते. तिथपर्यंत िंकंवा तिच्या आसपासही आपण पोहचू शकत नाही. आपण आपल्या प्रतिभाशक्‍तीच्या जोरावर त्या शाखेला अधिकाधिक समृद्‌ध करू शकतो, हे आमच्या गावीही नसते. म्हणून नवनविन संशोधनावर काय फक्‍त पाश्‍चात देशाचीच मक्‍तेदारी असावी?
ज्या समाजात प्रतिभावंत शास्त्रज्ञ , विचारवंत, कवी, कलावंत, खेळाडू जन्माला यायला हवेत, त्या समाजात जास्तीत जास्त संख्येने आता केवळ आणि केवळ "एकसारखे'च जन्माला येताहेत. जागोजागी मेंढराचे कळप तयार होताहेत. म्हणून आजचे "ज्ञानेश्‍वर' बेरोजगार होउन गल्लोगल्ली भटकताना दिसतात. त्यांच्या हाताला काम नाही. पुस्तकांच्या ठिकाणी मोबाईल आला आणि आमचे "ज्ञानेश्‍वर' आज फेसबुक, व्हॉटस्‌ ऍपवरून आपल्या कर्माच्या सुसाट ओव्या लिहित सुटले आहेत. या नवीन ऍप्सवरून नवीन नवीन अफवांचे पिक घेण्याचा मौसम अनुकूल होत आहे. नवनवीन शोध घेण्यापेक्षा स्वतःच्या फायदयासाठी एखादया विषयावर "जावई शोध' लावून एखादयाच्या चारित्रयावर शिंतोडे उडविण्यातच सगळी उर्जा वाया घालविली जात आहे. कट्‌टयावर बसून फालतू चर्चांत वेळ दवडू लागले आहेत. संशोधनाची अनेक क्षेत्र पादाक्रांत करण्याऐवजी "कॉपी पेस्ट' करून त्यात "मास्टरकी' मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे. मुळात पुस्तकांची आवड कमी झाल्यामुळे मोबाईलवर "गेम' खेळून आपल्याच जीवनाचा"गेम' करण्याकडे आपला "इस्ट्रेस्ट' वाढत आहे. पुस्तकाला "गुगल' हा पर्याय असूच शकत नाही, असे शहाणीसुरती माणसं म्हणतात.
आपली विज्ञानाविषयीची समजूतही फारच बाळबोध. शाळेत शिकत असताना जेवढे विज्ञान आपण आत्मसात केले त्यापुढे काकणभरही न सरकण्याची शपथ आपण शिक्षण पूर्ण होताच घेउन टाकतो. सदयाच्या काळात विज्ञान कितीतरी पुढे गेले आहे. त्यापैकी आपल्याला काय माहिती आहे. नवनवीन संशोधनांची शिखरे क्षणोक्षणी पादाक्रांत केल्या जाताहेत. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादालाही "क्‍वॉंटम थेरी'तून चॅलेंज मिळत आहे. अख्खे जीवनाचे संदर्भ बदलून टाकणारा अतिवेगवान क्‍वॉंटम कॉम्प्यूटर जन्मास येत आहे. भविष्यकाळात भौतीक शास्त्रातील अनेक सिद्‌धांत "ब्लॅक होल' किंवा कृष्ण विवरांमुळे मोडीस निघतात की काय अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. तरीही आपण मात्र वैज्ञानिक अहंकार जोपासतो आहोत. विज्ञानाचा अहंकार सांगून आपले "पुरोगामित्व' पुढे करण्याचा नवीन अंधविश्‍वास तयार होत आहे. मुळात बदलण्यापेक्षा अहंकार जोपसणे आपल्याला महत्वाचे वाटते. परंतु शास्त्रज्ञ मात्र आम्ही शून्य पॉईंट शून्यावर आहोत, अजून काही ठामपणे सांगू शकत नाही, असे प्रामाणिक कबुल करतात.
थोर शास्त्रज्ञ न्युटनला एकदा त्याच्या मित्राने विचारले की, तू हे सर्व शोध कसे काय लावतोस ? त्यावर न्युटन उत्तरला की मी महासागरातील अथांग पाण्यातील एक थेंब आहे. मी माझ्या मोकळ्या वेळात येशु ख्रिस्ताचे चिंतन करीत बसतो. आम्ही शास्त्रज्ञ शोध कसे लावले सांगू शकत नाही. आम्ही केमीकलमध्ये केमिकल मिसळतो. वायरला वायर जोडतो व त्या निष्काम प्रयत्नातून अचानक आमच्या डोक्‍यातून वीज चमकल्यासारखा लख्खकन प्रकाश पडतो व नकळत आमच्या हातून शोध लागून जातो. पण या क्रियेच्या पाठीशी एकमेव ईश्‍वर असतो, असे न्युटन म्हणतो तेव्हा आमच्या बुद्‌धीची किव करावीसी वाटते.
अलीकडे शे-दिडशे वर्षापूर्वी जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्याचे मुळ ज्ञानेश्‍वारीत सापडते, म्हटल्यास अतिशयोक्‍ती ठरणार नाही. सुर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सुर्याभोवती फिरते. हा शोध कोपर्निकसने दिडशे वर्षापुर्वी लावला. त्याचा हा सिद्धांत बायबल विरोध असल्यामुळे धर्ममार्तंडांनी त्याचा छळही केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सुर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्‍वरीत सातशे वर्षापुर्वीचे पृथ्वी सुर्याभोवती फिरते हे वैज्ञानिक सत्य मांडले होते. आणि उदो अस्तुतेनि प्रमाणे। जैसे न चालता सुर्याचे चालणे। तेसे नैष्कर्मत्व जाणे।
उदय आणि अस्त होत असल्यामुळे सुर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सुर्याचे न चालता भ्रम निर्माण होणे हा ज्ञानेश्‍वरांचा क्रांतीकारक शोध नाही का?
असे ज्ञानेश्‍वर पुन्हा पुन्हा निर्माण व्हावेत. तेव्हाच आम्ही "आता विश्‍वात्मके देवे, येणे वागज्ञे तोषावे' अशा पसायदानातून सा-या जगात विश्‍वाचा महागुरू होण्याचे स्वप्न उराशी बाळगू शकतो. म्हणून ज्ञानेश्‍वरांवर टिका करणा-यांनी ते आपल्या गोड भाषेत काय सांगतात, याकडे लक्ष द्यावे.
माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती-धर्मात व्हावा, आईवडिल कसे असावेत, हे माझया हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्‌दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्‍कीच सुखी करू शकतो. मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दुःख करीत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे, त्याबाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल ती संधी मी गमाविता कामा नये.
विजयकुमार राउत
8888876462


गुरुवार, 9 फ़रवरी 2017

अक्‍कल नाय? डोन्ट वरी.....


                                                                                                                 *विजयकुमार राउत
अक्‍कल नावाची काही गोष्ट आहे का तुझयाकडे? थोडी अक्‍कल तर वापरत जा ! परमेश्‍वराने अक्‍कल वाटली तेव्हा कोठे होतास रे?अशी वाक्‍ये नेहमीच्याच परिचयातली. अक्‍कल म्हणजेच सर्वस्व. थोडी चूक झाली की अक्‍कलेत कच्चे असलेल्यांना अक्‍कलवानांकडून टोमणे खाणे ठरलेलेच. बरं जो अकलेवरून इतरांना कमी लेखतो त्याने किती अकलेचे दिवे पाजळले याचा हिशेब मागायचा कोणी? काही जण दिवसरात्र "अकलेचेच तारे' तोडत बसतात. मित्रहो, सचिन तेंदुलकरने कुठली डिग्री घेतली? टाटा, धीरूभाई अंबानीनी कुठल्या "एमबीए'त गोल्ड मेडल मिळविले ? लता मंगेशकर यांनी गायनात कुठल्या विद्यापीठातून "पीएचडी' केले. देशविदेशात प्रत्येक मैफलीत "वाह उस्ताद' ही दाद घेण्यापूर्वी उस्ताद जाकीर हुसेन यांनी कुठल्या कॉलेजमधून "मेरीट' घेतले नाही. अशी अनेक उदाहरणे मिळतील. मग आपल्याजवळ "ती' नसली तर काय बिघडतं? असं कदाचित अक्‍कलशून्य माणसाला एखादवेळेस वाटू शकेल. परंतु अकलेच्या महाभागांना मात्र दुस-याजवळ नसलेल्या कुठल्यातरी नेमक्‍या अकलेबद्‌दल मरदुमकी वाटत असते आणि मग त्याच्या बुद्‌धीमत्तेवर अगदीच तोंडसुख घेणे म्हणजे शहानपणा समजतात. अक्‍कल नसली तर समाजात जगणंच अशक्‍य. बरं अक्‍कल आहे किंवा नाही हे कोणी ठरवावं?
बरं आज बुद्‌धीचे मापन करणा-या "आयक्‍यू'सारख्या "टेस्ट' खूप मागे पडल्याचे दिसून येते. एखाद्या क्षेत्रातील जेमतेम ज्ञान असणे आता "आउटडेट' होत आहे. आता नवनवीन संकल्पना उदयास येत आहेत. ज्ञानविज्ञानाच्या कक्षा अधिकाधिक विस्तारीत होत आहेत. शैक्षकि मानसशास्त्रात आणखी नउ बुद्‌धीमत्ता जोडण्यात आलेल्या आहेत. दिवसेंदिवस नवनविन संशोधनातून पुढे येणा-या बाबीनुसार आता बुद्‌धीच असून चालत नाही. केवळ बुद्‌धी आणि बुद्‌धीच्या भरवशावर जगणारे पदोपदी मागे पडताना दिसतात. जुन्या संकल्पना नव्याने तपासून बघीतल्या जात आहेत. जुन्याला नवीन संकल्पनांची जोड देण्यात येत आहे. या संकल्पना नविन चष्म्यातून पाहण्यात येत आहेत. एवढच काय ते नाविण्य ! एरवी भारतासारख्या देशात या संकल्पना खूप खूप वर्षापूर्वीही होत्याच, हे आपण जाणतोच. या देशात तथागतांच्या बाबतीत "महाकारूनिक' आणि भगवान शंकराच्या बाबतीत "करूणावतारम' म्हटल्या जातं. "थर्ड आय' आणि "सम्यक ज्ञान' या अगदी समान संकल्पना. समाजातील असामान्य माणसं केवळ बुद्‌धीच्या भरोशावरच पुढे गेलीत का, याचा कित्येक दिवसापासून आढावा घेतला. असं लक्षात आलं की ज्या निसर्गानं आपल्याला मेंदू , ह्रदय यासारखी इंद्रीये दिली, त्याचा वापर कशासाठी करायचा? प्रत्येकाचं एक मर्यादित क्षेत्र आहे. प्रत्येकाचं कामही वेगवेगळं आहे. " IMGINATION IS GRATER THAN KWOLADGE* असं म्हणणारा असामान्य बुद्‌धीमत्तेचा धनी असलेला अर्ल्बटही आईनस्टाईनही काहीसं हेच सांगतो.
काल परवापर्यंत शाळेत पहिल्या बाकावर बसणारा मुलगाच "स्मार्ट' समजल्या जायचा. रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनमधील निसर्गरम्य ठिकाणी मातीत खेळणारे विद्यार्थी असोत नाही तर अमिर खानच्या "तारे जमिनपर' चित्रपटातील मंदबुद्‌धी समजला जाणारा विद्यार्थी. मंदबुद्‌धी म्हणून शाळेतून काढून टाकलेल्या "न्यूटन'चेच उदाहरण घ्या. या देशात महान प्रतिभेचा शोध घ्यायचा असेल तर शेवटच्या बाकावरून घ्यावा लागेल, असे वक्‍तव्य डॉ.अब्दुल कलाम करतात,
"आयक्‍यू' सोबत आता तुमच्यात "ईक्‍यू' भावनिक बुद्‌धीमत्ता त्याचबरोबर "एसक्‍यू' आध्यात्मिक बुद्‌धीमत्ता नसेल तर बौद्‌धीक बुद्‌धीमत्ता कामाचीच नसल्याचे सिद्‌ध होत आहे. व्यक्तीच्या विकासात तार्किक बुद्धीइतकंच भावनेचंही महत्वव पुढं लक्षात येऊ लागलं आणि त्यातून भावनिक बुद्धिमत्ता ही डॅनियल गोलमन यांची संकल्पना पुढं आली. "इ' म्हणजे एनर्जी आणि मोशन म्हणजे गती यातून "इमोशन'शब्द आला. व्यक्‍तीच्या अवचेतन मनातील विचारांना सकारात्मक भावनांची जोड दिली तर स्वप्नांनासुद्‌धा पाहिजे तो आकार देता येतो, हे आजवरच्या महान प्रतिभावंताच्या कृतीतून दिसून येते. परंतु एवढयावरच संपले नाही तर आणखी एका बुद्‌धीमत्तेची गरज निर्माण झाली. त्याच्यापाठोपाठ गोलमन यांनी सामाजिक बुद्धिमत्ता या संकल्पनेचाही पुरस्कार केला. त्याचबरोबर बहुविध बुद्धिमत्ता ही हॉवर्ड गार्डनर यांची संकल्पना शैक्षणिक मानसशास्त्रात प्रचारात आली. या सगळ्या घडामोडींनंतर बुद्धिमत्तेच्या नऊ वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार सुरू झाला. त्याचबरोबर "एसक्‍यू'ही नव्याने आलेली संकल्पना सदया अख्ख्या जगात रूळली आहे. डॅना झोहर, सिंडी विगल्सवर्थ यासारख्या अभ्यासकांनी आध्यात्मिकता हा विषय केवळ धार्मिक अथवा तात्विक स्वरूपाचा नसून, मानसशास्त्रीय असल्याचं सांगून त्याला प्रायोगिक मानसशास्त्राचा आधार दिला. त्यासंबंधीच्या मेंदूविषयक संशोधनाची जोड दिली आणि त्यातून माणसाच्या आध्यात्मिक वृत्तीचा शास्त्रशुद्ध वेध घेतला.
लता मंगेशकर, पं.जसराज, झाकीर हुसेन, सत्यजित राय, एम एफ हुसेन आदी कलाकारांच्या बुद्धिमत्तेची जातकुळी वेगळी असते. मॅराडोना, सचिन तेंडूलकर, सायना, आनंद इत्यादी क्रीडापटूंची बुद्धिमत्ता शारीरिक बुद्धिमत्ता या प्रकारात मोडते. काहींना नाते-संबंध, मैत्री जोडण्याची व ती टिकवून ठेवण्याची कला अवगत असते. इतर काही आपल्या संभाषण चातुर्यातून वा प्रसन्न व्यक्तिमत्वातून कुणालाही आत्मसात करू शकतात व आपला कार्यभाग उरकून घेतात. काही जण व्यवहारकुशल असतात. अशा प्रकारे बुद्धिमत्ता या शब्दात समस्यांचे विश्‍लेषण करून उत्तरं शोधण्याची कुशलता, शैक्षणिक परीक्षेतल्या यशासाठी लागणारी हुशारी, साहित्य, संगीत इत्यादी ललित कलाप्रकारांसाठी लागणारी सर्जनशीलता, आर्थिक, राजकीय व सामाजिक यशासाठी लागणारे व्यावहारिक चातुर्य व क्रीडाक्षेत्रात नाम कमावण्यासाठी लागणारे कौशल्य अशा विविध गोष्टींचा समावेश करता येईल. भावनिक बुद्‌धीमत्ता वाढविण्यासाठी उत्तमोत्तम साहित्य वाचणे, संगीत ऐकणे, कविता करणे, चित्र काढणे यासारखे छंद जोपासता योत. प्रत्येक माणूसच संवेदनशिल असतो. परंतु त्याला आपल्या भावनांना निकोप बनविणे सहसा जमत नाही. भावनेच्या आहारी जाउन तो स्वतः कमकुवत करीत असतो. चित्रपट, नाटकातून अभिनय करणारा कलावंत काय करतो? भूमीकेत शिरून आपली भावनिक बुद्‌धीमत्ता पणाला लावूनच तो यशस्वी होत असतो. कला क्षेत्र भावनिक भूक भागविण्याचे उत्तम माध्यम आहे. त्यानंतर अध्यात्मिक बुद्‌धीमत्ता कुठल्या धर्माशी जोडत नाही, तर आपले आपल्याशीच, आपल्या अस्तित्वाशी जोडत असल्यामुळे व्यवहारासोबतच जीवनातील प्रत्येक प्रसंगात यशस्वी होण्याचा मंत्र देते. प्रत्येक व्यक्‍ती काही ना काही वैशिष्टये असतात. ती शोधली तर आपल्याच "विक प्वाईंट'वर स्वार होउन यशाच्या दिशेने पुढचा प्रवास करता येतो. म्हणून आपल्याकडे काहीच नाही...म्हणून कुढत बसण्यापेक्षा तुमच्यातील उत्तम, सर्वोत्तम शोधले तर तुम्हीही जगात अप्रतिम होउ शकता. हे केवळ मी सांगत नाही, तर अलीकडचे संशोधन सांगते.
gazalesathi.blogspot.com

गुरुवार, 20 अक्टूबर 2016

सुफींचा स्वच्छंद


परमेश्‍वर भक्‍ती म्हणजे काय? किंवा अध्यात्म म्हणजे काय? तर निसर्गनियमाप्रमाणे जीवनाला निसर्गाशी जोडून केलेला चोख व्यवहार. या निसर्गापासून आपण जसजसे दूर होऊ लागतो तसतसे जीवनात अनेक प्रश्‍न निर्माण करून आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. निखळ हास्य ही मानवाला मिळालेली अप्रतिम अशी देणगी आहे, आणि तोच त्याचा स्वभावही. वेद-उपनिषदांत सांगितल्याप्रमाणे अन्नकोष, मनकोष, प्राणमय कोष, विज्ञानमय कोष आणि आनंदमय कोष असा तो प्रवास आहे. "अन हल हक'ची साद देत रस्त्याने मस्तीत नाचत सुटलेला सुफी संत मंसूर खऱ्या धर्माचे अंतरंग उलगडतो. सुफी संप्रदायाचे तत्वज्ञान जीवनाच्या लयीशी तादात्म्य साधण्याचा एक छंद आहे, असं म्हटलं तरी चालेल.
प्रत्येक धर्माचं सारही हेच आहे. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती. मग ही जीवन जगण्याची काही सूत्रे प्रत्येक धर्माने सांगितलेली आहेत. त्यापैकीच "आनंद' हेच समान सूत्र जगाच्या पाठीवर सगळीकडेच पाहायला मिळते. कुठल्याही धर्माचं अध्यात्म हे शरीर आणि मनाच्या पलीकडे जाऊन शुद्ध आत्म्यापर्यंत पोहचविणारा प्रवास असतो. त्यासाठी मानवनिर्मित अंधश्रद्धेत शिरण्याची काहीही गरज नसते. खरे अध्यात्म हे तुमचे तुमच्याशी असलेले नाते जोडून देणारे शास्त्र आहे. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे म्हणजेच अध्यात्म होय. स्वतः निरोगी राहून "जगा आणि जगू द्या' या ध्येयापर्यत नेतो तो धर्म.
वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रातील कष्टकरी, कामकरी, शेतकरी या वर्गाला जीवन जगण्याचे साधे, सोपे तत्वज्ञान दिले. म्हणून प्रत्येक घरातील माणसामाणसांपर्यंत भक्‍तीचा वारसा पोहचला. "आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणणारे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर असोत वा कुठलाही सुफी संप्रदाय केवळ आनंद आणि परोपकाराचे तत्वज्ञान सांगतो. सूफी हा एक उदारमतवादी संप्रदाय आहे. धर्म आणि आचाराच्या क्षेत्रात सूफीचे स्थान विशिष्ट आहे. देश, वर्ग आणि कोणत्याही विशिष्ट धर्मापलिकडे त्याचे अस्तित्व आहे. आंतरिक भावनेला महत्व देणारा हा संप्रदाय असल्यामुळे तो संवेदना जपताना दिसतो. म्हणून "आनंद' ही संवेदना संप्रदायात खोलवर रूजलेली दिसते.
हिंदू धर्मातील संप्रदायांप्रमाणेच काही अहिंदू संप्रदायांनीही महाराष्ट्रीय जनतेवर छाप बसविली. अशा संप्रदायांपैकीच एक स्वच्छंदी संप्रदाय म्हणजे सुफी.
निर्गुण, निराकाराची भक्‍ती अगदी सुफी पंथातही पहायला मिळते. वारकरी पंथात सगुण, साकार रूपातून निर्गुण, निराकाराशी नाळ जोडण्याचं काम संप्रदायातील संतांनी केलं. तसंच मुस्लीम धर्मातही सुफी पंथीयांनी सर्वांचा ईश्‍वर एकच आहे, अशी शिकवण दिली. हे करीत असताना मनाची निरामय अवस्था आणि आनंद हेच जीवनात हातात हात घालून प्रवास करीत असल्याचे दिसते. हा प्रवासच उच्चतम अवस्थेपर्यंत नेणारा आहे. अभिजात सूफी विद्वानांनी सुफी मताची व्याख्या "ज्या शास्त्राचे उद्दिष्ट हृदयाची दुरुस्ती आणि ईश्वर वगळता इतर सर्व गोष्टींकडे त्याला पाठ फिरविण्यास लावणे असे शास्त्र' अशी केली आहे. विख्यात भारतीय गूढवादी ओशो रजनिस यांच्या म्हणण्यानुसार सूफी मत हे नाव बाहेरच्या व्यक्तींनी दिलेले असून कोणताही सूफी त्याला "मत' समजत नाही. "परमेश्वराशी असलेले, अंतिम सत्तेशी असलेले, समग्रतेशी असलेले प्रेमप्रकरण म्हणजे "सूफी' अशी व्याख्या त्यांनी केली आहे. गॅब्रिएल या देवदूताने प्रेषित महम्मदाजवळ उघड केलेली उपासनेची पद्धत (एहसान) आपण आचरीत आहोत, असा सुफींचा विश्वास आहे.
सुफी हा गूढवादी मुसलमानांचा पंथ होय, असं म्हटल्या जातं. या शब्दाच्या व्युत्पत्तीबद्दल बरेच मतभेद आहेत. तरी त्याचा अर्थ निश्‍चित आहे. इस्लामी धर्मांत गूढवादाचा आरंभ सातव्या शतकात झाला. हा गूढवाद ख्रिस्ती धर्माच्या परिणामामुळें फकिरी वृत्तीनें राहण्याची प्रवृत्ती मुसलमानांमध्यें उत्पन्न झाली. कारण सुफी पंथी सुप्रसिद्ध इसम मूळचे फकिरी वृत्तीचे होते. सुफी पंथ हा मुख्यतः पुराणमतवादी, ;ऑर्थोडॉक्‍स होता. मूळच्या फकिरी वृत्तीच्या सुफी पंथीं इसमांच्या विचारांना व मतांनां इस्लामी तिस-या शतकांत नवे वळण लागले. अल्ला हा एकच शाश्वत व अविनाशी असून बाकी सर्व गोष्टी नश्वर आहेत, वगैरे अर्थाची वाक्‍ये कुराणांत आहेत. सुफी पंथी विद्वानांनीं हाच सर्वेश्वरवाद ;पॅनथीइझम प्रस्थापित केला. हे सर्वेश्वरी मत सुफीपंथी गूढवादी विद्वानांनीं स्वयंप्रेरणेनें व कुराणाच्या आधारानें प्रतिपादन करण्यास सुरुवात केली असणे शक्‍य आहे. तथापि त्याच्या विचारांवर ख्रिस्ती धर्म, प्लेटा मत व बौद्ध धर्म यांचा परिणामही झाला असला पाहिजे ही गोष्ट निर्विवाद आहे.
सुफी पंथींयांनी कुराणाच्या प्रत्येक वाक्‍यांत व शब्दांत गूढार्थ अभिप्रेत आहे, असे प्रतिपादन सुरू केले. त्यामुळे कुराणांतील एकाच वाक्‍याचे अनेक व परस्परविरोधी अर्थही सुफी लोक करू लागले .म्हणून सुफी लोक म्हणजे एक विशिष्ट मतवादी पंथ आहे असे म्हणता येत नाहीं. तरी पण कुराणाचा खरा अर्थ आम्हांलाच समजतो असे सुफी लोक मानतात. तदनुसार कुराण स्वतःच्या शिष्यवर्गाला शिकवितात. पुढे गूढार्थपर कविताही पुष्कळ होउन फारशी वाङ्मयांत अबू सय्यद, फरीदुद्दीन अत्तार ; जलाल अल दीन रूमी ; जामीए महमूद शबिस्तरी, इब्न अल्‌ फरिद, इब्न अल्‌ अरबी, नेमिसी वगैरे कवी ललामभूत आहेत. सुफी संप्रदायाने समाजाच्या निकोप वाढीसाठी आपल्याला संगीत, काव्याची भेट दिली यावरून मानवी जीवनाच्या उत्थानाबरोबर एकंदर मानवी मनही घडविण्याचे काम सुफींनी केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ध्यान ही "स्वबोधा' ची यात्रा आहे. माहितीकडून ज्ञानापर्यंतचा हा प्रवास आहे. आपल्या अंतरंगाची साफसफाई करणारी प्रत्येक साधना आहे. प्रपंचातच वरवर रमताना लाटांचा कल्लोळ असणारच. खरी परमार्थाची यात्रा अंतरंगाकडे आहे. अंतरंगात समुद्राच्या तळाशी फक्त शांतता आहे. अक्षय आनंद आहे. सुफींनी ध्यानाची त-हा मात्र स्वछंदी, मस्त धुंद स्थितीत परमेश्‍वराच्या भक्‍तीकडे जाण्याची निवडली.
शिवाजी गोर्ले यांच्या शब्दांत, आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. सुख - दुःख या संवेदना आहेत, आनंद ही अनुभूती आहे. खरा आनंद हा सुख दुःखाच्या पलीकडचा असतो. आनंद मानण्यावर असतो. आनंद कणाकणानं आणि क्षणाक्षणानं मिळवायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. भूतकाळ मृत असतो, भविष्यकाळ अनिश्‍चित असतो. म्हणूनच आनंद हा वर्तमानात जगण्यात असतो. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्तं आहेत. आनंद हीच यशाची पहिली पायरी असते. आनंद हीच यशाची अंतिम कसोटी असते.
"इट इज सिम्पल टु बी हॅपी...बट इट इज डिफिकल्ट टु बी सिम्पल'. म्हणून आनंदाची सुत्रे सांगणारा सुफी असो वा अन्य कोणताही संप्रदाय ख-या अर्थांने आनंदापर्यंत पोहविणारेच शास्त्र आहे.

विजयकुमार राउत
साईनगर, ट्रॅक्‍टर कंपनी चौक
हिंगणा रोड , नागपूर
8888876462

 
Blogger Templates